ब्लॉग संग्रहण

गुरुवार, २५ जून, २०२६

पेसी अंकल

* पेसी अंकल * 

              पाचगणीच्या मुख्य रस्त्यावरून महाबळेश्वर कडे जाताना रस्त्यात रश्मी चोक नावाचा बोर्ड दिसतो. त्याच्या बाजूचा रस्ता चेसन रोड आणि याच चेसन रस्त्यावरच थोडं अंतर चालले की दोन पांढरे शुभ्र पिलर्स व त्यावर डाव्या बाजूच्या पिलरवर इंग्रजीमध्ये "मेडस्टोन '' व उजव्या बाजूच्या पिलरवर वीरजी लिहीलं आहे. तोच तो पेसी विरजी अंकलचा बंगला.
               आठ एकर जागेत प्रशस्त ऐसपैस व ब्रिटिशांनी बांधलेला, गेटच्या आत जाताच दोन्ही बाजूला उंचच उंच सिल्व्हर ओकची झाडे आणि प्रशस्त गार्डन. या गार्डन मध्ये बोगन वेलींची कमान आणि उजवीकडे बंगल्याच्या पोर्चमध्ये उभी असलेली शेवाळी रंगाची जुनी फियाट गाडी.
गोरेपान, उंच, पांढरेशुभ्र केस व मिशा ,मिस्किल हास्य, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, पुढाऱ्यासारखे जॅकेट,वार्धक्याने थकलेली मजबूत शरीरयष्टी पण त्यांचा उत्साह मात्र एका तरुणासारखा............
            बंगल्यात प्रवेश करताना डाव्या बाजूला शिलाई मशीनवर सुंदर डिझाईन्स करणारी डॉली आंटी, ती त्यांच्या मोठ्या भावाची विधवा. त्यांचं नाव फिरोज आणि त्यांच्या मृत्युनंतर, आठवणी विसरण्यासाठी सातत्याने मग्न होऊन शिवणकाम करणारी डॉली आंटी . उजव्या बाजूला सागवानी भव्य टेबल व त्या टेबलावर असंख्य वस्तू, पेन स्टँड, फ्लॉवर पॉट, टेलीफोन, जुन्या कागदांची चवड, वर्तमानपत्रे , लिहिण्याचा स्टँड , जुना डायलचा टेलीफोन, प्लबींगचे सामान, रंगाचे सामान , ब्रशेस , स्क्रू ड्रायव्हर्स, गाडीचे पाने, ड्रिल मशीन आणि अनेक छोटया मोटया असंख्य सटरफटर वस्तू व त्यापाठीमागे ऐटीत बसलेले पेसी अंकल. ते त्यांचे छोटे ऑफिस कम प्रवेशद्वार .पेसी अंकलची ही स्टाईल मी कित्येक वर्ष पहात होतो.

              पेसी अंकल घरगुती पण फक्त पारशी लोकांसाठीच हॉटेल चालवायचे,त्यांच्याकडे फक्त ओळखीचेच लोक राहायचे आणि मग राहायला जणू त्यांचा संपुर्ण बंगला वापरायला द्यायचे. त्यांच्या प्रशस्त हॉल मध्ये त्यांच्या आईचे चित्रकार
एस . एल . हळदणकरांनी जलरंगात केलेले पोट्रेट लावलेले होते. त्यांच्या भव्य अशा डायनिंग टेबल वर सगळी गेस्ट मंडळी घरच्यासारखे जेवण करायची. त्यामध्ये कसलीही व्यावसायिकता नसायची.त्यांच्या बंगल्याचे लोकेशनच असे होते की त्यामधून खाली कृष्णा व्हॅलीची सुंदर चिखली गावाची दरी व छोटी छोटी शेती व धोम धरणाचे ,कृष्णा नदीचे विहंगम दृश्य दिसायचे येणारा प्रत्येक माणूस भान हरपून जायचा. 
                त्यांच्या या प्रचंड मोठया माडीच्या बंगल्यात राहणाऱ्या व्यक्ती फक्त तीनच...डॉली आंटी, पेसी विरजी, व त्यांची बॉबकट केलेली......... ब्रिटीशांसारखी दिसणारी गोरीपान ,थोडी बुटकी , फुलाफुलांचे फ्रॉक घालणारी पत्नी डॅफनी... डॅफनी मूळची ब्रम्हदेशातील ....ख्रिश्चन होती व अंकल तेथे नोकरीसाठी गेले होते त्यावेळी त्यांचा प्रेमविवाह झाल्यामुळे पेसी विरजी अंकलची ती फार लाडकी होती. अगदी प्रेमाने ते तिला
' डॉल ' म्हणत व तीही त्यांना प्रेमानेच 
' पेस्तन ' म्हणे............

            हे संपुर्ण कुटुंब कलाप्रेमी, कलासक्त व जीवनातील सर्व आनंद घेणारे असे कुटुंब होते. गावापासून त्यांचा बंगला जरा लांब होता. पण रोटरी क्लब , पांचगणी क्लब, पारशी फायर टेम्पलचे ते अध्यक्ष असल्याने ते गावात प्रसिद्ध होते. पांचगणी क्लबमध्ये उन्हाळी सुट्टीत रोज संध्याकाळी हौजीचा खेळ लावत व तो खेळण्यासाठी अनेक पर्यटक, तसेच स्थानिक ।यांची गर्दी होत असे.

              माझी आणि त्यांची ओळखही ही फार मजेशीर झाली. त्यावेळी मला लँडस्केप
हा शब्दही माहीत नव्हता. पण कोऱ्या कागदावर दिसणारी कृष्णानदी व पांचगणीच्या रस्त्यालगतची वडाची व उंचच उंच सिल्व्हर वृक्षांची झाडे , टेबल लॅन्डची पठारे , रेखाटण्याचा मला छंद लागला होता. एकदा असेच रस्त्याच्या बाजूला चित्र काढत बसलो होतो. अगदी तल्लीन झालो होतो. त्यावेळी अचानक गाडी थांबल्याचा पाठीमागून आवाज आला व जोराने टाळ्या वाजवत पेसी अंकलने त्या चित्राला दाद दिली 
' वेल डन माय बॉय' !

              मराठी शाळेत शिकत असल्याने माझी इंग्रजीची बोंब व त्यांची मराठीची.......पण ते त्यांच्या परीने मराठी बोलण्याचा खूप प्रयत्न करत.....टिपिकल पारसी टोन.........

              पहिल्याच भेटीत ते चित्र पाहून खूप प्रभावित झाले होते. मग त्यांच्या फियाट मध्ये बसवून बंगल्यावर घेऊन आले. त्यांचा सर्व परिसर फिरून दाखविला. माणसांची ती नीटनेटकी अवाढव्य घरे, उंची सागवानी फर्निचर, सोफासेट , टिपॉय, पुस्तकांची भव्य कपाटे, घरातली लावलेली चित्रे, डायनिंग टेबल, असा मोठा थाटमाट मी प्रथमच जवळून पहात होतो.डॉली आंटी व डॅफनी आंटी यांनी माझे फार प्रेमाने स्वागत व कौतुक केले. 

             पुढे मी तिला ढाफनी आंटी म्हणायचो कारण आंटीला मोठा चष्मा लावलेला असायचा.

               पेसी अंकलचे वडील व आजोबा चित्र काढायचे, त्यांची बहीण शिरिन विरजी मोठी शिल्पकार होती . पण पेसी अंकलला चित्रे काढता यायची नाहीत त्यामूळे आपल्या गावात कोणी चित्र काढणारा  " दुर्मिळ " मुलगा सापडल्याचा त्यांना भारी आनंद झाला होता. दुपारची वेळ होती. मग त्यांनी मला त्यांच्या शेजारी डायनिंग टेबलवर बसून जेवायला थांबवले. भारी थाट होता त्यांचा. समोर ताटाखाली छोटे रुमाल , जेवताना 
अॅप्रन, बाजूला ठेवलेले काटे चमचे व चिनी मातीच्या प्लेट्स. त्यादिवशी मटन बिर्याणी , 
ब्रेड, व मटन करी असा बेत होता. काटा चमच्याने मटन खाणे मला अजिबात जमत नव्हते. मी पूर्णपणे बावरून गेलो होतो . माझे सगळे पदार्थ प्लेट बाहेर पडत होते व तरीही पेसी अंकल हसत हसत मला म्हणत होते. तू चांगला ट्राय करते......असाच होते ,पन तुला जमेल.........
मला खाताना त्रास होतोय हे पाहून डॅफनी आंटी पेसी अंकलला ओरडली " Please let him use his hand. Why you are forcing him to eat with forks?" मग त्यांची जुगलबंदी सुरू झाली .
 ती नेहमीचीच होती. पुढे मला ती परिचयाची व सवयीची झाली.
माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच
टेबलावर बसून जेवत होतो आणि असा प्रेमळ पाहुणचार घेत होतो. मग त्यांनी मला त्यांच्याकडची काही चित्रकलेची पुस्तके दाखवली. आयुष्यात मी पहिल्यांदाच लिओनार्दो, व्हॅन गॉग, टर्नर , मोने ही नावे ऐकली. ती चित्रे पाहून मी एका वेगळ्या विश्वातच गेलो. धुक्यात हरवलेल्या बोटीचे टर्नरचे चित्र आजही माझ्या डोक्यात पूर्णपणे बसलेय .
मला जणू खजिनाच सापडला होता . त्या संध्याकाळी एका मंतरलेल्या अवस्थेतच मी घरी आलो . रात्रभर धुके , वारे, हलणारी झाडे,
रेल्वे, व टर्नरचे पुस्तक आणि पेसी विरजींचे अवाढव्य घर डोळयांसमोर सारखे सारखे दिसत होते .

                    मला चित्रात पाचगणीची थंड हवा धुके, वारे चित्रात दाखवण्याचा जणू नादच लागला. आणि पेसी अंकलचे ते फेव्हरेट वाक्य.........."असा इफेक्ट आला पाहिजे फॉगचा, फॉगचा फिल आला पाहीजे, हवा आला पाहीजे.......फॉग एकदम पिक्चर मंधी घुसला पाहीजे....... सतत डोक्यात ही वाक्य घुमायची.

          मी चित्र काढत होतो पण मला कोणतीच चित्रशिक्षणाची पार्श्वभूमी नव्हती .मी सायन्स शिकत होतो आणि माझा जीव चित्रांमध्ये अडकला होता . माझी तगमग पेसी अंकलना समजत होती . "तू सायंटीस्ट नाय आर्टीस्ट हाय, तवा तू आर्ट कॉलेजमंदी जा . लई शिकला पाहीजे तुला " त्यांचे ते शब्द मला नेहमी प्रोत्साहन देणारे ठरले. 
              एकदा ठाण्याच्या ठाणे स्कूल ऑफ आर्टच्या नीलिमा कढे मॅडम व वर्षा कुलकर्णी मॅडम पाचगणीत माझ्या घरी आल्या होत्या. माझी एक पत्र्याची पेटीच भरली होती निसर्गचित्रांची , ती चित्रे त्यांनी पाहीली व मला आर्टस्कूलची माहीती दिली व प्रोत्साहन दिले. त्यानंतर मात्र चित्रकला कॉलेजला जाण्याचे मी मनोमन नक्की केले.

             1985 साली एके दिवशी मी घरातून बारावी सायन्स पूर्ण करून कोल्हापूरला पळून आलो. तेथे एक वर्ष मी फौंडेशनचा कोर्स पूर्ण केला व नंतर पुण्याला आलो . कोल्हापूरला निसर्गचित्रांची एक परंपरा आहे . त्यामुळे मी तोच निसर्ग चित्रांचा ध्यास सातत्याने ठेवला. पुण्यात आल्यानंतर मी कमर्शियल आर्ट शिकण्याचा निर्णय घेतला , सुट्टीमध्ये ज्यावेळी मी पाचगणीला जायचो त्यावेळी मी पेसी अंकलच्या बंगल्यावर हमखास जायचो आणि बंगल्याच्या सभोवतालची , पाचगणी परिसराची खूप निसर्ग चित्रे रेखाटायचो. अंकल ती चित्रे पाहून खूप खुष व्हायचे .......
              त्यांनी मला एक कल्पना सांगितली मी पाचगणी परिसरातील सर्व निसर्गचित्रे काढायची आणि ती त्यांच्याकडे विकायला द्यायची, विकलेल्या चित्रांचे जे काय पैसे होतील ते सर्व पैसे मला देण्यात येतील शिक्षणासाठी त्याचा मला उपयोग होईल आणि कोणत्याही प्रकारचे कमिशन पेसी अंकल घेणार नाहीत. परंतू चित्रे खूप स्वस्तात असली पाहीजेत. ही कल्पना मी ताबडतोब मान्य केली कारण मला कमर्शियल आर्टच्या शिक्षणासाठी व पुण्यामध्ये वसतिगृहात राहण्यासाठी खर्च येत असे.
          पेसी अंकल हे पाचगणी येथील प्रसिद्ध व्यक्तिमत्व असले ,त्यांचा प्रचंड मोठा आठ एकर परिसरातील मेडस्टोन हा वंशपरंपरागत पारंपारिक बंगला असला तरी स्वभावाने मात्र ते अतिशय कंजूष होते .
त्यांच्याकडे खूप आर्थिक संपन्नता असली तरीही कित्येक वर्ष जुनी असलेली फियाट गाडी ते वापरत असत. त्यांना आलेली एकही पत्र ते कधीही फेकून देत नसत उलट या पत्र आलेल्या पाकिटाचा भाग असेल तो पूर्णपणे उघडून त्याच्या पाठीमागे ते पत्र लिहित आणि त्याचा उपयोग करत. (आजही त्यातील काही पत्र माझ्याकडे आहेत. ) त्यांच्याकडे येणारे सर्व कामगार अतिशय कमी पगारामध्ये काम करत असत त्यांच्या कंजूषपणाचे अनेक किस्से हे कामगार मला सांगत असत .
        पेसी अंकल यांना एकूण तीन मुले व एक मुलगी होती.त्यांची तिन्ही मुले उच्च शिक्षण घेऊन इंग्लंडमध्ये स्थायिक झालेली होती. त्यांचे दहा-बारा एकरामध्ये प्रचंड मोठे आलिशान राजवाड्या सारखी घरे होती. पेसी अंकल पावसाळ्यामध्ये कधीकधी तीन-चार महिन्यांसाठी इंग्लंडला जात असत. तेथे वर्तमानपत्र वाचण्यासाठी दोन युरो (2x80=160 रुपये ) लागतात म्हणून ते वर्तमानपत्र अजिबात वाचत नसत .तिकडची एकही वस्तू घेत नसत. तिकडचे राहणीमान हे भारतापेक्षा खूप महाग आहे हे त्यांच्या मनाने खूप गांभीर्याने घेतलं होते. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही मुलाबरोबर पटत नसत. शेवटी मी आपला पाचगणीतच बरा आहे आणि शेवटी मी पाचगणीतच मी मरेन असा निर्वाणीचा इशारा त्यांनी सर्व मुलांना, नातवंडाना दिला होता आणि तो इशारा त्यांनी शेवटपर्यंत पूर्ण केला .

             पेसी अंकलने मला पाचगणी आर्ट गॅलरी व पांचगणी क्लब याठिकाणी प्रदर्शन करण्यासाठी खूप मदत केली ,त्याचप्रमाणे वेळोवेळी माझी चित्रकला विकत घेऊन माझ्या शिक्षणासाठी खूप मदत केली. त्यांची काही चित्रकलेची पुस्तके मला दिली. इंग्लडचे विन्सर अॅन्ड न्यूटनचे महागडे रंग चित्रांच्या बदल्यात मला दिले. एकदा राज्यपाल पी.सी अलेक्झांडर महात्मा गांधी यांनी लावलेले गुलमोहराच्या झाडाचे मी काढलेले चित्र घेण्यासाठी विरजींच्या बंगल्यावर आले त्यावेळी पेसी अंकलचा आनंद गगनात मावत नव्हता.

           एकदा मात्र माझे शिक्षण पूर्ण झाले त्यावेळी मी पाचगणीला कायमचा राहण्यासाठी आलो होतो. असाच एके दिवशी मला पेसी अंकल चा निरोप आला. त्यांच्याकडे कोणीतरी जर्मनी मधून खास पर्यटक आलेले होते आणि त्यांना मेड स्टोन बंगल्याच्या पाठीमागचे कृष्णा व्हॅलीचे एक जलरंगातील चित्र हवे होते .
मी माझे सर्व चित्रकलेचे साहित्य घेऊन बंगल्याच्या पाठीमागे छानपैकी चित्र रंगवत बसलो होतो चित्र रंगवत असतानाच माझा छान मूड लागल्यामुळे मी आणखी काही चित्र रंगविण्यास सुरुवात केली .पेसी विरजींच्या मेडस्टोन बंगल्याच्या पाठीमागे एक खूप मोठी स्टोअर रूम होती . ती नेहमी उघडीच असे.दुपारच्या वेळी मला एक खुर्ची , व छोटे टेबल चित्र ठेवण्यासाठी पाहिजे होते म्हणून मी त्या स्टोअर रूम मध्ये गेलो .तेथे सहजपणे माझी नजर एक चित्रकलेची फाईल कोपऱ्यात होती तेथे गेली. मी ती फाईल सहज उघडली तर त्यामध्ये माझी शिकत असताना काढलेली निसर्ग चित्रे होती , ही सर्व चित्रे वेगवेगळ्या पर्यटकांना विकलेली आहेत असे मला पेसी अंकल यांनी सांगितले सांगितले होते परंतु प्रत्यक्षात मात्र ही चित्रे पेसी अंकल यांनीच विकत घेतलेली आहेत हे मला समजत होते. व वेळोवेळी त्यांनी त्याचे पैसेही दिले होते. म्हणून पुढच्या क्षणी रागानेच मी ती फाईल घेऊन पेसी अंकल यांच्या ऑफिसमध्ये गेलो. 
अंकल त्यावेळी निवांतपणे पेपर वाचत होते .मी त्यांना विचारले की तुम्ही तर माझी चित्रे पर्यटकांना विकली आहेत असे सांगितले, पण चित्रे तर मात्र इथेच आहेत पण तुम्ही पैसे तर मात्र मला सगळे दिले. जर चित्रे विकली नव्हती तर तसं सांगायचे होते मला. असे का केले तुम्ही ? 
त्यावेळी पेसी अंकल त्यांच्या खुर्चीतून उठले आणि मला त्यांनी कडकडून मिठी मारली आणि म्हणाले ..........
सॉरी दिकरा ,तू त्या वेळेस शिकायला आर्ट कॉलेजमंदी पुण्यात होता .......आणि तुला पैशांची गरज होती, मी तुला मदत म्हणून मी पैसे दिले असते तर ते तू घेतले नसते याची मला पुर्ण खात्री होती. पण तुला मदत करणे फार गरजेचं होते म्हणून मी ही सगळी चित्रे वेळोवेळी पर्यटकांनी विकत घेतलेली आहेत असे मुद्दाम खोटेच सांगितले. 
आय ॲम रियली सॉरी फॉर दॅट.......... 
पण चांगल्या कामासाठी खोटा बोलले तर चालते, हे मला माहित आहे.

             पेसीअंकल यांचं हे उत्तर ऐकून माझ्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले . कोण ? कुठला मी ? पण माझे शिक्षण पूर्ण व्हावे मला पैशांची कमतरता जाणवू नये म्हणून स्वतः पैसे पाठवून गेली चार वर्ष ते मला मदत करत होते. आणि ज्यांनी मला जन्म दिला, ते आणि इतर नातलग म्हणवणाऱ्या मंडळीनी माझी कधीही साधी विचारपूसही केली नाही . नात्यातला हा विरोधाभास कायम लक्षात राहीला.

मला अनेक वेळा हा प्रश्न विचारला जातो की पूर्ण चित्रकलेवर तुमचं जीवन कसं जगलं जातं ? कसं भागलं जाते ?
आज मला अभिमानाने सांगावेसे वाटते ही कला जिवंत ठेवण्यासाठी अशी पेसी अंकल सारखी माणसे आहेत ,ज्यांना कला आणि कलाकार यांच्याविषयी आस्था, आपुलकी, प्रेम व मनापासून मदत करण्याची इच्छाशक्ती आहे म्हणूनच कलाकार व त्याची कला जिवंत राहू शकते.

             1995 साली माझे प्रदर्शन मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये होणार आहे, त्या ठिकाणी उदघाटनासाठी सांस्कृतिक मंत्री येणार याचा माझ्यापेक्षा पेसी अंकल यानांच फार आनंद झाला होता. त्या प्रदर्शनासाठी अंकल आपली तब्येत बरोबर नसतानाही मोठ्या उत्साहाने जहांगीर आर्ट गॅलरीला आले होते. त्या प्रदर्शनांमध्ये व्यावसायिक यश मिळाल्यामुळे त्यांना खूपच आनंद झालेला दिसत होता. आपल्या गावाकडचा एक मुलगा 
जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन करतो याचे त्यांना फार कौतुक वाटत होते आणि ते सगळ्या लोकांसमोर बोलून दाखवत होते .पाचगणीत कायमस्वरूपी आर्ट गॅलरी करावी अशी त्यांची फार इच्छा होती. आणि मी सुरु ही केली पण कायमस्वरूपी टिकवू शकलो नाही याची खंतही कायम माझ्या मनात राहीली.

             पुढे म्हातारपण आल्यामुळे पेसी अंकल पूर्णपणे थकले होते हळूहळू डायबेटिस व इतर रोगांनी त्यांना पूर्णपणे घेरले आणि त्यातच त्यांचा अंत झाला .त्यांची पूर्ण प्रॉपर्टी आणि संपत्ती त्यांच्या बहिणीची मुलगी गीता चोक्सी हिने ताब्यात घेतली आणि हळूहळू त्यांचे सर्व सामान , फर्निचर, सर्व वस्तू विकून टाकल्या व अंतिमतः ती जागा शेजारच्या बाथा स्कूलला मोठया किमतीमध्ये विकून टाकली....... आणि माझा, पेसी अंकल व मेडस्टोन बंगल्याबरोबरचा कायमचा संबंध संपवला............

         मी मात्र पेसी अंकलची इच्छा माझ्या 'निसर्ग ' स्टुडीओ व बंगल्याची निर्मिती करून पुर्ण केली आहे...... आजही कोणीतरी सहज बोलता बोलता म्हणून जातं की हा तर पारशी माणसाचा बंगला वाटतो त्यावेळी नकळतपणे माझे डोळे पाणवतात व वाटते पेसी अंकलला हे माझे घर नक्की आवडले असते व मोठयाने टाळ्या वाजवून ते परत परत म्हणाले असते 
 " वेल डन माय बॉय, 
 '' वेल डन माय बॉय " 
ॲटलास्ट यु डीड इट..............

        आजही मी ज्यावेळी शांतपणे विचार करतो त्यावेळी मला जाणवते की अशी पेसी अंकल सारखी माणसे माझ्या आयुष्यात आली नसती तर हा माझा चित्रकलेचा 
काटया -कुट्यातला सदैव अडचणीतला प्रवास फार पूर्वीच संपुष्टात आला असता.

              एखादे चांगलं चित्र झाले आणि मी शांतपणे ते चित्र पहात बसलो की आजही मला टाळ्यांचा आवाज येतो............... आणि मोठ्या प्रेमाने कौतुकाचे शब्द ऐकू येतात 
'' वेल डन माय बॉय, 
" वेल डन माय बॉय " 
आणि मी मनातच नतमस्तक होऊन पेसी अंकलच्या आठवणीत आजही रमून जातो.....................................................................................................................

✍️सुनील काळे [चित्रकार ]
9423966486

मंगळवार, २३ जून, २०२६

*पाऊस चित्रातला *पाऊस मनातला*

पाऊस चित्रातला
पाऊस मनातला
🌧️🌧️🌧️🌧️🌧️
           निसर्ग हा अफलातून कलाकार आहे .त्याने सजवलेल्या  विविध रूपांमुळे , अनोख्या जडणघडणीमुळे , अनेक दृश्य-अदृश्य पैलूंमुळे माणूस मंत्रमुग्ध होऊन जातो . कधीकधी तर त्याचे वर्णन  शब्दांमध्ये करणेही शक्य होत नाही .भारत देशावर तर निसर्गाने इतकी मुक्त उधळण केली आहे की बऱ्याचदा  वाटते की काही भारतीयांना या विशाल समृद्धतेची जाणीव देखील नाही . कारण काही देशामध्ये कंटाळवाणे फक्त दोनच ऋतू असतात तर भारतामध्ये तीन ऋतू आहेत ते म्हणजे हिवाळा ,उन्हाळा आणि पावसाळा . 
           मे महिन्याच्या प्रखर तापलेल्या उन्हामध्ये खूप चालावे लागले आणि जवळपास एखादे झाड किंवा पेलाभर पाणी देखील प्यायला मिळाले नाही की उन्हामुळे गरमीमुळे माणूस अस्वस्थ होत जातो .उन्हाच्या या तप्त झळांमुळे जीवाची प्रचंड काहिली व्हायला लागल्यानंतर मग पावसाचे वेध लागू लागतात . जून महिना सुरू होऊन कधी एकदाचा पाऊस सुरू होतो व सगळीकडे गारवा पसरतो असे वाटते . अर्थात काही जणांना पाऊस खूप आवडतो तर काही जणांना जराही आवडत नाही .

       पण मला मात्र पाऊस खूप आवडतो माझ्यातील चित्रकाराला पावसामुळे नव्या चित्रांच्या तयारीचे वेध लागतात .

         परमेश्वराजवळ माझे न लिहून पाठवलेले असंख्य तक्रारअर्ज आहेत .पण एका गोष्टीची मी कधीही तक्रार केलेली नाही . त्यासाठी मी त्या विश्वनिर्मात्याचा खूप आभारी आहे ,आणि ते म्हणजे त्याने माझे बालपण , तरुणपण पाचगणी , महाबळेश्वर ,वाई या निसर्गाने समृद्ध असलेल्या परिसरात घडवले . आपण ज्या परिसरात वाढतो त्या देशाचा , राज्याचा , जिल्हयाचा , गावाच्या आजूबाजूच्या नैसर्गिक वातावरणाचा आपल्यावर सतत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे खूप प्रभाव पडतो . माझ्यावर तर या परिसरातील 
निसर्गदैवतांचे अनेक उपकार आशीर्वाद आहेत आणि त्यासाठी मी माझ्या चित्रातून नेहमीच कृतज्ञता व्यक्त करतो .
          लहानपणापासून पाचगणीत वाढलो . या गावाला अचंबित करणारे सपाट डोंगराचे टेबललँड नावाचे पठार देवाने उदारपणे बहाल केले आहे . आशिया खंडातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे पठार म्हणून ते प्रसिद्ध आहे . उन्हाळ्यात या पठारावरून फेरफटका मारला की लक्षात येते पूर्वेकडचे मांढरदेवीचा डोंगर ,पांडवगड , कमळगड , नवरा-नवरीच्या डोंगरांच्या रांगा पश्चिमेकडच्या भिलार , तायघाट गावच्या परिसरात व दक्षिणेकडे राजपुरी ,खिंगर परिसरातील डोंगरात लावलेल्या वणव्यांमुळे वनश्री भकास दिसत असते . त्यातील हिरवाई पूर्णपणे नष्ट होऊन काळे कभिन्न  झालेले डोंगर पाहताना संवेदनशील पर्यटकही खूप नाराज झालेले असतात . पण पावसाळ्यात मात्र येथे निसर्गाच्या चमत्काराला सुरुवात होते आणि या डोंगर परिसरातील सृष्टीसौंदर्य स्वर्गालाही लाजवणारे ठरते .
          पाचगणीत महाबळेश्वरच्या मानाने खूपच कमी पाऊस पडतो . महाबळेश्वरमध्ये हे नीरस  उदास व जनजीवन विस्कळीत करणारे वातावरण प्रचंड पावसामूळे सुरु होते असे हवामान मात्र पाचगणीला नसते .महाबळेश्वरला एकदा पावसाने जोर धरला की चार-पाच दिवस संततधार पावसाने खूप कंटाळा येतो . काहीजण घराला प्लास्टिक कापडाचे आवरण लावतात, काहीजणांच्या घराला गवताच्या पेंड्या बांधून केलेले संरक्षण असते तर काही इमारतींना पत्र्याची उभी पाने लावून संरक्षक तटबंदी तयार केलेली असते . त्याशिवाय घर सुरक्षित राहू शकत नाही .कारण पावसामुळे सगळ्या भिंतींना ओल पसरून घरातच थंडीचे एक कुबट वातावरण तयार होते . आता नव्याने आलेली इलेक्ट्रॉनिक माध्यमे व इंटरनेट , मोबाईल यांच्यामुळे निदान चांगला टाईमपास तरी होतो व थोडी करमणूक होते .पण पूर्वीच्या काळात महाबळेश्वरच्या पावसामुळे अनेकांच्या जीवाचे हाल होत असत व आजारपणामुळे ते तात्पुरते स्थलांतर ही करत असत .पाचगणीचा पाऊस आरोग्यदायी आणि उत्तम प्रकृती ठेवणारा आहे . तिन्ही ऋतूंमध्ये येथील वातावरण आल्हाददायक आहे याचा अभ्यास करून ब्रिटिशांनी येथे मुला-मुलींच्या शाळा वसवल्या . त्यापैकी सेंट जोसेफ या शाळेने नुकतेच 126 व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे .
           मी मराठी शाळेतून संजीवन या मोठ्या शाळेत मराठी माध्यमातच शिकण्यासाठी गेलो .ही शाळा गावापासून जरा थोडी लांब होती .माझे मित्र घनःश्याम कारंजकर ,संजय भिलारे  व विलास निंबाळकर व मी आमची एक छान पैकी चौकडी जमली होती . आम्ही सगळेजण एकत्र शाळेत जायचो . पावसाळ्यात आत्ताच्या सारखे त्यावेळी उंच फुटपाथ बांधलेले नव्हते . रस्त्याच्या बाजूला चांगली मोठी खोदलेली गटारे होती . या वाहत्या पाण्यामध्ये आम्ही चौघेजण कागदाच्या बोटी करून सोडायचो .या बोटीच्या वेड्यावाकड्या प्रवासातील गंमत न्याहाळत आमचा शाळेमध्ये प्रवेश व्हायचा .आमच्याकडे हॉकी खेळण्यासाठी स्टिक्स नव्हत्या मग पावसाळ्यातील मोठ्या छत्र्यांच्या दांड्याने आम्ही प्लास्टिक पेपरचा गुंडाळा केलेला बॉल भर रस्त्यातच खेळत खेळत  शाळेतून घरी यायचो. हॉकीची लाकडाची खरी  स्टिक नाही याची आम्हाला कधीही खंत किंवा दुःख झाले नाही .
       याच काळामध्ये मला बहुदा चित्रकार व्हायचे वेड लागले मी पावसाची चित्रे काढायचा प्रयत्न करायचो . खूप आटापिटा करायचो पण चित्रात खऱ्या पावसासारखे इफेक्ट यायचे नाहीत . लहान असल्याने व चित्रतत्रांची माहीती नसल्याने पावसाची चित्रे एवढी प्रभावी व्हायची नाहीत .
               माझा मित्र घन:श्‍याम एकदा पूर्ण भिजलेल्या अवस्थेत नखशिखांत
ओलाचिंब होऊनच माझ्या घरी आला . त्याची कपडे पूर्णपणे भिजलेली होती . अस्ताव्यस्त झालेले केस , त्यावरून ओघळणारे पाणी पाहून मी त्याला चांगलेच फैलावर घेतले .कशाला असा पावसात भिजत आलास ? असे विचारले असता तो सहजपणे म्हणाला 
" असा भिजलो नसतो तर कविता कशी सुचली असती ? " 
मग माझ्याकडून एक कोरा कागद घेऊन त्याने पावसाची एक सुंदर अप्रतिम कविता लगेच लिहून काढली व मला म्हणाला 
पावसाची चित्रे , 
पावसाची गाणी , 
पावसावरचे काव्य , 
पावसाचे लेखन असे घरात बसून निवांत करायच्या गोष्टी असतात का ? 
" चित्रासाठी एकदा तरी चिंब भिजून  खरा पाऊस कधी  अनुभवलास का ? एकदा माझ्यासारखा नखशिखांत भिजलास की तुला खरा पाऊस कसा असतो ते कळेल . मग आम्ही दोघेही पावसात भिजलो , व्हॅलीमध्ये भरपावसात भिजत भ्रमंती केली . कोसळणाऱ्या पावसाच्या त्या धुक्याच्या साम्राज्यात हरवून जायला शिकलो .

मग पाऊस माझा व मी पावसाचा एकमेकांचे खरे मित्र झालो.

मग भरपूर पावसाची चित्रे काढण्याचा सपाटाच लावला .

          पाचगणी गाव ते वाईचा जकात नाका यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंचच उंच अशी वडाची अनेक झाडे आहेत .त्या झाडांची भिजलेली , हिरवट झालेली मोठी खोडे ,त्याच्या विशाल फांद्या , रस्त्यावर चमकणारे पाणी , त्या झाडांची रस्त्यावर पडलेली प्रतिबिंबे मला आवडू लागली. हळुवार जपून चालणारे सायकलस्वार ,चौकातील लगबगीने छत्री घेऊन चालणारी माणसे , काळ्या पिवळ्या रंगातील वडापच्या जीपगाड्या ,शाळेचा रेनकोट घालून बोट धरून चालणारी छोटी छोटी मुले ,विद्यार्थी व त्यांच्यासोबतचे पालक , कधी नवनवे पर्यटक रंगविताना मजा यायची. टेबललॅन्डचे उंच पसरलेले कडे त्यामधले धुक्याचे थर , एम .आर . ए सेंटरची धुक्यातून चमकणारी इमारत , त्याच्या बाजूला असलेली सिल्वर ओक्स व इतर प्रचंड मोठ्या वृक्षांची झाडी , पावसात चमकणारे कृष्णा नदीचे पात्र ,नगरपालिकेच्या आंबेडकर उद्यानाजवळची झाडे , त्या झाडांच्या रस्त्यातून भर पावसात वेगाने पाणी उडवत जाणारी वाहने ,एखादा लाल किंवा निळ्या रंगाचा टेम्पो , बाजारपेठांमधील छत्री घेऊन गडबडीने जाणारी माणसे ,पांगारी , तायघाट  गावाजवळची व सिडनेपाईंटच्या परिसरातील कृष्णाव्हॅलीतील घरे .भाताच्या शेतीसाठी तुंबवलेली छोटी छोटी शेततळी , दरीवर ढगांचा तयार झालेला राक्षसासारखा मानवी आकार किंवा वेगवेगळे प्राण्यासारखे दिसणारे भव्य आकार चित्रातून दर्शवताना मजा यायची .आकाशात चाललेले  धुके व ढगांच्या वेगवेगळ्या आकाराचा हा नयनरम्य खेळ बराच वेळा जाणीवपूर्वक निरीक्षण करताना मी तहानभूक विसरून जायचो .
         महाबळेश्वरला तर धुक्याचेच साम्राज्य सगळीकडे पसरले की चित्रातही ग्रे कलरचे आकाश यायला लागायचे . एकदा मित्रासोबत एलफिस्टन पॉईंटला गेलो होतो पण आकाशात ढगांचे इतके मोठमोठे पुंजके , धुकेच धुके पसरले की जणू पृथ्वीवरच संपूर्ण आकाश उतरले की काय ? असे वाटू लागले . पुढे असणारा रस्ताही दिसेनासा होतो .
ऑर्थरसीट पॉईंटच्या दरीतून निळ्या ,जांभळ्या ढगांच्या कापसासारख्या हळुवार लाटा पाहिल्या की आपण स्वर्गातून खाली दिसणारा अनोखा जादूचा खेळ पाहतो की काय असे वाटते .केटस् पॉइंट ,लॉडविक पॉईंट ,वेण्णा लेक व इतर पाईंटचा परिसरही मला चित्र काढण्यासाठी नेहमी प्रेरणादायी ठरतो .
          वाईला अधून-मधून जोराचा पाऊस पडतो त्यावेळी गणपती घाट , गंगापुरीचा घाट व धोम धरणाचा परिसर एका वेगळ्याच कलर स्कीममध्ये पावसाळ्यामध्ये चित्रात दाखवता येतो .
          कोकणात जाताना ताम्हिणी घाटातील धबधबे , समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा , आकाशातील ढगांचे रौद्ररूप , कोळी व त्यांच्या बोटी , त्या बोटींवरचे वेगळ्या रंगातील झेंडे ,उन्हाने चमकणारे समुद्रकिनारे ,कोळ्यांच्या जाळी फेकण्याच्या ,बोटी ढकलतानाच्या हालचाली मला पावसात चित्रे काढण्यासाठी प्रोत्साहित करतात .
         महाबळेश्वरचा  लिंगमळ्याचा धबधबा , भिलारचा वॉटरफॉल ,पोलादपूर महामार्गावरचे धबधबे डोंगर कपाऱ्यांवरून पडणारे पाणी पाहिले की मला आपण माणसे निसर्गापुढे किती छोट्या उंचीचे व खुजे व्यक्तिमत्वाचे आहोत याची प्रकर्षाने जाणीव होते .
           पाऊस मला आवडतो त्यामागे आणखी एक खरे कारण आहे .
ज्यांच्या सोबत मी बालपणी लहानाचा मोठा झालो ते माझे सख्खे तीनही मित्र आता माझ्यासोबत नाहीत .काळाने तिघांच्याही बाबतीत मोठा विचित्र आघात करून तिघांचेही निधन झाले . माझ्यावर नितांत प्रेम करणारी स्वातीची आई या जगातून निघून गेली .माझ्या काळजाचा तुकडा असलेली माझी एकुलती एक छोटी मुलगी  ' दिशा ' आम्हाला दिशाहीन करून कायमची पैलतिरी गेली .
           ज्या जवळच्या मित्रांनी फसवले, अगदी जवळच्या नातेवाईकांनी संकटकाळात माझ्याकडे पाठ फिरवली , माणसांच्या वाईट व्यवहारामुळे ,
कृत्यांमुळे कधीकधी मला जीवन नकोसे झाले , माझे मन उदास व सैरभर झाले . माझे आर्थिक ,शारीरिक ,मानसिक ,
नुकसान झाले .त्यांच्या दिलेल्या वेदनांमुळे , दुःखामुळे अनेकदा अचानकपणे डोळ्यात अश्रू येतात .
         जी जवळची माणसे मला आता कायमची दूर सोडून गेली त्यांच्या आठवणींनी माझे मन गदगदून , गलबलून ,गहिवरून येते आणि डोळ्यात  पुन्हा खूप अश्रू तयार होतात . या सगळ्या दुःखदायक घटना मी दरवर्षी पूर्णपणे विसरून  जातो व परत नव्या दमाने , नव्या जोशाने पुन्हा पावसात भिजतो आणि मनातला पाऊस चित्रामध्ये रंगविण्यास सुरवात करतो . तुम्ही देखील तसेच करा सगळ्या वाईट आठवणीनां मनातून  हद्दपार करून नव्याने पावसात भिजा नव्याने पुन्हा पाऊस अनुभवा मग परत नव्या आशा ,नवी उमेद व नवीन चित्रे रेखाटण्यास मनाला प्रेरणा मिळेल.

मला पाऊस आवडतो , कारण मी एकटाच पावसात फिरताना  वाहणारे डोळ्यातील हे अश्रू कोणालाही दिसत नाहीत .

पावसाच्या पाण्यात  डोळ्यात आलेले हे अश्रू पावसातच पुन्हा वाहून जातात .
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
पावसाच्या पाण्यात  डोळ्यात आलेले हे अश्रू पावसातच पुन्हा वाहून जातात .
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

* म्हणून मला मनातला  पाऊस चित्रात रंगवायला खूप खूप आवडतो .*

सुनील काळे
9423966486
Rain in the picture
Rain is on my mind.
🌧️🌧️🌧️🌧️🌧️
           Nature is a wonderful artist. Man is enchanted by the various forms it has decorated, its unique structure, its many visible and invisible aspects. Sometimes it is not even possible to describe it in words. Nature has spread so freely over the country of India that it often seems that some Indians are not even aware of this vast richness. Because in some countries there are only two boring seasons, while in India there are three seasons, namely winter, summer and monsoon. 
           In the intense heat of May, one has to walk a lot and there is not even a tree or a glass of water to drink, which makes one feel uncomfortable due to the heat. After the scorching heat of the sun starts causing a lot of discomfort, then one starts to crave for rain. With the onset of June, it starts raining once and a while and it seems like there is a drizzle everywhere. Of course, some people like rain a lot, while some do not like it at all.

       But I love rain very much. The painter in me is excited to prepare new paintings because of the rain.

         I have countless unwritten complaints to God. But I have never complained about one thing. For that, I am very grateful to the Creator of the Universe, and that is that He made my childhood and youth in the nature-rich areas of Panchgani, Mahabaleshwar, and Wai. The natural environment of the country, state, district, and village in which we grow up constantly has a great impact on us, directly or indirectly. On me, the environment of this area 
There are many blessings from the gods of nature, and for that I always express gratitude through my paintings.
          I grew up in Panchgani since childhood. God has generously bestowed upon this village a plateau called Tableland, which is a flat mountain plateau that amazes. It is famous as the second largest plateau in Asia. When you take a walk on this plateau in summer, you notice the Mandhardevi mountain in the east, Pandavgad, Kamalgad, Navra-Navri mountain ranges, the Bhilar, Taighat village area in the west and the mountains in the Rajpuri and Khingar area in the south. The forests look desolate due to the fires set in the mountains. Even sensitive tourists are very upset when they see the mountains that have completely destroyed their greenery and turned black. But during the monsoon, the miracle of nature begins here and the beauty of this mountain area embarrasses even heaven.
          Panchgani receives very less rainfall compared to Mahabaleshwar. However, the weather in Mahabaleshwar is not like that of Panchgani. Once the rains start, Mahabaleshwar gets very tired of the continuous rain for four-five days. Some people cover their houses with plastic cloth, some have their houses protected by tying grass mats, while some buildings are protected by erecting leafy walls. Without that, the house cannot be safe. Because due to rain, moisture spreads on all the walls and creates a cold atmosphere in the house. Now, with the newly introduced electronic media and internet, mobile phones, at least it is a good time pass and some entertainment. But in the past, the rains of Mahabaleshwar used to cause problems for many people and they used to migrate temporarily due to illness. The rains of Panchgani are healthy and maintain good health. The British, having studied the pleasant climate here in all three seasons, established schools for boys and girls here. Among them, St. Joseph's School has recently successfully debuted in its 126th year.
           I went from Marathi school to Sanjeevan, a big school in Marathi medium. This school was a little far from the village. My friends Ghanshyam Karanjkar, Sanjay Bhilare and Vilas Nimbalkar and I were a nice group of us. We all used to go to school together. During the monsoon, there were no high footpaths built like now. There were big dug drains on the side of the road. The four of us used to make paper boats and launch them in the flowing water. We used to enter the school watching the crazy journey of this boat. We did not have sticks to play hockey, so in the rainy season, we used to play with a ball wrapped in plastic paper on the road and come home from school with the poles of big umbrellas. We never felt sad or regretted that we did not have real wooden hockey sticks.
       During this time, I probably became obsessed with becoming a painter. I used to try to paint pictures of rain. I would try very hard, but the pictures would not have the effect of real rain. Since I was young and did not know how to paint, the pictures of rain would not be that effective.
               My friend Ghanshyam once went to Nakshikhan in a completely soaked state.
He came to my house soaked. His clothes were completely soaked. Seeing his messy hair and the water dripping from it, I hugged him tightly. When asked why did you come soaking wet in the rain? He simply said 
"If I hadn't been so wet, how would the poem have come to me?" 
Then he took a blank piece of paper from me and immediately wrote a beautiful and wonderful poem about rain and said to me, 
Rain pictures, 
Rain songs, 
Poetry on rain, 
Are there things to do while sitting at home and relaxing, like writing about the rain? 
"Have you ever experienced real rain by getting soaked to the bone for a painting? Once you get soaked to the bone like me, you will know what real rain is like. Then we both got soaked in the rain, wandering around the valley soaked in the pouring rain. We learned to get lost in the misty kingdom of the falling rain."

Then the rain became my true friend and I became the rain's true friend.

Then I decided to take pictures of the heavy rain. ।

          There are many tall banyan trees on both sides of the road from Panchgani village to Waicha Zakat Naka. I started liking the soaked, green trunks of those trees, their huge branches, the water shining on the road, the reflections of those trees on the road. Cyclists moving slowly and carefully, people walking with umbrellas in the square, black and yellow Vadap jeeps, small children wearing school raincoats and holding hands, students and their parents, and sometimes new tourists. It was fun to paint the high spreading edges of the tableland, the layers of fog in between, M.R. The A Center building shining through the fog, the silver oaks and other huge trees next to it, the Krishna river bed shining in the rain, the trees near the Ambedkar Park of the municipality, vehicles speeding through the road of those trees in heavy rain, a red or blue tempo, people hurrying with umbrellas in the markets, the pangari, the houses in the । Krishna Valley near Tayghat village and in the Sydney Point area. The small ponds dug for rice cultivation, the giant human-like shapes of the clouds formed on the valley or the magnificent shapes that looked like different animals, I used to enjoy depicting them in pictures. While consciously observing this picturesque play of fog and different shapes of clouds in the sky, I used to forget my thirst and hunger many times.
         In Mahabaleshwar, when the fog spread everywhere, the sky would start to look gray even in the pictures. Once I had gone to Elphinstone Point with a friend, but there were such huge clusters of clouds and thick fog in the sky that it felt as if the entire sky had descended on Earth. The road ahead would also disappear.
When I look at the gentle waves of blue and purple clouds from the valley of Orthersit Point, I feel like I am witnessing a unique magical play from heaven. The surroundings of Cates Point, Lodwick Point, Venna Lake and other points also always inspire me to take pictures.
          When Wai receives occasional heavy rains, the Ganpati Ghat, Gangapuri Ghat, and the Dhom Dam area can be depicted in a different color scheme during the monsoon season.
          While traveling to Konkan, the waterfalls of Tamhini Ghat, the crashing waves of the sea, the thunderous appearance of the clouds in the sky, the fishermen and their boats, the different colored flags on those boats, the beaches shining in the sun, the movements of the fishermen throwing their nets and pushing their boats encourage me to take pictures in the rain.
         When I saw the Lingamla waterfall in Mahabaleshwar, the waterfall in Bhilar, the waterfalls on the Poladpur highway, the water falling from the mountain cliffs, I was deeply aware of how small and insignificant we humans are in front of nature.
           There is another real reason why I like rain.
All three of my best friends with whom I grew up in my childhood are no longer with me. Time has taken a strange toll on all three of them and they have passed away. Swati's mother, who loved me deeply, has left this world. My only little daughter 'Disha', who was a piece of my heart, has left us directionless and gone to the other side forever.
           Those who were betrayed by close friends, those who were even close relatives who turned their backs on me in times of trouble, because of the bad behavior of people,
Sometimes my actions made me feel unloved in life, my mind became sad and full of worries. My financial, physical, mental,
The damage was done. The pain and sorrow they inflict often bring tears to my eyes.
         My heart aches, trembles, and is filled with the memories of those close to me who have left me forever. Every year, I completely forget all these sad events and, with renewed vigor and enthusiasm, I get soaked in the rain again and start painting the rain in my mind. You too should do the same. Banish all the bad memories from your mind and get soaked in the rain anew. Experience the rain anew. Then your mind will be inspired to draw new hopes, new hopes, and new pictures.

I love the rain, because no one sees the tears flowing from my eyes when I walk alone in the rain.

These tears that fall into the eyes in the rain water flow back into the rain.
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
These tears that fall into the eyes in the rain water flow back into the rain.
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

That's why I really like to paint the rain in my mind.*

Sunil Kale ✍️
9423966486

बुधवार, ६ मे, २०२६

ऑर्थरसीट पॉईंट महाबळेश्वर - एक थरारक अनुभव

ऑर्थरसीट पॉईंट : एक थरारक अनुभव
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
                 महाबळेश्वर आणि पाचगणी ही महाराष्ट्राची खूप प्रसिद्ध व निसर्गरम्य गिरीस्थाने आहेत. सातारा जिल्हा असलेले पाचगणी हे शैक्षणिक केंद्र आणि महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटन क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून सुप्रसिद्ध आहे .
       मी तर लहानपणापासून पाचगणीमध्येच वाढलो. पाचगणीच्या जीवन शिक्षण विद्यामंदिर या मराठी शाळेमध्ये माझे प्राथमिक शिक्षण झाले. प्रत्येक वर्षी खूप पावसाळ्यामूळे , सततच्या अतिवृष्टीमुळे सर्व शाळांना व बोर्डींग स्कूलला सुट्टी असायची . घराबाहेर प्रंचड पाऊस पडायचा त्यामुळे कुठे जाता येत नव्हते. अशावेळी मी सुट्टीत दरवर्षी लहानपणी महाबळेश्वरला जायचो .
           महाबळेश्वरला माझे काका राहत असत त्यांच्या मुलांनाही पावसाळ्यातच सुट्टी असायची. त्याकाळात पाऊसही प्रचंड आणि वेळेवर पडायचा . महाबळेश्वर मध्ये पावसामध्ये सर्वजण थंडीने खूपच गारठून जायचे.
पस्तीस चाळीस वर्षांपूर्वीचे आजही मला आठवते की महाबळेश्वरची सर्व हॉटेल्स , बंगले , दुकाने घराच्या भिंतीचे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून गवताच्या पेंड्या बांधलेल्या झावळ्यांनी, किंवा लोखंडी नळीच्या पत्र्याची उभी पाने लावून सर्व इमारती , घरे, शासकीय कार्यालये, श्रीमंतांचे बंगले पूर्णपणे एकच छोटा दरवाजा उघडा ठेवून बाकी पूर्णपणे बंद केलेल्या अवस्थेत असत .
त्या काळामध्ये निळे , पिवळे प्लास्टिक किंवा मोठ्या ताडपत्र्या वापरल्या जात नसत, ती पद्धत आजकाल सुरू झालेली आहे .
         महाबळेश्वरला माझे काका नगरपालिकेमध्ये काम करत होते यांचे नाव गंगाराम काळे त्यांना सर्वजण बापू म्हणत. बापू ,नानी त्यांची राजेश, संजय आणि सुरेखा नावाची मुलगी असा परिवार होता . त्यात पंधरा वीस दिवसांसाठी मी त्यात भर पडायचो . नगरपालिकेच्या पाठीमागे त्यांच्या सरकारी क्वॉटर्स होत्या .
पावसाळ्यामध्ये प्रचंड पाऊस दाट धुके आणि थरकाप उडवणारी थंडी यामुळे बाहेर जास्त फिरता यायचे नाही घरांमध्येच सतत कोळशांची घमेल्यात शेकोटी पेटवून आम्ही पुस्तके वाचणे किंवा पत्ते व इतर बैठे खेळ खेळत असू .ज्यावेळी पाऊस कमी असेल त्यावेळी आम्ही जवळच्या महाबळेश्वर क्लब ,पोलो ग्राउंड ,वेण्णालेकचा परिसर , बाजारपेठ व जवळचे पॉईंट बघत असायचो.
             परंतु 13 किलोमीटर दूर असलेला ऑर्थरसीट पाईंट मात्र मला बघायला मिळत नव्हता, प्रत्येक वर्षी ऑर्थरसीट पाईंट बघणे हे माझे स्वप्न अधुरेच राहिले .
महाबळेश्वर मध्ये प्रत्येक जण बोलताना एकदा तरी ऑर्थरसीट पॉईंट पाहिला पाहीजे असे जणू पंढरपुरच्या विठोबाचे दर्शन वारकऱ्याने एकदा तरी घेतले पाहीजेच याच भक्तीभावाने बोलत असे , ऑर्थरसीट पॉइंटचे काही फोटोग्राफ , पोस्टकार्डस् मी पाहिली होती परंतू प्रत्यक्ष जावून दर्शन झाले नव्हते.
            कित्येक वर्ष स्वतःचे वाहन नसल्याने किंवा कोणी बाहेरचे नातेवाईक यांनीही आम्हाला ऑर्थरसीट पॉईंटचे दर्शन घडवले नाही . कारण आम्ही लहान होतो .
त्यामुळे ऑर्थरसीट पॉईंट विषयी माझ्या मनात कायमच उत्सुकता राहिली होती . एकदा तर मराठी शाळेची ट्रिप गेली होती परंतु त्यावेळीही ऑर्थरसीट पॉईंट लांब असल्याने पाहताच आला नाही.

            पाचगणीत राहत असूनही कित्येक वर्ष मी ऑर्थरसीट पॉईंट पाहिला नव्हता. पुढे शिक्षणासाठी कोल्हापूर ,पुणे व नंतर मुंबई येथे गेल्यामुळे मी आर्थरसीटच्या दर्शनाचे महत्त्व पूर्णपणे विसरून गेलो .

            1995 साली माझी जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शनाची बुकींगची तारीख पक्की झाली होती. मी पाचगणीला सहा महिने केमोल्ड फ्रेम्समधले कंपनीचे काम अर्धवट सोडून आलो होतो. कंपनीचे मालक श्री.केकु गांधी यांनी मला सांगितले की तुझे जहॉंगीर आर्ट गॅलरी मधील प्रदर्शन यशस्वी झाले तर तू चित्रकार म्हणून काम कर पण जर तुला आर्थिक अपयश आले तर तुला परत कंपनीमध्ये नोकरी करावी लागेल . म्हणजे परत आयुष्यभर मुंबईला राहावे लागणार होते. कारण माझ्यावर घराचे बँकेचे कर्ज व मालकांचे कर्ज होते.ती रक्कम दिल्याशिवाय मी कंपनी सोडू शकत नव्हतो .
             मी मुंबईला रेल्वे प्रवासामूळे वैतागलो होतो त्यामुळे मला यश मिळवणे फार फार गरजेचे होते ते एक मोठे चॅलन्जच होते व ते चॅलेन्ज मी सहा महिन्यात पूर्ण करायचे गांभीर्याने स्विकारले होते .
खूप वर्षानंतर आल्यामुळे मी प्रथम पाचगणी येथील चित्रे काढली ,त्यानंतर इतर सर्व पॉईंट, प्रतापगड , तळदेव व तापोळा या ठिकाणी मी चित्रे काढायला गेलो होतो. चार पाच महिने मी वेडयासारखा सतत चित्रे काढत फिरत होतो.
              शेवटच्या टप्प्यात मात्र मला ऑर्थरसीट पॉइंटची जाऊन चित्रे काढायची होती परंतु येथे जाण्यासाठी माझ्याकडे स्पेशल स्वतःचे वाहन नव्हते. एक दिवस पाचगणीवरून सकाळीच चित्रकलेचे सर्व सामान घेऊन मी महाबळेश्वरच्या एसटी स्टँडवर पोहोचलो त्या ठिकाणी मला ऑर्थरसीटला जाण्यासाठी काही वाहन मिळते का ? याची मी चौकशी करत होतो, त्याचवेळी पाचगणीचे टॅक्सी चालक व शेजारीच राहणारे ओळखीचे जयवंत शिंदे (भाऊ ) नावाचे गृहस्थ भेटले . त्यांची स्वतःची टॅक्सी होती. ते पाचगणी वरून एका नवविवाहीत जोडप्याला घेऊन महाबळेश्वर दर्शनासाठी आले होते .मला सकाळी सकाळीच टॅक्सी स्टँडवर आवारात फिरत असताना त्यांनी पाहिले व मला कारण विचारले .मी त्यांना मला ऑर्थरसीट पॉइंटला जाऊन चित्र काढायचे आहे असे सांगितले . ते देखील तिकडे जाणार होते मग त्यांनी मला ड्रायव्हर जवळच्या सीटवर बसवून मला आर्थरसीट पॉइंटपर्यंत पोहोचवले .
ऑर्थरसीट पॉईंटला जायच्या अगोदर आम्ही एलफिन्स्टन पॉइंटला गेलो .जाताना मार्जेरी पॉईंट, सावित्री पॉईंट, मंकी पॉईंट, कॅसल रॉक यांचेही दर्शन घेतले.
               मला मात्र कधी एकदा आर्थरसीट पॉइंटला पोहोचतो त्याची ओढ लागली होती सकाळी दहा वाजता आम्ही ऑर्थरसीट पॉईंटच्या जवळ पार्कींगजवळ पोहोचलो. उतरत असताना मला संध्याकाळी पाचच्या आतमध्ये परत निघण्याची जाणीव शिंदे टॅक्सीवाले यांनी वारंवार करून दिली होती.
माझे चित्रसामान घेऊन ऑर्थरसीट पॉॅईंटच्या दिशेने निघालो त्यावेळी आजच्यासारखी लाल दगडांची सुबक पायऱ्याची बांधणी झालेली नव्हती . सगळीकडे ओबडधोबड परिसरच होता.
तो दिवस सुट्टीचा किंवा वीकएंड नसल्यामुळे ऑर्थरसीट पॉईंटवर तशी फार गर्दीही नव्हती.
           मी निवांतपणे डावीकडच्या पायऱ्या उतरून ऑर्थरसीटच्या दर्शनासाठी निघालो . तेथे हॉन्टींग पॉईंट, एको पॉईंट, व माल्कम पॉईंट, टायगर स्प्रिंग पॉईंट असे छोटे छोटे पॉईंट लोखंडाचे सरंक्षक कठडे बांधून तयार केलेले आहेत. तेथून प्रतापगड, रायरेश्वर, कोळेश्वर व चंद्रगड या किल्ल्याचे दर्शन होत होते आणि हा सगळा परिसर खूप मनोहर , नयनरम्य दिसत होता.

            पुढचे दृश्य पाहताच मात्र मी आवाक झालो, आश्चर्यचकीत झालो. आता मी प्रेक्षणीय व डोळ्यांचे पारणे फेडणारा ऑर्थरसीट पॉईंट पहात होतो.
आणि काय सांगू तुम्हाला..................... 
त्या रौद्रभीषण सृष्टीला न्याहाळताना नजरेचाच आवाका कमी पडत होता. ऑर्थरसीटचा तो उंच अजस्त्र तुटलेला कडा, पाताळपाणी दाखवणाऱ्या दोन्हीकडच्या खोल दऱ्या , त्या दरीतून उंचावणारे लहान मोठे डोंगराचे सुळके, सुळक्यांवर उन्हाचा प्रकाश पडल्यामुळे निळ्या जांभळ्या, व केसरी रंगात ते डोंगर चमकत होते. मी महाराष्ट्रातील सर्वात मोठया सह्याद्री पर्वताच्या अवाढव्य रांगाच रांगा पहात होतो.या कडयाच्या पाठीमागे ब्रह्मारण्य आहे आणि डोंगराच्या लांबच लांब दूरवर पसरलेल्या अस्पष्ट पर्वतरांगा मला एरिएल परस्पेक्टीव्हची जाणीव करून देत होत्या. डावीकडे सावित्री खोऱ्याची प्रचंड मोठी खोल खोल दरी , व उजवीकडे हिरवेगार जोर व कृष्णेचे खोरे झकास दिसत होते. खाली खोल दरीत पाहीले तर डोळे गरगरा फिरत होते,मनात भीती वाटत होती समोर आर्थरसीट पॉईंट्सचा आयताकृती चौकोनी कडा दिसत होता. त्या चौकोनी आकाराच्या सिमेंटच्या कठड्यावर रेलिंगला धरुन उभ्या राहिलेल्या छोट्या आकाराच्या मानवाकृती खूप लहान पण भारी दिसत होत्या . जणू चित्रातला गोल्डन पॉईंटच वाटत होता, तो चित्रात नव्याने शोधत बसायची गरजच नाही.खाली डोंगराच्या घड्या, कड्यांचे सुळके तयार होऊन डोंगरांच्या कड्यावर नैसर्गिक खांब तयार झालेले दिसत होते. त्यावर पडलेली सूर्याची नारंगी सूर्यकिरणे पाहून कडा वेगळ्या तेजाने चमकत होता. एकसंघ मोठी भिंत तयार होऊन हा भाग सहयाद्रीने मस्तकी घेतल्यासारखे वाटत होता.खाली खोऱ्यांवर आणि डोंगरावर लाल पिवळी कोवळी उन्हे पसरल्यामूळे ऑर्थरसीटच्या दरीत त्या रंगात काळही क्षणभर हरपला आहे असे वाटत होते. डोळे व मन हे दृश्य पाहिल्यानंतर तृप्त, तृप्त झाले होते.
         इतक्यात उन्हाचा खेळ संपून अचानक वातावरणात पडदा बदलावा तसा नवाच दृश्यमय खेळ सुरु झाला. आता ही पाताळदरी धुक्याने, ढगांनी भरून गेली आणि हळूहळू पांढरेशुभ्र ढग दरीतून वेगाने उसळी मारु लागले . शांतपणे, तरंगत येणाऱ्या ढगांचे पुंजकेच पुंजके आता अलगदपणे धुक्याचे पदर सुटून वर येऊ लागले आणि ह्या सृष्टीनेच अनोखा नवा साज परिधान करण्यास सुरुवात केली. सगळे खोरे ,विविध उंचीचे डोंगर, डोंगराचे सुळके एका नव्या रुपात समोर येऊ लागले. 
               डोंगराच्या घळ्या मऊलोकरीसारख्या धुक्यांच्या लोळांनी घनदाट निळ्या छायेने भरून जात होते .नभपटलावर निसर्ग विविध रंगछटा व प्रकाशाची उधळण करीत होता. धुके वरवर सरकत येत होते, आणि झुळझुळणाऱ्या हवेत वारा सुखद गारवा आणत होता. धुक्यांचे सुंदर लोळ अलगद शिखरांजवळ फेकल्यांसारखे वरच्या दिशेने येत होते .
                या सुळक्यांच्या वायव्य दिशेस कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील जोर नदीचे खोरे घनदाट अरण्याचे आहे. या पॉईन्टवरून पुणे जिल्ह्यातील राजगड व तोरणा आणि रायगड जिल्यातील कांगोरी हे किल्ले व विशाल रमणीय परिसर दिसत होता. भोर तालुक्यातील काही डोंगर स्पष्ट अस्पष्टपणे दिसत होते. डोंगराची भव्यता व निसर्गसौंदर्य पाहून मन खूपच प्रफुल्लित झाले होते.
                   अशा भारावलेल्या अवस्थेमध्ये मी ऑर्थरसीट पॉइंटचे निरीक्षण करत होतो ऑर्थरसीट पॉईंटची पाहिलेली ही सर्व रूपे माझ्या डोळ्यात, मनात खोलवर भरून हृदयात साठवत होतो. कारण त्यावेळी माझ्याकडे कॅमेरा नव्हता, डोळयांचाच कॅमेरा करून लक्षपूर्वक सर्व इमेजेस डोक्यात साठवत होतो.
               त्या भारावलेल्या अवस्थेमध्येच मी माझे चित्र कामाचे साहित्य काढले आणि हे  जादूमय वातावरण चित्रित करण्यास सुरुवात केली. ऑर्थरसीट पॉईंट त्या सर्व वातावरणासह माझ्यात आणि मी त्याच्यात पूर्णपणे एकरूप झालो होतो. मला आता आजूबाजूला माझ्या कोणी आहे , किंवा नाही याचे भानही राहिले नाही. अशा धुंदीतच मी ऑर्थरसीट पाँईट बेभानपणे रंगवला......... 
            एक सुंदर कलाकृती माझ्या हातून झाली होती , चित्रकाम करताना तीन चार तास कसे स्वप्नवत संपून गेले होते.

               चित्रकाम संपवून मला अजून ऑर्थरसीटच्या आयताकृती व्हयू पॉईंटच्या कठडयावर जायचे होते. मी पटापट चित्र सामान आवरून त्या मुख्य कठडयावर पोहचलो. एक मोठा ग्रूप तेथे खूप दंगामस्ती करत होता. येथून तर खालची दरी अजूनच भीषण दिसत होती ,पोटात भीतीचा गोळा आणणारी ती दरी खूप खोल खोल होती. या दरीमध्ये कोणी, कोल्ड्रींक्सचे बिल्ले, कोणी नाणी, तर कोणी हातरुमाल टाकून वस्तू तरंगत वर येतात का ? असा वाऱ्याचा अंदाज घेत होते. कोणी जोरजोरात ओरडून स्वतःच्या प्रतिध्वनींचा एको येतोय का याचा अंदाज घेत होते. खाली एक अंगठयाच्या आकाराचा विंडो पॉईंट नावाचा खडक दिसत होता. दोन उत्साही तरुण तिकडे चालले होते मग त्या अवघड छोट्या पायऱ्या उतरून मी देखील ऑर्थरसीटच्या खाली उतरलो.
           तेथून जे अनोखे ,अफलातून दृश्य दिसत होते ते पाहून मी निशब्दच झालो. दोन डोळे ते अवर्णनीय दृश्य पाहायला ,मनात साठवायला कमीच पडत होते. किती पाहू आणि किती मनात साठवू असा प्रश्नच पडत होता. अशा वेळी मी पूर्णपणे शांत होतो, त्या निसर्गाच्या
अनामिक विश्वनिर्मात्याला मी आपोआपच हात जोडून वंदन केले आणि मग तेथे एका दगडावर शांतपणे बसून बराच वेळ अवलोकन करत, ब्लॅक अँन्ड व्हाईट शाई व पेन्सीलने स्केचिंग करीत बसलो.

            चित्र रेखाटत असतानाच ऑर्थरसीटची दरी माझ्या हृदयातच उतरत जाऊन खोल ,खोल खूप खोलवर हृदयातच घर करून बसत होती, जणू मनात पाझरत, पसरत चालली होती. मी भान हरपून चित्र रेखाटताना मंत्रमुग्ध झालो होतो.

              अचानक सांयकाळचे वातावरण निर्माण झाले, सुर्यदेव हळूहळू गायब झाला, अंधार पडू लागला व मी एकदम भानावर आलो. मी ताबडतोब ऑर्थरसीटच्या वरच्या २०० फूट उंच कठडा असलेल्या आयताकृती व्हयू पॉईंटकडे निघालो. वर पोहचलो तर तेथे कोणीच नव्हते, आजूबाजूला पाहीले तर सगळे पर्यटक कधीच निघून गेले होते, छोटेमोठे दुकानदार,फोटोग्राफर्स, सगळेच्या सगळे सामान आवरून घरी निघून गेले होते. 
           आणि त्या प्रचंड दरीमध्ये मी एकटाच असल्याची भयाण जाणीव माझ्या मनाला झाली. काळोखात एक थरारक , अदृश्य भितीची एकाकीपणाची जाणीव मनात तयार झाली व मी ताबडतोब पाय उचलून पटापट चालत मुख्य रस्त्याकडे निघालो. मी कित्येक तास अन्नपाणी घेतल्याचेही आठवत नव्हते. आता भीतीने घशाला कोरड पडली होती,मग टायगर स्प्रिंग पॉईंटचे पाणी पोटभर प्यायलो, थोडा सावरलो व स्वतःलाच धीर देत चालत चालत कार पार्कींग स्पॉटवर आलो . माझा वेळेचा अंदाज पूर्ण चुकला होता. सगळे पर्यटक, टॅक्सीवाले, दुकानदार कोणी कोणीच उरले नव्हते. क्षणभर मी प्रचंड निराश झालो, हतबल झालो, स्वतःवरच खूप रागावलो,चरफडलो. कारण परत १३ कि.मी परतीचा मार्ग भीषण कंटाळवाणे व एकट्याने चालत करण्याचा होता . दिवसभर थकल्यामूळे चालत प्रवासाचा मार्ग मला फार फार अवघड दिसत होता.........
                 पणआता मला दुसरा कोणताच पर्यायही नव्हता, जड अतःकरणाने निराश पावले टाकत मी रस्त्याने चालत सुटलो. त्याकाळात मोबाईल नव्हते आणि बॅगेत बॅटरी, खिशात छोटा टॉर्चही नव्हता. 
साथीला होता फक्त चंद्राचा थोडा अंधुकसा संध्याप्रकाश............. 
             चालत चालत एकट्याला सावरत मी स्वतःशीच बोलत चाललो होतो. प्रचंड घनदाट जंगल, माणूस भेटण्याची शक्यता नाहीच, पण या जंगलात वाघ, बिबळे, रानगवे, जंगली डुक्कर, श्वापदे ,अजस्त्र साप आहेत हे मला वाचनात आलेले होते. दबकत दबकत सावध पावले टाकत माझा प्रवास सुरु होता........
        एक दोन तास चालल्यानंतर मी थकलो, चालण्याची सवय होती पण अंधारात बसण्याचीही इच्छा नव्हती आणि मला अंदाजाने जाणवले की रस्त्यात आता एलफिन्स्टन पॉईंटचे वळण आले होते. चालत असताना अचानक त्या वळणातून मोठा गाडीचा आवाज आला. त्या अम्बेसिटर टॅक्सीचा प्रकाशझोत तोंडावर आला. मी खूप उत्साहीत झालो व दोन्ही हात वेगाने हालवत मी टॅक्सीवाल्याला जोरजोराने लिफ्टसाठी हातवारे केले.............पण दुर्देव................ 
त्याने माझ्याकडे जराही लक्ष न देता वेगाने कार तशीच पुढे नेली कारण आतमध्ये टॅक्सीत माणसे होती . आता माझी उरलीसुरली आशाही पुर्णपणे संपुष्टात आली.घोर निराशेने, भीतीने, अंधारामूळे त्रासल्यामुळे मी टॅक्सीवाल्याला दोन चार शिव्या मनातच दिल्या, त्याच्या खानदानाचा उध्दार केला. पण हे करुन काय उपयोग......... आता पुढचा प्रवास तर मला एकाकी चालतच करावा लागणार होता.

         मनाला सावरत, धीर देत मी नव्या दमाने चालण्यास सुरुवात केली. आयुष्यात पहिल्यांदा मला अशी खूप खूप एकटेपणाची जाणीव तीव्रपणे जाणवली, असं वाटत होते की हा भितीदायक प्रवास कधी संपणार आहे की नाही ? का आजचा माझा दिवस शेवटचा ठरणार आहे की काय ? एखाद्या जंगली श्वापदाने माझ्यावर आता हल्ला केला तर मी काय करू शकतो ? मला येथे कोण वाचवणार ? आपण इतके बेफिकीर ,बावळट, मुर्ख कसे आहोत, आपण तेथे चित्र काढत इतका वेळ थांबवयास नको होते........

कशासाठी थांबलो ?.. .......... ऑर्थरसीटसाठी.....................

               मग मला ऑर्थरसीट पॉईंटचाच राग येऊ लागला. झक मारली आणि येथे आलो. आता यापुढे कधीही आयुष्यात स्वतःची गाडी असल्याशिवाय ,कधीही या ऑर्थरसीट पॉईंटला यायचे नाही, यापुढे कधीही ऑर्थरसीटचे चित्रही काढायचे नाही व आलो तर स्वतःची गाडी घेऊनच चित्र काढायला येईन, अशी भीष्मप्रतिज्ञा मी मनातल्या मनात केली व माझे मलाच हसायला येऊ लागले. त्या भीषण रस्त्यावर मी मोठयाने हसलो कारण माझ्या खिशात जगण्यापूरतेही उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे नव्हते आणि मी स्वप्न मात्र गाडीची पहात होतो.............

           आपण ज्यावेळी फार फार एकटे असतो त्यावेळी मन, शरीर, आत्मा आणि बुद्धी आपल्याशी आपोआप संपर्क करतात........ या मनात किती अनंत विचार येतात ना ? एका क्षणात आपण मनाने हजारो कि.मी.चा प्रवास करू शकतो, वाऱ्याच्या वेगाने, पक्ष्याप्रमाणे गगनात विहार करू शकतो....... मन हे अमर्याद ताकद असलेले न दिसणारे न उलघडणारे कोडे आहे . अथांग आहे मनाची प्रक्रिया समजून घेणे अदभूत ताकदीची गोष्ट आहे. पण एक नक्की मनाची ताकद एखादया गोष्टीवर पूर्णपणे लावली, केंद्रीत केली तर अशक्यप्राय गोष्टी सहज शक्य होऊ शकतात..... जसे एखादे भिंग उन्हात एकत्रित किरणे करून सगळा कागद जाळू शकते तसे माझे मन व शरीर स्वतः स्वतःलाच सावरत सावरत ताकदवान बनवत प्रवास करत चालले होते..........

               आणि अचानक उजव्या बाजूकडे जंगलात खूप मोठी हालचाल झाली............ क्षणार्धात एक पाच सहा तगडे , धिप्पाड अगडबंब रानगवे अचानक मुसंडी मारुन बाहेर रस्त्यावर आले, आणि त्याच वेगाने डावीकडच्या जंगलात रस्ता क्रॉस करून घुसले. मी क्षणभर काहीच न कळल्यामूळे तेथेच स्तब्ध झालो..........

                आता माझी पूर्ण तंतरली होती, त्यानां मी दिसलो नाही की , त्यांनी जाणीवपूर्वक माझ्याकडे दुर्लक्ष केले काय माहीती........ पण माझा हा प्रवास मला आणखीनच थरकाप करणारा वाटू लागला.......... खूप घाबरलो, वैतागलो, चिडत, चरफडत, स्वतःला, ऑर्थरसीटला, जगाला, दैवाला ,नशीबाला शिव्या घालत घालत चारपाच तासानंतर एकदाचा मी अंतिमतः महाबळेश्वर एसटी स्टॅन्डवर पोहचलो .त्यावेळी रात्रीचे ११ वाजले होते व एसटी स्टॅन्डवर मी परत एकटा हताश होऊन बसलो होतो. कारण मला पाचगणीला पुढे जायचे होते व यानंतर कोणतीही एसटीची गाडी उपलब्ध नव्हती.........
रस्त्यात खूप वाट पाहील्यानंतर मला एक मालवाहतूक करणारा ट्रकवाला भेटला आणि रात्री खूप उशीरा माझ्या घरी पोहचलो. त्या रात्री मी नीट झोपूच शकलो नाही. रात्रभर ऑथरसीटचा थरार , तो चालत केलेला थरारक भयानक त्रासदायक प्रवासाचा अनुभव मला रात्रभर वारंवार आठवत होता........ झोपून देत नव्हता .

                दुसऱ्या दिवशी माझ्या एका जवळच्या मित्राला मी ह्या प्रवासाची हकीकत सांगितली तर तो टरकलाच.एवढया भयाण रात्री मी एकटा १३ कि.मी चालत आलो हे ऐकून त्याने कपाळावरच हात मारून घेतला. व उत्साहाने एका नव्या माणसाची ओळख करून दिली. त्याचे नाव स्वामी. या मिलींद स्वामीची एक मिलिटरी कलरची अम्बॅसीटर गाडी अर्जंट विकायची होती. त्याची किमंत ३५,००० रुपये होती.गाडी पाहताच ती मला खूप आवडली होती पण खिशात पैसे नसल्याने मी गप्प बसलो. दोन महिने थांब माझे मुंबईला प्रदर्शन आहे त्यानंतर सांगतो असे सांगून मी तेथून पळ काढला.

                1 ते 7 ऑगस्टला जहाँगीर आर्ट गॅलरीचे प्रदर्शन नक्की ठरले होते. माझी छोटी जलरंगातील चित्रे तयार होती. एक मोठे चार फूट बाय बारा फुटाचे टेबललॅन्डचे भव्य चित्र मी काढले होते पण आता मला ऑर्थरसीटचे चार फूटबाय सहा फुटाचे एक चित्र करायचे होते. मी मुंबईला नालासोपारा येथे रहात होतो. मध्ये बराच काळ गेला होता. स्केचवरून चित्र काढताना माझ्याकडे रंगीत रेफरन्स नव्हता. त्याकाळात मोबाईल किंवा लॅपटॉप नव्हता गुगलवर चित्र शोधणे आजच्या सारखे सोपे काम नव्हते . सुरुवात केली आणि काही आठवेनाच , मनासारखे रंगकाम होत नव्हते ,
मी ब्लॅन्क झालो होतो........
काम थांबवून थोडा शांत झालो.
मनाची सगळी शक्ती भिंगाप्रमाणे एकत्र केली .  ऑर्थरसीटचा धावा मनातूनच केला. तो थरारक दिवस आठवला, आणि सर्व मन, शरीर केंद्रीत केले आणि मग अचानक भिंतीवर ऑर्थरसीटचेच दिव्यदर्शन झाले. सगळे दृश्य स्पष्ट दिसू लागले ,सगळे चित्र स्पष्ट दिसू लागले , धुके, वारे, कडा, सुळके, ब्रम्हारण्य, विंडो पॉईंट, सगळे सगळे स्पष्ट दिसू लागले. जशी तन्द्री त्या थरारनाट्यादिवशी होती तशीच तंद्री आज पुन्हा लागली आणि त्या भारावलेल्या अवस्थेत एक भव्य चित्र मी रंगवत पुर्ण केले.
                 जहाँगीर आर्ट गॅलरीचा प्रदर्शनाचा तो पहिलाच मंतरलेला दिवस मला आजही आठवतोय. सांस्कृतिक मंत्री श्री. प्रमोद नवलकर उदघाटनासाठी सरकारी लवाजमा घेऊन आले होते. केकू गांधी, पेसी वीरजीअंकल प्रमुख पाहुणे होते....... कार्यक्रम छान पार पडला होता.
              दुपारच्या वेळी एक तरुण पारशी गृहस्थ त्यांच्या सात आठ वर्षाच्या मुलाला घेऊन आले होते आणि गॅलरीत प्रवेश करताना समोरचे चित्र पाहताच... खूप मोठयाने .....
"ओ माय गॉड, धिस इज ऑथरसीट पॉईंट, महाबळेश्वर
 माय फेव्हरेट पॉईंट , 
वन्डरफूल ,अमेजिंग पेंटींग....... 
आणि अतिभावनाविवश होऊन वेगाने आमच्या टेबलाजवळ आले. Who is Artist ? असे विचारून त्यांनी माझा हात प्रेमाने हातात घेतला , हाताचे चुंबन घेतले व मनापासून अभिनंदन केले. हे चित्र मला आताच्या आता ताबडतोब विकत पाहीजे काय किंमत आहे ? असे त्यांनी विचारताच मला स्वामीची मिलीटरी रंगाची अॅम्बेसीटर कारच डोळ्यासमोर दिसली व मी थोडे घाबरतच त्यानां ३५,००० रुपये किंमत सांगितली. आणि ते गृहस्थ पुन्हा मोठ्याने ओरडले..........

ओन्ली थर्टी फाईव्ह थांऊजंड रुपीज ? ............

             आता आश्चर्यचकीत होण्याची पाळी माझी होती. त्यांनी माझा हात हातातून सोडवला व ते लगेच बाहेर गेले आणि पाच दहा मिनिटात परत आले. त्यांच्या गाडीतून पस्तीस हजार रुपये रोख घेऊन आले. सगळे पैसे टेबलावर ठेवले व म्हणाले...... 

माय नेम इज मिस्टर रेडीमनी, आय अलवेज किप रेडी मनी विथ मी.......

              माझ्या आयुष्यात एकाच चित्राला एवढी मोठी रक्कम प्रथमच मिळाली होती....... आणि ती देखील रोख नव्या कोऱ्या करकरीत नोटांमध्ये.

भगवान के घर देर है लेकीन अंधेर नही या म्हणीची प्रचिती मला आली होती...... मी आकाशाकडे पाहीले व मनातून ऑर्थरसीट पॉईंटला नमस्कार केला .

            प्रदर्शन संपल्यानंतर मी तडक पांचगणीत आलो आणि प्रथम मिलीटरी कलरची अॅम्बॅसीटर कार स्वामीकडून विकत घेतली..... रोख पस्तीस हजाराच्या कडक नोटा रु रोख दिल्याचे पाहून तोही चक्रावला...........

         थोडे दिवस  पाचगणीत गाडी चालवायला शिकलो आणि 
पहीली भेट दिली ती महाबळेश्वरच्याऑथरसीट पाँईटला....... 

नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करायला........

         त्या दिवशी मी निवांतपणे परत ऑथरसीट पाह्यला, पुन्हा स्केचेस केली ,कारण मला आता परतीच्या चालत प्रवासाची काळजी नव्हती.आता मात्र हा ऑर्थरसीट माझ्याकडे मैत्रीपूर्ण हसतोय असा मला भास होत होता ,त्या दिवसापासून ऑर्थरसीट माझा खूप जवळचा जीवाभावाचा मित्र झाला, त्याने मला भरभरून यश दिले , दोन पायावर चालत १३ कि. मी चालवले पण मैत्रीच्या परिक्षेत पास झाल्यानंतर मला नंतर आजपर्यंत चित्र काढण्यासाठी कधीही पायपीट करायला लावली नाही.

         आजही मी वैतागलो, कंटाळलो, निराश झालो, त्रासलो, उदास झालो की पहील्यांदा सरळ गाडी घेऊन ,स्केचबुक घेऊन ऑथरसीट पॉईंटला जातो.निवांतपणे भटकतो, चित्रे काढतो व हा माझा मित्र मला परत चेहऱ्यावर हास्य आणून प्रसन्न व शांत , उत्साही करूनच परत पाठवतो.
येताना आणि हो.......जर कोणी प्रवासी एकटाच रस्त्याने चालत येत असेल तर मी स्वतः गाडी थांबवून त्याला माझ्या गाडीत घेतोच............ कारण ऑर्थरसीटने मला तशी शिकवणच दिली आहे............ कोणाला पायपीट करून दयायची नाही, सगळ्यानां भरभरून आनंद द्यायचा........

           ऑर्थरसीट पॉॅईंटची गेल्या पंचवीस वर्षांत मी एकाच ठिकाणची अनेक माध्यमात वेगवेगळी चित्रे काढली, स्केचेस केलेली आहेत.
      अजूनही प्रत्येक वर्षी मला ऑर्थरसीटला का जावेसे वाटते ? त्याच त्याच ठिकाणी बसून चित्र काढावेसे का वाटते. ?  का ? याचे माझे मलाच नवल वाटते .

       याचा ज्यावेळी मी शांतपणे विचार करतो त्यावेळी अनेक गोष्टींचा उलघडा होतो. काही जण ऑर्थरसीट पॉईंटची तुलना अमेरिकेच्या ग्रँन्ड कॅनियनशी करतात. मला पर्सनली ही तुलना चुकीची वाटते. कारण स्वतः ऑर्थरसीट कोणाशीच तुलना करायला जात नाही. कारण तुलना सुरु केली की मग भांडणे आली, तु मोठा ? की मी मोठा ? हे हेवेदावे सुरु झाले, आरोप प्रत्यारोप, जेलसी सुरु झाली. मला या सगळ्यांच्या पलीकडे राहायला आवडते आणि ऑर्थरसीट तसाच मला तुलना विरहीत मुक्त जीवन जगायला शिकवतो . 
त्याला भेट दया अथवा देऊ नका तो कोणावरही नाराज होत नाही. 
त्याचे कोणी कौतुक करा अथवा करू नका, त्याला काहीही फरक पडत नाही.
आणि सर्वात म्हणजे ऊन, प्रचंड पाऊस, धुके, वादळ, वारा, वीज यांचे कितीही नैसर्गिक आघात झाले तरी तो सगळे सोसतो, तो कधीही तक्रार करत नाही उलट प्रत्येक ऋतूंमध्ये त्या त्या महिन्यात ऋतूशी पूर्णपणे सामावून जाऊन, वेगवेगळी गोजिरी रुपे धारण करुन हजारो पर्यटकांना त्यांच्या अगणित रुपांची नव्याने ओळख करून देत असतो. रोज नवा अनोखा पोशाख परिधान करून सर्वानां प्रसन्नपणे रिझवत असतो. खंबीर रहा, येणाऱ्या सर्व संकटानां धीराने, कणखरपणे, न घाबरता सामोरे जा, माघार घेऊ नका , सतत प्रयत्न करत रहा असा संदेश देत असतो.

                ऑर्थरसीटचा शोध ब्रिटीश अधिकारी सर चार्लस मॅलेट यांचा मुलगा, ऑर्थर मॅलेट याने लावला. मॅलेट कुटूंबाचा मोठा दबदबा होता त्या काळात. 
                १८५३ साली एप्रिल महिन्यात ऑर्थर मॅलेटची २६ वर्षीय पत्नी अन् अवघ्या ३२ दिवसांची केट नावाची मुलगी या दोघींना व त्यांच्या नोकरानां सावित्री नदीतून प्रवास करताना बोट उलटून जलसमाधी मिळाली. त्यातील कोणीच वाचले नाही. स्वतःला झालेले आणि हृदयात न मावणारे हे मोठे दुःख विसरण्यासाठी ऑर्थर या उंच जागी येऊन एकटाच बसत असे. या दरीतून खाली पाहीले की सावित्री नदीच्या बाणकोट भागाचं अंधुकसे दर्शन होते पत्नी व कन्या ऐन उमेदीत अचानक गमावल्यामूळे विरह, दुःख, निराशेत होरपळणाऱ्या ऑर्थरला ही भरभक्कम दरी त्याला प्रचंड आधार देई. त्यामूळे ऑर्थर दुःख विसरून जात असे..........
आणि ही कथा ऐकल्यामूळे तर ऑर्थरसीट मला का भावतो हे लक्षात आले, कारण माझीही एकूलती एक मूलगी लहान असतानाच देवाघरी गेली . ऑर्थरचे व माझे दुःख सारखेच असल्याने हा पॉईंट आणखीनच आवडू लागला.......
 
सर्वानां दुःख विसरा आणि जीवन छान, स्वच्छन्दी, उमेदीने जगा, कितीही आघात झाले, अडचणी आल्या ,अचानक कोणतीही संकटे, परिस्थिती विपरीत आली तरी मनाने सशक्त रहा खंबीरपणे तोंड दया , लढा दया असा संदेश हा ऑर्थरसीट पॉईंट आपल्या सर्वांना देत रहातो..........

महाबळेश्वरला जाऊन जर तुम्हीऑर्थरसीट पॉईंट पाहीला नाही..... तर खरे महाबळेश्वर, 
खरा सह्याद्रीच तुम्ही पाहीला नाही.......... 
निसर्गाचा खरा थरारच तुम्ही अनुभवला नाही असेच म्हणावे लागेल.............. 

मी तर हा थरार अनुभवलाच आहे .
एकदा तरी तुम्ही देखील महाबळेश्वरच्या ऑर्थरसीटला भेट  द्या . त्यासाठी खूप खूप शुभेच्छा ! 💐
तुम्हाला प्रवासात एका नव्या थराराचा नक्की अनुभव मिळेल .


✍️सुनील काळे ( चित्रकार )
३२ निसर्ग  बंगला
मेणवली रोड, मु .पो भोगाव
ता. वाई. ,जि. सातारा ४१२८०३
मो.नं.9423966486
Sunilkaleartist@gmail.com

भूक🌟🌟 वाईच्या मेणवली गावाशेजारी ' निसर्ग ' बंगल्यात कायमस्वरूपी राहायला आल्यानंतरही आम्ही आमचे किचन व चित्र काढण्याचा स्टुडिओ हे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले आहे . कारण स्टुडिओ आणि किचन एकत्र असले की किचन मधून येणाऱ्या भांड्यांचा आवाज , कामवाल्या मावशींची बडबड , तेथून येणारे चित्रविचित्र फोडणीचे वास यांच्यामुळे माझी भूक चाळवते , सारखे सारखे किचनमध्ये जावेसे वाटते . सारखी भूकच लागते , म्हणून किचन बंगल्याच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी असलेल्या कॉटेजमध्ये आहे . आणि दुसरी गोष्ट स्टुडिओमध्ये चित्र , लेखन किंवा वाचन करताना मला पूर्ण शांत , निवांत वातावरण लागते आणि त्या शांततेच्या तंद्रीत आपण एकरुप होऊन करत असलेले काम हे चांगले होते असा माझा अनुभव आहे . असाच एके दिवशी लिखाण काम करत होतो आणि त्या लेखन लिहिण्याच्या प्रोसेस मध्ये मी इतका गुंतलो होतो की दुपारचे दोन तीन वाजले तरी मला कळलेच नाही . काम संपत आले होते आणि पोटात भुकेची जोरदार जाणीव झाली . इतक्यात स्वाती तिचे जेवण व इतर सर्व कामे उरकून ती स्टुडिओत परत देखील आली होती . त्यानंतर तिने जेवण टेबलावर मांडलेले आहे असा निरोप दिल्यामुळे मी किचनच्या घरी निघालो .घरात प्रवेश करतानाच गेटच्या दिशेने आमचा टॉमी कुत्रा जोरजोरात भुंकून गोंधळ घालत असल्याचे दिसले आमचे हे गेट बंदिस्त असल्यामुळे बाहेरचे काही दिसत नाही , त्यामुळे एखादा अनोळखी माणूस आलेला असावा म्हणून मी गेट उघडले . गेट उघडल्यानंतर दरवाजातच बसलेली एक वयस्कर व्यक्ती दिसली. डोक्यावर घातलेली तिरकस कळकट गांधी टोपी , अंगावरच्या काळ्या कोटाच्या , सदऱ्याच्या , आखूड पॅंटीच्या चिंध्या झालेल्या दिसत होत्या . खांद्यावर एक फाटलेली झोळी पायात झिजलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या स्लीपरची जोडी दिसत होती . दाढीचे खुंट वाढल्यामुळे की वयस्कर व्यक्ती एखादा भिकारी दारात असल्यासारखे दिसत होती . पण त्याचे दोन्ही डोळे मात्र भरपूर काही तरी सांगत होते . त्या डोळ्यात असहाय्यता ,करुणा ,दया , निराशा व आलेला हातबलपणा स्पष्टपणे दिसत होता . खपाटीला गेलेल्या पोटाकडे हात करून केविलवाणेपणे त्याने माझ्याकडे पाहिले आणि पटकन अनपेक्षितपणे माझे पायच पकडले . त्याच्या थरथरत्या हातात जणू जीवच नव्हता . निष्प्राण डोळ्यातील भाव , पोटातील भुकेची वेदना त्याला गप्प बसू देत नव्हते . सुकलेल्या ओठाने भूक , भूक लागली, भूक लागली असे दोनच शब्द तो वारंवार उच्चारत होता . त्याची ती दयनीय अवस्था पाहून मी किचनमध्ये गेलो . एका प्लेटमध्ये भाकरी व थोडी भाजी ताटात आणून दिली . ती भाकरी व भाजी पाहून त्याने खूपच वेगाने त्यावर झडप घातली व खायला सुरुवात केली . त्याचा तो धुसमुसळेपणा पाहून मी चक्रावलो . एका मिनिटात त्याने ती भाकरी संपवली व परत पोटाकडे भूक भूक करत माझ्याकडे दयायुक्त नजरेने पाहिले . मग घरातील आणखी एक भाकरी , भाजी आणि थोडा भात त्याला दिला . तोही बाबाजीने झडप घालून लगेच संपवला . परत भूक भूक भूक असे पोटावर हातवारे करणे चालूच ठेवले . बरेच दिवस कोरोनाच्या लॉकडाऊन च्या काळात त्याला भीक किंवा जेवण काहीच मिळाले नसावे असे माझ्या लक्षात आल्यावर दुपारचे माझे घरातील उरलेसुरले सगळे जेवणच मी त्याला दिले. तेव्हा कुठे त्याची खूप दिवसांपासून लागलेली भूक पूर्ण झालेली असावी . मी घरात जाऊन दोन बिस्किटांचे पुडे त्याच्या झोळीत टाकले . हे पाहिल्यानंतर तर त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धाराच वाहू लागल्या त्याने मला वाकून नमस्कार करत असतानाच मी त्याला अडवले . आता तो उभा राहिला व रस्त्याने पाठमोरा होऊन काठी टेकत चालत निघाला . थोडे अंतर गेल्यावर तो मला म्हणाला "मी भिकारी नाही " खरंच "मी भिकारी नाही " .आणि मग हळूहळू तो रस्त्याने चालत दिसेनासा झाला . मी घरात आलो घरातले दुपारचे जेवण पूर्णपणे संपलेले होतेच आता खाण्याचा प्रश्न उरलेला नव्हता . माझी पोटातील भुकेची जाणीवही पूर्णपणे संपलेली होती . आणि अचानक तो प्रसंग आठवून माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा एकसारख्या वाहू लागल्या . मलाही एकदा भूक लागली होती .होय , खरंच सांगतो खूप मोठी भूक लागलेली होती . त्या भुकेची आठवण येऊन माझ्या अंगावर सरकन् काटा आला .मी प्रचंड अस्वस्थ झालो .आज मी तुम्हाला त्या खऱ्या लागलेल्या भुकेचीच गोष्ट सांगणार आहे . 1990 साली मी पुण्यात अभिनव कला महाविद्यालयात शिकत होतो त्यावेळी पुणे महानगरपालिकेच्या घोलेरोड वरील महात्मा फुले संग्रहालयासमोर असलेल्या आंबेडकर वसतिगृहात राहत होतो . माझी रूम नंबर 28 एका कोपऱ्यामध्ये होती .ते वर्ष कमर्शियल आर्टचे अंतिम वर्ष होते . मी बारावी सायन्स सोडून चित्रकला करतो म्हणून घरची आर्थिक मदत होत नव्हती .त्यावेळी मिळेल ती कामे करून मी जगत होतो . नाना पेठेत जवाहर आर्ट नावाचे साईनबोर्ड पेंटिंगचे दुकान होते . त्या दुकानात मी साईनबोर्ड रंगवायचे काम करत होतो .त्याकाळात डिप्लोमाची अंतिम परीक्षा मुंबईच्या जे .जे .स्कूल ऑफ आर्टमध्ये असायची . मला माझा वार्षिक असायमेंटचा पोर्टफोलिओ पूर्ण करायचा होता .त्या पोर्टफोलिओच्या असायमेंटसची पूर्तता करून नंतर वार्षिक अंतिम परीक्षेसाठी मुंबईला जावून राहावे लागणार होते .त्यासाठी मला किमान आठ ते दहा हजार रुपये तरी लागणार होते . माझे सर्व काम खुंटले होते . त्यामुळे शेवटी नाईलाजाने मी वडिलांसमोर पैशासाठी हात पसरला . त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे नकार दिला दुर्दैवाने त्याच वर्षी आमच्या गावाकडच्या घराला आग लागली होती व ते घर आगीत पूर्णपणे भस्मसात झाले होते . मनात चारी बाजूने अडचणीचा डोंगर उभा होता . माझ्या ओळखीच्या मित्रांची परिस्थितीही थोड्याफार प्रमाणात सारखीच होती . जे श्रीमंत मित्र होते त्यांच्याकडे पैसे मागण्याची हिंमत होत नव्हती . .परीक्षा कशी द्यायची ? हा मोठा प्रश्न पडलेला होता . अशा या विचित्र परिस्थितीच्या काळात अचानक एक सीनियर चित्रकार व ॲड एजन्सी असलेल्या मित्राची ओळख झाली . . त्याला मी माझी अडचण सांगितली त्यानंतर त्याने मला मदत करण्याची इच्छा दर्शविली . आम्ही एक छोटे टेबल कॅलेंडर तयार करण्याचा प्रकल्प ठरवला . त्यामध्ये पाचगणी , वाई महाबळेश्वरची बारा चित्रे निवडून बाजूला महिन्याचे . कॅलेंडर व त्याच्या खाली तेथील शाळा , हॉटेल्स व जाम कंपन्यांच्या जाहिराती मिळवून त्याची नावे स्क्रिनप्रिंट करून द्यायच्या . आणि त्यांना ही टेबल कॅलेंडर विकायची असे ठरवले . ऑर्डर्स मिळवण्यासाठी पाचगणी महाबळेश्वरला मी एकटाच आलो अनेक शाळा , हॉटेल्स जाम कंपनीच्या मालकांना प्रत्यक्ष पायी चालत जाऊन भेटून माझी परिस्थिती सांगून मी जवळपास 2000 कॅलेंडरच्या ऑर्डर्स मिळवल्या . एका कॅलेंडर ची किंमत 15 रुपये होती त्यामुळे तीस हजार रुपये हे आम्हाला मिळणारच होते . आमच्या ॲड एजन्सीवाल्या मित्राने प्रिंटिंगची जबाबदारी घेऊन मदत करण्याचे आश्वासन दिले . त्याप्रमाणे सर्व काम व्यवस्थित पार पडले . शेवटी पैसे कलेक्शन करत असताना हा प्रिंटींग करणारा मित्र सोबत आला व सर्व पैसे बिले तयार त्याने स्वतःच्या ताब्यात घेतले . आपण प्रथम हिशोब करू त्यानंतर तुला तुझे पैसे देतो असे त्याने मला सांगितले . हिशोब केल्यानंतर प्रिंटीगचा खर्च जास्त झालेला आहे , त्यामुळे तूच आता यापुढे माझे पैसे देणे आहे असे तो सांगू लागला आणि कॉलेजमध्ये शिकत असतानाच मला प्रॅक्टिकल व्यवहाराची " खरीखुरी " ओळख झाली . फायनल ईयरचे वर्ष संपत आले होते . कॉलेजचा सर्व प्रोजेक्ट व असायमेंटस पूर्ण करण्याची वेळ जवळ आली होती .अशावेळी मित्राचे पैसे देऊ ? की प्रोजेक्ट पूर्ण करू ? असा दुहेरी गोंधळ माझ्या मनात उडत होता . त्यातच माझी सायकल चोरीला गेली आणि चिंतेची आणखीनच भर पडली .कॅलेंडरचे सगळे पैसे मित्रानेच घेतलेले होते . त्यामुळे बिनापैशांमुळे माझी अवस्था जणू भिकाऱ्यासारखे झालेली होती . अशा अवस्थेतही मी कॉलेजला जात होतो . तिकडे फायनल इयरच्या सबमिशनसाठी सरांची सतत मागणी सुरू झाली होती .सगळे मित्र वेगाने तयारीला लागलेले होते मी त्यांच्या धावपळीकडे फक्त बघत होतो . पण माझा प्रोजेक्ट कसा करावा ? पैसे कुठून आणावे ? मुंबईला कसे जावे ? राहणार कोणाकडे? या विचारांमुळे मी सैरभैर झालो , त्यातच सायकल नसल्यामुळे सतत चालत असल्यामुळे प्रकृती चांगलीच ढासळायला सुरुवात झाली होती . कॅलेंडरच्या गडबडीमध्ये जवाहर आर्टचे काम थांबले होते .एकंदर पैसे मिळवण्याचे सगळे मार्ग माझे बंद झालेले होते . घोले रोडवरचे आंबेडकर वसतिगृह ते अभिनव कलामहाविद्यालयाचे अंतर सात-आठ किलोमीटर तरी असावे आणि हे अंतर मला चालत ये-जा करावी लागत होते . येताना व जाताना अनेक खानावळी ,स्टॉल्स , वडापावच्या टपऱ्या , खाद्यपदार्थांच्या गाड्या व मोठमोठी हॉटेल्स दिसायची . त्यांच्यासमोर चालत जाताना त्या वासाने मी कासावीस व्हायचो .पण करणार काय ? खिसा रिकामा होता . खायला पैसे नाहीत आणि इकडे त्या ॲड एजन्सीवाल्या मित्राचे आणखी पैसे पाहिजेत या मागणीची सततची नोटीस येत होती . त्यामुळे मी फार कोलमडून पडलो होतो वडापाव खाण्याचेही शेवटी पैसे माझ्याकडे नव्हते . खिशात असलेली सर्व सुट्टी नाणी संपली व खऱ्या अर्थाने मी पुर्ण ' भिकारी ' झालो . जेवणाचे पैसे न दिल्यामुळे खानावळ बंद झाली आणि मी सर्वार्थाने निराधारही झालो .त्या रात्री पाणी पिऊन उपाशी झोपावे लागले . सकाळी चालत कॉलेजला गेलो आता कोणी मित्र निदान मधल्या सुट्टीत चहा पाण्यासाठी बोलवतील या अपेक्षेने मी पाहत होतो पण सबमिशनच्या अंतिम तयारीचे काम वेळेत पूर्ण करण्याचे असल्यामुळे माझ्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते . त्यादिवशी कॉलेज संपले आणि मी खाली लायब्ररी मध्ये बसलो . अचानकपणे त्यादिवशी नेमके माझ्याकडे व्हॅन गॉगचे माधुरी पुरंदरे लिखित पुस्तक वाचनात आले .त्या व्हॅन गॉगच्या पुस्तकावर मी हळूच माझे मस्तक टेकवले आणि मनात म्हणालो " कसा रे बाबा उन्हातान्हात उपाशी हिंडून तू चित्रे काढलीस ? तुझ्या मागे तुझा भाऊ थिओ होता . माझ्या मागे तर कोणीच नाही .तुला चित्रांची भूक लागली होती की स्वतःला व्यक्त करण्याची भूक लागली होती ? पण आता माझ्या पोटात लागलेल्या भुकेचे मी काय करू ? हे पुस्तक वाचून झाल्यानंतर संध्याकाळी मी उपाशी चालत चालत घोलेरोड वरच्या माझ्या वसतिगृहाकडे निघालो .सगळी हॉटेल्स टपऱ्या वडापावची दुकाने मला आवडेनाशी झाली . त्यांच्या बोर्डाकडे मी बघायचं टाळायचो .खिसा रिकामा असला की माणूस सरळ चालतो , मान देखील इकडेतिकडे वळवत नाही . मी स्वतःला सावरत हळू चालत निघालो होतो .बालगंधर्व येथील पुलावरून जाताना मात्र मी आता पडतो की काय ? असा मला सतत भास होत होता . अशक्तपणा आल्यामुळे शरीर साथ देत नव्हते . मी त्या रेलिंगला धरून हळूहळू चालत निघालो . खूप उशिरा मी वसतीगृहात गेलो . भरपूर पाणी प्यायलो आणि शांतपणे अंगावर चादर घेऊन झोपी गेलो .आजचा दुसरा दिवस मी पूर्णपणे उपाशी होतो . सकाळी परत चालत अभिनवला निघालो आता तर पाऊले हळूहळू पडत होते . पोटात भुक व शरीराला अशक्तपणाची सतत जाणीव होत होती .कॉलेजला उशिरा पोहोचलो . प्रेझेंटी होऊन गेली होती . त्यामूळे उशीरा आल्याचे पाहून सरांनी मला बोलवले माझ्याकडे प्रोजेक्टच्या कामाची सबमिशनची माहिती विचारली . माझ्याकडे काहीच तयारी नव्हती . मग सर ही रागवले .त्यांनी बरेच मोठे लेक्चर दिले . मी खाली मान घालून उभा होतो . त्या लेक्चरने मला वाईट वाटण्यापेक्षा आणखी भूकच लागली . गरिबीची जाणीव असल्यामुळे , भीडस्त स्वभाव असल्याने कोणाकडे पैसे मागायची माझी हिम्मत होत नव्हती. कॉलेज संपले आणि होस्टेलकडे चालत जाणे म्हणजे मला मोठी शिक्षाच वाटू लागली . लायब्ररीत उपाशी बसवेना .दुपारी चालत जाताना पाहत होतो सगळेजण जेवत होते . कोणी वडापाव खात होते . खाणारी माणसे आता मला माझी दुश्मन वाटत होती .त्यांच्याकडे बघण्याचा मोह मी टाळत टाळत हळूहळू होस्टेलला पोहोचलो . भूक एक विचित्र प्रक्रिया आहे . पहिल्यांदा भुकेची जाणीव होते . डोळे भिरभिरू लागतात .नाकाची वासकेंद्रे प्रभावी होतात .सगळीकडे खाण्याचे पदार्थ अतिस्पष्ट दिसू लागतात . पदार्थ खाण्यासाठी जीवाची तगमग वाढते व मन चळवळू लागते . तो पदार्थ खाल्ल्यावर कसा लागेल हे आपल्याला न खाताच चवीने कळायला लागते .पोटातून थोडा आवाज येतो . हळूहळू आवाज मोठा होऊ लागतो ,पोटात खड्डा पडल्याची जाणीव होते .बघता बघता हा खड्डा मोठा मोठा होत जातो .काहीतरी आत खडुयात घुसळत आहे अशी जाणीव होते .घुसळण होण्याचा वेग मग वाढत जातो आणि मग लोहाराच्या सतत हालणाऱ्या भात्याप्रमाणे भूक आपला पूर्ण ताबा घेते . डोळे मांजरीसारखे अतिशय तीक्ष्ण होतात . कुठे बिस्किटे कुठे छोटे छोटे सांडलेले चणे फुटाणे सारखा लहान पदार्थही लगेच दिसतात . एखादा छान वास आला की तिकडे इच्छा नसूनही डोळे फाडून फाडून काय आहेत पदार्थ ते बघावेसे वाटतात . मनाची अवस्था त्या पदार्थावर कधीच झडप मारून कधी गिळंकृत करू अशी इच्छा वारंवार होते . आपण पाणी पिल्यावर ती घुसळण अजून लयदार होते . अचानकपणे पोटात बेडका सारखा डराव डराव असा आवाज होऊन आतडी आतल्या आत वळवळू लागतात .आता आपण काही खाल्लं नाही तर कासावीस होऊन मरणार की काय ? अशी संवेदना वेगाने होऊ लागते .पंचप्राण गळ्याशी येतात व अस्वस्थ मन आणखी वेगाने सैरभैर विचार करू लागते . ही अशी अस्वस्थता हळू हळू इतकी वाढते की बस आता संपलो की काय ? असे वाटते . पोटात इतकी आग पडते की घुसळणारे पोट मफलरसारख्या एखाद्या कपड्याने पोट घट्ट बांधावे असे वाटते . पण तो कपडा बांधूनही घुसळन काही थांबतच नाही .डोळ्यात अधाशीपणा व डोक्यात भुकेच्या मुंग्या सारख्या वाढू लागतात . एखाद्या मेलेल्या प्राण्यावर झडप मारावी तशा या मुंग्या मेंदूवर हल्ला करून जीव भणभणाणून सोडतात .भुकेमुळे जीव नकोसा वाटतो .आपण म्हणजे नक्की कोण आहोत हेच कळत नाही . डोके ? मन ? शरीर ? बुद्धी ? आत्मा ? का आतमध्ये वळवळ करणारी आतडी ? कशाचाही काहीच संदर्भच लागत नाही . मग हा असह्य होणारा बांध कधीतरी फुटतोच . उसळी मारून समुद्रातील पाणी जसे खडकावर वेगाने आपटते तशी ही भूक मनातून उसळी मारू लागते . मग भूक पोटापेक्षा डोक्यात वेगवान हालचाली सुरु करते . डोके घट्ट आवळून बांधले तरी विचारांची ही प्रक्रिया थांबतच नाही . अशा ह्या संघर्षमय अस्वस्थ वातावरणात मी रूममध्ये कॉटवर तळमळत पडलो होतो . दुपारचे एक वाजले असावेत होस्टेलच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांचे डबे घेऊन एक डबेवाला नेहमी यायचा .त्याने त्या प्रत्येक रूमच्या दरवाजा समोर डबे ठेवले , आणि तो निघून गेला . खरी भूक लागली कानही प्रचंड सुक्ष्मपणे काम करू लागतात .माझ्या कानातून मेंदूपर्यंत तो डबे ठेवल्याचा आवाज स्पष्टपणे आला आणि मी चक्क उठून बसलो . बाहेर दरवाजा उघडून अंदाज घेतला डबेवाला गेला होता . कॉरिडॉरमध्ये कोणीच नव्हते . आजूबाजूला देखील कोणी नाही याची पक्की खात्री करून घेतली आणि शेजारच्या एका रूमबाहेर ठेवलेला जेवणाचा डबा मी पटकन उचलला .मला कोणतेही भान राहिले नव्हते . खरं तर ही एक प्रकारची चोरी होती .पण भुकेमुळे मला काही समजत नव्हते . मी तो डबा उचलून माझ्या रूममध्ये आणला . माझे हात वेगाने हालचाल करू लागले . घाईने तो डबा उघडला त्या भुकेमूळे झटापटीत मला तो डबा कसा उघडायचा हे देखील समजत नव्हते . त्या गडबडीत तो डबा थोडा उपडाच पडला . आणि त्यातील काही अन्नपदार्थ फरशीवर देखील सांडले .पण या सर्वांपेक्षा माझी भूक मोठी होती .मी इतक्या वेगाने खात होतो की माझे मलाच कळत नव्हते .एक घास बत्तीस वेळा चावून खायचा असतो ,जेवण करताना शांतपणे खायचे असते हे थोर तत्त्वज्ञान त्यावेळी मला जराही आठवले नाही . खरी भूक लागल्यानंतर व भरपूर खाल्ल्यानंतर पोटात एक विस्मयकारक चमत्कार होतो .सागरांच्या लाटांवर जशा नौका हळुवारपणे अल्हाददायकपणे विहार करत असतात तशी आनंदाची एक वेगळीच समाधानाची तृप्ती मनात तयार होते . आपल्या सार्‍या चित्तवृत्ती अतिशय प्रफुल्लित होतात .आणि हे जेवण तर मी तीन दिवसानंतर मी खाल्ले होते . पण हे समाधान थोड्याच वेळात संपुष्टात आले .कारण तो खाल्लेला डबा माझा नव्हता . त्यातील अन्न खाण्याच्या अधिकार माझे नव्हते . परंतु परिस्थितीने हे वाईट कृत्य माझ्याकडून करवून घेतले होते .परिस्थिती विपरित असली की माणसाला आपले सगळे धागेदोरे , तत्वे , नियम बाजूला ठेवावे लागतात याची मला चांगलीच प्रचिती आली . थोड्याच वेळात इंजिनिअरिंग कॉलेजची मुले होस्टेलला परत येऊ लागली .अगोदर मी खाल्लेला रिकामा डबा मी बाहेर दरवाजा उघडून शेजारी होता त्या जागेवर ठेवला . रूम मध्ये परत आलो . त्या डब्याचा मालक म्हणजे माझा अतिशय जवळचा एक मित्र होता . त्याला देखील कडकडून भूक लागलेली होती . त्याने आल्याआल्या घाईने तो डबा आत उचलून ठेवला .आणि थोडा फ्रेश झाल्यानंतर तो डबा खायला जाणार तर डबा रिकामा आणि खरकट्या अवस्थेत दिसला . आणि माझ्या मित्राचे टाळकेच सटकले . भुकेने व्याकूळ झालेला हा मित्र हवालदिल झाला होता . पण डबा नक्की कोणी खाल्ला याची त्याला माहिती नव्हती . ते मागासवर्गीय मुलांचे हॉस्टेल होते . समाजातील सर्वात खालच्या स्तरातील मुले येथे उच्चशिक्षणासाठी आलेली होती . त्या मुलांची परिस्थिती देखील अतिशय बिकट गंभीर व खालावलेलीच होती . तो माझा मित्र कधी नव्हे तो भूकेने खूप बिघडला त्याला भूक कंट्रोल होत नव्हती. त्याने शिव्यांची लाखोली द्यायला सुरुवात केली . तो कॉरिडॉरच्या मध्यभागी आला आणि मोठ्याने माझा डबा खाणाऱ्यांच्या आईची xx xx xx माझा डबा खाणाऱ्याच्या आईला xxx xxx माझा डबा खाणाऱ्याच्या बहिणीच्या xx xx मा x x xx x भे xxx . . . . . . . . . जगातल्या सर्व वाईटातल्या वाईट शिव्यांचा त्याच्याकडे अफाट संग्रह असावा . तो मोठ्याने हा संग्रह सगळ्यांसमोर सादर करत होता . इकडे रूममध्ये मला ते शब्द एखाद्या तापवलेली सळई कानात खूपसतात तसे शब्द कानात घुसत होते . हृदयाच्या असंख्य चिंधड्या चिंधड्या उडत होत्या .कोणीतरी तलवारीने किंवा चाकूने आपल्या शरीरावर सपासप वार करत आहेत असे सारखे वाटत होते . मी माझे दोन्ही गुडघे जवळ केले .कानावर मोठे कापड बांधले .दोन्ही हाताची घट्ट झडप कानावर ठेवली .आणि हाय रे देवा ! कानात पडणारे शिव्यांचे आवाज थांबतच नव्हते . उलट त्या शब्दांचा इको तयार होऊन कानावर आणखी मोठे आवाज येऊ लागले . एक वेळच्या जेवणासाठी मी लाचार , दिनदुबळा , मलूल झालो होतो .निराधार झालो होतो . शरीरात खाल्लेल्या अन्नाचे पाणी पाणी झाले होते . सगळी भूक लगेचच खाडकन उतरली होती .मन ,शरीर , आत्मा ,बुद्धी सगळे अवयवच संवेदनाहीन झाले होते . डबा खाल्लेले अन्न जरी शरीरात मिसळून गेले होते तरी मनावर पडलेल्या शब्दांच्या जखमा मात्र कायम व्रण करून गेल्या .त्या दिवशी मी रूममधून बाहेर पडलोच नाही . माझ्या या लाचार परिस्थितीचा मला स्वतःलाच तीटकारा आला . मी कॉलेजला जाणे सोडून दिले . मुंबईला जावून परीक्षा देण्याचे स्वप्न सोडून दिले . माझे सर्व सामान घेऊन मी आंबेडकर हॉस्टेलही सोडून दिले . आणि परत पाचगणीला घरी गेलो .घरी गेल्यानंतर दरवाज्यामध्ये प्रवेश करताच वडील म्हणाले " मला खात्री होती की तू चित्रकलेचे शिक्षण घेऊन " भिकारी " होऊन परत माझ्याच दारामध्ये येशील ! "हे ऐकल्यानंतर घरात गेलोच नाही आणि तसाच माघारी फिरून माझ्या दीपक चिकणे नावाच्या मित्राच्या घरी राहिलो . थोड्या दिवसानंतर स्वस्त जागा मिळते म्हणून पाचगणीच्या जवळ आता पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिलार गावामध्ये एक छोटी खोली घेऊन राहू लागलो . आता मला एक वेगळी भूक लागली होती .शरीराच्या भुकेपेक्षा झालेला अपमान भरून काढण्याची . परिस्थितीला टक्कर देऊन स्वतःला सिद्ध करण्याची मला खरी भूक लागली . माझ्या हातात असलेल्या चित्रकलेची महती , जादू सिद्ध करण्याची ही भूक होती . माझ्यात आता खरोखरच व्हॅन गॉग पूर्णपणे संचारलेला होता .मग कागद-पेन - पेन्सिल्स - ब्रश हँडमेडचे पॅड जलरंगाचे सामान घेऊन मी भिलार , कासवंड , दानवली , रुईघर , दापवडी ,काटवली ,खिंगर ,राजपुरी ,दांडेघर व टेबललॅन्डच्या विस्तीर्ण पठारांवर दिवसभर व्हॅलीमध्ये रानोमाळ भटकायचो . त्यावेळी चित्रकलेची साहित्याने भरलेली बॅग व मोठी टोपी माझ्या डोक्यावर सतत असायची . सातत्याने चित्रनिर्मिती करायची याचीच मला मोठी भूक लागली होती . कितीतरी चित्रे त्या झपाटलेल्या अवस्थेत माझ्याकडून झाली . जेवणाची आता मला आठवण येत नव्हती . शरीराला तशी सवयच लावली .दिवसभर भटकून आलो की त्या माझ्या दिडशे रुपये भाड्याच्या खोलीत मी परत चित्रच काढत बसायचो . या छोट्या खोलीत रियाज , हेमंत व जयवंत भिलारे व इतर अनेक जवळपासची छोटी छोटी मुले आवडीने यायची . जयवंत भिलारेच्या वडिलांचे सदाशिव भिलारे ( अण्णा ) यांचे विसावा नावाचे छोटे हॉटेल होते . आजही आहे. त्या हॉटेलातील वडा तळलेल्या बेसणाच्या कण्या किंवा चुरा , उरलेल्या तेलकट भज्यांचे तुकडे आणि एखादा कधीतरी मिळणारा फुकटचा पाव खायचो .रोज तेच तेच खाऊन माझ्या तोंडावर असंख्य मुरुमांचे मोठे फोड आलेले होते . शरीर तर पूर्ण अशक्त झाले होते . पण मन मात्र दिवसेंदिवस कणखर होत गेले .आता शरीराला अन्नाची भूक कमी चित्रनिर्मितीची भूक प्रचंड लागलेली होती . पाचगणी मध्ये एम .आर .ए सेंटर नावाची राजमोहन गांधी यांनी बांधलेली एक संस्था मोठी प्रसिद्ध आहे . या संस्थेमध्ये ट्रस्टी मंडळीची एक मिटींग होती .या मीटिंगसाठी मुंबईतील केमोल्ड आर्ट गॅलरीचे मालक व प्रसिद्ध चित्रकलाविक्रेते श्री .केकू गांधी आलेले होते .त्यांना कोणीतरी माझ्याविषयी सांगितले आणि ते त्यांच्या ड्रायव्हर सोबत मला शोधत शोधत भिलारला आले .त्यांनी माझा अवतार व खोलीभर पसरलेली चित्रे पाहिली . आणि कौतुकाने आनंदाने ते भारावून गेले . लिटल व्हॅन गॉग ऑफ इंडिया ! असे म्हणत त्यांनी माझे अभिनंदन केले . या ठिकाणी राहून तुझे काही होणार नाही , तुला मुंबईला माझ्या सोबत यावे लागेल तरच तुझ्या कलेची किंमत होईल आणि त्यासाठी लागणारी मदत मी तुला करीन असे त्यांनी आश्वासन दिल्यामुळे मी त्यांच्यासोबत मुंबईला यायला तयार झालो . केकू गांधी ही एक अजब वल्ली आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते त्यांनी अनेक चित्रकारांना मोठे केल्याचे मी ऐकले होते . त्यांच्यासोबत मी लॅन्डसएंड बांद्रा येथे असणाऱ्या केकी मंजिल या अलिशान बंगल्यामध्ये रहायला आलो . ( आता केकी मंजिलच्या शेजारी प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याचा ' मन्नत ' बंगला आहे . ) केकू गांधी यांच्याविषयीची आठवण व प्रवास मी नंतर कधीतरी सविस्तर लिहीन .काही दिवस मुंबईत राहील्या नंतर केकू गांधींनी मला पुढे दिल्लीला पाठवले . पाचगणीची गल्ली ते दिल्ली हा माझा प्रवास फारच आगळावेगळा आणि नाविन्यपूर्ण झाला .त्यांनी मला फ्रान्सला पाठवण्याचे ठरवले होते . पॅरीस येथील सुप्रसिद्ध आर्ट स्कूलमध्ये चित्रांच्या रिस्टोरेशनचा कोर्स पूर्ण करावा यासाठी मला पाठवण्याचे नक्की केले . सर्व कागदपत्रांची पूर्तता करताना अभिनवचे अंतिम डिप्लोमाचे अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट हवे होते . परंतु मी परीक्षा दिली नाही ही सत्य परिस्थिती मी त्यांना सांगितले .मग त्यांनी कॉलेजला प्राचार्यांशी संपर्क साधल्यानंतर तुम्हाला सहा महिने उपस्थित राहून परीक्षा देता येईल असे सांगितल्यामुळे 1992 साली मी डिप्लोमा कमर्शियल आर्टची डिग्री मिळवण्यासाठी परत पुण्याला आलो . केकू गांधी यांच्यामुळे माझ्याकडे आता पैसे होते .म्हणून मी कॉलेजजवळ असलेल्या शुक्रवार पेठेत गांधीवाड्यात भाड्याने रुम घेतली व बादशाही येथे टिळक रोडला जेवणाची मेस लावली . एकदा रविवारी मी घोले रोडवरच्या आंबेडकर हॉस्टेलवर सहज गेलो . मला रूम नंबर 28 मध्ये जायचे होते .प्रचंड भुकेच्या वेळी ज्याचा डबा खाल्लेला होता त्या मित्राला मला भेटायचे होते .त्या मित्राचे नाव मी मुद्दाम सांगत नाही कारण तो देखील आता मोठा सरकारी अधिकारी असून उत्तम पद्धतीने स्थिरस्थावर झालेला आहे . मी ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी हा मित्र उदासपणे खुर्चीवर बसलेला होता .वसतिगृहात राहत असताना तो बामसेफ व इतर आंबेडकर चळवळीमधील सक्रिय कार्यकर्ता झाला होता . त्याच्या या भलत्याच कर्मामुळे इंजिनिअरिंग मध्ये सलग दोन वर्षे नापास झालेला होता . त्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याला पैसे पाठवणे बंद केले होते . आणि त्याची आर्थिक नाकाबंदी चांगलीच झालेली होती .अशा विचित्र परिस्थितीत माझा हा मित्र दोन दिवस झाले जेवलेला नव्हता .आयुष्य कसं विचित्र असतं ना! कधी कोणाची बाजी किवां पारडे कधी पलटले जाईल हे नक्की सांगता येत नाही . मी खूप दिवसांनी त्याला भेटल्यामुळे तो खूप खुश झाला . त्याची कर्मकहाणी ऐकून व असहाय्य अवस्था बघून मी त्याला जेवणासाठी सर्वात मोठ्या हॉटेलमध्ये येण्याचे आमंत्रण दिले . त्याला जे आवडेल ते पदार्थ खाण्याची ऑफरही दिली . क्षणभर माझ्या मित्राला आपल्या आयुष्यामध्ये असे काही पदार्थ खायला मिळतील याचा विश्वासच बसत नव्हता .त्या संध्याकाळी माझा मित्र मनसोक्तपणे जेवत होता , अधाशीपणे खात होता , पण मी मात्र तो खाताना त्याच्याकडे पहात समाधानाने कृतार्थ होत होतो . त्याला आवडणाऱ्या नॉनव्हेज पदार्थ खाण्याचे त्याचे स्वप्न कितीतरी दिवसांनी पूर्ण होत होते ,आणि मी त्याला अजून खाण्याचा आग्रह सतत करत होतो .त्याचे पोटभरुन खाणे झाले तो तृप्त झाला .आईस्क्रिम खाल्यानंतर मी त्याला सोडायला घोले रोडच्या आंबेडकर हॉस्टेलला निघालो . मग मी त्याला रस्त्यातच विचारले " दोन वर्षांपूर्वी तुझा एकदा कुणीतरी डब्बा खाल्ला होता तो माणूस सापडला का " ? असे विचारताच त्याने चमकून माझ्याकडे पाहिले व म्हणाला " शेवटपर्यंत त्याचा शोध लागला नाही . " मग मी त्याला तो डबा मीच खाल्ला होता असे सांगितले . हे ऐकताच तो खूप भारावला व हळहळला , दुःखी झाला.भर रस्त्यामध्येच त्याने मला मिठी मारली . त्यावेळी त्याने डबा खाणाऱ्याला खूप शिव्या दिल्या त्याचे आता वाईट वाटत आहे ,असे सांगून यापुढे कधीही कोणाही उपाशी माणसाला परत कधी आयुष्यात शिव्या देणार नाही अशी प्रेमाने कबुलीही दिली व आजच्या भरपेट सुग्रास जेवणाचा आनंद दिला त्याबद्दल आभारही मानले . म्हणाला " मित्रा दोन दिवस उपाशी होतो , आज तर खूप मोठी खरी भूक लागलेली होती .तू अगदी योग्यवेळी देवदूतासारखा आलास . आजचा दिवस माझ्या कायम लक्षात राहील . जीवनात खरी भूक लागल्याशिवाय जेवणाची किंमत कळत नाही हे अगदी खरे आहे . पुढे आयुष्यात ही भूकेची गोष्ट व जाणीव सतत ठेवल्यामुळे माझ्यावर उपाशी राहण्याची व कोणाचा गुपचूप डबा खाण्याची कधी परिस्थिती आली नाही . आजही तोडांवरील पुसून चाललेले मुरमांचे खड्डे पाहीले की मला 'भूक ' आठवत राहते . पण कोरोनाच्या या संकट काळात कितीतरी लोकांच्या नोकर्‍या गेल्या . कितीतरी जणांच्या कंपन्या , दुकाने , कारखाने ,छोटेमोठे उद्योगधंदे , व्यापार , ऑफीसेस बंद पडली. कितीतरी लोकांना घरी बसावे लागले . त्यात कडक लॉकडाऊन मुळे बाहेर पडण्याचीही मुश्कीली झाली . किती तरी छोटी मोठी माणसे मृत्युमुखी पावली . कितीतरी जणांचे मित्र-मैत्रिणी , आप्तमंडळी , जवळचे नातेवाईक यांना मृत्यूला सामोरे जावे लागले . या मृत्यूमुखी पडलेल्या जीवांची तर गणतीच नाही . त्यांचे अंतिम दर्शनही घेता आले नाही किंवा सांत्वन , श्रध्दांजलीही नीट वाहता आली नाही . या लॉकडाऊनच्या काळात कितीतरी माणसांना खरंच मोठी भूक लागली होती अशा वेळी त्यांची भूक भागवणारी मंडळी देवदूतासमानच वाटली असतील नाही का?* कोणालातरी ज्ञानप्राप्तीची खरी भूक असते. * कोणाला राजकारणाची भूक असते .* कोणाला वाद-विवाद सतत भांडणाचीच भूक असते* कोणाला सतत चमकत राहायची प्रसिध्दीची हाव ,मोठे व्हायची भूक असते .* कोणाला मोठा कलाकार ,मोठा चित्रकार , मोठा शिल्पकार , मोठा कवी, * मोठा लेखक , मोठा अभिनेता बनण्याची भूक असते .* कोणाला मोठा शास्त्रज्ञ होऊन नवनवे तंत्रज्ञान विकसित करण्याची भूक असते . * कोणाला मोठा बिल्डर होऊन आपले शरीर कमवण्याची भूक असते . * कोणाला मोठा बांधकाम व्यावसायिक होऊन मोठ्या इमारती बांधण्याची भूक असते .* कोणाला नामवंत वकील होऊन कायदेपंडित होण्याची भूक असते .* कोणाला मोठा उद्योजक होऊन आणखी मोठ्या उंचच उंच इमारतीत राहण्याची भूक असते .* कोणाला रिसर्च करून पीएचडी मिळवण्याची भूक असते . * कोणाला मोठा माणूस होऊन सरकारी कलेक्टर , एस.पी सारखे क्लासवन अधिकारी बनण्याची भूक असते . * कोणाला मोठा आमदार ,खासदार , पंतप्रधान , राष्ट्रपती बनण्याची भूक असते . * कोणाला मोठे स्मारके ,मंदिरे , मोठे पुतळे बांधण्याची भूक असते * कोणाला सतत जातीपातीतले धार्मिक विसंवाद निर्माण करण्याची भूक असते .* कोणाला गरिबांना आणखी गरीब करून त्यानां आणखी लाचार करण्याची भूक असते .* कोणाला खूप मोठमोठ्या बढया मारायच्या , खोटी आश्वासने द्यायची भूक असते.* कोणाला आपली जात , धर्म , प्रांत, क्षेत्र , उच्च कुळ , स्वतःचे सतत श्रेष्ठत्व करण्याची भूक असते.* कोणाला कोणाचे बरे चालले असेल तर त्यात खोडा घालायचा , त्याच्यासमोर अडचणी निर्माण करायच्या , खोट्या कोर्ट केसेस करून सतत दुसऱ्याला नामोहरम करण्याचीही भूक असते .* आता सगळ्या समाजाला , सगळ्या जातीवर्गाला एक नवी भूक लागू लागली आहे आणि ती आहे आरक्षणाची भूक . सगळ्यांनाच आरक्षण पाहीजे .तर असे हे भुकेचे असंख्य ,अगणित प्रकार आहेत. तर असे हे लोकांच्या भूकेचे वेगवेगळे प्रकार असतात . असमाधानी लोकांची भूक कधीही न संपणारी नसते , ती सतत वाढतच रहाते. आपण या आयुष्यात माणूस म्हणून जन्माला आलो . येताना आपण एकटेच जन्माला आलो , काहीही सोबत घेऊन आलो नाही आणि जाताना आपण एकटेच या पृथ्वीवरून काहीही सोबत न घेता जाणार आहोत . आपण ज्यावेळी मरतो त्यानंतर आपली राख तयार होते . त्या राखेमध्ये आपली हाडे गोळा करून अस्थिकलश तयार करतात व तो अस्थिकलश देखील नदीच्या प्रवाहात किंवा समुद्रात सोडून देतात . मग काय राहीलं आपले अस्तित्व . शुन्य . मोठे शुन्य . हे एकदा समजले की खरी ' माणुसकी ' जपणे सुरु होते . दुसऱ्यांच्या वेदना या आपल्याच वेदना आहेत हे समजून घेऊन माणसाने माणसाशी माणसासारखे माणुसकीनेच वागावे याची अंतरमनातून जाणीव होऊन खरी भूक प्रत्येक माणसाला ज्यावेळी लागेल त्यावेळी या जगात कोणीच उपेक्षित व उपाशी राहणार नाहीत .आणि हीच खरी🌟 " माणूसकी "🌟 जपण्याचीच मोठी ' भूक ' सर्वानां सतत लागली पाहिजे .🍞🥪🍞🥪🍪🧆🍱🥞🥯🍔🍞🥪🍔🍞🍔🥪🧇🥯🥪🌮सुनील काळे✍️9423966486

पेसी अंकल

* पेसी अंकल *                पाचगणीच्या मुख्य रस्त्यावरून महाबळेश्वर कडे जाताना रस्त्यात रश्मी चोक नावाचा बोर्ड दिसतो. त्याच्या ...