बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

भालचंद्र मोने - एक भन्नाट वाईकर

भालचंद्र मोने - एक भन्नाट वाईकर
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
         वाई , पाचगणी व महाबळेश्वर ही सातारा जिल्ह्यातील  जवळजवळ लागून असलेली महत्वाची ठिकाणे आहेत . पण या तिन्हीही ठिकाणची भौगोलिक रचना , भूप्रदेशाची वैशिष्ठ्ये , वातावरण , हवामान व सर्वात महत्वाचे माणसांच्या जगण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत . वाईमध्ये प्रसिद्ध अशी अनेक मंदिरे , दगडी चिरेबंदी घाट , कृष्णा नदी वाई शहरातून वाहत असल्याने सर्वानां खूप भावते . पाचगणी टेबललॅन्डच्या पठारामूळे व बोर्डींग शाळांमूळे प्रसिद्ध , तिथे अनेक शाळांच्या शिक्षणपद्धतीमूळे कोस्मोपोलीटिशन संस्कृती आहे . महाबळेश्वरला सह्याद्री डोंगरपर्वतांच्या रांगामूळे अनेक पॉईंटस विकसित झाले आहेत व त्याचे श्रेय ब्रिटिशांना जाते . विकसित केलेल्या पर्यटन संस्कृतीमुळे एक वेगळा व्यावसायिकपणा येथील माणसांमध्ये मुरला आहे .
           मी ज्यावेळी पाचगणीतून वाईला स्थलांतरीत झालो त्यावेळी नव्या मित्रांच्या शोधात होतो . पण मित्र थोडे असे पटापट मिळतात ? मग वाईची पुस्तके वाचून थोडा अभ्यास करायचा ठरवले . त्यासाठी वाईचे प्रसिद्ध लेखक लक्ष्मीकांत रांजणे यानां विनंती केली आणि त्यांनी एक अप्रतिम पुस्तक वाचायला दिले त्या पुस्तकाचे नाव होते वाई - कला आणि संस्कृती . त्या पुस्तकावर चित्रकार सुहास बहुलकरांचे चित्र व अप्रतिम प्रस्तावना आहे . त्या पुस्तकाचे लेखक सु .र . देशपांडे यानां भेटलो तर त्यांनी सांगितले तुम्ही आता या पुस्तकाच्या प्रेमात पडलाच आहात पण एका व्यक्तिला लवकरात लवकर भेटलेच पाहीजे आणि त्यांचे नाव आहे भालचंद्र मोने कारण त्याच्यां मदतीमूळेच हे पुस्तक वैशिष्ठ्यपूर्ण झाले आहे .
             ब्राम्हणशाहीच्या घाटाजवळ उतरताना मोने साहेबांच्या घरी गेलो आणि लोकेशन पाहूनच चकीत झालो . माझे एक स्वप्न होते आपले घर वाईच्या नदीच्या घाटाजवळ असावे मग रोज सकाळी निवांतपणे घाटावर फिरायचे व स्केचिंग करत राहायचे . वाईचे सगळेच घाट किती वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात . प्रत्येक प्रहारात , प्रत्येक सिझनमध्ये त्याची वेगवेगळी रूपे दिसतात . भालचंद्र मोने यानां प्रत्यक्ष भेटल्यावर खरोखरच त्यांची व घाटाचीही वेगवेगळी रूपे आजमावता आली .
            वाईला स्टेट बँक ऑफ इंडियामधून ते रिटायर्ड झाले . बँकेचा कारभार तसा रुक्ष कर्तव्यदक्षतेचा . सतत आर्थिक गोष्टींशी निगडीत असलेला पण भालचंद्र मोने त्रासलेले वाटले नाहीत . कारण त्यांच्या आवडीनिवडी निराळ्या होत्या . वाचन , चित्रकला , भटकंती ,संशोधन , अध्यात्म व सर्वात महत्वाचे आपल्या वाई गावाविषयी असलेले नितांत प्रेम . या प्रेमापोटीच त्याच्यां मित्रांनी 'आस्था ' नावाची पर्यावरण मैत्री संस्था स्थापन केली व त्याचे सचिव म्हणून त्यानी स्वतःला कामात झोकून दिले .
            वाईला लक्ष्मणशास्त्री जोशींमूळे विश्वकोष व प्राज्ञपाठशाळा खूप प्रसिद्ध आहेत . त्या संस्थेच्या प्रभावातून अनेक लेखक , कवी , कायकर्ते , संशोधक लेखक निर्माण झालेले आहेत . भालचंद्र मोने त्यापैकी एक . काही दिवसांपूर्वी त्यांनी वाई परिसरातील फोटोग्राफर्स एकत्र करून असंख्य पक्षांची माहीती असलेले सुंदर पुस्तक निर्माण केले होते . त्यासाठी पक्षीतज्ञ किरण पुरंदरे यानां प्रकाशन सोहळ्याला बोलावले होते . वाईचे कमलाकर भालेकर दुसऱ्या महायुद्धात वॉरंट ऑफीसर होते . त्या महायुद्धात त्यांनी रोजची डायरी लिहीली होती . मोनेंनी ती डायरी मिळवून छान संक्षिप्त पुस्तक लिहीले आहे.
            वसंत व्याख्यानमालेचे अनेक वर्ष श्रोते, कार्यकर्ते ते पदाधिकारी असल्याने भालचंद्र मोने बहुश्रृत व बहुआयामी व्यक्तिमत्वाचे आहेत . त्यानां अनेक विषयांची व अनेक गोष्टींची माहिती असल्याने त्यांच्याशी गप्पा मारत असताना कधी कंटाळा येत नाही . विश्वकोषाची लायब्ररी , प्राज्ञ पाठशाळा , येथे त्यांचा मुक्त सतत संचार चालू असतो . त्यांच्या खांद्यावर एक शबनम बॅग नेहमी लटकवलेली असते . त्यात एखादे तरी पुस्तक असतेच . मी चित्रकार असल्याने त्यांनी टिळक वाचनालयात चित्रकला विषयाची  कोणकोणती पुस्तके उपलब्ध आहेत याची तोंडपाठ यादीच दिली कारण त्यांचे आजोबा हरभट मोने चित्रकार होते. त्यानां पारंपारीक कला ते आधुनिक समकालीन कला , मूर्त , अमूर्त कला ,गाजलेले चित्रपट , चित्रकार ,लेखक , जुनी पुस्तके , अध्यात्मातील अनुभव यांचा दांडगा अभ्यास आहे . पण त्याचा वृथा अभिमान नाही . अतिशय साधेपणा व अहंकार विरहीत जीवनशैली यामुळे ते समाधानी असतात . त्यांच्या या स्वभावामुळे मी कधीकधी गप्पा मारायला त्याच्या घरी जातो. एक प्रसंग मात्र कायम लक्षात राहीला आहे तो सांगण्यासारखाच आहे .
            एकदा विजय दिवाण व मी मोनेसाहेबांच्या  घरी मस्त गप्पा मारत होतो . आणि अचानक संध्याकाळ झाल्याने चहाचा विषय निघाला . त्यावेळी स्वतः मोने चहा करायला आत गेले . बाहेर त्यांच्या वयोवृद्ध आई झोपाळ्यावर बसून आमच्याशी बोलत होत्या कारण त्यांचे पाय दुखत होते. मी त्यानां एक सहज प्रश्न विचारला . नागेश मोने व भालचंद्र मोने ही तुमची दोन मुले . एक शाळेचा मुख्याध्यापक व दुसरा बँकेचा अधिकारी आहेत , कर्तृत्ववान आहेत , हुशार आहेत , व्यासंगी आहेत , सर्वानां आवडणारे आहेत पण दोघांनीही लग्न केले नाही . तुम्हाला दोन सुना मिळाल्या असत्या तर तुम्हाला जरा छान विश्रांती मिळाली असती व सुनांवर जरा रुबाबही दाखवता आला असता . तुम्हाला वाईट वाटत नाही का ?
जराही नाही . 
मोनेआजी अगदी ठामपणे म्हणाल्या .
असे कसे ? माझा लगेच प्रतिप्रश्न . जरा सविस्तर सांगा . भारतात जुन्या पारंपारिक विचारांचा पगडा आहे . प्रत्येकाला वाटते माझा वंश पुढे चालला पाहीजे , घराण्याचे नाव राहीले पाहीजे . नातू हवा , घर कसे गजबजलेले हवे . लग्न करून मुलानां जन्म देणे हे तर प्रत्येक भारतीयाला आद्य कर्तव्य वाटते मग तुमची विचारसरणी अशी वेगळी कशी ?
         मोने आजीच्यां चेहऱ्यावर मंद स्मितहास्य होते . तुम्ही हा प्रश्न मला विचारणार याची मला खात्री होती . पण खरं सांगू आता दोघेही साठीच्या आसपास आहेत त्यामूळे आता लग्न हा  विषय पूर्णपणे संपला . पण तरुण होते त्यावेळी फार पूर्वी मी त्यांच्या लग्नाचा विषय काढला होता . 
दोघेही विद्यार्थीप्रिय , अभ्यासू , वाचनप्रिय व हुशार आहेत . आनंदी आहेत , छान जगत आहेत , मग माझ्या स्वार्थासाठी त्यांच्या जीवनात मी का खोडा घालू ? हे जीवन प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसार , आवडीनुसार , सवडीनुसार , मनसोक्तपणे जगता आले पाहीजे . जीवनातील प्रत्येक दिवस एक मोठा सणाचा दिवस असल्यासारखा उत्सवपूर्ण जगता आला पाहीजे . थोडक्यात स्वमर्जीप्रमाणे  दिवस  जगता आला पाहीजे . कोणाच्याही व्यक्तिस्वातंत्र्याचा अपमान न करता , कोणाचाही प्रभाव न पाडून घेता , जीवन स्वच्छपणे जगता आले पाहीजे . माझी दोन्ही मुले आनंदी आहेत . त्यांच्या कार्यामूळे हजारो विद्यार्थी माणसे आनंदी होत आहेत आणि हा आनंद मला रोज मिळतो . मग वाईट कशाला वाटेल ?
मी हे उत्तर ऐकले व छानपणे मस्तक त्यांच्या पायाशी ठेवून आशीर्वाद घेतला .
दिव्यत्वाची जेथे प्रचिती ॥
तेथे कर माझी जुळती ॥ त्यादिवशी अशीच माझी भावावस्था झाली .
          लोकमान्य टिळक व वाईचा एक वेगळा ऋणानुबंध होता . अठ्ठावीस वाईकरांनी सांगितलेल्या लोकमान्य टिळकांच्या आठवणी , पत्रव्यवहार , टिळकांच्या वाई भेटीचे किस्से , छायाचित्रे यांचा मागोवा भालचंद्र मोने यांनी शोधून अभ्यासपूर्ण पुस्तक तयार केले आहे . जूना इतिहास पुराव्यांसह शोधून काढणे, हजारो पुस्तकांतून अभ्यास करून त्यांचे वाचन करून निवडक  माहिती संकलन करणे , त्याची वर्गवारी करून पुस्तकासाठी दस्ताऐवज तयार करणे , अनेकांच्या घरी जावून माहिती गोळा करणे , संदर्भ गोळा करणे हे एखाद्या मधमाशीसारखे न कंटाळता अविरत कष्टाचे काम असते आणि नेमके हेच काम भालचंद्र मोने करतात . अशा कामासाठी जिद्द , चिकाटी व सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा लागतो तरच कार्य सफल होते व इतके सर्व करून मोने प्रसिद्धीपासून नेहमी दूर राहतात . 
           हे सगळे आठवायचे कारण म्हणजे तीनचार दिवसांपूर्वी त्यांचा फोन आला होता . ' लोकमान्य टिळक आणि वाईकर ' या पुस्तक प्रकाशन समारंभाच्या निमंत्रण देण्यासंदर्भात . त्याचदिवशी माझा वर्गमित्र श्री .सुरेश वरगंटीवार याने लोकमान्यांचे व्यक्तीचित्र विविध माध्यमातून साकारून एक वेगळे प्रदर्शन वाईमध्ये भरवायचे ठरवले आहे . त्याचे उद्‌घाटन माझ्या हस्ते करावयाचे त्यांनी नक्की केले होते . मोठ्ठ व्हायचे कॅन्सल केले असले तरी मी मित्रप्रेमामुळे त्यानां नकार देऊ शकलो नाही .
              तर भेटू प्रत्यक्ष येत्या शनीवारी दि .२६ ऑगस्टला सकाळी 10 वाजता चित्रप्रदर्शनाच्या उदघाटनाला व संध्याकाळी 5 वाजता पुस्तक प्रकाशनाच्या समारंभावेळी . अध्यक्ष श्री . अनिल जोशी आहेत . प्रमुख पाहुणे श्री.दिपक टिळक येणार आहेत .
सर्वानां सस्नेह निमंत्रण !🙏🙏

सुनील काळे
9423966486

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...