रविवार, १९ मे, २०२४

डॉ.शंतनू अभ्यंकर - एक बहुआयामी व्यक्तिमत्व

डॉ.शंतनू अभ्यंकर - एक बहुआयामी व्यक्तिमत्व
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
       " पुणे तेथे काय उणे " अशी म्हण फार प्रसिद्ध आहे .कारण पुण्यात फार पूर्वीपासूनच काहीही उणे नव्हते आणि आताही नाही आणि यापुढेही असणार नाही . कारण अनेक अभ्यासू, कार्यप्रवीण , व्यासंगी ,बहुआयामी व चतुरस्त्र , अफाट व्यक्तिमत्वे असलेली मंडळी त्यावेळी पुण्यात होती आतादेखील आहेत आणि यापुढेही असणार आहेत . या पुण्यानंतर नंबर लागतो तो बहुतेक वाईचा . कारण वाईला अशा अद्भूत व्यक्तिमत्वांचा खूप भरणा आहे याचा मला हळूहळू शोध लागतो आहे . आज अशाच एका व्यासंगी , बहुआयामी व्यक्तिमत्वाची महती सांगतो .
         १८५७ च्या बंडानंतर ब्रिटिश साम्राज्याने भारतावर चांगली पकड बसवली . बऱ्यापैकी स्थिरता आल्यामूळे त्यांनी अनेक हिलस्टेशने नवी शहरे ,गावे विकसित केली . अनेक नव्या प्रशासकीय इमारती , शाळा , कॉलेज निर्माण करून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला . पाचगणीची हवा व आरोग्यपूर्ण वातावरण याचा अभ्यास करून 1895 साली सेंट जोसेफ शाळा टेबललँडच्या पायथ्याशी बांधली . ती पाचगणीतील  पहिली शाळा . त्यानंतर 1898 साली किमिन्स व 1904 साली सेंट पीटर्स या शाळा सुरु केल्या . धर्मप्रसार व त्यासाठी अनुकूल ख्रिश्चन संस्कृती वातावरण निर्माण करण्यासाठी दोन चर्चेस बांधली आणि मग इंग्रजी शाळेत जाणे एक प्रतिष्ठेची बाब ठरली .
         अशा प्रतिकूल वातावरणात कृष्णराव पंडीत व रावसाहेब पंडीत या बंधूनी आपली भारतीय संस्कृती जपण्यासाठी हिंदू स्कूल निर्माण केले . पुढे त्याचे नाव संजीवन झाले . या संजीवन शाळेचे पूर्वीचे वैशिष्ठ्य म्हणजे ते रविंद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतनच्या धर्तीवर आधारीत होते . इंग्रजी माध्यामांबरोबर सातवीनंतर दहावीपर्यंत स्थानिक मुलांच्या शिक्षणासाठी मराठी माध्यमातून 8 वी ते 10वी पर्यंत वर्ग सुरु केले होते . अशा शाळेत प्रवेश घेण्यासाठी चाचणी परिक्षा द्यावी लागायची . मी व माझे तीन मित्र त्या परिक्षेत उतीर्ण झालो व शाळेत जाऊ लागलो .
          संजीवन शाळेचे लोकेशन व शाळेचे एकंदर वातावरण फार मनमोहक होते . पाचगणी क्लबच्या रस्त्यावरून डावीकडे वळलो की ब्रिटीशांची शाळा लागायची व त्यानंतर त्यांचे हॉस्पीटल व लॉरेन्स व्हिला बंगला या दोघांमधून संजीवनचा रस्ता लागायचा . शाळेच्या या रस्त्यावरून चालत खाली उताराच्या रस्त्याला लागलो की डाव्या बाजूला छोटे छोटे दुपाकी पत्र्याची गावकडची घरे असल्यासारखी शाळेचे वर्ग असायचे . सभोवताली भरपूर हिरवीगार वनश्री व लाल दगडांच्या भिंती व थोड्या पायऱ्या चढून गेले की मराठी माध्यमाचे वर्ग असायचे .
      इंग्रजी व मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलामुलींसाठी वेगवेगळ्या इमारती असल्या तरी सर्वांच्या प्रार्थना मात्र एकत्र व्हायच्या . त्यावेळी राष्ट्रगीत  व वेगवेगळी गाणी एकत्र म्हणायचो त्याची एक छोटी पुस्तिका छापलेली आजही जपून ठेवलेली आहे .
          या शाळेत चित्रकला , संगीत शिक्षक असायचे . शाळेत उत्तम भव्य वाचनालय होते . तेथे जानकीताई पंडीत असायच्या तेथे शांतपणे पुस्तके वाचणे एक सुंदर अनुभव असायचा . तेथे सतत वाचन करणारी विद्यार्थीमंडळी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात उतुंग पदावर पोहचलेली आहेत ,  कलाक्षेत्रात व व्यावसायिक क्षेत्रात भरारी मारून नाव कमावलेली देश विदेशातील ही मंडळी अजूनही पाचगणीचे शाळेचे दिवस विसरलेली नाहीत . 
           संजीवनशाळेत फक्त पुस्तकी शिक्षणच नाहीतर अनेक कलागुणांचा विकास व्हावा, शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या येथील विद्यार्थी परिपूर्ण व्हावीत म्हणून भर दिला जायचा . माझ्या1982 च्या दहावीच्या बॅचमध्ये संगीतकार ललीतराज पंडीत , अर्थशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले नीरज हातेकर होते . अशा प्रत्येक बॅचमध्ये अनेक उत्तम विद्यार्थी शाळेने घडवले . 1922 साली शाळेने शताब्दी महोत्सव साजरा केला . अशा शाळेत आमच्या अगोदरच्या बॅचमध्ये शंतनू अभ्यंकर होता . तो मूळचा वाईचा पण 5 वी नंतर मराठी माध्यमातून डायरेक्ट इंग्रजी माध्यमात शिकण्यासाठी संजीवनला बोर्डिंग शाळेत आला . बोर्डींग स्कूलमध्ये राहणारे विद्यार्थी तेथेच राहत असल्यामुळे शिक्षणाबरोबरच अनेक गोष्टींमध्ये पारंगत होतात . नाटक , कविसंमेलन , वाचन , वक्तृत्व , खेळांचे विविध प्रकार त्यानां अनुभवता येतात .काहीजण त्यांचा शेवटपर्यंत पाठपुरावा करतात व त्याविषयांवर कमांड मिळवतात . अर्थात स्वतःची एक मूलभूत हुशारी अशा मुलांमध्ये असेल तर शाळेत या हिऱ्यानां पैलू पाडले जातात. 
डॉक्टर शंतनू अभ्यंकर त्यापैकी एक चमकणारा हिरा.
           दहा वर्षांपूर्वी मी पाचगणीतून कायमस्वरूपी वाईजवळ राहायला आलो . वाचनाची आवड असल्याने लोकमान्य टिळक वाचनालयाचा सदस्य झालो . तेथे अनिल जोशी सर , भालचंद्र मोने , प्रा .सदाशिव फडणीस , डॉ .राजेन्द्र प्रभूणे , श्री . मधू नेने, लक्ष्मीकांत रांजणे , ॲड .उमेश सणस व इतर अनेक जणाच्यां ओळखी झाल्या . वाचनालयातर्फे भरणाऱ्या वसंत व्याख्यानमाला व इतर अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी बऱ्याचदा जावू लागलो . त्यावेळी या मंडळीचा अगदी जवळून जीवनक्रम पाहता आला आणि त्यांच्या अफाट कर्तृत्वामुळे , व्यासंगामुळे , बहुआयामी गुणांमुळे व विविध क्षेत्रातील कामाचा झपाटा पाहून मी खूपच प्रभावित झालो .
             यावर्षी डॉ. शंतनू अभ्यंकर हे लोकमान्य टिळक वाचनालयाचे अध्यक्ष झाले आहेत . अध्यक्ष झाल्यानंतर ग्रंथालयात अनेक उपक्रम व सुधारणांचा त्यांनी झपाटा लावला आहे . ग्रंथालयाचे रुपडे नव्या संचालक मंडळीनी बदलून टाकले आहे . नुकतेच पार पाडलेले वाई पंचक्रोशी साहित्य संमेलन योग्य व सुंदर नियोजनाच्या अनेक गोष्टींमुळे सर्वांच्या लक्षात राहीले आहे .
           शिकत असताना मी चित्रकार प्रताप मुळीकांच्या स्टुडीओत अमर चित्रकथेच्या कॉमिक्सचे लेटरींग करायला जायचो . कॉमिक्स मध्ये राम ,लक्ष्मण , कृष्ण , इन्स्पेक्टर विक्रम , अशी पात्रे असायची . त्यासाठी जे मॉडेल असेल ते शंतनू सारखे असावे . प्रसन्न हसरा चेहरा , उंच , गोरा रंग व भुरुभरु वाऱ्याने उडणारे केस डाव्या हाताने सतत सरळ ठेवणारे डॉ .शंतनू मला एखाद्या चित्रपट अभिनेत्यासारखे किंवा कॉमिक्सचे मॉडेल वाटतात . त्यांचा एखादा कार्यक्रम सुरु असेल तर मी पुढे बसायचो व असंख्य फोटो काढायचो . त्यातील काही फोटो त्यांनां पाठवायचो मग ते आवडल्याचा इमोजी हमखास पाठवतातच .
       डॉ. शंतनूचे लेख वाचायला लागलो की माझे डोक्यावरचे केस उभे राहतात व भूवया विस्फरतात . त्यांची लेखनशैली व डॉक्टरी ज्ञानाची सुसंगत अभ्यासपूर्वक मांडणी वाचून वाचक तोडांत बोटे घालतो . डॉक्टर ब्लॉग लिहतात , भाषणे देतात , अनेक वैद्यकीय कॉन्फरसला , अनेक वसंत व्याखानमाला , शारदीय व्याख्यानमालेमध्ये हजेरी लावतात . ते उत्तम लिहतात , कविता करतात, उत्स्फूर्तपणे भरपूर भ्रमंती करतात , रसाळ वाणीने श्रोत्यांनां तृप्त करतात . अनेक अवजड न समजणाऱ्या पुस्तकांचे सहज सोप्या शब्दात भाषांतर करतात . ते उत्तम भाषांतरकार तर आहेत पण उत्तम लेखकही आहेत .
मला शास्त्रज्ञ व्हायचयं , पाळी मिळी गुपचिळी ,आरोग्यवती भव , फादर टेरेसा आणि इतर वल्ली, बायकांत पुरुष लांबोडा, रिचर्ड डॉकिन्स जादूई वास्तव , आधुनिक वैद्यकीची शोधगाथा ,इ  दहा पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे . लोकमत , महाअनुभव , दिव्यमराठी या मासिकांमधून व वर्तमानपत्रात नियमित लेख लिहत असतात . दिवाळी अंकात तर त्यांचे लेख येतातच . 
         एवढे मोठे लेख वाचताना  ते कधी लिहित असतील या विचारांनीच मी भारावून जातो . शेवटी एकदा मी मुद्दाम त्यांच्या मॉडर्न हॉस्पीटलला  व्हीजीट दिली तर कॉरीडॉरमध्ये पेशंटच्या बाहेर रांगा लागल्या होत्या . तर हे डॉक्टर महाशय दोन पेशंटच्या तपासणी दरम्यान जो थोडासा वेळ मिळतो त्यावेळी दोनचार ओळी टाईप करून परत हसतमुखाने दुसऱ्या पेशंटबरोबर बोलत असतात . या त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा मला आचंबा वाटतो कारण मला शांतता असेल तरच काही लेखन किंवा चित्र निर्माण करता येते . अशा गप्पा मारता मारता लेखाची कंटिन्यूटी ठेवणे मला तर जमणारच नाही त्यामुळे ते प्रकरण लई भारी काम वाटते . इंपॉसिबल वाटते .
      डॉक्टर होमियोपॅथीचे शिक्षण पूर्ण करून काही दिवस प्राध्यापक म्हणून रूजू झाले होते . त्याचवेळी बी.जे मेडीकलमध्ये MBBS करत होते . नंतर MD झाले . प्रसुतिशास्त्र व स्त्रीआरोग्य शिक्षणसाक्षरता करणे त्यांचा आवडीचा विषय आहे . विज्ञान परिषदेचे पहिले सचीव , राष्ट्रीय स्त्री आरोग्य संघटनेचे ते ॲक्टीव्ह मेंबर आहेत .
          उत्तम भाषांतरकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत . माझ्या प्रदर्शनाच्या ब्रोशरचा लेख  इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभूत्व असल्याने सुंदरित्या करून दिले . ते वाईत राहत असल्याने अनेक वक्त्यांची भाषणे त्यांनी ऐकली असावीत त्यामुळे ते उत्तम वक्ता आहेत . अनेक इंग्रजी शब्दानां त्यांनी मराठीत नवी नावे निर्माण केली आहेत . डॉक्टर उत्तम मुलाखतकार आहेत . कोणत्याही व्यक्तीचा कोणताही विषय असो त्या विषयात ते सहज प्रवेश करतात .अनेकानां बोलते करण्याची कसोटी त्यांच्याकडे आहे .
           राधिकासांत्वनम नावाचा मूळ तेलगू भाषेतील इंग्रजी ग्रंथ स्वतः भाषांतरीत करून त्यांची पत्नी रुपाली अभ्यंकर यांचेबरोबर अभिवाचनाचा त्यांचा कार्यक्रम पाहून ऐकून मी थक्क झालो . त्यावेळी कळते हे दोघे प्रसिद्ध डॉक्टर तर आहेत पण भारी ॲक्टरही आहेत .त्यांचे सादरीकरण ते पुणे , मिरज , नाशिक , मुंबई इ .अनेक शहरांमध्ये करत असतात . त्या कार्यक्रमाला त्यानां रसिकांची खूप पसंति, वाहवा मिळते .
       मध्यंतरी लक्ष्मीकांत रांजणे व त्यांचा एका कथाकथनाचा कार्यक्रम होता . डॉक्टर त्यांची स्वलिखित कथा अशी सहज सांगत होते की माणसाचे लक्ष खिळवून ठेवण्याचे कौशल्य त्याच्यांकडे आहे हे जाणवते . संपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याचे त्यांचे शब्दप्रभूत्व असामान्य आहे . ते शंतनू ऊवाच नावाचा ब्लॉग लिहतात पंचाहत्तर हजारांपेक्षा त्यांचे फॉलोवर्स आहेत . त्यांचा हा कामाचा आवाका पाहून आपण चित्रकाराचे रिटायर्ड लाईफ फारच आळशीपणाने जगतोय याची मला सतत जाणीव होत राहते . मला अनेक गोष्टींचा कंटाळा तर लगेच येतो पण डॉक्टर मात्र वेगळेच आहेत . 
        विश्वकोश , प्राज्ञपाठशाळा , डॉक्टरांच्या मेडीकल असो. व इतर अनेक संस्थामध्ये ते कार्यरत असतात शिवाय संपूर्ण कुटूंबातील सर्व सदस्यानां संभाळून ते आता आजोबांचीही भुमिका उत्तमपणे सांभाळत असतात .
            मध्यंतरी करोनाच्या काळात मी करोनाग्रस्त झालो व  पायाच्या अपघातातही सापडलो मला कम्पलसरी बेडरेस्ट होती . त्यावेळी कळाले डॉक्टर फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे आजारी आहेत . त्या आजाराच्या गोष्टींचा भलामोठा लेख त्यांनी लिहला होता . तो वाचून मानवी जीवन किती साधारण व अनिश्चित आहे हे लक्षात आले . डोळ्यात पाणी आले व हृदय गलबलून गेले . मग डोळ्यांपुढे डॉक्टरांचा हसरा चेहरा सतत नेहमी दिसू लागला . डॉक्टर पण जिद्दी माणूस . आपल्या आजाराचा बाऊ न करता आपल्या कामात त्यांनी झोकून दिले . त्यांची केमोथेरपी व इतर उपचार यांचा कोणाला थांगपत्ता न लागून देता अनेक लेख , कविता , व्याखाने भाषांतरे यामध्ये ते सतत मग्न राहत असतात . 
         आमच्या येण्याजाण्याच्या मेणवलीच्या रस्त्यावरून वॉकिंग करताना डॉक्टर तीनचारवेळा दिसले व आजारावर त्यांनी नियंत्रण मिळवल्याचे दिसले .
            मी सातारा जिल्ह्यात प्रदर्शन करतच नाही कारण तेथे प्रदर्शनाचा सुसज्ज हॉलच नसतो . चित्र टांगण्याची , भिंतीचा रंग , प्रकाशयोजना नसतेच . मग चित्र लावणार कशी ? अशा अनेक तक्रारी व कारणे सांगून मी प्रदर्शन टाळतो . 
      एक दिवस लायब्ररीत पुस्तक बदलण्यासाठी गेलो होतो तर महावीर जंयतीची सुट्टी होती . मग ऑफिसमध्ये गेलो तर अमित वाडकर , तनुजा इनामदार , राजेश भोज (सर) व तोंडाला मास्क बांधून अध्यक्ष डॉ. शंतनू अभ्यंकर हे सगळेजण वक्ता कोण असणार ? प्रस्तावना कोण देणार ? अध्यक्ष कोण होणार ? समारोपाच्या शेवटी आभारप्रदर्शन कोण करणार ? असे एकूण एकवीस दिवसांचे नियोजन व फोनाफोनी करत बसले होते . ते पाहून मला डॉक्टरांचे पुन्हा कौतूक वाटले . त्यांनी मला चित्रप्रदर्शनासाठी पुन्हा विचारले , मग मी नाही म्हणू शकलो नाही . काय सांगावे कदाचित वाईत प्रदर्शन करायचेच राहून जाईल असे वाटले . त्यादिवशी डॉक्टर मला आनंद चित्रपटातील राजेश खन्नासारखे वाटले . जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ है जिसे न आप बदल सकते है न मै . हम सब तो रंगमंच की कठपुतलियां है, जिनकी डोर उपर वाले के उंगलियो में बंधी है । कब कौन कैसे उठेगा ये कोई नहीं बता सकता । 
जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नही .
       डॉक्टर असून स्वतः पेशंट असूनही ते वाईच्या लायब्ररीच्या कामासाठी , वसंत व्याख्यानमाला सुंदर व्हावी म्हणून इतकी मेहनत करतात तर आपणही वाईकरांसाठी एक छान प्रदर्शन का करू नये ? हे ठरवून मी लगेच कामाला लागलो . 
        तर अशा या व्यासंगी डॉक्टर शंतनू अभ्यंकर या आमच्या संजीवनच्या तालीमेत तयार झालेल्या शाळेकरी मित्राच्या आग्रहामुळे व अनेक वाईकरांच्या प्रेमळ विनंतीमुळे यावर्षी वाईत प्रदर्शन करणार आहे .
खरं सांगायचे तर अजून पूर्ण डॉक्टर मलाच समजले नाहीत कारण ते व्यक्तिमत्व बहुआयामी व समजण्यापलीकडचे आहे . त्यांच्या या बहुगुण संपन्न व्यक्तीमत्वामुळे अनेक क्षेत्रातील अनेक मित्रमंडळीचा मेळा त्यांच्याकडे नेहमी असतो अशा सर्व मित्रां तर्फे या डॉक्टर मित्राला उत्तम निरोगी दिर्घायुष्य लाभो हीच विधात्याकडे मागणी करतो व थांबतो .
थोडक्यात सांगायचे तर डॉक्टर शंतनू अभ्यंकर हे व्यक्तीमत्व सर्व वाईकरांनां आवडणारे असे 
" वाईभूषण " 
बहुआयामी व्यक्तिमत्व आहे.

सोबत प्रदर्शनाची निमंत्रणपत्रिका सोबत आहेच . 
यावर्षी १०८ वर्ष पूर्ण करणाऱ्या वसंत व्याखानमालेत अनेक मान्यवर मंडळी येणार आहेत त्याचीही कार्यक्रमपत्रिका सोबत पाठवत आहे .
सर्वांनी जरूर या !
सर्वांनां सप्रेम निमंत्रण🙏

चित्रकार सुनील व स्वाती काळे यांचे
" व्हॅलीज ॲन्ड फ्लॉवर्स "
पाचगणी , वाई , महाबळेश्वर येथील निसर्गसंपन्न परिसरातील जलरंग व तैलरंगातील निसर्गचित्रांचे चित्रप्रदर्शन .
लोकमान्य आर्ट गॅलरी
लोकमान्य टिळक वाचनालय 
वाई .४१२८०३
प्रदर्शनाचे उदघाटन प्रमुख पाहूणे श्री . विश्वास पाटील , श्री .अनिल जोशी व डॉ. शंतनू अभ्यंकर व संचालक मंडळ टिळक लायब्ररी यांच्या उपस्थितीत १ मे रोजी संध्याकाळी करण्याचे ठरवले आहे . तुम्ही देखील उपस्थितीत राहावे यासाठी पुन्हा एकदा आग्रहाचे निमंत्रण
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रदर्शनाची वेळ : रोज सकाळी १० ते १२ व संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत .
दिनांक : १ ते २१ मे २०२४ पर्यंत
प्रवेशमुल्य नाही . 🙏सर्वांनां मुक्त प्रवेश🙏

✍️सुनील काळे (चित्रकार)
     9423966486

वाई ,पाचगणी व महाबळेश्वरचे कलापर्यटन

* वाई ,पाचगणी व महाबळेश्वरचे कलापर्यटन *
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
 लोकसत्ता - 24 फेब्रूवारी 2024 . पर्यटन विशेषांक .
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟         
              वाई ,पाचगणी आणि महाबळेश्वर ही महाराष्ट्राची नावाजलेली ठिकाणे आहेत . वाई हे पर्यटनाच्या दृष्टीने तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते, काही जण वाईला दक्षिण काशी असेही संबोधतात . तीर्थक्षेत्र ही जशी वाईची ओळख आहे तसेच फार पूर्वीपासून विद्वान मंडळीचे गाव किंवा विश्वकोश निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींमुळे वाईला महत्व प्राप्त झाले आहे .
          वाई पासून बारा कि .मी अंतरावर पसरणीचा वेडावाकडा घाट पार करून पोहचले की थंडगार वाऱ्याच्या झुळका सुरु झाल्या की ओळखायचे आपण पाचगणीत पोहचत आहोत . पर्यटनाच्या दृष्टीने थंड हवेचे ठिकाण म्हणून पाचगणीला ओळखतातच पण त्याहीपेक्षा ब्रिटींशानी सुरु केलेल्या रेसिडेन्सल बोर्डींग स्कूल्समुळे पांचगणीला एक नवी ओळख मिळाली आहे .
         महाबळेश्वर हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नंदनवन व उंचावर असलेले गिरिस्थान आहे . थंड हवेच्या ठिकाणाबरोबरच महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणूनही महाबळेश्वरला महत्व आहे . क्षेत्र महाबळेश्वर येथील पुरातन पंचगगा व कृष्णाबाईचे मंदीरे , कृष्णा नदीचे उगमस्थान व पंचनद्याचे संगमस्थान यामुळे तीर्थक्षेत्र म्हणूनही प्राचीन काळापासून क्षेत्रमहाबळेश्वर सुप्रसिद्ध होते . अशा या महाबळेश्वर पाचगणीला खऱ्या अर्थाने विकसित करण्याचे श्रेय मात्र ब्रिटिशांना किंवा गोऱ्यासाहेबांना दिलेच पाहीजे . याचे मुख्य कारण म्हणजे येथील थंडगार हवा , सुंदर वनश्री , आल्हाददायक वातावरण ही वैशिष्ठये असली तरी या ठिकाणाला येण्यासाठी चांगले रस्ते नव्हते . राहण्यासाठी प्रशस्त बंगले , निवासस्थाने , क्लब्ज , बाजारपेठ , नव्या सुंदर पॉईंटसचा शोध घेऊन तेथपर्यंत अवघड डोंगराळ जागी पोहचण्यासाठी लागणारे रस्ते विकसित करण्याचे काम ब्रिटीश राजवटीत सुरु झाले . पुणे किंवा मुंबईतील असह्य उकाड्यामुळे उन्हाळ्यातील मे महिन्यात व्हाईसरॉय , गव्हर्नरसाहेब यांनी राज्यकारभार करण्यासाठी महाबळेश्वर येथून राजभवन किंवा गव्हर्नर हाऊस नावाचे प्रशस्त बंगले बांधले व खऱ्या अर्थाने पर्यटनाची कारकीर्द सुरू केली . या ठिकाणांचा प्रसार व प्रचार केला त्यामुळे अनेक ब्रिटीश अधिकारी व भारतातील राजे , श्रीमंत व्यापारी , प्रसिद्ध उदयोजक त्यांची बायका मुले  सर्व परिवार घेऊन मित्रमंडळीसोबत सातत्याने  येथे येऊ लागली व हळूहळू खऱ्या जीवनावश्यक सुविधा येथे पुरविल्या जाऊ लागल्या . त्याचबरोबर अनेक इंग्रज कलाकार मंडळी येथे निसर्गचित्र काढण्यासाठी येऊ लागले .
            परमेश्वराकडे माझ्या अनेक तक्रारी आहेत पण एका गोष्टीविषयी मी सतत त्याचा कृतज्ञ आहे की त्याने माझा जन्म व बालपण पाचगणीसारख्या सुंदर  निसर्गरम्यस्थानी  घालवले . लोकसत्ताने जेव्हा या तीन ठिकाणी चित्रकाराच्यादृष्टीने या पर्यटनस्थळांचे काय महत्व आहे असा विषय मांडायला सांगितले त्यावेळी जवळपास पन्नासवर्षांपासूनचा एका कलाकाराचा समृद्ध जीवनपटच माझ्या डोळ्यापुढे सरकला . सगळ्या आठवणी जाग्या झाल्या सष्टपणे डोळ्यासमोर चित्र दिसू लागले . 
           साधारण पन्नासपूर्वी म्हणजे 1975 च्या दरम्यान आम्ही मुले पाचगणीच्या मराठी शाळेत  शिकत होतो . त्या कोवळ्या आठ दहा या बालीश  वयात पाचगणीच्या गावाबाहेर जकात नाक्याशेजारी एका शनिवारच्या अर्ध्या दिवसाच्या शाळेनंतर आम्ही मुले शाळा सारावण्यासाठी शेण गोळा करायला जात होतो . त्यावेळी त्या दुपारच्या शांत वेळी एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले . एक वयस्कर जाडजूड रिचर्ड ॲटनबरोसारखा दिसणारा गोरापान म्हातारा माणूस डोक्यावर मोठी फेल्टहॅट घालून रंगाची एक मोठी पेटी घेऊन छान ब्रशेस कागदाचे पॅड घेऊन बिलिमोरीया स्कूलच्या बाहेर मुख्य रस्त्याच्या कडेला निवांतपणे एक चित्र काढत होता . हा म्हातारा नेमके काय करतोय हे पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी आम्ही मुले त्याच्या बाजूला गोळा झालो . अतिशय व्यवस्थित काटेकोरपणे समोरच्या दृश्याचे पेन्सीलने केलेले रेखाटन व सुंदर रंगसगतीने चित्रित केलेले कृष्णाव्हॅलीचे ते पाहिलेले पहीले 
डेमोन्सस्ट्रेशन नंतरच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले . सगळी मुले गेली पण मी मात्र या गोऱ्या चित्रकाराचा शेवटपर्यंत पाठलाग केला . त्यावेळी ते गृहस्थ पाचगणीच्या प्रसिद्ध एम आर ए या राजमोहन गांधी यांच्या संस्थेत गेले . पुढे मोठे झाल्यानंतर त्यांचे नाव व कार्य कळले . या चित्रकाराचे नाव होते  गॉर्डन ब्राऊन . हे मूळचे ऑस्ट्रेलियाचे पण त्यांनी नैतिक पुनरुत्थान केन्द्र (MRA ) ही संस्था उभी करण्यासाठी आर्किटेक्ट म्हणून फुकट काम केले . राजमोहन यांच्या प्रेमाखातर ऑस्ट्रेलियातून स्वखर्चाने येऊन संस्थेचे वास्तूनिर्मितीचे नियोजन व पूर्ण त्रेसष्ट एकरात एक भव्य प्रकल्प उभा केला . पण येथील सुंदर वातावरण , टेबललॅन्डची पठाराखालची संस्था , कृष्णा व्हॅलीची , रस्त्यांची त्यांनी अनेक चित्रे जलरंगात साकारली . त्यातील काही चित्रे एम आर ए या संस्थेच्या इमारतीमध्ये आजही पाहता येतात .
           त्यानंतर कलाशिक्षक सुभाष बोंगाळे यांनी अनेक चित्रे जलरंगात जागेवर जाऊन रेखाटलेली आहेत . हिरव्या शेवाळी रंगाच्या सायकलला एक पाठीमागे स्टॅन्ड बांधून रंगाचे सामान घेऊन सिडने पॉईंटच्या व्हॅलीत बोंगाळे सर सतत स्केचिंग व लॅन्डसेकप्स करत बसायचे . पाचगणीच्या या संराच्या चित्रनिर्मितीच प्रेरणा घेऊन मी या लेखाचा लेखक  सुनील काळे आयुष्यभर या परिसरात रेखाटणे करत व जलरंग वापरून सातत्याने तीस पस्तीस वर्ष चित्र काढत राहीलो आहे . कृष्णानदीच्या किनाऱ्यावर धोमधरण बांधल्यानंतर पाचगणीच्या विविध भागातून दिसणारे विहंगम दृश्य , चिखली , पसरणी या गावांची बारावाडीची दिसणारी भातशेती , चमकणाऱ्या सह्याद्री पर्वताच्या रांगा , पाचगणीचे दुतर्फा रस्त्याच्या बाजूला असलेली भव्य वडाची झाडे , अशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सपाट पठार म्हणून प्रसिद्ध असलेली टेबललॅन्डची पठारे या पाच पठारावरून दिसणारे पाचगणी गावाचे दृश्य विलोभनीय दिसते . खिंगर , दांडेघर , आंब्रळ , राजपुरी , तायघाट , भिलार या सभोवतालच्या गावामध्ये पसरलेले शंभर एकरचे एकेक सपाट पठार रंगवणे हे आयुष्यभर आनंद देणारे कार्य ठरले . ब्रिटिशांनी त्यांच्या मुलांमुलीसाठी येथे प्रथम त्यांचा जॉन चेसन नावाचा रिटायर्ड ऑफीसर पाठवून भरपूर अभ्यास केला . सिल्व्हर वृक्षाची झाडे लावली . प्रत्येक वर्षातील बारा महिन्यांचे तापमान पाहून तीनही ऋतूमध्ये काय काय फरक दिसतो याच्या सविस्तर नोंदी केल्या . रिकाम्या पसरलेल्या जागेत मोठ्या शाळा व राहण्यासाठी वसतिगृहे बांधली बंगले बांधले . रस्त्यांचे नियोजन केले . स्ट्रॉबेरी , बटाटा , कॉफी व इतर अनेक फळझाडे वृक्षांची लागवड केली . नगरपालीका बांधली . ऑफीसर्स राहण्यासाठी विश्रामगृहे बांधली . प्रथमच टेबललॅन्डच्या पायथ्याशी शाळा बांधली या शाळांपैकी सेंट जोसेफ स्कूल , किमिन्स स्कूल , सेंट पीटर्स स्कूल , यांनी सव्वाशे वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे . 
          परंतू सव्वाशे वर्ष होवूनसुद्धा  आजही किमिन्स , सेंट जोसेफ या शाळांमध्ये उत्तम दर्जाचे सुशिक्षित कलाशिक्षक नसल्याने चांगले कलाकार निर्माण झाले नाहीत किंवा कलापरंपरां निर्माण झाली नाही . चित्रसंस्कृती टिकून राहीली नाही ही दुर्देवाची गोष्ट आहे .
         सुनील व स्वाती काळे या दाम्पत्याने मात्र या परिसराचा सखोल अभ्यास करून येथील किमिन्स , सेंट पीटर्स , बिलीमोरीया , या शाळांसोबत अनेक ब्रिटीशकालीन बंगले , पारशी लोकांचे बंगले , अग्यारी , चर्चेस , या वास्तूंचे जलरंगात चित्रिकरण केले . गावातील मुख्यरस्ते , सुंदर वनश्री , गार्डनमधील फुले , कुंड्या , कॉसमॉस , हॉलिहॉक्स ,वॉटरलिलीज , रानफुले  तैलरंगात रंगवून पाचगणीचा निसर्ग अनेक मान्यवर कलाप्रेमी मंडळीच्या घरी व अनेक देशात चित्रे विकली त्यामुळे पाचगणी ,महाबळेश्वर व वाईपरिसरातील चित्रकार म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे . नुकतेच त्यांचे प्रदर्शन नेहरू सेंटर येथील AC व सर्क्युलर आर्ट गॅलरीमध्ये भरले होते त्याठिकाणी त्यांनां चित्र रसिकांकडून भरघोस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला .
            वाई हे ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचे गाव आहे . लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विश्वकोष निर्मितीचे संपादक मंडळाचे प्रमुख म्हणून अनेक वर्ष काम केले . त्याकामासाठी अनेक तज्ञ व नावाजलेले चित्रकार वाई येथे कलासंपादक म्हणून येऊ लागले . 
        प्रसिद्ध चित्रकार व जेजे स्कूल ऑफ मुंबईचे डिन असलेले ज . द . गोंधळेकर वाईच्या  विश्वकोषात काही वर्षांसाठी आले होते . त्यांनी गणपती घाट , मधलीआळी घाट , मेणवली घाट येथे पेनने व जलरंगात चित्रे काढलेली आहेत .
          विश्वकोषासाठी विशेष नोंदी करण्यासाठी आलेले चित्रकार सुहास बहुळकर  तर वाईच्या प्रेमातच पडले . त्याचे सुंदर वर्णन त्यांनी वाई कलासंस्कृती या पुस्तकात केले आहे . पेशवेकालीन पुण्याचे वास्तुवैभव , महिरपी खिडक्या , वाडयांचे दरवाजे , चौकटी , कोनाडे हे त्यांच्या चित्रांचे विषय आहेत . या विषयांची प्रेरणा घेऊन आकारसंस्कृती नावाचे त्यांनी केलेले प्रदर्शन खूप गाजले आहे .
          वाईच्या घाटाची तर अनेकांनी चित्रे काढलेली आहेत त्यापैकी ना. श्री . बेन्द्रे यांच्या आत्मचरित्रात वाईच्या घाटाचे पेनने चित्र रेखाटलेले पाहता येते . वि .मा . बाचल मूळचे वाईचे . काही वर्ष त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केले आहे . त्यांनी काढलेली रेखाटने व घाटाची चित्रे फर्ग्युसनच्या शताब्दी स्मरणिकेत पाहायला मिळतात .
          वाईचे सु .पि .अष्टपुत्रे सर व गजानन वंजारी सर हे दोघेही वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये कलाशिक्षक होते . त्यांना ज्यावेळी वेळ मिळत असे तेव्हा ते गणपती घाटावर चित्रे काढायला यायचे . अष्टपुत्रेसर अपारदर्शक कलर्स म्हणजे पोस्टर कलरमध्ये व वंजारीसर तैलरंगमध्ये निसर्गचित्रे रेखाटतात . मूळचे पसरणी गावाचे पण सध्या इंग्लडमध्ये वास्तव्य असणारे तुषार साबळे यांनीही वाई घाटपरिसरातील , मेणवली घाटाची चित्रे रेखाटली आहेत .
        सुप्रसिद्ध सिनेनट चंद्रकांत मांडरे , चित्रकार पी एस कांबळे , दिवाकर प्रभाकर, या जुन्या पिढीतील कलावतांनी वाईची चित्रे साकारलेली आहेत . बाळासाहेब कोलार , श्रीमंत होनराव (वाई) , यांच्या बरोबरच मिलींद मुळीक , संजय देसाई , शलैश मेश्राम , कविता साळुंखे , दिवगंत सचीन नाईक , कुडलय्या हिरेमठ (पुणे) , प्रफुल्ल सावंत , सागर गायकवाड (सातारा ) , संदीप यादव ( पुणे), अमोल पवार , निशिकांत पलांडे (मुंबई ), गणेश कोकरे (सातारा) विजयराज बोधनकर (ठाणे ) सुनील काळे अशा नव्या दमाच्या चित्रकारांनी वाई परिसरातील अनेक चित्रे काढलेली आहेत .
            एडवर्ड लियर या ब्रिटीश चित्रकाराने वाईच्या घाटाचे केलेले सुरेख  रेखाटन अरुण टिकेकर यांच्या ' स्थलकाल ' या पुस्तकात पाहायला मिळते . त्याचबरोबर जॉन फेड्रीक लिस्टर 1871 याने एलफिस्टन पॉईंटची व्हॅली रंगवलेली आहे . तर 1850 साली विल्यम कारपेंटर या चित्रकाराने प्रतापगडाचे विहंगम दृश्य रंगवल्याचे गुगलसर्च केल्यावर सापडले . एम.के . परांडेकर यांनी रेखाटलेल्या ऑर्थरसीट पॉईंटचे चित्र खूप प्रसिद्ध आहे . त्याचबरोबर अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिवंगत श्री . दिवाकर डेंगळे यांनीही पांचगणी वाई महाबळेश्वर येथील चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत .
           प्रसिद्ध चित्रकार जहाँगीर साबावाला याचां महाबळेश्वरमध्ये बालचेस्टर नावाचा बंगला आहे . त्यामुळे त्यांनी महाबळेश्वरच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्यांच्या अमूर्त शैलीत ऑईलकलर मध्ये साकारले आहे . नाशिकचे शिवाजी तुपे यांनी घोड्यांचे पार्कींग असलेले इमारतीचे चित्र काढले आहे तर रवि परांजपे यांनी प्रसिद्ध पंचगंगेच्या मंदिराचे प्रवेशद्वार त्यांच्या शैलीत रेखाटले आहे .वासुदेव कामत यांनीही या परिसरात चित्रांकन केलेले आहे .
         मेणवली घाट , धोमचे नरसिंहाचे मंदीर , गणपती घाट , गंगापुरी घाट , मधलीआळी घाट , भीमकुंडआळीचा घाट , असा घाटांचा परिसर व मंदिराचे गाव म्हणून जरी वाई प्रसिद्ध असले तरी या घाटांच्या आजूबाजूला वाढलेले स्टॉल्स , टपऱ्या , दुकाने , कातकऱ्यांच्या वस्त्या , स्थानिक नगरपालीकेचे व सर्व घरांचे नदीपात्रात सोडण्यात येत असलेले दुषित सांडपाणी उघडपणे कृष्णा नदीत राजेरोसपणे सोडले जाते . त्यामुळे ट्रॅफिकची प्रचंड वर्दळ , गोंगाट , उघडी नागडी नदीत अंघोळ करणारी माणसे, भांडीकुडी कपडे धुणारी व हागणदारी करत नदीशेजारीच झोपड्यात राहणारी माणसे प्रदुर्षण करतात . मंदिराशेजारची वाढणारी गलीच्छ वस्ती पाहीली की चित्र काढण्याचा चित्रकाराचा मूड जाण्याचीच जास्त शक्यता असते . त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही . भंगारवाल्याच्या टपऱ्या , मेणवली जोर रस्त्यावर जाणाऱ्या जीपगाडया , छोट्या पुलावर बसणारे छोटे व्यावसायिक पाहीले की रस्त्यातून गाडया चालवणे किंब चालत जाणे एक मोठे संकट आहे . तरीही कलामहाविद्यालयाचे विद्यार्थी व चित्रकार येथे येऊन चित्र काढत बसतात . मेणवली घाटावर लेखी परवानगी घेऊन फी देऊन फोटो व चित्र काढावे लागते . मेणवली घाटावर उतरत असताना डाव्या बाजूला जवळच स्मशानभूमीची जागा आहे व त्याशेजारी उघड्यावरची हागणदारी पाहीली की येथे पैसे देऊन चित्र का काढावे असा प्रश्न पडतो . तेथे बसून चित्र काढावे असे कधीकधी वाटत नाही .
           खूप वर्षांपूर्वी एकदा फलटणचे रघुनाथराजे निंबाळकर यांच्या घरी राहण्याचा योग आला होता . त्यावेळी औंधचे कलाप्रेमी बाळासाहेब पंतनिधी महाराज यांचे तैलरंगातील २ फूट बाय ३ फूट आकारातील एक मेणवलीच्या घाटाचे चित्र पाहायला मिळाले . त्या चित्रातील वातावरण व शांतता आता कधीच अनुभवता येईल असे वाटत नाही . सगळीकडे व्यापारीकरण सुरु आहे .
         पाचगणीच्या टेबललॅन्डच्या पठारावर आता मोठी तटबंदी बांधली आहे . त्याच्या सभोवताली खाण्याच्या टपऱ्या व घोडागाडीची रेलचेल पाहीली की चित्र काढणाराच चकीत होतो . सगळीकडे हॉटेल्स व त्यांच्या जाहीरातीचे फ्लेक्स दिसतात त्यातून निसर्ग शोधावा लागतो . शिवाय अति गर्दीमुळे पर्यटकांचा त्रास असतोच . महाबळेश्वरला शनिवार रविवारी जायचे असेल तर घाटातच ट्रॅफीक जामचा अनुभव येऊन ड्रायव्हींग करताना मुंबई पुण्यासारखा इंच इंच लढवावा लागतो . प्रसिद्ध पॉईंटसवर चित्रे काढणाऱ्या चित्रकारानां परवानगी घ्यावी लागते अन्यथा तुमचे रेखाटलेले चित्र खोडणारे नतद्रष्ट येथे आहेत . नियमांचा बडगा दाखवून कलाप्रेमीनां काम करताना बंद पाडणारे हाकलून देणारे महाभाग येथे आहेत . त्यामुळे कलेविषयी सातारा जिल्हयात अनास्था भरपूर आहे .
         संपूर्ण सातारा जिल्हयात एकही कलादालन नसल्याने चित्रकारांनी काढलेली चित्रे प्रदर्शित करण्यासाठी कोठेही जागा नाही . कापडाच्या बांबूच्या कनाती बांधून नाटक असल्यासारखे प्रदर्शन करावे लागते . येथे अनेक व्यावसायिक मंडळी , राजकीय पुढारी , मुख्यमंत्री , आमदार ,खासदार , शिवरायांचे वशंज राजेमंडळी आहेत पण जिल्ह्यात वाई ,पाचगणी ,महाबळेश्वर , सातारा , कराड येथे कोठेही सुसज्ज चित्रप्रदर्शनासाठी कलादालन नाही आणि याची कोणाला लाज वाटत नाही . सगळ्या चित्रकारानां नाईलाजाने पुण्यामुंबईत प्रदर्शनासाठी जावे लागते . एकंदर कलेविषयी खूप लाचार अनास्था या पर्यटनस्थळी आहे . त्यामुळे प्रदर्शने भरत नाहीत , कलाप्रेमी तयार होत नाहीत व कलारसिकही नाहीत . 
        एकंदर परिस्थिती गंभीर आहे पण चित्रकार मात्र मनाने खंबीर आहेत .
         आजही चित्रकार मनापासून चित्रे रेखाटत आहेत व भावी पिढीचेही नवे चित्रकार भविष्यातही चित्रे रेखाटत राहतील कारण निसर्गाची ओढ, जुन्या स्थापत्यशैलीतील मंदीरे,घाट, सहयाद्री पर्वताच्या डोंगरांच्या दूर पसरलेल्या रांगा , भव्य सपाट टेबललॅन्डची पठारे कायम चित्रकारानां प्रेरणा देत राहणारच आहेत . चित्रकारांची ही चित्रे आणखी काही वर्षांनी इतकी महत्वाची असतील कारण जे वेगाने बदल होत आहेत त्या बदलांचे हे एक प्रकारे दस्तीकरण होत असते .निसर्गदेव सदैव दोन्ही हातांनी भरभरून देत राहणार आहे .  माणूस नावाचा प्राणी मात्र निसर्गाची वाट लावायला रोज नवी यंत्रणा राबवतो , त्याच्या कुठे तरी भलताच  ' विकास ' करण्याच्या प्रयत्नांनां मात्र लगाम घातला पाहीजे .

सुनील काळे ✍️[चित्रकार]
9423966486
Sunilkaleartist@gmail.com

वाईतील लोकमान्य आर्ट गॅलरी एक वेगळा अनुभव

वाईतील लोकमान्य आर्ट गॅलरी 
एक वेगळा अनुभव .
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
         सोमवार  म्हणजे वाईकरांसाठी एक महत्वाचा दिवस असतो . कारण त्यादिवशी आठवड्याचा बाजार भरतो . हा बाजार पुर्ण गणपतीआळी , दाणेबाजार , मुख्य किसनवीर चौक ते संपूर्ण आजूबाजूच्या सर्व रस्त्यावर खूप सर्वदूर पसरलेला असतो . पूर्वी मावळे शिवाजी महाराजांच्या काळात घोड्यावरून बाजारहाट करत , तसे काही वाईकर दुचाकीवरूनच भाजीपाला खरेदी करत असतात . संपूर्ण रस्ता खचाखच गर्दीने व दुचाकी वाहनांनी ओसंडून वाहत असतो . 
      लालभडक,पिवळ्याधम्मक तर कधी शांत निळ्या रंगाच्या प्लॉस्टिकच्या छत्र्या व डोक्यावर ऊन लागू नये म्हणून याच रंगाची प्लास्टीक कापडांची बांधलेली छप्परे यांनी रस्ता गजबजून गेलेला दिसतो . 
         कलिंगडवाले , आंबेवाले , द्राक्षेवाले , भाजीवाले , फुलवाले यांनी सगळा फुटपाथ पूर्ण व्यापलेला असतो . छोट्यामोठ्या वस्तू , तेल , साबून पावडर , कुलूपवाले , भांडीवाले पासून ते नानाविध अनेक तयार कपड्यांच्या व सामानाच्या व्हरायटी घेऊन किरकोळ फिरस्ते व्यापारी बसलेले असतात .अनेक फळभाज्या घेऊन पंचक्रोशीतील शेतकरी मंडळी ताजीतवानी भाजी घेऊन येत असल्याने व सोमवारी जरा कमी दरात मिळत असल्याने वाई परिसरातील माणसांची झुंबड उडालेली असते . 
         आमच्या लोकमान्य आर्ट गॅलरीच्या आजूबाजूला आरडाओरडा व माणसांची झुंबड पाहून मला खूप मजा वाटतेय . कारण मुंबईतील जहाँगीर व नेहरू सेंटरला फार गंभीर चेहरे घेऊन माणसे येत असतात .आपल्याला खूप खूप चित्र समजतात असे भासवणारी मंडळी पाहिली की  शांत वातावरणात  आणखी खूप गुढगंभीरता वाढत असते.
         याउलट वाईतील हे लोकमान्य वाचनालय नेमके या प्रचंड गर्दीत हमरस्त्याला आहे , त्या पुर्ण रस्त्यावर गजबजलेल्या फुटपाथवर अनेक भाजीवाले विक्रीसाठी सोमवारी  नियमित येत असतात 
        आज तर सोमवारची कमालच झाली .कारण  आर्ट गॅलरीच्या प्रदर्शनाचे प्रवेशद्वार पूर्ण माणसांनी व वेगवेगळ्या व्यापाऱ्यांच्या टोपल्यात भरलेल्या भाज्यांनी भरलेले होते . सोबत एक मावशी गावठी अंडी विकत झक्कास मांडी घालून बिनधास्त मोठयाने ओरडत होती . शंभरला बारा , शंभरला बारा , 
तिचा खणखणीत आवाज ऐकून सगळ्या नजरा तिच्याकडे वळायच्या .
        एक व्यापारी लोणंदवरून ट्रक घेऊन आलेला होता . तो कलिंगडवाला प्रवेशद्वाराच्या शेजारीच बसला होता . मग आर्ट गॅलरी उघडल्यावर ही भाजी विकणारे मुद्दाम आत येऊन चित्रप्रदर्शन पहायला येऊ लागले . एक भाजीवाली मावशी गणपती मंदिराचे निसर्गचित्र  पाहून दोन्ही हात जोडून नमस्कार करू लागली . मग हळूच म्हणाली सकाळी बया लई गडबड झाली बघा , गंपतीचे दर्शनच घ्यायचे राहीले होते .आता तुमच्या चित्रात बाहेरचा कळस तरी दिसला , आता समदं मनासारखे झालं बघा. आता धंदा लई चांगला व्हईल .
           मग एका कलिंगडवाल्याने हळूच कापलेले एक अर्धे लालभडक कलिंगड पाठवले , एकाने मस्त कापून चटणी मीठ घातलेली काकडी पाठवली , थोड्यावेळाने एक काळीटोपी  घातलेला मुलगा उसाचा रस घेऊन आला . हळूहळू लोकमान्य आर्ट गॅलरीत लावलेल्या प्रदर्शनात सोमवारचा बाजार हजेरी लावून भरू लागला . 
          एक छोटा चुणचुणीत रुद्र चिपाडे नावाचा मुलगा आला . खूप वेळ चित्र बघत होता . मराठी महिलामंडळच्या शाळेत चौथी पूर्ण करून आता तो पाचवीला द्रविड हायस्कूलला जाणार आहे . त्याला आमचे प्रदर्शन खूप आवडले . आता रोज येईन म्हणाला . मग त्याला विचारले त्याचे आईबाबा काय करतात ? तर म्हणाला ते दोघे ताजी फुले आणून पाटी घेऊन बाजारात विकत बसतात . म्हणून त्याला स्वातीची फुलांची चित्रे  खूप आवडली . गणपती घाटाचे सगळे अँगल त्याला पाठ आहेत कारण तो घाटाशेजारीच लहान मुलांच्या महिला मंडळाच्या शाळेत जात होता. चित्र कसे काढले ? कोठून काढले ? केव्हा काढले ? त्यावेळी वातावरण कसे होते  ते तो नेमके सांगत होता . त्याचे प्रश्न संपतच नव्हते .
           आता वाटते बरं झाले आपण असे छोट्या गावात प्रदर्शन भरवले . असे अनेक छोटे मित्र , भाजीवाले , व्यापारी मित्र , ऊसाचा रस पाठवून माणुसकी जपणारे रस्त्यावरचे दुकानदार ,छोटा रुद्र व अनेक वाईकर यांची भेट कशी झाली असती ?
         मध्यमवर्गीय आईबाप भाज्यांची पिशव्या घेऊन व सोबत त्यांची छोटी मुले घेऊन चित्र पाहायला येत आहेत . हळूहळू चित्र काय असते ? प्रदर्शन म्हणजे काय ? पेपर कोणता ? फ्रेम कोठून आणली ? रंग कोणते वापरता ? असे नानाविध प्रश्न विचारत आहेत . त्याच्यां प्रश्नानां उत्तरे देताना मी देखील आता  एन्जॉय करतोय .
         आमच्या काळात चित्रप्रदर्शन पाहायला न मिळल्याचे खरोखर दुःख होत आहे . अशी छोटया तालुक्याच्या गावानां चित्रकारांनी प्रदर्शने भरवली पाहिजेत . कदाचित नव्या पिढीतील भावी कलाकार नक्की घडण्यास मदत होईल . अर्थात त्यासाठी चित्रातून फक्त अर्थप्राप्ती होईल हा विचार व अपेक्षा सोडून ग्राऊंड लेव्हलला यावे लागेल . निरपेक्ष भाव ठेऊन प्रदर्शने करावी लागतील .
        अशा अनेक छोट्या व हौशी कलाकारांची भेट नवी उभारी देते . "गावरान तडका " ही अतिशय समर्पक उपमा आहे . इथे डोक्यावर टोपल्या घेऊन भाजीवाले , अंडीवाले , आंबेवाले नाना प्रकारची माणसे येतात . त्यानां काय विचारायच्या आत पाटी टेबलावर ठेवतात व मस्त निर्व्याज ,निरागस , उत्सुकतेने चित्रे पाहतात . स्वच्छ मनापासून हसतात , दाद देतात . निवांत बसतात .चित्रे आवडल्याचे सांगतात . आनंदाने नाव्हून जातात . मुंबईत लई टेन्शन 😀😀 लई धावत्यात 😀😀 सारखी घाईत असल्याने पळत असतात इकडून तिकडे😀😀 इथे मात्र खुर्चीवर बसून गप्पा मारत अर्धा ते एक तास बसतात . मुक्त टेन्शन फ्री चित्रविचारमंथन चालते . त्यांचा परिसर चित्रातून पाहताना ते आचंबित होतात भारावून जातात . त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद , काही तरी नवीन पाहील्याचे समाधान मिळते व खऱ्या अर्थाने चित्रप्रदर्शनाची आतुरता लक्षात येते .
          वाईतील यावर्षी सुरु झालेली  2024 ची वसंत व्याखानमाला खूप सुंदर व नियोजनबद्द आहे . खूप भारी भारी वक्ते येतात . त्यांची भाषणे ऐकणे हा अवर्णनीय अनुभव असतो . त्यांच्या आवडत्या विषयावर ते बोलतात पण आपल्या ज्ञानात खूप भर पडते . त्यासाठी खूप मोठा लेख लिहावा लागणार आहे . 
        सर्वांनी भेट द्यायलाच पाहीजे अशी व्याख्यानमाला आयोजित केल्याबद्दल लो . टिळक ग्रंथालय संयोजकाचे व संचालक मंडळाचे आभार मानावे तितके कमीच आहे .

व्हॅलीज ॲन्ड फ्लॉवर्स
वाई ,पाचगणी , महाबळेश्वर येथील स्वाती व सुनील काळे यांच्या निसर्गचित्रांच्या प्रदर्शनाला सर्व कलारसिकांनी नक्की भेट द्या .
लोकमान्य आर्ट गॅलरी
लो .टिळक ग्रंथालय . गणपती आळी वाई .
1 ते 21 मे 2024
रोज सकाळी 10 ते 12  संध्याकाळी 5 ते 7
सर्वांना सस्नेह निमंत्रण 🙏🙏

सुनील काळे✍️
9423966486

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...