ब्लॉग संग्रहण

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०२४

गिर्यारोहक : जितेन्द्र गवारे

गिर्यारोहक - जितेन्द्र गवारे
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟    
          प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या स्वभावाचा , वेगवेगळ्या विचारांचा , वेगळ्या शारीरीक , आर्थिक , मानसिक विचारधारेंनी भारावून गेलेला असतो . आपल्याला जी जीवनशैली आवडेल तशीच दुसऱ्यांची असेल हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही . समान व्यसन , समान आवडी असलेल्यांची मैत्री त्यामुळेच जुळते जेव्हा विचारांची बैठक सारखी असते .
        माझे मूळ गाव वाई तालुक्यातील पांडवगडाच्या पायथ्याशी असलेले पांडववाडी किंवा पांडेवाडी . दरवर्षी गावातून वर डोंगरावर पांडवगडावर पांडवजाईदेवीची पालखी जाते . कित्येक वर्ष फक्त मनातूनच गडावर गेलो. प्रत्यक्ष शरीर घेऊन जाणे आता तर स्वप्नच झाले कारण पायाचे झालेल्या ऑपरेशनमुळे डोंगर चढणे आता जमत नाही . मी पाचगणी महाबळेश्वरमधून जशी चित्रनिर्मिती केली तशी एकटे जाऊन ट्रेकिंग करून गडावर चित्रकलेचे सामान घेऊन जाणे शक्य नसते . ट्रेकिंग करून गड सर करणारे . हिमालयात जाऊन बर्फात , थंडीत अनेक किलोंचे सामान पाठीवर घेऊन कांचनगंगा व इतर गिरिशिखरे चढाई करून सर करण्यासाठी जी अलौकीक जिद्द लागते त्यानां तर मी चक्क साष्टांग नमस्कारच करतो .
           आता रिटायर्डमेंटच्या काळात मी पांडवगडाच्या पायथ्याशी राहतोय . माझ्या सर्व खिडक्यांमधून पांडवगडाचे दर्शन होते . त्या उंच डोंगरावर पूर्वी अज्ञातवासात पांडव रहात होते अशी आख्यायिका आहे . त्या गडावर पाचगणीचा एक पारशी शेर वाडीया नावाचा माणूस कित्येक वर्ष रहात होता . पाचगणीच्या संजीवन शाळेच्या समोर जकात नाक्याशेजारी असलेली रोडटच  महागडी प्रॉपर्टी विकून हा गडी एकटा पांडवगडावर राहायचा . त्याने तेथे एक छोटे घर बांधले होते . सोबत एकदोन कुत्री घेऊन हा पारशी दिवसभर त्या गडाच्या परिसरात वरून दिसणारे निसर्गसौंदर्य पहात राहायचा . असा कित्येक वर्ष तेथे रहात होता . लाईट नाही , जनरेटर नाही , मोबाईल , टिव्ही नाही , बाजार वस्तू घेण्यासाठी वाईला जायचे तर डोंगर उतरावा लागायचा . नंतर परत प्रवास करून सर्व सामान डोंगरावर चढवायचे . सोबत माणूस नाही असे एकटे राहणाऱ्या शेर वाडीयाविषयी मला खूप खूप उत्सुकता असायची . असे एकट्याने डोंगरमाथ्यावर राहणे साधे सोपे काम नसते . डोक्यावर एक फूट लांबीचे सरळ मोकळे केस , त्या केसांवर वाऱ्याने उडू नयेत,अस्ताव्यस्त होऊ नयेत म्हणून एक काळी पट्टी बांधलेली असायची , खूर्टी बुल्गानीन दाढी , आत बसलेली गालफडे , गोरा रंग व साडे सहा फूट उंच किडकिडीत शरीरयष्टी , नेहमी इनशर्ट करायचा व एक जाड चामड्याचा पट्टा पँटला बांधायचा . त्यात नेलकटर , छोटा चाकू ,किल्ली यासारखी दोनतीन अवजारे असायची . त्याचा खूप उंच असा काळ्या रंगाचा हंटरशूज पाहीला की मला जणू इंग्रजी चित्रपटाचा नायक चालत आहे असे वाटायचे . त्याच्या रेसर सायकलची शीट दीड फूट उंच असायची त्याच्यासारखीच विचित्र दिसायची . वाईत किंवा पाचगणीला तो फिरत असला की सगळे त्याच्याकडे बघत राहायचे . सेंट पीटर्समध्ये शिकला होता तरी मराठी बोलायचा त्यामुळे सगळ्यांशी त्याची ओळख होती . असा हा शेर वाडीया सर्व जगाशी सबंध तोडून पांडवगडावर का रहात होता ? काय जीवनाचे रहस्य शोधत होता ? हे आता विचारायचेच राहीले .
       एक दिवस वाईला टिळक लायब्ररीत जितेन्द्र गवारे यांचा हिमालयातील गिर्यारोहणाचा अनुभव व स्लाईडशो असा कार्यक्रम आयोजित केला होता . मी त्यांचे अनुभव ऐकून एका वेगळ्याच जगात पोहचलो  होतो . हिमालयात गिर्यारोहण करणे हे एक वेडे धाडस आहे . महाराष्ट्रातील वातावरण व हिमालयाच्या बर्फाच्छदित पर्वतरांगाचे वातावरण यात जमीनअस्मानाचा फरक आहे . त्यासाठी बर्फात  राहण्याचे सामान व ऑक्सीजनचा सिलेंडर पाठीवर घेऊन हातात काठी , जाड प्लास्टीकचे शरीर पूर्ण झाकणारे कपडे घालून प्रत्यक्ष हिमवर्षावात चढाई करताना बर्फाचे डोंगर , लँडस्लायडींग , वारा , वादळ , अनोळख्या अडचणींच्या विश्वात डोंगर चढत गिरिभ्रमण करणे हे सोपे काम नसते .
           प्रत्यक्ष चढाई करण्यापूर्वी जवळपास वीस पंचवीस लाखांची तरदूत करावी लागते . जाण्या येण्यासाठी रेल्वे , विमान कंपनीचे तिकीट बुक करून ठेवावे लागते . श्वास वाढवणे व श्वास रोखून धरण्यासाठी शास्त्रशुद्ध सराव करावा लागतो , त्यासाठी शारीरिक व्यायाम , पळणे ,चालणे, योगाचा अभ्यास व मनाची संतुलीत अवस्था टिकवून ठेवण्याचे तंत्र शिकावे लागते . सततचा सराव करावा लागतो . विपरीत परिस्थिती येणार आहे याची जाणीव ठेऊन शरीरसंपदा चपळ ठेवावी लागते . वजन वाढू नये सतत साथ द्यायला तयार शरीर तंदुरुस्त असावे म्हणून सातत्याने जिममध्ये व्यायाम करावा लागतो . ज्याठिकाणी जायचे आहे त्या गिरिशिखरांचा नकाशा घेऊन भौगोलीक रचना व इतिहास समजून घ्यावा लागतो . निळ्या ट्रॅकसूटमध्ये तंदुरुस्त जितेन्द्र गवारे त्यांचे हिमालयातील फोटोंचा स्लाईड शो वाईमध्ये दाखवत असताना सगळे प्रेक्षक थंडगार झाले होते , अचंबित झाले होते. प्रत्येकाला प्रश्न पडलेला होता की हे सगळे उपदव्याप करून स्वतःच्या प्रिय कुटुंबापासून एक दोन महिना दूर राहून आर्थिक भूर्दंड सहन करून यानां काय मिळवायचे असते ? कशाला जीव धोक्यात घालून अडचणींचा सामना करत बसायच ?
शेवटी जितेन्द्र गवारे यांनी प्रेक्षकांना काही प्रश्न विचारायचे असल्यास विचारावेत असे वाक्य ऐकताच माझा  हात पटकन वर गेला .
          जिवाची पर्वा न करता , प्राणप्रिय कुटूंबातील सदस्यानां दूर ठेऊन , पंचवीस लाखांची आर्थिक झळ सोसून , एवढा शारीरिक व्यायामाचा त्रास सोसून जेव्हा तुम्ही हिमालयात जाता त्याऐवजी ते पैसे बँकेत मुदतठेव ठेऊन दर महिना व्याज मोजत बसण्या ऐवजी,निवांत सकाळी जरा उशीरा उठून , रिस्क न घेणारे साधे सर्वसामान्य माणसांसारखे जीवन जगायला तुम्हाला आवडत नाही का ? आणि तुम्ही अशा सफरींसाठी जाता त्यावेळी घरच्यांची अवस्था काय असते ? ते तुम्हाला अडवत नाहीत का ? माझा प्रश्न ऐकताच जितेन्द्र गवारे सहज हसत म्हणाले बसा सांगतो याची उत्तरे . आणि सगळ्यांनी कान टवकारले .
           आयुष्य म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा एक अविस्मरणीय प्रवास असतो . काहींचे जीवन अगदी रहाटगाडग्यासारखे असते .रोजचा दिवस सारखाच उगवतो . तेच तेच रुटीन जगणे असते . जीवनात काही नवीन उत्साहाने जगण्यासाठी आव्हानच नसते . बेसूर व कंटाळवाणे तेच तेच जीवन का जगावे माणसाने ? मला माणूस म्हणून जगताना चॅलेंजिंग , बाणेदार , शुरवीरासारखे धाडसी जगावे वाटते . आपले शरीर हे आराम करण्यासाठी , खाऊन जाडजूड होऊन निवांत झोपण्यासाठी नसते . शरीराला कार्यमग्न , उर्जावान ठेवण्यासाठी मावळ्यांसारखे चपळ ठेवण्यासाठी योग्य आहार , योग्य दिनचर्या असावी असे मला वाटते . त्यासाठी दरवर्षी कोठे ना कोठे मी गिर्यारोहणाची मोहीम आखत असतो . गिर्यारोहण हा साहसी खेळ आहे . या खेळात हिमशिखरे कधी अंगावर पडतील , आपण कधी या पर्वतशिखरांखाली गाडले जाऊ याची शाश्वती नसते . आपला हा श्वास कधी संपेल हे सांगता येत नाही . जर रोजचा दिवस जीवनातील एक साहसी खेळ म्हणून जगलो तर संपूर्ण जीवन एक उर्जेची धारा असल्यासारखे वाटेल .
              दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे . माणूस कितीही श्रीमंत असू द्या तो कधीच समाधानी नसतो . गरीबानां श्रीमंत व्हायचे म्हणून ते धावत असतात व श्रीमंतानां अधिक श्रीमंत व्हायचे असते म्हणून ते अधिक धावपळ करतात . आणि पैसे टिकवून ठेवण्यासाठी कंजूषवृत्तीने जगताना आपल्या इच्छा मारण्यात अर्थ काय ? अधिक पैसे मिळविण्यासाठी सामान्य लोकानां फसवून टोप्या लांडीलबाडी करून दिवसरात्र पैसे कसे वाढतील या विचारांत स्वतःलाच काहीजण फसवत असतात . असे जीवन मला जगायचे नाही .
            तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर फार सोपे आहे . मी असा आळशी, निवांत  बेसूरा जगू नये म्हणून माझी पत्नी , माझे कुटूंबीय स्वतःच अशा मोहीमेमध्ये मला मदत करत असतात . शेवटी जगताना मरण कधी तरी येणारच . मग मरण पुण्यात आले काय किंवा हिमालयाच्या कुशीत आले काय ? मरण्याच्या अगोदर जिवंत जगले पाहीजे असे मला वाटते . मृत्यू त्यामुळे मित्र असल्यासारखा वाटतो. मग मित्रासोबत भिती कशाला वाटायला पाहीजे ?
आणि सर्वात शेवटी हे अगदी मनातलं सांगतो . जी माणसे सर्वसामान्य रुटीन पद्धतीने जगतात ती रुटीन पद्धतीनेच मरतात . जी माणसे असामान्य मोठ्या ध्येयाने पछाडलेली असतात ती असामान्य कर्तृत्व करतात. त्यांच्या कर्तृत्वाची दरवळ हळूहळू सगळीकडे पसरते व समाजही एक दिवस त्यांची दखल घेतोच . गिर्यारोहन क्षेत्रात जे काम मी केले त्यामुळेच तर तुम्ही मला या कार्यक्रमाला का बोलवले ना ?
            प्रत्येकाच्या जीवनाची फिलॉसॉफी वेगवेगळी असते किंवा ती वेगवेगळी असलीच पाहीजे . जितेन्द्र गवारे त्यांच्या आगळ्यावेगळ्या विचारांमूळे व धाडशी जीवनशैलीमुळे कायम लक्षात राहीले .
         जितेन्द्र गवारेंचा आज वाढदिवस आहे . त्यामुळे आजचा दिवस त्यांच्यासाठी खास आहे . अनेक मोहीमा ते आयोजित करत असतात . त्याच्यां सर्व गिरिशिखरांच्या मोहीमानां खूप खूप शुभेच्छा !
💐💐💐💐💐💐💐💐💐
 
https://www.facebook.com/share/r/Nsc8DB6Par2Xyu95/?s=chYV2B&fs=e&mibextid=6AJuK9

https://www.instagram.com/reel/ChZ5rlJq-dL/?igsh=Z2V3cGRqNDBud21s

सुनील काळे✍️ 
9423966486

जगण्याचे " स्टॅन्डर्ड " समजलेला माणूस- प्रा . डॉ . ज्ञानदेव झांबरे सर************************        पाचगणी हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शैक्षणिक केंद्र आणि थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे . ब्रिटिश काळापासून वेगवेगळ्या लोकांनी स्वधर्मियांसाठी शाळा सुरु केल्या . त्यामुळे येथे त्रेचाळीस शाळांमध्ये अठरापगड जातींचे लोक एकत्रित रहात असल्याने येथे कॉस्मोपोलीटन संस्कृती आहे . पाचगणी शहर छोटे असल्याने बहुभाषिक वेगवेगळ्या प्रांतातील मंडळी छानपैकी एकत्रितपणे राहतात . अशा या गावात माझे बालपण गेले . दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि चांगले मार्क मिळाले म्हणून अकरावीसाठी कॉलेजचा शोध सुरु झाला . त्याचवर्षी वाईला किसनवीर महाविद्यालयात नव्याने सायन्स कॉलेज सुरु झाल्याचे कळाले . BSc डिग्री मिळण्याची चांगली सोय झाली होती . त्यामुळे घरच्यांनी मला अकरावी सायन्सला प्रवेश घेण्यासाठी फोर्स केला . मी मात्र नाराज झालो होतो कारण माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले होते व सायन्सचे विषय इंग्रजी माध्यमात शिकवले जाणार होते . इंग्रजीची माझी खूप आबाळ झाली होती कारण सातवीपर्यंत आम्हाला इंग्रजीचे शिक्षकच नव्हते . इंग्रजी , गणित , सायन्स या विषयाची तर माझी कुडंली कधी जमलीच नव्हती पण त्याकाळी उलट उत्तर देण्याची प्रथा नव्हती त्यामुळे मी मुकाटपणे वाईला सायन्स कॉलेजला रोज एस.टी बसचा पास काढून येऊ लागलो .       सायन्सच्या या वर्गात शिक्षक मला काय शिकवत होते याचे मला भान नव्हते कारण मला इंग्रजी भाषाच समजत नव्हती . चाळीस पन्नास विद्यार्थी असल्याने मागच्या बेंचवर बसायला लागलो आणि मला एक नविन छंद लागला . मी चित्रे काढायला लागलो . माझ्या मित्रांची , शिक्षकांची , प्राण्यांची , वनस्पतींच्या जर्नलमध्ये आकृत्या काढणे मला आवडू लागले . कधी कधी मी वाईच्या बसमधून पसरणीघाटात उतरायचो . या घाटातील वळणदार रस्ते , दुतर्फा असलेली वडाची झाडे , पांडवगडाच्या पायथ्याच्या सभोवतालची छोटी छोटी चमकणारी भातशेती , ऊन पावसाचा खेळ , संध्याकाळची सुर्यास्ताची रंगउधळण , वाईच्या गणपती मंदिराची , वेगवेगळ्या घाटाची चित्रे मी जलरंगात उतरवू लागलो . थोडक्यात मला चित्रकलेची फारच आवड निर्माण झाली होती . चित्रकार होण्यासाठी लागणारी इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा मी बारावी सायन्सला असताना दिली व त्यामध्ये मला 'अ 'श्रेणी प्राप्त झाली होती .       चित्रकलेचे वेड इतके वाढले की मी सकाळी सहा वाजताच थंड हवेत चित्र काढायला जायला लागलो . टेबललॅन्डच्या पठारावर तर कधी सिडनेपाँईटच्या उंच चौथऱ्यावर बसून मी धोमधरणाचे पाणी ,कृष्णा व्हॅलीतील डोंगररांगा , कधी पांगारी तायघाट जवळच्या पारसी पॉईंटची चित्रे रेखाटू लागलो . आणि अचानक माझ्या लक्षात आले मला अतिथंड हवेत सकाळी फिरल्याने सर्दीचा त्रास सुरु झाला आहे . ऑक्सिजिन घेण्यासाठी दोन्ही नाकपुड्या बंद झाल्याने श्वास घेणे मुश्कील झाले आहे . डॉक्टरांनी माझे ऑपरेशन करून नाकातील वाढलेले पॉलीप्स काढावे लागतील यासाठी तातडीने ॲडमिट केले . नाकाला मोठे बँडेज बांधूनच मी 12वी सायन्सची प्रॅक्टीकल परिक्षा दिली होती . त्यानंतर  पुण्याला चित्रकलेच्या अभिनव कॉलेजला मी गेलो . चित्रकार झालो व परत पाचगणी महाबळेश्वरचा निसर्ग रंगवू लागलो होतो . थंड हवेत वेळीअवेळी सतत डोंगररांगावर भटकंती केल्याने माझा नाकाने श्वास घेण्याचा त्रास आणखीनच वेगाने वाढू लागला . डॉ. प्रशांत पोळ यांनी वेगवेगळ्या वर्षी चारपाच वेळा माझे ऑपरेशन केले आहे . एकंदरीत मला थंड हवेची ॲलर्जी झाल्याचे सिद्ध झाले व डॉक्टरांनी 2014 साली मी पाचगणी सोडावी लागेल असे निक्षून सांगितले . मला माझे पाचगणीचे बस्तान सोडून  कायमचे  वाईला यावे असे त्यांनी सांगितले व नाईलाजाने मी काही दिवस वाईला राहण्याचे ठरवले .          वाई कॉलेजचे प्राध्यापक असलेले माझे मित्र श्री .पटकुरे सर यांनी मला सह्याद्रीनगर या परिसरात बोलावले . थोडी चर्चा केली तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की त्यांच्या सोसायटीत " प्रज्ञाअमृत " नावाचा एक बंगला आहे . त्याचे मालक श्री .व सौ झांबरे दोघेही शिक्षक आहेत . त्यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर पाच खोल्यांचे घर भाड्याने मिळते . तेथे काही दिवस राहून वाईच्या परिसरातील चित्रे काढावीत . हवा बदलाने तब्बेतीवर काय परिणाम होईल हेही कळेल व एखादी जागा आवडली तर घर बांधण्यासाठी वाईत एन ए प्लॉट घ्यावा या उद्देशाने मी त्यांच्या घरी आलो .         सहयाद्रीनगरात असलेला " प्रज्ञाअमृत " अतिशय मेंटेन केलेला ,फुलझाडे असलेला सुंदर बगीचा व पार्किंगची सोय असलेला बंगला बघताक्षणीच मला आवडला . बंगल्याच्या पाठीमागे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी स्वतंत्र जीना होता . आतमध्ये सर्व नीटनेटकेपणा होता . खिडक्या दरवाजानां पडदे लावलेले होते . आम्ही दोघेही चित्रकार असल्याने चित्रकाम करण्यासाठी व राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होती . झांबरेसर , झांबरेमॅडम व त्यांची मुलगी मृणाल हे तीनच माणसे खाली रहात होते . त्यांचा मोठा मुलगा प्रणव शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला होता . पहिल्या भेटीतच आमची छान ओळख झाली व लगेच प्राथमिक बोलणी करून मी एका आठवड्यात पाचगणीवरून वाईला शिफ्ट झालो . सर व मॅडम दोघेही स्वच्छताप्रेमी होते . त्यामुळे मी रोज मॉर्निंगवॉकला वाकेश्वरला जाताना पाहायचो झांबरे सर स्वतः साफसफाई करायचे , कुंड्यांना पाणी घालणे , झाडांची निगा राखणे ,खतपाणी देणे . पूर्ण आवार पाण्याने स्वच्छ धूवून काढायची त्यांनां आवड होती . आम्ही कधीतरी समोरासमोर भेटलो की अनेक विषयांवर गप्पा मारायचो . वाईत राहण्याचे फायदेतोटे तपासून पहायचो . येथील परिसराचा माणसांचा स्वभाव व आचरणांवर चर्चा करायचो . नवनव्या जागा शोधायची आता सवय लागली होती . त्याचा आढावा घेताना झांबरे सर मनापासून प्रतिक्रिया द्यायचे .       " प्रज्ञाअमृत " या बंगल्यामध्ये रहात असताना एक घडलेला प्रसंग मला आजही लक्षात आहे व आयुष्यभर पुढेही कायम लक्षात राहील . एकदा रविवारी सुट्टीचा दिवस होता . साधारण नऊ दहा वाजताची वेळ असेल . आमची घरकाम कारणारी बाई आज येणार नव्हती त्यामुळे दोघेही निवांत पेपर वाचत बसलो होतो . आणि शेवटच्या दूरच्या खोलीतील अचानक कोपऱ्यातील किचनसिंकचा का वॉशबेसीनजवळचा नळ अलगद तुटून पडला होता . पाईपलाईन उघडी झाली आणि वेगाने पाणी रूममध्ये पसरु लागले होते . आम्ही विरुद्धदिशेच्या बाजूला असल्याने काही आवाजच आला नाही . हळूहळू पडणाऱ्या पाण्याने ती रुम भरून गेली होती आणि अचानक खालून झांबरे मॅडम व सर दोघेही वरच्या मजल्यावर आले .त्यांनी घराची बेल वाजवली आणि त्यांच्या लगेच लक्षात आले की शेवटच्या खोलीतून पाणी जवळपास चारपाच इंच भरून दुसऱ्या रूममध्ये पाणी पसरू लागले होते . झांबरे सरांनी लगेच प्लंबरला फोन लावला येताना नवीन नळ घेऊन यायला सांगितले . पटकन टेरेसवर जावून मुख्य पाईपलाईन बंद केली . इतक्यात झांबरे मॅडम पटकन खाली गेल्या , येताना त्यांनी फरशी पुसण्याचा रबरमॉप व चारपाच फरशी पुसण्याचे जाड कपडे घेऊन एक बादली आणली . त्यांची मुलगी मृणाल देखील मदतीला आली . इकडे बनियन व लुंगी घालून निवांत बसलेले झांबरे सर गुडघ्यापर्यंत लूंगी गुंडाळून पटकन फरशीवरील पाणी बादलीत भरू लागले . झांबरे मॅडम यांनी लगेच साडीचा पदर खोचून मॉपने पाणी बाहेर टाकायला सुरुवात केली . मग आम्ही दोघेही त्यांच्यामध्ये सामील झालो व सर्व जणांनी रुममध्ये साचलेले पाणी काढून तासाभरात सगळा बंगला चकाचक केला . नंतर प्लंबर आला त्याने नवीन नळ बसवला .आता तुम्ही म्हणाल यात आश्चर्याची गोष्ट काय ? तर आम्ही झांबरे सरांचे भाडेकरू होतो . पाण्याचा नळ दुरुस्त करून रुम साफसफाई करण्याची जबाबदारी आमची होती . ते घरमालक होते . उच्चशिक्षित पी एच डी झालेले कॉलेजचे प्राध्यापक होते . मॅडम एम एस सी व जॉय स्कूलच्या उपप्राचार्या होत्या . एकदा घर भाड्याने दिले की त्याची देखभाल करण्याची जबाबदारी भाडेकरूचीच असते . त्यादिवशी दुपारी आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि तो प्रसंग एन्जॉय केला . कोणीही कसलीही तक्रार झाली नाही . दोन चार महिन्यातच आम्ही " प्रज्ञाअमृत " बंगला सोडला . नवीन जागा घेतली तेथे मोठे अपयश आले . नंतर मग आमचा मेणवली गावाजवळ " निसर्ग " नावाचा बंगला तयार केला . मागच्या वर्षी तेथे " निसर्ग आर्ट गॅलरी " नावाने चित्रप्रदर्शनही भरवले होते . अनेक वेगवेगळ्या जिल्हयातील , तालुक्यातील पर्यटक प्रदर्शन पाहण्यासाठी येत होती . एकदा किसनवीर कॉलेजचे प्रा. श्री रमेशचंद्र बारगजे सरांनी फोन केला की त्यांच्या कोल्हापूरच्या 1973 सालच्या एम .एस .सी बॅचचे क्लासमेटस यांचे वाई येथे गेटटुगेदर आयोजित केले आहे त्यावेळी तुमची निसर्ग आर्ट गॅलरी पाहायला सर्वजण येणार आहेत . धोमचे मंदिर पाहून सर्व गाड्या निसर्ग आर्ट गॅलरी पाहण्यासाठी गेटपर्यंत आल्या . त्यानां पार्कींगची जागा दाखवत होतो त्यावेळी एक गाडी मात्र गेटपासून दूर थोड्या अंतरावर उभी राहीलेली पाहीली . बारगजे सरानां ती गाडी बाहेर का थांबली म्हणून विचारले तर सरांनी कपाळावर हात मारून घेतला . मला म्हणाले काय बोलू आता ? ती गाडी तुझ्या सख्या चुलत व मावसभाऊ असलेल्या हनुमंत काळे यांची आहे . तो आमच्या बॅचचा सर्वात अतिशय हुशार विद्यार्थी होता . युनिव्हरसिटीत प्रथम आला होता . त्याला आम्ही सांगितले चित्रकार सुनील काळे तुझा भाऊ आहे . त्याने वाई ,पाचगणी महाबळेश्वर या परिसरातील असंख्य अप्रतिम चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत , त्याची मिसेस चित्रकार स्वाती काळे हिने असंख्य फुलांची तैलरंगात चित्रे काढलेली आहेत . उत्तम चित्रप्रदर्शन आहे . तुमची तीस वर्ष झाली भेट झालेली नाही तर तुम्ही आता जरूर भेटा व प्रदर्शनही पहा . पण तुझा भाऊ गाडीतून उतरायला तयार नाही त्याचे कुटुंबीय गाडीतच बसून आहेत .ते म्हणतात आम्ही भावकीत जात नाही कारण आमचे " स्टॅन्डर्ड " मोठे आहे . मी मोठ्या कंपनीत ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर होतो . तो साधा चित्रकार आहे त्याची माझी तुलना होऊ शकत नाही . तुम्ही सगळे प्रदर्शन पाहायला जा आम्ही बाहेर रस्त्यावर गाडीत बसून राहू . तो एक तास बाहेर थांबला पण घरात आलाच नाही . खरे तर हा हनुमंतदादा आता हेमंत नाव लावतो . कारण आईबापाने ठेवलेले हनुमंत हे नाव त्याला आवडले नाही . अतिशय गरिबीतून त्याला शिक्षण दिले होते .स्वतःच्या कर्तबगारीने तो उच्चपदावर पोहचला त्याचे उच्चशिक्षित मुलीबरोबर लग्न झाले पण लग्नानंतर व अगोदर नोकरी करत असतानाही या दादाने कधीच कोणत्याही भांवडाला जवळ केले नाही . कोणत्याही नातेवाईकांकडे ते फिरकले नाहीत . कोणाशी कसलाही संबंध ठेवला नाही ,कोणालाही मदत केली नाही . संपूर्ण कुटुंबाला दूर ठेऊन दादा मोठा स्टॅन्डर्डवाला झाला . आमचा दादा कसा दिसतो हे मला पाहण्याची उत्सुकता होती . कारण तो माझ्यापेक्षा पंधरावीस वर्षांनी मोठा होता . पण " स्टॅन्डर्ड "आडवे आले . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात . शिक्षणामुळे माणूस विचारवंत होतो त्याच्या ज्ञानाच्या कक्षा उचांवतात . त्याचे जीवन सुखकर व समृद्ध होतेच पण त्याच्यां विशाल छायेत अनेकानां संजीवनी मिळते . उच्चशिक्षित भावाने मात्र आमच्या सर्वांसाठी त्याचे दरवाजे मात्र कायमचे बंद केले होते . उच्चशिक्षणाचा मला तेथे काहीच उपयोग झालेला दिसला नाही . इथे मला पीचडी झालेले उपप्राचार्य झांबरे सर आठवतात . उपप्राचार्या झांबरे मॅडम आठवतात . स्वतःच्या भाड्याने राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाशी प्रेमाने सुखदुःखाची विचारपूस करत असत . ते दोघेही स्वतःचे " स्टॅन्डर्ड "कधी गोंजारत बसले नाहीत .  सामान्य माणसासारखे राहून दोघेही असामान्य कामे करत राहीली . जॉय स्कूल व किसनवीर विद्यालयातील विद्यार्थी घडवताना आपल्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांला घडवण्याचे . " स्टॅन्डर्ड " काम त्यांनी आयुष्यभर केले व त्याचा गर्वही कधी केला नाही . जीवन जगण्याचे खरे " स्टॅन्डर्ड " त्यांनां कळले आहे म्हणून माझ्या त्या अतिउच्चशिक्षित एम एस सी फर्स्टक्लास झालेल्या अडाणी भावापेक्षा झांबरे पती पत्नींविषयी मला आदर वाटत आहे .     महिन्यापूर्वी एकदा झांबरे मॅडमचा मला फोन आला . त्यांनी विचारपूस केली व त्या जॉय स्कूलची नोकरी सोडून पुण्यात नातवाचा सांभाळ करण्यासाठी पुण्यात रहात असल्याचे सांगितले . मुलगा सिव्हील इंजिनियर व सुनबाई पेशाने सरकारी वकील असल्याने दोघेही कामात व्यस्त झाले मग मुलाकडे लक्ष कोण देणार ? म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला . आणि ते ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . माझी आर्ट गॅलरी होती . ती सांभाळताना माझी तीन वर्षाची मुलगी सांभाळण्यासाठी मी आईवडीलानां विनंती केली तर त्यांनी नकार दिला . गावाकडे शेतीची कामे असतात त्यामुळे तुमची मुलगी तुम्हीच सांभाळा असे उत्तर आईने दिले . शेवटी आमच्या संघर्षाच्या लढाईत मुलगी देवाघरी गेली . ती वारली त्यावेळी मी माझ्या मेव्हण्याला सत्यजितला फोन केला . तो म्हणाला मी अत्यंविधीला येऊ शकणार नाही . तो देखील Phd झालेला आहे . अतिउच्चशिक्षित आहे . त्याला भाचीच्या अत्यंविधीला जाण्याची गरज वाटली नाही . बहिणीला कठीण स्थितीत आधार देण्याची आवश्यकता वाटली नाही आणि पुढे आता सत्तावीस वर्ष झाली तरी त्याला आमची कधीच आठवणही झाली नाही . काय उपयोग त्या डॉक्टरेटचा ? जिथे माणूस माणसाला ओळखत नाही .मोबाईल ,फोन , लॅपटॉप आले तंत्रज्ञान वाढले तरी मनाची आढी मात्र कायम राहीली .कधी त्याच्या कुटूंबाने संपर्कच केला नाही कारण "स्टॅन्डर्ड " आडवे आले .त्यावेळी खऱ्या अर्थाने एकटे जगायला शिकलो . अशावेळी झांबरे मॅडमचा त्याग मला प्रेरणा देणारा वाटतो . मुलांविषयची माया त्यांच्या कृतीतून दिसते .इकडे सरांनां रिटायर्ड होण्यापूर्वी खानावळीत जेवण करावे लागले . काही महिने एकटेपणा स्विकारावा लागला . पण त्यांनी कधीही त्याची तक्रार केली नाही . कॉलेजमध्ये त्यांनी अनेक कार्यक्रमात स्वतःला झोकून दिले . त्यांच्या कॉलेजच्या कारकीर्दीची मला जास्त माहिती नाही पण त्यापेक्षा माणुसकी जपणारे , कुटुंबाला जपणारे , अभिमान नसणारे , मोठेपणाचा त्याग केलेले गार्डनमध्ये स्वच्छता करणारे डॉ झांबरे सर मनाला फार भावले . त्यांच्या मुलाचे लग्न ठरले त्यावेळी प्रणवच्या लग्नाला आम्ही दोघेही गेलो होतो . लग्नकार्यालय पूर्णपणे भरून गेले होते प्रचंड गर्दी होती तरीही झांबरेसरांनी आम्हाला बरोबर पकडलेच . शाल श्रीफळ देऊन योग्य मानसन्मान केला त्यावेळी मला या झांबरे कुटूबांचेखरे " स्टॅन्डर्ड " कळाले . वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य नामवंत लहानमोठ्या माणसांनी संपूर्ण हॉल भरून गेला होता . काय असते स्टॅन्डर्ड ?? तुम्ही जगत असता त्यावेळी त्या तुमच्या जगतानाच्या काळात असंख्य माणसे भेटतात . त्यातील काही माणसे चांगली वागलेली असतात काही वाईट वागलेली असतात . पण शेवट काय असतो ? तुमच्या जगण्याला कधीतरी मर्यादा येतेच . कधीतरी शरीर थकते व तुम्हाला अंतिम श्वास घ्यावा लागतो . त्यानंतर कोणत्यातरी स्मशानघाटाजवळ तुमची राख होते ती राख पाण्यात मिसळते तुमचे अस्तित्व संपते . जग काही दिवस तुमची आठवण काढते नंतर तुमची कोणी आठवणही काढत नाही . तुमचे " स्टॅन्डर्ड " काही असो शेवटी तुमची राखच होते . हे ज्यानां समजते त्यांचे भावविश्व वेगळे असते . ते कायम हसतमुख असतात . ते त्यांच्या कृतीतून त्यांचे वेगळेपण जोपासत असतात .अनेकानां त्यांचे जगणे प्रेरणा ठरत असते .असे जीवनाचे खरे " स्टॅन्डर्ड " कळालेले झांबरे सर मला आवडतात . काही महिन्यांपूर्वी अचानक आमच्याकडे घरकाम करणाऱ्या बाई व माळीकाम करणारा त्यांचा मुलगा या दोघांनी आमचे काम सोडले. काही दिवस आम्ही वेगवेगळी माणसे शोधली पण त्यांच्या पगाराच्या अपेक्षा जास्त असल्याने जुळले नाही . मग झांबरे सर पुन्हा आठवले . Phd झालेला माणूस स्वतः झाडलोट करतो , बागेची निगा राखतो तर आपण का लाजायचे ? त्यांच्यापासून प्रेरणा घेतली . आता मी बागकामात तरबेज झालोय बागेत शेतात काम केल्यामुळे आरोग्यही चांगले राहते याचा शोध लागला . आपण कोणावर विसंबून राहायचे नाही काम करत राहायचे हेच खरे " स्टॅन्डर्ड " झांबरे सरांकडून मी शिकलो . खरी डॉक्टरेट तीच आहे . मे महिन्यात ते आता रिटायर्ड होतील . अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या सरानां व झांबरेमॅडम या दोघांनाही उर्वरीत रिटायर्ड आयुष्य सुखसमृद्धीचे आनंदाचे जावे त्यांच्या मनासारखे जगताना उत्तम आरोग्य प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना व मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !चित्रकार - सुनील काळे✍️9423966486निसर्ग आर्ट गॅलरी [वाई]