ब्लॉग संग्रहण

शनिवार, १९ जून, २०२१

*पाऊस चित्रातला *पाऊस मनातला*

पाऊस चित्रातला
पाऊस मनातला
🌧️🌧️🌧️🌧️🌧️
           निसर्ग हा अफलातून कलाकार आहे .त्याने सजवलेल्या  विविध रूपांमुळे , अनोख्या जडणघडणीमुळे , अनेक दृश्य-अदृश्य पैलूंमुळे माणूस मंत्रमुग्ध होऊन जातो . कधीकधी तर त्याचे वर्णन  शब्दांमध्ये करणेही शक्य होत नाही .भारत देशावर तर निसर्गाने इतकी मुक्त उधळण केली आहे की बऱ्याचदा  वाटते की काही भारतीयांना या विशाल समृद्धतेची जाणीव देखील नाही . कारण काही देशामध्ये कंटाळवाणे फक्त दोनच ऋतू असतात तर भारतामध्ये तीन ऋतू आहेत ते म्हणजे हिवाळा ,उन्हाळा आणि पावसाळा . 
           मे महिन्याच्या प्रखर तापलेल्या उन्हामध्ये खूप चालावे लागले आणि जवळपास एखादे झाड किंवा पेलाभर पाणी देखील प्यायला मिळाले नाही की उन्हामुळे गरमीमुळे माणूस अस्वस्थ होत जातो .उन्हाच्या या तप्त झळांमुळे जीवाची प्रचंड काहिली व्हायला लागल्यानंतर मग पावसाचे वेध लागू लागतात . जून महिना सुरू होऊन कधी एकदाचा पाऊस सुरू होतो व सगळीकडे गारवा पसरतो असे वाटते . अर्थात काही जणांना पाऊस खूप आवडतो तर काही जणांना जराही आवडत नाही .

       पण मला मात्र पाऊस खूप आवडतो माझ्यातील चित्रकाराला पावसामुळे नव्या चित्रांच्या तयारीचे वेध लागतात .

         परमेश्वराजवळ माझे न लिहून पाठवलेले असंख्य तक्रारअर्ज आहेत .पण एका गोष्टीची मी कधीही तक्रार केलेली नाही . त्यासाठी मी त्या विश्वनिर्मात्याचा खूप आभारी आहे ,आणि ते म्हणजे त्याने माझे बालपण , तरुणपण पाचगणी , महाबळेश्वर ,वाई या निसर्गाने समृद्ध असलेल्या परिसरात घडवले . आपण ज्या परिसरात वाढतो त्या देशाचा , राज्याचा , जिल्हयाचा , गावाच्या आजूबाजूच्या नैसर्गिक वातावरणाचा आपल्यावर सतत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे खूप प्रभाव पडतो . माझ्यावर तर या परिसरातील 
निसर्गदैवतांचे अनेक उपकार आशीर्वाद आहेत आणि त्यासाठी मी माझ्या चित्रातून नेहमीच कृतज्ञता व्यक्त करतो .
          लहानपणापासून पाचगणीत वाढलो . या गावाला अचंबित करणारे सपाट डोंगराचे टेबललँड नावाचे पठार देवाने उदारपणे बहाल केले आहे . आशिया खंडातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे पठार म्हणून ते प्रसिद्ध आहे . उन्हाळ्यात या पठारावरून फेरफटका मारला की लक्षात येते पूर्वेकडचे मांढरदेवीचा डोंगर ,पांडवगड , कमळगड , नवरा-नवरीच्या डोंगरांच्या रांगा पश्चिमेकडच्या भिलार , तायघाट गावच्या परिसरात व दक्षिणेकडे राजपुरी ,खिंगर परिसरातील डोंगरात लावलेल्या वणव्यांमुळे वनश्री भकास दिसत असते . त्यातील हिरवाई पूर्णपणे नष्ट होऊन काळे कभिन्न  झालेले डोंगर पाहताना संवेदनशील पर्यटकही खूप नाराज झालेले असतात . पण पावसाळ्यात मात्र येथे निसर्गाच्या चमत्काराला सुरुवात होते आणि या डोंगर परिसरातील सृष्टीसौंदर्य स्वर्गालाही लाजवणारे ठरते .
          पाचगणीत महाबळेश्वरच्या मानाने खूपच कमी पाऊस पडतो . महाबळेश्वरमध्ये हे नीरस  उदास व जनजीवन विस्कळीत करणारे वातावरण प्रचंड पावसामूळे सुरु होते असे हवामान मात्र पाचगणीला नसते .महाबळेश्वरला एकदा पावसाने जोर धरला की चार-पाच दिवस संततधार पावसाने खूप कंटाळा येतो . काहीजण घराला प्लास्टिक कापडाचे आवरण लावतात, काहीजणांच्या घराला गवताच्या पेंड्या बांधून केलेले संरक्षण असते तर काही इमारतींना पत्र्याची उभी पाने लावून संरक्षक तटबंदी तयार केलेली असते . त्याशिवाय घर सुरक्षित राहू शकत नाही .कारण पावसामुळे सगळ्या भिंतींना ओल पसरून घरातच थंडीचे एक कुबट वातावरण तयार होते . आता नव्याने आलेली इलेक्ट्रॉनिक माध्यमे व इंटरनेट , मोबाईल यांच्यामुळे निदान चांगला टाईमपास तरी होतो व थोडी करमणूक होते .पण पूर्वीच्या काळात महाबळेश्वरच्या पावसामुळे अनेकांच्या जीवाचे हाल होत असत व आजारपणामुळे ते तात्पुरते स्थलांतर ही करत असत .पाचगणीचा पाऊस आरोग्यदायी आणि उत्तम प्रकृती ठेवणारा आहे . तिन्ही ऋतूंमध्ये येथील वातावरण आल्हाददायक आहे याचा अभ्यास करून ब्रिटिशांनी येथे मुला-मुलींच्या शाळा वसवल्या . त्यापैकी सेंट जोसेफ या शाळेने नुकतेच 126 व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे .
           मी मराठी शाळेतून संजीवन या मोठ्या शाळेत मराठी माध्यमातच शिकण्यासाठी गेलो .ही शाळा गावापासून जरा थोडी लांब होती .माझे मित्र घनःश्याम कारंजकर ,संजय भिलारे  व विलास निंबाळकर व मी आमची एक छान पैकी चौकडी जमली होती . आम्ही सगळेजण एकत्र शाळेत जायचो . पावसाळ्यात आत्ताच्या सारखे त्यावेळी उंच फुटपाथ बांधलेले नव्हते . रस्त्याच्या बाजूला चांगली मोठी खोदलेली गटारे होती . या वाहत्या पाण्यामध्ये आम्ही चौघेजण कागदाच्या बोटी करून सोडायचो .या बोटीच्या वेड्यावाकड्या प्रवासातील गंमत न्याहाळत आमचा शाळेमध्ये प्रवेश व्हायचा .आमच्याकडे हॉकी खेळण्यासाठी स्टिक्स नव्हत्या मग पावसाळ्यातील मोठ्या छत्र्यांच्या दांड्याने आम्ही प्लास्टिक पेपरचा गुंडाळा केलेला बॉल भर रस्त्यातच खेळत खेळत  शाळेतून घरी यायचो. हॉकीची लाकडाची खरी  स्टिक नाही याची आम्हाला कधीही खंत किंवा दुःख झाले नाही .
       याच काळामध्ये मला बहुदा चित्रकार व्हायचे वेड लागले मी पावसाची चित्रे काढायचा प्रयत्न करायचो . खूप आटापिटा करायचो पण चित्रात खऱ्या पावसासारखे इफेक्ट यायचे नाहीत . लहान असल्याने व चित्रतत्रांची माहीती नसल्याने पावसाची चित्रे एवढी प्रभावी व्हायची नाहीत .
               माझा मित्र घन:श्‍याम एकदा पूर्ण भिजलेल्या अवस्थेत नखशिखांत
ओलाचिंब होऊनच माझ्या घरी आला . त्याची कपडे पूर्णपणे भिजलेली होती . अस्ताव्यस्त झालेले केस , त्यावरून ओघळणारे पाणी पाहून मी त्याला चांगलेच फैलावर घेतले .कशाला असा पावसात भिजत आलास ? असे विचारले असता तो सहजपणे म्हणाला 
" असा भिजलो नसतो तर कविता कशी सुचली असती ? " 
मग माझ्याकडून एक कोरा कागद घेऊन त्याने पावसाची एक सुंदर अप्रतिम कविता लगेच लिहून काढली व मला म्हणाला 
पावसाची चित्रे , 
पावसाची गाणी , 
पावसावरचे काव्य , 
पावसाचे लेखन असे घरात बसून निवांत करायच्या गोष्टी असतात का ? 
" चित्रासाठी एकदा तरी चिंब भिजून  खरा पाऊस कधी  अनुभवलास का ? एकदा माझ्यासारखा नखशिखांत भिजलास की तुला खरा पाऊस कसा असतो ते कळेल . मग आम्ही दोघेही पावसात भिजलो , व्हॅलीमध्ये भरपावसात भिजत भ्रमंती केली . कोसळणाऱ्या पावसाच्या त्या धुक्याच्या साम्राज्यात हरवून जायला शिकलो .

मग पाऊस माझा व मी पावसाचा एकमेकांचे खरे मित्र झालो.

मग भरपूर पावसाची चित्रे काढण्याचा सपाटाच लावला .

          पाचगणी गाव ते वाईचा जकात नाका यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंचच उंच अशी वडाची अनेक झाडे आहेत .त्या झाडांची भिजलेली , हिरवट झालेली मोठी खोडे ,त्याच्या विशाल फांद्या , रस्त्यावर चमकणारे पाणी , त्या झाडांची रस्त्यावर पडलेली प्रतिबिंबे मला आवडू लागली. हळुवार जपून चालणारे सायकलस्वार ,चौकातील लगबगीने छत्री घेऊन चालणारी माणसे , काळ्या पिवळ्या रंगातील वडापच्या जीपगाड्या ,शाळेचा रेनकोट घालून बोट धरून चालणारी छोटी छोटी मुले ,विद्यार्थी व त्यांच्यासोबतचे पालक , कधी नवनवे पर्यटक रंगविताना मजा यायची. टेबललॅन्डचे उंच पसरलेले कडे त्यामधले धुक्याचे थर , एम .आर . ए सेंटरची धुक्यातून चमकणारी इमारत , त्याच्या बाजूला असलेली सिल्वर ओक्स व इतर प्रचंड मोठ्या वृक्षांची झाडी , पावसात चमकणारे कृष्णा नदीचे पात्र ,नगरपालिकेच्या आंबेडकर उद्यानाजवळची झाडे , त्या झाडांच्या रस्त्यातून भर पावसात वेगाने पाणी उडवत जाणारी वाहने ,एखादा लाल किंवा निळ्या रंगाचा टेम्पो , बाजारपेठांमधील छत्री घेऊन गडबडीने जाणारी माणसे ,पांगारी , तायघाट  गावाजवळची व सिडनेपाईंटच्या परिसरातील कृष्णाव्हॅलीतील घरे .भाताच्या शेतीसाठी तुंबवलेली छोटी छोटी शेततळी , दरीवर ढगांचा तयार झालेला राक्षसासारखा मानवी आकार किंवा वेगवेगळे प्राण्यासारखे दिसणारे भव्य आकार चित्रातून दर्शवताना मजा यायची .आकाशात चाललेले  धुके व ढगांच्या वेगवेगळ्या आकाराचा हा नयनरम्य खेळ बराच वेळा जाणीवपूर्वक निरीक्षण करताना मी तहानभूक विसरून जायचो .
         महाबळेश्वरला तर धुक्याचेच साम्राज्य सगळीकडे पसरले की चित्रातही ग्रे कलरचे आकाश यायला लागायचे . एकदा मित्रासोबत एलफिस्टन पॉईंटला गेलो होतो पण आकाशात ढगांचे इतके मोठमोठे पुंजके , धुकेच धुके पसरले की जणू पृथ्वीवरच संपूर्ण आकाश उतरले की काय ? असे वाटू लागले . पुढे असणारा रस्ताही दिसेनासा होतो .
ऑर्थरसीट पॉईंटच्या दरीतून निळ्या ,जांभळ्या ढगांच्या कापसासारख्या हळुवार लाटा पाहिल्या की आपण स्वर्गातून खाली दिसणारा अनोखा जादूचा खेळ पाहतो की काय असे वाटते .केटस् पॉइंट ,लॉडविक पॉईंट ,वेण्णा लेक व इतर पाईंटचा परिसरही मला चित्र काढण्यासाठी नेहमी प्रेरणादायी ठरतो .
          वाईला अधून-मधून जोराचा पाऊस पडतो त्यावेळी गणपती घाट , गंगापुरीचा घाट व धोम धरणाचा परिसर एका वेगळ्याच कलर स्कीममध्ये पावसाळ्यामध्ये चित्रात दाखवता येतो .
          कोकणात जाताना ताम्हिणी घाटातील धबधबे , समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा , आकाशातील ढगांचे रौद्ररूप , कोळी व त्यांच्या बोटी , त्या बोटींवरचे वेगळ्या रंगातील झेंडे ,उन्हाने चमकणारे समुद्रकिनारे ,कोळ्यांच्या जाळी फेकण्याच्या ,बोटी ढकलतानाच्या हालचाली मला पावसात चित्रे काढण्यासाठी प्रोत्साहित करतात .
         महाबळेश्वरचा  लिंगमळ्याचा धबधबा , भिलारचा वॉटरफॉल ,पोलादपूर महामार्गावरचे धबधबे डोंगर कपाऱ्यांवरून पडणारे पाणी पाहिले की मला आपण माणसे निसर्गापुढे किती छोट्या उंचीचे व खुजे व्यक्तिमत्वाचे आहोत याची प्रकर्षाने जाणीव होते .
           पाऊस मला आवडतो त्यामागे आणखी एक खरे कारण आहे .
ज्यांच्या सोबत मी बालपणी लहानाचा मोठा झालो ते माझे सख्खे तीनही मित्र आता माझ्यासोबत नाहीत .काळाने तिघांच्याही बाबतीत मोठा विचित्र आघात करून तिघांचेही निधन झाले . माझ्यावर नितांत प्रेम करणारी स्वातीची आई या जगातून निघून गेली .माझ्या काळजाचा तुकडा असलेली माझी एकुलती एक छोटी मुलगी  ' दिशा ' आम्हाला दिशाहीन करून कायमची पैलतिरी गेली .
           ज्या जवळच्या मित्रांनी फसवले, अगदी जवळच्या नातेवाईकांनी संकटकाळात माझ्याकडे पाठ फिरवली , माणसांच्या वाईट व्यवहारामुळे ,
कृत्यांमुळे कधीकधी मला जीवन नकोसे झाले , माझे मन उदास व सैरभर झाले . माझे आर्थिक ,शारीरिक ,मानसिक ,
नुकसान झाले .त्यांच्या दिलेल्या वेदनांमुळे , दुःखामुळे अनेकदा अचानकपणे डोळ्यात अश्रू येतात .
         जी जवळची माणसे मला आता कायमची दूर सोडून गेली त्यांच्या आठवणींनी माझे मन गदगदून , गलबलून ,गहिवरून येते आणि डोळ्यात  पुन्हा खूप अश्रू तयार होतात . या सगळ्या दुःखदायक घटना मी दरवर्षी पूर्णपणे विसरून  जातो व परत नव्या दमाने , नव्या जोशाने पुन्हा पावसात भिजतो आणि मनातला पाऊस चित्रामध्ये रंगविण्यास सुरवात करतो . तुम्ही देखील तसेच करा सगळ्या वाईट आठवणीनां मनातून  हद्दपार करून नव्याने पावसात भिजा नव्याने पुन्हा पाऊस अनुभवा मग परत नव्या आशा ,नवी उमेद व नवीन चित्रे रेखाटण्यास मनाला प्रेरणा मिळेल.

मला पाऊस आवडतो , कारण मी एकटाच पावसात फिरताना  वाहणारे डोळ्यातील हे अश्रू कोणालाही दिसत नाहीत .

पावसाच्या पाण्यात  डोळ्यात आलेले हे अश्रू पावसातच पुन्हा वाहून जातात .
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
पावसाच्या पाण्यात  डोळ्यात आलेले हे अश्रू पावसातच पुन्हा वाहून जातात .
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

* म्हणून मला मनातला  पाऊस चित्रात रंगवायला खूप खूप आवडतो .*

सुनील काळे
9423966486

जगण्याचे " स्टॅन्डर्ड " समजलेला माणूस- प्रा . डॉ . ज्ञानदेव झांबरे सर************************        पाचगणी हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शैक्षणिक केंद्र आणि थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे . ब्रिटिश काळापासून वेगवेगळ्या लोकांनी स्वधर्मियांसाठी शाळा सुरु केल्या . त्यामुळे येथे त्रेचाळीस शाळांमध्ये अठरापगड जातींचे लोक एकत्रित रहात असल्याने येथे कॉस्मोपोलीटन संस्कृती आहे . पाचगणी शहर छोटे असल्याने बहुभाषिक वेगवेगळ्या प्रांतातील मंडळी छानपैकी एकत्रितपणे राहतात . अशा या गावात माझे बालपण गेले . दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि चांगले मार्क मिळाले म्हणून अकरावीसाठी कॉलेजचा शोध सुरु झाला . त्याचवर्षी वाईला किसनवीर महाविद्यालयात नव्याने सायन्स कॉलेज सुरु झाल्याचे कळाले . BSc डिग्री मिळण्याची चांगली सोय झाली होती . त्यामुळे घरच्यांनी मला अकरावी सायन्सला प्रवेश घेण्यासाठी फोर्स केला . मी मात्र नाराज झालो होतो कारण माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले होते व सायन्सचे विषय इंग्रजी माध्यमात शिकवले जाणार होते . इंग्रजीची माझी खूप आबाळ झाली होती कारण सातवीपर्यंत आम्हाला इंग्रजीचे शिक्षकच नव्हते . इंग्रजी , गणित , सायन्स या विषयाची तर माझी कुडंली कधी जमलीच नव्हती पण त्याकाळी उलट उत्तर देण्याची प्रथा नव्हती त्यामुळे मी मुकाटपणे वाईला सायन्स कॉलेजला रोज एस.टी बसचा पास काढून येऊ लागलो .       सायन्सच्या या वर्गात शिक्षक मला काय शिकवत होते याचे मला भान नव्हते कारण मला इंग्रजी भाषाच समजत नव्हती . चाळीस पन्नास विद्यार्थी असल्याने मागच्या बेंचवर बसायला लागलो आणि मला एक नविन छंद लागला . मी चित्रे काढायला लागलो . माझ्या मित्रांची , शिक्षकांची , प्राण्यांची , वनस्पतींच्या जर्नलमध्ये आकृत्या काढणे मला आवडू लागले . कधी कधी मी वाईच्या बसमधून पसरणीघाटात उतरायचो . या घाटातील वळणदार रस्ते , दुतर्फा असलेली वडाची झाडे , पांडवगडाच्या पायथ्याच्या सभोवतालची छोटी छोटी चमकणारी भातशेती , ऊन पावसाचा खेळ , संध्याकाळची सुर्यास्ताची रंगउधळण , वाईच्या गणपती मंदिराची , वेगवेगळ्या घाटाची चित्रे मी जलरंगात उतरवू लागलो . थोडक्यात मला चित्रकलेची फारच आवड निर्माण झाली होती . चित्रकार होण्यासाठी लागणारी इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा मी बारावी सायन्सला असताना दिली व त्यामध्ये मला 'अ 'श्रेणी प्राप्त झाली होती .       चित्रकलेचे वेड इतके वाढले की मी सकाळी सहा वाजताच थंड हवेत चित्र काढायला जायला लागलो . टेबललॅन्डच्या पठारावर तर कधी सिडनेपाँईटच्या उंच चौथऱ्यावर बसून मी धोमधरणाचे पाणी ,कृष्णा व्हॅलीतील डोंगररांगा , कधी पांगारी तायघाट जवळच्या पारसी पॉईंटची चित्रे रेखाटू लागलो . आणि अचानक माझ्या लक्षात आले मला अतिथंड हवेत सकाळी फिरल्याने सर्दीचा त्रास सुरु झाला आहे . ऑक्सिजिन घेण्यासाठी दोन्ही नाकपुड्या बंद झाल्याने श्वास घेणे मुश्कील झाले आहे . डॉक्टरांनी माझे ऑपरेशन करून नाकातील वाढलेले पॉलीप्स काढावे लागतील यासाठी तातडीने ॲडमिट केले . नाकाला मोठे बँडेज बांधूनच मी 12वी सायन्सची प्रॅक्टीकल परिक्षा दिली होती . त्यानंतर  पुण्याला चित्रकलेच्या अभिनव कॉलेजला मी गेलो . चित्रकार झालो व परत पाचगणी महाबळेश्वरचा निसर्ग रंगवू लागलो होतो . थंड हवेत वेळीअवेळी सतत डोंगररांगावर भटकंती केल्याने माझा नाकाने श्वास घेण्याचा त्रास आणखीनच वेगाने वाढू लागला . डॉ. प्रशांत पोळ यांनी वेगवेगळ्या वर्षी चारपाच वेळा माझे ऑपरेशन केले आहे . एकंदरीत मला थंड हवेची ॲलर्जी झाल्याचे सिद्ध झाले व डॉक्टरांनी 2014 साली मी पाचगणी सोडावी लागेल असे निक्षून सांगितले . मला माझे पाचगणीचे बस्तान सोडून  कायमचे  वाईला यावे असे त्यांनी सांगितले व नाईलाजाने मी काही दिवस वाईला राहण्याचे ठरवले .          वाई कॉलेजचे प्राध्यापक असलेले माझे मित्र श्री .पटकुरे सर यांनी मला सह्याद्रीनगर या परिसरात बोलावले . थोडी चर्चा केली तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की त्यांच्या सोसायटीत " प्रज्ञाअमृत " नावाचा एक बंगला आहे . त्याचे मालक श्री .व सौ झांबरे दोघेही शिक्षक आहेत . त्यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर पाच खोल्यांचे घर भाड्याने मिळते . तेथे काही दिवस राहून वाईच्या परिसरातील चित्रे काढावीत . हवा बदलाने तब्बेतीवर काय परिणाम होईल हेही कळेल व एखादी जागा आवडली तर घर बांधण्यासाठी वाईत एन ए प्लॉट घ्यावा या उद्देशाने मी त्यांच्या घरी आलो .         सहयाद्रीनगरात असलेला " प्रज्ञाअमृत " अतिशय मेंटेन केलेला ,फुलझाडे असलेला सुंदर बगीचा व पार्किंगची सोय असलेला बंगला बघताक्षणीच मला आवडला . बंगल्याच्या पाठीमागे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी स्वतंत्र जीना होता . आतमध्ये सर्व नीटनेटकेपणा होता . खिडक्या दरवाजानां पडदे लावलेले होते . आम्ही दोघेही चित्रकार असल्याने चित्रकाम करण्यासाठी व राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होती . झांबरेसर , झांबरेमॅडम व त्यांची मुलगी मृणाल हे तीनच माणसे खाली रहात होते . त्यांचा मोठा मुलगा प्रणव शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला होता . पहिल्या भेटीतच आमची छान ओळख झाली व लगेच प्राथमिक बोलणी करून मी एका आठवड्यात पाचगणीवरून वाईला शिफ्ट झालो . सर व मॅडम दोघेही स्वच्छताप्रेमी होते . त्यामुळे मी रोज मॉर्निंगवॉकला वाकेश्वरला जाताना पाहायचो झांबरे सर स्वतः साफसफाई करायचे , कुंड्यांना पाणी घालणे , झाडांची निगा राखणे ,खतपाणी देणे . पूर्ण आवार पाण्याने स्वच्छ धूवून काढायची त्यांनां आवड होती . आम्ही कधीतरी समोरासमोर भेटलो की अनेक विषयांवर गप्पा मारायचो . वाईत राहण्याचे फायदेतोटे तपासून पहायचो . येथील परिसराचा माणसांचा स्वभाव व आचरणांवर चर्चा करायचो . नवनव्या जागा शोधायची आता सवय लागली होती . त्याचा आढावा घेताना झांबरे सर मनापासून प्रतिक्रिया द्यायचे .       " प्रज्ञाअमृत " या बंगल्यामध्ये रहात असताना एक घडलेला प्रसंग मला आजही लक्षात आहे व आयुष्यभर पुढेही कायम लक्षात राहील . एकदा रविवारी सुट्टीचा दिवस होता . साधारण नऊ दहा वाजताची वेळ असेल . आमची घरकाम कारणारी बाई आज येणार नव्हती त्यामुळे दोघेही निवांत पेपर वाचत बसलो होतो . आणि शेवटच्या दूरच्या खोलीतील अचानक कोपऱ्यातील किचनसिंकचा का वॉशबेसीनजवळचा नळ अलगद तुटून पडला होता . पाईपलाईन उघडी झाली आणि वेगाने पाणी रूममध्ये पसरु लागले होते . आम्ही विरुद्धदिशेच्या बाजूला असल्याने काही आवाजच आला नाही . हळूहळू पडणाऱ्या पाण्याने ती रुम भरून गेली होती आणि अचानक खालून झांबरे मॅडम व सर दोघेही वरच्या मजल्यावर आले .त्यांनी घराची बेल वाजवली आणि त्यांच्या लगेच लक्षात आले की शेवटच्या खोलीतून पाणी जवळपास चारपाच इंच भरून दुसऱ्या रूममध्ये पाणी पसरू लागले होते . झांबरे सरांनी लगेच प्लंबरला फोन लावला येताना नवीन नळ घेऊन यायला सांगितले . पटकन टेरेसवर जावून मुख्य पाईपलाईन बंद केली . इतक्यात झांबरे मॅडम पटकन खाली गेल्या , येताना त्यांनी फरशी पुसण्याचा रबरमॉप व चारपाच फरशी पुसण्याचे जाड कपडे घेऊन एक बादली आणली . त्यांची मुलगी मृणाल देखील मदतीला आली . इकडे बनियन व लुंगी घालून निवांत बसलेले झांबरे सर गुडघ्यापर्यंत लूंगी गुंडाळून पटकन फरशीवरील पाणी बादलीत भरू लागले . झांबरे मॅडम यांनी लगेच साडीचा पदर खोचून मॉपने पाणी बाहेर टाकायला सुरुवात केली . मग आम्ही दोघेही त्यांच्यामध्ये सामील झालो व सर्व जणांनी रुममध्ये साचलेले पाणी काढून तासाभरात सगळा बंगला चकाचक केला . नंतर प्लंबर आला त्याने नवीन नळ बसवला .आता तुम्ही म्हणाल यात आश्चर्याची गोष्ट काय ? तर आम्ही झांबरे सरांचे भाडेकरू होतो . पाण्याचा नळ दुरुस्त करून रुम साफसफाई करण्याची जबाबदारी आमची होती . ते घरमालक होते . उच्चशिक्षित पी एच डी झालेले कॉलेजचे प्राध्यापक होते . मॅडम एम एस सी व जॉय स्कूलच्या उपप्राचार्या होत्या . एकदा घर भाड्याने दिले की त्याची देखभाल करण्याची जबाबदारी भाडेकरूचीच असते . त्यादिवशी दुपारी आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि तो प्रसंग एन्जॉय केला . कोणीही कसलीही तक्रार झाली नाही . दोन चार महिन्यातच आम्ही " प्रज्ञाअमृत " बंगला सोडला . नवीन जागा घेतली तेथे मोठे अपयश आले . नंतर मग आमचा मेणवली गावाजवळ " निसर्ग " नावाचा बंगला तयार केला . मागच्या वर्षी तेथे " निसर्ग आर्ट गॅलरी " नावाने चित्रप्रदर्शनही भरवले होते . अनेक वेगवेगळ्या जिल्हयातील , तालुक्यातील पर्यटक प्रदर्शन पाहण्यासाठी येत होती . एकदा किसनवीर कॉलेजचे प्रा. श्री रमेशचंद्र बारगजे सरांनी फोन केला की त्यांच्या कोल्हापूरच्या 1973 सालच्या एम .एस .सी बॅचचे क्लासमेटस यांचे वाई येथे गेटटुगेदर आयोजित केले आहे त्यावेळी तुमची निसर्ग आर्ट गॅलरी पाहायला सर्वजण येणार आहेत . धोमचे मंदिर पाहून सर्व गाड्या निसर्ग आर्ट गॅलरी पाहण्यासाठी गेटपर्यंत आल्या . त्यानां पार्कींगची जागा दाखवत होतो त्यावेळी एक गाडी मात्र गेटपासून दूर थोड्या अंतरावर उभी राहीलेली पाहीली . बारगजे सरानां ती गाडी बाहेर का थांबली म्हणून विचारले तर सरांनी कपाळावर हात मारून घेतला . मला म्हणाले काय बोलू आता ? ती गाडी तुझ्या सख्या चुलत व मावसभाऊ असलेल्या हनुमंत काळे यांची आहे . तो आमच्या बॅचचा सर्वात अतिशय हुशार विद्यार्थी होता . युनिव्हरसिटीत प्रथम आला होता . त्याला आम्ही सांगितले चित्रकार सुनील काळे तुझा भाऊ आहे . त्याने वाई ,पाचगणी महाबळेश्वर या परिसरातील असंख्य अप्रतिम चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत , त्याची मिसेस चित्रकार स्वाती काळे हिने असंख्य फुलांची तैलरंगात चित्रे काढलेली आहेत . उत्तम चित्रप्रदर्शन आहे . तुमची तीस वर्ष झाली भेट झालेली नाही तर तुम्ही आता जरूर भेटा व प्रदर्शनही पहा . पण तुझा भाऊ गाडीतून उतरायला तयार नाही त्याचे कुटुंबीय गाडीतच बसून आहेत .ते म्हणतात आम्ही भावकीत जात नाही कारण आमचे " स्टॅन्डर्ड " मोठे आहे . मी मोठ्या कंपनीत ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर होतो . तो साधा चित्रकार आहे त्याची माझी तुलना होऊ शकत नाही . तुम्ही सगळे प्रदर्शन पाहायला जा आम्ही बाहेर रस्त्यावर गाडीत बसून राहू . तो एक तास बाहेर थांबला पण घरात आलाच नाही . खरे तर हा हनुमंतदादा आता हेमंत नाव लावतो . कारण आईबापाने ठेवलेले हनुमंत हे नाव त्याला आवडले नाही . अतिशय गरिबीतून त्याला शिक्षण दिले होते .स्वतःच्या कर्तबगारीने तो उच्चपदावर पोहचला त्याचे उच्चशिक्षित मुलीबरोबर लग्न झाले पण लग्नानंतर व अगोदर नोकरी करत असतानाही या दादाने कधीच कोणत्याही भांवडाला जवळ केले नाही . कोणत्याही नातेवाईकांकडे ते फिरकले नाहीत . कोणाशी कसलाही संबंध ठेवला नाही ,कोणालाही मदत केली नाही . संपूर्ण कुटुंबाला दूर ठेऊन दादा मोठा स्टॅन्डर्डवाला झाला . आमचा दादा कसा दिसतो हे मला पाहण्याची उत्सुकता होती . कारण तो माझ्यापेक्षा पंधरावीस वर्षांनी मोठा होता . पण " स्टॅन्डर्ड "आडवे आले . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात . शिक्षणामुळे माणूस विचारवंत होतो त्याच्या ज्ञानाच्या कक्षा उचांवतात . त्याचे जीवन सुखकर व समृद्ध होतेच पण त्याच्यां विशाल छायेत अनेकानां संजीवनी मिळते . उच्चशिक्षित भावाने मात्र आमच्या सर्वांसाठी त्याचे दरवाजे मात्र कायमचे बंद केले होते . उच्चशिक्षणाचा मला तेथे काहीच उपयोग झालेला दिसला नाही . इथे मला पीचडी झालेले उपप्राचार्य झांबरे सर आठवतात . उपप्राचार्या झांबरे मॅडम आठवतात . स्वतःच्या भाड्याने राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाशी प्रेमाने सुखदुःखाची विचारपूस करत असत . ते दोघेही स्वतःचे " स्टॅन्डर्ड "कधी गोंजारत बसले नाहीत .  सामान्य माणसासारखे राहून दोघेही असामान्य कामे करत राहीली . जॉय स्कूल व किसनवीर विद्यालयातील विद्यार्थी घडवताना आपल्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांला घडवण्याचे . " स्टॅन्डर्ड " काम त्यांनी आयुष्यभर केले व त्याचा गर्वही कधी केला नाही . जीवन जगण्याचे खरे " स्टॅन्डर्ड " त्यांनां कळले आहे म्हणून माझ्या त्या अतिउच्चशिक्षित एम एस सी फर्स्टक्लास झालेल्या अडाणी भावापेक्षा झांबरे पती पत्नींविषयी मला आदर वाटत आहे .     महिन्यापूर्वी एकदा झांबरे मॅडमचा मला फोन आला . त्यांनी विचारपूस केली व त्या जॉय स्कूलची नोकरी सोडून पुण्यात नातवाचा सांभाळ करण्यासाठी पुण्यात रहात असल्याचे सांगितले . मुलगा सिव्हील इंजिनियर व सुनबाई पेशाने सरकारी वकील असल्याने दोघेही कामात व्यस्त झाले मग मुलाकडे लक्ष कोण देणार ? म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला . आणि ते ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . माझी आर्ट गॅलरी होती . ती सांभाळताना माझी तीन वर्षाची मुलगी सांभाळण्यासाठी मी आईवडीलानां विनंती केली तर त्यांनी नकार दिला . गावाकडे शेतीची कामे असतात त्यामुळे तुमची मुलगी तुम्हीच सांभाळा असे उत्तर आईने दिले . शेवटी आमच्या संघर्षाच्या लढाईत मुलगी देवाघरी गेली . ती वारली त्यावेळी मी माझ्या मेव्हण्याला सत्यजितला फोन केला . तो म्हणाला मी अत्यंविधीला येऊ शकणार नाही . तो देखील Phd झालेला आहे . अतिउच्चशिक्षित आहे . त्याला भाचीच्या अत्यंविधीला जाण्याची गरज वाटली नाही . बहिणीला कठीण स्थितीत आधार देण्याची आवश्यकता वाटली नाही आणि पुढे आता सत्तावीस वर्ष झाली तरी त्याला आमची कधीच आठवणही झाली नाही . काय उपयोग त्या डॉक्टरेटचा ? जिथे माणूस माणसाला ओळखत नाही .मोबाईल ,फोन , लॅपटॉप आले तंत्रज्ञान वाढले तरी मनाची आढी मात्र कायम राहीली .कधी त्याच्या कुटूंबाने संपर्कच केला नाही कारण "स्टॅन्डर्ड " आडवे आले .त्यावेळी खऱ्या अर्थाने एकटे जगायला शिकलो . अशावेळी झांबरे मॅडमचा त्याग मला प्रेरणा देणारा वाटतो . मुलांविषयची माया त्यांच्या कृतीतून दिसते .इकडे सरांनां रिटायर्ड होण्यापूर्वी खानावळीत जेवण करावे लागले . काही महिने एकटेपणा स्विकारावा लागला . पण त्यांनी कधीही त्याची तक्रार केली नाही . कॉलेजमध्ये त्यांनी अनेक कार्यक्रमात स्वतःला झोकून दिले . त्यांच्या कॉलेजच्या कारकीर्दीची मला जास्त माहिती नाही पण त्यापेक्षा माणुसकी जपणारे , कुटुंबाला जपणारे , अभिमान नसणारे , मोठेपणाचा त्याग केलेले गार्डनमध्ये स्वच्छता करणारे डॉ झांबरे सर मनाला फार भावले . त्यांच्या मुलाचे लग्न ठरले त्यावेळी प्रणवच्या लग्नाला आम्ही दोघेही गेलो होतो . लग्नकार्यालय पूर्णपणे भरून गेले होते प्रचंड गर्दी होती तरीही झांबरेसरांनी आम्हाला बरोबर पकडलेच . शाल श्रीफळ देऊन योग्य मानसन्मान केला त्यावेळी मला या झांबरे कुटूबांचेखरे " स्टॅन्डर्ड " कळाले . वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य नामवंत लहानमोठ्या माणसांनी संपूर्ण हॉल भरून गेला होता . काय असते स्टॅन्डर्ड ?? तुम्ही जगत असता त्यावेळी त्या तुमच्या जगतानाच्या काळात असंख्य माणसे भेटतात . त्यातील काही माणसे चांगली वागलेली असतात काही वाईट वागलेली असतात . पण शेवट काय असतो ? तुमच्या जगण्याला कधीतरी मर्यादा येतेच . कधीतरी शरीर थकते व तुम्हाला अंतिम श्वास घ्यावा लागतो . त्यानंतर कोणत्यातरी स्मशानघाटाजवळ तुमची राख होते ती राख पाण्यात मिसळते तुमचे अस्तित्व संपते . जग काही दिवस तुमची आठवण काढते नंतर तुमची कोणी आठवणही काढत नाही . तुमचे " स्टॅन्डर्ड " काही असो शेवटी तुमची राखच होते . हे ज्यानां समजते त्यांचे भावविश्व वेगळे असते . ते कायम हसतमुख असतात . ते त्यांच्या कृतीतून त्यांचे वेगळेपण जोपासत असतात .अनेकानां त्यांचे जगणे प्रेरणा ठरत असते .असे जीवनाचे खरे " स्टॅन्डर्ड " कळालेले झांबरे सर मला आवडतात . काही महिन्यांपूर्वी अचानक आमच्याकडे घरकाम करणाऱ्या बाई व माळीकाम करणारा त्यांचा मुलगा या दोघांनी आमचे काम सोडले. काही दिवस आम्ही वेगवेगळी माणसे शोधली पण त्यांच्या पगाराच्या अपेक्षा जास्त असल्याने जुळले नाही . मग झांबरे सर पुन्हा आठवले . Phd झालेला माणूस स्वतः झाडलोट करतो , बागेची निगा राखतो तर आपण का लाजायचे ? त्यांच्यापासून प्रेरणा घेतली . आता मी बागकामात तरबेज झालोय बागेत शेतात काम केल्यामुळे आरोग्यही चांगले राहते याचा शोध लागला . आपण कोणावर विसंबून राहायचे नाही काम करत राहायचे हेच खरे " स्टॅन्डर्ड " झांबरे सरांकडून मी शिकलो . खरी डॉक्टरेट तीच आहे . मे महिन्यात ते आता रिटायर्ड होतील . अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या सरानां व झांबरेमॅडम या दोघांनाही उर्वरीत रिटायर्ड आयुष्य सुखसमृद्धीचे आनंदाचे जावे त्यांच्या मनासारखे जगताना उत्तम आरोग्य प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना व मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !चित्रकार - सुनील काळे✍️9423966486निसर्ग आर्ट गॅलरी [वाई]