ब्लॉग संग्रहण

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०२४

कोल्हापूरचे निसर्गचित्रकार : एस .निंबाळकर

कोल्हापूरचे निसर्गचित्रकार - एस. निंबाळकर
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
           आपण कोणत्या गावात , कोणत्या जिल्हयात , कोणत्या घरात , कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसते . निसर्गाने किंवा सृष्टीकर्त्या विधात्याने तो चॉईस माणसाला दिला नाही . पण समजा तसा चॉईस मला मिळाला असता अशी ज्यावेळी मी मनातल्या मनात कल्पना करतो त्यावेळी एक जिल्हा मला हमखास आवडतो त्या जिल्ह्याचे नाव आहे कोल्हापूर . कोल्हापूर खरं सांगायचे तर सर्वार्थाने कलापूर आहे . अशा या कलापूरात अपघाताने अचानकपणे मी कलाशिक्षण घेण्यासाठी सन 1985 मध्ये एक वर्ष राहीलो . ते एक वर्ष माझ्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करणारे , जाणीवा विकसित करणारे , जीवनाची जडणघडण करणारे व माणूस म्हणून जगताना माणुसकी शिकवणारे ठरले . म्हणून आजही कोल्हापूरला जायचे काही कारण निघाले की मी लगेच एका पायावर तयार असतो .
            मी 1984 साली बारावी सायन्स शिकलो होतो पण यापुढे आपल्याला चित्रकार म्हणून जगायचे असे माझ्या मनाने फार गंभीरपणे ठरवले . त्यावर्षी तीन ठिकाणी मी प्रवेशअर्ज भरले होते . पुणे ,मुंबई व कोल्हापूराचे कलानिकेतन कॉलेज . इंटरमिजिएट परीक्षेत A ग्रेड व दहावीला फर्स्टक्लास मिळाला होता  त्यामुळे कोणत्याही कलामहाविद्यालयात सहज प्रवेश मिळणार याची खात्री होती . पण चित्रकला क्षेत्रात घुसतानाच दुर्दैवाचे फेरे सुरु झाले . त्यावेळी बाबुराव सडवेलकर जेजे स्कूलचे डीन होते . त्यावर्षी त्यांनी एक नवा फतवा काढला की 12वी पास असणाऱ्या सर्व विद्यार्थीवर्गाला बी.ए , बीएससी , लॉ , किंवा इतर कोणत्याही शाखेत सहज जाता येईल . त्यामुळे यावर्षी प्रथम दहावीच्याच मुलामुलींना प्रवेश मिळणार , त्यापेक्षा जास्त शिकलेल्या इतरानां कोणालाही प्रवेश मिळणार नाही . त्यामुळे माझी चांगलीच गोची झाली . पाचगणीपासून पुणे जवळ होते त्यामुळे पुण्यात मला प्रवेश हवा होता . मुंबई तर खूपच दूर वाटायची त्यावेळी .
             पुण्यात एक महिना धडपडलो व खूप निराश झालो .फौडेंशन हा बेसिक कोर्स असतो नंतर पुन्हा वेगळ्या कॉलेजमध्ये जाता येते हे समजल्यानंतर मी  निदान कोल्हापूरला तरी प्रयत्न करावा असे ठरवले .
             आयुष्यात पहिल्यांदा कोल्हापूरला आलो . बाबूराव  पेंटरांचे चिरंजीव अरविंद मेस्त्री त्यावेळी प्राचार्य होते . त्यांनी निसर्गचित्रांचा गठ्ठा पाहीला आणि म्हणाले शासनाला काय येड लागलयं समजत नाही . ज्याला कलेची आवड आहे त्यानां प्रवेश द्यायचा सोडून फक्त दहावी पास असलेले घ्या हे चुकीचे आहे . मग सरांनी दोन दिवस थांब आपण प्रयत्न करू असे सांगितले . मग आयुष्यात  पहिल्यांदा बाहेर राहण्याचा प्रश्न पडला . आता काय करावे ? या विचारात कोल्हापूर बसस्थानकावर बसून राहीलो . रात्री तेथेच झोपलो . 
             दुसऱ्या दिवशी चालत कळंबा येथे असणाऱ्या कलानिकेतन कॉलेजला पोहचलो तर अरविंद सर नुकतेच ऑफिसला येत होते . त्यांनी ऑफीसात बोलावले . रात्री कुठे राहीलास ? काय खाल्ले ? ओळखीचे कोणी आहे का याची प्रेमाने विचारपूस केली . मी ज्यावेळी स्टेशनवरच झोपलो हे ऐकून ते आश्चर्यचकीत झाले . त्यांनी मला सांगितले जा तुला फौडेंशनच्या वर्गात  प्रवेश मिळाला असे समज . तुझी शिकायची जिद्द , चिकाटी मला आवडली . बघू पुढे काय होते ते , मी सांगतो तसे कर .
            कोल्हापूरच्या कलामहाविद्यालयात मला प्रवेश मिळाला पण जगण्यासाठी अन्न व राहण्यासाठी छप्पर लागते . ते तर माझ्याकडे नव्हते व कोणी ओळखीचेही नव्हते . पण कोल्हापूरची माणसेच भारी . हळूहळू चारपाच कॉटबेसीसवर खोलीत राहणारे काही विद्यार्थी होते त्यांनी मला त्यांच्यात सामावून घेतले . मी साईनबोर्ड करायचो व निसर्गचित्रकार म्हणून मला कलाक्षेत्रात काम करायचे होते . स्वतःच्या पायावर उभे राहून पैसे मिळवून शिक्षण पूर्ण करायचे होते . मग मी व माझा मित्र दिपक सातार्डेकर कामासाठी भटकू लागलो . त्यावेळी छत्र्यांवर नाव टाकणे , सायकली डेकोरेट करणे , दुकानांचे बोर्ड रंगविणे , नाटकाची पोस्टर्स करणे , बंगल्याच्या दर्शनी भागावर घरांवर नावाच्या पाट्या लिहीणे अशी कामे मिळत . ती कामे मिळवत असताना ऐके दिवशी खासबाग मैदानाच्या समोरच्या  पहिल्या मजल्यावर एक छोटी पाटी दिसली . पेंटर एस . निंबाळकर आर्ट्स आणि स्टुडीओ . मग उत्सुकतेपोटी नकळत मी पहिल्या मजल्यावर पोहचलो .
            निंबाळकराच्या या स्टुडीओमध्ये एकच मोठी खोली होती . त्या दरवाज्या शेजारी एक लाकडी फोल्डींगचे इझल त्यावर माऊंट बोर्ड लावलेला होता . त्या इझलशेजारी एक मोठे टेबल त्या टेबलावर एका प्लास्टीकच्या ट्रे मध्ये असंख्य पोस्टर कलर्सच्या अर्धवट रंगानी भरलेल्या बाटल्या होत्या . जलरंगाचे असंख्य ब्रशेस , पाण्याची छोटी बादली , पॅलेटस व शेजारच्या लोखंडी रॅकवर व टिपॉयवर चित्रांची पुस्तके रचलेली होती .
पांढरा बिनबाह्यांचा बनियन , बुल्गानीन दाढी , अनेक रंगानी शितोंडे उडून मूळ रंग कोणता हे दिसत नसलेली पँट घालून डाव्या हातात सिगारेटचे झुरके घेत हे चित्रकारमहाशय एक दुकानाचा साईनबोर्ड ऑईलपेंटने रंगवत बसलेले होते .
             मी त्यानां नमस्कार केला माझी ओळख सांगितली व तुमच्याकडे काही काम मिळेल का याची विचारणा केली . अरे वा ! तु पाचगणीचा का? लई बेस्ट स्पॉट ? लई भारी हाय बघ लँडस्केपसाठी . मी गेलो होतो . टेबललॅन्ड नावाचे पठार हाय बघ तेथे . एकदम बेस्ट . सिगारेटचे झुरके मारत साईनबोर्ड रंगविणारे एस. निंबाळकर पुढे कायमचे मित्र झाले . हळूहळू निंबाळकर मला त्यांची जास्तीचे काम द्यायचे . पण त्यांचे खरे प्रेम हे निसर्गचित्रे रेखाटनावर असायचे . पोटासाठी साईनबोर्ड व इतर रंगविण्याची कसलीही कामे करताना त्यांनी कधी लाज , शरम धरली नाही . किंवा मी मोठा चित्रकार आहे , जी डी आर्ट पेंटींग व कमर्शियल आर्ट शिकलो आहे तर अशी कामे का करू ? असा प्रश्नही त्यानां कधी पडला नाही . त्यांचा हा गुण मला जगण्यासाठी खूप उपयुक्त ठरला .
             कोल्हापूरचे अनेक चित्रकार त्यांच्या स्टुडिओला येता जाता सहज भेट देत असायचे त्यांनी कधीच कोणाला रोखले नाही . अपॉईमेंट नावाची भानगडच त्यांनी ठेवली नाही . मुक्त प्रवेश व भरपूर कोल्हापूरी शिव्या घालून ते येणाऱ्या जाणाऱ्यांचे स्वागत करायचे . खूप लोकानां भेटायचे . पुण्या मुंबईतील चित्रकार फोन करून या म्हणायचे पण निंबाळकर त्यानां कधी फोन करायचे नाहीत . मी त्यानां एकदा विचारले की समजा तुम्ही त्या चित्रकाराच्या घरी गेला आणि तो तेथे नसला तर ? ते सहज म्हणाले सुनील , तुला सांगतो ही चित्रकारमंडळी म्हणजे लई म्हंजे लई म्हंजे लईच चतुर जात . तुम्ही त्यानां फोन केला की लई नाटकं करणार . खोटे तर लगेच बोलणार , लई बीझी हाय असं म्हणणार त्यापेक्षा डायरेक्ट भिडायचे . रिक्शा प्रवासाचे पैसे वाया गेले तरी हरकत नाय पण आजपर्यंत माझा अंदाज कधी चुकला नाही . ते पुण्यामुंबईत भ्रमण करत असताना अनेकानां भेटायचे व त्यानां मित्र करून टाकायचे . त्यामुळेच मलाही अनेक चित्रकारानां भेटायची गप्पा मारून नव्या गोष्टी समजून घेण्याचे व्यसन लागले .
             त्यांच्याकडे अनेक चित्रांचे रेफरन्स बुक व फोटो कलेक्शन असायचे . कधी एका चित्रातील होडी घ्यायचे तर दुसऱ्या चित्रातील डोंगर घ्यायचे कधी तिसऱ्या रेफरन्समधून मंदीर घ्यायचे . कधी वातावरण निर्मितीसाठी इकडून तिकडून फिगर्स ढापायचे . या सगळ्यांचा परिपाक एक नवीनच स्पॉट किंवा निसर्गदृश्य साकारायचे . ते साकार करताना ते इतके एक्स्पर्ट झाले होते की चार पाच चित्रे एकत्र रंगवूनही कोणाला त्याचा पत्ता लागला नाही . कारण नवे चित्र खरेच वेगळे असायचे .अनेक कलाकारांच्या चांगल्या गोष्टी ते सहजपणे चित्रांत बेमालूमपणे घुसवायचे . कोणी प्रश्न विचारला तर भाबडेपणाने कोठून चित्रात काय घुसवले याची उकल करून सांगायचे .
            एकदा कोल्हापूरला प्रसिद्ध चित्रकार प्रताप मुळीक यांचे प्रदर्शन भरवायचे ठरले . त्यावेळी मी त्यांच्याकडेच कामाला होतो . मग चित्र नेणे , रात्री डिस्प्ले करणे , चित्रांवर नंबर टाकणे , बाहेरचा कापडी बोर्ड , बॅनर , जाहिरातीचा फलक रंगविणे इत्यादी कामे करण्यासाठी त्यांनी मला सोबत नेले . सर्व कामे संपल्यावर म्हणाले आता मी माझ्या चुलत भावाकडे मुक्कामासाठी जातो . तु काय करणार आता ? आणि ते मला तेथेच सोडून निघून गेले .खरं तर माझे कोणी नातेवाईक नव्हते तेथे जे होते ते निंबाळकरांसारखे मित्र . त्यानां फोन करून बोलावले तर शाहू स्मारकला लगेच आले . म्हणाले काळजी करू नकोस आज माझ्या स्टुडीओत झोप , कोल्हापूरला आला होतास त्या स्टेशनावर झोपू नको . मुळीक कोल्हापूरचेच पण ते आता पुण्यात राहतात . माणसे बदलतात . तु पुण्यात चार वर्ष राहूनही पुणेकरांकडून काहीच शिकला नाहीस . त्यांनी स्टुडिओची चावी दिली व रिक्शाने आम्ही खासबागच्या स्टुडीओत आलो .एस .निंबाळकर असे फटकळ पण बिनधास्त खरे बोलणारे कोल्हापूरकर होते .
            एकदा वडगावचे चित्रकार संपत नायकवडी व एस. निंबाळकर सातआठ दिवसांसाठी चित्र काढायला पाचगणीला आले होते . ते पावसाळ्याचे दिवस होते . आम्ही मस्तपैकी टेबललॅन्डच्या पठारावरच्या गुहेत , डालकेटच्या जुन्या इमारती , पाचगणीचे रस्ते , महाबळेश्वरच्या पॉईंटसवर जाऊन डोंगररांगांची चित्रे काढली . महाबळेश्वरला त्यांचे मित्र बाळू वेल्हाळ नोकरीला होते . त्यांच्याकडे मुक्काम केला व प्रसिद्ध ऑर्थरसीट पॉईंटला जाऊन छान वॉटरकलर केले . मग अचानक एस. निंबाळकर म्हणाले आपण ही चित्रे मांडून पॉईंटवर बसू या . कदाचित कोणी कलारसिक आपली चित्रे विकत घेतील . दोन तासानंतर कोणीही चित्र विकत घेत नाहीत हे पाहुन एस .निंबाळकर म्हणाले . आयला आपण महाराष्ट्रात जन्मलो हिच मोठी चुक झाली . त्यात सातारा जिल्ह्यात चित्र विकायचे म्हणजे राजस्थानाच्या वाळूत शेती करायला घेतल्यासारखे आहे . चित्रातून चित्रकार जगवला पाहीजे , चांगले चित्र भिंतीवर लावले पाहीजे याची भारतात जाणीव नाही . मग गरम भुट्टा (कणीस) खात निसर्ग पाहणाऱ्या लोकांकडे पहात ते म्हणाले . निसर्ग पाहायला येतात की भुट्टा खायला तेच कळत नाही .
             चित्र विकण्यासाठी त्यांनी मग त्यांचा अनोखा फंडा सांगितला . एकदा मुंबईला भेटले तर म्हणाले चल तुला स्वस्तात रंग कुठे मिळतात ते दाखवतो . मग अतिशय गर्दी असलेल्या जुन्या बाजाराच्या दोन टाकी परिसरात घेऊन गेले . तेथे इतकी गल्ली बोळे व असंख्य वस्तू विकायला होत्या की फिरताना मी गांगरून गेलो . मग तेथेच एका अरुंद बोळात घुसून एका जुन्या इमारतीच्या गलीच्छ वस्तीत कंपनीचे वाया गेलेले रिजेक्टेट भंगारचे रंगाचे दुकान होते तेथे घेऊन गेले . अर्धवट भरलेल्या , रंग बाहेर पडल्यामुळे रिजेक्ट झालेल्या ट्युब्ज त्यांनी विकत घेतल्या . एका दुकानात बॉक्सबोर्डचे पेपर विकत घेतले . काही ब्रशेस घेतले . दोन तीन हजाराच्या त्या वस्तू मला दाखवून म्हणाले आता बघ याचे सहा महिन्यात दहापट पैसे करतो . सहा महिन्यानंतर ते परत आले व म्हणाले चल आता माझी करामत दाखवतो .
              मुंबईत अनेक फ्रेम्समेकर्स आहेत , सदगुरु , पेटेंडरिदम , इंदू फोटोफ्रेम्स या मोठ्या शो रुम्समध्ये ओरीजनल चित्रे विकणारी मोठी व्यापारी मंडळी आहेत . त्याच्यांकडे एस .निंबाळकर प्लास्टीक फाईल्स किंवा कधी कापडी पिशव्या घेऊन जायचे . त्या पिशव्या दुकानाच्या मालकापुढे ठेवायचे . ते देतील ते पैसे घ्यायचे . घासाघीस नाही , वादविवाद नाहीत अशा चार पाच जणांकडे गेले की त्यांची सहा महिन्याची बेगमी पुर्ण व्हायची . चित्र काढण्यासाठी व जगण्यासाठी पैसे मिळाले यामध्ये ते खूष असायचे . त्यांनी कधीही मोठ्या चित्रकारांसारखे जगात नाव व्हावे , स्टाईलमध्ये जगावे , कोल्हापूरात नाव कमवावे , आपली चित्रे कोट्यावधी रुपयांमध्ये विकली जावीत अशी हाव धरली नाही . पायात साधी चप्पल , साधे शर्ट पँट व अस्ताव्यस्त अवतार त्यांनी कधी सोडला नाही . कोणावर इंप्रेशन मारण्याचे ध्येयच नसल्यामुळे आपल्या कलानिर्मितीत हा माणूस धुदंपणे जगला .
               एकदा सावर्डे येथील चित्रकार प्रकाश राजेशिर्के यांनी कोल्हापूरजवळ पन्हाळा येथे संजीवन विद्यालयात चित्रकलेचा कॅम्प आयोजित केला होता . प्रत्येक चित्रकाराला राहण्याची सोय व दहा हजार रुपये मिळणार होते . मग मी व स्वाती प्रथमच अशा कॅम्पला गेलो . तेथे एस. निंबाळकर देखील आले होते . मग आम्ही पन्हाळ्यात पायथ्याशी छोट्या गावात चित्र काढायला गेलो . माझ्याकडे खुर्ची , ईझल , बोर्ड सर्व मटेरियल होते . पण निंबाळकर मस्त पायाची मांडी घालून मातीत निवांत बसले होते . पँट खराब होत होती पण त्याची त्यांना जराही पर्वा नव्हती . डाव्या हातात सिगारेट पेटत होती . त्यावेळी मस्तपैकी दोन घरे , त्याच्यां शेणाने सारवलेल्या भिंती , कौले , दोन कोंबड्या , दोन शेळया डोक्यावर लाकडांचा भारा घेऊन जाणारी बाई यांचे मस्तपैकी दोन तासात चित्रण करून निंबाळकर कोल्हापूरला एका दिवसातच परतले . जाताना स्टुडिओत भेटून जा म्हणाले .
             त्यांच्या स्टुडीओचा पत्ता बदलेला होता . आता ते तिसऱ्या मजल्यावर शिफ्ट झाले होते . स्टुडीओची जागा बदललेली होती पण निंबाळकर बदलले नव्हते . त्यांच्या रहाणीमानाप्रमाणेच स्टुडीओतील रचना बदललेली नव्हती . त्याच अस्ताव्यस्त पसरलेल्या वस्तू , पुस्तके , भिंतीवरील अनेक टांगलेली चित्रे , तोच ईझल , तोच टेबल , तेच ते जुन्या बाजारातून आणलेल्या पोस्टर कलर्सच्या अर्धवट रंगानी भरलेल्या बाटल्या होत्या सिगारेटची अनेक थेटूक ॲश ट्रे मध्ये पडलेली होती आणि बाल्कनीमध्ये पोत्यात भरलेल्या रिकाम्या बाटल्या बघितल्यानंतर त्यांच्या रोजच्या जगण्याची पद्धत लक्षात आली . तेथेच मित्र उमेश नेरकर यांची भेट झाली .
             कोणाशी शत्रूत्व नाही , कोणाशी वैर नाही , कोणाशी स्पर्धा नाही , कोणाशी तुलना नाही . कोणी मान अपमान केला तरी विचलीत झाला नाही असा हा वेगळाच आत्मा होता .आपल्या स्वतःची एक जीवनशैली निवडून फक्त चित्रांवर जगण्याचा काट्याकुट्यातील मार्गावर सर्वांसोबत हसून जगणारा कोल्हापूरचा हा अवलीया निसर्गचित्रकार आज अनंतात विलीन झाला . आता कोल्हापूरला गेलो की चित्रकार एस.निंबाळकर व त्यांच्या फोटोमुळे असंख्य आठवणी नेहमी आठवत राहतील . . . . . 

चित्रकार : सुनील काळे✍️
9423966486

जगण्याचे " स्टॅन्डर्ड " समजलेला माणूस- प्रा . डॉ . ज्ञानदेव झांबरे सर************************        पाचगणी हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शैक्षणिक केंद्र आणि थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे . ब्रिटिश काळापासून वेगवेगळ्या लोकांनी स्वधर्मियांसाठी शाळा सुरु केल्या . त्यामुळे येथे त्रेचाळीस शाळांमध्ये अठरापगड जातींचे लोक एकत्रित रहात असल्याने येथे कॉस्मोपोलीटन संस्कृती आहे . पाचगणी शहर छोटे असल्याने बहुभाषिक वेगवेगळ्या प्रांतातील मंडळी छानपैकी एकत्रितपणे राहतात . अशा या गावात माझे बालपण गेले . दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि चांगले मार्क मिळाले म्हणून अकरावीसाठी कॉलेजचा शोध सुरु झाला . त्याचवर्षी वाईला किसनवीर महाविद्यालयात नव्याने सायन्स कॉलेज सुरु झाल्याचे कळाले . BSc डिग्री मिळण्याची चांगली सोय झाली होती . त्यामुळे घरच्यांनी मला अकरावी सायन्सला प्रवेश घेण्यासाठी फोर्स केला . मी मात्र नाराज झालो होतो कारण माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले होते व सायन्सचे विषय इंग्रजी माध्यमात शिकवले जाणार होते . इंग्रजीची माझी खूप आबाळ झाली होती कारण सातवीपर्यंत आम्हाला इंग्रजीचे शिक्षकच नव्हते . इंग्रजी , गणित , सायन्स या विषयाची तर माझी कुडंली कधी जमलीच नव्हती पण त्याकाळी उलट उत्तर देण्याची प्रथा नव्हती त्यामुळे मी मुकाटपणे वाईला सायन्स कॉलेजला रोज एस.टी बसचा पास काढून येऊ लागलो .       सायन्सच्या या वर्गात शिक्षक मला काय शिकवत होते याचे मला भान नव्हते कारण मला इंग्रजी भाषाच समजत नव्हती . चाळीस पन्नास विद्यार्थी असल्याने मागच्या बेंचवर बसायला लागलो आणि मला एक नविन छंद लागला . मी चित्रे काढायला लागलो . माझ्या मित्रांची , शिक्षकांची , प्राण्यांची , वनस्पतींच्या जर्नलमध्ये आकृत्या काढणे मला आवडू लागले . कधी कधी मी वाईच्या बसमधून पसरणीघाटात उतरायचो . या घाटातील वळणदार रस्ते , दुतर्फा असलेली वडाची झाडे , पांडवगडाच्या पायथ्याच्या सभोवतालची छोटी छोटी चमकणारी भातशेती , ऊन पावसाचा खेळ , संध्याकाळची सुर्यास्ताची रंगउधळण , वाईच्या गणपती मंदिराची , वेगवेगळ्या घाटाची चित्रे मी जलरंगात उतरवू लागलो . थोडक्यात मला चित्रकलेची फारच आवड निर्माण झाली होती . चित्रकार होण्यासाठी लागणारी इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा मी बारावी सायन्सला असताना दिली व त्यामध्ये मला 'अ 'श्रेणी प्राप्त झाली होती .       चित्रकलेचे वेड इतके वाढले की मी सकाळी सहा वाजताच थंड हवेत चित्र काढायला जायला लागलो . टेबललॅन्डच्या पठारावर तर कधी सिडनेपाँईटच्या उंच चौथऱ्यावर बसून मी धोमधरणाचे पाणी ,कृष्णा व्हॅलीतील डोंगररांगा , कधी पांगारी तायघाट जवळच्या पारसी पॉईंटची चित्रे रेखाटू लागलो . आणि अचानक माझ्या लक्षात आले मला अतिथंड हवेत सकाळी फिरल्याने सर्दीचा त्रास सुरु झाला आहे . ऑक्सिजिन घेण्यासाठी दोन्ही नाकपुड्या बंद झाल्याने श्वास घेणे मुश्कील झाले आहे . डॉक्टरांनी माझे ऑपरेशन करून नाकातील वाढलेले पॉलीप्स काढावे लागतील यासाठी तातडीने ॲडमिट केले . नाकाला मोठे बँडेज बांधूनच मी 12वी सायन्सची प्रॅक्टीकल परिक्षा दिली होती . त्यानंतर  पुण्याला चित्रकलेच्या अभिनव कॉलेजला मी गेलो . चित्रकार झालो व परत पाचगणी महाबळेश्वरचा निसर्ग रंगवू लागलो होतो . थंड हवेत वेळीअवेळी सतत डोंगररांगावर भटकंती केल्याने माझा नाकाने श्वास घेण्याचा त्रास आणखीनच वेगाने वाढू लागला . डॉ. प्रशांत पोळ यांनी वेगवेगळ्या वर्षी चारपाच वेळा माझे ऑपरेशन केले आहे . एकंदरीत मला थंड हवेची ॲलर्जी झाल्याचे सिद्ध झाले व डॉक्टरांनी 2014 साली मी पाचगणी सोडावी लागेल असे निक्षून सांगितले . मला माझे पाचगणीचे बस्तान सोडून  कायमचे  वाईला यावे असे त्यांनी सांगितले व नाईलाजाने मी काही दिवस वाईला राहण्याचे ठरवले .          वाई कॉलेजचे प्राध्यापक असलेले माझे मित्र श्री .पटकुरे सर यांनी मला सह्याद्रीनगर या परिसरात बोलावले . थोडी चर्चा केली तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की त्यांच्या सोसायटीत " प्रज्ञाअमृत " नावाचा एक बंगला आहे . त्याचे मालक श्री .व सौ झांबरे दोघेही शिक्षक आहेत . त्यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर पाच खोल्यांचे घर भाड्याने मिळते . तेथे काही दिवस राहून वाईच्या परिसरातील चित्रे काढावीत . हवा बदलाने तब्बेतीवर काय परिणाम होईल हेही कळेल व एखादी जागा आवडली तर घर बांधण्यासाठी वाईत एन ए प्लॉट घ्यावा या उद्देशाने मी त्यांच्या घरी आलो .         सहयाद्रीनगरात असलेला " प्रज्ञाअमृत " अतिशय मेंटेन केलेला ,फुलझाडे असलेला सुंदर बगीचा व पार्किंगची सोय असलेला बंगला बघताक्षणीच मला आवडला . बंगल्याच्या पाठीमागे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी स्वतंत्र जीना होता . आतमध्ये सर्व नीटनेटकेपणा होता . खिडक्या दरवाजानां पडदे लावलेले होते . आम्ही दोघेही चित्रकार असल्याने चित्रकाम करण्यासाठी व राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होती . झांबरेसर , झांबरेमॅडम व त्यांची मुलगी मृणाल हे तीनच माणसे खाली रहात होते . त्यांचा मोठा मुलगा प्रणव शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला होता . पहिल्या भेटीतच आमची छान ओळख झाली व लगेच प्राथमिक बोलणी करून मी एका आठवड्यात पाचगणीवरून वाईला शिफ्ट झालो . सर व मॅडम दोघेही स्वच्छताप्रेमी होते . त्यामुळे मी रोज मॉर्निंगवॉकला वाकेश्वरला जाताना पाहायचो झांबरे सर स्वतः साफसफाई करायचे , कुंड्यांना पाणी घालणे , झाडांची निगा राखणे ,खतपाणी देणे . पूर्ण आवार पाण्याने स्वच्छ धूवून काढायची त्यांनां आवड होती . आम्ही कधीतरी समोरासमोर भेटलो की अनेक विषयांवर गप्पा मारायचो . वाईत राहण्याचे फायदेतोटे तपासून पहायचो . येथील परिसराचा माणसांचा स्वभाव व आचरणांवर चर्चा करायचो . नवनव्या जागा शोधायची आता सवय लागली होती . त्याचा आढावा घेताना झांबरे सर मनापासून प्रतिक्रिया द्यायचे .       " प्रज्ञाअमृत " या बंगल्यामध्ये रहात असताना एक घडलेला प्रसंग मला आजही लक्षात आहे व आयुष्यभर पुढेही कायम लक्षात राहील . एकदा रविवारी सुट्टीचा दिवस होता . साधारण नऊ दहा वाजताची वेळ असेल . आमची घरकाम कारणारी बाई आज येणार नव्हती त्यामुळे दोघेही निवांत पेपर वाचत बसलो होतो . आणि शेवटच्या दूरच्या खोलीतील अचानक कोपऱ्यातील किचनसिंकचा का वॉशबेसीनजवळचा नळ अलगद तुटून पडला होता . पाईपलाईन उघडी झाली आणि वेगाने पाणी रूममध्ये पसरु लागले होते . आम्ही विरुद्धदिशेच्या बाजूला असल्याने काही आवाजच आला नाही . हळूहळू पडणाऱ्या पाण्याने ती रुम भरून गेली होती आणि अचानक खालून झांबरे मॅडम व सर दोघेही वरच्या मजल्यावर आले .त्यांनी घराची बेल वाजवली आणि त्यांच्या लगेच लक्षात आले की शेवटच्या खोलीतून पाणी जवळपास चारपाच इंच भरून दुसऱ्या रूममध्ये पाणी पसरू लागले होते . झांबरे सरांनी लगेच प्लंबरला फोन लावला येताना नवीन नळ घेऊन यायला सांगितले . पटकन टेरेसवर जावून मुख्य पाईपलाईन बंद केली . इतक्यात झांबरे मॅडम पटकन खाली गेल्या , येताना त्यांनी फरशी पुसण्याचा रबरमॉप व चारपाच फरशी पुसण्याचे जाड कपडे घेऊन एक बादली आणली . त्यांची मुलगी मृणाल देखील मदतीला आली . इकडे बनियन व लुंगी घालून निवांत बसलेले झांबरे सर गुडघ्यापर्यंत लूंगी गुंडाळून पटकन फरशीवरील पाणी बादलीत भरू लागले . झांबरे मॅडम यांनी लगेच साडीचा पदर खोचून मॉपने पाणी बाहेर टाकायला सुरुवात केली . मग आम्ही दोघेही त्यांच्यामध्ये सामील झालो व सर्व जणांनी रुममध्ये साचलेले पाणी काढून तासाभरात सगळा बंगला चकाचक केला . नंतर प्लंबर आला त्याने नवीन नळ बसवला .आता तुम्ही म्हणाल यात आश्चर्याची गोष्ट काय ? तर आम्ही झांबरे सरांचे भाडेकरू होतो . पाण्याचा नळ दुरुस्त करून रुम साफसफाई करण्याची जबाबदारी आमची होती . ते घरमालक होते . उच्चशिक्षित पी एच डी झालेले कॉलेजचे प्राध्यापक होते . मॅडम एम एस सी व जॉय स्कूलच्या उपप्राचार्या होत्या . एकदा घर भाड्याने दिले की त्याची देखभाल करण्याची जबाबदारी भाडेकरूचीच असते . त्यादिवशी दुपारी आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि तो प्रसंग एन्जॉय केला . कोणीही कसलीही तक्रार झाली नाही . दोन चार महिन्यातच आम्ही " प्रज्ञाअमृत " बंगला सोडला . नवीन जागा घेतली तेथे मोठे अपयश आले . नंतर मग आमचा मेणवली गावाजवळ " निसर्ग " नावाचा बंगला तयार केला . मागच्या वर्षी तेथे " निसर्ग आर्ट गॅलरी " नावाने चित्रप्रदर्शनही भरवले होते . अनेक वेगवेगळ्या जिल्हयातील , तालुक्यातील पर्यटक प्रदर्शन पाहण्यासाठी येत होती . एकदा किसनवीर कॉलेजचे प्रा. श्री रमेशचंद्र बारगजे सरांनी फोन केला की त्यांच्या कोल्हापूरच्या 1973 सालच्या एम .एस .सी बॅचचे क्लासमेटस यांचे वाई येथे गेटटुगेदर आयोजित केले आहे त्यावेळी तुमची निसर्ग आर्ट गॅलरी पाहायला सर्वजण येणार आहेत . धोमचे मंदिर पाहून सर्व गाड्या निसर्ग आर्ट गॅलरी पाहण्यासाठी गेटपर्यंत आल्या . त्यानां पार्कींगची जागा दाखवत होतो त्यावेळी एक गाडी मात्र गेटपासून दूर थोड्या अंतरावर उभी राहीलेली पाहीली . बारगजे सरानां ती गाडी बाहेर का थांबली म्हणून विचारले तर सरांनी कपाळावर हात मारून घेतला . मला म्हणाले काय बोलू आता ? ती गाडी तुझ्या सख्या चुलत व मावसभाऊ असलेल्या हनुमंत काळे यांची आहे . तो आमच्या बॅचचा सर्वात अतिशय हुशार विद्यार्थी होता . युनिव्हरसिटीत प्रथम आला होता . त्याला आम्ही सांगितले चित्रकार सुनील काळे तुझा भाऊ आहे . त्याने वाई ,पाचगणी महाबळेश्वर या परिसरातील असंख्य अप्रतिम चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत , त्याची मिसेस चित्रकार स्वाती काळे हिने असंख्य फुलांची तैलरंगात चित्रे काढलेली आहेत . उत्तम चित्रप्रदर्शन आहे . तुमची तीस वर्ष झाली भेट झालेली नाही तर तुम्ही आता जरूर भेटा व प्रदर्शनही पहा . पण तुझा भाऊ गाडीतून उतरायला तयार नाही त्याचे कुटुंबीय गाडीतच बसून आहेत .ते म्हणतात आम्ही भावकीत जात नाही कारण आमचे " स्टॅन्डर्ड " मोठे आहे . मी मोठ्या कंपनीत ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर होतो . तो साधा चित्रकार आहे त्याची माझी तुलना होऊ शकत नाही . तुम्ही सगळे प्रदर्शन पाहायला जा आम्ही बाहेर रस्त्यावर गाडीत बसून राहू . तो एक तास बाहेर थांबला पण घरात आलाच नाही . खरे तर हा हनुमंतदादा आता हेमंत नाव लावतो . कारण आईबापाने ठेवलेले हनुमंत हे नाव त्याला आवडले नाही . अतिशय गरिबीतून त्याला शिक्षण दिले होते .स्वतःच्या कर्तबगारीने तो उच्चपदावर पोहचला त्याचे उच्चशिक्षित मुलीबरोबर लग्न झाले पण लग्नानंतर व अगोदर नोकरी करत असतानाही या दादाने कधीच कोणत्याही भांवडाला जवळ केले नाही . कोणत्याही नातेवाईकांकडे ते फिरकले नाहीत . कोणाशी कसलाही संबंध ठेवला नाही ,कोणालाही मदत केली नाही . संपूर्ण कुटुंबाला दूर ठेऊन दादा मोठा स्टॅन्डर्डवाला झाला . आमचा दादा कसा दिसतो हे मला पाहण्याची उत्सुकता होती . कारण तो माझ्यापेक्षा पंधरावीस वर्षांनी मोठा होता . पण " स्टॅन्डर्ड "आडवे आले . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात . शिक्षणामुळे माणूस विचारवंत होतो त्याच्या ज्ञानाच्या कक्षा उचांवतात . त्याचे जीवन सुखकर व समृद्ध होतेच पण त्याच्यां विशाल छायेत अनेकानां संजीवनी मिळते . उच्चशिक्षित भावाने मात्र आमच्या सर्वांसाठी त्याचे दरवाजे मात्र कायमचे बंद केले होते . उच्चशिक्षणाचा मला तेथे काहीच उपयोग झालेला दिसला नाही . इथे मला पीचडी झालेले उपप्राचार्य झांबरे सर आठवतात . उपप्राचार्या झांबरे मॅडम आठवतात . स्वतःच्या भाड्याने राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाशी प्रेमाने सुखदुःखाची विचारपूस करत असत . ते दोघेही स्वतःचे " स्टॅन्डर्ड "कधी गोंजारत बसले नाहीत .  सामान्य माणसासारखे राहून दोघेही असामान्य कामे करत राहीली . जॉय स्कूल व किसनवीर विद्यालयातील विद्यार्थी घडवताना आपल्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांला घडवण्याचे . " स्टॅन्डर्ड " काम त्यांनी आयुष्यभर केले व त्याचा गर्वही कधी केला नाही . जीवन जगण्याचे खरे " स्टॅन्डर्ड " त्यांनां कळले आहे म्हणून माझ्या त्या अतिउच्चशिक्षित एम एस सी फर्स्टक्लास झालेल्या अडाणी भावापेक्षा झांबरे पती पत्नींविषयी मला आदर वाटत आहे .     महिन्यापूर्वी एकदा झांबरे मॅडमचा मला फोन आला . त्यांनी विचारपूस केली व त्या जॉय स्कूलची नोकरी सोडून पुण्यात नातवाचा सांभाळ करण्यासाठी पुण्यात रहात असल्याचे सांगितले . मुलगा सिव्हील इंजिनियर व सुनबाई पेशाने सरकारी वकील असल्याने दोघेही कामात व्यस्त झाले मग मुलाकडे लक्ष कोण देणार ? म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला . आणि ते ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . माझी आर्ट गॅलरी होती . ती सांभाळताना माझी तीन वर्षाची मुलगी सांभाळण्यासाठी मी आईवडीलानां विनंती केली तर त्यांनी नकार दिला . गावाकडे शेतीची कामे असतात त्यामुळे तुमची मुलगी तुम्हीच सांभाळा असे उत्तर आईने दिले . शेवटी आमच्या संघर्षाच्या लढाईत मुलगी देवाघरी गेली . ती वारली त्यावेळी मी माझ्या मेव्हण्याला सत्यजितला फोन केला . तो म्हणाला मी अत्यंविधीला येऊ शकणार नाही . तो देखील Phd झालेला आहे . अतिउच्चशिक्षित आहे . त्याला भाचीच्या अत्यंविधीला जाण्याची गरज वाटली नाही . बहिणीला कठीण स्थितीत आधार देण्याची आवश्यकता वाटली नाही आणि पुढे आता सत्तावीस वर्ष झाली तरी त्याला आमची कधीच आठवणही झाली नाही . काय उपयोग त्या डॉक्टरेटचा ? जिथे माणूस माणसाला ओळखत नाही .मोबाईल ,फोन , लॅपटॉप आले तंत्रज्ञान वाढले तरी मनाची आढी मात्र कायम राहीली .कधी त्याच्या कुटूंबाने संपर्कच केला नाही कारण "स्टॅन्डर्ड " आडवे आले .त्यावेळी खऱ्या अर्थाने एकटे जगायला शिकलो . अशावेळी झांबरे मॅडमचा त्याग मला प्रेरणा देणारा वाटतो . मुलांविषयची माया त्यांच्या कृतीतून दिसते .इकडे सरांनां रिटायर्ड होण्यापूर्वी खानावळीत जेवण करावे लागले . काही महिने एकटेपणा स्विकारावा लागला . पण त्यांनी कधीही त्याची तक्रार केली नाही . कॉलेजमध्ये त्यांनी अनेक कार्यक्रमात स्वतःला झोकून दिले . त्यांच्या कॉलेजच्या कारकीर्दीची मला जास्त माहिती नाही पण त्यापेक्षा माणुसकी जपणारे , कुटुंबाला जपणारे , अभिमान नसणारे , मोठेपणाचा त्याग केलेले गार्डनमध्ये स्वच्छता करणारे डॉ झांबरे सर मनाला फार भावले . त्यांच्या मुलाचे लग्न ठरले त्यावेळी प्रणवच्या लग्नाला आम्ही दोघेही गेलो होतो . लग्नकार्यालय पूर्णपणे भरून गेले होते प्रचंड गर्दी होती तरीही झांबरेसरांनी आम्हाला बरोबर पकडलेच . शाल श्रीफळ देऊन योग्य मानसन्मान केला त्यावेळी मला या झांबरे कुटूबांचेखरे " स्टॅन्डर्ड " कळाले . वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य नामवंत लहानमोठ्या माणसांनी संपूर्ण हॉल भरून गेला होता . काय असते स्टॅन्डर्ड ?? तुम्ही जगत असता त्यावेळी त्या तुमच्या जगतानाच्या काळात असंख्य माणसे भेटतात . त्यातील काही माणसे चांगली वागलेली असतात काही वाईट वागलेली असतात . पण शेवट काय असतो ? तुमच्या जगण्याला कधीतरी मर्यादा येतेच . कधीतरी शरीर थकते व तुम्हाला अंतिम श्वास घ्यावा लागतो . त्यानंतर कोणत्यातरी स्मशानघाटाजवळ तुमची राख होते ती राख पाण्यात मिसळते तुमचे अस्तित्व संपते . जग काही दिवस तुमची आठवण काढते नंतर तुमची कोणी आठवणही काढत नाही . तुमचे " स्टॅन्डर्ड " काही असो शेवटी तुमची राखच होते . हे ज्यानां समजते त्यांचे भावविश्व वेगळे असते . ते कायम हसतमुख असतात . ते त्यांच्या कृतीतून त्यांचे वेगळेपण जोपासत असतात .अनेकानां त्यांचे जगणे प्रेरणा ठरत असते .असे जीवनाचे खरे " स्टॅन्डर्ड " कळालेले झांबरे सर मला आवडतात . काही महिन्यांपूर्वी अचानक आमच्याकडे घरकाम करणाऱ्या बाई व माळीकाम करणारा त्यांचा मुलगा या दोघांनी आमचे काम सोडले. काही दिवस आम्ही वेगवेगळी माणसे शोधली पण त्यांच्या पगाराच्या अपेक्षा जास्त असल्याने जुळले नाही . मग झांबरे सर पुन्हा आठवले . Phd झालेला माणूस स्वतः झाडलोट करतो , बागेची निगा राखतो तर आपण का लाजायचे ? त्यांच्यापासून प्रेरणा घेतली . आता मी बागकामात तरबेज झालोय बागेत शेतात काम केल्यामुळे आरोग्यही चांगले राहते याचा शोध लागला . आपण कोणावर विसंबून राहायचे नाही काम करत राहायचे हेच खरे " स्टॅन्डर्ड " झांबरे सरांकडून मी शिकलो . खरी डॉक्टरेट तीच आहे . मे महिन्यात ते आता रिटायर्ड होतील . अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या सरानां व झांबरेमॅडम या दोघांनाही उर्वरीत रिटायर्ड आयुष्य सुखसमृद्धीचे आनंदाचे जावे त्यांच्या मनासारखे जगताना उत्तम आरोग्य प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना व मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !चित्रकार - सुनील काळे✍️9423966486निसर्ग आर्ट गॅलरी [वाई]