ब्लॉग संग्रहण

मंगळवार, १६ जुलै, २०२४

सुभाष दांडेकरांची आठवण

कॅम्लीनच्या सुभाष दांडेकरांची आठवण
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
        पाऊस सुरु झाला की पाचगणी महाबळेश्वरच्या डोंगरपठारावरून दिसणाऱ्या सहयाद्रीच्या पर्वतरांगा हळूहळू नवी रुपे धारण करू लागतात . पावसामुळे सर्वत्र गवत उगवण्यास सुरुवात होते आणि मग पावसाचा एकदा का जोरदार सपाटा सुरु झाला की धरतीमाता जणू हिरवागार शालू नेसली आहे की काय असेच वाटायला लागतो . 
            मे महिन्याच्या उकाड्यामुळे हैराण झाल्यामुळे प्रत्यक्ष स्पॉटवरचे काम थांबले असायचे मग पावसाळ्यात चित्र काढायला मला जोर यायचा . चित्र काढण्यासाठी त्यावेळी मारुती व्हॅन गाडी मुद्दाम घेतली होती . आठ सीटर गाडीच्या पाठीमागच्या समोरासमोर बसायच्या दोन सीटस काढल्या की ऐसपेस जागा मिळायची व पाठीमागचा दरवाजा ओपन केला की समोर मोठा पत्र्याचा आडोसा तयार व्हायचा आत पाणी यायचे नाही . अशी कितीतरी चित्रे मी भर पावसाळ्यात रंगवलेली आहेत .
          सन २००२ साली माझे व स्वातीचे " निसर्गसंवाद " या शीर्षकातंर्गत जहाँगीर आर्ट गॅलरीच्या डाव्या बाजूच्या मोठ्या ऑडीटोरीयम हॉलमध्ये चित्रप्रदर्शन भरलेले होते . ऑगस्ट महिन्यात प्रदर्शन असल्यामुळे त्या काळात मुंबईतही प्रचंड पाऊस कोसळत होता . सकाळी ११ वाजता उद्‌घाटन झाल्यानंतर काही चित्रे भिंतीवर टांगायची तयारी सुरु होती . अशावेळी लाईट व्हायोलट कलरचा शर्ट व इनशर्ट केलेली कडक पँट घातलेली एक वयस्कर व्यक्ती भिजत  अचानक हॉलमध्ये आली आणि प्रदर्शन पहाता  पहाता तुम्हाला मी काही मदत करू का ? अशी विचारणा करू लागली . मी नकार दिला व ते पुन्हा शांतपणे चित्रे पाहू लागले . 
         एका चित्रासमोर मात्र ते थांबायचे व पुन्हा प्रदर्शनाला चक्कर मारून परत परत त्याच चित्रासमोर पुन्हा उभे राहायचे . काहीतरी विचार केल्यानंतर पुन्हा फेरी मारायचे . अशा सात आठ चकरा मारल्यानंतर ते म्हणाले हे चित्र पाचगणीचे आहे का ? मी होय म्हणालो . नंतर म्हणाले तेथे पारशी पॉईंट आहे आणि त्यानंतर थोडे चालल्यानंतर उतारावर एक छोटे खेडेगाव आहे , या चित्रात हेच गाव आहे का ? हो त्या गावाचे नाव तायघाट आहे मी म्हणालो आणि ग्रहस्थ एकदम खूष झाले . बरोबर हेच ते गाव आणि या गावावरून थोडे पुढे चालत गेलो की उजव्या बाजूला आणखी एका गावाचा रस्ता लागतो तेथून हे गाव फार फार सुंदर दिसते त्या गावाचे नाव तुम्हाला आठवतंय का ? 
अहो ते तर पांगारी गाव . या पांगारी गावाला जाणाऱ्या रस्त्यावरूनच मी हे चित्र पावसाळ्यात काढलेले आहे . मग ग्रहस्थ मनापासून एकदम खूप खुषच झाले . मग मला म्हणाले काय सांगू तुम्हाला अहो ,या अशा गडद दाट धुक्यात भर पावसात तीस चाळीस वर्षांपूर्वी मी माझी बायको रजनी लग्नानंतर हनिमूनसाठी पाचगणीला आलो होतो आणि पावसात रस्ता चुकलो . या पांगारी गावच्या रस्त्याने चालत धुक्यातून एकमेकांना खेटून कधी एकमेकाचां हात धरून दोन तास आम्ही भटकत होतो . काय सुंदर वातावरण होते ते . या तुमच्या चित्रात अगदी तसेच वातावरण आहे बघा . दोन्ही बाजूने आकाशातून ढगांचे पुंजके उतरत होते . समोर सिडने पॉईंट व टेबललॅन्डचे पठार व त्याच्या डोंगरउतारावर तायघाट गाव अप्रतिम नजारा होता . आज तुमच्या चित्रामुळे तरुणपणातील सगळ्या गमतीजमती आठवल्या . फार मस्त प्रदर्शन आहे . तुमचे हे चित्र मी विकत घेत आहे . त्यांनी लगेच  नाव विचारून चेकच हातात ठेवला . त्या चेकवरची सही पाहून आता मीच थबकलो कारण त्यावर नाव होते सुभाष दांडेकर . आणि खाली कॅम्लीन कंपनीचे चेअरमन असे स्पष्टपणे प्रिंट केले होते .
      ज्यांचे रंग मी लहानपणापासून वापरायचो पण ती व्यक्ती समोर कधी पाहिली नव्हती . त्यांचा कधी फोटोही पाहिला नव्हता .मग आमच्या गप्पा आणखीन रंगू लागल्या . मग रंगाचा विषय निघाला . त्याची क्वालीटी कशी राखली जाते याविषयी चर्चा झाल्या . त्यांनी चित्र घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टसाठी घरी बोलावले अभिप्राय वहीत छोटा अभिप्राय लिहून त्यांच्या घराचा सविस्तर पत्ता लिहिला व निरोप घेतला . गॅलरीतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा पाच मिनिनंतर परत येऊन त्यांनी हात हातात घेतला व उदया मी रजनीला सरप्राईज देणार आहे . तुम्ही हे चित्र कोणत्या ठिकाणावरून काढले हे लगेच सांगायचे नाही असे सांगून हासत हासत न चुकता उदया भेटण्याची आठवण पुन्हा करून दिली .
              दुसऱ्या दिवशी मी चित्र घेऊन टॅक्सीने त्यांच्या बांद्रयाच्या कोबे रेस्टारंट जवळच्या क्षितिज अपार्टमेंटमध्ये पोहचलो तर खाली एक माणूस माझी वाटच पहात होता . त्याने चित्र हातात घेतले व मला लिफ्टने घरात नेले . तेथे हॉलमध्ये सुभाषजी माझी वाट पहात बसलेलेच होते . त्यांनी बबल सीटचे पॅकिंग स्वतः उघडून समोर एका टेबलावर चित्र ठेवले व लहान मुलासारखे तोंडावर बोट ठेवून मला आता काही बोलायचे नाही अशी सुचना केली . त्यांचा तो उत्साह पाहून मीदेखील हसलो व ठिक आहे मी बोलणार नाही असे सांगितले . मग त्यांनी मोठ्याने किचनकडे तोंड करून हाक मारली रजनी जरा बाहेर ये , हे बघ मी काय आणलेय तु ओळख बघू आता . इतक्यात रजनीताई नॅपकीनने हात पुसत बाहेरच्या हॉलमध्ये आल्या व ते चित्र पाहून चकीत झाल्या . अय्या हे तर पाचगणीचे चित्र , किती सुंदर आहे , सुभाष तुला आठवतेय का? आपण लग्नानंतर हनिमूनला गेलो होतो . त्यावेळी त्या गावच्या रस्त्यावरून हेच दृश्य दिसत होते . धुक्यात हरवलेले ते गाव , डोंगर व टेबललॅन्डचे ते पठार . किती किती मस्त दिवस होते ना ते . त्या मनापासून लाजल्या व म्हणाल्या आज मला या चित्रामुळे सगळं आठवतय . थँक्यू सो मच फॉर लवली मेमरीज ! आपल्या बायकोला हे सगळे दिवस आठवत आहेत हे पाहून दांडेकरसाहेब भलतेच खूष झाले . मग त्यांनी माझी चित्रकार म्हणून ओळख करून दिली . पुन्हा तायघाट व पांगारी या नावाची गावे आठवत आहेत का ? याची आठवण करून दिली व नाटकीय भाषेत म्हणाले चित्रकार सुनील काळे , तुम्ही महान चित्रकार आहात , तुमच्या या चित्रात त्या गावाचा निसर्गाचा आत्मा उतरलेला आहे , यापुढे तुम्हाला कॅम्लीन कंपनीतर्फे 40% डिस्काऊंड मिळेल . तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी केली की अमाऊंटवर 40% डिस्काऊंडची तुम्ही मागणी करायची ती तुम्हाला मिळेल ही माझी तुम्हाला सप्रेम भेट समजा .
               मग रजनीताईंनी सर्व घर फिरून दाखवले . गोपाळ देऊस्करांनी त्यांचे ऑईलकलर मध्ये केलेले पोट्रेट दाखवले . संग्रहातील इतर मान्यवर प्रसिद्ध चित्रकारांच्या काही कलाकृती दाखवण्याची त्यांची इच्छा होती पण माझे प्रदर्शन जहाँगीर आर्ट गॅलरीत सुरु होते त्यामुळे त्यांचा निरोप घेऊन मी गॅलरीत आलो . अर्ध्या तासातच कॅम्लीनचे रघुनाथ पोवळे नावाचे मार्केटींग टिमचे मॅनेजर आले व पत्ता घेऊन गेले . यापुढे मला संपर्क करा असे सांगून साहेबांनी तुम्हाला 40% डिस्काऊंट देणार आहे याची पुन्हा आठवण करून दिली .
              अशी चित्रांवर चित्रकलेवर प्रेम करणारी माणसे कायमची लक्षात राहतात . पुढे कॅम्लीनचे कॅनव्हास , रंग , आर्टमटेरियल यावर चाळीस टक्के डिस्काऊंट मिळत राहीला . आजही पोवळेसाहेब संपर्कात असतात . मी ज्या ब्रिटीश स्कूलमध्ये शिकवायला होतो ते बोर्डींग स्कूल होते . तेथे आम्ही प्रत्येक मुलाला आर्ट किट दिले . त्यामध्ये कॅम्लीनचे जलरंग , पेस्टल व पोस्टर कलर्स ,कॅलिग्राफी पेन , स्केल , कंपास बॉक्स व इतर सर्व सामान ठेवण्यासाठी एक खास बॅग तयार केली . त्या बॅगेवर शाळेचा व कंपनीचा लोगो प्रिंट करून दिला होता . मुले खूप खूष झाली होती . त्यावेळी सातारा येथील मंगेश बलशेठवार यांच्या दुकानातून सर्व पुरवठा करण्यात आला होता . पण त्यापाठीमागे खरी प्रेरणा होती सुभाष व रजनी दांडेकर या कलासक्त दाम्पत्याची . मुलांनी चित्रे काढली पाहिजेत, आर्ट कॉलेजच्या मुलांनी परदेशातील चित्रकारांची म्युझियममध्ये जावून प्रत्यक्ष चित्रे पाहीली पाहिजे , प्रेरणा घेतली पाहिजे यासाठी स्पर्धा घेऊन पारितोषकप्राप्त मुलांना कंपनीतर्फे परदेशवारी करण्याचे पुण्यकाम दांडेकर मंडळी कॅम्लीन फौडेंशनच्या माध्यामातून करत असत .
                मराठी माणसांनां उद्योजक म्हणून यशस्वी होता येत नाही हा शाप दांडेकरांनी साफ चुकीचा ठरवला . पेनाची रंगीत शाई पासून सुरुवात करून हळूहळू उच्च गुणवत्तेची उत्पादने देण्याचे त्यांचे ध्येय होते आणि त्यासाठी ते झपाटून काम करत . 1958 मध्ये सुभाष दांडेकरांनी मुंबईतून रसायनशास्त्रात पदवी मिळवली व कंपनीत तांत्रिक संचालक म्हणून रुजू झाले . रंग तंत्रज्ञानाचा प्रगत अभ्यास करण्यासाठी ते इंग्लडला गेले . आणि आल्यानंतर त्यांनी कमी बजेटमध्ये पण गुणवत्तेशी तोल साधत अनेक रंग बाजारात उपलब्ध केले . सरतेशेवटी कॅमल हा ब्रॅन्ड प्रतिष्ठित भारतीय ग्राहकांच्या बदलत्या मागणीनुसार विद्यार्थी आणि छंद बाळगणाऱ्यांपासून ते हौशी व व्यावसायिक कलाकरांच्या परिचयाचा होत गेला कारण त्यामागे सुभाष दांडेकराची अखंड प्रेरणा व परिश्रम होते .
                दिनांक 22 जुलै 2022 रोजी रजनीताई यांचे निधन झाले आणि आज 15 जुलै 2024रोजी श्री.सुभाष दांडेकर यांचे निधन झाले . एकमेकांवर नितांत प्रेम करणाऱ्या तसेच अनेक चित्रकार , चित्रकला शिक्षक , कलावंत , आणि विद्यार्थी या मंडळीना प्रोत्साहन देणाऱ्या या दाम्पत्याची आठवण सर्व चित्रकारानां नेहमीच राहील .
मला खात्री आहे की ते स्वर्गात गेल्यानंतर रजनी दांडेकरांचा प्रथम शोध घेतील . आपल्या कॅम्लीन कंपनीचा प्रगतीचा अहवाल सादर करतील आणि आता स्वर्गातील देवांच्या मुलांसाठी , स्वर्गातील चित्रकारांसाठी , कलावंतांसाठी आणखी नवनवी उत्पादने निर्माण करतील आणि पृथ्वीवरील कलाकारांचे जीवन जसे रंगीत कलरफूल केले तसे स्वर्गातील जीवन आणखी सुंदर करतील यामध्ये शंका वाटत नाही .
सुभाष दांडेकर यांनी 15 जुलै रोजी अखेरचा श्वास घेतला त्यानां भावपूर्ण श्रध्दांजली .🙏

सुनील काळे✍️
9423966486

जगण्याचे " स्टॅन्डर्ड " समजलेला माणूस- प्रा . डॉ . ज्ञानदेव झांबरे सर************************        पाचगणी हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शैक्षणिक केंद्र आणि थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे . ब्रिटिश काळापासून वेगवेगळ्या लोकांनी स्वधर्मियांसाठी शाळा सुरु केल्या . त्यामुळे येथे त्रेचाळीस शाळांमध्ये अठरापगड जातींचे लोक एकत्रित रहात असल्याने येथे कॉस्मोपोलीटन संस्कृती आहे . पाचगणी शहर छोटे असल्याने बहुभाषिक वेगवेगळ्या प्रांतातील मंडळी छानपैकी एकत्रितपणे राहतात . अशा या गावात माझे बालपण गेले . दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि चांगले मार्क मिळाले म्हणून अकरावीसाठी कॉलेजचा शोध सुरु झाला . त्याचवर्षी वाईला किसनवीर महाविद्यालयात नव्याने सायन्स कॉलेज सुरु झाल्याचे कळाले . BSc डिग्री मिळण्याची चांगली सोय झाली होती . त्यामुळे घरच्यांनी मला अकरावी सायन्सला प्रवेश घेण्यासाठी फोर्स केला . मी मात्र नाराज झालो होतो कारण माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले होते व सायन्सचे विषय इंग्रजी माध्यमात शिकवले जाणार होते . इंग्रजीची माझी खूप आबाळ झाली होती कारण सातवीपर्यंत आम्हाला इंग्रजीचे शिक्षकच नव्हते . इंग्रजी , गणित , सायन्स या विषयाची तर माझी कुडंली कधी जमलीच नव्हती पण त्याकाळी उलट उत्तर देण्याची प्रथा नव्हती त्यामुळे मी मुकाटपणे वाईला सायन्स कॉलेजला रोज एस.टी बसचा पास काढून येऊ लागलो .       सायन्सच्या या वर्गात शिक्षक मला काय शिकवत होते याचे मला भान नव्हते कारण मला इंग्रजी भाषाच समजत नव्हती . चाळीस पन्नास विद्यार्थी असल्याने मागच्या बेंचवर बसायला लागलो आणि मला एक नविन छंद लागला . मी चित्रे काढायला लागलो . माझ्या मित्रांची , शिक्षकांची , प्राण्यांची , वनस्पतींच्या जर्नलमध्ये आकृत्या काढणे मला आवडू लागले . कधी कधी मी वाईच्या बसमधून पसरणीघाटात उतरायचो . या घाटातील वळणदार रस्ते , दुतर्फा असलेली वडाची झाडे , पांडवगडाच्या पायथ्याच्या सभोवतालची छोटी छोटी चमकणारी भातशेती , ऊन पावसाचा खेळ , संध्याकाळची सुर्यास्ताची रंगउधळण , वाईच्या गणपती मंदिराची , वेगवेगळ्या घाटाची चित्रे मी जलरंगात उतरवू लागलो . थोडक्यात मला चित्रकलेची फारच आवड निर्माण झाली होती . चित्रकार होण्यासाठी लागणारी इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा मी बारावी सायन्सला असताना दिली व त्यामध्ये मला 'अ 'श्रेणी प्राप्त झाली होती .       चित्रकलेचे वेड इतके वाढले की मी सकाळी सहा वाजताच थंड हवेत चित्र काढायला जायला लागलो . टेबललॅन्डच्या पठारावर तर कधी सिडनेपाँईटच्या उंच चौथऱ्यावर बसून मी धोमधरणाचे पाणी ,कृष्णा व्हॅलीतील डोंगररांगा , कधी पांगारी तायघाट जवळच्या पारसी पॉईंटची चित्रे रेखाटू लागलो . आणि अचानक माझ्या लक्षात आले मला अतिथंड हवेत सकाळी फिरल्याने सर्दीचा त्रास सुरु झाला आहे . ऑक्सिजिन घेण्यासाठी दोन्ही नाकपुड्या बंद झाल्याने श्वास घेणे मुश्कील झाले आहे . डॉक्टरांनी माझे ऑपरेशन करून नाकातील वाढलेले पॉलीप्स काढावे लागतील यासाठी तातडीने ॲडमिट केले . नाकाला मोठे बँडेज बांधूनच मी 12वी सायन्सची प्रॅक्टीकल परिक्षा दिली होती . त्यानंतर  पुण्याला चित्रकलेच्या अभिनव कॉलेजला मी गेलो . चित्रकार झालो व परत पाचगणी महाबळेश्वरचा निसर्ग रंगवू लागलो होतो . थंड हवेत वेळीअवेळी सतत डोंगररांगावर भटकंती केल्याने माझा नाकाने श्वास घेण्याचा त्रास आणखीनच वेगाने वाढू लागला . डॉ. प्रशांत पोळ यांनी वेगवेगळ्या वर्षी चारपाच वेळा माझे ऑपरेशन केले आहे . एकंदरीत मला थंड हवेची ॲलर्जी झाल्याचे सिद्ध झाले व डॉक्टरांनी 2014 साली मी पाचगणी सोडावी लागेल असे निक्षून सांगितले . मला माझे पाचगणीचे बस्तान सोडून  कायमचे  वाईला यावे असे त्यांनी सांगितले व नाईलाजाने मी काही दिवस वाईला राहण्याचे ठरवले .          वाई कॉलेजचे प्राध्यापक असलेले माझे मित्र श्री .पटकुरे सर यांनी मला सह्याद्रीनगर या परिसरात बोलावले . थोडी चर्चा केली तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की त्यांच्या सोसायटीत " प्रज्ञाअमृत " नावाचा एक बंगला आहे . त्याचे मालक श्री .व सौ झांबरे दोघेही शिक्षक आहेत . त्यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर पाच खोल्यांचे घर भाड्याने मिळते . तेथे काही दिवस राहून वाईच्या परिसरातील चित्रे काढावीत . हवा बदलाने तब्बेतीवर काय परिणाम होईल हेही कळेल व एखादी जागा आवडली तर घर बांधण्यासाठी वाईत एन ए प्लॉट घ्यावा या उद्देशाने मी त्यांच्या घरी आलो .         सहयाद्रीनगरात असलेला " प्रज्ञाअमृत " अतिशय मेंटेन केलेला ,फुलझाडे असलेला सुंदर बगीचा व पार्किंगची सोय असलेला बंगला बघताक्षणीच मला आवडला . बंगल्याच्या पाठीमागे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी स्वतंत्र जीना होता . आतमध्ये सर्व नीटनेटकेपणा होता . खिडक्या दरवाजानां पडदे लावलेले होते . आम्ही दोघेही चित्रकार असल्याने चित्रकाम करण्यासाठी व राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होती . झांबरेसर , झांबरेमॅडम व त्यांची मुलगी मृणाल हे तीनच माणसे खाली रहात होते . त्यांचा मोठा मुलगा प्रणव शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला होता . पहिल्या भेटीतच आमची छान ओळख झाली व लगेच प्राथमिक बोलणी करून मी एका आठवड्यात पाचगणीवरून वाईला शिफ्ट झालो . सर व मॅडम दोघेही स्वच्छताप्रेमी होते . त्यामुळे मी रोज मॉर्निंगवॉकला वाकेश्वरला जाताना पाहायचो झांबरे सर स्वतः साफसफाई करायचे , कुंड्यांना पाणी घालणे , झाडांची निगा राखणे ,खतपाणी देणे . पूर्ण आवार पाण्याने स्वच्छ धूवून काढायची त्यांनां आवड होती . आम्ही कधीतरी समोरासमोर भेटलो की अनेक विषयांवर गप्पा मारायचो . वाईत राहण्याचे फायदेतोटे तपासून पहायचो . येथील परिसराचा माणसांचा स्वभाव व आचरणांवर चर्चा करायचो . नवनव्या जागा शोधायची आता सवय लागली होती . त्याचा आढावा घेताना झांबरे सर मनापासून प्रतिक्रिया द्यायचे .       " प्रज्ञाअमृत " या बंगल्यामध्ये रहात असताना एक घडलेला प्रसंग मला आजही लक्षात आहे व आयुष्यभर पुढेही कायम लक्षात राहील . एकदा रविवारी सुट्टीचा दिवस होता . साधारण नऊ दहा वाजताची वेळ असेल . आमची घरकाम कारणारी बाई आज येणार नव्हती त्यामुळे दोघेही निवांत पेपर वाचत बसलो होतो . आणि शेवटच्या दूरच्या खोलीतील अचानक कोपऱ्यातील किचनसिंकचा का वॉशबेसीनजवळचा नळ अलगद तुटून पडला होता . पाईपलाईन उघडी झाली आणि वेगाने पाणी रूममध्ये पसरु लागले होते . आम्ही विरुद्धदिशेच्या बाजूला असल्याने काही आवाजच आला नाही . हळूहळू पडणाऱ्या पाण्याने ती रुम भरून गेली होती आणि अचानक खालून झांबरे मॅडम व सर दोघेही वरच्या मजल्यावर आले .त्यांनी घराची बेल वाजवली आणि त्यांच्या लगेच लक्षात आले की शेवटच्या खोलीतून पाणी जवळपास चारपाच इंच भरून दुसऱ्या रूममध्ये पाणी पसरू लागले होते . झांबरे सरांनी लगेच प्लंबरला फोन लावला येताना नवीन नळ घेऊन यायला सांगितले . पटकन टेरेसवर जावून मुख्य पाईपलाईन बंद केली . इतक्यात झांबरे मॅडम पटकन खाली गेल्या , येताना त्यांनी फरशी पुसण्याचा रबरमॉप व चारपाच फरशी पुसण्याचे जाड कपडे घेऊन एक बादली आणली . त्यांची मुलगी मृणाल देखील मदतीला आली . इकडे बनियन व लुंगी घालून निवांत बसलेले झांबरे सर गुडघ्यापर्यंत लूंगी गुंडाळून पटकन फरशीवरील पाणी बादलीत भरू लागले . झांबरे मॅडम यांनी लगेच साडीचा पदर खोचून मॉपने पाणी बाहेर टाकायला सुरुवात केली . मग आम्ही दोघेही त्यांच्यामध्ये सामील झालो व सर्व जणांनी रुममध्ये साचलेले पाणी काढून तासाभरात सगळा बंगला चकाचक केला . नंतर प्लंबर आला त्याने नवीन नळ बसवला .आता तुम्ही म्हणाल यात आश्चर्याची गोष्ट काय ? तर आम्ही झांबरे सरांचे भाडेकरू होतो . पाण्याचा नळ दुरुस्त करून रुम साफसफाई करण्याची जबाबदारी आमची होती . ते घरमालक होते . उच्चशिक्षित पी एच डी झालेले कॉलेजचे प्राध्यापक होते . मॅडम एम एस सी व जॉय स्कूलच्या उपप्राचार्या होत्या . एकदा घर भाड्याने दिले की त्याची देखभाल करण्याची जबाबदारी भाडेकरूचीच असते . त्यादिवशी दुपारी आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि तो प्रसंग एन्जॉय केला . कोणीही कसलीही तक्रार झाली नाही . दोन चार महिन्यातच आम्ही " प्रज्ञाअमृत " बंगला सोडला . नवीन जागा घेतली तेथे मोठे अपयश आले . नंतर मग आमचा मेणवली गावाजवळ " निसर्ग " नावाचा बंगला तयार केला . मागच्या वर्षी तेथे " निसर्ग आर्ट गॅलरी " नावाने चित्रप्रदर्शनही भरवले होते . अनेक वेगवेगळ्या जिल्हयातील , तालुक्यातील पर्यटक प्रदर्शन पाहण्यासाठी येत होती . एकदा किसनवीर कॉलेजचे प्रा. श्री रमेशचंद्र बारगजे सरांनी फोन केला की त्यांच्या कोल्हापूरच्या 1973 सालच्या एम .एस .सी बॅचचे क्लासमेटस यांचे वाई येथे गेटटुगेदर आयोजित केले आहे त्यावेळी तुमची निसर्ग आर्ट गॅलरी पाहायला सर्वजण येणार आहेत . धोमचे मंदिर पाहून सर्व गाड्या निसर्ग आर्ट गॅलरी पाहण्यासाठी गेटपर्यंत आल्या . त्यानां पार्कींगची जागा दाखवत होतो त्यावेळी एक गाडी मात्र गेटपासून दूर थोड्या अंतरावर उभी राहीलेली पाहीली . बारगजे सरानां ती गाडी बाहेर का थांबली म्हणून विचारले तर सरांनी कपाळावर हात मारून घेतला . मला म्हणाले काय बोलू आता ? ती गाडी तुझ्या सख्या चुलत व मावसभाऊ असलेल्या हनुमंत काळे यांची आहे . तो आमच्या बॅचचा सर्वात अतिशय हुशार विद्यार्थी होता . युनिव्हरसिटीत प्रथम आला होता . त्याला आम्ही सांगितले चित्रकार सुनील काळे तुझा भाऊ आहे . त्याने वाई ,पाचगणी महाबळेश्वर या परिसरातील असंख्य अप्रतिम चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत , त्याची मिसेस चित्रकार स्वाती काळे हिने असंख्य फुलांची तैलरंगात चित्रे काढलेली आहेत . उत्तम चित्रप्रदर्शन आहे . तुमची तीस वर्ष झाली भेट झालेली नाही तर तुम्ही आता जरूर भेटा व प्रदर्शनही पहा . पण तुझा भाऊ गाडीतून उतरायला तयार नाही त्याचे कुटुंबीय गाडीतच बसून आहेत .ते म्हणतात आम्ही भावकीत जात नाही कारण आमचे " स्टॅन्डर्ड " मोठे आहे . मी मोठ्या कंपनीत ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर होतो . तो साधा चित्रकार आहे त्याची माझी तुलना होऊ शकत नाही . तुम्ही सगळे प्रदर्शन पाहायला जा आम्ही बाहेर रस्त्यावर गाडीत बसून राहू . तो एक तास बाहेर थांबला पण घरात आलाच नाही . खरे तर हा हनुमंतदादा आता हेमंत नाव लावतो . कारण आईबापाने ठेवलेले हनुमंत हे नाव त्याला आवडले नाही . अतिशय गरिबीतून त्याला शिक्षण दिले होते .स्वतःच्या कर्तबगारीने तो उच्चपदावर पोहचला त्याचे उच्चशिक्षित मुलीबरोबर लग्न झाले पण लग्नानंतर व अगोदर नोकरी करत असतानाही या दादाने कधीच कोणत्याही भांवडाला जवळ केले नाही . कोणत्याही नातेवाईकांकडे ते फिरकले नाहीत . कोणाशी कसलाही संबंध ठेवला नाही ,कोणालाही मदत केली नाही . संपूर्ण कुटुंबाला दूर ठेऊन दादा मोठा स्टॅन्डर्डवाला झाला . आमचा दादा कसा दिसतो हे मला पाहण्याची उत्सुकता होती . कारण तो माझ्यापेक्षा पंधरावीस वर्षांनी मोठा होता . पण " स्टॅन्डर्ड "आडवे आले . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात . शिक्षणामुळे माणूस विचारवंत होतो त्याच्या ज्ञानाच्या कक्षा उचांवतात . त्याचे जीवन सुखकर व समृद्ध होतेच पण त्याच्यां विशाल छायेत अनेकानां संजीवनी मिळते . उच्चशिक्षित भावाने मात्र आमच्या सर्वांसाठी त्याचे दरवाजे मात्र कायमचे बंद केले होते . उच्चशिक्षणाचा मला तेथे काहीच उपयोग झालेला दिसला नाही . इथे मला पीचडी झालेले उपप्राचार्य झांबरे सर आठवतात . उपप्राचार्या झांबरे मॅडम आठवतात . स्वतःच्या भाड्याने राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाशी प्रेमाने सुखदुःखाची विचारपूस करत असत . ते दोघेही स्वतःचे " स्टॅन्डर्ड "कधी गोंजारत बसले नाहीत .  सामान्य माणसासारखे राहून दोघेही असामान्य कामे करत राहीली . जॉय स्कूल व किसनवीर विद्यालयातील विद्यार्थी घडवताना आपल्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांला घडवण्याचे . " स्टॅन्डर्ड " काम त्यांनी आयुष्यभर केले व त्याचा गर्वही कधी केला नाही . जीवन जगण्याचे खरे " स्टॅन्डर्ड " त्यांनां कळले आहे म्हणून माझ्या त्या अतिउच्चशिक्षित एम एस सी फर्स्टक्लास झालेल्या अडाणी भावापेक्षा झांबरे पती पत्नींविषयी मला आदर वाटत आहे .     महिन्यापूर्वी एकदा झांबरे मॅडमचा मला फोन आला . त्यांनी विचारपूस केली व त्या जॉय स्कूलची नोकरी सोडून पुण्यात नातवाचा सांभाळ करण्यासाठी पुण्यात रहात असल्याचे सांगितले . मुलगा सिव्हील इंजिनियर व सुनबाई पेशाने सरकारी वकील असल्याने दोघेही कामात व्यस्त झाले मग मुलाकडे लक्ष कोण देणार ? म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला . आणि ते ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . माझी आर्ट गॅलरी होती . ती सांभाळताना माझी तीन वर्षाची मुलगी सांभाळण्यासाठी मी आईवडीलानां विनंती केली तर त्यांनी नकार दिला . गावाकडे शेतीची कामे असतात त्यामुळे तुमची मुलगी तुम्हीच सांभाळा असे उत्तर आईने दिले . शेवटी आमच्या संघर्षाच्या लढाईत मुलगी देवाघरी गेली . ती वारली त्यावेळी मी माझ्या मेव्हण्याला सत्यजितला फोन केला . तो म्हणाला मी अत्यंविधीला येऊ शकणार नाही . तो देखील Phd झालेला आहे . अतिउच्चशिक्षित आहे . त्याला भाचीच्या अत्यंविधीला जाण्याची गरज वाटली नाही . बहिणीला कठीण स्थितीत आधार देण्याची आवश्यकता वाटली नाही आणि पुढे आता सत्तावीस वर्ष झाली तरी त्याला आमची कधीच आठवणही झाली नाही . काय उपयोग त्या डॉक्टरेटचा ? जिथे माणूस माणसाला ओळखत नाही .मोबाईल ,फोन , लॅपटॉप आले तंत्रज्ञान वाढले तरी मनाची आढी मात्र कायम राहीली .कधी त्याच्या कुटूंबाने संपर्कच केला नाही कारण "स्टॅन्डर्ड " आडवे आले .त्यावेळी खऱ्या अर्थाने एकटे जगायला शिकलो . अशावेळी झांबरे मॅडमचा त्याग मला प्रेरणा देणारा वाटतो . मुलांविषयची माया त्यांच्या कृतीतून दिसते .इकडे सरांनां रिटायर्ड होण्यापूर्वी खानावळीत जेवण करावे लागले . काही महिने एकटेपणा स्विकारावा लागला . पण त्यांनी कधीही त्याची तक्रार केली नाही . कॉलेजमध्ये त्यांनी अनेक कार्यक्रमात स्वतःला झोकून दिले . त्यांच्या कॉलेजच्या कारकीर्दीची मला जास्त माहिती नाही पण त्यापेक्षा माणुसकी जपणारे , कुटुंबाला जपणारे , अभिमान नसणारे , मोठेपणाचा त्याग केलेले गार्डनमध्ये स्वच्छता करणारे डॉ झांबरे सर मनाला फार भावले . त्यांच्या मुलाचे लग्न ठरले त्यावेळी प्रणवच्या लग्नाला आम्ही दोघेही गेलो होतो . लग्नकार्यालय पूर्णपणे भरून गेले होते प्रचंड गर्दी होती तरीही झांबरेसरांनी आम्हाला बरोबर पकडलेच . शाल श्रीफळ देऊन योग्य मानसन्मान केला त्यावेळी मला या झांबरे कुटूबांचेखरे " स्टॅन्डर्ड " कळाले . वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य नामवंत लहानमोठ्या माणसांनी संपूर्ण हॉल भरून गेला होता . काय असते स्टॅन्डर्ड ?? तुम्ही जगत असता त्यावेळी त्या तुमच्या जगतानाच्या काळात असंख्य माणसे भेटतात . त्यातील काही माणसे चांगली वागलेली असतात काही वाईट वागलेली असतात . पण शेवट काय असतो ? तुमच्या जगण्याला कधीतरी मर्यादा येतेच . कधीतरी शरीर थकते व तुम्हाला अंतिम श्वास घ्यावा लागतो . त्यानंतर कोणत्यातरी स्मशानघाटाजवळ तुमची राख होते ती राख पाण्यात मिसळते तुमचे अस्तित्व संपते . जग काही दिवस तुमची आठवण काढते नंतर तुमची कोणी आठवणही काढत नाही . तुमचे " स्टॅन्डर्ड " काही असो शेवटी तुमची राखच होते . हे ज्यानां समजते त्यांचे भावविश्व वेगळे असते . ते कायम हसतमुख असतात . ते त्यांच्या कृतीतून त्यांचे वेगळेपण जोपासत असतात .अनेकानां त्यांचे जगणे प्रेरणा ठरत असते .असे जीवनाचे खरे " स्टॅन्डर्ड " कळालेले झांबरे सर मला आवडतात . काही महिन्यांपूर्वी अचानक आमच्याकडे घरकाम करणाऱ्या बाई व माळीकाम करणारा त्यांचा मुलगा या दोघांनी आमचे काम सोडले. काही दिवस आम्ही वेगवेगळी माणसे शोधली पण त्यांच्या पगाराच्या अपेक्षा जास्त असल्याने जुळले नाही . मग झांबरे सर पुन्हा आठवले . Phd झालेला माणूस स्वतः झाडलोट करतो , बागेची निगा राखतो तर आपण का लाजायचे ? त्यांच्यापासून प्रेरणा घेतली . आता मी बागकामात तरबेज झालोय बागेत शेतात काम केल्यामुळे आरोग्यही चांगले राहते याचा शोध लागला . आपण कोणावर विसंबून राहायचे नाही काम करत राहायचे हेच खरे " स्टॅन्डर्ड " झांबरे सरांकडून मी शिकलो . खरी डॉक्टरेट तीच आहे . मे महिन्यात ते आता रिटायर्ड होतील . अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या सरानां व झांबरेमॅडम या दोघांनाही उर्वरीत रिटायर्ड आयुष्य सुखसमृद्धीचे आनंदाचे जावे त्यांच्या मनासारखे जगताना उत्तम आरोग्य प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना व मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !चित्रकार - सुनील काळे✍️9423966486निसर्ग आर्ट गॅलरी [वाई]