ब्लॉग संग्रहण

बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३

रियाज

रियाज
🌟🌟🌟
          वाईवरून पाचगणीकडे निघालो की वळणावळणाचा पसरणी घाट सुरु होतो . या घाटातून प्रवास करताना आजही मी भारावून जातो . मनातल्या मनात कितीतरी आठवणी जपल्यात या घाटाने . १२वी सायन्स शिकत असताना पास काढलेला असायचा . रोज पाचगणी -वाई  एसटी ने प्रवास करायला लागायचा . हॅरिसन फॉली (थापा पॉईंट) संपला की पांडवगड ,मांढरदेवीचा डोंगर दिसू लागतो . आणि मग पसरणी , एकसर , कुसगाव , अशा अनेक गावातील शेतकऱ्यांनी केलेली भातशेती दिसायची . त्या भातशेतीत तुंबवलेले पाणी सुर्यप्रकाशामुळे चमकायचे व एक वेगळीच चित्रांची दृश्यमालीका दिसायला लागायची .आजही हा प्रवास करताना मला सृष्टीमध्ये हिरवागार नवचैतन्याचा बहर नेहमी फुललेला दिसून येतो .
           चित्रकला महाविद्यालयात जाण्याचे ठरले होते आणि त्यासाठी इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा द्यावी लागते अशी माहीती मिळाली . त्या परिक्षेत A ग्रेड मिळाले तर कला महाविद्यालयात लगेच प्रवेश मिळतो असेही समजले .  त्यामुळे मी वाईला केंद्र असलेल्या द्रविड हायस्कूलमध्ये प्रथमच आलो . प्रवेश करताना एका शाळेच्या शिपाईमामाने अष्टपुत्रेसरानां भेटायला सांगितले . इमारतीच्या शेवटच्या टोकाला एक जीना होता त्या जीन्यातुन गेलो की उजव्या बाजूला भलामोठा चित्रकला वर्ग होता .
            अष्टपुत्रेसरांची काही निसर्गचित्रे त्या वर्गात लावलेली होती . वाईच्या घाटात जशी वडाची झाडे होती तशाच प्रकारे जलरंगातील ती चित्रे पाहून मी भारावलेल्या अवस्थेत अष्टपुत्रेसरांच्या पाया पडलो आणि त्यानां माझा कलामहाविद्यालयात जाण्याचा विचार सांगितला . अष्टपुत्रेसर मनापासून हसले आणि अगोदर ग्रेड परिक्षा द्या  मग चित्रकार होण्याची स्वप्ने नंतर बघा अशी तंबी देऊन म्हणाले रियाज करा , रियाज करण्यावाचून गत्यंतर नाही . रियाज करा . रियाज करा .
               मग मी रियाजाच्या मागे लागलो . रियाज करायचा म्हणजे काय हे माहीत नव्हते .पण सतत चित्रे काढायची म्हणजे रियाज करायचा एवढे ठरवून ग्रेड परिक्षा दिली आणि खरोखर A ग्रेड मिळाले . मग पुन्हा अष्टपुत्रेसरांच्या घरी जाऊन मार्गदर्शनासाठी पाया पडलो व निसर्गचित्रे कशी काढायची ते शिकवा अशी विनंती केली . मग अष्टपुत्रेसर पुन्हा हसले . शांतपणे म्हणाले ही माझी डायरी आहे आजची तारीख मी यामध्ये लिहून ठेवतो . आजपासून बरोबर एक वर्षाने म्हणजे 365 दिवसांनी तू मला भेट . रोज एक चित्रे काढायचं , त्या चित्राच्यापाठीमागे तारीख टाकायची अशी एक वर्षाची 365 चित्रे झाली की मला चित्रांचा गट्टा घेऊन भेटायला ये मग मी तुला निसर्गचित्रे कशी काढायची याचे मार्गदर्शन करतो . रियाज करा , रियाज करा, रियाजाशिवाय गत्यंतर नाही . खूप खूप शुभेच्छा ! असे सांगून त्यांनी बाहेर जाण्याचा दरवाजा दाखवला .
           पुण्यात अभिनव कला महाविद्यालयात आलो त्यावेळी विद्यार्थी सहाय्यक समिती या वसतिगृहात राहायचो . कमवा शिका योजना व अनेक अडचणीनां तोंड द्यावे लागायचे . पण रोज एक चित्र काढायचोच . त्यापाठीमागे तारीख लिहून ठेवायचो रोज डायरीत चित्र काढतानाचा अनुभव लिहून ठेवायचो . एक वर्ष झाल्यानंतर अष्टपुत्रेसरानां भेटायची ओढ लागली होती . कारण मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे 365 चित्रे पूर्ण केली होती त्यानंतर ते मला निसर्गचित्रे काढायला शिकवणार होते .
            विद्यार्थी सहाय्यक समिती या हॉस्टेलवर रहात असताना माझे पर्यवेक्षक तांबोळीसरांबरोबर काही गोष्टींमूळे मतभेद झाले व मी एकवर्षानंतर कायमस्वरूपी या वसतिगृहातून बाहेर पडलो . कॉलेजला मे महिन्याची सुट्टी लागली होती . वसतिगृह बंद झाले व मला पाचगणीला सर्व सामानाशिवाय परत जाणे एवढाच पर्याय शिल्लक राहीला. माझे सर्व सामान बांधून मी परत निघालो .
            रिक्षाने स्वारगेट स्टेशनला आलो . त्याकाळी एसटीशिवाय पर्याय नव्हता . टॅक्सीने जाण्याची ऐपत नव्हती . स्वारगेट स्टेशनला प्लॅटफार्मवर आलो तर तोबा गर्दी . मे महिन्यात उन्हाळी सिझन सुरु झाल्याने सर्व गाड्या पुणे स्टेशनवरूनच भरून यायच्या त्यामूळे तीन चार गाड्या सोडल्या . शेवटी संध्याकाळची शेवटची गाडी आली . तोपर्यंत एका हमालाला सांगून चित्राच्या फाईली व माझ्या सर्व बॅगा टपावर नीट व्यवस्थित बांधण्यासाठी पैसे ठरवले . त्यासाठी त्याची हमाली अगोदरच दिली .एसटी आल्यानंतर घाईने गर्दीत घुसलो पण बसायला काय उभे राहण्यासाठीसुद्धा जागा नव्हती . हळूहळू प्रवास करत एसटी वाई स्टेशनला आली आणि मग बसायला जागा मिळाली .
            वाई ते पाचगणी घाटातून जाताना मी प्रवासात खूप खूष झालो होतो . बसायला खिडकीशेजारी जागा मिळाली होती . घाटातील वनश्री , झाडे , छोट्या छोट्या तुकड्यांची शेती , पांडवगड व थंडगार भन्नाट वेगाने वाहणारा वारा मनाला सुखावत होता . वाऱ्याच्या उलट्या दिशेने एसटी वेगाने चालली होती , बुवासाहेबाचे मंदीर पार करून आता नागेवाडीच्या १६ नंबर स्टॉपवर एसटी थांबणार होती .
            पण या स्टॉपवर बस थांबायच्या अगोदरच एसटी अचानक थांबवली होती . एसटीचा ड्रायव्हर गाडी थांबवून खाली उतरून आकाशाच्या दिशेने पहात होता . आकाशात हजारो कागद पक्षांप्रमाणे हळुवारपणे तरंगत तरंगत पसरणीच्या खोल दरीत उडत चालले होते व ते एसटीच्या टपावरून उडत होते . क्षणार्धात माझी तंद्री भंग पावली व सगळा प्रकार माझ्या लक्षात आला . भराभर धावत वेगाने खाली उतरून मी एसटीच्या टपावर चढलो . माझ्या सामानाच्या बॅगा वजनदार असल्याने तशाच होत्या पण चित्रांच्या पोर्टपोलीओच्या फाईली बांधायला काही नसल्याने हमालाने त्या फाईलीच्या दोऱ्या एसटीच्या ग्रिलला बांधल्या होत्या . वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे दोऱ्या तुटल्या होत्या व फाईलींमध्ये हवा भरून सर्व चित्रे फडफडत वेगाने घाटाच्या खोल खोल दरीमध्ये उंचउंच उडत होती . दरीमध्ये उतरून चित्र गोळा करणे शक्य नव्हते . शिवाय एसटीमध्ये बसलेली माणसे उशीर होत असल्याने वैतागली होती . आरडाओरड करू लागली होती . मी खाली उतरून एसटीत आल्यानंतर आतमध्ये प्रत्येकजण विचारत होता काय झाले ? काय झाले ?
            काय सांगू त्यांना ? माझा रियाज , 365 दिवसांची दिवसरात्र जागून केलेली मेहनत व हजारो स्केचेस , निसर्गचित्रे , असाईनमेंटस क्षणार्धात माझ्याच डोळ्यांसमोर पसरणीघाटाच्या दरीत  दिसेनासी झाली होती . रियाज करा , रियाज करा रियाजाशिवाय गत्यंतर नाही असे सांगणारे अष्टपुत्रेसर पाणवलेल्या डोळ्यांसमोर धुसर दिसू लागले . आता काय सांगणार त्यानां ? कोणता रियाज दाखवणार आता ? आता एसटीचा उरलेला प्रवास आवडेनासा झाला . खूप खूप राग आला स्वतःचा , नियतीचा , हतबल परिस्थितीचा . त्यानंतर खरोखरच खूप रियाज केला . त्यानंतर चार वर्ष अष्टपुत्रेसरानां भेटलोच नाही .अथक परिश्रमाने आर्थिक परिस्थिती बदलली . त्यानंतर 1996 साली स्वत:ची चारचाकी गाडी घेतली . एसटीने प्रवास करून आता सत्तावीस वर्षे झाली असावीत .
             परवा वाईवरून स्वतःच्याच गाडीने पाचगणीला जात होतो . स्वच्छ हवा होती , डोंगरदऱ्या , पांडवगड , पसरणी , कुसगाव , एकसर गावातली शेती हिरवीगार दिसत होती . पाणी साठल्याने चमकत होती , मस्त थंडगार बेभान वारा सुटला होता . त्या एसटीच्या स्पॉटवरच , त्याच जागेवरच मुद्दाम थोडावेळ थांबलो होतो . वर आकाशात असंख्य पक्षी दरीच्या दिशेने वेगाने उडत चालले होते . ते उडत चाललेले पक्षी जणू मला माझ्या दरीत झेपावलेल्या चित्रांसारखे वाटत होते . 
माझा रियाज वाया गेला नव्हता . 
रियाज कधीच वाया जात नाही . 
प्रत्येक रियाज नव्याने काहीतरी शिकवत असतो .
निसर्ग हाच खरा सर्वश्रेष्ठ कलाकार त्याच्याकडची अदभूत  रंगांची पॅलेट , नयनरम्य विविधता , क्षणात दृश्य व वातावरण बदलण्याची तत्परता आपल्याकडे कशी असणार ? म्हणून त्याने माझी असंख्य चित्रे मला रियाजाचा गर्व होऊ नये म्हणून स्वतःकडे पसरणी घाटाच्या दरीत ओढून घेतली व मला मुक्त केला . एक नवा विचार दिला . रियाज हा फक्त प्रत्यक्ष कृतीने करण्याची गोष्ट नसते रियाज सतत मनन , चिंतन करूनही करता येतो . आपण आपल्या कलेचा रियाज खूप केला असा कधीही कलाकाराने गर्व करू नये . कोणतीही कला ही तात्पुरती स्वरूपाची नसून आयुष्यभर सतत करण्याची साधना असते त्यासाठी सतत रियाज करत राहणे हाच उपाय असतो . आपली पॅशनेट वृत्ती सतत जागृत सावध ठेवली पाहिजे . मनातून कधीही विसरली न जाणारी नवी जाणीव निसर्गाने मला दिली . त्या समृद्ध निसर्गगुरुपुढे मी मनापासून  नतमस्तक झालो आणि .....
अचानक दरीमधून मला मोठ्याने अष्टपुत्रेसरांचा  इकोसारखा घुमणारा आवाज ऐकू येऊ लागला . मित्रांनो क्षेत्र कोणतेही असू द्या . 
रियाज करा ,
रियाज करा , 
सतत रियाजाशिवाय गत्यंतर नाही .

🎨🎨🎨🎨  
सुनील काळे
9423966486

अमूर्ततेचा शोध

अमूर्ततेचा शोध......
✨✨✨✨✨✨
         भारतात अनेक जातींची , वेगवेगळ्या धर्मांची ,विविध पंथाची, विविध भाषांची , वेगवेगळ्या विचारसरणींची , वेगवेगळा पेहराव करणारांची जशी रेलचेल  आहे तशीच चित्रकलेच्या क्षेत्रातही असंख्य वेगवेगळे प्रकार आहेत . काहीजण वास्तववादी चित्र काढतात , काहीजण व्यक्तीचित्र रेखाटण्यात तर काहीजण निसर्गचित्रात माहीर असतात . काहीजण अमूर्त आकारांच्या चित्रशोधात सतत मग्न व तल्लीन झालेली असतात . या सर्व चित्रकारांची माध्यमेही वेगवेगळी असतात . काही चित्रकार जलरंगात , काही तैलरंग तर काहीजण ॲक्रलिक रंगाचा वापर करतात .  एकाच विषयाच्या , वेगळ्या अमूर्त आकारांच्या चित्रशोधकार्यात कलाकार मंडळी कधी पाहून रंगवत असतात तर काहीजण प्रथम रंगवतात व नंतर पाहत असतात . प्रत्येकाची रंगवण्याची पद्धती वेगवेगळी असते .माझा एक जिज्ञासू चित्रकार मित्र भेटला की मला नेहमी अमूर्त चित्रांविषयी माहिती विचारायचा पण त्याच्या प्रश्नानां उत्तरे देताना मी भांबांऊन जायचो कारण अँब्स्ट्रॅक्ट  चित्र काढणे एक अवघड आणि तितकीच सोपी पण आव्हानात्मक व मानसिक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे असे मला आजही प्रामाणिकपणे वाटते .
               1993 साली उमेदीच्या काळात मी मुंबईच्या प्रिन्सेस स्ट्रीटला पारशी डेअरी शेजारी असलेल्या प्रसिद्ध केमोल्ड फ्रेम्समध्ये कामाला होतो . त्याठिकाणी अनेक प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे फ्रेमिंगसाठी येत असत . एके दिवशी खास मजबूत पॅकींग केलेले एक मोठे पार्सल खास स्पेशल गाडीत घेऊन कंपनीचे मालक केकू गांधी स्वतः वर्कशॉपला आले होते . एका मोठ्या चित्रकाराचे चित्र खास स्पेशल महागडी फ्रेम करण्यासाठी आले होते . ते अमूर्त चित्र एक कोटी रुपयांचे असून त्या चित्राला कंपनीद्वारे खास विमा संरक्षण केले होते . त्यामूळे त्या चित्राची फ्रेम काळजीपूर्वक करून घेण्याचे मोठे आव्हान माझ्यापुढे होते .
                वर्कशॉपचा इन्चार्च म्हणून मी काम करत असल्याने त्या चित्राची पूर्ण जबाबदारी माझी होती . त्यासाठी मी सर्व तयारी केली . पण मलाही चित्र समजून घेण्याची उत्सुकता मोठी होती . वर्कशॉपला एक मोठे बर्हीवक्र भिंग घेऊन ते अमूर्त चित्र इतके महाग का आहे याचाच शोध घेण्याचे ठरवले . ते चित्र पूर्ण रात्रभर अगदी जवळून भिंगातून मी पहात होतो . कधी दूरून पाहायचो . त्या अदभूत चित्राचे आकार , रंगाचे ॲप्लीकेशन भलतेच वेगळे वाटत होते . कशाचा कशालाच मेळ लागत नव्हता . कधी वाटायचे फाटक्या विविध रंगाच्या लहानमोठ्या  चिंध्या एका लाकडाच्या तुकड्यात अडकल्या आहेत . तर कधी वाटायचे ह्या छोट्या छोट्या आकारांच्या रंगाच्या फटकाऱ्यांमूळे या चित्रात एक वेगळी रंगसंगती तयार झाली आहे . संपूर्ण चित्रात एक निर्जर निवांत शांतता पसरली आहे असे वाटायचे. कधी वाटायचे एक निवांत बेदरकार वाहणारी नदी एका नादभऱ्या तालात मनसोक्तपणे , स्वच्छन्दीपणे वहात आहे . ते चित्र गतिमान वाटायचे तर काही अँगलमधून शांत वाटायचे . अनेकवेळा पाहूनही मला त्यावेळी त्याचा अर्थ नक्की समजला नव्हता . त्या चित्राचे न समजलेले आकार , रंग , चित्राची रचना कित्येक वर्ष कायमची डोक्यात ठाण मांडून बसलेली होती . ते अमूर्त चित्र नक्कीच विसरण्यासारखे नव्हते .
          पावसाळा संपल्यामूळे आज सकाळी सगळीकडे स्वच्छ वातावरण होते . मेणवली गावाजवळ कृष्णा नदी वाहते तेथे निवांतपणे फिरायला नदीकिनारी गेलो होतो . सगळीकडे हिरवागार परिसर , थंड हवा व नुकतीच सुर्याची किरणे पडत असल्याने पाण्याचा खळखळाट व त्या पाण्यावरील प्रतिबिंब मोत्याचा सर पडल्यासारखे चमकत होते . अनेकविध पक्षांच्या चिवचिवटामूळे आसंमतात एक वेगळे नादभरे संगीत कानांवर पडत होते .
             नदीच्या किनाऱ्यावर चालताना मात्र एकदम वेगळेच अद्भूत चित्र दिसले . नदीच्या प्रवाहातून वहात आलेली घाण ,माणसांनी टाकलेली रंगीबेरंगी फाटलेले कपडे , प्लास्टीकच्या पिशव्या , बारदाने , थर्माकोलच्या वस्तू , बिसलरीच्या बाटल्या , जुन्या बॅगा , वापरलेल्या बूटांच्या व चपलेच्या जोड्या , झाडांच्या मोठमोठ्या बुंध्यावर व लटकत्या फांद्यांवर लोंबकळत होत्या . 
ती लाल ,पिवळी , जांभळी असंख्य अनेकरंगी छोटी छोटी फाटकी लफ्तरे निसर्गाच्या मोठ्या कॅनव्हासवर जणू अमूर्त चित्रांसारखी वाऱ्यावर डोलत होती . त्याच्या एकत्रित असण्याने ,फडकण्यामूळे त्या कॅनव्हासला एक अद्भूत गुढता निर्माण झाली होती . त्या चमकणाऱ्या सुर्यकिरणांच्या साक्षीने तो कॅनव्हास आता एका मोठ्या अमूर्त पेंटींग असल्यासारखाच भासत होता . 
          तीस वर्षानंतर त्या अमूर्त चित्राचा विषय आता मनामध्ये हळूहळू पूर्णपणे उलघडत होता . माणसांनी टाकलेल्या अनेक बिनवापराच्या वस्तू , माणसांनी टाकलेला कचरा माणसांसाठीच  किनाऱ्यावर मुक्तपणे सोडून नदी मात्र स्वच्छपणे पाण्याच्या प्रवाहाचा खळखळाट करत नव्या उर्जेने , नव्या उमेदीने , नव्या धेय्याने , नव्या आकांक्षेने वाहत चालली होती 
नव्या अमूर्ततेच्या शोधात . . . . 
कोणतीही अपेक्षा , कोणतीही गुंतागुंत ,  कोणतीही तक्रार न करता ,मनात कोणतीही आढी न ठेवता स्वच्छ पाण्यासोबत नदी वेगाने वाहत चालली होती 
नव्या अमूर्ततेच्या शोधात . . . . . . 
        आपणही कोणती आढी , कोणत्या इच्छा , कोणतेही वादविवाद डोक्यात न ठेवता नदीसारखे स्वच्छ वहात राहत राहीले पाहीजे कशातही गुंतून न राहता सगळा जात , पात, धर्म , उच्च , नीच आशा , अपेक्षांचा साचलेला डोक्यातला कचरा , राग , लोभ, मोठेपणाची हाव किनार्‍यावरच सोडून दिली पाहीजे आणि जीवनात मुक्तपणे आशाविरहित निर्विकार प्रवास केला पाहीजे नदीप्रमाणे  
नव्या अमूर्ततेच्या शोधात.......
नव्या अमूर्ततेच्या शोधात.......

सुनील काळे
9423966486

शुटींग - एक वेगळी दुनिया

शुटींग - वेगळी ती दुनिया .
🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭
🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬

           वाई जरी मंदिरांचे गाव , विश्वकोश , सांस्कृतिक तीर्थक्षेत्र म्हणून जरी प्रसिद्ध असले तरी आणखी एका गोष्टीसाठी खूप प्रसिद्ध झालेले आहे आणि ते म्हणजे चित्रपटांच्या शुटींगचे मुख्य केन्द्र . काही वर्षांपूर्वी वाईला सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी व दिग्दर्शकांनी हजेरी लावलेली होती . मोठमोठ्या बॅनर्सचे चित्रपट आवर्जून वाईची निवड करत होते . त्यामूळे मेणवलीघाट , गंगापूरीचा घाट , वाईचा गणपती घाटाचा परिसर अनेक चित्रपटांमध्ये चित्रित झालेला आहे . या मंदिराच्या सुबक घाटाबरोबरच आजूबाजूचा धोमधरणाचा परिसर व जवळची छोटी छोटी गावे निसर्गरम्य असल्याने चित्रपट व्यावसाय करणाऱ्यांचे लक्ष वाईला मुख्य केंन्द्रस्थानी नेण्यास आकर्षित करत आहेत . त्याची दोन मुख्य कारणे म्हणजे वाई हे पाचगणी - महाबळेश्वर या पर्यटनस्थळांच्या अगदी जवळ आहे शिवाय पाचगणीत टेबललॅन्ड या मुख्य पठारावर गाडी नेण्यासाठी बंदी आहे दुसरे कारण महाबळेश्वरला हॉटेलच्या अतोनात भाडेवाढीमुळे शुटींग करणे परवडत नाही म्हणून वाईला महत्व प्राप्त झालेले आहे .
            त्यामूळे या परिसरातील अनेक छोटेमोटे हॉटेल व्यावसायिक , स्थानिक शेतकरी , त्यांच्या बैलजोड्या, खानावळवाले , अनेक छोटेमोठ्या मॉबसीनसाठी लागणारी गर्दी यामूळे स्थानिकानां शुटींग आले की थोडेफार पैसे मिळण्यास सुरुवात झाली होती .पण या सगळ्या गोष्टींना थोडे गालबोट लागले ते शुटींगसाठी लागणाऱ्या अनेक गोष्टींचे सप्लाय करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर पद्धतीच्या गब्बर गावनेत्यांमूळे . त्यांच्या आपआपसातील हेवेदावे, कुरघोड्यांचे राजकारण , 'मी म्हणेल तो कायदा व माझाच झाला पाहिजे फायदा ' या प्रवृत्तीमुळे अनेक गट तयार झाले . या गटांमध्ये मारामारी होऊ लागली ती अगदी एकमेकांच्यावर पिस्तुल तलवारबाजीपर्यंत मजल गेली . त्याच्यां भांडणाचा परिणाम चित्रपटनिर्मितीसाठी बाधा ठरू लागला . या स्थानिक असहकार्याच्या भुमिकेमूळे हळूहळू वाईला शुटींगला प्राधान्य देण्याचे प्रमाण कमी झाले . आता हळूहळू हा हस्तक्षेप थांबला असावा म्हणून पुन्हा वाई चित्रपटसृष्टीची आवडती झाली आहे .
           ही सर्व पार्श्वभूमी आठवायचे कारण म्हणजे आज सकाळी मेणवलीघाटावर नेहमीच्या मॉर्निंग वॉकसाठी गेलो तर सकाळपासूनच घाटावर शुटींगची मोठी तयारी चालू होती . घाटावर पायऱ्या उतरत असतानाच वाईच्या सोनवले मंडपवाल्यांचा मोठा जनरेटरचा ट्रक लाइटींगची व्यवस्था करण्यात मग्न होता . मेणवली घाटावर नेहमीचे वॉचमनदादा निवांतपणे सकाळी पोहण्यासाठी येणाऱ्या स्थानिक गावकर्यांसोबत मस्तपैकी गप्पा मारत बसलेले होते . शुटींगचा आणि येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीचा व त्यांचा काही संबंध नसल्यामूळे मला काहीच माहीती मिळाली नाही .
            मुख्य घाटावर मेणवलीच्या स्थानिक बायका निवांतपणे कपडे धुण्याचा कार्यक्रम व गप्पांमध्ये मग्न होत सकाळचा प्रहर एन्जॉय करत होत्या .त्रिकोणी आकाराच्या दगडाच्या मध्यावर आर्ट डिपार्टमेंटमधला मुख्य डायरेक्टर एक चौकोनी दहा बाय दहाचा चौथरा बनविण्याच्या सूचना देत होता . एक पेंटर , एक सुतार प्लायवूडचा तो चौथरा दगडासारखा ग्रे रंग लावून पटापट हाताने काम उरकत होता . कारण शुटींगचा मुख्य काफीला आता घाटावर येणार होता . वाड्याच्या दक्षिणेच्या प्रवेशदाराजवळ तर जत्रेचेच स्वरूप आलेले होते . सकाळचा नाश्ता तयार करणारे कॉन्ट्रक्टर एका मोठ्या ट्रकमधून गरमागरम इडली , चहा , पोहे आग्रहाने वाढत होते . त्याच्याबाजूला कपडेपट सांभाळणारी मंडळी ट्रकशेजारी कापडाच्या मंडपात हिरोच्या कपड्यावर इस्त्री करत होते . त्याच्याजवळ लाईटींगचे सामान भरलेला मोठा ट्रक पाठीमागून उघडा केला होता . त्यामध्ये लहान लहान स्पॉटलाईट ते अवाढव्य जनसेट व साऊंडयंत्रणेचे सामान तुडूंब भरलेले होते . रिफ्लेकर्स तर ठिकठिकाणी लावलेले दिसत होते .सगळे छोटेमोठे कलाकार आपआपला ड्रेस , दाढी मिशा चिकटवून , काही जण भगवी कपडे परिधान करून शॉटची वाट पहात निवांतपणे बाओबाबच्या विशाल वृक्षाखाली खूर्च्यांवर निवांत बसलेले होते . सुमो , इनोव्हा अशाप्रकारच्या मोठ्या वीसपंचवीस गाड्यांच्या काचांवर नंबर लावून शुटींगच्या ठिकाणी ही मंडळी आली होती .
मेकअपमन , छोटे छोटे असिस्टंट , डायरेक्टर्स , त्यांचे सहकारी , झेंडेवाले , बॅनर्सवाले हातात मोबाईल फोन घेऊन सगळीकडे फिरत होते.गार्डनच्या छत्र्या लावल्याने शुटींगच्या या जत्रेत खऱ्या जत्रेप्रमाणेच भरगच्चपणा आलेला होता .
            मग काही जणांशी चर्चा केल्यावर ही एका सिरियलची शुटींग असल्याचे कळाले . बिहार राज्याच्या पार्श्वभूमीवर आधारीत वेशभूषा असलेल्या व नेहमीचाच मसाला असलेल्या त्या सिरियलचे नाव आहे " तोसे नैना मिलाई के " मेणवलीच्या वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच्या रस्त्यावर शुटींग सुरु असल्याची माहीती मिळताच मी तिकडे पोहचलो .
           वाई मेणवली रस्त्यावर मोठा कॅमेरा लावलेला होता . फेल्टहॅट घालून दाढीवाला डायरेक्टर अँक्टर्स मंडळीना शुटींगचा सीन नीटपणे समजावून सांगत होता . कॅमेरामनला नीट फोकसिंग करण्याच्या सूचना देत होता .व्हिलन गळ्यात सोन्याची चेन , हातात लॉकेट , पांढरीशुभ्र धोती , व अधूनमधून मिशानां पीळ देत प्लास्टीकच्या खूर्चीवर उजवा पाय रेलून उभा होता . हिरॉईन आता वाड्याच्या प्रवेशद्वाराच्या रस्त्यातून वेगाने पळत येणार असते " नही करने हमे ये शादी "असे मोठमोठ्याने म्हणत रडवेला चेहरा करून व्हिलनच्या दिशेने येणार असते . एक सायकलवाला भय्या दुधाच्या 
किटल्या भरून निवांतपणे जाणार असतो . वाईतून जरा नीटनेटक्या कपड्यातील एक दिवसाच्या कामासाठी आलेल्या स्थानिक महिला हातात रिकामी पिशव्या घेऊन मॉबसीनसाठी ये जा करणार असतात . एवढासा छोटा सीन पण त्यात वास्तवतेचा स्पर्श होण्यासाठी ,दृश्य जिवंत दिसण्यासाठी किती आटोकाठ प्रयत्नाची शिकस्त करावी लागत होती . मध्येच मुख्य रस्त्यांवर वाहतूकीची कोंडी थांबवावी लागत होती . तीन वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठे कॅमेरा लावून चित्रिकरण केले जात होते . सिरीयलमध्ये प्रसंगाची कंटीन्यूटी येण्यासाठी लेखकाचे स्क्रीप्ट वारंवार सर्वानां ऐकवले जात होते . गाड्यांच्या नंबरप्लेटवर बिहारची गाडी वाटावी म्हणून नकली प्लेट लावल्या जात होत्या . अधूनमधून बिहारीभाषेत बोलण्यासाठी जाणीवपूर्वक माणसे चालत जात येत होती . दिडशे ते दोनशे माणसे एक शॉट यशस्वी होण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत होती . लाईट , साऊंड ,ॲक्शन व कॅमेरा असा आरडाओरडा होत होता , एकवेळ रिअर्सल व तीनदा रिटेक घेऊन एकदाचा शॉट ओके झाला व लगेच दुसऱ्या शॉटची तयारी सुरु झाली .
           परत जाताना पाहतो तर घाटावरचा चौथरा आता पूर्ण झाला होता . नकली प्लायच्या फळ्या लावून असली दगडाचा वाटावा असा चौथरा पूर्ण झाला होता . आता त्यावर दहा फूटांची शंकराची मूर्ती विराजमान झालेली होती . त्यासाठी लागणाऱ्या मोठ्या आकाराच्या समया , हार , नारळ , पुजेचे सामान , त्रिशूळ , भगवे झेंडे सगळीकडे लावलेले होते . स्थानिक कलाकार दगडी भिंतीवरच्या डिझाईनला पुन्हा रंग भरत होते . फुलांच्या माळा मंदिराच्या घंटा असलेल्या कमानीवर लावल्या जात होत्या . एकंदर बिहारी छटपूजेच्या कार्यक्रमाचा देखावा उभा करण्यात आर्ट डायरेक्टर कमालीची मेहनत घेत होता .
           सिरियलचा स्मार्ट हिरो एका फोटोग्राफरकडून पिंपळाच्या मोठ्या गोल दगडी चौथऱ्यावरून स्वतःचे फोटो काढून घेत होता . त्याला फोटोसाठी विचारले तर त्याने प्रेमाने घट्टपणे हात हातात घेऊन माझी चौकशी करत चार पाच फोटो काढले . एकंदर शुटींगचा कार्यक्रम नकली असला तरी माणुसकीचे असलीपण टिकवून वाटचाल करीत असल्याची मला जाणीव होत होती.
           सिनेसृष्टी एक भारतातील मोठी इंडस्ट्री आहे . हजारो कलाकार ,लेखक , गायक , वादक , चित्रकार , डायरेक्टर्स , अभिनेते , अभिनेत्री यांचा भरणा असणारी मंडळी आपले नशीब रोज आजमावत असतात . कित्येक जणांना यश मिळते किंवा काही जणानां अपयशाच्या गर्ततेच्या वादळात करियरचा अंत पहावा लागतो . अपयशी झालेले कोणाच्या स्मरणातही राहत नाहीत . काही जण दुय्यम दर्जाचे म्हणून आयुष्यभर कष्ट करत राहतात .
           स्पॉटबॉय पासून ते चतुर्थ श्रेणीतील हेल्परसारखी कामे करणारी असंख्य माणसे पोटाची खळगी भरण्यासाठी या इंडस्ट्रीवर अवलंबून असतात . त्यानां काम मिळाले तरच त्यांच्यां कुटूंबाचा उदरनिर्वाह होणार असतो . त्यांच्या मुलानां शाळेची फी भरण्यासाठी यानां काबाडकष्ट करावे लागणार असतात . हा एक मोठा चालताफिरता काफीला असतो . आज एका ठिकाणी तर उदया दुसऱ्या लोकेशनवर भटकंती सुरु असते . सिरियल किंवा सिनेमा चालला तर त्यांच्या जीवनाचे रहाटगाडगे सुरु राहणार असते . अन्यथा कामावरून काढून टाकण्याची टांगती तलवार घेऊनच हातावर पोट असलेली ही मंडळी सतत अस्थीर जीवन जगत असतात . त्यानां कसले पेन्शन नसते ,भवितव्य नसते, म्हातारपणातील आरोग्याच्या सुखसुविधा नसतात . आणि त्यांच्यामागे कसल्याही प्रकारचा आशावाद , किंवा त्यांच्या स्वप्नानां आकार देणारा राजकीय वरदहस्त नसतो . सगळे भविष्य खोल अंधांतरी डुबलेले असते .
            आम्ही किती सहजपणे एखादा चित्रपट , सिरियल फालतू आहे असे समजून चॅनेल बदलतो पण त्या प्रत्येक शॉटच्या प्रसंगासाठी किती दिव्यातून जावे लागत असते हे त्या डायरेक्टरलाच माहीत असते .तो त्या अवाढव्य जहाजाचा कप्तान असतो . सगळ्या यश अपयशाची जबाबदारी त्याची असते .
           सामान्य माणसांच्या रोजच्या जगण्यापेक्षा शुटींगच्या या वेगळ्या जीवनपध्दतीचा थोडा काळ अनुभव घेऊन मी परत माझ्या दुनियेत परत आलो .
          येताना पारावर निवांत गप्पा मारत बसलेली माणसे पाहीली, दुकानात व घरात दोनशे रुपयाने गॅस स्वस्त झाला म्हणुन सुखावलेली माणसे पाहीली .शेतात नेहमीप्रमाणे कष्ट करणारे शेतकरी पाहीले , दुकानातून राजकारण्यानां नेहमीच्या शिव्या घालत रस्त्यावर पचापच पान तंबाखू खावून थुंकणारी माणसे पाहीली , घरातील सगळा कचरा बाहेर रस्त्यांवर , ओढ्यामध्ये , छोट्या पुलांवर  टाकून घाण करणारी नेहमीची गावातील माणसे पाहीली . शिवाय पहाटेची , दिवसभर वेळी अवेळी डिजे लावून मोठमोठ्याने लाऊडस्पीकरवर भेसूर आवाजातील गाणी व भजने ऐकत ऐकत माझा रोजचा दिनक्रम सुरळीत चालला आहे याची मला खात्री पटत जाते . आमच्या दुनियेत , रोजच्या  दिनचर्येत फार मोठा फरक नसतो
मात्र शुटींगची ही दुनिया वेगळीच असते . एका भ्रमनिरास , नकलीपणातील जीवनाला काही तास असलीपणाकडे घेऊन जाणारी . प्रत्येक दृश्याचे लोकेशन वेगवेगळे , प्रत्येक नवा दिवस निराळा , प्रत्येक शॉट वेगळा , प्रत्येक घटना वेगवेगळी . 
सायलेन्स ,
लाईट ,
साऊंड ,
ॲन्ड
ॲक्शन ............

शुटींग - वेगळी ती दुनिया .
🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭
🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬

सुनील काळे
9423966486

वाईतील लोकमान्य टिळकांचे चित्रप्रदर्शन

26-8-2023 रोजी वाईमध्ये ' लोकमान्य टिळक आणि वाईकर ' या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा  अतिशय उत्तम पद्धतीने पार पडला . 
सकाळी १० वाजता चित्रकार व कलाशिक्षक श्री .सुरेश वरगंटीवार ,पुणे यांच्या लोकमान्यांची विविध वेगवेगळ्या वैशिष्ठ्यपूर्ण माध्यमात साकारलेल्या 75 चित्रांचे प्रदर्शन वाईला लोकमान्य वाचनालयाच्या कलादालनात भरले होते . त्यावेळी वाईतील अनेक शाळांच्या विद्यार्थीवर्गाने व वाईतील मान्यवरांच्या उपस्थितीमूळे समारंभ छान व वैशिष्ठयपूर्ण झाला . लोकमान्यांचीच चित्रे , लोकमान्यांचेच पुस्तक व लोकमान्य वाचनालयातच भरलेल्या या पुस्तक प्रकाशन समारंभाला लोकमान्यांचे पणतू श्री .दीपक टिळक उपस्थित होते . अतिशय सुबक , नीटनेटका हा कार्यक्रम झाला . वक्त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांमूळे लोकमान्यांचे अनेक पैलू वाईतील उपस्थित रसिकानां अनुभवता आले . खऱ्या अर्थाने तो दिवसच लोकमान्यमय झाला होता .
    काही दिवस कायम स्मरणात राहणारे असतात . 26 ऑगस्ट 2023 असा वाईकरांसाठी कायम लक्षात राहील .

भालचंद्र मोने - एक भन्नाट वाईकर

भालचंद्र मोने - एक भन्नाट वाईकर
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
         वाई , पाचगणी व महाबळेश्वर ही सातारा जिल्ह्यातील  जवळजवळ लागून असलेली महत्वाची ठिकाणे आहेत . पण या तिन्हीही ठिकाणची भौगोलिक रचना , भूप्रदेशाची वैशिष्ठ्ये , वातावरण , हवामान व सर्वात महत्वाचे माणसांच्या जगण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत . वाईमध्ये प्रसिद्ध अशी अनेक मंदिरे , दगडी चिरेबंदी घाट , कृष्णा नदी वाई शहरातून वाहत असल्याने सर्वानां खूप भावते . पाचगणी टेबललॅन्डच्या पठारामूळे व बोर्डींग शाळांमूळे प्रसिद्ध , तिथे अनेक शाळांच्या शिक्षणपद्धतीमूळे कोस्मोपोलीटिशन संस्कृती आहे . महाबळेश्वरला सह्याद्री डोंगरपर्वतांच्या रांगामूळे अनेक पॉईंटस विकसित झाले आहेत व त्याचे श्रेय ब्रिटिशांना जाते . विकसित केलेल्या पर्यटन संस्कृतीमुळे एक वेगळा व्यावसायिकपणा येथील माणसांमध्ये मुरला आहे .
           मी ज्यावेळी पाचगणीतून वाईला स्थलांतरीत झालो त्यावेळी नव्या मित्रांच्या शोधात होतो . पण मित्र थोडे असे पटापट मिळतात ? मग वाईची पुस्तके वाचून थोडा अभ्यास करायचा ठरवले . त्यासाठी वाईचे प्रसिद्ध लेखक लक्ष्मीकांत रांजणे यानां विनंती केली आणि त्यांनी एक अप्रतिम पुस्तक वाचायला दिले त्या पुस्तकाचे नाव होते वाई - कला आणि संस्कृती . त्या पुस्तकावर चित्रकार सुहास बहुलकरांचे चित्र व अप्रतिम प्रस्तावना आहे . त्या पुस्तकाचे लेखक सु .र . देशपांडे यानां भेटलो तर त्यांनी सांगितले तुम्ही आता या पुस्तकाच्या प्रेमात पडलाच आहात पण एका व्यक्तिला लवकरात लवकर भेटलेच पाहीजे आणि त्यांचे नाव आहे भालचंद्र मोने कारण त्याच्यां मदतीमूळेच हे पुस्तक वैशिष्ठ्यपूर्ण झाले आहे .
             ब्राम्हणशाहीच्या घाटाजवळ उतरताना मोने साहेबांच्या घरी गेलो आणि लोकेशन पाहूनच चकीत झालो . माझे एक स्वप्न होते आपले घर वाईच्या नदीच्या घाटाजवळ असावे मग रोज सकाळी निवांतपणे घाटावर फिरायचे व स्केचिंग करत राहायचे . वाईचे सगळेच घाट किती वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात . प्रत्येक प्रहारात , प्रत्येक सिझनमध्ये त्याची वेगवेगळी रूपे दिसतात . भालचंद्र मोने यानां प्रत्यक्ष भेटल्यावर खरोखरच त्यांची व घाटाचीही वेगवेगळी रूपे आजमावता आली .
            वाईला स्टेट बँक ऑफ इंडियामधून ते रिटायर्ड झाले . बँकेचा कारभार तसा रुक्ष कर्तव्यदक्षतेचा . सतत आर्थिक गोष्टींशी निगडीत असलेला पण भालचंद्र मोने त्रासलेले वाटले नाहीत . कारण त्यांच्या आवडीनिवडी निराळ्या होत्या . वाचन , चित्रकला , भटकंती ,संशोधन , अध्यात्म व सर्वात महत्वाचे आपल्या वाई गावाविषयी असलेले नितांत प्रेम . या प्रेमापोटीच त्याच्यां मित्रांनी 'आस्था ' नावाची पर्यावरण मैत्री संस्था स्थापन केली व त्याचे सचिव म्हणून त्यानी स्वतःला कामात झोकून दिले .
            वाईला लक्ष्मणशास्त्री जोशींमूळे विश्वकोष व प्राज्ञपाठशाळा खूप प्रसिद्ध आहेत . त्या संस्थेच्या प्रभावातून अनेक लेखक , कवी , कायकर्ते , संशोधक लेखक निर्माण झालेले आहेत . भालचंद्र मोने त्यापैकी एक . काही दिवसांपूर्वी त्यांनी वाई परिसरातील फोटोग्राफर्स एकत्र करून असंख्य पक्षांची माहीती असलेले सुंदर पुस्तक निर्माण केले होते . त्यासाठी पक्षीतज्ञ किरण पुरंदरे यानां प्रकाशन सोहळ्याला बोलावले होते . वाईचे कमलाकर भालेकर दुसऱ्या महायुद्धात वॉरंट ऑफीसर होते . त्या महायुद्धात त्यांनी रोजची डायरी लिहीली होती . मोनेंनी ती डायरी मिळवून छान संक्षिप्त पुस्तक लिहीले आहे.
            वसंत व्याख्यानमालेचे अनेक वर्ष श्रोते, कार्यकर्ते ते पदाधिकारी असल्याने भालचंद्र मोने बहुश्रृत व बहुआयामी व्यक्तिमत्वाचे आहेत . त्यानां अनेक विषयांची व अनेक गोष्टींची माहिती असल्याने त्यांच्याशी गप्पा मारत असताना कधी कंटाळा येत नाही . विश्वकोषाची लायब्ररी , प्राज्ञ पाठशाळा , येथे त्यांचा मुक्त सतत संचार चालू असतो . त्यांच्या खांद्यावर एक शबनम बॅग नेहमी लटकवलेली असते . त्यात एखादे तरी पुस्तक असतेच . मी चित्रकार असल्याने त्यांनी टिळक वाचनालयात चित्रकला विषयाची  कोणकोणती पुस्तके उपलब्ध आहेत याची तोंडपाठ यादीच दिली कारण त्यांचे आजोबा हरभट मोने चित्रकार होते. त्यानां पारंपारीक कला ते आधुनिक समकालीन कला , मूर्त , अमूर्त कला ,गाजलेले चित्रपट , चित्रकार ,लेखक , जुनी पुस्तके , अध्यात्मातील अनुभव यांचा दांडगा अभ्यास आहे . पण त्याचा वृथा अभिमान नाही . अतिशय साधेपणा व अहंकार विरहीत जीवनशैली यामुळे ते समाधानी असतात . त्यांच्या या स्वभावामुळे मी कधीकधी गप्पा मारायला त्याच्या घरी जातो. एक प्रसंग मात्र कायम लक्षात राहीला आहे तो सांगण्यासारखाच आहे .
            एकदा विजय दिवाण व मी मोनेसाहेबांच्या  घरी मस्त गप्पा मारत होतो . आणि अचानक संध्याकाळ झाल्याने चहाचा विषय निघाला . त्यावेळी स्वतः मोने चहा करायला आत गेले . बाहेर त्यांच्या वयोवृद्ध आई झोपाळ्यावर बसून आमच्याशी बोलत होत्या कारण त्यांचे पाय दुखत होते. मी त्यानां एक सहज प्रश्न विचारला . नागेश मोने व भालचंद्र मोने ही तुमची दोन मुले . एक शाळेचा मुख्याध्यापक व दुसरा बँकेचा अधिकारी आहेत , कर्तृत्ववान आहेत , हुशार आहेत , व्यासंगी आहेत , सर्वानां आवडणारे आहेत पण दोघांनीही लग्न केले नाही . तुम्हाला दोन सुना मिळाल्या असत्या तर तुम्हाला जरा छान विश्रांती मिळाली असती व सुनांवर जरा रुबाबही दाखवता आला असता . तुम्हाला वाईट वाटत नाही का ?
जराही नाही . 
मोनेआजी अगदी ठामपणे म्हणाल्या .
असे कसे ? माझा लगेच प्रतिप्रश्न . जरा सविस्तर सांगा . भारतात जुन्या पारंपारिक विचारांचा पगडा आहे . प्रत्येकाला वाटते माझा वंश पुढे चालला पाहीजे , घराण्याचे नाव राहीले पाहीजे . नातू हवा , घर कसे गजबजलेले हवे . लग्न करून मुलानां जन्म देणे हे तर प्रत्येक भारतीयाला आद्य कर्तव्य वाटते मग तुमची विचारसरणी अशी वेगळी कशी ?
         मोने आजीच्यां चेहऱ्यावर मंद स्मितहास्य होते . तुम्ही हा प्रश्न मला विचारणार याची मला खात्री होती . पण खरं सांगू आता दोघेही साठीच्या आसपास आहेत त्यामूळे आता लग्न हा  विषय पूर्णपणे संपला . पण तरुण होते त्यावेळी फार पूर्वी मी त्यांच्या लग्नाचा विषय काढला होता . 
दोघेही विद्यार्थीप्रिय , अभ्यासू , वाचनप्रिय व हुशार आहेत . आनंदी आहेत , छान जगत आहेत , मग माझ्या स्वार्थासाठी त्यांच्या जीवनात मी का खोडा घालू ? हे जीवन प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसार , आवडीनुसार , सवडीनुसार , मनसोक्तपणे जगता आले पाहीजे . जीवनातील प्रत्येक दिवस एक मोठा सणाचा दिवस असल्यासारखा उत्सवपूर्ण जगता आला पाहीजे . थोडक्यात स्वमर्जीप्रमाणे  दिवस  जगता आला पाहीजे . कोणाच्याही व्यक्तिस्वातंत्र्याचा अपमान न करता , कोणाचाही प्रभाव न पाडून घेता , जीवन स्वच्छपणे जगता आले पाहीजे . माझी दोन्ही मुले आनंदी आहेत . त्यांच्या कार्यामूळे हजारो विद्यार्थी माणसे आनंदी होत आहेत आणि हा आनंद मला रोज मिळतो . मग वाईट कशाला वाटेल ?
मी हे उत्तर ऐकले व छानपणे मस्तक त्यांच्या पायाशी ठेवून आशीर्वाद घेतला .
दिव्यत्वाची जेथे प्रचिती ॥
तेथे कर माझी जुळती ॥ त्यादिवशी अशीच माझी भावावस्था झाली .
          लोकमान्य टिळक व वाईचा एक वेगळा ऋणानुबंध होता . अठ्ठावीस वाईकरांनी सांगितलेल्या लोकमान्य टिळकांच्या आठवणी , पत्रव्यवहार , टिळकांच्या वाई भेटीचे किस्से , छायाचित्रे यांचा मागोवा भालचंद्र मोने यांनी शोधून अभ्यासपूर्ण पुस्तक तयार केले आहे . जूना इतिहास पुराव्यांसह शोधून काढणे, हजारो पुस्तकांतून अभ्यास करून त्यांचे वाचन करून निवडक  माहिती संकलन करणे , त्याची वर्गवारी करून पुस्तकासाठी दस्ताऐवज तयार करणे , अनेकांच्या घरी जावून माहिती गोळा करणे , संदर्भ गोळा करणे हे एखाद्या मधमाशीसारखे न कंटाळता अविरत कष्टाचे काम असते आणि नेमके हेच काम भालचंद्र मोने करतात . अशा कामासाठी जिद्द , चिकाटी व सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा लागतो तरच कार्य सफल होते व इतके सर्व करून मोने प्रसिद्धीपासून नेहमी दूर राहतात . 
           हे सगळे आठवायचे कारण म्हणजे तीनचार दिवसांपूर्वी त्यांचा फोन आला होता . ' लोकमान्य टिळक आणि वाईकर ' या पुस्तक प्रकाशन समारंभाच्या निमंत्रण देण्यासंदर्भात . त्याचदिवशी माझा वर्गमित्र श्री .सुरेश वरगंटीवार याने लोकमान्यांचे व्यक्तीचित्र विविध माध्यमातून साकारून एक वेगळे प्रदर्शन वाईमध्ये भरवायचे ठरवले आहे . त्याचे उद्‌घाटन माझ्या हस्ते करावयाचे त्यांनी नक्की केले होते . मोठ्ठ व्हायचे कॅन्सल केले असले तरी मी मित्रप्रेमामुळे त्यानां नकार देऊ शकलो नाही .
              तर भेटू प्रत्यक्ष येत्या शनीवारी दि .२६ ऑगस्टला सकाळी 10 वाजता चित्रप्रदर्शनाच्या उदघाटनाला व संध्याकाळी 5 वाजता पुस्तक प्रकाशनाच्या समारंभावेळी . अध्यक्ष श्री . अनिल जोशी आहेत . प्रमुख पाहुणे श्री.दिपक टिळक येणार आहेत .
सर्वानां सस्नेह निमंत्रण !🙏🙏

सुनील काळे
9423966486

रंगसभा

* 19 - 8 - 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय श्री . रमेश बैस यांच्या हस्ते रंगसभा या पुस्तकाचे प्रकाशन झाले . त्यावेळी जेजे स्कूल ऑफ आर्ट (मुंबई ) येथे सभागृहात अनेक मान्यवर उपस्थित होते . भारतातील 100 प्रसिद्ध मान्यवर चित्रकार व शिल्पकारांची संपूर्ण माहिती व कलासाधनेच्या पद्धतीची रसिक जणानां उत्तम जाणीव या ग्रंथामध्ये सामावेश करून संग्रही ठेवण्यासारखा  झकास प्रिटिंग करून सुंदर डॉक्युमेंटरी ग्रंथ निर्माण केला आहे. त्या ग्रंथामध्ये सामावेश केल्याबद्दल व मा .राज्यपालांच्या हस्ते ग्रंथ प्रधान केल्याबद्दल लेखक प्रा डॉ .गजानन शेपाळ सरांना मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा !
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात सुरु करण्यासाठी केंद्र व राज्याकडे पाठपुरावा करण्याचे राज्यपालांचे आश्वासन *

*सर्जनशील आणि सांस्कृतिक उद्योगातील संधींचा कलाकारांनी लाभ घ्यावा: राज्यपाल रमेश बैस*

* दिल्ली येथील ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी आपण व्यक्तिशः लक्ष घालू तसेच केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे दिले.  

* ज.जी. उपयोजित कला महाविद्यालय येथील प्राध्यापक डॉ. गजानन शेपाळ यांच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या दृश्यकला विषयक लेखांचे संकलन असलेल्या 'रंगसभा' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल बैस यांच्या हस्ते शनिवारी (दि. 19/8/2023 रोजी) जे जे .महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. 

* आणि सांस्कृतिक उद्योग क्षेत्र जगातील अर्थव्यवस्थेत सर्वाधिक गतीने वाढणारे क्षेत्र आहे. कलात्मक वस्तूंचा जागतिक व्यापार सातत्याने वाढत आहे व या क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होत आहेत. या संधींचा कलाकारांनी लाभ घ्यावा असे राज्यपालांनी सांगितले. कला, शिल्पकला, वारसा, संगीत या क्षेत्रात खासगी क्षेत्राने देखील गुंतवणूक करावी असे राज्यपालांनी सांगितले.   न्यूयॉर्क येथील 'मेट गाला' फॅशन उत्सवाप्रमाणे मुंबईचा देखील कलाविषयक 'मेट कला' महोत्सव असावा अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. 

* कला महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी कला शिक्षण घेत आहेत. या महाविद्यालयांचे बळकटीकरण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण केले पाहिजे. या दृष्टीने कला संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत आपण शासनाला सूचना करू असेही राज्यपालांनी सांगितले. 

* समाज तसेच ग्रामीण भागात लोक घरी चित्र लावतात किंवा रांगोळी काढतात. त्याचप्रमाणे शहरातील लोकांना देखील आपल्या घरी, भिंतींवर कलाकृती असावी असे वाटते. मात्र कलाकृती जनसामान्यांना परवडणाऱ्या असल्या पाहिजे. तसे झाल्यास कलेचे लोकशाहीकरण होईल असे सांगताना आपल्या कलाकृती परवडणाऱ्या नसल्या तर चीन सारखे देश आपल्या स्वस्त कलाकृती व मूर्ती घरोघरी पाठवतील असा इशारा राज्यपालांनी दिला. 

* स्वतः एक छोटे दृश्य कलाकार असून जे जे स्कुलला भेट देण्याचे आपले स्वप्न होते, असे राज्यपालांनी सांगितले. गजानन शेपाळ यांनी राज्यातील अनेक ज्ञात व अज्ञात दृश्य कलाकारांना तसेच कला संस्थांना आपल्या लिखाणाच्या माध्यमातून प्रकाशात आणल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या मराठी वृत्तपत्रलेखक संघ मुंबईने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले.  

*प्रकाशन सोहळ्याला ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ.  उत्तम पाचरणे, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे, ज्येष्ठ पत्रकार विवेक सबनीस, उपयोजित कला महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ संतोष क्षीरसागर व कला क्षेत्रातील अनेक मान्यवर व चित्रकार उपस्थित होते.  

*Maharashtra Governor releases Gajanan Shepal's book 'Ranga Sabha*

Maharashtra Governor Ramesh Bais released the book 'Rang Sabha' authored by Prof Ganajan Shepal at Sir J J School of Applied Art in Mumbai on Sat (19 Aug). 

Speaking on the occasion, the Governor said he will put his best efforts to establish the Sub Centre of Lalit Kala Academy in Maharashtra. The Governor said the Creative and Culture Industry is among the fastest growing industries in the world having immense potential for job creation. In this connection, he called for efforts to strengthen art institutions in the State. 

Former Chairman of Lalit Kala Academy Dr Uttam Pacharne, author Dr Gajanan Shepal, President of Marathi Vruttapatra Lekhak Sangh Mumbai Ravindra Malusare, senior journalist Vivek Sabnis and invitees were present. 

The book 'Rang Sabha' is a compilation of the published articles of Dr Shepal, covering the life and work of 100 visual artists and art institutions.

कोकणची स्मरणचित्रे

कोकणची स्मरणचित्रे
⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵
           काही वर्षांपूर्वी कोकणात चित्रे रेखाटण्यासाठी गेलो होतो . महाबळेश्वर महाड ,पोलादपूर मार्गे आम्ही हर्णे बंदरावर पोहचलो . निसर्गाने  प्रत्येक गावाला  एक अद्भुत अविस्मरणीय  सृष्टीसौंदर्य  बहाल केलेले आहे . पाचगणी महाबळेश्वरला  उंच डोंगरावरून पाहताना दूरपर्यंत दिसणारी  सह्याद्री पर्वतरांगांची शिखरे  सिल्वरवृक्षांची झाडे व घनदाट जंगल तर कोकणात पायथ्याशी पसरलेला प्रचंड मोठा समुद्र व किनाऱ्यावर माडांची उंचच उंच झाडे .या दोन्ही ठिकाणची दृश्ये परस्पर विरोधी आहेत .दोन्हींची तुलनाच होऊ शकत नाही . प्रत्येकाचे आपआपले वैशिष्ठय आहे. महाबळेश्वर पाचगणीतल्या घनदाट जंगलांची  ब्रिटिशकालीन बंगल्यांची कृष्णा दरीची चित्रे वेगळी तयार होतात तर कोकणातील अथांग समुद्राच्या लाटा ,त्यावर चालणाऱ्या होड्या ,बोटी ,मासेमारी करणारे कोळी सागरीकिनारे , सततच्या लाटांमूळे झीजलेल्या कातळांची ,जलदुर्गांची , लाटांची चित्रे वेगळीच रुपे धारण करतात .आणि या दोन्ही प्रकारच्या चित्रांना कागदावर सजीव करताना जो आनंद मिळतो त्यामध्ये मी नेहमीच खुष असतो . 
           कोकणात पूर्वी अरुण दाभोळकर नावाचे चित्रकार वॉटरप्रूफ इंकमध्ये गणपती व कोकणचा परिसर चित्रित करायचे त्यांची ती स्टाईल फार प्रसिद्ध झाली होती .
            आज कित्येक दिवसांनी वॉटरप्रूफ इंक सापडली आणि चकचकीत असे युगो आर्ट पेपरचे काही 5"x14" इंचाचे छोटे तुकडे सापडले .      
         कालच्या जोरदार वाऱ्याच्या दमदार चक्रीवादळामुळे अनेकांचे नुकसान झालेले प्रसिद्धी माध्यमांवर पाहिले  आणि खूप वाईटही वाटले .
          मला हर्णे बंदरावर पाहिलेल्या बोटींची ,किनार्‍यांवरील मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांची व मासे खरेदी करण्यासाठी छोट्या व्यापाऱ्यांच्या लगबगीची आठवण झाली .
      आपल्या मनाची दोन मनांमध्ये विभागणी केलेली आहे . एक अंतरमन व एक बाह्यमन .अंतरमनामध्ये ठसलेली दृश्ये कायमची मनामध्ये रुजून रहातात .
      वॉटरप्रूफ इंकमध्ये या आत बसलेल्या दृश्यांना छोट्या आकारात मूर्त स्वरूप लगेच मिळाले .मग मनाच्या कोपऱ्यात बसलेली चित्रे , कोणतेही आरेखन न करता पटापट हाताद्वारे प्रिंटस घेतल्या सारखी निघू लागली आणि आज एकाच बैठकीमध्ये 14 चित्रे एकापाठोपाठ तयार झाली .
तीच ही 
कोकणची स्मरणचित्रे .
⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵

जॉय चिल्ड्रन ॲकडमी

* जॉय चिल्ड्रन्स ॲकडमी - वाई *
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
         जया अंगी मोठेपण तया यातना कठीण . हे वाक्य मला मनापासून पटते कारण कोणतेही मोठ्ठ काम करायचं तर मोठ्या यातना सहन कराव्या लागतात . त्याग करावा लागतो .आता अगदी साधं उदाहरण म्हणजे एक छोटीशी खोली एकट्या माणसाला नीटनेटकी ठेवणे सहज शक्य असते पण पाच हजार स्केअर फूटांच्या बंगल्याची व अर्धा एकर बागेची निगा राखायची , परिसर नेहमी सतत स्वच्छ ठेवायचा म्हणजे तुम्हाला रोजचा वेळ द्यावा लागतो . आणि मग हा वेळ रोजच्या दैनंदिन अनेक कामातून कसा काढायचा कसा ? हा एक भलामोठा प्रश्न असतो . त्यामूळे  मोठे काम करणाऱ्या सतत व्यस्त असणाऱ्या मोठ्या मंडळीचे मला नेहमीच कौतुक वाटते .
         आमचा वाईतील मित्र वसिम पिंजारी असाच एक  हुरहुन्नरी माणूस . सतत कामात मग्न व शोधक वृत्तीचा . अनेक प्रसिध्द राजकीय , सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना सतत पत्रलेखन करणारा मित्र . खूप दिवसांपूर्वी एक दिवस त्याचा मला फोन आला , आमच्या शाळेचे संस्थापक श्री . मनिंद्र कारंडे सर यानां घेऊन तुमच्याकडे येतोय . ते आले आणि मला लगेच जाणवले जया अंगी मोठपण तया यातना कठीण .
           या पहिल्या भेटीतच कारंडे सरांचे व्यक्तिमत्व लक्षात आले . काही माणसे ध्येयाने झपाटून आपआपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत असतात . वाईसारख्या ग्रामीण तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढून या आजूबाजूच्या परिसरातील मुलानां ज्ञानाची कवाडे उघडी करून शिक्षणक्षेत्रात भरीव काम करून नवनव्या संस्था काढून मुलानां घडवणे ह्या एकाच उद्देशाने त्यांनी स्वतःला झोकून दिलेले आहे. जॉय चिल्ड्रन्स ॲकडमी वाई, नॅशनल पब्लिक स्कूल वाई, जॉय जुनियर कॉलेज वाई , डायनॅमिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वाई , जॉय किडस पब्लिकेशन्स -वाई , यासारख्या संस्था सुरु करून नेटाने हे ज्ञानदानाचे अनमोल ,अखंड कार्य पूर्ण दिवसभर चिकाटीने ते करत असतात . मुलांच्या मानसशास्त्राचा त्यांचा सखोल अभ्यास आहे . आपल्याला एखादे छोटे ऑफीस सांभाळताना त्रेधातिरपीट उडते . कारण इतक्या संस्था सुलभपणे सुरु ठेवताना वेगवेगळ्या स्वभावाची अनेक माणसे सांभाळावी लागतात . त्यांना सांभाळताना त्यांच्या व्यक्तिगत अडचणी , त्यांचे व्यक्तिगत सुखदुःखाचे क्षण , भावभावना व प्रत्यक्ष रोजचे मूडस , हेवेदावे व जगण्याचे व्यवहार कुशलतेने पार पाडणे हे सोपे काम नाही .
          अशा या चतुरस्त्र कार्यमग्न मनिंद्र कारंडे सरांचा मला फोन आला की त्यांच्या संस्थेत वार्षिक सायन्स व चित्रकला हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन आहे त्यासाठी तुम्ही दोघांनी उदघाटन करावे व तुमचे अनुभव मार्गदर्शन करावे त्यातून विद्यार्थ्यानां प्रेरणा मिळेल . 
          खरं सांगायचं तर चित्र काढणे मला सोपे वाटते पण भाषण करणे , हजारो लोकांसमोर बोलणे ते ही इंग्रजीत बोलणे म्हणजे सकंट आल्यासारखे वाटले . मी लगेच प्रतिसाद दिला नाही पण कारंडे सर हार मानणारे नाहीत त्यांनी व त्यांच्या सहकारी मंडळीनी माझ्याकडून होकार मिळवलाच .
             पाचगणीच्या बिलिमोरीया स्कूलमध्ये एक वर्ष व ब्रिटीशकालीन सेंट पीटर्स स्कूलमध्ये चार वर्षांचा शैक्षणिक कडक अनुभव घेऊन बरीच वर्ष होऊन गेली होती . शाळांचा नंतर खास सबंध आला नाही . म्हणून एक दिवस जॉय स्कूल पाहून आलो . आमच्या ओळखीच्या सौ प्रमिला झांबरे मॅडम तेथे उपप्राचार्या म्हणून कार्यरत आहेत . शाळा , तेथील विद्यार्थी , शिक्षकवर्ग , सर्व सहकारीवर्ग छान एकमेकाला सोबत घेऊन खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थी घडवत होते . ब्रिटीशांची इंग्रजी भाषा शिकवताना आपली मराठी संस्कृती , सण, संस्कार ,टिकवून वाटचाल करत असलेले दिसले . 
         २ मार्चला बरोबर नऊ वाजता आम्ही तेथे पोहचलो . मुद्दाम टायसुट बूट घातले नाही . उगाच दडपण नको म्हणून . तेथे मराठी संस्कृती जोपासत कुंकूम टिळा लावून पुष्पगुच्छ देऊन आमचे जोरदार स्वागत केले गेले . डॉ. ओ.पी.जी अब्दुल कलाम व थोर शास्त्रज्ञ व्यंकटरमण यांच्या तसबिरानां हार घातले व नमस्कार केला . समोर जॉय स्कूलच्या उत्साही विद्यार्थीवर्ग पाहून खुर्चीवर बसलो . माझा व स्वातीचा इंग्रजीतून परिचय करून दिला आणि मग मी भाषण सुरु केले . खरं तर सगळ्याच कलावंताचा त्यात चित्रकलेसारख्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रयत्न करताना आलेले अनुभव इतके मोठे व इंटरेस्टींग होते की मुले टाळ्या वाजवत प्रतिसाद देत होती . इंग्रजी भाषा असो की इतर कोणतीही भाषा असो मनापासून संवाद साधला तर एकमेकांचे सुर व ताल देखील जुळतात . मग भाषा ही व्याकरणाच्या चुका काढण्यापेक्षा संवादाचे प्रभावी साधन बनते .
        मी फक्त मुलानां एवढेच सांगत होतो की तुम्ही स्वतःलाच विचारा व शोध घ्या की तुम्हाला कोणते क्षेत्र मनापासून आवडते . पूर्ण मनापासून आवडणारे क्षेत्र निवडले की मग कष्ट करताना तडजोड करू नका , त्या क्षेत्रातील सर्व गोष्टींचा अभ्यास करून प्रचंड मेहनत करा . अनेक अडचणी येणारच आहेत पण ध्यास घेऊन उत्तुंग यश मिळवताना अपयशाचाही सामना करावा लागणार आहे तर तेथे थांबू नका . अपयशाचेही संशोधन करा त्या चुका सुधारून पुन्हा जोमाने वाटचाल करा . दरवेळी प्रयत्न करताना नव्या चुका करा त्या परत सुधारायला मार्ग काढा .निगेटिव्ह व पॉझिटीव्ह दोन्ही शक्यता सतत पडताळून पहा . मग यश मिळणारच . यशस्वी होण्यासाठी ध्यास महत्वाचा असतो. मला आलेले काही अनुभव सांगत भाषण संपवले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला त्यावेळी एक अनोखा उत्साह प्रत्येक विद्यार्थी मित्रांच्या चेहर्‍यावर दिसून येत होता .
         गणित , जीवशास्त्र , भौतिकशास्त्र , इतिहास , भूगोल , मराठी, हिंदी , इंग्रजी भाषा , पर्यावरण , कॉम्पुटर चित्रकला हस्तकला , या अनेक विषयांचे व नवनव्या गोष्टींचे विभागवार सुंदर प्रदर्शन मांडले होते .त्या विषयातील प्रयोग कसा केला ? मॉडेल कसे बनवले ? हे कसे कार्यरत आहे ? त्याचा उद्देश काय हे सांगतानाचे त्या  छोट्या छोट्या विद्यार्थ्याचा उत्साह , जिज्ञासा , आत्मविश्वास पाहून नवीन पिढी वाया चालली आहे असे बिलकूल वाटले नाही . उलट आपणच नवे तंत्रज्ञान समजून घ्यायला कमी पडतोय की काय ? याची जाणीव मला होत होती .
           नेमक्या त्यादिवशीच रात्री श्री .मनिंद्र कारंडे सरांच्या आई देवाघरी गेल्या . त्यामूळे ते आले नव्हते . पण शो मस्ट गो ऑन या तत्वानुसार त्यांनी कार्यक्रमात बदल केला नाही . शाळेच्या प्राचार्या सौ . फरांदे मॅडम , उपप्राचार्या सौ . झांबरे मॅडम व त्यांचे सर्व शिक्षक सहकारी यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला . वसिम पिंजारीने कार्यक्रमाचे व उद्‌घाटनाचे फोटो काढले .
           २ मार्च २०२३ हा जीवनातील एक दिवस जॉयस्कूलच्या प्रदर्शनामूळे , प्रेरणा देणारा , शाळेच्या जुन्या आठवणी जागृत करणारा व सळसळत्या नव्या पिढीचा उत्साह पहात कायम लक्षात राहणारा ठरला . 
           ग्रामीण भागात कमी फी आकारत अनेक अडचणींना तोंड देत शिक्षण क्षेत्रात सतत कार्यरत असणाऱ्या व नवी विद्यार्थी पिढी घडवण्याचा , सर्वानां उच्च ध्येयांनीं प्रेरीत करण्याचा ध्यास घेतलेल्या ऋषितुल्य मनिंद्र कारंडे सर , सौ .मीना कारंडे मॅडम व  त्यांचे सर्व सहकारी स्टाफ मेंबर्स , प्राचार्या , उपप्राचार्या व सर्व शिक्षकानां मनापासून प्रणाम व सर्व विद्यार्थीवर्गाला उज्वल भवितव्यासाठी ... . . . . . . .
खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा !
💐💐💐💐💐💐💐💐

सुनील काळे✍️
9423966486

ती वेळ निराळी होती .....

ती वेळ निराळी होती
ही वेळ निराळी आहे .
🌟🌟🌟🌟🌟🌟
          बरोबर सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. माझे  "मोठ्ठ व्हायचं कॅन्सल केले त्याची गोष्ट " व " देशमुख फार्म - वाई " नावाचे दोन लेख वाचल्यानंतर ठाण्याचे सुनील सामंत (http://www.esahity.com/ ई साहित्य प्रतिष्ठान , प्रसार व निर्मिती करतात ) ते सपत्नीक मुद्दाम ठरवून खास भेटायला आले होते . त्या दिवशी आमच्या निसर्ग बंगल्यातील चित्रकारांचा पसारा पाहून त्यांनी कौतुक केले आणि मुक्कामासाठी देशमुख फार्मच्या कृषी पर्यटन केंद्रांकडे संजय देशमुख यांच्याकडे गेले . त्याच दुपारी जेवण करून निवांत बसलो तर एक पांढऱ्या रंगाची कार गेटजवळ थांबली . त्यामधून उतरले प्रसिद्ध कवि व ठाण्याचेच रहिवासी असलेले श्री .अरुण म्हात्रे .
          वाईच्या विश्वकोशाचा द्रविड हायस्कूल पटांगणात मोठा कार्यक्रम झाला होता . त्यामध्ये अशोक नायगांवकर , अरुण म्हात्रे यांच्या कवितेचा कार्यक्रम मी पाहीलेला होता . टीव्हीवर त्यानां पाहीले होते .त्यामूळे त्यानां लगेच ओळखले . वाईमध्ये एका तरुण कवीच्या पुस्तकप्रकाशनासाठी ते आले होते . कार्यक्रमानंतर धोमधरण पाहण्यासाठी ते चालले होते . कोणाच्या तरी सांगण्यावरुन ते रस्त्यात लागणाऱ्या निसर्ग बंगल्यात आले . आमची दोघांची चित्रे व स्टुडिओ पाहून ते खूष झाले व टेरेसवर सगळीकडे भातशेती व हिरवागार परिसर पाहून त्यांनी उत्स्फूर्तपणे काही कविता ऐकवण्यास सुरुवात केली . त्या कविता ऐकताना आम्ही अगदी तल्लीन होऊन गेलो . माझ्या मोबाईलमध्ये भरपूर फोटो काढले व मग दुपारी धोम मंदीर व धरणाकडे निघालो .
         धोम मंदीरापूर्वी देशमुख फार्मला सामंताना भेटायला गेलो . दोघेही ठाणेकर व जवळपासच्या परिसरातच राहत होते . मग गरम भजी , चहा व पावसाळी वातावरणात साहित्य क्षेत्रातील गप्पांची मैफीलच रंगली . समान व्यसनेसु सख्यम ! याची लगेच प्रचिती आली .
          एक चित्रकार जोडपे , एक साहित्यिक जोडपे व एक लेखक कवि जोडपे असे सगळे वाईच्या प्रसिद्ध धोमच्या नरसिंह मंदिरात गेलो . त्यानंतर जवळच धोम धरणाच्या जलाशयाजवळ पोहचलो . थंडगार वाहणारे वारे , कडाडणाऱ्या ढगांचा आवाज , सभोवताली प्रचंड समुद्रासारखे जलाशयाचे पाणीच पाणी पाहून सगळे खूष झाले . वातावरणात अनोखी ऊर्जा भरली होती .मग कवींची कविता हृदयापासुन जागृत झाली व निरोप घेण्याआधी भर रस्त्यात हिरव्यागार डोंगराच्या सानिध्यात त्यांनी
ती वेळ निराळी होती , 
ही वेळ निराळी आहे 
अशी मोठी सुंदर कविता सर्वांसाठी सादर केली त्यांच्या बहारदार सादरीकरणामूळे त्या दिवसाचे सोने झाले ,कान तृप्त झाले व खरंच वाटू लागले ती वेळ निराळी होती ,
ही वेळ निराळी आहे .
वो शाम कुछ अजीब थी । 
यह शाम भी कुछ अजीब है । 
हे आम्ही सर्वांनी खरोखरच अनुभवले व एकमेकांचा मनापासून निरोप घेतला . खरं तर प्रत्यक्ष भेटीची ही गोष्ट येथे संपली .
         पुढे आम्ही फेसबुक फ्रेंड झालो , व्हॉटसअपवर एकमेकांशी संवाद साधू लागलो . एकमेकांचे लेख कविता शेअर करू लागलो होतो . पण एक चमत्कार माझ्या मोबाईलमध्ये झाला होता . माझ्या मोबाईलवर असलेले सर्वच्या सर्व व्हीडीओ , फोटो अचानक गायब झाले . माझ्या मनात तर मोठी खंत निर्माण झाली , मनात कायमची हुरहुर निर्माण झाली . कारण सामंत , म्हात्रे यांच्या सोबतचे सर्वच्या सर्व फोटो मोबाईलवरून अदृश्य झाले होते . खूप जंगजंग पछाडले पण फोटो काही शेवटपर्यंत सापडलेच नाहीत .मग मी माझ्या मुंबईच्या चित्रप्रदर्शनाच्या तयारीत त्यानां विसरूनही गेलो . पण कवि अरुण म्हात्रेंचे शब्द मात्र कायम मनात रुंजी घालत होते .
ती वेळ निराळी होती ,
ही वेळ निराळी आहे .
        जानेवारीत नेहरू सेंटरच्या चित्रप्रदर्शनात सामंतसाहेब सर्व कुंटूबियासोबत आले . त्यांनी प्रदर्शनात स्वातीची पाच तैलरंगातील चित्रे विकत घेतली .आमच्या प्रदर्शनात प्रथमच मराठी माणसाने , मराठी चित्रकाराची कोणतीही घासाघीस न करता एकदम पाच चित्र घेणे हा नवा अनुभव कायम लक्षात राहणारा होता . त्यावेळी सामंत व म्हात्रे यांच्या प्रथम भेटीची आठवण झाली . अरुण म्हात्रे यांनी सुद्धा फोटो पाठवण्याची आठवण केली होती पण मी गप्पच राहीलो . कारण फोटो गायब झालेले होते . फक्त मनात एक वाक्य सारखे घोळत होते .
ती वेळ निराळी होती ,
ही वेळ निराळी आहे .
         आज सहा महिन्यानंतर अचानक अवकाळी गारांचा मोठा पाऊस पडत होता . ढगांचा मोठा कडकडाट होत होता . थंडगार वारे वहात होते . वातावरणात नवी उर्जा निर्माण झाली होती . मग टेरेसवर एकटाच निवांत बसून पुन्हा कविमित्राच्या कवितेची खूप आठवण झाली व नवा मोबाईल सहज चाळत होतो  तर अचानक सगळे फोटो गुगल क्लाऊड अॅपवर सापडले .निरोप घेतानाचा कविता सादर करतानाचा व्हीडीओ देखील सापडला . 15 GB फ्री डाटा फुल्ल झाल्याने गुगलवाल्यांनी सर्व फोटो गायब केले होते . व एक दोन दिवसांपूर्वी 100 GB डाटा विकत घेतल्यामूळे गायब केलेले सर्व फोटो परत मोबाईलवर पाठवले . खूप आनंद झाला . 
कारण अशा काही आवडीच्या कलाकारांच्या कलेचा आस्वाद घेणे , कवींच्या कविता प्रत्यक्ष त्यांच्या मुखातून ऐकणे हा अनुभव अविस्मरणीय असतो .तो अनुभव , ते शब्द कधीच विसरता येत नाहीत . ते काळजाच्या आत कप्प्यात खूप खोल रुतून बसतात .
आज पावसात परत एकदा ती कविता पुन्हा पुन्हा ऐकत मनात कायमची साठवली .

ती वेळ निराळी होती ,
ही वेळ निराळी आहे .

सुनील काळे✍️
9423966486

मी ' वाडा ' बोलतोय .........

मी ' वाडा ' बोलतोय .....

        पाचगणी सोडून आता सात आठ वर्षे झाली . वाईपासून 3 km अंतरावर  मेणवली वाड्याजवळच राहण्यासाठी घर आणि स्टुडिओचे बांधकाम पूर्ण केले आणि रोज सकाळी घाटावर फिरायचा छंद लागला. एक छोटेसे स्केचबुक दोनतीन पेनपेन्सीली खिशात टाकून सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घाटावर  फिरताना जो आनंद मिळतो तो खरं सांगायचे म्हणजे शब्दात व्यक्तच करता येत नाही .
          आजही नेहमीप्रमाणे मी वाड्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली . आज गुढीपाडवा  त्यामूळे प्रत्येक घरासमोर गुढी उभारण्याची तयारी करण्यात गावकरी डूबून गेले होते . मी देखील तो आनंदोत्सव पहात पहात नाना फडणवीस वाड्यापर्यंत पोहचलो . वाड्याच्या मुख्य प्रवेशदाराला विशेष नक्षीदार तोरण बांधलेले दिसत होते. भगवा झेंडा दिमाखाने डौलत होता . वाड्याची देखभाल करणारे मॅनेजर देशपांडे व सहकारी जगताप यांची फडणवीस वाड्याची गुढी उभारण्याची जय्यत तयारी चालली होती . 
         इतक्यात आमचे दै .प्रभातचे पत्रकार मित्र श्रीनिवास वारुंजीकर यांचा फोन आला . आज मेणवलीत सातारचे कलेक्टर श्री.शेखर सिंग व इतिहासाचार्य पांडुरंग बलकवडे येणार आहेत . आम्ही कार्यक्रमासाठी मेणवलीत वाड्याजवळ आलो आहोत . त्यावेळी नेहमीप्रमाणे मी घाटावर मोठ्या गोल चौथऱ्यावर पाय पसरून निवांत स्केचेस करत होतो. थोड्याच वेळात पत्रकार मित्रांचे घाटावर आगमन झाले आणि मग आमची फडणीस वाड्याच्या कार्यक्रमाविषयी चर्चा सुरु झाली , त्या कार्यक्रमाचे नाव होते 
मी ' वाडा ' बोलतोय .....
            खरंतर आज वाडा सर्वांबरोबर बोलणार होता . पण मला मात्र आठवतेय गेल्या कित्येक वर्षांपासून वाडा माझ्याशी कितीतरी वेळा बोलला होता . तुम्ही म्हणाल कसे शक्य आहे ? वाडा कसा बोलेल? पुतळे , वाडा , किल्ले , गढ्या, डोंगर , झाडे ,झुडपे , पशू , पक्षी , प्राणी आपल्या बरोबर संवाद साधण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात . डोंगरानां वणवे पेटवले की डोंगर होरपळतात , कितीतरी पक्षीप्राणी त्या वणव्यामूळे  बेघर होतात . कोंबड्या , बकरे यांच्या मानेवर सुरी फिरली की जिवाच्या आकांताने ते ओरडतात पण माणसाने क्रूरपणाची परिसिमा गाठली आहे . माणूस स्वार्थी व जाणूनबूजून बहिरा झाल्यामूळे त्याला या पर्यावरणाच्या संवेदनाचे मूक आक्रदंन मनापर्यंत पोहचत नाहीत .
           आमचे मूळ गाव पांडवगडाच्या पायथ्याशी असलेले पांडेवाडी . भोगाव , मेणवली व पांडेवाडीच्या जत्रा एकापाठोपाठ एक दिवसानंतर असतात . त्यामूळे लहान असल्यापासून खूप वेळा या जत्रेच्या वेळी मेणवली घाटावर यायचो . पुढे  चित्रांची आवड निर्माण झाली त्यावेळी वाड्यात नेहमी यायचो . त्यावेळी वाडा सताड मोकळा व उघडा असायचा . वाड्याच्या भिंती पडलेल्या असायच्या , सागवानी लाकडाला वाळवी लागलेली असायची , कोनाड्यानां कोळीष्टके लागलेली असायची ,वाड्याच्या आत काही मुस्लीम शेतकामगारांची कुटूंबे राहायची . पत्र्याच्या व प्लायवूडच्या रंगीत तुकड्यांनी खिळे ठोकून तयार केलेल्या छोट्या छोट्या खोल्या मला अमूर्त चित्रांची आठवण करून द्यायच्या . वाड्याला कोणी वारसदार नसल्यासारखे त्याचे पडीक हाल पाहुन मनाला वेदना व्हायच्या . वाड्यात मराठेशाहीतील भित्तीचित्रे होती पण त्यावर पर्यटकांनी रेघोटया मारून , खरवडून स्वतःची व प्रेमिकेचे नावे टाकून आपली संस्कृती दाखवली होती . मग त्या भित्तीचित्रांच्या खोल्यानां कायमस्वरूपी कुलूपे लावून , पर्यटकांना दाखवण्यासाठी कायमची पूर्ण  बंदी केली गेली .
           आतले सागवानी लाकडांचे नक्षीकाम , मस्तानीचा पलंग , खिडक्या , चौथरे , वाड्याची काळी कौले पूर्णपणे ढासळून विस्कळीतपणे पडलेली असायची . मग वाडा माझ्या त्याच्या या वाईट अवस्थेबद्दल माझ्याशी बोलायचा . तक्रारी करायचा . त्याच्या तक्रारी व झालेली पडझड पाहून मन दुःखी व्हायचे . वाटायचे या वाड्याचे नशीबच वाईट . मग मी त्याला समजावयाचो की बाबारे भारतामध्ये जुन्या वास्तूंचे संवर्धन करायची परंपरा व सवय नाही . तुझ्या भावना समजतात मला . पण मी एकटा काय करू शकतो ? ज्या राजकारणी लोकानां आम्ही निवडून दिले , ज्यांच्या हातात सत्ता दिली अशी सर्व मंडळी आपआपल्या पक्षांचा झेंडा  घेऊन एकमेकांशी इतके जोरदारपणे भांडंत बसतात , त्यांच्या एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात किल्ल्यांच्या ,गडाच्या , जलदुर्गांच्या , जुन्या वाड्याच्या वास्तूंच्या सुधारणा करण्याची जबाबदारी ते विसरूनच गेलेत . 
         महाराष्ट्रात  कितीतरी चांगली ठिकाणे माणसांच्या दुर्लक्षितेमुळे , राजकारण्यांच्या उदासीनतेमूळे दुर्देवी आणि अविकसित राहीली . कित्येक जुन्या वास्तूंचा अंत झाला .त्या अंत होणाऱ्या वाड्यांपैकीच  हा मेणवलीचा फडणवीस वाडा देखील असावा .
             पण कधीतरी खऱ्या प्रार्थनेतून खऱ्या अस्थेमधून , खऱ्या श्रध्देतून मोठा चमत्कार होतो असे म्हणतात , तसाच चमत्कार मी गेल्या चारपाच वर्षांपासून पाहतोय . 
            एकदा सकाळी घाटावर फिरत असताना वाड्यात अनेक कारागीर काम करत असताना पाहीले . संपूर्ण छतावरची कुजलेली फुटलेली कौले काढून नवा पत्रा बसवायचे काम सुरू झाले होते . प्रवेशद्वाराच्या दरवाजानां दुरुस्त करून लाकडी पॉलीश केले जात होते . सदरेचा भाग पूर्णपणे काढून सागवानाच्या जुन्या लाकडांचा उपयोग करून नवी सदर दिमाखाने उभी राहत होती . पायाला अडथळा ठरणाऱ्या पाण्याच्या गटारांवर लादी बसवण्याचे काम सुरु झाले होते . नक्षीदार छत , महिरिपी मराठेशाहीतील तुळ्या , खांब यांची योग्य ती दुरुस्ती करून चकाकी आणली जात होती . अंधारात धडपडत वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांची दुरुस्ती करून लाईटची सोय केलेली होती . मुख्य चौकातील तुटलेले छोटे वर्तृळाकार सागवानी घुमट नव्या आकारात पुन्हा बांधले गेले होते . आता दररोज सकाळी फिरताना वाड्याची होणारी प्रगती कळत होती .सकाळी सहा वाजल्यापासून कामगार निष्ठेने वाड्याच्या जिर्णोद्धार करण्याच्या कामाला लागलेले असायचे . त्या होत असलेल्या या सुधारणांमूळे मग वाड्याच्या बोलण्याचे ' तथास्तू ' असे समाधानाने तृप्त झालेले आशिर्वादाचे शब्द मला स्पष्ट ऐकू येऊ लागले . वाडा आता प्रेमाने सगळ्यानां सांगू लागला . या सर्वजण आणि इयरफोन लावून ऐका खरंच
मी ' वाडा ' बोलतोय .........
            हळूहळू वाडा , त्याच्या तटबंदी , बुरुज , नगारखान्याचे छत , प्रवेशद्वार नव्या तेजाने चमकू लागली . आतली प्रत्येक खोली नीटनीटकेपणाने सजवली जात होती . प्रत्येक जागेचे महत्व शोधून त्या खोल्यानां नावे दिली गेली . माहीती नकाशा फोटोंचे फ्लेक्स लावले जात होते . वाड्यात चार पाच स्थानिक पूर्ण ट्रेनिंग दिलेले गाईडस आता पर्यटकांबरोबर फिरून वाड्याचा इतिहास व पेशवाईतील महत्वाच्या जुन्या गोष्टीनां उजाळा देऊ लागले . पोवाडे वाजू लागले . वाडा आता झाडून पुसून पर्यटकांसाठी खुला केला  आणि इतक्यात कोव्हीडचे संकट सुरु झाले . त्यात दोन वर्ष त्या महामारीत निघून गेली . आज नव वर्षाच्या सुरुवातीस संपूर्णपणे करोनामूक्त झालेच्या शासकीय घोषणेमूळे  महाराष्ट्रातील पर्यटक पुन्हा नव्याने मोकळा श्वास घेऊ लागला . फिरू लागला .  सगळ्या वाड्याचा जणू कायापालटच झाला .वाडा पुन्हा सजून सज्ज झाला व सर्वानां म्हणू लागला या ऐका
 मी ' वाडा '  बोलतोय .......
           आज सातारा जिल्ह्याचे कलेक्टर श्री . शेखर सिंग व इतिहासकार पांडूरंग बलकवडे यांच्या उपस्थितीत वाडा नव्याने बोलू लागला . आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून असे एक ॲप तयार केले आहे की वाड्यातील प्रत्येक जागेचा , बुरुजाचा , कोनाड्याचा इतिहास आता कानाला इयरफोन ऐकत जोपसला जाणार आहे . खऱ्या अर्थाने एका जुन्या पण नव्या तेजस्वी रुपात पर्यटनस्थळाचा कायापालट केला गेला . मला त्याचा साक्षीदार म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळत होती म्हणून मुद्दाम कार्यक्रमाला उपस्थित राहीलो .
            वाड्याचे आत्मवृत्त ऐकताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे सध्या वारसदार असलेल्या अनिरुध्द , नितिन , अविनाश , संदीप या मेणवलीकर फडणवीस बंधू ,त्यांच्या बायका व नवीन पिढीतील  संपूर्ण कुटूंबच या कार्याने भारावलेले आहेत . हे कार्य आपले एकट्याच्या स्वार्थासाठी नसून पुढील भावी पिढीसाठी आणखी पुढची अडीचशे वर्षे तरी ही वास्तूरुपाने सतत नव्याने आपला गौरवशाली इतिहास जोपासला जावा या साठी तनमनधनाने झटत होती . त्यांचा आदर्श नव्याने तरुणाईला प्रेरीत करणारा आहे .  अशा श्रध्देने , निष्ठेने व भारावलेल्या परंपरेने इतिहास जपणारी माणसे पाहून कौतूक वाटत आहे.
             अतिशय उत्तम लेखन करणारे व भारदस्त धारधार आवाजात हा इतिहास ऑडीयो रुपात साकार करणारे किरण यज्ञोपावित यांची भेट झाली . इतिहासाचा मागोवा घेत जुन्या गोष्टीनां धक्का न लावता जिर्णोद्धार करणारे आर्कीटेक्ट राहूल चेंबूरकर यांचे काम वाखाणण्याजोगेच आहे . शिवरायांचे स्वराज्य व्यवस्थापन या विषयावर पी . एच .डी करणारे डॉ.अजित आपटे व इतर स्क्रिप्ट रायटींगसाठी मदत करणाऱ्या अनेकजणांची भेट घेता आली .
             जिल्हाधिकारी श्री. शेखर सिंग यांनी आपल्या मराठी भाषणात या वाड्याचे नव्याने जिर्णोद्धार करणाऱ्या सर्व मेणवलीकरबंधूचे मनापासून कौतुक केले . त्यानां दिलेले स्मृतीचित्र (मोमेन्टो) आवडल्याचे त्यांनी कबूल केले .पाचगणी महाबळेश्वरला होणाऱ्या अमाप गर्दीमुळे पर्यटकांनां नव्याने उदयास आलेला जिर्णोद्धारीत मेणवलीचा वाडा सर्वानां आकर्षित करेल अशी अपेक्षा व्यक्त केली. वाईच्या परिसरात असलेल्या अनेक जुन्या मंदिरानां , वाड्यानां नव्याने पुनर्जिवित करण्याची गरज असून पर्यटनवाढीसाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे. हे कार्य स्थानिक व शासनातील मंडळीनी मिळून करावे असे आवाहन त्यांनी केले .
             इतिहासकार पांडूरंग बलकवडे यांनी पेशवाईतील नाना फडणवीस यांच्या कार्यावर नव्याने प्रकाश टाकला. अतिशय धोरणी , चतुर व मुत्सदी नानांनी कठीण काळात पेशवाईचा डोलारा सावरण्यासाठी किती कष्ट घेतले याची जाणीव करून दिली . महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी विखुरलेले किल्ले , वाडे , जलदुर्ग यांचा जिर्णोध्दार करून असे वैभव व परंपरा जपण्याची जबाबदारी सर्वांनी थोडीथोडी घेतली पाहीजे , हातभार लावला पाहीजे अशी अपेक्षा व्यक्त केली . त्यांचे हे छोटे भाषण संपूर्ण साडेतीनशे वर्षाच्या इतिहासाला उजळणी देणारे ठरले .
            मेणवली ग्रामस्थांनी उपस्थित पाहुण्यांचा सत्कार केला . उपसरपंच संजय चौधरी यांनी जिल्हाधिकारी ,
शासनातील उपस्थित असलेल्या प्रांत ,
तहसिलदार , सर्कल , उपविभागीय अधिकारी , वाईचे मुख्याधिकारी व काही नगरसेवक , मान्यवर नागरीक यांच्या उपस्थितीबद्दल संतोष व्यक्त केला . तसेच मेणवली हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी , तरुण मुलानां नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी योजनांचा पाठपुरावा करावा म्हणून अपेक्षा व्यक्त केली . वाड्याजवळ नदीशेजारी पर्यटकांसाठी बोटींग सुरू करण्याची मागणी केली . वाड्याच्या परिसरात  सार्वजनिक शौचालय व स्वच्छता अभियान राबविण्यासाठी व विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली . आणि हे सगळे प्रत्यक्षात उतरले तर एकमेकांच्या साथीने मेणवली गाव एक दिवस खरोखर भारताच्या  पर्यटनाच्या दृष्टीने दखलपात्र होईल अशी अपेक्षा केली .
          अतिशय नीटनेटकेपणा व उत्तम व्यवस्थापन उत्तम सुत्रसंचालन  केलेल्या या कार्यक्रमाची सांगता सुंदर आवाजाच्या  पसायदानाने झाली
         आज आपण या परिसरात घर बांधून चूक केली नाही या विचाराने माझ्या मनाला आनंदच झाला .
          या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्व उत्साही मेणवलीकर बंधू व कुटूंबातील सर्व सदस्य ,त्यांच्या टिममधील श्री . रोहन देशपांडे , श्री .जगताप यांच्यासह सर्व सहकारी सदस्यांचे मनापासून आभार व धन्यवाद ! या सर्वांचे टिम वर्क खरोखर कौतुकास्पद होते .
          मेणवली वाडा व परिसर संपूर्ण फडणवीस यांची खाजगी मालमत्ता आहे . त्यासाठी सुधारणा , विकास व मेंटेनन्ससाठी आता पार्किंग (३० रुपये) व प्रवेशमुल्य ( ४० रुपये )आहे हे जाण्यापूर्वी लक्षात घ्यावे .

        विशेष सुचना : चित्रकारानां , फोटोग्राफर्सना घाटावर प्रत्यक्ष स्केचिंग करणाऱ्यानां मात्र एकदा प्रवेशमूल्य दिल्यानंतर परत स्वतंत्र लेखी परवानगी अर्ज द्यावा ,चित्र काढण्यासाठी वेगळे कमिशन मूल्य द्यावे अशी कृपया सक्ती करू नये अशी मेणवलीकर बंधूना प्रेमळ विनंती . कारण ते त्यांच्या चित्रांतून तुमचा वाडा व घाटाचा परिसर  आणखी सौंदर्यपूर्ण करून प्रदर्शनाद्वारे जगभर प्रसिद्धच करत असतात . त्यानां मुक्तपणे चित्रण करून द्यावे . ती चित्रे , स्केचेस रसिक पाहतील त्यावेळी त्यांचाही आनंदही द्विगुणित होणार आहे व पर्यटन वाढीसाठी प्रसार होणार आहे याची जाणीव ठेवावी .
        आजचा  गुढीपाडवा खऱ्या अर्थाने साजरा झाला .
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

सुनील काळे 
9423966486

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...