गुरुवार, २ नोव्हेंबर, २०२३

दामू

*दामू* 
☀️☀️
          दामुअण्णाचे खरे नाव अरुण मारुती  काळे, पण त्याला दामू का म्हणायचे याचा मला कधीच उलगडा झाला नाही. तो आमचा चुलत भाऊ होता .त्याचे वडील मारुतराव  पूर्वी महाबळेश्वर मध्ये राहात असत.  हे उत्तम  कारागीर तर होतेच पण त्याहीपेक्षा सर्वात उत्तम देवाची हरिभजने म्हणणारे होते, त्यांच्या  भजनात हृदयाला हात घालण्याची ताकद होती. पांडूरंगाला , विठ्ठलाला ते इतकी भावपूर्ण साद गाण्यातून मारायचे की ऐकणारा भारावून जायचा त्यात तो स्वतःला  विसरून जायचा. खूप सुरेख आवाजात काही स्वनिर्मित तर काही जुन्या गाण्यांच्या तालावर ते मराठी भजने स्वतः करत.  मग श्रावणात असो वा कोणाच्या अंतिम  विधीला, यांच्या भजनाचा कार्यक्रम हमखास  असे. अंत्यविधीच्या अगोदर कोणताही पाषाणहृदयी माणूस असला तरी त्यांचे भजन ऐकले की त्या माणसाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा आपोआप   सुरू व्हायच्या. त्यामुळे अंत्यविधीचा कार्यक्रम प्रभावी व्हावा आणि  दुःखाची निर्मिती व्हावी म्हणून मारुतरावांना भजनासाठी हमखास मागणी असे. त्यांची ,लहान असताना ऐकलेली काही भजनं आजही माझ्या मनात रुंजी  घालून आहेत, आठवणीत आहेत . 
         मारुतरावांना एकूण चार मुले ,त्यातील   अरुण हा पहिला मुलगा.  पहिला   मुलगा पाहून  ते आनंदले असतील, पण मुलाच्या जन्मानंतर थोड्याच वेळात त्यांचा आनंद मावळला असेल. कारण अरुण जन्मताच डोक्यावर पडल्यासारखा होता. पुढे दिसायला अतिशय साधारण,  बोबडे बोलणारा,   असंबद्ध बोलणारा त्याला कोणतीही भाषा नीट समजत नव्हती, केस वाढलेले, गालफड फार दबलेली, दात पुढे आलेले, वर्णही काळसर ,चालताना तिरका ,आडवातिडवा झोकांड्या देत जाणारा, आपण काय करतो, काय बोलतो, कसं खातो हे त्याला कळतही नव्हतं, आणि वळतही नव्हतं .खाताना सगळी लाळ तोंडातून टपकत असे, पदार्थ तोंडातून बाहेर पडत. झोकांड्या देत जाणारा, मेंदूचा कंट्रोलच नव्हता जणु त्याच्यावर, मेंदूच्या सगळ्या वायरी जणू उलट्या सुलटया चुकल्या सारख्याच जोडलेल्या होत्या. मारुतरावांनी त्याला शाळेत पाठवला.  पण दोनचार दिवसातच त्याच्या मास्तरांनी त्याला घरी पाठवला. कारण त्याला शाळेतले काहीच कळत नव्हते . इतकी सुरेल भजने म्हणणारे, देवाची आराधना करणारे मारुतराव त्यामुळे  पार बिघडले आणि  बिथरले. खूप मारलं, ओरडलं, झोडपलं, गदगदून हलवलं तरी  अरुण सुधारलाच नाही. त्यामुळे मारुतराव खूप निराश होऊन खूपच दारूच्या व्यसनाधीन झाले. मग त्यांच्या भजनात दुःखाची अर्तता आता  आणखीनच वाढली.  खूप करुणापूर्वक अंतःकरणातून त्यांची भजने यावयाची व गावकऱ्यांच्या हृदयाला  भिडायची. त्यांचा एक ग्रुपच त्यांनी बनवला होता.  व ते भजनी मंडळ खूप प्रसिद्धही  झाले होते .पण देवाची भजनं म्हणूनही देवाने त्यांच्याबाबतीत जो हात आखडता घेतला हे पाहुन ते हळूहळू खोल दारूच्या नशेत व्यसनाधीन झाले व पुढे  मारुतराव एक दिवस संपले , मग अरुणचा *दामू* झाला, पुढे तोपर्यंत अरुणची आई, त्याचा सर्वात धाकटा भाऊ सुभाष, नंतर सुरेश, हेही दारूतच संपले. आणि त्यांची आर्थिक ,स्थितीही पूर्ण ढासळली .
        एकदा महाबळेश्वरला मार्केटमध्ये मी मित्रांसोबत  फिरत होतो ,त्याने मला लांबूनच बरोबर ओळखले . तो लगबगीने माझ्या मित्रांजवळ  सर्वांसमोर आला. अतिशय गचाळ फाडलेले कपडे, कित्येक दिवस न धुतलेले, पायात चप्पल नाही,  झोकांड्या जात होत्या  म्हणून हातात काठी घेतलेली. कित्येक दिवस अंघोळ न केल्यामूळे केसांच्या जटा वाढलेल्या ,त्याच्या तोंडातून लाळ टपकत होती .हे पाहून व त्याची असंबधपणे माझ्या नावाची  बडबड चालू असलेली पाहून  मला खूप लाज वाटली, दया देखील आली, पण मित्रांसमोर मी त्याला ओळख दाखवली नाही. तो माझ्या मागोमाग यायला लागला, वेडसर  मनोरुग्णासारखा तो वागत होता. त्याला सर्व माणसं मात्र बरोबर समजायची, त्यां सर्वानां नावानिशी ओळखण्याची स्मरणशक्ती कशी होती हे कोडे मात्र आजही  मला उलघडत नाही.
         एकदा तर त्याने रस्त्यावरच बूट पॉलिशचेच दुकान मांडले. आपल्या ओळखीच्या माणसाच्या पायात बूट दिसताच तो त्यांच्या मागोमाग धावायचा व पॉलिश करण्यासाठी त्या माणसाचा पाय पकडायचा  धावपळ करून हैराण करायचा. एकदा बूट पॉलिश साठी तो माझ्या पाठोपाठ धावायला लागला मी वेगाने पळालोच. व मग मात्र त्याला  मी पूर्णपणे टाळू लागलो . मला त्याची घृणा वाटू लागली होती .
     दामू पुढे आमच्या मूळगावी पांडेवाडी येथे भावासोबत राहू ,लागला. आईबाप नसल्याने व पुढे भाऊही गेल्यामूळे  त्याच्या दुर्दशेत आणखीनच भर पडली. त्याची परिस्थिती आणखीनच बिकट झाली. त्याची भावजय पुतण्या व त्याचे कुटूंबीय त्याला गावी  सांभाळायचे .तो सगळीकडे भटकत रहायचा, हळूहळू त्याचे वय पन्नास पंचावन्नच्या पुढे गेले असावे. गावात फिरताना कोणी त्याला भाकर तुकडा द्यायचा. त्याची वहिनी पुतण्या व इतर जण शक्य तितके त्याला खाऊपिऊ घालायचे, त्याचे सर्व करायचे तरीही  येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना तो अधाशीपणे खायला मागायचाच, तर कधी  पैसे मागायचा. तो प्रचंड असमाधानी .. असल्याने , व त्याच्या विचित्र गबाळ्या अवतारामूळे मी मात्र त्याला   पूर्णपणे टाळायचो, बोलायचो नाही, आणि ओळखही दाखवायचो नाही.
        परमेश्वर किंवा आकाशातील बापाचा मला कधीकधी  खूप म्हणजे खूपच राग येतो. त्याने एखाद्याला जन्म देताना  इतकी नाराजी का दाखवावी ? चेहरा, रूप, शिक्षण, कला, उदरनिर्वाहाचे साधन नाही, पण निदान सामान्य माणसासारखे जगणेही एखाद्याला देऊ नये म्हणजे काय?शिवाय मारूतराव इतकी सुमधूर भजनं म्हणत असताना अशी उपेक्षा का करावी  या विश्व निर्मात्याने , आपणाला बनविलेल्या या अजब कलाकृतीला   स्वतः दामूही कंटाळला असावा . आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही, कोणी बोलत नाही, जवळ करत नाही हे त्याला कळत असावे. मग तो  गावच्या देवळाशेजारी पायरीवर काठी  टेकून बडबड करीत बसायचा व ओळखीच्या नजरेने, विदीर्ण चेहऱ्याने, विषण्ण मनाने,  खोल नजरेने ,एक टक कोणाची तरी  वाट पहात  पडून रहायचा. सर्वांकडे अपेक्षेने आणि अन्नाच्या आशेने पहायचा. खायला मिळाले नाही तरी त्याहीपेक्षा कोणी ओळखीचा माणूस आला की त्याला प्रचंड उर्जा यायची  त्याचे डोळे चमकायचे,उत्स्फूर्ततेने उठून धडपडत उभा रहायचा,  त्याच्या मागे मागे धावायचा, बोलायचा प्रयत्न करत राहायचा, लहान मुलांना जवळ घेण्याचा प्रयत्न करायचा, पण त्याच्या अवताराकडे पाहून कोणी सुधारलेली मंडळी त्याच्याजवळ मैत्री करण्याचा प्रयत्नही करायची नाही.लांबूनच लोक त्याच्याशी बोलायचे, गावातले  ,आळीतील लोकं उरलंसुरलं अन्न, कधी थोडे पैसे द्यायचे, पण तो सगळ्यांना नकोसा झाल्यासारखाच होता. तो प्रेमाचा भुकेला असावा आणि असं प्रेमाने आपल्याला कोणी जवळ करत नाही, कोणी स्वीकारत नाही, परिस्थितीमुळे गबाळेपणामुळे, आपल्याला सर्व जण टाळतात, हे त्याला पूर्णपणे  जाणवलं असावं. आपल्याला प्रेमाने जसं आहोत तसं  कोणी स्वीकारत नाही हे पाहून तो खूप निराश झाला असावा. आणि आपण कोणालाच नको आहे हेही त्याला कळले होते. 
       अशी परकेपणाची, एकाकीपणाची भावना माणसाला पार पोखरून टाकते .मनाला आणि शरीराला उदासीपणे विच्छिन्न करते, अंतःकरणाला .एक प्रकारचा संताप आणते, असं वाटतं जिवंतपणीच आपण आपल्या हृदयाचे तुकडे स्वतःच्या हाताने कापावेत आणि भिरकावून द्यावेत सगळ्यांसमोर, की आपण इतके दुष्ट आणि दुर्लक्षित अपमानित करण्यासारखे नाही. एकटेपण , एकाकी जीवन फार वाईट असतं,आजारपण ,
संकटे आणि वाईट परिस्थिती आली की आपली सख्खी असणारी माणसं सोडून देतात वाऱ्यावर, ओळख दाखवत नाहीत. साधा फोनही करत नाहीत . आपल्या जवळच्या माणसाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात, नजरेआड करतात त्याला . जणू त्याचा व आपला कधीच संबंध नाही व नव्हता असं वागू लागतात . तिथं मोठेपणा, स्टेटस, उच्चभ्रूपणा व स्वार्थ महत्त्वाचा असतो. जिव्हाळा ,माणुसकी , आपुलकी व स्नेहभाव संपलेला असतो . त्यांनी त्यांच्या आयुष्यातून आपल्याला कटाप केलेले असते . आणि ही नावापुरती सुकी नाती व आपुलकीच्या उणीवा पाहून, एकाकीपणाची ही भावना आयुष्य हळूहळू पूर्णपणे वाळवी सारखी पोखरूण टाकते . दाट काळ्या ढगांची चादर अंगावर घेऊनच मग प्रवास करावा लागतो . आणि ज्याचा त्याचा हा प्रवास  एकाकी एकट्यानेच संपवावा लागतो . फार वाट लागत असते हा प्रवास करताना . तिथं नाईलाजानेच सर्व मनस्तापाला स्विकारत रहावं लागतं.
         दामूने अखेर येथून जाण्याचा अंतिम निर्णय घेतला असावा. हा कंटाळवाणा प्रवास थांबविण्याचा निर्णयच त्याने केला असावा त्याने कोणाशीही बोलणे टाळले. आणि अन्न पाण्याचा त्याग केला . तो सतरा जानेवारीला शांतपणे कोणाशीही न भांडता कायमचा निघून गेला. आकाशातल्या बापाकडे जाब
विचारायला, की का मला धाडले अशी अवस्था करून ? काय मिळवलसं तू तुझ्या कृतीतून ? का अशा अवस्थेत साठ पासष्ट वर्ष मला जगायला भाग पाडलंस ?  पण तिथंही त्याचे कोणी ऐकले की नाही हे मला माहीत नाही. बहुधा ऐकलं नसावंच . अशा लोकांचे हाल ऐकणारे कोणी नसतेच .
        सतरा तारखेला सकाळी बारा वाजता पुतण्या योगेशचा. मला दामू गेल्याचा फोन आला. एक वाजता मी पांडेवाडीत पोचलो. दामूला मी अखेरचे पाहण्याची हिंमतच करू शकलो नाही. वाटलं दामू उठेल व माझ्याकडे दहा रुपये मागेल, आणि माझ्या मागोमाग ओळख दाखवत पाठीमागे येईल ,ओरडत मागे मागे येईल  पण मी मात्र माझ्या स्टेटसमुळे त्याला टाळून पुढे गेलो असतो. असे काही विचार मनात येत होते . आता तो पूर्ण शांत झाला होता .कोणाकडून प्रेमाची  कसलीच अपेक्षा नसल्याने तो खिन्नपणे ,निपचित निष्प्राणपणे पडून होता. निर्विकार  चेहऱ्याने अखेरच्या शेवटच्या अंतिम प्रवासासाठी सज्ज झाला होता .
          गावातील थोडीफार लोकं जमली होती. पण त्याच्यासाठी कोणी फार मोठा हंबरडा फोडला नाही. सर्वांना तो सुटला व बरे झाले अशीच भावना मनात येत होती. त्याच्या अंत्यविधीचा प्रवास अवघड दिसत होता. सगळे दुर्लक्ष करून टाळत होते  कोणीच पुढे येत नव्हते. त्याचे अंत्यविधीच्या सामानाचा खर्च कोणी करायला तयार नव्हते . अंत्यविधाची तयारी करायला कोणी पुढे सरसावतच नव्हते . पैशांचा प्रश्न निर्माण झाला होता . मग मात्र मला राहवले नाही.  आळीतील तीन माहीतगार गावकऱ्यांना सोबत गाडीमध्ये घेतले व मी तालुक्याच्या ठिकाणी वाईला सर्व सामान आणण्यासाठी निघालो . वखारीत जाऊन नऊ मण लाकडे घेतली, कुंभारवाड्यात जाऊन मडकी घेतली.हार, पांढरा पायजमा, सदरा , हार , फुले,कापड, कापूर, गुलाल इ. तिरडीचे अंत्यविधीचे सर्वच्या सर्व सामान स्वखर्चाने घेतले.  हे सर्व सामान कोठे विकत मिळते मला माहीत नव्हते त्याची नवीन माहिती मला मिळाली .एक मण  म्हणजे चाळीस किलो लाकडं . जगत असताना माणूस एकही झाड लावत नाही पण जाताना सरणासाठी तीनशे साठ किलो लाकडे घेऊन जातो, या नव्या ज्ञानात भर पडली. हे सर्व सामान घेऊन  परत पांडेवाडीला आलो.
         तोपर्यंत थोडी आणखी नातेवाईक मंडळी , आली होती. पन्नास साठ वर्ष आयुष्यभर ज्याचा प्रवास खडतर झाला, उपेक्षेने,तिरस्काराने, घृणतेने भरुन, झिडकारूनच झाला , त्याचा अंतिम प्रवास तरी सुखाने  व्हावा व त्यास हातभार लागावा हा माझा प्रयत्न मी माझ्या कृतीतून समाधानाने पूर्ण  केला होता .
         कारण मला खात्री आहे की मी इहलोकीचा प्रवास संपून ज्यावेळी वर आकाशात जाईल तेथे कदाचित दामू भेटेलच व माझ्या मागोमाग धावेल, ओळख विचारेल,पण आता म्हणेल, बरं झालं  निदान माझा शेवटचा प्रवास तू जरा सुखकर केलास. त्याचे उदास डोळे कृतार्थपणे माझ्याकडे पाहतील , व तो डोळ्यातूनच सांगेल मला आयुष्यभर काही दिलं नाहीस,पण माझा अंतिम प्रवासाचा शेवट तरी गोड केलास .
अखेर ओळख दाखवलीस भावा, खरंच ओळख दाखवलीस भावा.........
          मी दामूच्या अंतिम प्रवासासाठी  अंत्ययात्रेच्या  पाठीमागून निघालो पण तेथे पूर्णवेळ थांबलो नाही . तोपर्यंत पावणेसहा वाजले होते . माझा येथील रोल संपला होता .सहा वाजता आमचा एक पुर्वनियोजित कार्यक्रम लोकमान्य वाचनालय वाई येथे होता. 
          दामूच्या अंत्यविधीच्या विस्कटलेले आयुष्य कसे जगावे ? या कार्यक्रमानंतर चित्र कसे पहावे ? या माझ्या आवडीच्या कार्यक्रमात मी परत चित्रांच्या दुनियेत रममाण झालो. 
         दामूच्या आयुष्ययात्रेवरील घटनांचा आढावा घेतल्यावर मला आता माझ्याच वाट्याला हे अवघड त्रासदायक जीवन कसं आलं ?मी असले फालतू प्रश्न पडत नाहीत .आता मला शांत झोप लागते .( पूर्वीही शांत झोप लागायचीच पण आता जरा जास्त जाणीवपूर्वक शांतपणाची जाणीव होते )
            आता मला  नवनवीन माझ्या विषयी प्रश्न पडत नाहीत,आणि हो ,मला खूप खूप श्रीमंत ,जहागीरदार , मोठा उद्योगपती किंवा अंबानीपेक्षा ही मोठे, भारी आहोत असंच वाटायला लागले आहे . कारण त्याला बिचाऱ्याला सत्तावीस मजले असलेले घर सांभाळावे लागते . शिवाय एवढा मोठा उद्योग .मी मात्र निवांत झोपू शकतो . माणूस कितीही मोठा असला तरी मरताना सरणावर लाकडं मात्र नऊ मण लागतात . 
म्हणजे चाळीस गुणीले नऊ बरोबर तीनशे साठ किलो . गणित किती सोप्पं आहे आणि ते सगळ्यानां सारखंच लागू आहे याचा शोध मला लागला होता
          आपण किती नाराज असतो स्वतःवर आणि आयुष्यावर , मला हे मिळालं नाही , ते मिळालं नाही. ट्रॅफीकचा त्रास,  आवाजांचा त्रास , वन रुम किचन असेल तर टू रुम किचन नाही म्हणून त्रास, दुचाकी असेल तर चार चाकी नाही म्हणून त्रास , चार चाकी असेल तर मोठ्ठी नवीन मॉडेल  पाहीजे, बंगला असेल तर फार्महाऊस कधी मिळणार याचा शोध, शेजाऱ्यांचा त्रास, इतकेच काय ट्रॅफीक मध्ये एखादयाने जरा ओव्हरटेक केले तरी त्रास. त्याला मिळाले मग मला का नाही ??
 याचाही त्रास . आपण प्रसिध्द नाही, नावारूपाला आलो नाही म्हणून त्रास, सगळीकडे त्रासच त्रास, ईर्षा ,आपण पूर्ण शरीराने ठाकठीक आहोत याकडे आपले कधी लक्षच नसते. इतकंच काय मुलगी असेल तर मुलगा नाही म्हणूनही त्रास करून घेणारी माणसं मी पाहिली आहेत . सतत अस्वस्थ, ही अस्वस्थता कधीही न संपणारी आपण कधी खाली पहातच नाही . आमची नजर सतत वर पाहणारी हव्यासापोठी काहीही करण्याची तयारी असणारी . आम्हाला आमचं ते हवेच पण दुसऱ्याचे जे आहे ते देखील हवे असते . मग कोणत्याही गैरमार्गाने ते मिळवायचं व खूप मोठे काम केले असा आव आणायचा . दुसऱ्याचे कष्टाचे पैसे लुटायचे व आपण समाजसेवा करतो असे दाखवायचे . या सत्य गोष्टीनां कधीही अंत नसतो . या कालचक्राला अंतच नसतो .आपण जसे आहोत तसं स्विकारण्याची आपली कधी तयारीच नसते . 
पण आपल्यात बदल करणे शक्य असतं . 
सुधारणा करणं शक्य असतं .

         आज असाच एक  अनोळखी दामू वाईच्या मिशन हॉस्पीटल  रस्त्यावर दिसला. फार विस्कटलेला दिसत होता बिचारा, उदासपणे निवांत उभा  होता. मग दहा रुपयांचा  पारले बिस्किटाचा एक पुडा घेतला व त्याला दिला. तो माझ्याकडे निर्विकार थोडं हसून व ओळखीच्या चेहऱ्याने पाहून शांतपणे बिस्किट खाऊ लागला.  थोडी तरतरी , किंचिंतसी चमक त्याच्या चेहऱ्यावर दिसली. मलाही जरा बरे वाटले .
          आता शक्य होईल तिथे, शक्य होईल तेव्हा , प्रत्येक भेटणाऱ्या दामू साठी एवढंतरी करायचं असं ठरवलं आहे. मग बघा आपण असं दुसऱ्यासाठी एवढंसं छोटे काही काम केलं तरी लई , म्हणजे लईच भारी वाटतं बघा . कधी प्रयत्न तर करून बघा ...................
           मला मग राजेश खन्नाचा   बावर्ची  चित्रपट आठवतो त्यातला रघु म्हणतो . 
अपना काम तो सब लोग करते है | मगर दुसरोंका काम करने मे , उनके चेहरेपे मुस्कान देखनेमें कुछ औरही मजा है | 
आपल्या शक्तीनुसार, अगदी थोडासा हिस्सा , अगदी अल्पशी जमेल तशी, खिशाला फार मोठी  कात्री न  लावता अशा  दामूंसाठी मदत करुया .

म्हणजे नऊ मण लाकडं आणताना शेवटच्या प्रवासात त्रास होणार नाही ............

गणित तर अगदी खूप सोप्प आहे . 
सर्वानां सारखेच . 
नऊ गुणिले चाळीस = तीनशेसाठ किलो लाकडं . 

आपल्याला देखील तितकीच लागणार .
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
सुनिल काळे✍️  
9423966486

ऑर्थरसीट पॉईंट महाबळेश्वर - एक थरारक अनुभव

ऑर्थरसीट पॉईंट : एक थरारक अनुभव
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
                 महाबळेश्वर आणि पाचगणी ही महाराष्ट्राची खूप प्रसिद्ध व निसर्गरम्य गिरीस्थाने आहेत. सातारा जिल्हा असलेले पाचगणी हे शैक्षणिक केंद्र आणि महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटन क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून सुप्रसिद्ध आहे .
       मी तर लहानपणापासून पाचगणीमध्येच वाढलो. पाचगणीच्या जीवन शिक्षण विद्यामंदिर या मराठी शाळेमध्ये माझे प्राथमिक शिक्षण झाले. प्रत्येक वर्षी खूप पावसाळ्यामूळे , सततच्या अतिवृष्टीमुळे सर्व शाळांना व बोर्डींग स्कूलला सुट्टी असायची . घराबाहेर प्रंचड पाऊस पडायचा त्यामुळे कुठे जाता येत नव्हते. अशावेळी मी सुट्टीत दरवर्षी लहानपणी महाबळेश्वरला जायचो .
           महाबळेश्वरला माझे काका राहत असत त्यांच्या मुलांनाही पावसाळ्यातच सुट्टी असायची. त्याकाळात पाऊसही प्रचंड आणि वेळेवर पडायचा . महाबळेश्वर मध्ये पावसामध्ये सर्वजण थंडीने खूपच गारठून जायचे.
पस्तीस चाळीस वर्षांपूर्वीचे आजही मला आठवते की महाबळेश्वरची सर्व हॉटेल्स , बंगले , दुकाने घराच्या भिंतीचे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून गवताच्या पेंड्या बांधलेल्या झावळ्यांनी, किंवा लोखंडी नळीच्या पत्र्याची उभी पाने लावून सर्व इमारती , घरे, शासकीय कार्यालये, श्रीमंतांचे बंगले पूर्णपणे एकच छोटा दरवाजा उघडा ठेवून बाकी पूर्णपणे बंद केलेल्या अवस्थेत असत .
त्या काळामध्ये निळे , पिवळे प्लास्टिक किंवा मोठ्या ताडपत्र्या वापरल्या जात नसत, ती पद्धत आजकाल सुरू झालेली आहे .
         महाबळेश्वरला माझे काका नगरपालिकेमध्ये काम करत होते यांचे नाव गंगाराम काळे त्यांना सर्वजण बापू म्हणत. बापू ,नानी त्यांची राजेश, संजय आणि सुरेखा नावाची मुलगी असा परिवार होता . त्यात पंधरा वीस दिवसांसाठी मी त्यात भर पडायचो . नगरपालिकेच्या पाठीमागे त्यांच्या सरकारी क्वॉटर्स होत्या .
पावसाळ्यामध्ये प्रचंड पाऊस दाट धुके आणि थरकाप उडवणारी थंडी यामुळे बाहेर जास्त फिरता यायचे नाही घरांमध्येच सतत कोळशांची घमेल्यात शेकोटी पेटवून आम्ही पुस्तके वाचणे किंवा पत्ते व इतर बैठे खेळ खेळत असू .ज्यावेळी पाऊस कमी असेल त्यावेळी आम्ही जवळच्या महाबळेश्वर क्लब ,पोलो ग्राउंड ,वेण्णालेकचा परिसर , बाजारपेठ व जवळचे पॉईंट बघत असायचो.
             परंतु 13 किलोमीटर दूर असलेला ऑर्थरसीट पाईंट मात्र मला बघायला मिळत नव्हता, प्रत्येक वर्षी ऑर्थरसीट पाईंट बघणे हे माझे स्वप्न अधुरेच राहिले .
महाबळेश्वर मध्ये प्रत्येक जण बोलताना एकदा तरी ऑर्थरसीट पॉईंट पाहिला पाहीजे असे जणू पंढरपुरच्या विठोबाचे दर्शन वारकऱ्याने एकदा तरी घेतले पाहीजेच याच भक्तीभावाने बोलत असे , ऑर्थरसीट पॉइंटचे काही फोटोग्राफ , पोस्टकार्डस् मी पाहिली होती परंतू प्रत्यक्ष जावून दर्शन झाले नव्हते.
            कित्येक वर्ष स्वतःचे वाहन नसल्याने किंवा कोणी बाहेरचे नातेवाईक यांनीही आम्हाला ऑर्थरसीट पॉईंटचे दर्शन घडवले नाही . कारण आम्ही लहान होतो .
त्यामुळे ऑर्थरसीट पॉईंट विषयी माझ्या मनात कायमच उत्सुकता राहिली होती . एकदा तर मराठी शाळेची ट्रिप गेली होती परंतु त्यावेळीही ऑर्थरसीट पॉईंट लांब असल्याने पाहताच आला नाही.

            पाचगणीत राहत असूनही कित्येक वर्ष मी ऑर्थरसीट पॉईंट पाहिला नव्हता. पुढे शिक्षणासाठी कोल्हापूर ,पुणे व नंतर मुंबई येथे गेल्यामुळे मी आर्थरसीटच्या दर्शनाचे महत्त्व पूर्णपणे विसरून गेलो .

            1995 साली माझी जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शनाची बुकींगची तारीख पक्की झाली होती. मी पाचगणीला सहा महिने केमोल्ड फ्रेम्समधले कंपनीचे काम अर्धवट सोडून आलो होतो. कंपनीचे मालक श्री.केकु गांधी यांनी मला सांगितले की तुझे जहॉंगीर आर्ट गॅलरी मधील प्रदर्शन यशस्वी झाले तर तू चित्रकार म्हणून काम कर पण जर तुला आर्थिक अपयश आले तर तुला परत कंपनीमध्ये नोकरी करावी लागेल . म्हणजे परत आयुष्यभर मुंबईला राहावे लागणार होते. कारण माझ्यावर घराचे बँकेचे कर्ज व मालकांचे कर्ज होते.ती रक्कम दिल्याशिवाय मी कंपनी सोडू शकत नव्हतो .
             मी मुंबईला रेल्वे प्रवासामूळे वैतागलो होतो त्यामुळे मला यश मिळवणे फार फार गरजेचे होते ते एक मोठे चॅलन्जच होते व ते चॅलेन्ज मी सहा महिन्यात पूर्ण करायचे गांभीर्याने स्विकारले होते .
खूप वर्षानंतर आल्यामुळे मी प्रथम पाचगणी येथील चित्रे काढली ,त्यानंतर इतर सर्व पॉईंट, प्रतापगड , तळदेव व तापोळा या ठिकाणी मी चित्रे काढायला गेलो होतो. चार पाच महिने मी वेडयासारखा सतत चित्रे काढत फिरत होतो.
              शेवटच्या टप्प्यात मात्र मला ऑर्थरसीट पॉइंटची जाऊन चित्रे काढायची होती परंतु येथे जाण्यासाठी माझ्याकडे स्पेशल स्वतःचे वाहन नव्हते. एक दिवस पाचगणीवरून सकाळीच चित्रकलेचे सर्व सामान घेऊन मी महाबळेश्वरच्या एसटी स्टँडवर पोहोचलो त्या ठिकाणी मला ऑर्थरसीटला जाण्यासाठी काही वाहन मिळते का ? याची मी चौकशी करत होतो, त्याचवेळी पाचगणीचे टॅक्सी चालक व शेजारीच राहणारे ओळखीचे जयवंत शिंदे (भाऊ ) नावाचे गृहस्थ भेटले . त्यांची स्वतःची टॅक्सी होती. ते पाचगणी वरून एका नवविवाहीत जोडप्याला घेऊन महाबळेश्वर दर्शनासाठी आले होते .मला सकाळी सकाळीच टॅक्सी स्टँडवर आवारात फिरत असताना त्यांनी पाहिले व मला कारण विचारले .मी त्यांना मला ऑर्थरसीट पॉइंटला जाऊन चित्र काढायचे आहे असे सांगितले . ते देखील तिकडे जाणार होते मग त्यांनी मला ड्रायव्हर जवळच्या सीटवर बसवून मला आर्थरसीट पॉइंटपर्यंत पोहोचवले .
ऑर्थरसीट पॉईंटला जायच्या अगोदर आम्ही एलफिन्स्टन पॉइंटला गेलो .जाताना मार्जेरी पॉईंट, सावित्री पॉईंट, मंकी पॉईंट, कॅसल रॉक यांचेही दर्शन घेतले.
               मला मात्र कधी एकदा आर्थरसीट पॉइंटला पोहोचतो त्याची ओढ लागली होती सकाळी दहा वाजता आम्ही ऑर्थरसीट पॉईंटच्या जवळ पार्कींगजवळ पोहोचलो. उतरत असताना मला संध्याकाळी पाचच्या आतमध्ये परत निघण्याची जाणीव शिंदे टॅक्सीवाले यांनी वारंवार करून दिली होती.
माझे चित्रसामान घेऊन ऑर्थरसीट पॉॅईंटच्या दिशेने निघालो त्यावेळी आजच्यासारखी लाल दगडांची सुबक पायऱ्याची बांधणी झालेली नव्हती . सगळीकडे ओबडधोबड परिसरच होता.
तो दिवस सुट्टीचा किंवा वीकएंड नसल्यामुळे ऑर्थरसीट पॉईंटवर तशी फार गर्दीही नव्हती.
           मी निवांतपणे डावीकडच्या पायऱ्या उतरून ऑर्थरसीटच्या दर्शनासाठी निघालो . तेथे हॉन्टींग पॉईंट, एको पॉईंट, व माल्कम पॉईंट, टायगर स्प्रिंग पॉईंट असे छोटे छोटे पॉईंट लोखंडाचे सरंक्षक कठडे बांधून तयार केलेले आहेत. तेथून प्रतापगड, रायरेश्वर, कोळेश्वर व चंद्रगड या किल्ल्याचे दर्शन होत होते आणि हा सगळा परिसर खूप मनोहर , नयनरम्य दिसत होता.

            पुढचे दृश्य पाहताच मात्र मी आवाक झालो, आश्चर्यचकीत झालो. आता मी प्रेक्षणीय व डोळ्यांचे पारणे फेडणारा ऑर्थरसीट पॉईंट पहात होतो.
आणि काय सांगू तुम्हाला..................... 
त्या रौद्रभीषण सृष्टीला न्याहाळताना नजरेचाच आवाका कमी पडत होता. ऑर्थरसीटचा तो उंच अजस्त्र तुटलेला कडा, पाताळपाणी दाखवणाऱ्या दोन्हीकडच्या खोल दऱ्या , त्या दरीतून उंचावणारे लहान मोठे डोंगराचे सुळके, सुळक्यांवर उन्हाचा प्रकाश पडल्यामुळे निळ्या जांभळ्या, व केसरी रंगात ते डोंगर चमकत होते. मी महाराष्ट्रातील सर्वात मोठया सह्याद्री पर्वताच्या अवाढव्य रांगाच रांगा पहात होतो.या कडयाच्या पाठीमागे ब्रह्मारण्य आहे आणि डोंगराच्या लांबच लांब दूरवर पसरलेल्या अस्पष्ट पर्वतरांगा मला एरिएल परस्पेक्टीव्हची जाणीव करून देत होत्या. डावीकडे सावित्री खोऱ्याची प्रचंड मोठी खोल खोल दरी , व उजवीकडे हिरवेगार जोर व कृष्णेचे खोरे झकास दिसत होते. खाली खोल दरीत पाहीले तर डोळे गरगरा फिरत होते,मनात भीती वाटत होती समोर आर्थरसीट पॉईंट्सचा आयताकृती चौकोनी कडा दिसत होता. त्या चौकोनी आकाराच्या सिमेंटच्या कठड्यावर रेलिंगला धरुन उभ्या राहिलेल्या छोट्या आकाराच्या मानवाकृती खूप लहान पण भारी दिसत होत्या . जणू चित्रातला गोल्डन पॉईंटच वाटत होता, तो चित्रात नव्याने शोधत बसायची गरजच नाही.खाली डोंगराच्या घड्या, कड्यांचे सुळके तयार होऊन डोंगरांच्या कड्यावर नैसर्गिक खांब तयार झालेले दिसत होते. त्यावर पडलेली सूर्याची नारंगी सूर्यकिरणे पाहून कडा वेगळ्या तेजाने चमकत होता. एकसंघ मोठी भिंत तयार होऊन हा भाग सहयाद्रीने मस्तकी घेतल्यासारखे वाटत होता.खाली खोऱ्यांवर आणि डोंगरावर लाल पिवळी कोवळी उन्हे पसरल्यामूळे ऑर्थरसीटच्या दरीत त्या रंगात काळही क्षणभर हरपला आहे असे वाटत होते. डोळे व मन हे दृश्य पाहिल्यानंतर तृप्त, तृप्त झाले होते.
         इतक्यात उन्हाचा खेळ संपून अचानक वातावरणात पडदा बदलावा तसा नवाच दृश्यमय खेळ सुरु झाला. आता ही पाताळदरी धुक्याने, ढगांनी भरून गेली आणि हळूहळू पांढरेशुभ्र ढग दरीतून वेगाने उसळी मारु लागले . शांतपणे, तरंगत येणाऱ्या ढगांचे पुंजकेच पुंजके आता अलगदपणे धुक्याचे पदर सुटून वर येऊ लागले आणि ह्या सृष्टीनेच अनोखा नवा साज परिधान करण्यास सुरुवात केली. सगळे खोरे ,विविध उंचीचे डोंगर, डोंगराचे सुळके एका नव्या रुपात समोर येऊ लागले. 
               डोंगराच्या घळ्या मऊलोकरीसारख्या धुक्यांच्या लोळांनी घनदाट निळ्या छायेने भरून जात होते .नभपटलावर निसर्ग विविध रंगछटा व प्रकाशाची उधळण करीत होता. धुके वरवर सरकत येत होते, आणि झुळझुळणाऱ्या हवेत वारा सुखद गारवा आणत होता. धुक्यांचे सुंदर लोळ अलगद शिखरांजवळ फेकल्यांसारखे वरच्या दिशेने येत होते .
                या सुळक्यांच्या वायव्य दिशेस कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील जोर नदीचे खोरे घनदाट अरण्याचे आहे. या पॉईन्टवरून पुणे जिल्ह्यातील राजगड व तोरणा आणि रायगड जिल्यातील कांगोरी हे किल्ले व विशाल रमणीय परिसर दिसत होता. भोर तालुक्यातील काही डोंगर स्पष्ट अस्पष्टपणे दिसत होते. डोंगराची भव्यता व निसर्गसौंदर्य पाहून मन खूपच प्रफुल्लित झाले होते.
                   अशा भारावलेल्या अवस्थेमध्ये मी ऑर्थरसीट पॉइंटचे निरीक्षण करत होतो ऑर्थरसीट पॉईंटची पाहिलेली ही सर्व रूपे माझ्या डोळ्यात, मनात खोलवर भरून हृदयात साठवत होतो. कारण त्यावेळी माझ्याकडे कॅमेरा नव्हता, डोळयांचाच कॅमेरा करून लक्षपूर्वक सर्व इमेजेस डोक्यात साठवत होतो.
               त्या भारावलेल्या अवस्थेमध्येच मी माझे चित्र कामाचे साहित्य काढले आणि हे  जादूमय वातावरण चित्रित करण्यास सुरुवात केली. ऑर्थरसीट पॉईंट त्या सर्व वातावरणासह माझ्यात आणि मी त्याच्यात पूर्णपणे एकरूप झालो होतो. मला आता आजूबाजूला माझ्या कोणी आहे , किंवा नाही याचे भानही राहिले नाही. अशा धुंदीतच मी ऑर्थरसीट पाँईट बेभानपणे रंगवला......... 
            एक सुंदर कलाकृती माझ्या हातून झाली होती , चित्रकाम करताना तीन चार तास कसे स्वप्नवत संपून गेले होते.

               चित्रकाम संपवून मला अजून ऑर्थरसीटच्या आयताकृती व्हयू पॉईंटच्या कठडयावर जायचे होते. मी पटापट चित्र सामान आवरून त्या मुख्य कठडयावर पोहचलो. एक मोठा ग्रूप तेथे खूप दंगामस्ती करत होता. येथून तर खालची दरी अजूनच भीषण दिसत होती ,पोटात भीतीचा गोळा आणणारी ती दरी खूप खोल खोल होती. या दरीमध्ये कोणी, कोल्ड्रींक्सचे बिल्ले, कोणी नाणी, तर कोणी हातरुमाल टाकून वस्तू तरंगत वर येतात का ? असा वाऱ्याचा अंदाज घेत होते. कोणी जोरजोरात ओरडून स्वतःच्या प्रतिध्वनींचा एको येतोय का याचा अंदाज घेत होते. खाली एक अंगठयाच्या आकाराचा विंडो पॉईंट नावाचा खडक दिसत होता. दोन उत्साही तरुण तिकडे चालले होते मग त्या अवघड छोट्या पायऱ्या उतरून मी देखील ऑर्थरसीटच्या खाली उतरलो.
           तेथून जे अनोखे ,अफलातून दृश्य दिसत होते ते पाहून मी निशब्दच झालो. दोन डोळे ते अवर्णनीय दृश्य पाहायला ,मनात साठवायला कमीच पडत होते. किती पाहू आणि किती मनात साठवू असा प्रश्नच पडत होता. अशा वेळी मी पूर्णपणे शांत होतो, त्या निसर्गाच्या
अनामिक विश्वनिर्मात्याला मी आपोआपच हात जोडून वंदन केले आणि मग तेथे एका दगडावर शांतपणे बसून बराच वेळ अवलोकन करत, ब्लॅक अँन्ड व्हाईट शाई व पेन्सीलने स्केचिंग करीत बसलो.

            चित्र रेखाटत असतानाच ऑर्थरसीटची दरी माझ्या हृदयातच उतरत जाऊन खोल ,खोल खूप खोलवर हृदयातच घर करून बसत होती, जणू मनात पाझरत, पसरत चालली होती. मी भान हरपून चित्र रेखाटताना मंत्रमुग्ध झालो होतो.

              अचानक सांयकाळचे वातावरण निर्माण झाले, सुर्यदेव हळूहळू गायब झाला, अंधार पडू लागला व मी एकदम भानावर आलो. मी ताबडतोब ऑर्थरसीटच्या वरच्या २०० फूट उंच कठडा असलेल्या आयताकृती व्हयू पॉईंटकडे निघालो. वर पोहचलो तर तेथे कोणीच नव्हते, आजूबाजूला पाहीले तर सगळे पर्यटक कधीच निघून गेले होते, छोटेमोठे दुकानदार,फोटोग्राफर्स, सगळेच्या सगळे सामान आवरून घरी निघून गेले होते. 
           आणि त्या प्रचंड दरीमध्ये मी एकटाच असल्याची भयाण जाणीव माझ्या मनाला झाली. काळोखात एक थरारक , अदृश्य भितीची एकाकीपणाची जाणीव मनात तयार झाली व मी ताबडतोब पाय उचलून पटापट चालत मुख्य रस्त्याकडे निघालो. मी कित्येक तास अन्नपाणी घेतल्याचेही आठवत नव्हते. आता भीतीने घशाला कोरड पडली होती,मग टायगर स्प्रिंग पॉईंटचे पाणी पोटभर प्यायलो, थोडा सावरलो व स्वतःलाच धीर देत चालत चालत कार पार्कींग स्पॉटवर आलो . माझा वेळेचा अंदाज पूर्ण चुकला होता. सगळे पर्यटक, टॅक्सीवाले, दुकानदार कोणी कोणीच उरले नव्हते. क्षणभर मी प्रचंड निराश झालो, हतबल झालो, स्वतःवरच खूप रागावलो,चरफडलो. कारण परत १३ कि.मी परतीचा मार्ग भीषण कंटाळवाणे व एकट्याने चालत करण्याचा होता . दिवसभर थकल्यामूळे चालत प्रवासाचा मार्ग मला फार फार अवघड दिसत होता.........
                 पणआता मला दुसरा कोणताच पर्यायही नव्हता, जड अतःकरणाने निराश पावले टाकत मी रस्त्याने चालत सुटलो. त्याकाळात मोबाईल नव्हते आणि बॅगेत बॅटरी, खिशात छोटा टॉर्चही नव्हता. 
साथीला होता फक्त चंद्राचा थोडा अंधुकसा संध्याप्रकाश............. 
             चालत चालत एकट्याला सावरत मी स्वतःशीच बोलत चाललो होतो. प्रचंड घनदाट जंगल, माणूस भेटण्याची शक्यता नाहीच, पण या जंगलात वाघ, बिबळे, रानगवे, जंगली डुक्कर, श्वापदे ,अजस्त्र साप आहेत हे मला वाचनात आलेले होते. दबकत दबकत सावध पावले टाकत माझा प्रवास सुरु होता........
        एक दोन तास चालल्यानंतर मी थकलो, चालण्याची सवय होती पण अंधारात बसण्याचीही इच्छा नव्हती आणि मला अंदाजाने जाणवले की रस्त्यात आता एलफिन्स्टन पॉईंटचे वळण आले होते. चालत असताना अचानक त्या वळणातून मोठा गाडीचा आवाज आला. त्या अम्बेसिटर टॅक्सीचा प्रकाशझोत तोंडावर आला. मी खूप उत्साहीत झालो व दोन्ही हात वेगाने हालवत मी टॅक्सीवाल्याला जोरजोराने लिफ्टसाठी हातवारे केले.............पण दुर्देव................ 
त्याने माझ्याकडे जराही लक्ष न देता वेगाने कार तशीच पुढे नेली कारण आतमध्ये टॅक्सीत माणसे होती . आता माझी उरलीसुरली आशाही पुर्णपणे संपुष्टात आली.घोर निराशेने, भीतीने, अंधारामूळे त्रासल्यामुळे मी टॅक्सीवाल्याला दोन चार शिव्या मनातच दिल्या, त्याच्या खानदानाचा उध्दार केला. पण हे करुन काय उपयोग......... आता पुढचा प्रवास तर मला एकाकी चालतच करावा लागणार होता.

         मनाला सावरत, धीर देत मी नव्या दमाने चालण्यास सुरुवात केली. आयुष्यात पहिल्यांदा मला अशी खूप खूप एकटेपणाची जाणीव तीव्रपणे जाणवली, असं वाटत होते की हा भितीदायक प्रवास कधी संपणार आहे की नाही ? का आजचा माझा दिवस शेवटचा ठरणार आहे की काय ? एखाद्या जंगली श्वापदाने माझ्यावर आता हल्ला केला तर मी काय करू शकतो ? मला येथे कोण वाचवणार ? आपण इतके बेफिकीर ,बावळट, मुर्ख कसे आहोत, आपण तेथे चित्र काढत इतका वेळ थांबवयास नको होते........

कशासाठी थांबलो ?.. .......... ऑर्थरसीटसाठी.....................

               मग मला ऑर्थरसीट पॉईंटचाच राग येऊ लागला. झक मारली आणि येथे आलो. आता यापुढे कधीही आयुष्यात स्वतःची गाडी असल्याशिवाय ,कधीही या ऑर्थरसीट पॉईंटला यायचे नाही, यापुढे कधीही ऑर्थरसीटचे चित्रही काढायचे नाही व आलो तर स्वतःची गाडी घेऊनच चित्र काढायला येईन, अशी भीष्मप्रतिज्ञा मी मनातल्या मनात केली व माझे मलाच हसायला येऊ लागले. त्या भीषण रस्त्यावर मी मोठयाने हसलो कारण माझ्या खिशात जगण्यापूरतेही उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे नव्हते आणि मी स्वप्न मात्र गाडीची पहात होतो.............

           आपण ज्यावेळी फार फार एकटे असतो त्यावेळी मन, शरीर, आत्मा आणि बुद्धी आपल्याशी आपोआप संपर्क करतात........ या मनात किती अनंत विचार येतात ना ? एका क्षणात आपण मनाने हजारो कि.मी.चा प्रवास करू शकतो, वाऱ्याच्या वेगाने, पक्ष्याप्रमाणे गगनात विहार करू शकतो....... मन हे अमर्याद ताकद असलेले न दिसणारे न उलघडणारे कोडे आहे . अथांग आहे मनाची प्रक्रिया समजून घेणे अदभूत ताकदीची गोष्ट आहे. पण एक नक्की मनाची ताकद एखादया गोष्टीवर पूर्णपणे लावली, केंद्रीत केली तर अशक्यप्राय गोष्टी सहज शक्य होऊ शकतात..... जसे एखादे भिंग उन्हात एकत्रित किरणे करून सगळा कागद जाळू शकते तसे माझे मन व शरीर स्वतः स्वतःलाच सावरत सावरत ताकदवान बनवत प्रवास करत चालले होते..........

               आणि अचानक उजव्या बाजूकडे जंगलात खूप मोठी हालचाल झाली............ क्षणार्धात एक पाच सहा तगडे , धिप्पाड अगडबंब रानगवे अचानक मुसंडी मारुन बाहेर रस्त्यावर आले, आणि त्याच वेगाने डावीकडच्या जंगलात रस्ता क्रॉस करून घुसले. मी क्षणभर काहीच न कळल्यामूळे तेथेच स्तब्ध झालो..........

                आता माझी पूर्ण तंतरली होती, त्यानां मी दिसलो नाही की , त्यांनी जाणीवपूर्वक माझ्याकडे दुर्लक्ष केले काय माहीती........ पण माझा हा प्रवास मला आणखीनच थरकाप करणारा वाटू लागला.......... खूप घाबरलो, वैतागलो, चिडत, चरफडत, स्वतःला, ऑर्थरसीटला, जगाला, दैवाला ,नशीबाला शिव्या घालत घालत चारपाच तासानंतर एकदाचा मी अंतिमतः महाबळेश्वर एसटी स्टॅन्डवर पोहचलो .त्यावेळी रात्रीचे ११ वाजले होते व एसटी स्टॅन्डवर मी परत एकटा हताश होऊन बसलो होतो. कारण मला पाचगणीला पुढे जायचे होते व यानंतर कोणतीही एसटीची गाडी उपलब्ध नव्हती.........
रस्त्यात खूप वाट पाहील्यानंतर मला एक मालवाहतूक करणारा ट्रकवाला भेटला आणि रात्री खूप उशीरा माझ्या घरी पोहचलो. त्या रात्री मी नीट झोपूच शकलो नाही. रात्रभर ऑथरसीटचा थरार , तो चालत केलेला थरारक भयानक त्रासदायक प्रवासाचा अनुभव मला रात्रभर वारंवार आठवत होता........ झोपून देत नव्हता .

                दुसऱ्या दिवशी माझ्या एका जवळच्या मित्राला मी ह्या प्रवासाची हकीकत सांगितली तर तो टरकलाच.एवढया भयाण रात्री मी एकटा १३ कि.मी चालत आलो हे ऐकून त्याने कपाळावरच हात मारून घेतला. व उत्साहाने एका नव्या माणसाची ओळख करून दिली. त्याचे नाव स्वामी. या मिलींद स्वामीची एक मिलिटरी कलरची अम्बॅसीटर गाडी अर्जंट विकायची होती. त्याची किमंत ३५,००० रुपये होती.गाडी पाहताच ती मला खूप आवडली होती पण खिशात पैसे नसल्याने मी गप्प बसलो. दोन महिने थांब माझे मुंबईला प्रदर्शन आहे त्यानंतर सांगतो असे सांगून मी तेथून पळ काढला.

                1 ते 7 ऑगस्टला जहाँगीर आर्ट गॅलरीचे प्रदर्शन नक्की ठरले होते. माझी छोटी जलरंगातील चित्रे तयार होती. एक मोठे चार फूट बाय बारा फुटाचे टेबललॅन्डचे भव्य चित्र मी काढले होते पण आता मला ऑर्थरसीटचे चार फूटबाय सहा फुटाचे एक चित्र करायचे होते. मी मुंबईला नालासोपारा येथे रहात होतो. मध्ये बराच काळ गेला होता. स्केचवरून चित्र काढताना माझ्याकडे रंगीत रेफरन्स नव्हता. त्याकाळात मोबाईल किंवा लॅपटॉप नव्हता गुगलवर चित्र शोधणे आजच्या सारखे सोपे काम नव्हते . सुरुवात केली आणि काही आठवेनाच , मनासारखे रंगकाम होत नव्हते ,
मी ब्लॅन्क झालो होतो........
काम थांबवून थोडा शांत झालो.
मनाची सगळी शक्ती भिंगाप्रमाणे एकत्र केली .  ऑर्थरसीटचा धावा मनातूनच केला. तो थरारक दिवस आठवला, आणि सर्व मन, शरीर केंद्रीत केले आणि मग अचानक भिंतीवर ऑर्थरसीटचेच दिव्यदर्शन झाले. सगळे दृश्य स्पष्ट दिसू लागले ,सगळे चित्र स्पष्ट दिसू लागले , धुके, वारे, कडा, सुळके, ब्रम्हारण्य, विंडो पॉईंट, सगळे सगळे स्पष्ट दिसू लागले. जशी तन्द्री त्या थरारनाट्यादिवशी होती तशीच तंद्री आज पुन्हा लागली आणि त्या भारावलेल्या अवस्थेत एक भव्य चित्र मी रंगवत पुर्ण केले.
                 जहाँगीर आर्ट गॅलरीचा प्रदर्शनाचा तो पहिलाच मंतरलेला दिवस मला आजही आठवतोय. सांस्कृतिक मंत्री श्री. प्रमोद नवलकर उदघाटनासाठी सरकारी लवाजमा घेऊन आले होते. केकू गांधी, पेसी वीरजीअंकल प्रमुख पाहुणे होते....... कार्यक्रम छान पार पडला होता.
              दुपारच्या वेळी एक तरुण पारशी गृहस्थ त्यांच्या सात आठ वर्षाच्या मुलाला घेऊन आले होते आणि गॅलरीत प्रवेश करताना समोरचे चित्र पाहताच... खूप मोठयाने .....
"ओ माय गॉड, धिस इज ऑथरसीट पॉईंट, महाबळेश्वर
 माय फेव्हरेट पॉईंट , 
वन्डरफूल ,अमेजिंग पेंटींग....... 
आणि अतिभावनाविवश होऊन वेगाने आमच्या टेबलाजवळ आले. Who is Artist ? असे विचारून त्यांनी माझा हात प्रेमाने हातात घेतला , हाताचे चुंबन घेतले व मनापासून अभिनंदन केले. हे चित्र मला आताच्या आता ताबडतोब विकत पाहीजे काय किंमत आहे ? असे त्यांनी विचारताच मला स्वामीची मिलीटरी रंगाची अॅम्बेसीटर कारच डोळ्यासमोर दिसली व मी थोडे घाबरतच त्यानां ३५,००० रुपये किंमत सांगितली. आणि ते गृहस्थ पुन्हा मोठ्याने ओरडले..........

ओन्ली थर्टी फाईव्ह थांऊजंड रुपीज ? ............

             आता आश्चर्यचकीत होण्याची पाळी माझी होती. त्यांनी माझा हात हातातून सोडवला व ते लगेच बाहेर गेले आणि पाच दहा मिनिटात परत आले. त्यांच्या गाडीतून पस्तीस हजार रुपये रोख घेऊन आले. सगळे पैसे टेबलावर ठेवले व म्हणाले...... 

माय नेम इज मिस्टर रेडीमनी, आय अलवेज किप रेडी मनी विथ मी.......

              माझ्या आयुष्यात एकाच चित्राला एवढी मोठी रक्कम प्रथमच मिळाली होती....... आणि ती देखील रोख नव्या कोऱ्या करकरीत नोटांमध्ये.

भगवान के घर देर है लेकीन अंधेर नही या म्हणीची प्रचिती मला आली होती...... मी आकाशाकडे पाहीले व मनातून ऑर्थरसीट पॉईंटला नमस्कार केला .

            प्रदर्शन संपल्यानंतर मी तडक पांचगणीत आलो आणि प्रथम मिलीटरी कलरची अॅम्बॅसीटर कार स्वामीकडून विकत घेतली..... रोख पस्तीस हजाराच्या कडक नोटा रु रोख दिल्याचे पाहून तोही चक्रावला...........

         थोडे दिवस  पाचगणीत गाडी चालवायला शिकलो आणि 
पहीली भेट दिली ती महाबळेश्वरच्याऑथरसीट पाँईटला....... 

नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करायला........

         त्या दिवशी मी निवांतपणे परत ऑथरसीट पाह्यला, पुन्हा स्केचेस केली ,कारण मला आता परतीच्या चालत प्रवासाची काळजी नव्हती.आता मात्र हा ऑर्थरसीट माझ्याकडे मैत्रीपूर्ण हसतोय असा मला भास होत होता ,त्या दिवसापासून ऑर्थरसीट माझा खूप जवळचा जीवाभावाचा मित्र झाला, त्याने मला भरभरून यश दिले , दोन पायावर चालत १३ कि. मी चालवले पण मैत्रीच्या परिक्षेत पास झाल्यानंतर मला नंतर आजपर्यंत चित्र काढण्यासाठी कधीही पायपीट करायला लावली नाही.

         आजही मी वैतागलो, कंटाळलो, निराश झालो, त्रासलो, उदास झालो की पहील्यांदा सरळ गाडी घेऊन ,स्केचबुक घेऊन ऑथरसीट पॉईंटला जातो.निवांतपणे भटकतो, चित्रे काढतो व हा माझा मित्र मला परत चेहऱ्यावर हास्य आणून प्रसन्न व शांत , उत्साही करूनच परत पाठवतो.
येताना आणि हो.......जर कोणी प्रवासी एकटाच रस्त्याने चालत येत असेल तर मी स्वतः गाडी थांबवून त्याला माझ्या गाडीत घेतोच............ कारण ऑर्थरसीटने मला तशी शिकवणच दिली आहे............ कोणाला पायपीट करून दयायची नाही, सगळ्यानां भरभरून आनंद द्यायचा........

           ऑर्थरसीट पॉॅईंटची गेल्या पंचवीस वर्षांत मी एकाच ठिकाणची अनेक माध्यमात वेगवेगळी चित्रे काढली, स्केचेस केलेली आहेत.
      अजूनही प्रत्येक वर्षी मला ऑर्थरसीटला का जावेसे वाटते ? त्याच त्याच ठिकाणी बसून चित्र काढावेसे का वाटते. ?  का ? याचे माझे मलाच नवल वाटते .

       याचा ज्यावेळी मी शांतपणे विचार करतो त्यावेळी अनेक गोष्टींचा उलघडा होतो. काही जण ऑर्थरसीट पॉईंटची तुलना अमेरिकेच्या ग्रँन्ड कॅनियनशी करतात. मला पर्सनली ही तुलना चुकीची वाटते. कारण स्वतः ऑर्थरसीट कोणाशीच तुलना करायला जात नाही. कारण तुलना सुरु केली की मग भांडणे आली, तु मोठा ? की मी मोठा ? हे हेवेदावे सुरु झाले, आरोप प्रत्यारोप, जेलसी सुरु झाली. मला या सगळ्यांच्या पलीकडे राहायला आवडते आणि ऑर्थरसीट तसाच मला तुलना विरहीत मुक्त जीवन जगायला शिकवतो . 
त्याला भेट दया अथवा देऊ नका तो कोणावरही नाराज होत नाही. 
त्याचे कोणी कौतुक करा अथवा करू नका, त्याला काहीही फरक पडत नाही.
आणि सर्वात म्हणजे ऊन, प्रचंड पाऊस, धुके, वादळ, वारा, वीज यांचे कितीही नैसर्गिक आघात झाले तरी तो सगळे सोसतो, तो कधीही तक्रार करत नाही उलट प्रत्येक ऋतूंमध्ये त्या त्या महिन्यात ऋतूशी पूर्णपणे सामावून जाऊन, वेगवेगळी गोजिरी रुपे धारण करुन हजारो पर्यटकांना त्यांच्या अगणित रुपांची नव्याने ओळख करून देत असतो. रोज नवा अनोखा पोशाख परिधान करून सर्वानां प्रसन्नपणे रिझवत असतो. खंबीर रहा, येणाऱ्या सर्व संकटानां धीराने, कणखरपणे, न घाबरता सामोरे जा, माघार घेऊ नका , सतत प्रयत्न करत रहा असा संदेश देत असतो.

                ऑर्थरसीटचा शोध ब्रिटीश अधिकारी सर चार्लस मॅलेट यांचा मुलगा, ऑर्थर मॅलेट याने लावला. मॅलेट कुटूंबाचा मोठा दबदबा होता त्या काळात. 
                १८५३ साली एप्रिल महिन्यात ऑर्थर मॅलेटची २६ वर्षीय पत्नी अन् अवघ्या ३२ दिवसांची केट नावाची मुलगी या दोघींना व त्यांच्या नोकरानां सावित्री नदीतून प्रवास करताना बोट उलटून जलसमाधी मिळाली. त्यातील कोणीच वाचले नाही. स्वतःला झालेले आणि हृदयात न मावणारे हे मोठे दुःख विसरण्यासाठी ऑर्थर या उंच जागी येऊन एकटाच बसत असे. या दरीतून खाली पाहीले की सावित्री नदीच्या बाणकोट भागाचं अंधुकसे दर्शन होते पत्नी व कन्या ऐन उमेदीत अचानक गमावल्यामूळे विरह, दुःख, निराशेत होरपळणाऱ्या ऑर्थरला ही भरभक्कम दरी त्याला प्रचंड आधार देई. त्यामूळे ऑर्थर दुःख विसरून जात असे..........
आणि ही कथा ऐकल्यामूळे तर ऑर्थरसीट मला का भावतो हे लक्षात आले, कारण माझीही एकूलती एक मूलगी लहान असतानाच देवाघरी गेली . ऑर्थरचे व माझे दुःख सारखेच असल्याने हा पॉईंट आणखीनच आवडू लागला.......
 
सर्वानां दुःख विसरा आणि जीवन छान, स्वच्छन्दी, उमेदीने जगा, कितीही आघात झाले, अडचणी आल्या ,अचानक कोणतीही संकटे, परिस्थिती विपरीत आली तरी मनाने सशक्त रहा खंबीरपणे तोंड दया , लढा दया असा संदेश हा ऑर्थरसीट पॉईंट आपल्या सर्वांना देत रहातो..........

महाबळेश्वरला जाऊन जर तुम्हीऑर्थरसीट पॉईंट पाहीला नाही..... तर खरे महाबळेश्वर, 
खरा सह्याद्रीच तुम्ही पाहीला नाही.......... 
निसर्गाचा खरा थरारच तुम्ही अनुभवला नाही असेच म्हणावे लागेल.............. 

मी तर हा थरार अनुभवलाच आहे .
एकदा तरी तुम्ही देखील महाबळेश्वरच्या ऑर्थरसीटला भेट  द्या . त्यासाठी खूप खूप शुभेच्छा ! 💐
तुम्हाला प्रवासात एका नव्या थराराचा नक्की अनुभव मिळेल .


✍️सुनील काळे ( चित्रकार )
३२ निसर्ग  बंगला
मेणवली रोड, मु .पो भोगाव
ता. वाई. ,जि. सातारा ४१२८०३
मो.नं.9423966486
Sunilkaleartist@gmail.com

रिटायर्ड

रिटायर्ड
🌟🌟🌟
       आज सकाळी व्हॉट्सॲपवर मेसेजेस पाहत असताना इंद्रनील बर्वे या मित्राचा गुड मॉर्निंगचा मेसेज आला . त्यामध्ये एका तुटलेल्या , टाकून दिलेल्या , गंजलेल्या बोटीचा फोटो होता . आणि त्याखाली लिहले होते  " रिटायर्ड '' . तो फोटो पाहून मी एका जुन्या आठवणीत रममाण झालो .
          २oo४ साली आमचा एक ग्रूप शो मुंबईला नेहरू सेंटरच्या मोठया हॉलमध्ये झाला . प्रदर्शन सुरु झाले संध्याकाळी मला गॅलरीच्या ऑफीसमधून निरोप आला की महाबळेश्वर वरुन तुमच्यासाठी फोन आला आहे .गॅलरीच्या कोपऱ्यातच कॉर्नरला ऑफीस आहे .मी टेलीफोन घेतला .... कोणीतरी वयोवृध्द आवाजात पारशी टोन मध्ये बाई बोलत होत्या. 
" मिस्टर सुनील काले मी पेरीन बोलते , पेरीन भरूचा असा माझा नाव हाय,मी पण रिटायर हाय ,पण आता महाबलेश्वरमंदी आला हाय , तुझा क्लबमंदी पाठवलेला एक्झीबिशनचा ब्रोशर मी पाहीला हाय , त्यामंदी एक बोटींचा पेंटींग हाय , " रिटायर्ड " टायटल लिवला हाय त्यो मला लई आवडला. ह्यो पेंटींग मला हंड्रेड परसेन्ट पाहिजे हाय . त्याला ब्राऊनकलरमंदी फ्रेम कर . मी बॉम्बेला आला की  तवा तुझा पैसा दिल .पक्का प्रॉमिस कर .  माझा नंबर लिव . मी प्रॉमिस करून नंबर लिहून घेतला . आणि समोरुन फोन बंद झाला .
           प्रदर्शनाची धामधूम संपल्यानंतर निघण्यापूर्वी मी त्या पारशी पेरीन बाईंना फोन केला . त्यांनी सांगितल्या प्रमाणे मंत्रालया शेजारी ' समता ' नावाची पॉश इमारत होती . त्या ठिकाणी पेंटींग व्यवस्थित पॅक करून टॅक्सीने गेलो . नरिमन पॉईंट ,मंत्रालय परिसरात ती इमारत प्रसिद्ध  असल्याने शोधायला जास्त त्रास झाला नाही . इमारत पॉश होती .लिफ्टने पोहचलो आणि घराची बेल वाजविली.
           75 वयाच्या पेरीनबाई टिपीकल स्लीवलेस पारशी फ्रॉक घालून समोरच दरवाजा उघडून उभ्या होत्या .आत गेल्यावर प्रशस्त हॉलमध्ये पारशी सागवानी फर्निचर व सर्व ठिकाणी जाडजूड पुस्तकांची कपाटे . विश्वकोष किंवा वकीलाच्या ऑफिस मध्ये जशी जाडजूड काळ्या रंगाची पुस्तके असतात तशीच  सगळीकडे पुस्तकेच पुस्तके . त्या पुस्तकांच्या भोवती बरोबर मध्यभागी अतिशय व्यवस्थित टाय सुट बुट घातलेले ८० वर्षांचे एक पारशी गृहस्थ बसलेले. अतिशय धारदार नाक , गोरा वर्ण ,उंच , सडपातळ ब्रिटीशां प्रमाणे दिसणारा व शांतपणे शुन्यात नजर लावून बसलेला. मी त्यानां गुडमॉर्निंग  केले , पण काहीच प्रतिक्रिया नाही , हास्य नाही, ओळख नाही, शब्द नाहीत .पेरीनने मला सरळ आत मध्ये येण्यास सांगितले .आतमध्ये सुध्दा सगळीकडेच कपाटांनी भरलेली  पुस्तके व या कपाटांच्या मधोमध एक छोटी जागा मोकळी सोडलेली .व त्याला खिळा सुध्दा मारुन ठेवला होता . ते  " रिटायर्ड " बोटींचे चित्र तिने तेथे लावायला सांगितले .मी पॅकींग केलेले चित्र काढले व त्या ठिकाणी लावले . ते इतके परफेक्ट बसले की जणू कित्येक वर्ष ती जागा माझ्या  पेंटींगची वाटच पहात होते .
         पैशाचे पाकीट तयारच ठेवले होते . तिने ते माझ्या हातात दिले, डोक्यावर प्रेमाने हात ठेवला . गॉड ब्लेस यू असे म्हटले व शांतपणे बाहेरचा रस्ता दाखवला . बाहेर पडताना मी तिच्याकडे पाहीले तर म्हणाली .........
" माजा हाजबंड हाय , ते असाच बसते . "
           मी त्या इमारतीतून बाहेर प्रचंड गर्दीत आलो . रस्त्याच्या फूटपाथवरून मी जरी चालत होतो तरी माझ्या मनात असंख्य विचार येत होते . घरात पारशी बाबा टाय बूट घालून का बसत असेल ? असा निर्विकार शांत मनाने तो कसला विचार करत असेल ? त्याला कोणी दुःख दिले असेल का ? काय तरी त्याचे बिनसले असेल किंवा हरविले असेल का ? त्याला कंटाळा येत नसेल का त्या रोजच्या बसण्याचा ? असे दिवसभर एका जागेवर बसून राहायचे म्हणजे अवघड काम ...... माझ्या मनात प्रश्नावर प्रश्न निर्माण होत होते .
             पुढे मी त्यानां विसरून गेलो . चार पाच वर्षानंतर मी पाचगणीत असताना मला अचानक फोन आला . तोच पारशी टोन, 
" मी पेरीन भरूचा बोलते . मी आता महाबळेश्वर क्लब मंदी हाय  तू भेटायला ये, मला तुला काय  तरी दयायचं हाय तू ये .पक्का प्रॉमिस कर . मीही पक्का प्रॉमिस केला व  ठरलेल्या दिवशी मी महाबळेश्वरला गेलो . संध्याकाळी मी तेथे पोहचलो क्लबच्या ऑफीस मध्ये चौकशी केली . उजव्या बाजूलाच थोडया पायऱ्या असलेली छोटी एकसंघ कॉटेजेस आहेत . त्यातील १ नंबरच्या कॉटेज मध्येच पेरीन उभ्या होत्या. बाहेर व्हरांड्यामध्येच आराम खुर्ची होती व त्यामध्ये पारशी बाबा बसलेले . तीच नजर , तेच निर्विकार आंतरळात पहाणे . मी केलेल्या नमस्काराला प्रत्युतर नाही . बोलणे नाही . मी पेरीन कडे पाहीले . तिने न बोलता एक इंग्रजी पुस्तक माझ्या हातावर ठेवले . महाबळेश्वर क्लब व परिसराची माहीती असलेले . महाबळेश्वर क्लब साठी तिने ते स्वतः लिहले होते . 
वुई एंजॉईंग युवर पेटींग मिस्टर  काले , वुई बोथ लाईक दॅट पेंटींग  , 
तुझा " रिटायर्ड " टायटल लई म्हंजी लईच आवडला .
 मी आरामखुर्चीकडे पाहीले तर म्हणाली 
" माजा हजबंड हाय , ते असाच बसते . "
टाय, सुट ,बुट कडक पारशीबाबा .निर्विकार ,शांत शुन्यात नजर लावून बसलेला . काहीही बोलणे नाही , समोरच्याशी बोलणे नाही , कसलाच प्रतिसाद नाही . एकदम शुन्यात नजर . निर्विकार . कसलेच एक्सप्रेशन नाही . त्याला पाहिल्यानंतर मी परत प्रश्नांच्या खाईत ... मनात प्रश्नावर प्रश्न निर्माण होत होते . काय शोधत असेल हा माणूस ? का शांतपणे न बोलता शुन्यात हरवलेल्या नजरेने बसत असावा ? 
       मला आठवले ते पेंटींग मी तापोळ्याला गेलो होतो त्यावेळी काढले होते . माझा एक शिक्षक मित्र दीपक चिकणे तेथे रुम घेऊन रहात होता .दिवसभर मी तापोळ्याच्या शिवसागर  बोटींग क्लब व बामणोली परिसरात फिरत होतो संध्याकाळी परतताना थोडया अंतरावर ह्या वापरलेल्या ,टाकून दिलेल्या, निरोपयोगी झालेल्या बोटी पडल्या होत्या . मला त्या चकाचक नव्या बोटींपेक्षा या गंजलेल्या , दुर्लक्षित फेकून दिलेल्या बोटींचेच चित्र काढावेसे वाटले . त्याची झिजलेली लाकडे  ,उडालेला रंग पूर्ण गंजलेले लोखंड यांचा इफेक्ट मिळविण्यात मी बराच यशस्वी झालो होतो व त्याला " रिटायर्ड "नाव देऊन मी ते चित्र ब्रोशरमध्ये छापले होते .
           पुढे एकदा आमच्या मुंबईच्या प्रदर्शनावेळी एका पारशी मित्राला मी ही कथा सांगितली . त्यांच्याविषयी विचारले तर म्हणाले , 
" ते पारशी गृहस्थ तर मिस्टर सॅम भरुचा . "
एके काळी तो दिल्लीच्या  सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश होता, रिटायर्ड जज्ज . तो खूप मोठा माणूस  , ऑप्टीमॅस्टीक ॲॅन्ड व्हेरी व्हेरी टॅलेंटेड मॅन , अलसो ही वॉज व्हेरी पॉवरफूल मॅन , व्हेरी स्ट्रीक्ट जज्ज .  यु आर लकी दॅट युवर ओन्ली पेंटींग इन हीज हाऊस .
         आणि अचानक मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली . माझे रिटायर्ड नावाचे पेंटीग त्यांनी का घेतले असावे त्याचे कोडेही अचानकपणे सुटले . मनात खूप दिवस असलेल्या  दिवसांचे शंकेचे उत्तर मिळाले
          त्या दुर्लक्षित, गंजलेल्या,  लाकुड सडलेल्या निरोपयोगी बोटी पूर्वी किती छान  दिसत असतील ? किती  पर्यटकांनीं या बोटीवर व शिवसागर क्लबमध्ये असताना मस्ती , मजा अनुभवली असेल . रुबाब असेल या बोटींचा त्यावेळी मालक त्यांची मन लावून काळजी घेत असणार . आणि आता गरज संपल्यावर त्या एका कोपऱ्यात टाकून दिलेल्या असाव्यात .दुर लोटलेल्या दुर्लक्षित केलल्या ,अडवळणी  कोनाड्यात लांब ,विषन्नपणे तुटलेल्या अवस्थेत त्या आता पडलेल्या आहेत , कदाचित आता अखेरचा श्वास मोजत पडलेल्या या त्याच बोटी त्यांच्याकडे आता कोणीच लक्ष देत नाहीत ..........
            अचानक मला सुपरस्टार राजेश खन्नाचे अखेरच्या दिवसात केलेले एक भाषण आठवले . त्यावेळी त्याने साहीरचा एक शेर म्हटला होता तो शेर असा होता , " इज्जते , शोहरते , उल्फते , चाहते सब कुछ इस दुनिया में रहता नही . आज मै हू जहाँ कल कोई और था , ये भी एक दौर है ...... वो भी एक दौर था " .
    पुढे गुगलवर सहज जस्टीज सॅम भरुचा नावाचा शोध घेतला त्यावेळी कळाले  ते भारताचे तीसावे सरन्यायाधीश होते . कर्नाटक राज्याचे मुख्य न्यायधीश म्हणूनही कार्यरत होते . त्यांच्या काळात त्यांनी जयललीता यानां मुख्यमंत्री पदावरून पायउतार केले होते . अनेक महत्वाचे निर्णय  जस्टीज सॅम भरुचा यांनी त्यांच्या कारकीर्दीत घेतले होते .  कदाचित त्यांचा पूर्वीचा रुबाबदार , उच्चत्तम पदावरचा व्यतित केलेला काळ आठवत असेच खूप गुढपणे शांत बसत असावेत . दूर अंतराळात , निर्विकार चेहऱ्याने ,  आठवणी काढत,  आठवणींचे गाठोडे सोडत बसलेले असावेत, आपला पूर्वीचा रुबाब आठवत बसलेले असावेत .त्या " रिटायर्ड " बोटीप्रमाणे स्वतःच्याच एका 
भूतकाळातील  अनोळखी भावविश्वात..........

सुनील काळे✍️ 
9423966486

ग्रीन टाय

*ग्रीन टाय* 
🌟🌟🌟🌟
        आयुष्य मोठे गमतीशीर असते, किती तरी अकल्पित,नावीन्यपूर्ण, रोमांचक , सुखाच्या, दुःखाच्या घटना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रोज घडत असतात.... आणि विशेष म्हणजे प्रत्येकाचे रोजचे जगणेही वेगवेगळे असते.... एकासारखे दुसऱ्याचे जगणे साचेबंद नसते.
        अशा या आयुष्यात कधीकधी वाईट प्रसंगाची मालिकाच सुरु होते, आणि चांगला कणखर दिसणारा माणूसही निराशेच्या गर्ततेत खोलवर रुतत जातो . काही माणसं चेहऱ्यावर हुशारीचा आव आणत असतात पण मनातून मात्र कोलमडून एखाद्या वटवृक्षाप्रमाणे उन्मळून पडलेली असतात.............. असा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येतोच की खूप झाले जगून, आता नको जगायला यापुढे...... माणसं कबूल करत नाहीत पण आतून त्यांना या प्रसंगाची आठवण धगधग मनात साठलेली असते .
          1995 साली मी मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्रप्रदर्शन केले होते आणि ते सर्व प्रकारे विशेषतः व्यावसायिक स्तरावर यशस्वी झाले . त्याकाळात मी नालासोपारा येथे राहायचो. माझी नोकरी केमोल्ड कंपनीच्या फ्रेमिंग डिपार्टमेंटमध्ये असल्याने कंपनीच्या लोअर परेल, प्रिन्सेस स्ट्रीट, वसई आणि जहांगीर आर्ट गॅलरी येथे मला रोज जायला लागायचे .सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत मी थकून भागून घरी परत यायचो. माझं हे रोजचं रुटीन झालं होते त्या रुटीनला आणि त्या भयानक गर्दीच्या रेल्वे प्रवासाला मी मनापासून कंटाळलो होतो. रोज जगण्याऐवजी मी रोज मरत चाललोय ही भावना खूप खोल ठसली होती माझ्या मनात......
            मला वाई  पाचगणी ,महाबळेश्वर चा निसर्ग खूप आवडायचा म्हणून मी परत कायम मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. पाचगणी मध्ये मला चित्र विक्रीसाठी आर्ट गॅलरी तयार करायची होती या आर्ट गॅलरीच्या ध्येयासाठी मी बेफाम झालो होतो, मी मनापासून प्रयत्न करत होतो. शेवटी सिडने पॉईंटच्या जवळ मला एक जुना बंगला भाड्याने मिळाला त्या जुनाट बंगल्याला आर्ट गॅलरी चे स्वरूप देताना माझे सर्व पैसे कसे संपले हे मलाही कळले नाही तरीही जिद्दीने आम्ही आर्ट गॅलरी सुरू केली अतिशय उत्तम प्रतिसाद सर्व पर्यटकांकडून व स्थानिकांकडून आम्हाला मिळत होता. परंतु एका वर्षाच्या आत घरमालकाने फसवले आणि त्याची जागा परत मागितली मी त्याला अनेक विनंत्या करूनही त्याने नकार दिला. त्यामुळे खऱ्या अर्थाने व्यवसायिक रित्या मी पूर्णपणे कोलमडून पडलो. 
त्यानंतर उतरती कळा लागली ...........
            मग नव्या जागांसाठी शोध सुरू राहिला पुढे पाचगणी क्लब, टेबल लँड वरची गुहा, मॅप्रो गार्डन अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करत राहिलो . प्रत्येक ठिकाणी नवीन अडचण, नवा प्रयोग, नवे इंटेरियर करावे लागायचे. प्रत्येक वर्षी जागा बदलावी लागायची. त्याकाळात मॅप्रो गार्डन येथे उघड्यावर प्लाझा सारखे प्रदर्शन लावले होते. मे महिन्यात एक दिवस अचानक वळवाचा पाऊस वादळासारखा कोसळला आणि सर्व चित्रे, ग्रीटिंग कार्डस, कॅलेंडर, पोस्टर्स, सर्व काही धो धो पावसात भिजून गेले .मॅप्रोचे कोणीही कामगार मदतीस आले नाहीत , त्यामुळे जवळपास सर्व प्रत्यक्ष जागेवर जाऊन काढलेली ओरिजिनल जलरंगातील निसर्ग चित्रे पूर्णपणे बेचिराख झाली. ही ओरिजनल चित्रे पावसामुळे पूर्णपणे धूवून गेली. मॅप्रोच्या मालकांनी कोणतीही मदत केली नाही उलट सर्वच्या सर्व चित्रांचा कचरा ताबडतोब उचलला नाही तर दुसऱ्या दिवशी रस्त्यावर टाकला जाईल अशी धमकी दिली........... आणि पूर्ण देखील केली.......आणि जी अवहेलना  केली ती मनाच्या पटलावर एखाद्याने चाकुचे अनेक वार करावे तशी जखम करुन गेली .
       अतिशय कष्टाने काढलेली मूळ चित्रे धुळीस मिळाल्यामुळे जगण्याचा आधारच संपला .राहायला घर नाही , जगण्यासाठी पैसे नाहीत , घरातून सकारात्मक प्रतिसाद नाही अशा परिस्थितीत सगळीकडे निराशेच्या अंधाराने मनाला ग्रासून टाकले, मनात काळ्या ढगांची काळीकुट्ट गर्जना सतत येत राहू लागली आणि मग सर्व पसारा आवरून मी मुंबईला गेलो तिथे नालासोपारा येथे माझ्या एकुलत्या एक मुलीचा डॉक्टरांच्या चुकीच्या दिलेल्या इंजेक्शनमूळे मृत्यू झाला आणि खऱ्या अर्थाने मी पूर्णपणे धुळीस मिळालो, पूर्णपणे खचलो.
           आणि मग जगण्यात राम नाही ,मजा नाही सर्व ठिकाणी निराशाच निराशा पदरी पडल्यामुळे मग जगायच तरी कसे ?कशासाठी ? असे संघर्षमय जीवन किती वर्ष जगायचे ? सततच्या संघर्षाचाच मला खूप कंटाळा आला म्हणून मी मनातल्या मनात आत्महत्या करण्याचे नक्की केले.
           पाचगणी क्लबच्या समोरच मुख्य रस्त्याला लागूनच छोट्या रस्त्यावर सेंट पीटरचे चर्च आहे त्या चर्चच्या पाठीमागे अँग्लो इंडियन ख्रिश्चन लोकांची दफनभूमी आहे . येथील परिसर अतिशय शांत आणि निसर्गमय आहे.
पाचगणीचा शोध ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याने लावला त्या जॉन चेसन याची दफन केलेली दुर्लक्षित समाधी येथे आहे. 
माहीत नाही का? पण आत्महत्या करण्यापूर्वी त्या थडग्याचे दर्शन घेऊन आत्महत्या करण्याचे मी नक्की केले होते . 
दुपारी दोनच्या सुमारास मी तेथे पोचलो ज्या माणसाने पाचगणीचा शोध लावला, असंख्य फळाफुलांची ,सिल्वर वृक्षांची झाडे लावली ,कॉफी, बटाटे, स्ट्रॉबेरी यांची लागवड केली, या ठिकाणी पहिला बंगला बांधला या परिसराचा संपूर्ण अभ्यास करून हिल स्टेशनला लागणाऱ्या सर्व सुधारणा केल्या, गाईड बुक लिहिले , ब्रिटिशांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या त्या महान जॉन चेसनची दफनभूमी मात्र उघड्यावरच अनेक ऊनपावसाळे झेलत मलूल पडलेली होती. गवतांच्या व काट्याकुट्यां मध्ये कधीही साफसफाई नसल्याने नीट दिसतही नव्हती . मी थोडी बसण्यासाठी जागा साफ केली व डोळे मिटून जॉन चेसन बरोबर बोलत राहिलो . त्याची व माझी पाचगणीकरांनी केलेली दुर्लक्षित अवस्था सारखीच होती. अचानकपणे डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. या निर्जनस्‍थळी मी पूर्णपणे ध्यानस्थ होऊन एकरूप झालो होतो मला कशाचेही भान राहिले नव्हते कितीतरी वेळ मी तसाच सुन्न बसून होतो आणि .................. 
अचानकपणे कोणीतरी खांद्यावर हात ठेवल्याची जाणीव झाली ,डोळे उघडले आणि पाठीमागे पाहिले तो माझा मित्र आयझॅक सिंग दिसला . आयझॅकने मला कडकडून मिठी मारली माझे डोळे पुसले माझे सांत्वन केले आणि माझी निराशेची पूर्ण कथा मनापासून ऐकली. 
          आयझॅक पाचगणीत कम्प्युटरचे प्रायव्हेट क्लासेस चालवायचा संगणक व त्याचे शास्त्र याची त्याला खूप माहिती होती. सर्वांना फार प्रेमाने तो शिकवायचा .
मी चित्रकार असल्याने कॉम्प्युटरवर चित्र, स्केचिंग काढायला प्रोत्साहन द्यायचा.
फुकट शिकवायचा आणि एखादे सुंदर स्केच झाले की खूप कौतुक करायचा. सर्वांना अतिप्रेमाने शिकवत असल्यामुळे अनेक देशी, परदेशी विद्यार्थी त्याच्या क्लासमध्ये आवडीने येत असत. तो सतत बिझी असायचा चालताना देखील धावत धावत चालायचा.... आयझॅक खूप गमतीशीर पण विनोदी माणूस होता .
मी सुसाईड करणार असल्याचे सांगितल्यावर त्याने माझे प्रथम खूप मनापासून अभिनंदन केले .................
आणि मला म्हणाला इतक्या प्रचंड संघर्षाने चित्रकलेचे प्रशिक्षण घेतलेस ,पाचगणी परिसरातील असंख्य चित्रे रेखाटलीस चित्रप्रदर्शने केलीस, पण जागेअभावी तुला खूप त्रास झाला त्याचा मी साक्षीदार आहे. चित्रे पावसात भिजली, तुझे खूप नुकसान झाले याचीही मला जाणीव आहे तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत, तुला यश का मिळाले नाही ? हे मी सांगू शकत नाही तू खूप कष्ट घेतले आहेस त्यामुळे तू आत्महत्या करू नकोस असेही मी तुला सांगणार नाही. पण मी एक तुला विनंती करतो की तुझी जी कला हातामध्ये जिवंत आहे ही तुझ्याबरोबरच संपणार............ 
तर काही दिवस तू बिलिमोरिया स्कूलमध्ये मुलांना चित्रकला शिकव , तेथे कोणीही कलाशिक्षक नाही त्या मुलांना एलिमेंटरी व इंटरमिजिएट या चित्रकला विषयाच्या परीक्षा द्यायच्या आहेत त्यांना गुरुची (कलाशिक्षकाची ) फार आवश्यकता आहे जर तू सुसाईड करून मरून गेलास तर तुझी कलाही तुझ्याबरोबर कायमची मरणार आहे............ 
जर तू ही कला कोणाला शिकवली नाहीस तर या चर्च मधला येशु तुला कधीही माफ करणार नाही .
फक्त एक महिना तु या मुलांना शिकव व नंतर निवांतपणे आत्महत्या कर .तुला मी अडवणार नाही ..........
पण मी चित्रकला कधी शिकवली नाही, ही शाळा इंग्रजी माध्यमाची आहे माझे अे. टी. डी किंवा ए .एम झालेले नाही. ते शाळेतील लोक मला कसे स्वीकारतील ? हे मला जमणार नाही ...  मी कमर्शियल आर्ट शिकलेलो आहे शिक्षण क्षेत्राशी माझा कधी संबंध आला नाही, अशी मी विनंती त्याला केली.
आयझॅक जिद्दी होता त्याने त्याच्या गळ्यातील ग्रीन रंगाची टाय काढली आणि माझ्या गळ्यात घातली. आणि म्हणाला 
" मिस्टर आर्टीस्ट सुनील काळे नाऊ यु आर लुकिंग व्हेरी स्मार्ट आर्टटीचर.. "..... 
तुला मी वचन देतो की तुला कसलाही त्रास होणार नाही कसलाही इंटरव्यू घेतला जाणार नाही, कसल्याही अटी टाकल्या जाणार नाहीत सकाळचा नाष्टा ,दोन्ही वेळचे जेवण, संध्याकाळचा चहा आणि राहण्यासाठी तुला एक  खोली मिळेल. माणसाला जगायला आणखी काय लागते ? अन्न ,वस्त्र निवारा व पर्मनंट जॉब ,
तुला जर या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हे चॅलेंज तु का स्वीकारू नये ? एक महिन्याचा तर फक्त प्रश्न आहे . शिवाय तु जी आत्महत्या करणार आहेस त्याला मी विरोधही करत नाही मग प्रश्न येतो कुठे ? या जगातून जाण्यापूर्वी अनुभवलेले, शिकलेले सर्वोत्तम ज्ञान तू त्या मुलांना दे एवढीच माझी मागणी आहे .
थोडा शांतपणे विचार केल्यानंतर मलाही त्याचे म्हणणे पटले. आपले सर्वोत्तम ज्ञान मुलांना द्यायचे मगच मरायचे .............
असे मी ठरवले.
          दुसऱ्या दिवशी बिलिमोरिया स्कूलमध्ये सकाळी हजर झालो .
प्राचार्य सायमन सरांनी मला अपॉइंटमेंट लेटर दिले आणि एका छोट्या मुलांच्या वर्गात शिकवण्यासाठी पाठवले.
वर्गात प्रवेश केल्यानंतर मला पाहून ती छोटी मुले फार आनंदित झाली त्यांना खूप वर्षांनी आर्ट टीचर मिळाल्यामुळे उत्साह आला होता ती सगळी मुले आणि मुली माझ्या भोवती जमा झाली त्यांची स्वतःची चित्रे, चित्रकलेच्या वह्या ,क्रेयॉन कलरचे बॉक्स दाखवू लागली. मुलांचा उत्साह पाहून मीही खुष झालो आणि त्यांना चित्रकला शिकवू लागलो ,जणू मी माझ्या छोट्या स्वतःच्या मुलीला शिकवत आहे असा भास मला होत होता....... शिकवता शिकवता दोन तास कसे संपले हे मलाही कळले नाही. सायली पिसाळ, आकाश दुबे, उत्सव पटेल , ताहीर अली, अशी अनेक  नावे आजही मला आठवत आहेत. नंतर दुसरा वर्ग ,नवीन तास, नव्या ओळखी नवी उत्सुकता असलेली मुले, त्यांच्या निरागस भावना मला हेलावून गेल्या. नव्याने ओळखीची होत असलेली छोटी मुले व मुली शाळा सुटल्यानंतरही माझ्या खोली भोवती घिरट्या घालत राहिली त्यांना त्यांची नवीन चित्रे दाखवायचा खूप उत्साह असायचा मग मीही त्यांना क्राफ्ट, अरोगामी .चित्रांचे वेगवेगळे विषय उत्साहाने शिकवू लागलो. मीही नियमित त्यांची व्यक्तिचित्रे, स्केचिंग करु लागलो. शशी सारस्वत, संजय अपार सर, दुबे मॅडम, छाया व संजय उपाध्याय, मोहीते सर , नॅथलीन मिस, सुनील जोशी सर ,असे नवीन मित्रही या बिलीमोरिया शाळेत भेटले. अशा रीतीने एक महिना, दुसरा महिना ,तिसरा महिना कसा संपला हे कळलेच नाही..... एक शाळेचे नवे वेगळे विश्व मी अनुभवत होतो ...... हे माझ्यासाठी फार वेगळे जगणे होते. शाळेत मी जरी रोज नवीन शर्ट घालत असलो तरी माझी टाय मात्र एकच होती... आयझॅकने दिलेली  ..... * ग्रीन टाय.*
           अशा रीतीने एक वर्ष संपले आणि मी सेंट पीटर्स या ब्रिटिश स्कूलमध्ये गेलो आणि माझी पत्नी स्वाती बिलिमोरिया स्कूलमध्ये जॉईंट झाली .
         सेंट पीटर्स मध्ये चित्रकला विषयाला खूप प्रोत्साहन मिळत होते मुलं देखील नव नवीन गोष्टी शिकत होती त्याच बरोबर माझी चित्रकला ही नव्याने बहरून येत होती. या नव्या शाळेच्या परिसरातील मी अनेक निसर्ग चित्रे नव्याने रेखाटू लागलो . त्याकाळात माझे चित्रकलेचे प्रदर्शन नेहरू सेंटर , नंतर ओबेराय टॉवर हॉटेल व 2002 मध्ये जहांगीर आर्ट गॅलरी येथे झाले याठिकाणी अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला .
माझी आर्थिक स्थितीही सुधारली 2003 साली मी नवीन रो हाऊस घेतले नवा स्टुडिओ बांधला .
सेंट पीटर्स येथे ड्रेस कोड असल्यामुळे भरपूर कपडे घेतले त्यावेळी माझ्याकडे रंगीबेरंगी 80 टाय झाल्या होत्या. आजही त्या आठवण म्हणून माझ्याकडे आहेत .
पण एक टाय मात्र मी प्रेमाने जिव्हाळ्याने कायमची जपून ठेवलेली आहे .
ती म्हणजे आयझॅक सरांची  
*ग्रीन टाय.*
 
            मी कधीही दुःखी आणि निराशेच्या गर्तते मध्ये असलो की मला आयझॅकची आठवण येते. आता आयझॅक अमेरिकेत असतो त्याने आता लग्नही केलेले आहे .फेसबुकवर अधून मधून भेटत असतो. मी कितीही श्रीमंत झालो, माझी परिस्थिती सुधारली ,बिघडली तरी एक गोष्ट मी त्याला कधीही परत करणार नाही ती म्हणजे  *ग्रीन  टाय .* 
           कारण ती टाय मला स्वतःलाच कधीकधी आयझॅक बनवते. माझ्याकडे कितीतरी कलाकार मित्र येत असतात .काही नवीन शिकणारी असतात, काही निराश झालेले असतात ,काही उमेद हरवलेले कलाशिक्षक असतात, अनेक गोष्टींच्या तक्रारी करत असतात त्यानां मार्ग सापडत नसतो अशावेळी मी काळे सरांच्या ऐवजी आयझॅक होतो नव्हे आयझॅक सर संचारतो माझ्यात............. ज्या ज्या वेळी अशी निराशेने ग्रासलेली , व्यथित, दुःखी माणसे मला भेटतात त्यावेळी आपण प्रत्येकाने आयझॅक झाले पाहीजे असे माझे आंतरमन मला नेहमी सांगत असते, कारण त्याची *ग्रीन टाय* सतत मला आठवण करून देते.
            जीवन हे आत्महत्या करून संपवण्यासाठी नसते तर आपल्यातील सर्वोत्तम देण्यासाठी, सर्वोत्तम जगण्यासाठी ,सर्वोत्तम शिकण्यासाठी, सर्वोत्तम पाहण्यासाठी, सर्वोत्तम शिकवण्यासाठी , सर्वोत्तम ऐकण्यासाठी असते.
           सुदैवाने असे अनेक आयझॅक मला वेळोवेळी भेटत गेले. आणि माझे आयुष्य समृद्ध करत गेले. एकवीस वर्ष झाली आता या घटनेला, आत्महत्या करायचे तर मी कधीच विसरून गेलो आहे. 
          असे अनेक आयझॅक आपल्याला वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या रुपात भेटत असतात. कधी भेटले नसले तर तुम्हालाही असा आयझॅक भेटावा व एक *ग्रीन टाय* मिळावी किंवा.......... तुम्हीच कोणाचे तरी आयझॅक व्हावे आणि त्या निराश माणसाला एक ग्रीन टायसारखी वस्तू द्यावी म्हणजे निराशेचा अंधार कायमचा दुर व्हावा..............
म्हणून खूप 
खूप शुभेच्छा !💐                 
तर अशी  आहे माझी *ग्रीन टाय* ची आठवण..... 
मला व इतरांनाही सतत प्रेरणा देणारी......
🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुनील काळे✍️
9423966486 .

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...