एकलव्य 'कांताराम'
मी जरी लहानपणापासून पाचगणीत राहत होतो तरी काही ना काही कारणाने आमचे येणे वाईला व्हायचेच . वाईत आलो की जुन्या शॉर्टकट ने घाटावर यायचो . घाटावर आले की ढोल्या गणपतीचे देऊळ त्याच्या शेजारचे काशी विश्वेशराचे मंदीर त्यावरील कोरीव काम, घाटाची काळया दगडात केलेली सुबक बांधणी, रचना, कृष्णेचे वाहणारे पाणी व परिसर हा माझ्या आवडीचा भाग कधी झाला हे माझे मलाच कळले नाही . पुढे कॉलेजला सायन्स शिकायला दोन वर्ष वाईला होतो ,त्यावेळेपासूनच घाटाची चित्रे काढायचा छंदच लागला .
जसजशी चित्रात प्रगती होत गेली तशी घाटावर वारंवार येण्याची इच्छा अनावर होवू लागली . चित्र ,रेखाटन, वॉटर कलर करताना खूप गर्दी व्हायची . घाटाच्या आजुबाजूला हळूहळू कातकरी समाजाच्या छोटया छोट्या झोपड्या वाढू लागल्या होत्या . त्या घाट परिसरात खूप घाण दिसतात व कचरा करतात , त्या कातकऱ्यांची उघडी नागडी पोरं पाण्यात व परिसरात बिनधास्त फिरायची आजही फिरतात . त्यांचा पाण्यात डुंबत बसण्याचा ,मासे पकडण्याचा उदयोग सातत्याने चालूच असायचा. ( व आजही चालू आहे )चित्र काढताना ह्या पोरानां हाकलणे हा अधूनमधून मोठा त्रासच व फालतू त्रासदायक प्रकार असायचा. त्यावेळी आठवतेय एक छोटा पोरगा माझ्या मागे हळूच येवून उभा असायचा. व शांतपणे मला चित्र काढताना तो निरखून पहात राहायचा .मी अधून मधून सगळ्यानां काम थांबवून हाकलून द्यायचो . पण हा पोरगा मात्र मी ज्या ज्या वेळी घाटावर जायचो त्यावेळी हमखास भेटायचाच. माझ्या माघावरच असायचा .मी देखील हळूहळू त्याला हाकलणे सोडून दिले . त्याला नाव विचारले तर म्हणाला कांताराम . पुढे हेही कळाले की तो त्या नदी शेजारच्या झोपडीत राहतो व त्याचे आईबाप जाळी घेऊन मासे पकडण्याचा धंदा करतात , व त्याची परिस्थिती देखील खूप खराब होती . कांताराम शाळेत कमी व घाटावरच जास्त असायचा . पुढे मी आर्ट कॉलेजला पुण्याला गेलो . अधूनमधून स्केचिंग करायला गेलो तर कांताराम हजर असायचाच जणू प्रत्येक चित्रकार कधी ना कधी येणार व तो त्याच्यासाठी देवच असल्याप्रमाणे वाट पहात बसायचा . कांतारामने आता शाळा सोडली व तो चित्र काढत घाटावरच असतो हेही कळले होते. मधे बरीच वर्षे गेली व मी मुंबईला गेलो . वाईचा संपर्क तुटला होता .
आज बऱ्याच वर्षांनी वाईच्या गंगापूरी घाटावर छोटया पायवाटेवर एका दगडी पायरीवर बसून मी मंदीराची स्केचेस करत होतो . परत त्या कातकरी पोरांचा त्रास सुरू झाला, गर्दी वाढू लागली व या त्रासदायक प्रकारामूळे मला अचानक कांतारामची आठवण झाली. दहा बारा वर्षाचा गॅप पडला होता . मग त्या येणाऱ्या जाणाऱ्या पाच सहा पोरानां मी कांताराम विषयी विचारले पण त्यानां सांगता आले नाही . मग जरा वेळाने दुसरा जरा मोठा दिसणारा मुलगा आला. त्याला विचारले तर म्हणाला मी कांतारामचा चुलतभाऊ , कांताराम आता पेंटर झालाय . मग त्याने त्याचा मोबाईल नंबर दिला .कांतारामला मी स्केच संपल्यावर फोन लावला तर म्हणाला थांबा जावू नका ,दहा मिनिटात येतो . कांताराम आला व पाया पडू लागला, मी मध्येच त्याला थांबविला तर म्हणाला आज थांबवू नका . आता मी मोठा झालोय, माझा एक पोरगा अकरावीला व एक नववीत शिकतोय . त्यानां शाळा शिकवणार आहे .धाकटयाला शाळेत सोडायला गेलो म्हणून उशीर झाला . तुमच्या सारखंच मला बनायचं होतं . मग मी देखील चित्रे काढू लागलो .आता माझ्याकडे मोटरसायकल आहे , मी आता शाळेत पेंटीग्जची , महाबळेश्वरच्या वेण्णा लेकच्या बोटीवर चित्र काढण्याची, साईन बोर्डांची जी मिळेल ती कामे करतो . माझ्याबरोबर माझे अजून दोन मित्र संतोष केळघणे व पंकज सणस हे देखील असतात . आम्ही सर्वजण मिळूनच काम करतो . खूप कामे असतात , तुमची लई आठवण येते . तुम्हाला भेटायला ते दोघेही येत आहेत .पळत निघालेत .थोड्याच वेळात तेही दोघे आले व आल्या आल्या पाया पडायला लागले . मी त्यानां थांबविले तर म्हणाले तुमच्या सारखीच आता चाळीस हजारांची आर्ट विषयी पुस्तके घेतलीत .आमचं आता बर चाललयं . आमची धडपड नेहमी चालू असते .तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती .तुमच्याकडे एकदा येवू .कारण आता आम्हाला महाबळेश्वरला जायचंय. सिझन चालू झालाय, शिवाय स्वच्छता अभियान सुरू असल्याने खूप भिंती रंगवायच्या आहेत . त्यावर आम्ही अॅकलिक किंवा ऑईल पेंटने चित्रे काढतो . साईन बोर्ड रंगवितो, सायकलवर नावे टाकतो .जी कामे मिळतील ती सर्व करतो , पण आता निघतो, कारण जरा आज उशीर झालाय एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन निवांतपणे भेटण्याचे आश्वासन घेेऊन ते निघून गेले .
कांतारामचा व त्याच्या मित्रांचा डिप्लोमा नाही, त्याचे कोणतेही कला शिक्षण नाही . त्याला व त्याच्या मित्रानां आर्ट फिल्ड माहीत नाही . आर्ट फिल्डच्या प्रदर्शनाची , तिथल्या घडामोडींशी , मार्केटशी, चित्रकारांच्या संघर्षाशी , त्यांचा काही संबध नाही . त्याची त्यानां जाणीवच नाही . कारण त्यांचा मार्ग त्यानां सापडला आहे .एकलव्या प्रमाणे त्यांचा त्यांनीच शोधून काढला होता त्यांची कोणाशी स्पर्धा नाही व नव्हती .निर्व्याज मनाने ते त्यांच्या कार्यात मग्न आहेत . आणि अनेक क्षेत्रातील तरुण मंडळी पाच वर्षाचे उच्च शिक्षण घेऊन काय पुढे करायचे ? नोकरी कधी मिळणार ? संधी कधी मिळणार ? यश कधी मिळणार ? पुढे आमचे भविष्य काय होणार या धास्तीने कुथत जीवन जगत असतात . पण कांताराम सारखी मंडळी त्यांची वाट न पहाता जे समोर येईल ते व स्विकारत पुढे जात राहतात .
बीज अंकुरे , अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत .
कसे रुजावे बियाने, माळरानाच्या कुशीत ?
पण हे बीज तर माळरानाच्या कुशीत रुजलेले दिसत होते .व त्याची वाढ ही चांगली चाललेली दिसत होती .
आता मात्र मी कोणालाच दूर लोटत नाही , किंवा चित्र काढताना हाकलून देत नाही . कारण माझ्या चित्र कामाचे साहीत्य आवरुन ज्यावेळी मी माझ्या फोर व्हिलर कारमध्ये निघतो त्यावेळी मला त्याच्यांत उद्याचा एखादा एकलव्य कांताराम दिसत असतो . एखादा सुनिल काळे दिसत असतो . आणि मग मी माझ्या अशा अनेक ज्ञात अज्ञात गुरु जणानां मनातूनच मनःपूर्वक नमस्कार करून पुढे प्रवास करत राहतो . अशा एकलव्यांच्या मार्गात काटे न टाकता अंगठा न मागता फक्त थोडासा दिलासा, धीर, आधार दिला तर त्यांचाही प्रवास थोडा सुखकर होईल याची प्रत्येकाने थोडी जाणीव ठेवली तर किती मजा येईल ना ? आपल्या सगळ्यांचा प्रवासाला .
[कातांराम आता वाई नगरपालिकेत
नगरसेवक म्हणून कार्यरत आहे आणि उत्तम काम करून अनेक नव्या एकलव्यांच्या जडण घडणीत मदतही करत आहे. ]
सुनिल काळे (9423966486 )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा