ब्लॉग संग्रहण

गुरुवार, २ एप्रिल, २०२६

टायगर सर - संजीवनचे न्यू देशपांडे सर

टायगर उर्फ संजीवनचे न्यू देशपांडे सर 
🐆🐅🐆🐅🐆🐅🐆🐅🐆🐅

मित्र मैत्रिणींनो ,सप्रेम नमस्कार 💐🙏
      मी जिथे रहातो त्या गावातील गावकऱ्यांचा एक  ग्रूप आहे .  त्या ग्रूपमध्ये गावातील व आजूबाजूच्या परिसरातील छोट्या मोठया स्थानिक घटना ,कार्यक्रम कळविण्याची पध्दत आहे . त्यामुळे गावात काहीही कार्यक्रम असले की सर्वांना लगेच आमच्या गावकट्टयावर लिहिण्याची  सगळ्यानां खूपच घाई असते .
       आज मेणवली वेशीजवळ गंगापूरी नावाच्या भागात शेतात बिबटयाचा वावर आढळल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे . सगळेच गावकरी चिंतेत पडले आहेत . विशेषता ज्यांची घरे शेतात व गावाबाहेर आहेत त्यांना सावध व सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत . त्यामुळे आम्ही गेट बंद करून भीतीने शांत गुपचूप राहण्याचा निर्णय घेतला .
       संध्याकाळी चारपाच वाजले असावेत अचानक गेटजवळ खूप मोठी हालचाल झाली . आणि एक पांढरी गाडी उभी राहीली . माझ्या जाधव नावाच्या मित्राने मला तातडीने फोन केला , ताबडतोब या ,लवकर या ,पळत या .मला वाटले आता आपले काही खरं नाही . मनात शंका आली की बिबट्या (टायगर ) आपल्या निसर्ग बंगल्याच्या आजूबाजूच्या परिसरात आला की काय ? मग काय लगेच पळत धावत गेटजवळ गेलो .
      आणि जी शंका मनात होती तसेच झाले . समोर खरोखरच टायगर उभा होता. मी घाबरलो , तंतरलो , कासावीस झालो , क्षणभर माझा घसा कोरडा पडला . कारण प्रसंगच मोठा बाका होता .
पण करणार काय ?
आजूबाजूला पळून जाण्याची जराही सोयच नव्हती . शेवटी गेलो धावत आणि टायगरसरां समोर सरळ शरणागतीच पत्करली आणि पायाला स्पर्श करून मनःपूर्वक साष्टांग नमस्कार घातला .
       समोर अचानक सरप्राईज व्हिजिट देणारा टायगर हा साधासुधा नव्हता . ते माझे आठवी नववी व दहावीचे गणिताचे शिक्षक होते . गणित विषयात मी खूपच कच्चे मडके होतो . अंक बीजगणित नंबर्स दिसले की माझी तारे जमीन पर या चित्रपटातील ईशान सारखी अवस्था व्हायची . काही सुधारायचेच नाही . मनात सगळा गोंधळ व आत्मविश्वास शून्य व्हायचा . त्यात देशपांडे सर म्हणजे त्या काळातील चंगेझखान किंवा व्हिलन वाटायचे . त्यांचा तास आला की माझे हृदयाचे ठोके ठक ठक ठक वाढत जायचे व स्वतःला स्पष्टपणे ऐकू यायचे . लहानपणापासून आजही मला साधी साधी गणिते सोडवता येत नाहीत . आणि असे त्या काळात कर्दनकाळ वाटणारे सर मला भेटायला माझ्याच घरी आले होते . त्यानां पाहूनच क्षणार्धात प्रचंड घाबरगुंडी उडाली . मन आणि शरीर तात्काळ कंपित झाले . त्रेचाळीस वर्षांपूर्वीचे संजीवन शाळेतील सगळे प्रसंग आठवले . ती प्रसिद्ध कानपिळी आठवली . हदयाचे ठोके छातीत कंप पावून लंबकाप्रमाणे मोठमोठ्याने धकधक करू लागले . आता काय करू ? आणि काय नको ? अशी गंभीर परिस्थिती समोर उभी . मी पूर्ण बावचळून गेलो . कारण टायगर जिंदा था ! वह भी मेरे सामने .
      पांढऱ्या शूभ्र मिशा , तीच केशरचना , तेच दमदार हास्य , तीच करडी नजर . डोळ्यातील चमक धारधार पण त्या नजरेत आता कौतूक होते . प्रेम होते . आदर होता .
     टायगरने मला प्रेमाने मिठी मारली . मी क्षणभर थरारलो . वाघाने हात हातात घेतला . आणि माझी आर्ट गॅलरी , घराचा बागेतील परिसर , निसर्गरम्य टेरेस , घरातील सर्व चित्रे , स्केचेस डायऱ्या व स्टुडिओतील भिंतीवरची चित्रे पुन्हा पुन्हा पाहीली . त्या टायगरला आपला हा चेला आता खूप आवडू लागला होता . भले गणितात मी खूप मागे होतो पण कलेच्या क्षेत्रातील प्रगती खूप समाधान देणारी आहे असे टायगर सरांनी पाठीवर हात ठेऊन कौतुकाने सांगितले .
टायगरसरांनी नंतर कौतुकाने स्वातीची दोन व माझी दोन चित्रे विकत घेतली . डाईनिंग टेबलवर छान 'टायगर' चहाचा आस्वाद घेतला . खूप जुन्या आठवणी निघाल्या .
        संध्याकाळी टायगरसर म्हणाले निघतो आता , उशीर झाला . पुण्याला कोथरूड येथे पोहचायचे आहे . पण तुला भेटून खूप खूप समाधान वाटले . पुण्याला आलास की नक्की ये ! आम्ही शाळेतील , शिक्षणक्षेत्रातील प्रसंगाची पुन्हा देवाण घेवाण केली . जुन्या पाचगणीच्या आठवणींमध्ये रमलो .
      टायगरसरांच्या या भेटीमुळे संजीवनचे सगळे दिवस पुन्हा आठवले . आमच्या शाळेतील अनेक सर्व मित्रमैत्रिणींची आठवण झाली . 
       शाळेत असताना टायगरसरांची जी भिती होती ती आता पूर्ण संपली . टायगर खूपच 'प्रेमळ' झाला होता . इतक्या विपरीत परिस्थितीतही मी जी थोडीफार प्रगती केली त्याचे कौतूक टायगरसरांच्या डोळ्यात दिसले . भरपूर मनसोक्त गप्पा झाल्या व छान निरोप समारंभ झाला . फोटोसेशन झाले . टायगरच्या सोबत त्यांची पत्नी व मुलगा राहूल होता .
    एकमेकांचा हात सोबत घेऊन गाडीत बसेपर्यंत टायगर कृतात नजरेने माझ्याकडे पहात होता .
     आता मला बिबट्याची किंवा टायगरची भिती वाटत नाही .
मी आता म्हणतो हा जिंदादिल टायगर आता "दोस्त माझा मस्त " आहे .
       आपण संजीवन शाळेतील आपण मित्रमंडळी सर्वजण नक्की टायगरला भेटू या !
कारण आपण सगळे साठीत पोहचलो आपला टायगर जरी आता म्हातारा झाला पण तंदुरुस्त आहे . खूप वर्षानंतर पुन्हा शाळेत गेल्यासारखे वाटले . शाळेतील दिवस विसरता येत नाहीत . आपल्या स्मृतीपटलावर मेंदूच्या एका कोपऱ्यात या आठवणी कायमच्या एखादी लेण्या कोरल्यासारख्या जाग्या असतात .
       असे शिक्षक ,मार्गदर्शक आपले खरे हितचिंतक असतात . त्याच्यांमध्ये प्रेम जिव्हाळा माया ओसंडून वहात असते . त्यांनी आपल्या जीवनात माणूसकीचे रंग भरलेले असतात . जीवन समृद्ध करण्यात त्यांचे मोठे योगदान असते ते कधीच विसरता येत नाही .
अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वबळावर झेप घेण्यासाठी उतुंग भरारी मारण्यासाठी पंखात ताकद निर्माण करण्यासाठी आयुष्यभर झिजलेल्या टायगर उर्फ एस .डी . देशपांडे सरांना खूप मोठे निरोगी दिर्घायुष्य मिळावे ही ईश्वरचरणी प्रार्थना !
     आता आम्ही पुन्हा नक्की भेटायला येऊ शाळेतील सर्व मित्रमैत्रिणी सोबत .

        एक जबरदस्त सरप्राईज व्हिजीट दिल्याबद्दल मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद सर ! 🙏🙏🙏 खूप खूप शुभेच्छा ! 💐💐💐
आपण पूर्वी व आता यापुढेही कायम सर्वांचे प्रेरणास्त्रोत्र राहणार आहात .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

चित्रकार -सुनील काळे
1982 मराठी बॅच 
संजीवन विद्यालय पाचगणी .
[निसर्ग आर्ट गॅलरी -वाई ]

सोमवार, २३ मार्च, २०२६

जगण्याचे " स्टॅन्डर्ड " समजलेला माणूस- प्रा . डॉ . ज्ञानदेव झांबरे सर************************        पाचगणी हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शैक्षणिक केंद्र आणि थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे . ब्रिटिश काळापासून वेगवेगळ्या लोकांनी स्वधर्मियांसाठी शाळा सुरु केल्या . त्यामुळे येथे त्रेचाळीस शाळांमध्ये अठरापगड जातींचे लोक एकत्रित रहात असल्याने येथे कॉस्मोपोलीटन संस्कृती आहे . पाचगणी शहर छोटे असल्याने बहुभाषिक वेगवेगळ्या प्रांतातील मंडळी छानपैकी एकत्रितपणे राहतात . अशा या गावात माझे बालपण गेले . दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि चांगले मार्क मिळाले म्हणून अकरावीसाठी कॉलेजचा शोध सुरु झाला . त्याचवर्षी वाईला किसनवीर महाविद्यालयात नव्याने सायन्स कॉलेज सुरु झाल्याचे कळाले . BSc डिग्री मिळण्याची चांगली सोय झाली होती . त्यामुळे घरच्यांनी मला अकरावी सायन्सला प्रवेश घेण्यासाठी फोर्स केला . मी मात्र नाराज झालो होतो कारण माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले होते व सायन्सचे विषय इंग्रजी माध्यमात शिकवले जाणार होते . इंग्रजीची माझी खूप आबाळ झाली होती कारण सातवीपर्यंत आम्हाला इंग्रजीचे शिक्षकच नव्हते . इंग्रजी , गणित , सायन्स या विषयाची तर माझी कुडंली कधी जमलीच नव्हती पण त्याकाळी उलट उत्तर देण्याची प्रथा नव्हती त्यामुळे मी मुकाटपणे वाईला सायन्स कॉलेजला रोज एस.टी बसचा पास काढून येऊ लागलो .       सायन्सच्या या वर्गात शिक्षक मला काय शिकवत होते याचे मला भान नव्हते कारण मला इंग्रजी भाषाच समजत नव्हती . चाळीस पन्नास विद्यार्थी असल्याने मागच्या बेंचवर बसायला लागलो आणि मला एक नविन छंद लागला . मी चित्रे काढायला लागलो . माझ्या मित्रांची , शिक्षकांची , प्राण्यांची , वनस्पतींच्या जर्नलमध्ये आकृत्या काढणे मला आवडू लागले . कधी कधी मी वाईच्या बसमधून पसरणीघाटात उतरायचो . या घाटातील वळणदार रस्ते , दुतर्फा असलेली वडाची झाडे , पांडवगडाच्या पायथ्याच्या सभोवतालची छोटी छोटी चमकणारी भातशेती , ऊन पावसाचा खेळ , संध्याकाळची सुर्यास्ताची रंगउधळण , वाईच्या गणपती मंदिराची , वेगवेगळ्या घाटाची चित्रे मी जलरंगात उतरवू लागलो . थोडक्यात मला चित्रकलेची फारच आवड निर्माण झाली होती . चित्रकार होण्यासाठी लागणारी इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा मी बारावी सायन्सला असताना दिली व त्यामध्ये मला 'अ 'श्रेणी प्राप्त झाली होती .       चित्रकलेचे वेड इतके वाढले की मी सकाळी सहा वाजताच थंड हवेत चित्र काढायला जायला लागलो . टेबललॅन्डच्या पठारावर तर कधी सिडनेपाँईटच्या उंच चौथऱ्यावर बसून मी धोमधरणाचे पाणी ,कृष्णा व्हॅलीतील डोंगररांगा , कधी पांगारी तायघाट जवळच्या पारसी पॉईंटची चित्रे रेखाटू लागलो . आणि अचानक माझ्या लक्षात आले मला अतिथंड हवेत सकाळी फिरल्याने सर्दीचा त्रास सुरु झाला आहे . ऑक्सिजिन घेण्यासाठी दोन्ही नाकपुड्या बंद झाल्याने श्वास घेणे मुश्कील झाले आहे . डॉक्टरांनी माझे ऑपरेशन करून नाकातील वाढलेले पॉलीप्स काढावे लागतील यासाठी तातडीने ॲडमिट केले . नाकाला मोठे बँडेज बांधूनच मी 12वी सायन्सची प्रॅक्टीकल परिक्षा दिली होती . त्यानंतर  पुण्याला चित्रकलेच्या अभिनव कॉलेजला मी गेलो . चित्रकार झालो व परत पाचगणी महाबळेश्वरचा निसर्ग रंगवू लागलो होतो . थंड हवेत वेळीअवेळी सतत डोंगररांगावर भटकंती केल्याने माझा नाकाने श्वास घेण्याचा त्रास आणखीनच वेगाने वाढू लागला . डॉ. प्रशांत पोळ यांनी वेगवेगळ्या वर्षी चारपाच वेळा माझे ऑपरेशन केले आहे . एकंदरीत मला थंड हवेची ॲलर्जी झाल्याचे सिद्ध झाले व डॉक्टरांनी 2014 साली मी पाचगणी सोडावी लागेल असे निक्षून सांगितले . मला माझे पाचगणीचे बस्तान सोडून  कायमचे  वाईला यावे असे त्यांनी सांगितले व नाईलाजाने मी काही दिवस वाईला राहण्याचे ठरवले .          वाई कॉलेजचे प्राध्यापक असलेले माझे मित्र श्री .पटकुरे सर यांनी मला सह्याद्रीनगर या परिसरात बोलावले . थोडी चर्चा केली तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की त्यांच्या सोसायटीत " प्रज्ञाअमृत " नावाचा एक बंगला आहे . त्याचे मालक श्री .व सौ झांबरे दोघेही शिक्षक आहेत . त्यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर पाच खोल्यांचे घर भाड्याने मिळते . तेथे काही दिवस राहून वाईच्या परिसरातील चित्रे काढावीत . हवा बदलाने तब्बेतीवर काय परिणाम होईल हेही कळेल व एखादी जागा आवडली तर घर बांधण्यासाठी वाईत एन ए प्लॉट घ्यावा या उद्देशाने मी त्यांच्या घरी आलो .         सहयाद्रीनगरात असलेला " प्रज्ञाअमृत " अतिशय मेंटेन केलेला ,फुलझाडे असलेला सुंदर बगीचा व पार्किंगची सोय असलेला बंगला बघताक्षणीच मला आवडला . बंगल्याच्या पाठीमागे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी स्वतंत्र जीना होता . आतमध्ये सर्व नीटनेटकेपणा होता . खिडक्या दरवाजानां पडदे लावलेले होते . आम्ही दोघेही चित्रकार असल्याने चित्रकाम करण्यासाठी व राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होती . झांबरेसर , झांबरेमॅडम व त्यांची मुलगी मृणाल हे तीनच माणसे खाली रहात होते . त्यांचा मोठा मुलगा प्रणव शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला होता . पहिल्या भेटीतच आमची छान ओळख झाली व लगेच प्राथमिक बोलणी करून मी एका आठवड्यात पाचगणीवरून वाईला शिफ्ट झालो . सर व मॅडम दोघेही स्वच्छताप्रेमी होते . त्यामुळे मी रोज मॉर्निंगवॉकला वाकेश्वरला जाताना पाहायचो झांबरे सर स्वतः साफसफाई करायचे , कुंड्यांना पाणी घालणे , झाडांची निगा राखणे ,खतपाणी देणे . पूर्ण आवार पाण्याने स्वच्छ धूवून काढायची त्यांनां आवड होती . आम्ही कधीतरी समोरासमोर भेटलो की अनेक विषयांवर गप्पा मारायचो . वाईत राहण्याचे फायदेतोटे तपासून पहायचो . येथील परिसराचा माणसांचा स्वभाव व आचरणांवर चर्चा करायचो . नवनव्या जागा शोधायची आता सवय लागली होती . त्याचा आढावा घेताना झांबरे सर मनापासून प्रतिक्रिया द्यायचे .       " प्रज्ञाअमृत " या बंगल्यामध्ये रहात असताना एक घडलेला प्रसंग मला आजही लक्षात आहे व आयुष्यभर पुढेही कायम लक्षात राहील . एकदा रविवारी सुट्टीचा दिवस होता . साधारण नऊ दहा वाजताची वेळ असेल . आमची घरकाम कारणारी बाई आज येणार नव्हती त्यामुळे दोघेही निवांत पेपर वाचत बसलो होतो . आणि शेवटच्या दूरच्या खोलीतील अचानक कोपऱ्यातील किचनसिंकचा का वॉशबेसीनजवळचा नळ अलगद तुटून पडला होता . पाईपलाईन उघडी झाली आणि वेगाने पाणी रूममध्ये पसरु लागले होते . आम्ही विरुद्धदिशेच्या बाजूला असल्याने काही आवाजच आला नाही . हळूहळू पडणाऱ्या पाण्याने ती रुम भरून गेली होती आणि अचानक खालून झांबरे मॅडम व सर दोघेही वरच्या मजल्यावर आले .त्यांनी घराची बेल वाजवली आणि त्यांच्या लगेच लक्षात आले की शेवटच्या खोलीतून पाणी जवळपास चारपाच इंच भरून दुसऱ्या रूममध्ये पाणी पसरू लागले होते . झांबरे सरांनी लगेच प्लंबरला फोन लावला येताना नवीन नळ घेऊन यायला सांगितले . पटकन टेरेसवर जावून मुख्य पाईपलाईन बंद केली . इतक्यात झांबरे मॅडम पटकन खाली गेल्या , येताना त्यांनी फरशी पुसण्याचा रबरमॉप व चारपाच फरशी पुसण्याचे जाड कपडे घेऊन एक बादली आणली . त्यांची मुलगी मृणाल देखील मदतीला आली . इकडे बनियन व लुंगी घालून निवांत बसलेले झांबरे सर गुडघ्यापर्यंत लूंगी गुंडाळून पटकन फरशीवरील पाणी बादलीत भरू लागले . झांबरे मॅडम यांनी लगेच साडीचा पदर खोचून मॉपने पाणी बाहेर टाकायला सुरुवात केली . मग आम्ही दोघेही त्यांच्यामध्ये सामील झालो व सर्व जणांनी रुममध्ये साचलेले पाणी काढून तासाभरात सगळा बंगला चकाचक केला . नंतर प्लंबर आला त्याने नवीन नळ बसवला .आता तुम्ही म्हणाल यात आश्चर्याची गोष्ट काय ? तर आम्ही झांबरे सरांचे भाडेकरू होतो . पाण्याचा नळ दुरुस्त करून रुम साफसफाई करण्याची जबाबदारी आमची होती . ते घरमालक होते . उच्चशिक्षित पी एच डी झालेले कॉलेजचे प्राध्यापक होते . मॅडम एम एस सी व जॉय स्कूलच्या उपप्राचार्या होत्या . एकदा घर भाड्याने दिले की त्याची देखभाल करण्याची जबाबदारी भाडेकरूचीच असते . त्यादिवशी दुपारी आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि तो प्रसंग एन्जॉय केला . कोणीही कसलीही तक्रार झाली नाही . दोन चार महिन्यातच आम्ही " प्रज्ञाअमृत " बंगला सोडला . नवीन जागा घेतली तेथे मोठे अपयश आले . नंतर मग आमचा मेणवली गावाजवळ " निसर्ग " नावाचा बंगला तयार केला . मागच्या वर्षी तेथे " निसर्ग आर्ट गॅलरी " नावाने चित्रप्रदर्शनही भरवले होते . अनेक वेगवेगळ्या जिल्हयातील , तालुक्यातील पर्यटक प्रदर्शन पाहण्यासाठी येत होती . एकदा किसनवीर कॉलेजचे प्रा. श्री रमेशचंद्र बारगजे सरांनी फोन केला की त्यांच्या कोल्हापूरच्या 1973 सालच्या एम .एस .सी बॅचचे क्लासमेटस यांचे वाई येथे गेटटुगेदर आयोजित केले आहे त्यावेळी तुमची निसर्ग आर्ट गॅलरी पाहायला सर्वजण येणार आहेत . धोमचे मंदिर पाहून सर्व गाड्या निसर्ग आर्ट गॅलरी पाहण्यासाठी गेटपर्यंत आल्या . त्यानां पार्कींगची जागा दाखवत होतो त्यावेळी एक गाडी मात्र गेटपासून दूर थोड्या अंतरावर उभी राहीलेली पाहीली . बारगजे सरानां ती गाडी बाहेर का थांबली म्हणून विचारले तर सरांनी कपाळावर हात मारून घेतला . मला म्हणाले काय बोलू आता ? ती गाडी तुझ्या सख्या चुलत व मावसभाऊ असलेल्या हनुमंत काळे यांची आहे . तो आमच्या बॅचचा सर्वात अतिशय हुशार विद्यार्थी होता . युनिव्हरसिटीत प्रथम आला होता . त्याला आम्ही सांगितले चित्रकार सुनील काळे तुझा भाऊ आहे . त्याने वाई ,पाचगणी महाबळेश्वर या परिसरातील असंख्य अप्रतिम चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत , त्याची मिसेस चित्रकार स्वाती काळे हिने असंख्य फुलांची तैलरंगात चित्रे काढलेली आहेत . उत्तम चित्रप्रदर्शन आहे . तुमची तीस वर्ष झाली भेट झालेली नाही तर तुम्ही आता जरूर भेटा व प्रदर्शनही पहा . पण तुझा भाऊ गाडीतून उतरायला तयार नाही त्याचे कुटुंबीय गाडीतच बसून आहेत .ते म्हणतात आम्ही भावकीत जात नाही कारण आमचे " स्टॅन्डर्ड " मोठे आहे . मी मोठ्या कंपनीत ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर होतो . तो साधा चित्रकार आहे त्याची माझी तुलना होऊ शकत नाही . तुम्ही सगळे प्रदर्शन पाहायला जा आम्ही बाहेर रस्त्यावर गाडीत बसून राहू . तो एक तास बाहेर थांबला पण घरात आलाच नाही . खरे तर हा हनुमंतदादा आता हेमंत नाव लावतो . कारण आईबापाने ठेवलेले हनुमंत हे नाव त्याला आवडले नाही . अतिशय गरिबीतून त्याला शिक्षण दिले होते .स्वतःच्या कर्तबगारीने तो उच्चपदावर पोहचला त्याचे उच्चशिक्षित मुलीबरोबर लग्न झाले पण लग्नानंतर व अगोदर नोकरी करत असतानाही या दादाने कधीच कोणत्याही भांवडाला जवळ केले नाही . कोणत्याही नातेवाईकांकडे ते फिरकले नाहीत . कोणाशी कसलाही संबंध ठेवला नाही ,कोणालाही मदत केली नाही . संपूर्ण कुटुंबाला दूर ठेऊन दादा मोठा स्टॅन्डर्डवाला झाला . आमचा दादा कसा दिसतो हे मला पाहण्याची उत्सुकता होती . कारण तो माझ्यापेक्षा पंधरावीस वर्षांनी मोठा होता . पण " स्टॅन्डर्ड "आडवे आले . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात . शिक्षणामुळे माणूस विचारवंत होतो त्याच्या ज्ञानाच्या कक्षा उचांवतात . त्याचे जीवन सुखकर व समृद्ध होतेच पण त्याच्यां विशाल छायेत अनेकानां संजीवनी मिळते . उच्चशिक्षित भावाने मात्र आमच्या सर्वांसाठी त्याचे दरवाजे मात्र कायमचे बंद केले होते . उच्चशिक्षणाचा मला तेथे काहीच उपयोग झालेला दिसला नाही . इथे मला पीचडी झालेले उपप्राचार्य झांबरे सर आठवतात . उपप्राचार्या झांबरे मॅडम आठवतात . स्वतःच्या भाड्याने राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाशी प्रेमाने सुखदुःखाची विचारपूस करत असत . ते दोघेही स्वतःचे " स्टॅन्डर्ड "कधी गोंजारत बसले नाहीत .  सामान्य माणसासारखे राहून दोघेही असामान्य कामे करत राहीली . जॉय स्कूल व किसनवीर विद्यालयातील विद्यार्थी घडवताना आपल्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांला घडवण्याचे . " स्टॅन्डर्ड " काम त्यांनी आयुष्यभर केले व त्याचा गर्वही कधी केला नाही . जीवन जगण्याचे खरे " स्टॅन्डर्ड " त्यांनां कळले आहे म्हणून माझ्या त्या अतिउच्चशिक्षित एम एस सी फर्स्टक्लास झालेल्या अडाणी भावापेक्षा झांबरे पती पत्नींविषयी मला आदर वाटत आहे .     महिन्यापूर्वी एकदा झांबरे मॅडमचा मला फोन आला . त्यांनी विचारपूस केली व त्या जॉय स्कूलची नोकरी सोडून पुण्यात नातवाचा सांभाळ करण्यासाठी पुण्यात रहात असल्याचे सांगितले . मुलगा सिव्हील इंजिनियर व सुनबाई पेशाने सरकारी वकील असल्याने दोघेही कामात व्यस्त झाले मग मुलाकडे लक्ष कोण देणार ? म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला . आणि ते ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . माझी आर्ट गॅलरी होती . ती सांभाळताना माझी तीन वर्षाची मुलगी सांभाळण्यासाठी मी आईवडीलानां विनंती केली तर त्यांनी नकार दिला . गावाकडे शेतीची कामे असतात त्यामुळे तुमची मुलगी तुम्हीच सांभाळा असे उत्तर आईने दिले . शेवटी आमच्या संघर्षाच्या लढाईत मुलगी देवाघरी गेली . ती वारली त्यावेळी मी माझ्या मेव्हण्याला सत्यजितला फोन केला . तो म्हणाला मी अत्यंविधीला येऊ शकणार नाही . तो देखील Phd झालेला आहे . अतिउच्चशिक्षित आहे . त्याला भाचीच्या अत्यंविधीला जाण्याची गरज वाटली नाही . बहिणीला कठीण स्थितीत आधार देण्याची आवश्यकता वाटली नाही आणि पुढे आता सत्तावीस वर्ष झाली तरी त्याला आमची कधीच आठवणही झाली नाही . काय उपयोग त्या डॉक्टरेटचा ? जिथे माणूस माणसाला ओळखत नाही .मोबाईल ,फोन , लॅपटॉप आले तंत्रज्ञान वाढले तरी मनाची आढी मात्र कायम राहीली .कधी त्याच्या कुटूंबाने संपर्कच केला नाही कारण "स्टॅन्डर्ड " आडवे आले .त्यावेळी खऱ्या अर्थाने एकटे जगायला शिकलो . अशावेळी झांबरे मॅडमचा त्याग मला प्रेरणा देणारा वाटतो . मुलांविषयची माया त्यांच्या कृतीतून दिसते .इकडे सरांनां रिटायर्ड होण्यापूर्वी खानावळीत जेवण करावे लागले . काही महिने एकटेपणा स्विकारावा लागला . पण त्यांनी कधीही त्याची तक्रार केली नाही . कॉलेजमध्ये त्यांनी अनेक कार्यक्रमात स्वतःला झोकून दिले . त्यांच्या कॉलेजच्या कारकीर्दीची मला जास्त माहिती नाही पण त्यापेक्षा माणुसकी जपणारे , कुटुंबाला जपणारे , अभिमान नसणारे , मोठेपणाचा त्याग केलेले गार्डनमध्ये स्वच्छता करणारे डॉ झांबरे सर मनाला फार भावले . त्यांच्या मुलाचे लग्न ठरले त्यावेळी प्रणवच्या लग्नाला आम्ही दोघेही गेलो होतो . लग्नकार्यालय पूर्णपणे भरून गेले होते प्रचंड गर्दी होती तरीही झांबरेसरांनी आम्हाला बरोबर पकडलेच . शाल श्रीफळ देऊन योग्य मानसन्मान केला त्यावेळी मला या झांबरे कुटूबांचेखरे " स्टॅन्डर्ड " कळाले . वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य नामवंत लहानमोठ्या माणसांनी संपूर्ण हॉल भरून गेला होता . काय असते स्टॅन्डर्ड ?? तुम्ही जगत असता त्यावेळी त्या तुमच्या जगतानाच्या काळात असंख्य माणसे भेटतात . त्यातील काही माणसे चांगली वागलेली असतात काही वाईट वागलेली असतात . पण शेवट काय असतो ? तुमच्या जगण्याला कधीतरी मर्यादा येतेच . कधीतरी शरीर थकते व तुम्हाला अंतिम श्वास घ्यावा लागतो . त्यानंतर कोणत्यातरी स्मशानघाटाजवळ तुमची राख होते ती राख पाण्यात मिसळते तुमचे अस्तित्व संपते . जग काही दिवस तुमची आठवण काढते नंतर तुमची कोणी आठवणही काढत नाही . तुमचे " स्टॅन्डर्ड " काही असो शेवटी तुमची राखच होते . हे ज्यानां समजते त्यांचे भावविश्व वेगळे असते . ते कायम हसतमुख असतात . ते त्यांच्या कृतीतून त्यांचे वेगळेपण जोपासत असतात .अनेकानां त्यांचे जगणे प्रेरणा ठरत असते .असे जीवनाचे खरे " स्टॅन्डर्ड " कळालेले झांबरे सर मला आवडतात . काही महिन्यांपूर्वी अचानक आमच्याकडे घरकाम करणाऱ्या बाई व माळीकाम करणारा त्यांचा मुलगा या दोघांनी आमचे काम सोडले. काही दिवस आम्ही वेगवेगळी माणसे शोधली पण त्यांच्या पगाराच्या अपेक्षा जास्त असल्याने जुळले नाही . मग झांबरे सर पुन्हा आठवले . Phd झालेला माणूस स्वतः झाडलोट करतो , बागेची निगा राखतो तर आपण का लाजायचे ? त्यांच्यापासून प्रेरणा घेतली . आता मी बागकामात तरबेज झालोय बागेत शेतात काम केल्यामुळे आरोग्यही चांगले राहते याचा शोध लागला . आपण कोणावर विसंबून राहायचे नाही काम करत राहायचे हेच खरे " स्टॅन्डर्ड " झांबरे सरांकडून मी शिकलो . खरी डॉक्टरेट तीच आहे . मे महिन्यात ते आता रिटायर्ड होतील . अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या सरानां व झांबरेमॅडम या दोघांनाही उर्वरीत रिटायर्ड आयुष्य सुखसमृद्धीचे आनंदाचे जावे त्यांच्या मनासारखे जगताना उत्तम आरोग्य प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना व मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !चित्रकार - सुनील काळे✍️9423966486निसर्ग आर्ट गॅलरी [वाई]


बुधवार, १८ मार्च, २०२६

पानगळ

पानगळ ..................
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

      माणूस नावाचा जो प्राणी आहे त्याचा मेंदू , त्याचे विचार ,त्याच्या अपेक्षा किती वेगाने वाढत राहतात याचा विधात्याला सुद्धा पत्ता लागत नाही . जीवन नेमके कशासाठी जगायचे ? जगताना आपण नेमकी दिनचर्या कशी ठरवायची ? आपण स्वतःला नेहमी उत्साहित , आनंदी कसे ठेवायचे याचा विचार मला रोज सकाळी उठल्यापासून पडतो. कारण सतत आनंदी व उत्सव साजरे करण्यासारखे दिवसभरात काय तरी घडले पाहीजे याची वाट पहावी लागते .
      माणसे स्वप्न पाहतात , त्या स्वप्नानां प्रत्यक्ष आकार देण्यासाठी अहोरात्र झटतात . सतत अवघड यातना झेलत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाताना प्रत्येक वेळी झुंजावे लागते तरच यशप्राप्ती होते .
     पाचगणीमध्ये ब्रिटिशांनी निवासी शाळा बांधल्या त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्लडवरून नामवंत शिक्षक आणले . या शिक्षणतज्ञानां राहण्यासाठी व उद्योगपती श्रीमंताना राहण्यासाठी अलिशान बंगले बांधले . सुदैवाने पूर्वी या सर्व बंगल्यामध्ये मला जाण्याचा योग आला . त्यावेळी राहणारे स्थानिक माळ्यांची मुले शाळेत शिकायला असायची . आमच्या घरासमोर एसटी स्टॅन्ड होते व त्यापाठीमागे ' दि आर्क पॅलेस ' नावाचा नबाब बिजलीखान यांचा बंगला होता . मी व माझा मित्र घन:श्याम रोज संध्याकाळी अभ्यास करायला जायचो . नबाबसाहेब मोठे प्रेमळ गृहस्थ होते . ते आमच्यासारख्या गरीब मुलानां अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यायचे. खडीसाखर , शिरा , वाटीभर दूध सर्व मुलानां देत असत . त्यांच्या बंगल्यामध्ये अलिशान कलाकुसर केलेले सागवानी सोफासेट , डेकोरेटीव्ह खुर्च्या , सागवानी ॲटींक शिसम लाकडाचे पलंग, उंची कपाटे व त्यांच्या पूर्वजांचे भव्य आकारातील तैलरंगातील चित्रे भिंतींना शोभा आणत असत . त्या घरात एक भव्यतेचा अहसास देणारी नीरव शांतता असे . पिवळसर रंगाचे बल्ब व अलिशान झुंबरे त्या ऐश्वर्याला शोभा देणारे होते . त्याच्या विरुद्ध वातावरण माझ्या घरी होते . पुढे दुकान असायचे तेथे नेहमी गिऱ्हाईकांची गर्दी असायची . आतमध्ये कामगार व त्यांची कामाची गडबड , आतमध्ये घरात एकत्र कुटुंब पद्धतीमुळे भरपूर माणसे असत . सेपरेट बेडरूम , हॉल , अभ्यासाची खोली अशी रचना किंवा भानगडच माहिती नव्हती . सगळीकडे सतत हल्लाकोळ , आवाज व बडबड सुरु असायची . नीरव शांतता हे त्यांनां माहीतच नव्हते .
        ब्रिटिशांनी जाताना हे एकरात पसरलेले बंगले पारशी , इराणी , गुजराथी , बोहरी , मुस्लीम , ख्रिश्चन  श्रीमंत व्यक्तींना विकले . त्यामुळे आता त्याठिकाणी हॉटेल्स , सॅनिटोरियम्स , शाळा आहेत. भव्य इमारत , उतरत्या छपरांची बांधणी सभोवताली असंख्य झाडे, फुलांचा बागबगीचा , गुलाब व स्थानिक फुलांची सजावट केलेल्या सिमेंटच्या मोठ्या कुंड्या सर्व बंगल्यात आजही आहेत .
      विरजी फॅमिलीचा ' मेडस्टोन ' , अदाजानिया फॅमिलीचा ' मेहेरबाय हाऊस ' 
बेबी पाईंट शेजारी फर्नांडीस यांचे 'एनफिल्ड ' पोलीस स्टेशन ग्राऊंडच्या मागचा सोहराब मोदींचा बंगला , टाटांच्या मालकीचा 'टाटा टेक्सटाईल ' जिमी पंथकीचा 'डलवीच हाऊस ' डॉ . मर्चंट यांचा ' चिस्तिया मंजील ' असे अनेक बंगले मी पाहिलेले आहेत . बिलिमोरीया स्कूल , इल पलाझो हॉटेल , प्रोस्पेक्ट हॉटेल, न्यू इरा स्कूल अशा ठिकाणच्या बागा मला आजही आवडतात . सिल्व्हर वृक्षांची उंचच उंच झाडे व त्या बंगल्याच्या आजूबाजूचा परिसर मनाला फार मोहवून टाकत असे . मग गेली पन्नास वर्ष या परिसरात राहिल्यामुळे आपलाही एखादा असा बंगला असावा अशी स्वप्ने मला पडू लागली .
         एखाद्या उद्योगपतीला , व्यापाऱ्याला , कारखानदाराला बंगल्याचे स्वप्न पूर्ण करायला अवघड नसते कारण त्यानां आर्थिक पाठबळ व कुटूंबाची साथ असते. त्यासाठी मोठी आर्थिक गणिते असतात ती सोडवायला मित्रमंडळी असतात . पण मी पडलो चित्रकलेच्या प्रेमात . तेथे नियमित उत्पन्न नाही . कलाप्रेमींची साथ नाही . साताऱ्यातील सर्व तालुक्यांमध्ये एकही आर्ट गॅलरी नाही अशा विरुद्ध वातावरणात बंगला बांधण्याचे मुंगरीलालके हसीन स्वप्न होते . पण स्वाती व मी हार मानली नाही . आपले स्वप्न पाचगणीत होणे शक्य नाही हे आमच्या लक्षात आले . वाईजवळ कमी बजेटमध्ये मग मेणवली गावाबाहेर आम्ही जागा घेतली व ' निसर्ग ' बंगल्याचे स्वप्न दहा वर्षांपूर्वी पूर्ण केले .
         स्वप्न धडपड करून पूर्ण झाले पण त्या स्वप्नांना साकार झाल्यानंतर टिकवून ठेवणेही महत्वाचे असते. अठरा हजार स्क्वेअर फूट जागा पाच हजार स्क्वेअर फूटांचे घर व बागबगीचा तयार केला . उत्साहाने आंबा , रामफळ , नारळ , चिक्कू , लिंबू , पाम , केळी , डाळींब , फणस , सप्तपर्णी , तूती अशी अनेक प्रकारची झाडे लावली . झाडे लहान असताना त्यांनां योग्य खतपाणी व नीगा राखण्यासाठी मेहनत केल्याने झाडे भरपूर उंच झाली . पण आता त्यांची देखभाल करणे अवघड झाले आहे . जास्वंद, सदाफूली , झेंडू ,सुर्यफुले यांनी जवळपास 300 कुंड्या त्यांनां नियमित पाणी देणे , खुरपणे , खते टाकणे अशी असंख्य कामे वाढली . त्यासाठी स्थानिक माळी किंवा एखादे छोटे कुटूंब शोधायला सुरुवात केली पण यश मिळाले नाही . वाईला एम आय डी सी आहे . तेथे गरवारे , एचपी , मालाज जॅम ,अथर्व फौडेंशन यासारख्या असंख्य कंपन्या आहेत . आजूबाजूच्या खेड्यातील सर्व शेतकरी व तरुण मुले आता शेतीपेक्षा या कंपन्यामध्ये कामाला जातात तेथे त्यांनां चांगला रोज मिळतो . बायकानां नेण्या आणण्यासाठी बसची सोय केली आहे . त्यामुळे शेतात बेननी करण्यासाठी वेळ घालवण्यापेक्षा पंधरावीस हजार रुपये मिळत असल्याने सगळे अशा कंपनीत काम करण्याला प्राधान्य देत आहेत . मग तुमच्या घरकाम व माळीकामाला विचारतो कोण ? शेवटी त्यांचे पगारांचे आकडे ऐकून आम्ही माघार घेतली . आमची दोघांनी कामे वाटून घेतली . आता लढाई खरी सुरु झाली .
      सकाळी उठलो की बागेत फेरफटका मारतो आणि लगेच लक्षात येते की आज काय काय कामे करायची आहेत . कधी पाला पाचोळा पडलेला असतो ,कधी झाडाची फांदी तुटलेली असते ,कधी पाणी मारायचे कधी झाडू मारायचा असतो . अशावेळी लक्षात येते बंगल्याचे नुसते स्वप्न पाहणे हे सोपे काम आहे पण बंगला व त्याचा परिसर स्वच्छ ठेवणे , मेंटेनन्स करणे हे कधीही न संपणारे काम आहे. पण कोणी मदतनीस नाही खंत वाटत असे . या मदतनीसाची वाट तरी किती दिवस पहाणार ? अस्वच्छता तर पाहवत नाही मग आता स्वतःला "आत्मनिर्भर "करणे गरजेचे ठरते .हातात झाडू घेऊन साफसफाई मेंटेनन्सची कामे करावीच लागतात .घरकामाला तर पर्यायच राहत नाही .
       माणसाला एकाच कामाचा लवकरच कंटाळा येतो तसाच मलाही कंटाळा येतो पण ब्रिटीशकालीन बंगला पाहण्याचे स्वप्न अंगाशी आल्याचे दुःखही होते. कारण मोकळ्या जागेत पालापाचोळा नेहमीच पडतो .
      एकदा सकाळीच लक्षात आले की कोणी शेतकऱ्याने ऊसाचे पाचट पेटवल्याने संपूर्ण परिसरात काळे भूसकट तण सगळीकडे पसरलेले होते . वाऱ्याने उडून सगळीकडे पालापाचोळा काडीकचरा पडलेला होता . मोठी पानगळ झाली होती .मग लगेच झाडू घेऊन साफसफाईला सुरुवात केली. आणि तीन चार तासात पंचवीस तीस बादल्या झाडांची पाने गोळा केली. सर्व परिसर स्वच्छ केला होता . बंगल्याच्या बाहेर मोठ्ठा सुक्या पानांचा ढिग तयार झाला होता . त्या पानगळीच्या पानानां पेटवले व मी आतमध्ये पाणी पिण्यासाठी गेलो .
         निसर्गाचा काय भरोसा नाही हे लवकरच माझ्या लक्षात आले . भयंकर मोठी वावटळ व वेगवान वाऱ्याचा झंझावात सुरु झाला होता . भर दुपारी एखादे सुनामी सारखे चक्रीवादळ सुरु झाले होते. जेवढा परिसर तीनचार तास खपून स्वच्छ केला होता तेथे पुन्हा मोठी पानगळ होत होती . पावसासारखी पाने टपाटप पडत होती . धुळीचा लोट चक्राकार फिरून फिरून या पानानां गरगर फिरवत आपटत होता . सगळीकडे अहःकार सुरु होता . डोळ्यांना फक्त धुळीचे लोट दिसत होते . मी तसाच स्तब्ध होऊन खुर्चीवर बसलो . माझी मती गुंग झाली होती विचार करण्याची बुद्धी संपली होती समोर पानांचा ढिग पडलेला दिसत होता . मी हतबल झालो होतो . डोक्याला हातच लावून बसलो कारण मी पूर्ण निराश झालो होतो .
सगळीकडे वाळलेली पिवळसर असंख्य पानेच पाने पडलेली होती . वाऱ्याचा झंझावात सुरूच होता पाने पुन्हा पुन्हा पडतच होती जणू भयंकर प्रलयकाळ आताच संपलेला होता . . .
       अशा या भर दुपारच्या चक्रीवादळात मी सुन्न बसलेलो असतानाच अचानक चारपाच पाने माझ्या अगांवर पडली . त्यातले एक आंब्यांचे पान होते . ते पान चक्क माझ्याशी बोलूच लागले. मी तर एकदम आश्चर्यचकीतच झालो . असे पान एकदम बोलू कसे शकते . नीट पाहतो तर खरेच पाने बोलत होती . .
    काय झाले मित्रा ? एवढा काय निराश होऊन डोक्याला हात लावून बसला आहेस ? अरे ही पानगळ होती . आता पानगळीचे दिवसच आहेत . निसर्गचक्र सतत सुरुच असते . नवी पालवी फुटणार असते . नवा चमत्कार घडणार असतो नवी धुमारी फुटणार असते . कालचक्र सतत सुरु असते . काळ कोणासाठी थांबत नसतो . 
कारण पानगळ ही होणारच असते . . . . . .
      तु ज्या बंगल्याची वर्णने केलीस तेथे आता पुन्हा जा . गावच्या  रजिस्टर मालमत्ता ऑफीसमध्ये जरूर जा . तेथे असणारे सातबारा पहा . या सातबाऱ्यात तुला आता बदल दिसतील . ज्या मालकानां तु ओळखत होतास ती आता काळाच्या पडद्याआड गेली आहेत . तेथे नवे मालक आले आहेत. काही जणांनी त्यांच्या मालकीचे  बंगले विकले काही जणांची वारस रुपाने नवी पिढी आली . काळाचा महिमा अपरंपार आहे . जुने जाणार नवे येणार हे बदल सतत घडतच असतात . या बदलानां स्विकारावेच लागते . काही झाडे तशीच आहेत तर काही झाडे सरकारी माणसांनी काही झाडे नव्या मालकांनी तोडली . काही बंगले तसेच आहेत तर काही बंगल्यांना बुलडोझर लाऊन मालकांनी नवी हॉटेल्स बांधली आहेत . परिसर तोच असतो पण माणसे जिथे जिथे जातील तेथे तेथे नव्या गोष्टी करतील . सृष्टीचा हा नियमच आहे नव्याचा स्विकार करत जुने पाठीमागे सोडून द्यावेच लागते .
कारण पानगळ ही होणारच असते . . . . .
         त्या जीर्ण पानाने माझ्या डोळयात पाहिले आणि विचारले किती वर्ष झाली ही झाडे लावून ? दहा वर्षांपूर्वी छोट्या नर्सरीतून तू आम्हाला आणलेस , मोठ्या प्रेमाने जमीनीत लावण केलीस , खतपाणी टाकलेस , विटांचे जमीनीवर छोटे कुंपन केलेस , ऊनवाऱ्यात पडू नये म्हणून काठीचा आधार दिलास . बघता बघता आम्ही झाडमंडळी 10 ते 20 फूटापर्यंत उंच भरारी मारली .
लहानपणी हरितद्रव्ये भरूभरून मिळाली हिरव्या रंगात न्हाऊन निघालो . आता नीट बघ बरे ? मी पान हातात घेतले नीट पाहीले पानाचा रंग पिवळा झाला होतो . त्याच्या पर्णरेषा सुकल्या होत्या . मध्येच पूर्णपणे आरपार भोके पडलेली होती . शीरा उघड्या झाल्या होत्या . एकंदर पान म्हातारे झाले होते . त्याचा अवतार सुकल्यामुळे जीर्ण झाला होता . पान शांतपणे म्हणाले आता आकाशाशी गवसणी घालण्याचे दिवस गेले . आता या काळ्या मातीची ओढ लागली आहे . तु कसा आता सगळी पाने गोळा करतोस व आम्हाला बाहेर मुखाग्नी देतोस तेथे आमची राख होते . ही राख त्या काळ्या मातीत किंवा कृष्णेच्या पाण्यात वाहत जाते . तसेच तुमचे माणसाचे जीवन . तुम्हीही म्हातारे होता . केस पांढरे होतात . शीरा आकसतात . चेहऱ्याचे तेज कमी होत जाते . हातपाय थरथरतात . कितीही श्रीमंत असा कितीही पैसेवाले असा कितीही हुशार डॉक्टर कसलेही विज्ञान कसलेही औषधोपचार तुमचा जीव वाचवू शकणार नाहीत , कितीही सौंदर्यांचा अभिमान असो, कितीही ज्ञानाचा गर्व असो , कितीही मोठ्या घरातले वारसदार असो . निसर्गकालचक्र कोणालाच सोडत नाही . कधी सुनामीसारखे वादळ येईल , कधी करोनासारखी महामारी येईल , कधी गाडीचा , रेल्वेचा , विमानाचा अपघात होईल . कधी डॉक्टरांचे औषधोपचार चुकतील तर कधी स्वतःचेच दुर्लक्ष कडेकपाऱ्यातून किंवा साधे चालत असलात तरी किरकोळ अपघात झाल्यामुळे तुमची इच्छा असो वा नसो तुम्हाला हे जग सोडावेच लागते . सृष्टीचा कालचक्राचा नियम कधीच कोणाला चुकत नाही .
         आता मला पानगळीचा त्रास होत नाही , मला पानाने त्याची पूर्ण हकीकत ऐकवली त्याचा सारांश एवढाच कळाला की तुम्ही कोणीही महान व्यक्ती असा किंवा साधी माणसे असा , कोणत्याही धर्माचे असा , छोटे कर्म करणारे असा वा महान कर्म करणारे असा आपला सर्वांचा प्रवास या पानांसारखाच आहे . अलगद झाडापासून निघायचे दुरच्या प्रवासाला . कितीही अडचणी येवोत आनंदाने प्रवास करत राहायचे .

पानगळ ही होणारच असते . . . . . . 
पानगळ ही होणारच असते . . . . . . 
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃   
 ✍️ सुनील काळे 9423966486 .

रविवार, ७ डिसेंबर, २०२५

एकदा दर्शन दे घन:श्याम


एकदा दर्शन दे घन:श्याम
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
            घनःश्याम रमाकांत कारंजकर हे माझ्या मित्राचं नाव , पण मी त्याला फक्त " घन्या " म्हणायचो आणि ते त्याला ही आवडत असावे. त्याची व माझी गट्टी फार अगदी पहीलीपासून होती . पहीली ते सातवी मराठी शाळा व नंतर आठवी ते दहावीपर्यंत संजीवन विद्यालयात पाचगणीला एकत्रच शिकायचो , दिवसभर एकत्रच अभ्यास करायचो .

             घन्या हे फार अजब रसायन होते . त्याचे घारे डोळे मांजरीसारखे होते, गोरा वर्ण , स्वच्छ कपडे व संध्याकाळी तो ग्रे  काळपट रंगाचा एक आवडीचा कोट नेहमी घालायचा , तो नेहमी खुषीत असल्याचं दाखवायचा. त्याची घरची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूूक होती . त्याचे वडील रमाकांत, टेलरींग व अलटरचे काम करायचे. पाचगणीच्या शिवाजी पुतळ्याजवळ माडीवर त्यांचे छोटे दुकान होते . ते कधीही साफ केलेले मला आठवत नाही ,त्याला कधीही रंग मारल्याचे पहाण्यात आले नाही .अतिशय हुशार व सुट शिवण्यात तरबेज असलेल्या रमांकांत टेलरांनां निराशेने मात्र पूर्णपणे खूप ग्रासले होते . त्याचे कारण त्यांची मनोरुग्ण बायको म्हणजे घन्याची आई.घन्याची आई खूपच वेडी होती, वेड्यासारखीच एकटीच सतत बडबड करत राहायची . दिवसभर तिला  कशाचीच पर्वा नव्हती . संसाराची व मुलांची जबाबदार इतर कशाचीच तिला जाणीव नसायची . सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिची सततची बडबड कधी थांबायचीच नाही . तोच वारसा त्यांच्या मोठ्या मुलाने पुढे चालवला. घन्याचा मोठा भाऊ मोहन शाळेत असतानाच त्याचे कोणतेतरी गणित बिघडले  चुकले . व नंतर त्याचेही डोक्याचे गणित कायमचेच हुकले . हुशार मोहन आजही सारखी गणिते सोडवत बेवारशाप्रमाणे भररस्त्यात , गटारा शेजारी, घरात , कोठेही बडबडत असतो . त्याचे न सुटणारे गणित तो येणाऱ्या जाणाऱ्यानां समजून सांगण्याचा  किंवा स्वत :लाच विचारत, हातवारे करत बसतो .हे त्याचे जीवनच झाले आहे . [मागच्या वर्षी त्याचे निधन झाले ]घन्याच्या दोन बहिणीपैकी , एकीने शाळा सोडली होती व ती स्वयंपाक पाणी , आवराआवर करायची व आई विहिरीवर कपडे धुवायची सतत मोठ्याने एकटीच बडबड करत असायची .एक छोटी बहिण मात्र शाळेत जायची .

           घरातील या परिस्थितीमूळे रमाकांत टेलर खूप अस्वस्थ, निराश, व मटक्यासारख्या व्यसनात गुफूंन गेले होते . त्यांचे संसाराकडे लक्ष नव्हते कारण बायको सुधारण्याची शक्यता आजीबात नव्हती .

             या सगळ्यांत घन्या खूप हुशार होता . त्याला आपल्या ,परिस्थितीची जाणीव होती .आपली आई वेडी आहे व भाऊही कामातून गेला आहे  याचा त्याच्यावर एक प्रकारचा नकारार्थी  प्रचंड आघात झाला होता व  मानसिक दबाव ही त्याच्यावर नेहमीच असायचा .

              घन्या व मी जिगरी दोस्त होतो , आम्ही एकत्र पोलीस ग्राऊंडच्यामागे सोहराब मोदींच्या बंगल्यातील गार्डनमध्ये , एस टी स्टॅन्डच्याजवळ नबाब बंगल्यामध्ये ,कधी टेबललॅन्डच्या गुहेत अभ्यास करायचो , खेळायचो, घन्याला नीरव " शांतता " खूप आवडायची.आईच्या दिवसभरच्या बडबडीला तो जाम कंटाळलेला असायचा .आम्ही विद्यार्थी वाचनालयात जावून बसायचो . आम्ही कसलीही वर्गणी दिली नसताना वाचनालयाचा कमरुद्दीनचाचा आम्हाला गोष्टींची छोटी पुस्तके वाचायला दयायचा .घन्या व मी भरपूर वाचायचो व वाचलेल्या गोष्टीवर चर्चा करायचो

आमचा तो आवडीचा विरंगुळा होता .

             संजीवनला आल्यानंतर मात्र आठवीत घन्या खूप अस्वस्थ झाला होता . त्याच्या भावकीच्या भांडणामूळे त्याला माडीवरचे घर सोडावे लागले होते . मग माडीच्या मागेच घराबाहेर उघडयावर पत्र्याच्या शेडमध्ये ही सारी मंडळी स्थलांतरीत झाली . त्याला घर कसे म्हणायचे ? एक बारा बाय बाराचे उघडे पटांगण, त्यात दगडी बाजूला लावून  जुन्या पत्र्याचे  दोरीने बांधलेले कुंपण  व डोक्यावर उघडे सताड आभाळ . घरात एक स्टोव्ह, थोडी ॲल्युमिनियमची भांडी, वाकळा , गाद्या, चादरी व असंख्य बांधलेली कपड्यांची गाठोडी, अस्ताव्यस्त पसरलेली . बाजूला सार्वजनिक संडास व कोपऱ्यात बडबड करत, उचकत ,बांधत बसलेली वेडी आई . तर एका कोपऱ्यात भाऊ मोहन सुटलेली गणितं सोडवत स्वतःशीच भांडत बसलेला असायचा .

           तरीही प्रसन्न मनाने तो संजीवनला निघताना एसटी स्टॅन्डसमोरच्या माझ्या घरी यायचा .व आम्ही शाळेला निघायचो . रस्त्यातून जाताना सकाळची कोवळ ऊनं, झाडांच्या , माणसांच्या सावल्या दाखवायचा, धुक्याचं वातावरण टिपायला, इमारतींवर पडलेला प्रकाश बघायला मला सांगायचा . चित्रात हे जिवंतपणा आणण्याची साधने आहेत असं बोलत राहायचा . त्याला वाचनाची, लिखाणाची, चित्रांची, अध्यात्माची, गाण्याची एकंदर सर्व जीवनच समजून घेण्याची खूप ओढ होती. त्याला खूप खूप शिकून मोठे होण्याची आस लागलेली होती . तो त्या प्रयत्नात नेहमी असायचा .

              त्याच्याकडे शाळेची एकच ग्रे पँट व एकच सफेद शर्ट होता ,तर माझ्याकडे दोन ,त्या अर्थाने मी त्याच्यापेक्षा श्रीमंत होतो. आम्ही रोज शाळेतून आलो की लगेच कपडे काढून गादीखाली  घडी घालून ठेवायचो  . दुसऱ्या दिवशी सकाळी गरम तांब्या फिरवून शाळेच्या ड्रेसला इस्त्री करायचो . आम्ही कधी गेम्सच्या मैदानावर गेलो नाही कारण आमच्याकडे हाऊस टी शर्ट , हाफ पँट व शूज नव्हतेच .आमच्याकडे शाळेचा ब्लेझरही(कोट ) नव्हता . दहावीला राज्यपाल .व्ही.व्ही. गिरी आले होते. पण आमच्याकडे कोट नसल्यामुळे हिंदीच्या सिंगसरांनी आम्हाला वर्गातच बसवून ठेवले होते .

             घन्याला  गाण्यांची व मला चित्रांची  भारी आवड होती . त्यावेळी आमच्या दोघांच्याही घरी टिव्ही नव्हता . मग बाजारात मंडईमध्ये तर कधी कोणाच्या घरच्या खिडकीतुन, किंवा पत्र्याच्या  होलमधून आम्ही चित्रपट ऐकायचो, सफर, आराधना, चितचोर, गाईड, नमकहराम असे किती तरी चित्रपट  आम्ही पाहीले कमी ऐकले जास्त . त्यातली किशोरकुमारची गाणी मला आवडायची, मग मी घन्याकडे पाहायचो , त्याला सांगायचो. घन्या पटकन् तोंडावर बोट ठेवायचा व मला शांत राहायला सांगायचा. डोळे मिटायचा व गाणे संपताच  खिशातून कागदाचा तुकडा काढायचा व संपूर्ण गाणे न चुकता लिहून काढायचा . अशी अफाट व अलौकीक शक्ती मी घन्यातच पाहीली व अनुभवली . त्याची एक छोटी वही मी केली होती व आजही ती मी माझ्याकडे जपून ठेवलेली आहे .

           घन्याचे गाणे लिहून झाले की माझे अनेक प्रश्न सुरू व्हायचे . 

तु डोळे का मिटतोस ? 

तर शांतपणे म्हणायचा अरे, ते गाणे आपल्याला समजून घ्यायचे असले की डोळे मिटावे मग गाण्याचे शब्द , त्याचा स्वर, ताल, त्याची बांधणी, रचना, त्याची रागदारी, त्याच्यातील भावना, विषय, कवीची काव्यांतून सांगण्याची शैली सगळे आपल्याकडे येते . आपल्याला अनुभवता येते,मनात झिरपून जाते . मग शब्द कागदावर येतात .मी अचंबित व्हायचो की एकदाच ऐकलेले गाणे संपूर्ण कसे कागदावर आणता येते ? 

मी बऱ्याच वेळा तसा प्रयत्न केला आहे पण मला एकदा ऐकलेले गाणे कागदावर कधी ते संपूर्णपणे न चुकता लिहणे  जमले नाही . पण डोळे शांतपणे मिटून आवडलेले गाणे मात्र मी घन्याची फिलोसॉफी म्हणून आजही आठवणीने अमंलात आणतो .

            घन:श्याम व मी पुढे सायन्स शिकायला वाईला गेलो , सायन्स , गणित शिकणे , बेडकाचे पोट फाडून त्याची चिरफाड करुन पचनसंस्थेचा अभ्यास करणे, केमिस्ट्रीची रसायने एकमेकांत मिसळणे , लॉगबुकचे मोठे आकडे शोधत रहाणे , सायन्सच्या प्रयोगशाळेत रसायने मिसळत राहाणे ही आमची नावडती कामे होती . इंग्रजीत न समजणारे सायन्स शिकत राहणे, हा आमचा  नावडता कार्यक्रम होता. मग आम्ही एसटीतून गाडी थांबवून वाईच्या रस्त्यात घाटातच बऱ्याचदा उतरायचो .मी सगळ्या घाटातील झाडांची चित्रे रेखाटायचो तर घन्या गाणी , कविता, वाचन , लिखाणकाम करायचा . त्याच्या त्या अफाट बुद्धीमत्तेचा मला हेवा वाटायचा . त्याला विचारले तर सहज म्हणायचा 

" मनापासून केले की सगळं येते " .

 मग संध्याकाळी आम्ही एकमेकांच्या जगण्याचं "सायन्स " शिकून , समजून घेऊन आपआपल्या घरी जायचो .
        असा हा घन्या बारावीला गणितात नापास झाल्याचा निकाल लागला व तो मनाने कोलमडूनच पडला . माझ्याकडे यायचाच बंद झाला, मी त्याला खूप समजावयाचा  प्रयत्न केला, धीर दिला, चेतना दिली, आधार दिला . पण त्याने कोणाचेच ऐकले नाही . माझ्यावर चिडायचा, टाळायचा, दूर कोठेतरी जावून एकटाच भटकत राहायचा . आपण एका विषयात नापास झालो  हे त्याला, त्याच्या बुध्दीला, पटायचेच नाही . 

तो आत्महत्या करायचा प्रयत्न करायला लागला . मग मी त्याच्यावर रागवायचो, ओरडायचो, पण त्याच्यात काही फरक पडला नाही . इतका निराश वैफल्यग्रस्त घन्या मी कधीच पाहीला नव्हता . आपण नापास झालो या दुःखी भावनेने त्याला निराशेने प्रचंड आतूनच पोखरून काढले होते . सारखा स्वतःच्याच तोंडात तो चापटया मारायला लागला होता .

पश्चातापाच्या ........

            एक दिवस घन्याकडे दुपारी गेलो होतो . घन्याला खूप भूक लागली होती . त्याची वेडी आई तिथेच गाठोडी चिवडत, उचकत, मोठमोठयाने आपल्याच नादात, तंद्रीत बडबड करत बसली होती, तिचे आपल्या उपाशी लेकाकडं , त्याच्या बोलण्याकडे जरासुद्धा लक्ष नव्हतं, मोठी बहीण  चांगली कपडे नसल्यामूळे अंगावर चादर लपेटून निस्तेज व भकास चेहऱ्याने झोपली होती . घन्याला भुकेमूळे खूप राग आला होता तो त्याला कंट्रोल होत नव्हता . 

मी देखील त्याला मदत करण्याचे फक्त आश्वासन देत होतो . कारण मी कमवत नव्हतो . घन्याने सगळी भांडी आपटली, फेकून दिली, आईच्यासमोर तिने बांधलेल्या गाठोड्यांवर लाथा मारल्या .व माझ्याकडे रागाने पाहून हातवारे करत तो म्हणाला  कशाला असे भिकाऱ्यासारखे जगायचे ? असं फालतू आयुष्य जगून काय उपयोग? असं जगण्यासाठी का आपण जन्म घेतलाय ? याला जगणं म्हणतात का ? 

मी फक्त  डोळ्यात पाणी आणून त्याला माझ्या घरी न्यायचा प्रयत्न करू लागलो . संतापाने त्याने मला ढकलून दिले .भूकेच्या तडाक्यातच शोधाशोधीत त्याला मिरचीचा लाल चटणीचा डबा सापडला . त्याने चटणीच खायला सुरवात केली .बकाबक तो मुठी भरून चटणी तोडांत कोंबत होता . मी डोळे फाडून त्याच्याकडे पहातच बसलो . तो मला अघोरी प्रकार वाटत होता , जवळजवळ अर्धा किलो तरी चटणी त्याने संपवली होती . मला वाटले त्याला आता  जुलाब होणार, किंवा पोटात तरी दुखणार , प्रचंड यातना होणार , हॉस्पीटलमध्ये न्यावे लागणार .पण घन्याला काहीच झाले नाही . सगळे मान , अपमान, दुःख, वेदना, गरीबी पचविण्याची ताकद त्याने  शरीरात  व मनात निर्माण केलेली होती . मग तो एकटाच राहू लागला व शांत राहून स्वतःशीच मुकपणे भांडत राहीला . 

अखेरपर्यंत ................. 

              एक दिवस तो माझ्या घरी आला एका बॉक्समध्ये त्याने १२वीची सर्व पुस्तके भरली होती . त्याच्या मनावर चेहर्‍यावर एक वेगळीच उदासिनतेची छटा मला जाणवत होती . 

माझ्याकडे का देतोस ही पुस्तके ? असे विचारले तर म्हणाला तुझ्याकडे ठेव, तुला उपयोगी पडतील . मी चाललोय आता .......... 

कुठे चाललास ? 

तर म्हणाला खूप लांब , आता कोणालाच परत भेटणार नाही . 

मी घाबरलो व त्याच्या पाठीमागे जावू लागलो तर मागे वळून म्हणाला .

असा किती दिवस पाठलाग करशील तू ? 

थकशील तु .

मी कधीच सापडणार नाही तुला . 

पण तु खूप मोठा हो . शहाणा हो , 

तुला आवडणाऱ्या चित्रकलेत वाहून घे स्वतःला .

जीव ओत चित्रांमध्ये, कधी हारु नकोस माझ्यासारखा, तू झगडत रहा, खूप वाचत रहा. प्रयत्न सोडू नकोस, आणि गाणी ऐकताना मात्र डोळे मिटत जा मग तुला समजतील अनेक गुपिते गाण्यातील व जीवन जगण्यातील सुध्दा ...........

            दुसऱ्या दिवशी  सकाळीच गावात गदारोळ उठला . सकाळचे दहा वाजले असावेत . कोणीतरी मला सांगितले घनःश्यामने गाव विहीरीत  उडी मारून जीव दिला. 

जिवाच्या आकांताने मी पळत सुटलो विहीरीकडे .खूप  वेगाने ....काय कळतंच नव्हतं मला काय होतयं ते . शरीर,  मन, बुद्धी हातपाय सुन्न झाले होते.  

मी पाहीलेला माझ्या आयुष्यातील पहीला मृतदेह होता घन:श्यामचा, माझ्या सर्वात आवडत्या मित्राचा .पाण्यातून रात्रभर भिजलेला , ओलाचिंब झालेला. ज्याच्या बरोबर माझे सगळे बालपण घालवले तो घन्या आता शांतपणे ,निष्प्राणपणे पडलेला होता . त्याच्या अंगावर तोच कालचा आवडीचा डार्क ग्रे रंगाचा कित्येक वर्षाचा कोट होता . तो काहीच बोलत नव्हता ,मी त्याच्याकडे पाहीले त्याचे डोळे मात्र शांतपणे मिटलेले होते . कुठलेतरी आवडलेले गाणे ऐकतोय असे  वाटले . मग मला वाटले तो आता तोडांवर  बोट ठेवेल  ,मला शांत राहायला सांगेल व कागदाचा तुकडा काढेल व मला सगळे गाणे पुर्णपणे लिहून देईन . मला सांगेल डोळे मिटत जा गाणे ऐकताना . 

पण असं काही झालं नाही ... . .

घन्या गेला होता माझ्यापासून , आपल्या सगळयांपासूनच खूप  लांबच्या अज्ञात प्रवासासाठी ........... डोळे मिटून .

             घनःश्यामच्या अंतयात्रेला मी गेलो नाही . माझी हिम्मतच झाली नाही .त्या हनुमान गल्लीकडे मी फिरकलोच नाही कितीतरी दिवस .

             पुढे मी कोल्हापूर , पुणे, मुंबई दिल्लीे येथे चित्रकलेच्या कामासाठी, शिक्षणासाठी गेलो. पाचगणीला माझे येणे कमी झाले. पुढे असेही कोणाकडून तरी ऐकले की घनःश्यामची उत्तरपत्रिकेची फेरतपासणी केली तर घन्या फर्स्टक्लास मध्ये पास होता . बोर्डाने काही तरी रिझल्टच्या कागदावर मिसप्रिंट झाल्याचे कारण दिले होते .ती निकालाची प्रत दुरुस्त करूनही दिली . 

पण 

माझा घन्या मात्र माझ्यापासून कायमचा मिस झाला होता . तो कधीही दुरुस्त होणार नव्हता . तो कायमचा  गेला होता . माझ्यासोबत असंख्य आठवणी ठेवून .

             माझ्या  संजीवनच्या वर्गात असलेल्या अनिता  टेंबेचे सुरेल आवाजातील  गाणे सुरु झाले की मी घन्याकडे पाह्यचो . तर घन्याने डोळे मिटून घेतलेले असायचे व मलाही तो डोळे मिटून घ्यायला सांगायचा पण मी झोपलेला दिसेन या भितीने डोळे मिटायचोच नाही , घन्या मात्र तल्लीन झालेला असायचा . तीन तपानंतर ३६ वर्षानंतर आमच्या  संजीवनच्या ग्रुपची व्हॉट्सॲपवर भेट झाली . 

अनिता टेबेंची ( आता तिचे नाव अनिता  यादव झाले आहे ) तिच्या आवाजात रात्री  तिने पाठवलेली गाणी ऐकायला सुरुवात केली . आता मात्र मी डोळे मिटून घेतले होते ,तर पहीलेच गाणे सुरु झाले .

मधूवंतीच्या सुरासुरातून आळविते मी नाम, 

एकदा दर्शन दे घनःश्याम . . . . .

एकदा दर्शन दे घनःश्याम . . . . .

हे गाणे ऐकले  व माझ्या डोळ्यातून आपोआपच पाणी पाझरू लागले . ते थांबतच नव्हतं, इतका मी तर हळवा नाही मग हे पाणी का वाहतेय याचा  शांतपणे मी शोध घेत राहीलो . त्यावेळी जाणवले की अनिताच्या आवाजात आजही तीच अर्तता, स्वरांचा पक्का बाज, ठेका, ताल , शब्दफेक व काव्याची सुस्पष्टता, मंत्रमुग्ध होऊन भावना व्यक्त करण्याची जादूई सुरांची ताकद अजूनही  जिवंत आहे , आवाजाची धार तशीच टिकून आहे . वातावरण बदलून टाकायची त्या गाण्यांमध्ये ताकद आहे . 

घनःश्यामला ही गाणी खूप खूप आवडली असती . लगेच कागदाचा तुकडा काढून मला गाणी लिहून दिली असती व म्हणाला असता याला म्हणतात गाणे . अर्तता अशी असावी, गाणे गाताना तल्लीनता असावी .  तर खरं गाणे असंच पाहीजे जे हृदयाला भिडते आणि हेलावून टाकते ऐकताना संपूर्ण मनाचा कोपरा . 

      तर अशी ही घन्याची आठवण, अशा असंख्य आठवणी घेऊन  आपण सर्वच जण जगत असतो. मी देखील कधी कधी वैतागतो, निराशा येते मला , पण  मी हारत नाही, धडपड करत राहतो .यश मिळो ना मिळो . चित्रकाराचा काट्याकुट्यातील प्रवास करताना थकत  नाही  . वादविवाद , राजकारण फालतू विषय शक्यतो टाळतोच , कारण मग घन्या रागवेल माझ्यावर . व फालतू पोकळ कारणे घेऊन उगीचच भांडत बसल्यावर निषेध करेल तो माझा .

        पण आता असे वाटतंय घन्या जिवंत असता तर किती मजा आली असती ? माझी चित्रे , माझी गाडी , माझे घर पाहील्यानंतर म्हणाला  असता याला म्हणतात चित्रं काढणारा चित्रकार . कारण माझ्याकडे काहीच म्हणजे काहीच नव्हते .एकदम शुन्य , झिरो होतो . आज आठवतयं मग भांडला असता संजीवनशाळेच्या भट्टाचारी सरांशी ज्यांनी मला इंटरमिजिएट परिक्षेला डे स्कॉलर होतो म्हणून रिजेक्ट केले . चित्रकलेच्या ग्रेड परिक्षेला  बसूनच दिलं नाही . आणि म्हणाला असता ग्रेड परिक्षा घेऊन काय चित्रकार होता येते का? चित्रकार हा असा जन्मावाच लागतो .

        आपल्या सर्वांना देखील म्हणाला असता कधी तरी  प्रत्यक्ष भेटता, व्हॉटसअपवर व फेसबुकवर आभासी जगात एकमेकाला मेसेज पाठवता आणि कोणत्या तरी विषयावर उगाचच जीवाचा आटापिटा काथ्याकूट कशाला करता ?

आता विसरू नका एकमेकानां . 

भेटत रहा अधून मधून . 

हारू नका .

जिद्द सोडू नका .

वादविवाद , आपआपला मोठेपणा सोडा .

तुझे माझं मोठेपण सोडा,एकाच लेव्हलवर या .सर्वांचा मानसन्मान आदर ठेवा . 

कारण रागात किंवा भावनेच्या भरात एक चुकीचा शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो चांगल्या गोष्टीनां एका क्षणात संपवून टाकतो .आयुष्यभर तो शब्द एखादयाला विषासारखा टोचत राहू शकतो . 

म्हणून अधून मधून डोळे मिटत जा . 

आपल्या आवडीची गाणी ऐका ,
चित्रकारांची चित्रे नीट निरखूण पहा , मग नीटपणे कळतील चित्रकाराचे रंग त्याची साधना .गाण्याचा  , चित्रांचा  , कवितांचा आवडणाऱ्या सर्व गोष्टींचा कलांचां सार लक्षात घ्या, प्रत्येक गाणे , प्रत्येक चित्र , शिल्प , संगीत , वाद्य, आनंदासाठी निर्माण केलं आहे,. एकमेकानां मनसोक्त आनंद दया व घ्या . स्पर्धा करू नका .

जीवनाची अनेक गाणे गाऊन झाल्यावर आपल्या सगळ्यानां एक गाणे मात्र गावे लागते . शेवटचे अंतिम गाणे ..... 

घन्या आतच बसलाय जाऊन माझ्या हृदयात ,

खूप खोल . 

खूप खोलवर 

डोळे मिटून .................................

😌😌😌😌😌😌😌😌😌

चित्रकार : सुनील काळे✍️ 
9423966486.
निसर्ग आर्ट गॅलरी - वाई

शुक्रवार, ५ डिसेंबर, २०२५

Beautiful Panchgani & Mahabaleshwar

Beautiful Mahabaleshwar & Panchgani

Writer - Capt. Prasoon Shrivastava

Story of Maharashtra's Twin Hill Stations
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
            2005 साली मुंबईला जहाँगीर आर्ट गॅलरीच्या शेजारी म्युझियम आर्ट गॅलरी होती ( ती आता कायमची बंद झाली ) तेथे माझे चित्रप्रदर्शन झाले होते . या प्रदर्शनातून उद्योगपती श्री .जगदीश ठाकरसी यांनी माझी काही चित्रे विकत घेतली होती . ती त्यांनी त्यांच्या मुंबईच्या ऑफीसमध्ये लावली आहेत . त्यांचा महाबळेश्वर येथे 'ठाकरसी हाऊस ' हा ब्रिटीशकालीन बंगला आहे .पूर्वी त्याचे नाव ॲस्पेक्ट हॉल होते . जगदीशभाई कलारसिक आहेत व उत्तम फोटोग्राफर आहेत . त्यांनी या बंगल्याचे प्रत्यक्ष तेथे जावून एक मोठे जलरंगातील चित्र पूर्ण करण्याची संधी मला दिली होती . तो बंगला ब्रिटीश स्थापत्याशास्त्राचा उत्तम नमूना आहे . त्या काळात ब्रिटीशांनी काही चिनी लोकानां कैदी केले होते त्यांच्यासाठी महाबळेश्वर येथे  तुरुंग बांधला होता . या चिनी लोकांनी वेताच्या विणकामाच्या आराम खूर्च्या , फर्निचर व इतर अनेक गृहपयोगी वस्तू तयार केल्या होत्या , स्ट्रॉबेरीची लागवड त्यांनीच प्रथम या परिसरात सुरु केली होती . अनेक  एकरांमध्ये व घनदाट झाडीचा परिसर असल्याने येथे अतिशय शांतता असते .  महाबळेश्वर पाचगणीचे ब्रिटीशांचे बंगले आता अनेक पारशी व प्रसिद्ध व्यक्तिच्यां खाजगी मालकीचे आहेत .
           काही दिवसांपूर्वी एक अनोळखी फोन आला . फोनवर त्यांनी कॅप्टन प्रसून श्रीवास्तव असे नाव सांगितले . मुंबईतून जगदीश ठाकरसी यांच्या केबिनमध्ये ते माझ्या चित्रासमोर उभे राहून बोलतोय असे म्हणाले . त्यानां ते चित्र खूप आवडले होते .
        प्रसूनभाई यांनी नुकतेच पाचगणी महाबळेश्वर या दोन गिरिस्थानांचा प्रचंड अभ्यास करून एक जाडजूड 3000 रुपये किमतीचे इंग्रजी रंगीत चित्रमय कॉफीटेबल बुक प्रकाशित केले आहे . त्यामध्ये पाचगणी महाबळेश्वरचा इतिहास , ब्रिटीशकालीन इतिहास , अनेक रंगीत फोटो व पर्यटनस्थळांचा सविस्तर आलेख मांडला आहे . शाळा , इमारती , माणसे , सध्याची स्थिती व पूर्वीचे जीवन यांचा तुलनात्मक अभ्यास करून नव्या जुन्याचा चांगला मेळ घातला आहे .
कॅप्टन प्रसून श्रीवास्तव मूळचे दिल्लीचे पण त्यांची पत्नी मुंबईची व वारंवार या हिलस्टेशनला व्हिजीटर्स असल्याने येथील निसर्गाच्या प्रेमात पडले . मूळचे वार्ताहर व प्रकाशक असल्याने त्यांचा अभ्यास चांगलाच आहे . त्यांचे "पवई टाईम्स " हे दैनिक प्रसिद्ध आहे . अनेक चित्रे फोटो असल्याने हे पुस्तक वाचनीय व संग्रही ठेवण्यासारखे आहे .
      या पुस्तकामध्ये त्यांनी आमच्या दोघांच्या मुलाखती घेऊन छान लेख प्रकाशित केले आहेत . "जेथे पिकते तेथे विकत नाही "ही गोष्ट खरी आहे .चित्रकार म्हणून पाचगणीतील स्थानिकांनी जरी दूर लोटले ,नाकारले मदत केली नाही तरी आपण सातत्याने ज्या क्षेत्रात काम करत राहतो त्याची दखल घेणारा कौतूक करणारा कोणीतरी भेटतोच .
प्रसूनभाईंनी कोणतेही मानधन न मागता स्वतः लेख लिहून प्रसिद्धी दिली . उलट ऑनलाईन 500 रुपये पाठवून " ग्रीन टाय " या लेखाला पवई टाईम्स या त्यांच्या दैनिकात प्रसिध्दी दिली .
कॅप्टन प्रसून श्रीवास्तव यांना या पुस्तक निर्मितीबद्दल खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏💐💐💐
महाबळेश्वरला बाजाराच्या शेवटी श्री . इराणी यांचे इंपिरियल स्टोअर्स आहे तेथे हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे .

शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड

 दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

       आपल्यापैकी प्रत्येकाच्या रोजच्या जगण्यात  वेगवेगळ्या वयाची ,वेगवेगळ्या स्वभावाची ,अठरापगड जातीधर्माची , अतिशय वेगवेगळ्या विचारांचा पगडा असलेली , धार्मिक , राजकीय एकमत नसलेली  तर अगदी विरुद्ध विचारधारा व विरुद्ध टोकाची विचारसरणी असलेली अनेक माणसे जीवनप्रवासात भेटत असतात . काहीजण भेटल्यानंतर लगेच विस्मृतीत जातात,काही थोडेच दिवस लक्षात राहतात व नंतर विसरली जातात तर काही कायमची लक्षात राहतात . कधीकधी तर ही कायम लक्षात राहिलेली माणसे आपल्या जीवन प्रवासाचा एक अविभाज्य भागच झालेली असतात . त्यांचे हे अचानक निर्माण झालेले अनोखे मैत्रीचे नाते मनात कायम टिकून राहते .

            आज मी अशाच एका दूरदेशीच्या मैत्रीची गोष्ट सांगणार आहे. जी माझ्या जातीची नाही , धर्माची नाही , माझ्या वर्णाची नाही , जी माझ्या देशाची नाही , इतकेच काय ती मला समवयस्कर देखील नाही . आमचे राहणीमान , आर्थिक परिस्थिती , भौगोलिक वातावरण , आवडीनिवडी वेगवेगळ्याच आहेत .तरी देखील आम्ही कितीतरी वर्षे एकमेकांचे अगदी पक्के घनिष्ट मित्र आहोत आणि ह्या मैत्रीच्या मनाचे गुंफलेले धागे दिवसेंदिवस अजूनच घट्ट बनत चालले आहेत.

           1996 साली माझे एक चित्रप्रदर्शन पाचगणीत सुरु होते . त्या ओपन प्लाझाटाईप आर्टगॅलरीमध्ये अनेक पर्यटक येत होते . प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत होता.  एके दिवशी अशाच या प्रदर्शनाच्या धामधूमीत माझे चित्रप्रदर्शन पाहुन झाल्यावर पंच्चाहत्तरीच्या वयाची , पांढरेशुभ्र केस , युरोपीयन गोऱ्या वर्णाची , चेहर्‍यावर सुरकुत्या पण तजेलदार चेहरा असलेली , काळा गॉगल व लालभडक शर्ट व पांढरी पॅन्ट परिधान केलेली , पाठीमागे छोटी हॅवरसॅक लटकवलेली एक म्हातारी आज्जीबाई अगदी अचानकपणे माझ्यासमोर चालत आली व काही कळायच्या आतच तिने गळ्याभोवती प्रेमाने हात टाकत मनसोक्त गळाभेट घेतली . या अचानक झालेल्या जादूच्या झप्पीमुळे मी क्षणभर गांगरलो , बावरुन गेलो आणि थोडा आश्चर्यचकीतही झालो .

युवर पेंटीग्ज आर वंडरफूल ! 

युअर डिस्पले ॲन्ड स्टाईल इज अलसो व्हेरी व्हेरी इंटरेस्टींग .

कॅन वुई टेक कप ऑफ कॉफी टुगेदर ? तिने तिच्या मनातील भावना व ओळख थोडक्यात  शेकहँड करत अशा प्रेमळ पद्धतीने व्यक्त केल्यामूळे मी नकार देऊ शकलो नाही . मी , स्वाती , तिचा मित्र व ती असे चौघे कॉफी घेत हॉटेलमध्ये बसलो .

माय नेम इज इल्झे , 

आय एल एस ई .

व्हेरी सिंपल नेम .शेकहँन्ड करत तीने स्वतःची ओळख करून दिली . 

आय एम फ्रॉम जर्मनी , माय सिटी नेम इज बॉन . बी ओ एन एन . 

आय एम रिटायर्ड आर्ट टिचर ,बट नाऊ  टोटली फ्रि . 

आय लाईक एन्जॉईंग माय रिटायर्ड लाईफ स्केचिंग इंडिया . इंडिया अँन्ड इंडियन पीपल आर व्हेरी व्हेरी इंटरेस्टींग . आय लाईक युवर्स पेन्टींग अँन्ड स्केचेस .

           माझी चित्रे तिला आवडली होती , त्याविषयी ती भरभरून बोलत होती . तिला कौतुक करताना किती बोलावे याचे जणू भानच राहीले नव्हते . मग तिच्या लक्षात आले व तिच्यासोबत आलेल्या लालबुंद चेहरा असलेल्या , हाफ शर्टावर फोटोग्राफरचे जॅकेट परिधान केलेल्या वयोवृद्ध मित्राची ओळख करून दिली . त्याचे नाव ग्वीन्टर जॉन . त्या भेटीमध्ये तीने माझा पत्ता घेतला आणि दुसऱ्या दिवशी ती ग्वीन्टर सोबत माझ्या पाचगणीच्या त्या छोट्या घरात आली . तिचं जर्मनमिश्रित इंग्रजी आणि माझे मराठी गावरान इंग्रजी एकमेकाला मात्र थोडे थोड़े समजत होते .

            इल्झे आणि तिचा मित्र ग्वीन्टर दोघेही जर्मनीत बॉन नावाच्या शहरात राहत होते . तिथे तिचे 125 वर्ष जुने अनेक खोल्यांचे घर आहे . आणि तेथे ती एकटीच राहत असते . जर्मनीत डिसेंबरच्या सहा महिन्याच्या काळात अतिशय थंडी व बर्फ कोसळत असल्याने मायनस दहा डिग्रीच्या कडाक्याच्या थंडीमुळे घरात इलेक्ट्रीक हिटर बसवावा लागतो . त्या हिटरचे इलेक्ट्रीकचे इतके बिल येते की त्या बिलाच्या रकमेमध्ये सहा महिने भारतात राहायला परवडते . त्यामूळे अनेक वर्षांपासुन ते भारतात स्केचिंग करत भटकत असतात.

           ग्वीन्टर 85 वर्षांचा असुन तो पूर्वी जर्मन राजदूतांच्या सरकारी कार्यालयात नोकरी करायचा . जर्मनीत ते वेगवेगळ्या घरांमध्ये राहतात , पण दोघांना चित्रांची व स्केचिंगची आवड असल्याने ते भारतात एकत्र फिरतात .

या वयात असे मैत्रीपूर्ण संबध ठेवून एकत्र राहत , एकत्र भटकंती करत असताना तुमच्या दोघांचे कुटुंबिय काही तक्रार करतात का? मी आपला भारतीय , मराठमोळा प्रश्न विचारल्यानंतर इल्झे मनसोक्तपणे हसली .मग तिने तिच्या कुटूंबाविषयी माहिती दिली . इल्सेला दोन मुली व एक मुलगा सगळे वयाच्या पन्नासच्या पुढे . इल्सेचा नवरा कॅसिनो व गॅम्बलींगमध्ये बरबाद झाला. घटस्फोटानंतर इल्सेने सर्व जबाबदारी स्विकारली आर्ट टिचरची नोकरी केली आणि आपल्या सर्व मुलानां उत्तम शिक्षण दिले . जावई , सुना , नातवंडे सगळा भरपूर मोठा परिवार आहे. प्रत्येकजण सेटल आहे. प्रत्येकाची मोठी घरे आहेत व सर्वजण वेगवेगळे राहतात. त्यांच्या संसारात मग्न आहेत . पण आपण कोणालाही ओझे वाटता कामा नये यासाठी ती वेगळे राहणे पसंद करते . तिला चित्रे काढायला , स्केचिंग करायला भटकायला आवडते . योगायोगाने ग्वींटर तिच्याच शहरात राहणारा तोही समवयस्कर . त्याची पत्नी अजारपणात गेली . मुले सेटल आहेत .पण दोघांनीही नात्याच्या गुंत्यात स्वतःला गुरफटून घेतले नाही . मग या दोघांची निरागस मैत्री सुरु झाली व स्वच्छन्दी भटकंती देखील .

               वयाच्या साठीनंतर तिला स्केचिंग , चित्रकला करत मनसोक्त भटकायचे होते त्याप्रमाणे कधी एकटी किंवा एकत्रपणे ती भारतात प्रत्येकवर्षी सहा महिने भटकत असते . वाराणसी , इंदोर , औरंगाबाद , राजस्थानमधील जोधपूर ,उदयपूर , जैसलमेर , मद्रास , पचमढी , भोपाळ , मांडू , अजिंठा , वेरुळ ' पाँडेचरी , हम्पी , कर्नाटक , गोवा , सातारा , वाई, पाचगणी , महाबळेश्वर , म्यानमार , बाली , जावा , जकार्ता , मलेशिया , थायलंड , इंडोनिशिया बँकॉक अशा सर्व ठिकाणी तिची मुशाफिरी सुरु असते . गेली पंचवीस वर्षे तिचा हा मुक्तप्रवास मजेशीरपणे चालू आहे.

             दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ती पाचगणीला येते . ती भारतात आली की तिचा अचानक फोन येतो . प्रत्येक वेळी आठवणीने ती अपॉईंटमेंट घेतल्याप्रमाणे टायमिंग विचारते आणि ते कधीही आजपर्यंत चुकलेले नाही . तिला लाल एस.टी बसने प्रवास करायला आवडतो . त्याचे कारण म्हणजे एसटी स्वस्त आहेच पण त्यात बसणारी साधी माणसे प्रेमळ असतात व सुरक्षितपणे प्रवास करता येतो असे तिचे व्यक्तिगत मत आहे . आपली छोटी सॅक पाठीवर घेऊन ती सगळा भारत चित्रित करत बसमधूनच फिरत असते .

             एकदा तिने मला स्केचिंग करण्यासाठी माझ्या आवडत्या स्पॉटवर सोबत येण्याची विनंती केली. मग तिला इम्प्रेस करण्यासाठी मी माझे चित्रकलेचे सामान , ईझल (चित्रकलेचे स्टॅन्ड ), भरपूर पेन , ब्रशेस , वॉटरकलर्स ,पेन्सीली , बसायची खुर्ची , उन्हाची आऊटडोअरची मोठी छत्री , त्याचे लोखंडी स्टॅन्ड , व इतर अनेक सटरफटर वस्तू घेऊन पांगारी गावच्या व्हॅलीचे चित्र काढायला माझ्या मारुती व्हॅन गाडीतून निघालो . आमच्या दोघांनाही एकमेकानां स्पॉटवर चित्रे काढताना पाहण्याची इच्छा व उत्सुकता होती .

              पंजाबी ड्रेसमध्ये बसलेल्या इल्झेने मस्तपैकी जमीनीवरच बैठक मांडली . तिच्या जवळचे पाच बाय सात इंच आकाराचे छोटे स्केचबुक उघडले . त्यात एक बॉर्डर मार्किंग करायची चौकट होती . ती चौकट पेन्सिलीने आऊटलाईन करून तिची अतिशय छोट्या आकाराची जलरंगाच्या वड्या असलेली पेटी उघडली . तिच्याकडे एकच ब्रश होता तो दोन भागात विखुरलेला आट्या असलेला ब्रश तिने जोडला . युरीन टेस्ट करताना वापरतात तशी पाण्याची छोटी बाटली उघडली . अतिशय तत्परतेने तीने चित्र काढावयास सुरुवात केली . थोडे अमूर्त , थोडे मूर्त , इंप्रशेनिस्ट पद्धतीचे चित्र 15 मिनिटात संपले देखील . मग पाठीमागच्या बाजूला तिने मला स्पॉटविषयी माहिती विचारली . त्या दृश्याचे नाव ,गाव , वेळ लिहली मग माझ्याकडे हसत पहात म्हणाली माय वर्क इज फिनिश्ड . नाऊ यु स्टार्ट युवर वर्क .

             मी मात्र माझे सामान लावण्यातच अर्धा तास घालवला आणि मग दोन तीन तास माझे डिटेल स्केचिंग काम सुरु झाले . तोपर्यंत इल्झे सगळीकडे मनसोक्तपणे भटकून आली . तिचा स्केचिंगचा विचार , चित्राकडे , दृश्याकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी होती . तिच्या चित्रानां कोणतीही अशी स्टाईल नव्हती . तिचे स्केचबुक म्हणजे एक छान प्रवासवर्णन होते . प्रत्येक चित्रामागे सारांशरुपाने लिहलेली माहिती ,वेळ ,दिनांक व्यवस्थितपणे लिहलेले होते . त्या प्रत्येक स्केचमध्ये मला कधी व्हॅनगॉग , पॉल क्ली, पिकासो , मोनेट , कधी कोलते , अवचट , चंद्रमोहन अशी वेगवेगळी चित्रकारांच्या पद्धतीने रेखाटलेली चित्रे दिसायची . कोणतेही एक चित्र दुसऱ्यासारखे नाही . मी तिला याविषयी विचारले तर म्हणाली चित्र काढताना मला त्यादिवशी ,त्यावेळेला ,त्याक्षणाला जे जाणवले ,भावले ते मी रेखाटले . 

नो डिस्कशन . 

विषय संपला .

              मी मात्र माझी पारंपारीक पठडी , डिटेल्स स्केच करायची सवय सोडलेली नसायची पण त्यावर तिने कधीही टिकाटिप्पणी केली नाही किंवा मला ती स्टाईल सोडण्यासाठी । सांगितले नाही उलट ती कौतुकाने म्हणायची एक्सलंट जॉब , एक्सलंट पेशन्स . इल्झेने  चित्रकलेतील कोणत्याही ईझम्सचा निषेध केला नव्हता . तिला सगळे ईझम्स सारखेच प्रिय होते , सगळ्यानांच तिने स्विकारले होते . आनंदाने ..........

            पुढे प्रत्येकवर्षांच्या भेटीमध्ये ती आणि मी वाईच्या गणपती घाटावर , मधल्या आळीतील घाट , मेणवलीचा फडणीसवाडा , पाचगणी व महाबळेश्वरच्या परिसरातील  शेरबाग , आर्थरसीट , राजभवन , लॉडवीक पॉईंटला भटकत स्केचिंग करायचो खूप फिरायचो . तिला कोणत्याही विषयाचे वावडे नसायचे . डोंगर , दरी , रस्ता , झाडे , इमारत , बंगले काहीही विषय असो ती सगळे अगदी प्रेमाने चित्रित करायची . तिच्या स्वतःच्या स्टाईलने . तिचा ऐशींव्या वर्षाचा सातत्याने स्केचिंग करण्याचा उत्साह पाहून मी चकीत व्हायचो . बिनधास्तपणे अनोळखी गावांमध्ये फिरण्याची सवय , परका देश , परकी माणसे याविषयी तिची कसलीही तक्रार नसायची . तिची चित्रांची छोटी सॅक पाठीवर घेऊन कोणी सोबत असो वा नसो ती आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगते .

           मग मला माझी आपल्याकडची काही म्हातारी माणसे आठवतात . सांधेदुखी , गुडघेदुखी , हातपाय सुजलेले दाखवत राहतात . अनेक आजारांनी मानसिक व शारिरीक दृष्टीने खंगलेली एकाच जागेवर पडून राहीलेली असतात . प्रवासाचे नाव जरी काढले तरी अनेक अडचणी सांगत टाळाटाळ करत राहतात . काहीजण जुन्या घडलेल्या वाईट गोष्टींवर राजकारण , सरकार , व नातेवाईकांविषयी सतत टिकात्मक बोलून टिव्ही पहात स्वतः व इतरानाही अस्वस्थ करणारी मंडळी आठवत राहतात . अर्थात काही अपवाद असतात , सगळीच वयस्कर माणसं त्रासदायक नसतात .

              इल्झेचे व्यक्तिमत्व मात्र या सर्वांपेक्षा वेगळेच आहे . स्वतः नकाशा घ्यायचा , त्या गावाची शहराची माहीती काढायची , तिथल्या कोणत्या स्पॉटवर चित्रे काढता येतील याचा अभ्यास करायचा . हॉटेल बुक करायचे ,एसटीचे वेळापत्रक घ्यायचे . कोणतीही एसटी वेळेवर आली नाही म्हणून ती कधीही वैतागलेली दिसली नाही .एसटी मध्ये फाटलेल्या सीटाबद्दल , असुविधांबद्दल तिची कोणतीही तक्रार नाही. जे नानाविध प्रकारचे चांगले वाईट जेवण मिळेल ते आनंदाने खायचे , कोणत्याही अनोळख्या स्त्रीया , माणसांबरोबर मैत्री करायची त्यांच्या मुलानां खाऊ द्यायचा . त्यांच्याबरोबर मोबाईलने असंख्य फोटो काढायचे . बुरखा घातलेली एखादी मुस्लिम स्त्री दिसली की तीचा बुरखा उघडायचा व त्या बाईबरोबर हातात हात घालून एक हसतमुख फोटो काढण्यासाठी  त्याच बाईच्या सोबत असलेला तिच्याच नवर्‍याला सांगायचे ही तिची हॉबी ती पुरेपूर एन्जॉय करते . आपल्या या सहा महीन्यांच्या प्रवासात भरपूर स्केचबुके घेऊन ती समाधानाने जर्मनीला जाते . तेथे गेल्यावर सर्व ओळखीच्यानां आवर्जून पत्रे लिहते . स्वतः ई मेल करते व तिच्या अनुभवाबद्दल केलल्या मदतीबद्दल भरभरून लिहते . 

            गेली पंचवीस वर्ष मी आणि स्वाती करत असलेल्या आर्ट गॅलरीच्या संघर्षाची ती साक्षीदार आहे . येताना ती मुद्दाम जर्मनीची ब्रशपेन्स तर कधी छोटी स्केचबुके आणते त्याबदल्यात मी तिला कधी खास मदत करावी अशी तिची कधीही अपेक्षा नसते .आम्ही राहत होतो त्या सर्व चित्रविचित्र परिस्थितीचा तिने कधी तिरस्कार केला नाही . माझ्या अपयशावर टिकास्त्र सोडले नाही . उपदेशाचे डोस पाजले नाहीत .यावर्षी करोनाच्या महामारीमुळे डिसेंबर महिन्यामध्ये इल्झे भारतात आली नाही . यावर्षी मायनस वीस डिग्री सेल्सियस तापमानात बर्फामूळे पसरलेला ग्रे रंगाचा उदासिनपणा तिला भारताची आठवण करून देतो. युवर कंट्री इज कलरफूल , यु ऑल इंडियन्स आर वंडरफूल पीपल  असे सांगत इल्झे आता वॉटसअपवर कधी स्काईपवर व्हिडीओ कॉल करत खूप बोलत असते . तिने केलेली नवीन चित्रे दाखवत राहते .तिने माझी सगळी घरे पाहिलीत आता माझे नवीन घर पाहण्याची व परत त्या परिसरातील स्केचिंग करण्याची तीची ओढ आजही नव्वदाव्या वर्षी कायम आहे. 

ती फक्त करोना संपण्याची वाट पाहतेय ..........

            एकदा भारतातील प्रवास संपवून ती परत जर्मनीला जाण्यासाठी निघाली होती . कारण ग्वीन्टर ख्रिस्तवासी झाल्यामूळे ती आता एकटीच प्रवास करत होती . मी आणि स्वाती तिला शेवटचे भेटण्यासाठी महाबळेश्वरला हॉटेलवर गेलो होतो . तिच्या हातामध्ये छोटी चाके असलेली सुटकेस व पाठीमागे तिची फेव्हरेट छोटी चित्रांची सॅक होतीच . बाकी काही सामान नाही . मग मी तिला विचारले , असे परक्या देशात भटक्या विमुक्त जमातीसारखे फिरताना तुला भिती नाही का वाटत ?

त्यावेळी तिने दिलेले उत्तर आजही माझ्या कायम लक्षात आहे .

मित्रा , प्रवास खूप लांबचा आहे , 

मजेशीर आहे, 

आनंदाचा आहे , 

पण आपल्या प्रत्येकाचा प्रवास अचानकपणे कधीही संपू शकतो याची सतत जाणीव ठेवली पाहीजे . 

आपल्या या जीवनाच्या प्रवासात अनेक अडचणी येणार आहेत , अनेक कडू गोड अनुभव पाठीशी मिळणार आहेत. पण प्रवासात खूप मोठ्या अपेक्षा बाळगून, खूप नात्यांची गुंतागुंत वाढवण्यापेक्षा कमीत कमी सामान घेऊन मनाची आणि शरीरावरचीही जड ओझी टाळली पाहीजेत .


" शेवटच्या प्रवासात सामान खूप  कमी असले पाहीजे ". 


शेवटी आपले दोन्ही हात व मनही पक्षांप्रमाणे मोकळे असायला हवे मग झटपट कोठेही जाण्यासाठी आपण सदैव तयार असू .

जीवन प्रवासासाठी कसलीही जटील बंधने असू नयेत . 


" शेवटच्या प्रवासात सामान खूप कमी असले पाहीजे ". 


माझ्या वाई -पाचगणीच्या साध्या दोन दिवसाच्या प्रवासात गाडीतील डिकीत व पाठीमागच्या सीटवरील खच्चून भरलेल्या सामानाकडे सहज नजर टाकली की  मला या 

दुरदेशीच्या मैत्रीणीची आठवण येते व कानात शब्दही ऐकू येतात .


" प्रवासात सामान खूप कमी असले पाहीजे "

"प्रवासात सामान खूप कमी असले पाहीजे " 

🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳


सुनील काळे✍️

9423966486

sunilkaleartist@gmail.com

चित्रकार सदानंद बाकरे यांची आठवण

*चित्रकार सदानंद बाकरे यांची आठवण*
  🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭
                     आयुष्यामध्ये काही प्रसंग काही आठवणी अशा असतात की आपण किती जरी ठरवले की त्या विसरायच्या तरी ते शक्य होत नाही .काहीतरी प्रसंग असे येतात आणि त्या आठवणी परत नव्याने जागे होतात .आज संध्याकाळी सात वाजता आमच्या निसर्ग आर्ट गॅलरीच्या नेहमीच्या सकाळी १० ते ६ या वेळेनंतर अचानक एक कुटूंब चित्रप्रदर्शन पहायला आले . आमचा कामगार लगेच म्हणाला वेळ संपली , म्हणून ते परत जात होते इतक्यात मी माझा वॉक संपवून परतलो होतो . गेटच्या दारात त्यांची भेट झाली ते तरुण जोडपे दुचाकीवरून आले होते . रेनसूट घातला होता तरी पावसात भिजत आल्याने ओलेचिंब झाले होते . साताऱ्यावरून प्रवास करून आले होते रस्त्यात जाताना त्यानां निसर्ग आर्ट गॅलरीचा बोर्ड दिसला म्हणून त्यांनी विचारले होते . अचानक मला सदानंद बाकरे या मोठ्या चित्रकाराची आठवण झाली . मी त्यानां आमचे प्रदर्शन दाखवले थोड्या गप्पा मारल्या . दोघे तरुण जोडपे फारच खूष झाले . जाताना त्यांनी अनेकवेळा कृतज्ञता व्यक्त केली . त्या तरुण मुलाने माझ्यासोबत एक फोटो काढला. ते आनंदाने धन्यवाद देत गेले आणि माझी आठवणीची लेखणी सुरु झाली .
            कोकण हे सगळ्यांनाच आवडणारे ठिकाण आहे . कोकणातल्या बोटी समुद्र आणि नारळाच्या बागा ,जलदुर्ग , सागरकिनारे , बोटी हे रंगवणे हे मला आजही सर्वात आवडते काम वाटते . कारण कोकण व तेथील निसर्ग हा विषयच भारी आहे .  
            असेच एकदा कोकणाच्या दौऱ्यात चित्र काढायला गेलो असताना दापोली येथे गेलो होतो . दापोलीला छान कृषी महाविद्यालयामध्ये मुक्काम केला होता आणि जवळपास कोणकोणती ठिकाणे पाहण्यासाठी आहेत याचा शोध घेत होतो . त्यावेळी मुरुड ,अंजरले ,दिवेआगार ,बोर्डी , हरिहरेश्वर , श्रीवर्धन त्याच्याजवळ असणारे जीवनेबंदर या ठिकाणी चित्र काढण्यासाठी फिरत होतो . मुरुड मध्ये असताना आम्ही एका प्रायव्हेट बंगल्यामध्ये रहात होतो या बंगल्याचे मालक अतिशय बोलके आणि उत्साही गृहस्थ होते . त्यांचे आडनाव श्री .मुरुडकर . त्यादिवशी मी परिसरातील चित्र काढून आल्यानंतर रात्री जेवत असताना मी चित्रकार आहे हे सांगितले .  माझी चित्रे पाहिल्यानंतर त्यांनी सांगितले की मुरूडमध्ये आमच्या येथे एक वयस्कर प्रसिद्ध चित्रकार राहतात त्यांचे नाव सदानंद बाकरे आहे . परंतु हे चित्रकार अतिशय लहरी एककल्ली व विचित्र वागतात पूर्वी मी त्यांना जेवणाचा डबा पुरवायचो . परंतु त्यांच्या जेवणासाठी इतक्या तक्रारी असायच्या की आता संपूर्ण गावामध्ये त्यांना जेवण देण्यासाठी कोणीही जात नाही .हे चित्रकार मोठे असून पूर्वी परदेशातही राहत होते असे आम्हा गाववाल्यानां माहिती आहे . तुम्ही त्यांना जरूर भेटा. 
         त्यांनी आवर्जून सांगितल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांना सोबत घेतले व तिघेजण  बाकरेसरांच्या बंगल्यावर गाडी घेऊन गेलो .
          आम्ही बंगल्यात प्रवेश करण्यापूर्वीच आतून एका वयस्कर व्यक्तीचा मोठ्याने आवाज आला . कोण आहे रे तिकडे ? त्याबरोबर आम्ही लगेच थांबलो .आमच्या बरोबरचे श्री . मुरुडकर मालक यांनी लगेच पुढे जाऊन बाकरेसाहेबानां नमस्कार केला .पाचगणीवरून  निसर्गचित्रकार नवराबायको तुम्हाला भेटायला आलेले आहेत तर त्यांना भेटता येईल का ? असे विचारले . त्यांनी आतूनच विचारले अपॉईंटमेंट घेतलेली आहे का ? आम्ही त्यांना सांगितले की नाही .  त्यांना सांगा , पहिले आपण माझी अपॉईमेंट घ्या आणि मग भेटायला या . त्यांचे संभाषण चालू असतानाच मी त्यांना सांगितले की मी आता मुरुड सोडून दुसऱ्या गावाला चाललो आहे त्यामुळे मला नंतर भेटायला वेळ मिळणार नाही . त्यांनी आतूनच उत्तर दिले येथून 3km अंतरावर एसटी स्टॅन्डजवळ एक सार्वजनिक टेलीफोन आहे तेथे जा . तेथून मला फोन करून माझी अपॉईमेंट घ्या त्यानंतर मी फोनवर तुम्हाला वेळ देईन व त्यानंतर आपण भेटू .अपॉईमेंट घेतल्याशिवाय मी कोणालाच भेटत नाही . त्यामुळे येथून लगेच चला , चालू पडा . थांबू नका ? असे सडेतोडे उत्तर आल्यामुळे मी आणि स्वाती निराशेने बाहेर पडलो . प्रत्यक्ष माणूस समोर असताना टेलीफोन करून अपॉईमेंट का घ्यायची ? हे तंत्र मला कधीच समजले नाही . पुढे मी माझ्या व्यापात सदानंद बाकरे यांना विसरूनही गेलो
         2002 साली माझे जहांगीर आर्ट गॅलरी येथे ऑडिटोरियम हॉल येथे भव्य प्रदर्शन भरलेले होते . जहाँगीर आर्ट गॅलरीबद्दल बाकीचे लोक काहीही म्हणोत परंतु माझ्यासाठी चित्रविक्रीचे ते उत्तम ठिकाण आहे . त्यामुळे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन करताना मी जास्तीत जास्त चित्रे घेऊन जात असतो . चित्र चालू असताना चित्रप्रदर्शन चालू असताना जी चित्रे विकली जातात ती मी ताबडतोब काढून ठेवतो आणि भरपूर स्टॉक सोबत असल्यामुळे नवनवीन चित्रे प्रत्येक वेळी डिस्प्ले करत असायचो . अशा या प्रदर्शनांमध्ये चित्रप्रेमी लोकांची खूपच प्रचंड गर्दी असायची आणि प्रत्येकाकडे बोलायला वेळ द्यायला लक्ष द्यायला पुरेसा वेळही नसायचा . प्रदर्शनात खूप कामे व भेटाभेटी असल्याने दिवस व्यस्ततेतच संपायचा .
            त्यावेळी एकदा दुपारच्या वेळी गॅलरीमध्ये एक अर्धा  बाह्याचा पांढरा झब्बा घातलेले ,निळी लुंगी खांद्यावर , सोबत एक पांढरी शबनम घेऊन एक वयस्कर गृहस्थ लंगडत लंगडत एका तरुण माणसाच्या हाताला धरून आत आले . त्यांच्याबरोबर आमच्या ओळखीचे प्रशांत शहा व आशुतोष आपटे , ज्ञानेश्वर ढवळे हे चित्रकार मित्र होते . या गृहस्थांना नीट चालता येत नव्हते तरीही ते कष्टाने लंगडत लंगडत चाललेले होते . त्यांच्या उजव्या पायाला मोठी जखम झालेली होती त्या पांढऱ्या बँडेजवर त्यांनी पॉलिथिनची साधी प्लास्टिकची पिशवी बांधलेली होती . आत येताच आशुतोष आपटे यांनी त्यांची ओळख  सांगितली सुनील हे प्रसिद्ध चित्रकार सदानंद बाकरे ते तुमचे प्रदर्शन पाहायला खास टॅक्सीने तब्बेत बरी नसताना हॉस्पीटलमधून आलेत .
         एका क्षणार्धात मी बाकरेंच्या मुरूडच्या आठवणीमध्ये  गेलो . मला लगेच आठवले  त्यांनी मला त्यांच्या घरी भेट घेऊन दिली नव्हती , त्यामुळे मी थोडासा रागाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले . बाकरेसाहेबांनी आशुतोष आपटे , ज्ञानेश्वर ढवळे , प्रशांत शहा यांच्याबरोबर माझे चित्र प्रदर्शन पाहिले स्वातीच्या फुलांची चित्रे व माझी पाचगणी महाबळेश्वर येथील निसर्गचित्रे पाहून ते खूप भारावले नंतर टेबलापाशी आल्यानंतर त्यांनी माझी गळाभेट घेतली .
        त्यावेळी मी त्यानां म्हणालो  मुरुडला तुमच्या घरी आलो होतो परंतु आपली भेट त्यावेळी झाली नाही ती भेट आज होणार होती . त्यावेळी माझ्याकडे मोबाईल फोन नव्हता , आता आहे .कोकणात पुन्हा कधी आलो की तुमची अपॉईमेंट घेऊनच येईन . त्यावेळी ते मला निराश स्वरात म्हणाले अहो ती माझी चूकच होती . कशाला आठवण काढलीत ?  आता म्हातारपणात हातपाय थकलेत . कोणाचा आधार नाही . त्यावेळचा जोष व हुशारी आता राहीली नाही . आता तर शरीरही साथ देत नाही . तुम्ही त्यावेळी आला होता त्यावेळी भेटलो असतो तर बरे झाले असते . आता काय शेवटचे दिवस उरलेत . येणारा दिवस ढकलतोय .
          आज कितीतरी दिवसांनी हॉस्पिटलमध्ये असताना मला तुमच्या दोघांविषयी टाईम्स ऑफ इंडियात आलेले " कलर्स ऑफ लाईफ " हे  आर्टिकल वाचायला मिळाले . मग मी हॉस्पिटलमधून तडक तुमचे चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी आलो आहे . खरे सांगतो , तुमच्या दोघांचे प्रदर्शन खूप छान , अप्रतिम आहे . मला खूप आवडले . त्यांनी पाठीवर हात ठेऊन कौतुकही केले . थोडा वेळ खुर्चीवर बसले व त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा प्रदर्शन पाहण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळी आमचे मित्र प्रशांत शहा मला  म्हणाले अरे मित्रा ,  
' काय नशीबवान आहेस ' अशी मोठी माणसे तुमच्या प्रदर्शनाला दाद देत आहेत . त्यांचा अभिप्राय घे व फोटो घे . त्यावेळी बाकरेसाहेबांनी आमच्या अभिप्राय वहीमध्ये त्यांची सही  करून थरथरत्या हाताने एक छोटासा अभिप्रायही लिहिला . त्यांच्या हाताला झालेला कंप जाणवत होता , थरथरत्या हाताने त्यांनी शेवटचा अभिप्राय लिहिला .त्यावेळी त्यांनी सांगितले मुरूडच्या घराबाहेर फिरत असताना त्यांच्या पायाला विषारी साप चावला .त्या दंशामुळे पायाला मोठी इजा झालेली आहे . स्वतःचे जवळचे कोणी नातेवाईक माणसे मदतीला नव्हती त्यामुळे योग्य उपचार झाले नाहीत . त्यासाठी ते मुंबईमध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते . आता जखम बरी झाली आहे . थोडेफार चालू शकत होते .
           त्यांनी प्रेमाने निरोप घेतला व आता फोन करू नको डायरेक्ट मुरुडला या असे आमंत्रणही दिले होते , परंतु नंतर मी त्यांच्याकडे परत गेलो नाही .आज कितीतरी वर्षानंतर  आलेल्या एका तरुण जोडप्यामुळे मला  त्यांची परत एकदा आठवण झाली . 
          केकू गांधी यांच्या गॅलरी केमोल्डमध्ये मी तीन वर्ष फ्रेमिंग सेक्शनमध्ये होतो . तेथे प्रोगेसिव्ह आर्ट ग्रुप स्थापन केलेले हुसेन , रझा , आरा , गाडे , सुझा , बाकरे यासारख्या जगप्रसिद्ध कलाकारांची चित्रे गॅलरी मधून फ्रेमिंगसाठी येत असत . त्यांच्या चित्रांच्या किमंतीचे आकडे ऐकले तरी कानाला शॉक लागल्यासारखे वाटायचे . त्यांची नावे चित्रकला क्षेत्रात मोठी दबदबा करणारी व आदराने घेतली जातात . त्यानंतर या ग्रूपमधले पांढरा झब्बा लुंगी घालून आलेले हताश चित्रकार सदानंद बाकरे जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रत्यक्ष समोर पाहीले . त्यांची छबी कायम लक्षात राहीली . 
        एकदा सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे प्रकाश राजेशिर्के भेटले होते ते त्यांच्या संपर्कात होते . त्यांनी त्यांची दुर्देवी कैफियत थोडक्यात सांगितली . एका मोठ्या कलावंत चित्रकारांच्या उतारवयात काय उपेक्षा होवू शकते याची मला कहाणी त्यांना ऐकवली . मला बाकरेंच्या स्वभावाची प्रचिती आलेली होती त्यामुळे पुढे त्यांचे काय झाले याची मला आता पूर्ण माहिती नाही .
           गेटच्या दारात आलेला पाहूणा , मित्र किंवा अनोळखी व्यक्ती असो , तो गरीब असो वा श्रीमंत असो , चित्रकार असो वा सामान्य माणूस असो . मी त्याच्यासाठी प्रत्यक्ष गेटवर जावून त्याची दखल घेतो . दोन शब्द बोलतोच . कारण तो एक माणूस आहे आणि " माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहीजे " असे मला मनापासून वाटते .
       आपण माणुसकी जपणारे नसलो तर तुमच्या छोटेमोठेपणाला काहीही अर्थ नाही याची आठवण मला सदानंद बाकरे प्रसंगातून कायमची लक्षात राहीली आहे . आपण माणुसकीसाठी कायम सतर्क राहीले पाहिजे असे मला वाटते .
        मोठेपणाची झूल तारुण्यात जोर दाखवते , उतारवयात सर्वांचाच जोष उतरलेला असतो . मग उतारवयात पश्चाताप होतो पण  त्यावेळी खूप उशीर झालेला असतो . 
आज असलेले यश कधी पलायन करेल ? व अपयशाचा कधी सामना करावा लागेल ? हे कोणालाच माहिती नसते . आयुष्याचा खेळ कधी कोणाचा पलटेल याची खात्री कोणी देऊ नये . 

" समय बडा बलवान होता है " .
 
" माणूसकी " नेहमी जागृत ठेवण्यासाठी सर्वानां शुभेच्छा !
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुनील काळे✍️ 9423966486
निसर्ग आर्ट गॅलरी [वाई ]

गुरुवार, ३१ जुलै, २०२५

अनंत सामतांची भेट

"एम टी आयवा मारु " या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक श्री .अनंत सामंत यांनी आज निसर्ग आर्ट गॅलरीला सहकुटूंब भेट दिली . ते बरीच वर्ष 1980 सालापासून मेटगुताड या महाबळेश्वरजवळच्या खेड्यात राहत होते . अनेक अनुभव व बऱ्याच लोकांची आठवण निघाली .
भन्नाट व्यक्तिमत्व .

श्री . अनंत सामंत यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५२ रोजी मुंबईजवळच्या अर्नाळा इथे झाला. त्यांनी शालेय शिक्षण परळच्या आर.एम.भट्ट हायस्कुल मधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्कच्या इन्स्टिटयूट ऑफ कॅटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड न्यूट्रिशन मध्ये प्रवेश घेतला व डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी पूर्ण केला. या क्षेत्रात काही वर्षे वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नोकरी केली. MTDC मध्ये टुर मॅनेजर म्हणून देखील काम केले. त्यानंतर त्यांचा जहाजावरील प्रवास सुरू झाला. हॉटेल मॅनेजमेन्ट च्या जोरावर ते चीफ स्टुवर्ड म्हणून जहाजावर गेले व नंतर क्षेत्र बदलून नेव्हिगेटिंग ऑफिसर झाले. काही वर्षातच नोकरी सोडली आणि इंटेरियर डेकोरेशन, कन्स्ट्रक्शन वगैरे क्षेत्रात मुसाफिरी करत राहिले. लेखक होणं काही ठरवलेलं नव्हतं. परंतु जहाजावरील भ्रमंतीने आलेले अनुभव आणि भेटलेली माणसे यांच्यामुळे लेखनाला सुरुवात झाली. "एम टी आयवा मारू" च लिहून ठेवलेलं बाड बरीच वर्षे तसेच पडून होतं. मित्राच्या आग्रहावरून १९८९ साली ते प्रसिद्ध केलं आणि त्यांच्या लेखनाचा प्रवास सुरूच झाला तो एकदम हिट कलाकृतीने. सागरी जीवनावरील या कादंबरीने तरुणांना वेड लावलं. आज ३० पेक्षा जास्त वर्षे होऊन देखील तिची लोकप्रियता कमी झाली नाही आणि नवीन आवृत्त्या प्रकाशित होत आहेत. इतकेच नाही तर जागतिक स्तरावरील वाचकांसाठी या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद श्री. प्रशांत पेठे यांनी केला आणि तो २०१५ साली पेंग्विन (UK )नि प्रकाशित केला.

आतापर्यन्त त्यांची २० च्या आसपास पुस्तके प्रकाशित झाली असून काहींवर आधारित चित्रपट आणि नाटके देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.

अनंत सामंत यांनी लिहिलेली पुस्तके :
अविरत - १९९३ (आवृत्ती संपली )
अश्वत्थ (कादंबरी) (अविरतची सुधारित आवृत्ती )
एक ड्रीम..., मायला ! (कथासंग्रह)
एम टी आयवा मारू (कादंबरी) -१९८९[७]
ऑक्टोबर एंड (कादंबरी) - ऑगस्ट १९९९
Aiwa Maru (मूळ मराठी कादंबरी - एम टी आयवा मारू; इंग्रजी अनुवादक - प्रशांत पेठे) - २०१५
ओश्तोरीज (कादंबरी) - ऑगस्ट २०००
एका शहराचं शूटिंग (कथासंग्रह)
किबुत्झमधला डॅनी इथे आला होता (कथासंग्रह) - फेब्रुवारी २००३
के फाईव्ह (कादंबरी) - ऑगस्ट १९९९
त्रिमाकासी मादाम! (कादंबरी) - १९९५
दार  चौकट आणि बोटं (कथासंग्रह)
दृष्टी (कादंबरी)
बायपासचे दिवस (आरोग्यविषयक)
बेलिन्दा (कथासंग्रह) - मार्च २००१
मितवा (कादंबरी) - नोव्हेंबर २००४
लांडगा (कादंबरी) - सप्टेंबर १९९९
लिलियनची बखर (ऐतिहासिक)
सॅलिटेअर
माईन फ्रॉइण्ड - मे २००८
फ्रंट लाईन स्टोरी - जून २००१
अनंत सामंत यांना मिळालेले काही पुरस्कार
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे "दि.बा.मोकाशी " पुरस्कार
"वा.म.जोशी" पुरस्कार -१९८९
"महाराष्ट्र राज्य पुरस्कार" १९८९-९०, ९८-९९, ९९-२०००, २००९-१०
"ना.सी.फडके" पुरस्कार -१९९६
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा "आनंदीबाई शिर्के" पुरस्कार -१९९८
यशवंराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (नाशिक) यांचा "बाबुराव बागूल" गौरव पुरस्कार -१९९९
एकूण कथावाङ्मयासाठीचा "अ.वा. वर्टी" पुरस्कार -२००१
"पु.ना.पंडित" पुरस्कार -२००१
"पु.भा.भावे" महाराष्ट्र राज्य पुरस्कार -२००१
मुंबई मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ट कादंबरीसाठी "चंद्रकांत भोगटे" पुरस्कार -२००२
"बापूरावजी देशमुख स्मृती कथासंग्रह पुरस्कार" वर्धा -२००२
संस्कृती कलादर्पण पुरस्कार -२००९ (चित्रपट -वावटळ)

एका राजगीरा लाडूची गोष्ट

एका राजगीरा लाडूची गोष्ट
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
          चित्रकला , गायन, वादन, शिल्पकला , लेखन , अभिनय , नाट्यकला अशा अनेक विविध अभिजात कलाक्षेत्रात आपल्या कलागुणांमुळे ठसा उमटविणारे अनेक  कलावंत महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत . नेहमीच्या पोटापाण्याच्या नोकऱ्या न करता अखंड ध्यास घेणाऱ्या कलाकारांची तर महाराष्ट्रात वाणवा नाही . प्रसिद्धी मिळो वा ना मिळो पण आपण एखादे कार्य हाती घेतले तर ही मंडळी तडीस नेण्यासाठी अखेरपर्यंत तयार असतात .
      सातारा जिल्ह्यात कलादालन नाही याची एक बोचरी , दुखरी खंत मनात कायम सलत असते . मोठ्या शहरात कलादालने असल्याने तेथील नागरीक व शाळेकरी मुले तेथे होणाऱ्या कलाप्रदर्शनांना हजेरी लावतात बारकाईने चित्रे पाहतात . त्यानां चित्रकारांची नावे माहीत झाली आहेत त्या कलाकाराचे माध्यम व त्या माध्यमांची वैशिष्ठ्ये त्यानां समजून घेण्यात ते तयार होत आहेत . पण साताऱ्यातील छोट्या तालुक्यांमध्ये एकही आर्ट गॅलरी नाही त्यामुळे मुलांना ' कला ' या विषयात तितकासा रस निर्माण होत नाही .
          वाईतील मेणवलीजवळील भोगाव गावच्या सीमेवर रस्त्यालगत ज्यावेळी " निसर्ग आर्ट गॅलरी " या नावाचा बोर्ड पाहिल्यानंतर अनेक जवळपासच्या खेड्यात चर्चा सुरु झाली . काय असते आर्ट गॅलरीमध्ये ? तेथे काय मिळते ? हे पाहण्यासाठी अनेकजण कुतुहूल म्हणून फेरी मारतात व येथे हरवून जातात  व जाताना मला म्हणतात तुमची चित्रे जर येथे विकली जात नाहीत तर हा प्रकल्प कशासाठी सुरु ठेवला आहे ?
             मराठीत एक म्हण प्रसिद्ध आहे  आवड असेल तर सवड मिळते .  एके दिवशी दुपारी बाराच्या सुमारास भोगाव गावातील प्राथमिक शाळेतील तीन शिक्षक मुलांची सहल घेऊन आर्ट गॅलरी पाहायला आले . सौ .ससाणे मॅडम , सौ . फरांदे मॅडम व श्री . ठाकरे सर मुलानां कलादालन प्रथमच दाखवत होते . पाचगणी , वाई महाबळेश्वर परिसरातील चित्रित केलेला निसर्गवैभव पाहून मुले भारावून गेली , चर्चा करू लागली, जलरंग माध्यम , तैलरंग माध्यम त्यानां नवीन होते . खडूचे रंग (ऑईलपेस्टल ) त्यानां माहीत होते पण आता त्यानां नवी चित्रांची दृष्टी मिळत होती . तासभर नीट चित्रे पाहिल्यानंतर भरपूर फोटो काढून झाले . बागेत फिरून झाले व दुपारच्या जेवणाची वेळ झाली . मग शिक्षक मंडळीनी राजगिरा लाडू असलेली पिशवी उघडली व प्रत्येकाला एक एक लाडू दिला . आता शाळेत जावून मावशीने तयार केलेला खाऊ खायचा आहे तर पटापट चालत निघूया म्हणून मुलांची रांग तयार केली व निसर्ग आर्ट गॅलरीच्या बाहेर सर्व मुले एका लाईनीत परत निघाली . अचानक पाठीमागे राहीलेली एक मुलगी धावतपळत पुन्हा माघारी आली व हसत हसत तिने माझ्या हातात राजगिऱ्याचा लाडू कोंबला व निरागसतेने म्हणाली . . . . .
 ' मला तुमच्या दोघांचीही चित्रे खूप खूप आवडली म्हणून माझा लाडू तुमच्यासाठी ठेवलाय ' आणि लगेच क्षणार्धात पळतपळत ग्रुपमध्ये लाईनीत सामील होऊन निघूनही गेली .
          राजगीऱ्याचा तो लाडू व त्या मुलीची निरागस भावना माझ्या मनाला नवा उत्साह देऊन गेली .
         कलादालन पाहून उद्याची भावी चित्रकार मला चित्र रंगविताना त्या मुलीमध्ये दिसते . आणि ही प्रेरणा देण्याचे काम व प्रेरणा टिकवून ठेवण्याची स्फूर्ती गॅलरीतून मिळत राहते .
     आता कोणी विचारले की आर्ट गॅलरी सुरु ठेऊन काय मिळते ? तर मी सांगतो काही नाही मिळाले तरी चालेल पण एक राजगीऱ्याचा लाडू नक्की मिळतो .

वेडी माणसे

वेडी माणसे
🎭🎭🎭🎭
          चित्रकार ज्यावेळी एखादे ऑन द स्पॉट स्केच करत असतो त्यावेळी कितीतरी गोष्टी आजूबाजूला घडत असतात . त्या प्रत्यक्ष घडत असलेल्या घटना कधी मनाला खूप आनंदी करून जातात तर एकादी घटना मनाच्या आतपर्यंत खूप खोलवर जखम करणारी यातना देणारी असते . अशा वेगवेगळ्या घटनांचा चित्रनिर्मिती करताना नक्कीच प्रभाव ठरत असतो  चित्रकाराच्या मनात ती घटना आयुष्यभर लक्षात राहणारी ठरते .
          कृष्णानदीच्या किनारी वसलेल्या वाई गावाजवळ आमचे पांडेवाडी गाव आहे . पाचगणीला खूप वर्ष स्थायिक झालेलो असलो तरी या गावाला जत्रेनिमित्त , उन्हाळी सुट्टीत किंवा काही घरगूती कार्यक्रमानिमित्त आम्ही सतत येतजात असायचो . वाईच्या स्टॅन्डवर उतरलो की समोरचा रस्ता क्रॉस करायचा तेथे राजपूतांची सॉ मिल आहे त्या मिलसमोरच पुढे छान वळणावळणाचा पायवाटेचा रस्ता न्यायाधीशांच्या घरांपर्यंत चालत जायचो व लगेच शेखमिरा क्लबसमोर भव्य गणपती मंदीर दिसायचे . आजूबाजूला भरपूर झाडी होती . सिध्देश्वराच्या मंदीराजवळून जाताना डाव्याबाजूला गंगापूरीचा घाट व उजव्या बाजूला ढोल्या गणपतीचे मंदीर . त्या छोट्या पुलावरून दर्शन घेऊन गावी पायी जायचो . किती स्वच्छ आणि प्रसन्न वाटायचे . आपण वाईकर असल्याचा अभिमान वाटायचा .
           गेली दहा वर्ष मी आता वाईजवळ स्थायिक झालो . बालपणाच्या या आठवणींना उजाळा द्यावा म्हणून मी एक दिवस या रस्त्याने चालत निघालो . आता राजपूतांच्या मिलचा रस्ता आवडेनासा झाला आहे . आजूबाजूला दाट घरांची वस्ती , पुढे कातकरी व निर्वासित मंडळीनी उभारलेल्या झोपड्या त्या अस्वच्छ दुर्गंधीयुक्त झोपड्यांना सामोरे जात चालत राहीलो तर पुढे रस्ताच दिसेना . सगळीकडे घाणीचे व अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे . पूर्वीच्या वेदसंपन्न वाईच्या मंदिराच्या गावाला माणसांच्या मूर्खपणामुळे एक बकालपणाचा मोठा अजगरी विळखा पडलेला आहे . त्या प्रत्यक्ष पाहिलेल्या स्थित्यंतरानंतर या शॉर्टकटने मी कधीही जात नाही .
             मी गणपती घाट व आजूबाजूच्या परिसरातील जी रेखाटने केली त्याची संख्या कमी आहे . मला आवडणारा मधलीआळी घाटाची मी खूप वेळा जाऊन स्केचेस केलेली आहेत पण जलरंगात चित्र काढलेले नव्हते . एके दिवशी मस्तपैकी सकाळी सात वाजता माझे चित्रकलेचे सर्व सामान , छोटे ईझल , बसायची खुर्ची व गार्डनची ऊन आल्यानंतर लागणारी खुर्ची घेऊन मी कृष्णोत्सव मंगल कार्यालयाच्या पायऱ्या उतरल्या . समोरच पोहणारी मुले व पूर्वदिशेच्या सुर्योदयामुळे घाटाच्या पायऱ्यांवर छान कोवळे ऊन पडलेले होते . विश्वकोशाचा निर्माता असलेल्या लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या वाड्याजवळून जाणारी छोटी पायवाट नानी घाटाकडे येते त्याचे सुंदर प्रतिबिंब हालत्या पाण्यात फारच सुबक दिसत होते . नेहमी आडवा असणारा पेपर मी आज उभा घेतला कारण प्रतिबिंब चित्रित करायचे ठरवले होते .
          प्राथमिक रेखाटन झाले व जलरंगाच्या ब्रशच्या साहाय्याने मी चित्र रंगविण्यात मग्न झालो होतो इतक्यात मोठा बाका प्रसंग माझ्यासमोर आला . कातकऱ्यांचे एक काळेसावळे दहाबारा वर्षांचे एक पोर माझ्यासमोरच पाण्याचा डब्बा घेऊन शौचकर्माला बसायच्या तयारीत दिसले . मी त्याच्यावर ओरडणार होतो इतक्यात आणखी दोन तीन मुले डब्बा घेऊन त्याच्याशेजारी बसली . आता चित्र काढण्याची माझी इच्छा संपली त्यांच्यावर ओरडून काहीही उपयोग नाही हे माझ्या लक्षात आले कारण ती नेहमीची जागा त्यांच्या शौचालयाची जागा झालेली होती . चित्रकार किंवा चालणाऱ्या भक्तांसाठी आता तिचा वापर होणारा नव्हता . त्यानंतर मी वाईच्या घाटांवर प्रत्यक्ष जागेवर जावून चित्र काढण्याची उर्मी संपवून टाकली . कधीतरी एखादे छोटे स्केच करत असतो .
            एकदा रविवारी काही चित्रकार पाहुणे आले म्हणून घाटावर गेलो तर दहाबारा जण हातात फावडे , विळा , खुरपी , घमेले , काटेरी दाताळे घेऊन नदीघाटाचा परिसर स्वच्छ करत होती . हळूहळू ही संख्या वाढू लागली व दर रविवारी नदी सेवा कार्य समितीची ही माणसे त्यामध्ये काही स्त्रीया देखील आहेत , नियमितपणे घाटाचा वेगवेगळा कोपरा ठरवून दोन चार तास घरचे कार्य असल्याप्रमाणे घाटपरिसराची व नदीची घाण उपसत असतात . साफसफाई करत असतात . कधी स्वखर्चाने जेसीबी आणतात , कधी पाण्याचा टँकर , कधी मोटरपंप आणून प्रेशरने घाट स्वच्छ करतात . पाण्यात बांधकामाचे अवजड दगड निसटून पडलेले असतात हे सर्वजण ताकद लावून दगड शेजारी शेजारी लावण्याचे काम करत असतात . नदीपात्रात शुटींगवाल्यांच्या कृपेने सगळीकडे जलपर्णीमुळे हिरवळ पसरून नदीचा श्वास गुदमरत असतो . ही मंडळी  पाण्यात उतरून ती जलपर्णी काढत असतात . शेवाळलेल्या दगडी पायऱ्या व त्यावर अकारण वाढलेले कठीण गवत काढताना हाताला भेगा पडायची , जखमा होण्याची वेळ येते तरी माघार न घेता ही मंडळी जिद्दीने तो भाग स्वच्छ करत असतात . रविवारी कोणाचा वाढदिवस असला तर ही मंडळी थोडे थांबून तेथेच साजरा करतात . कधी श्रध्दांजली देण्याची वेळ आली असेल तर तेथेच देतात . ही मंडळी सामान्य नाहीत . यातील काहीजण राजकीय क्षेत्रात , काहीजण शिक्षणक्षेत्रात , काहीजण व्यापारी व नोकरीच्या क्षेत्रात तर काहीजण वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेले वाईकर आहेत . कसलाही भेदभाव न करता एकजुटीने हे वेडात दौडले वीर सात या खाक्याने दर रविवारी आराम करण्याच्या दिवशी एकत्र येऊन मोठी स्वच्छतामोहीम राबवत असतात . दहा वर्ष निरंतर योगदान .
        वाई शहराची शहाणी माणसे महापूजा झाली की त्या देवपूजेचे निर्माल्य ,हार ,फुले व इतर न लागणारी सर्व साहित्ये ,जेवणाच्या पत्रावळी नदीत टाकत राहतात . 
वाई गावाचे सर्व नागरीक  नगरपालीका ड्रेनेज व जवळपासच्या हॉस्पीटल व घरातील घाण काही प्रमाणात या नदीत सोडत असतात .
         ही वेडी माणसे वेड्यासारखा ध्यास घेऊन आपला गाव , आपला परिसर , आपली मंदीरे , आपली संस्कृती कणाकणाने जोपासत ही घाण दर रविवारी साफ करत असतात .त्यांना कोणता पगार मिळत नाही , मदत मिळत नाही , अनुदान मिळत नाही . याउलट वेळ पैसा व स्वतःची महत्वाची कामे बाजूला ठेऊन आपण सुशिक्षित , उच्चशिक्षित ,मान्यवरतेचा कोणताही बुरखा न पांघरता नदीपात्रात खोल उतरून स्वच्छतेचे काम करत असतात . आपल्या घरच्या कार्यासारखे कार्य करत असतात . खरंच ही माणसे वेडी असतात .
           गावातील नदीघाट व त्याशेजारी बांधलेली मंदीरे ही आपल्या बापजाद्याच्या खाजगी मालमत्ता असून तेथे इतरांचा काहीही संबंध नाही असे म्हणणारी शहाणी माणसे पार्कींगचे पैसे गोळा करणे , मंदिरातील दानपेटी ही आपल्या  हक्काची असल्याने त्यातील रुपये गोळा करणे , मंदिराच्या आजूबाजूला छोटेमोठे असंख्य दुकानगाळे निर्माण करून दरमहिना हक्काने भाडेपट्टा वसूल करून आपला चरितार्थ चालवित वसूली करत असतात . ही शहाण्या माणसांची लक्षणे आहेत . ही माणसे इतकी माया गोळा करतात पण मंदिर परिसराची स्वच्छता राखणे हे आपले काम नाही हे त्यांनां पक्के माहीत असते . खरे तर आपण ज्या जागेतून पैसे कमावतो ती जागा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीदेखील त्यांचीच आहे पण ते जाणीवपूर्वक जबाबदारी टाळतात .
           आपल्याकडे देवभोळ्या भक्तांचा तुटवडा नाही . त्यानां भावनिक साद घालून मंदिराचे रंगकाम करून घेणे त्यांना जमते . हे भक्त स्वखर्चाने सढळहाताने देवाच्या कामासाठी पैसे देत राहतात . मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे जोडे ठेवण्यासाठीही आता शुल्क सुरु आहे .शहाणी माणसे असा भरपूर व्यापार करून अपार धन कमवतात त्याचा कधी हिशोब देत नाहीत . स्थानिक असो वा बाहेरचा पार्कींगची रक्कम सर्वांनां द्यावीच लागते . तेथे ओळखपाळख चालत नाही . विशेष म्हणजे मंदिराच्या पश्चिमेकडे असलेली कातकरी वस्तीची जागा त्यांची नाही असे म्हणतात . त्यांनी केलेल्या अस्वच्छ घाणीची जबाबदारी शहाण्या माणसांची नसते . मंदिराच्या दक्षिणेकडे काळ्या दगडाचा घाट बांधून नगरपालीकेने नाना नानी पार्क बनवले आहे . तेथे आता जीपगाड्या पार्क करतात .
         एकंदर वाईची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे . मंदिराच्या सर्व बाजूने विळा खुरपी विकणारे , फळविक्रेते , छत्री व चप्पल दुरुस्त करणारे , छोटे मोठे भटके दुकानदार व असंख्य वाहनांच्या जंजाळात फसलेली आहे . पोटापाण्यासाठी येणाऱ्या  अनेक भटक्या विमुक्तांमुळे सोमवारी बाजारात गाडी घेऊन जाणे एक मोठे संकटकार्य निर्माण झाले आहे .
         एकदा रविवारी कोणत्यातरी कामासाठी गेलो होतो . तेथे माझा मित्र अतूल वाईकर भेटला म्हणाला ये कार्यक्रमासाठी . राजेन्द्रसिंग नावाचे एक महावेडे नदीकार्य , स्वच्छता अभियानासाठी झटत असतात त्यांची सभा होती . ते त्यांच्या वीस पंचवीस कार्यकर्त्यांसोबत आंध्रप्रदेश ते महाबळेश्वरला कृष्णेच्या उगमस्थानापर्यंत स्वच्छतेचे महाअभियान राबवणार आहेत . सर्वांच्या अडचणी व पर्याय व उपाय शोधत आहेत . नदी स्वच्छतेचा त्यानां ध्यास लागला आहे .
आता मला शहाणी माणसे आवडत नाहीत मग वेड्या माणसाच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहीलो तेथे अनेक गोष्टींचा उलघडा झाला .
         देशात , गावात , शहरात , खेड्यात आता शहाणी माणसे जास्त झाली आहेत . ती माणसे फक्त जोरजोरात बोलतात , भाषणे ठोकतात , प्रचंड न समजणारी आश्वासने देत राहतात . ओढयाकाठी गावातला कचरा रस्त्यालगत टाकत राहतात . मोठ्या सुधारणा करण्याच्या नावाखाली हळूच आपली पोळी भाजून घेत असतात . झाडे वाचविण्याचे आश्वासन देऊन विकासाच्या मुद्द्यावर अनेक रस्त्यांवरची झाडे झोपावतात, मोठी कत्तल करणारी ही कातील काळजाची मंडळी आहेत . मग त्यांच्याविरुद्ध वेडी माणसे आंदोलन छेडतात . त्यांच्या गुप्त उद्देशाची पोलखोल उघड करतात . मग शहाणी माणसे माघार घेतल्याचे नाटक करतात . वेडया माणसांचा जयजयकार करतात . परत कुटील कारस्थाने सुरुच राहतात .
            वाई असो किंवा नदीकिनारी असलेल्या अनेक गावांची शहराची हीच व्यथा आहे . आमच्याकडे वेडी माणसे कमी आहेत . पूर्ण वाई शहरात वीस पंचवीस वेडे आहेत व सगळे वाईकर शहाणे आहेत . घाण उचलणारे तीस चाळीस हात व घाण करणारे लाखो करोडो हात . याचा ताळमेळ कसा बसणार ? गाव शहरे स्वच्छ कशी होणार ? सुधारणांचा मेळ कसा साधणार ? हा एक मोठा जठील प्रश्न निर्माण झाला आहे .
          एक गोष्ट नक्की आहे . कधीतरी वेडया माणसांची संख्या वाढेल व शहाण्या माणसांना लाज वाटेल असे वाटते . आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अनेक स्वातत्र्यंसैनिकांचा इतिहास पाहिला तर हेच लक्षात येते की वेडया माणसांमुळेच स्वातंत्र्य मिळाले . शहाणी माणसे त्यांची चाकरी करायचे . वेड्या माणसांमुळे इतिहास बदलतो . या वाईच्या दर रविवारी नदी सेवा कार्यकर्त्यांना सर्व वेड्यानां मनापासून मानाचा मुजरा , सॅल्यूट . आदरपूर्वक सप्रेम नमस्कार !
          एक दिवस आपल्या सर्वानां वेडयाचा झटका येऊन सर्व वाईकर वेडे झाले तर नदी किनाऱ्याचा मंदिर परिसराचा कायापालट होण्यास फार काळ लागणार नाही . त्यासाठी हवी गावाची सुधारणा व्हावी अशी मनाची ओढ , आस्था , प्रेम व जिव्हाळा.

         वेडे होण्यासाठी सर्वानां शुभेच्छा !💐💐💐

      वाईतील दर रविवारी नियमितपणे जाणाऱ्या या नदी सेवा कार्य समितीतील वेडया माणसांची लिस्ट जोडत आहे . अजूनही अनेकजण असतील . त्या सर्वानां खूप खूप शुभेच्छा ! व पुन्हा एकदा मानाचा मुजरा व सॅल्यूट ! कारण काही माणसे स्वतःच्या घराचीही जिथे नीट स्वच्छता करत नाहीत तेथे आपल्या गावाच्या परिसराची विनामूल्य सेवा करायला कोण जाईल ? तुम्ही सगळे जाता म्हणून एक दिवस वाईच्या इतिहासात याची नक्की नोंद होईल हे नक्की व वाईकर म्हणतील ज्याना ज्याना आम्ही वेडी माणसे म्हणायचो तीच खरी शहाणी माणसे होती .

श्री .काशिनाथ शेलार
डॉ .नितीन कदम
श्री .भारतदादा खामकर
श्री .सुधीर क्षीरसागर
श्री .अतुल वाईकर
श्री .भवरलाल ओसवाल
श्री .विवेक चिंचकर
श्री .कुमार पवार
श्री .अमित सोहनी
श्री .सचिन गायकवाड
श्री .चरण गायकवाड
वनारसे काका
श्री .मलटणे सर ( पी .आर . सायकलवाले)
श्री .गिरीष जाधव
श्री .अमोल मुळीक
श्री .केशव हादगे
डॉ .अमित जमदाडे
सौ .उर्मिला जाधव
श्रीमती .सारीका गवते
सौ . अपर्णा वाईकर
चिमा खामकर
गणेश जाधव
कु . हिंदवी भाटे
सौ . सुनंदा कट्टे
तुषार घाडगे
गौरव सुर्वे
सुधीर शिंदे
. . . . . . . . . . .
. . . . . . . . . . .
. . . . . . . . . . .
💐💐💐💐💐💐💐💐💐
चित्रकार : सुनील काळे✍️ 9423966486
निसर्ग आर्ट गॅलरी - वाई

गुरुवार, २६ जून, २०२५

इनायत आणि कोल्हापूरच्या आठवणी

इनायत व कोल्हापूरच्या आठवणी
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      वाईजवळ तीन किमी मेणवली गावाजवळ खेडेगावात निसर्ग आर्ट गॅलरी सारखा प्रोजेक्ट सुरु करताना एक जवळचा मित्र म्हणाला अरे , या आडबाजूला पाचगणी महाबळेश्वरचा मुख्य रस्ता सोडून इकडे गॅलरीला कोण येणार एकदम फ्लॉप आयडीया आहे . मी सुद्धा त्याचा निराशावादी सुर ऐकून मनातून कचरलो , प्रदर्शनाचा थोडा वेडा व वेगळा प्रयत्न आहे पण 7 मे ते 7जून पर्यंत एक महिना प्रयत्न करूया अन्यथा गॅलरी पुढे सुरु ठेवायची का नाही ते नंतर  ठरवू असे ठरले.
पद्मश्री श्री .अच्युत पालव यांच्या शुभहस्ते उदघाटन केले .
             पहिल्या आठवड्यात अपेक्षेपेक्षा थोडी गर्दी कमी होती पण नंतर हळूहळू पावसाने मे महिन्यातच उच्छाद मांडला व आणखीनच नैराश्य वाढले . आणि अचानक सकाळी आठ वाजताच मोबाईलवर फोन आला . सुनिलभाई कैसे हो ? तुम्हारी आर्ट गॅलरी देखने के लिए मुंबईसे सोला लोगोंकी मिनी बस लेकर मुंबईसे वाईमें आया हूँ । गुगल मॅप भेजो , मै इनायत पित्तलवाला बोल रहा हूँ।
        थोड्याच वेळात एक मिनी बस आमच्या प्रवेशद्वाराजवळ दाखल झाली आणि त्या गाडीतून बोहरी जमातीच्या ड्रेसमधील काही महिला व पुरुष मंडळीची टिम गॅलरीत दाखल झाली . 
        1985 साली मी बारावी सायन्स पास झाल्यानंतर घरच्यांचा विरोध स्विकारून आयुष्यात पहिल्यांदा घराबाहेर कोल्हापूरला आलो होतो . कसलाही बाहेरच्या जगाचा अनुभव नव्हता . कोल्हापुरच्या आयटीआय कॉलेजसमोर मला कलानिकेतन महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता . त्यापूर्वी जेजे स्कूल ऑफ आर्ट व पुण्याच्या अभिनवला प्रवेशासाठी प्रयत्न केला होता . ती दोन्ही गजबजलेली आर्ट स्कूल पहिल्यानंतर दूर आडरानात एकमजली फार भव्य बांधकाम नसलेले कलानिकेतन पाहून मी थोडा निराश झालो होतो .
         प्राचार्य अरविंद मेस्त्रींनी पहिल्याच दिवशी विचारले कोल्हापुरात  कुठे राहणार ? मी म्हणालो माहीत नाही , पहिल्यांदा आलोय येथे , माझ्या ओळखीचेही कोणी नाही व नातेवाईकसुद्धा नाहीत . त्यादिवशी एसटी स्टॅन्ड वर झोपलो . सकाळी झाडूवाल्याने उठवले तेथे तोडांवर पाणी मारले व तीन चार किमी  चालत पुन्हा कॉलेजला दाखल झालो . दुसऱ्या दिवशी परत मेस्त्रीसरांनी विचारले कुठे राहीला रात्री ? मी एसटी स्टॅन्डवर राहीलो हे ऐकताच ते माझ्याकडे आश्चर्याने पाहून त्यांच्या शिपायाला म्हणाले बापू याची जरा सोय कर इतर मुलांबरोबर याला दुपारी जेवायला दे .
           संध्याकाळी बापू केळुस्कर मला बाजुच्याच कॉलेजशेजारी असलेल्या मोरे कॉलनीतील एका बंगल्याच्या तळमजल्यावर घेऊन गेला . तेथे कॉलेजमध्ये शिकणारे संजय देसाई , इनायत पित्तलवाला , गंगाधर गोंधळी व रामदास जगताप ही एलेमेंटरी कमर्शियल व एटीडीला शिकणारी मुले माझ्याच वयाची होती . त्यांनी फौंडेशनला शिकणारा असून मला लगेच त्यांच्या ताफ्यात सामावून घेतले . बापू केळुस्करने आमच्या पाचही जणांची दोन्ही वेळच्या जेवणाची सोय त्याच्या घरी केली होती . बापू जवळच एका बंगल्याच्या आवारात औट हाऊसमध्ये रहात होता .
          पहिल्या दिवशी मी त्या बंगल्यात गेलो तर चष्मा लावलेला , खाकी हाफ पँट व पांढरा शर्ट घातलेला एक म्हातारा माणूस बागेत खूर्ची टाकून पुस्तक वाचत बसलेला होता . बापूने गेटवर ओळख करून दिली व पाया पडायला सांगितले आणि विचारले ओळखलेस का हे कोण आहेत ते ? मी नाही म्हणालो .
हे आहेत भालजी पेंढारकर . चंद्रकांत मांडरे असलेला महाराजांचा चित्रपट पाहीलास का ? यांनीच बनवला तो . मी तो चित्रपट पाहिलेला होता पण भालजींना प्रथमच पहात होतो . मग त्यांनी कोल्हापूरी टोनमध्ये विचारले व्यायाम करतोस का नाय ? मी नाही म्हणालो . मग त्यांनी बापूला सांगितले रोज दहा जोरबैठका मारल्याशिवाय याला खायला देऊ नको . बापू लगेच होय म्हणाला .दिवसा कलानिकेतन व रात्री जयप्रभा स्टुडीओत रात्रीचा वॉचमन म्हणून बापू केळूस्कर काम करायचा .
         या काळात माझी या ग्रुपसोबत घट्ट मैत्री सुरु झाली . इनायत अतिशय शांत व सोज्वळ स्वभावाचा होता . मुंबईला गोरेगावला राहत होता . त्याचे वडील व काका कमर्शियल आर्टिस्ट होते त्यांचा स्टुडीओ होता . त्यावर्षी जेजे स्कूल व बान्द्रा स्कूलमध्ये ॲडमिशन न मिळाल्यामुळेच तो नाईलाजाने कोल्हापूरला आला होता . तो वेगळ्या धर्माचा असूनही कधीही त्याने कोणाशी वादविवाद केला नाही . आम्ही कोल्हापुरात सगळे नवखे व समान अडचणींना सामोरे जात होतो . एकमेकांच्या अडचणी समजून घेऊन एकमेकानां मदत करत होतो .
           सकाळ संध्याकाळी दहा जोरबैठका मारायच्या , गंगावेशीवर जाऊन म्हशीचे धारोष्ण दूध प्यायचे , केशवराव भोसले नाट्यगृहाचे नाटकांचे बोर्ड रंगवायचे , कधी जयप्रभा स्टुडीओत छोटे मोठे सेट रंगवायची कामे करायचो . कोल्हापूरकर खूपच हौशी मंडळी त्यावेळी छत्र्यांवर नावे टाकण्याची फॅशन होती. कधी गाड्यांच्या नंबर प्लेटा , साईन बोर्ड रंगवायचो . निसर्गचित्रणाचा नाद आणखी पक्का होण्याचे कारण म्हणजे स्वतः अरविंद मेस्त्री कधी कधी कॉलेजच्या आवारातच लँडस्केप करायचे . चंद्रकांत मांडरेचे संग्रहालय राजारामपूरीत त्यावर्षी तयार होत होते . पन्हाळा , रंकाळा , खाणीचा परिसर , कसबा बावडा , शालीनी पॅलेस , न्यू पॅलेस , भवानी मंडप याठिकाणी स्केचिंग व निसर्गचित्रणासाठी जायचो . त्याकाळात टाऊन हॉल म्युझियम , शिवाजी चौकातील डॉ. काटे यांच्या हॉस्पीटलमध्ये आबालाल रहिमान , अरुल राज , पॉल राज ,चंद्रकांत मांडरे , एस.एम . काझी , बाबुराव पेंटर ,रविंद्र मेस्त्री यांच्या कलाकृती पहायला मिळायच्या . एस.निंबाळकर  यांच्यामूळे अनेक चित्रकारांच्या ओळखी होत होत्या . त्या सर्वांमध्ये कायम लक्षात राहील्या त्या प्रेमा भोसले मॅडम आमच्या सर्वांच्या फौडेंशनच्या कडक शिस्तीच्या आदर्शशिक्षिका . त्यांच्यामुळे चित्रकलेचा पाया खरोखर पक्का झाला . त्या फार जिव्हाळ्याने शिकवायच्या त्यांच्या असाईनमेंट पूर्ण करणे चॅलेंज असायचे .महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिरात जाऊन दहा स्केचिंग करणे त्याकाळातील सर्वात मोठी टास्क असायची . माझा नवा रूम पार्टनर कागलचा अमृतराव पाटील व मी रोज चालत जात स्केचेस करायचो . चित्रांचा पसारा वाढल्यामुळे मी बाजूच्याच प्रकाश कोठावळे यांच्या बंगल्यात शिफ्ट झालो पण जेवणासाठी आम्ही एकत्रच बापू केळूस्कर यांच्याकडे जायचो .
        कोल्हापूरची माणसे साधी व सतत मदतीचा हात पुढे करणारी मंडळी . भरपूर भांडणार , तांबडा पांढरा हाणणार , एकमेकानां शिव्या घालणार पण माणुसकी जपणार . चाळीस वर्षांपूर्वीचे कोल्हापूरकर मित्र व मैत्रिणी आजही संपर्कात आहेत काही वर्षांपूर्वी आम्ही छान गेट टू गेदर केले होते . कोल्हापूरला वेळ व संधी मिळाली की जाण्यास मी नेहमी तयार असतो . ते दिवस सोनेरी व कायम लक्षात राहणारे होते .
         चाळीस वर्षांपासूनची ही मैत्री इनायतने व मी आजही टिकवून ठेवलेली आहे . इनायत एक वर्ष पूर्ण करून परत मुंबईला गेला व मी त्याचवर्षी पुण्याला आलो . पुढे बरीच वर्ष आमचा संपर्क नव्हता . तरुणपणातील दोघांचेही त्यावेळेचे काळेभोर केस आता पांढरेशुभ्र झाले आहेत . कोव्हीडच्या काळात त्याची मिसेस गेली . दोन्ही मुलींची लग्ने होऊन एक बँगलोर व एक मुंबईत स्थायिक आहे .इनायत आता एकटा मीरा रोड येथे राहतो .
         निसर्ग आर्ट गॅलरी पाहण्यासाठी व मला भेटण्यासाठी चाळीस वर्षांनंतर उरामध्ये साठवलेल्या अनेक आठवणी घेऊन हा मित्र सर्व नातेवाईकानां घेऊन मुंबईवरून वाईला भेटायला आला . मित्रत्व जपण्याची ओढ असली व एकमेकांविषयी आदरपूर्वक खरे प्रेम असले की माणसे प्रत्यक्ष भेटतात नाहीतर फेसबुक व्हॉटसअपच्या आभासी जगात मित्र नातेवाईक शेजारून चालले तरी ओळख दाखवत नाहीत भेटणे तर फार फार दुरची गोष्ट असते . एक मित्र प्रत्यक्ष भेटणे म्हणजे एक आठवणींचा अध्याय असतो . त्याच्यासोबत घालवल्या क्षणांची मनाच्या करण्यामध्ये उजळणी असते . तो एक ठेवा असतो अविस्मरणीय गोष्टींचा .
         आता वाटते बरे झाले गॅलरी सुरु केली नाहीतर अशा दूर माणसांच्या गर्दीत  मुंबईसारख्या शहरामध्ये हरवलेल्या  मित्राची प्रत्यक्ष भेट कशी झाली असती ? इनायतच्या भेटीमुळे कोल्हापूरातील दिवस आठवले .
त्यामुळे आता निसर्ग आर्ट गॅलरी पुढे सुरु ठेवायचा निश्चय केला आहे . 
तुम्ही देखील या , जमेल तसे वेळ काढून या . 
सर्वांना सप्रेम निमंत्रण आहेच .
सोबत कॉमेंटसमध्ये गूगल मॅपची लिंक दिलेली आहे .
फेसबुकवर इन्स्टाग्रामवर Nisarg Art Gallery या पेजला फॉलो करा. तेथे गॅलरीचे रोजचे अपडेट आहेत .
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
निसर्ग आर्ट गॅलरी
मेणवली धोम रोडवर नाना फडणीस वाड्यापासून अर्धा किमी मुख्य रस्त्यालगत .
मु.पो भोगाव , ता.वाई ,
जिल्हा . सातारा - 412803
वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत .
सर्वांना मुक्त प्रवेश [No Entry fee]
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
चित्रकार सुनील काळे✍️ 9423966486
निसर्ग आर्ट गॅलरी [वाई]

मंगळवार, २४ जून, २०२५

एक दिवस - एक स्केच

एक दिवस - एक स्केच
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
रात्रीचे सव्वाअकरा वाजलेत .
मी गावाबाहेर रहात असलेल्या 
" निसर्ग " बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त स्टुडिओत माझ्या तीस पस्तीस वर्षांच्या कालावधीत केलेल्या दोन तीन हजार रफ स्केचेसचा पसारा घेऊन बसलोय . सगळीकडे घनदाट नीरव शांतता आहे . या नीरव शांततेला भंग करणारा कसलाही आवाज नाही . काही वेळापूर्वी प्रचंड तुफान पाऊस पडल्यामुळे आजूबाजूच्या शेतात  डबकी साचलेली आहेत . त्या डबक्यातून डोके काढून लहानमोठे बेडूक कसलेतरी चित्रविचित्र आवाज काढत आहेत . त्यापेक्षाही दूर आमच्या खेडेगावातील मंदिराच्या गाभाऱ्यात काही गावकरी एकतारी घेऊन तालसुरांच्या नियमानां धुडकावून शांततेचा भंग करत मोठमोठ्याने बेताल सुरांमध्ये लाऊडस्पीकर लावून भजने गात आहेत. खरं तर देवाला लाऊडस्पीकरची काय गरज असते ? त्याला का ऐकू येत नाही ?  पण खरे कारण वेगळेच आहे . आम्ही गावात राहतो , म्हणजे शहरी नियमांशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही ही एक गोष्ट व दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही भजने करतोय म्हणजे आम्ही धार्मिक पुण्यकार्य करतोय त्यामुळे तुम्ही हे सहन केलेच पाहीजे असा सर्वानां समजलाच पाहीजे हा एक छूपा अट्टहास असतो .
         का बरे ही मंडळी भजने गात असावीत ? काय मिळत असेल त्यांना? आत्मिक समाधान ? सत्याचा ? ईश्वराचा शोध ? नुसता टाईमपास ? की स्वतःलाच स्वतः विसरण्याचा प्रयत्न ? का आणखी स्वतःलाच स्वतःमध्ये शोधण्याचा प्रयत्न किंवा काही अदृश्य हेतूही असावा का ? असे भराभर मला फारच गंभीर प्रश्न पडतात . त्या भजन मंडळीतील एखादाच खरा निष्णात , तालासुरांची जाणीव असलेला असावा बाकीची त्यांच्या ओबडधोबड आवाजात सुरात सूर मिसळून गाण्याचा विचका करत आहेत पण त्यांची कोणाची एकमेकांशी तक्रार नाही . आपण सगळेच बेसुरे आहोत पण शुद्ध मनाने सुरांचा शोध घेत राहीले पाहिजे अशी त्यांची धारणा असावी .
        मी जी स्केचेस केलीत त्यांची वेगवेगळी माध्यमेही अशी बेसुरी भजनांसारखीच आहेत . काही काळ्या पेनाने , काही चारकोलने , काही ब्रशने , काही रंगीत पेन्सीली वापरून ,काही जलरंगात , तर काही काळी फाऊंटन पेनाची इंक वापरुन केली आहेत . यामध्ये परीपुर्णत्वाचा ध्यास नाही . काही सहज आनंदासाठी , काही टाईमपाससाठी तर काही तो विषय समजून घेण्यासाठी , काही अभ्यासासाठी चित्राच्या पूर्वतयारीसाठी केलेली स्केचेस आहेत . 
      कदाचित त्या गावकऱ्यांची ईश्वराला साद देत देवत्वाचा शोध घेण्याची इच्छा किंवा भजनातून व्यक्त करण्याची कृती असेल . माझा देखील वाई ,पाचगणी , महाबळेश्वराच्या परिसरात रानोमाळ हिंडून शहरातून निसर्गाचे सौंदर्य कागदावर पकडण्याचा प्रयत्न स्केचमधून प्रतिबिंबित होत असेल . 
     निसर्गाचा गुरु कोण ? स्वतः निसर्गदेवच .हा निसर्गदेवच चित्ररूपाने माझ्या पाठीशी उभा राहून समोरच्या दृश्यांची  ज्ञातअज्ञात रुपे  स्केचरूपाने माझ्याकडून करून घेत असावा . निसर्गदेव असा छान सर्वत्र पसरला आहे . त्याचा आपण सर्वजणच जमेल तसे शोध घेण्यात आस्वाद घेण्यात मग्न असतो फक्त प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे असते. काहींचे भजन तर काहींचे चित्र .
        दृश्य पेंटिंग्जच्या रुपाने रंगाचा आधार घेत रेखाटणारे चित्रकाराचे हात असोत वा कवीमनाच्या लेखकाने निर्माण केलेल्या काव्यपंक्ती असोत , त्या काव्यपक्तीनां निरागसरुपाने साकार करणारे गायक असोत वा त्यांना सुरबद्ध करणारे संगीतकार असोत . चित्रकार , शिल्पकार , गायक , संगीतकार व समस्त विश्वातील अनेक कलाकारांमुळे ह्या दगदगीच्या भाकड बेसूर जगात आनंद निर्माण झाला आहे . त्यांच्या विविध कला साकार करण्याच्या अलौकीक कलागुणांमुळे या जगात राहायला सर्वानां आवडते मजा वाटते .     
जीवनात कोणतीही कला न आवडणारी कोणतीही कला  जोपासणारी अरसिक मंडळी पाहिली की यांचे जगण्याचे प्रयोजन शून्य आहे याची प्रकर्षाने जाणीव होते . एखादया पशूच्यामध्ये व या अरसिक माणसाच्यामध्ये काहीही फरक नाही याचीही मनाला खात्री पटते .
        तुमचा सूर लागो वा न लागो पण गावकरी जसे भजनांच्या तालांमध्ये तल्लीन होत जातात , दुसरा काय म्हणेल? त्याला काय वाटेल? त्या शेजारच्या माणसाला माझा बेसूर आवाज ऐकून त्रास होईल का ? याचा जराही विचार त्यांच्या मनात येत नाही . ते त्या भजनकलेमध्ये निरागसतेने सामील होत आस्वाद घेत राहतात .
         चित्रकाराने काढलेली ही रफ रेखाचित्रे त्याच निरागस ध्यासाचा एक धागा आहे . भजन व स्केचेस करणे मला आता वेगळा प्रकार वाटत नाही असतो . शेवटी ईश्वराप्रती जाण्याचे मार्ग प्रत्येकाचे वेगवेगळेच असतात .
       माझी ही चित्ररेखाटने पाहून एक मित्र म्हणाला तू तर तुझा परिसर , तो क्षण , ते दृश्य , तो काळ चित्ररूपाने  कागदांवर कायमचा पकडून  ठेवला आहेस . तो काळ तो परिसर आता किती बदलला याचा विचार केला तर जाणवते या सृष्टीतील कितीतरी अनमोल गोष्टी माणसाने विकासाच्या नावाखाली फारच " भकास " केलेल्या आहेत . ही स्केचेस आता एक प्रकारचे जून्या वास्तूंचे डाक्यूमेंटेशन झाले आहे .
         पाचगणी , महाबळेश्वर व वाई परिसरातील वृक्षतोड , मोकळ्या डोंगररांगावर बांधलेल्या नवनव्या इमारती वाहनांची गर्दी नव्या हॉटेल्स , बंगले व नव्या शाळांचा उदय पाहून पन्नास वर्षांत किती मोठा बदल होत आहे याचे " चित्रदर्शन " मला रेखाटनातून जाणवते . ही स्केचेस करताना एक नवा अनुभव , नवा अभ्यास व नवा दृष्टीकोन जाणवत होता . कालपरत्वे आता नवे झालेले बदल स्विकारले गेलेले होते . एक 
चित्ररेखाटन (स्केच)  रेखाटणे म्हणजे जणू एक नवी गोष्ट सांगणे असते .
         आता रोज एका चित्रामागची गोष्ट व ते रेखाटन करतानाचा अनुभव सांगण्याची वेळ आली आहे याची मला जाणीव होत आहे . चित्र रेखाटने करताना त्या दृश्याचा दृश्यअनुभव देणे हा उद्देश आहेच पण ते दृश्य रेखाटण्याची उर्मी का आली ? प्रत्यक्ष फिल्डवर साईटवर चित्र रेखाटताना काय परिस्थिती होती व चित्र रेखाटताना त्या त्या परिसराची थोडी माहिती व स्मरणरंजनाचा ही अनुभव मिळेल याची मला खात्री वाटते .
       कदाचित आणखी काही वर्षांनी ही दृश्यचित्रे एकदम इतिहासकालीन वाटतील असेही मला वाटत आहे .
चला तर मग सुरु करतो एक रफ स्केचेस चित्रमालीका .
तुमच्या प्रतिक्रिया वाचायला नक्की आवडतील .

सुनील काळे ✍️
9423 966486

टायगर सर - संजीवनचे न्यू देशपांडे सर

टायगर उर्फ संजीवनचे न्यू देशपांडे सर  🐆🐅🐆🐅🐆🐅🐆🐅🐆🐅 मित्र मैत्रिणींनो ,सप्रेम नमस्कार 💐🙏       मी जिथे रहातो त्या गावातील गावकऱ्यां...