ब्लॉग संग्रहण

बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

भालचंद्र मोने - एक भन्नाट वाईकर

भालचंद्र मोने - एक भन्नाट वाईकर
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
         वाई , पाचगणी व महाबळेश्वर ही सातारा जिल्ह्यातील  जवळजवळ लागून असलेली महत्वाची ठिकाणे आहेत . पण या तिन्हीही ठिकाणची भौगोलिक रचना , भूप्रदेशाची वैशिष्ठ्ये , वातावरण , हवामान व सर्वात महत्वाचे माणसांच्या जगण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत . वाईमध्ये प्रसिद्ध अशी अनेक मंदिरे , दगडी चिरेबंदी घाट , कृष्णा नदी वाई शहरातून वाहत असल्याने सर्वानां खूप भावते . पाचगणी टेबललॅन्डच्या पठारामूळे व बोर्डींग शाळांमूळे प्रसिद्ध , तिथे अनेक शाळांच्या शिक्षणपद्धतीमूळे कोस्मोपोलीटिशन संस्कृती आहे . महाबळेश्वरला सह्याद्री डोंगरपर्वतांच्या रांगामूळे अनेक पॉईंटस विकसित झाले आहेत व त्याचे श्रेय ब्रिटिशांना जाते . विकसित केलेल्या पर्यटन संस्कृतीमुळे एक वेगळा व्यावसायिकपणा येथील माणसांमध्ये मुरला आहे .
           मी ज्यावेळी पाचगणीतून वाईला स्थलांतरीत झालो त्यावेळी नव्या मित्रांच्या शोधात होतो . पण मित्र थोडे असे पटापट मिळतात ? मग वाईची पुस्तके वाचून थोडा अभ्यास करायचा ठरवले . त्यासाठी वाईचे प्रसिद्ध लेखक लक्ष्मीकांत रांजणे यानां विनंती केली आणि त्यांनी एक अप्रतिम पुस्तक वाचायला दिले त्या पुस्तकाचे नाव होते वाई - कला आणि संस्कृती . त्या पुस्तकावर चित्रकार सुहास बहुलकरांचे चित्र व अप्रतिम प्रस्तावना आहे . त्या पुस्तकाचे लेखक सु .र . देशपांडे यानां भेटलो तर त्यांनी सांगितले तुम्ही आता या पुस्तकाच्या प्रेमात पडलाच आहात पण एका व्यक्तिला लवकरात लवकर भेटलेच पाहीजे आणि त्यांचे नाव आहे भालचंद्र मोने कारण त्याच्यां मदतीमूळेच हे पुस्तक वैशिष्ठ्यपूर्ण झाले आहे .
             ब्राम्हणशाहीच्या घाटाजवळ उतरताना मोने साहेबांच्या घरी गेलो आणि लोकेशन पाहूनच चकीत झालो . माझे एक स्वप्न होते आपले घर वाईच्या नदीच्या घाटाजवळ असावे मग रोज सकाळी निवांतपणे घाटावर फिरायचे व स्केचिंग करत राहायचे . वाईचे सगळेच घाट किती वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात . प्रत्येक प्रहारात , प्रत्येक सिझनमध्ये त्याची वेगवेगळी रूपे दिसतात . भालचंद्र मोने यानां प्रत्यक्ष भेटल्यावर खरोखरच त्यांची व घाटाचीही वेगवेगळी रूपे आजमावता आली .
            वाईला स्टेट बँक ऑफ इंडियामधून ते रिटायर्ड झाले . बँकेचा कारभार तसा रुक्ष कर्तव्यदक्षतेचा . सतत आर्थिक गोष्टींशी निगडीत असलेला पण भालचंद्र मोने त्रासलेले वाटले नाहीत . कारण त्यांच्या आवडीनिवडी निराळ्या होत्या . वाचन , चित्रकला , भटकंती ,संशोधन , अध्यात्म व सर्वात महत्वाचे आपल्या वाई गावाविषयी असलेले नितांत प्रेम . या प्रेमापोटीच त्याच्यां मित्रांनी 'आस्था ' नावाची पर्यावरण मैत्री संस्था स्थापन केली व त्याचे सचिव म्हणून त्यानी स्वतःला कामात झोकून दिले .
            वाईला लक्ष्मणशास्त्री जोशींमूळे विश्वकोष व प्राज्ञपाठशाळा खूप प्रसिद्ध आहेत . त्या संस्थेच्या प्रभावातून अनेक लेखक , कवी , कायकर्ते , संशोधक लेखक निर्माण झालेले आहेत . भालचंद्र मोने त्यापैकी एक . काही दिवसांपूर्वी त्यांनी वाई परिसरातील फोटोग्राफर्स एकत्र करून असंख्य पक्षांची माहीती असलेले सुंदर पुस्तक निर्माण केले होते . त्यासाठी पक्षीतज्ञ किरण पुरंदरे यानां प्रकाशन सोहळ्याला बोलावले होते . वाईचे कमलाकर भालेकर दुसऱ्या महायुद्धात वॉरंट ऑफीसर होते . त्या महायुद्धात त्यांनी रोजची डायरी लिहीली होती . मोनेंनी ती डायरी मिळवून छान संक्षिप्त पुस्तक लिहीले आहे.
            वसंत व्याख्यानमालेचे अनेक वर्ष श्रोते, कार्यकर्ते ते पदाधिकारी असल्याने भालचंद्र मोने बहुश्रृत व बहुआयामी व्यक्तिमत्वाचे आहेत . त्यानां अनेक विषयांची व अनेक गोष्टींची माहिती असल्याने त्यांच्याशी गप्पा मारत असताना कधी कंटाळा येत नाही . विश्वकोषाची लायब्ररी , प्राज्ञ पाठशाळा , येथे त्यांचा मुक्त सतत संचार चालू असतो . त्यांच्या खांद्यावर एक शबनम बॅग नेहमी लटकवलेली असते . त्यात एखादे तरी पुस्तक असतेच . मी चित्रकार असल्याने त्यांनी टिळक वाचनालयात चित्रकला विषयाची  कोणकोणती पुस्तके उपलब्ध आहेत याची तोंडपाठ यादीच दिली कारण त्यांचे आजोबा हरभट मोने चित्रकार होते. त्यानां पारंपारीक कला ते आधुनिक समकालीन कला , मूर्त , अमूर्त कला ,गाजलेले चित्रपट , चित्रकार ,लेखक , जुनी पुस्तके , अध्यात्मातील अनुभव यांचा दांडगा अभ्यास आहे . पण त्याचा वृथा अभिमान नाही . अतिशय साधेपणा व अहंकार विरहीत जीवनशैली यामुळे ते समाधानी असतात . त्यांच्या या स्वभावामुळे मी कधीकधी गप्पा मारायला त्याच्या घरी जातो. एक प्रसंग मात्र कायम लक्षात राहीला आहे तो सांगण्यासारखाच आहे .
            एकदा विजय दिवाण व मी मोनेसाहेबांच्या  घरी मस्त गप्पा मारत होतो . आणि अचानक संध्याकाळ झाल्याने चहाचा विषय निघाला . त्यावेळी स्वतः मोने चहा करायला आत गेले . बाहेर त्यांच्या वयोवृद्ध आई झोपाळ्यावर बसून आमच्याशी बोलत होत्या कारण त्यांचे पाय दुखत होते. मी त्यानां एक सहज प्रश्न विचारला . नागेश मोने व भालचंद्र मोने ही तुमची दोन मुले . एक शाळेचा मुख्याध्यापक व दुसरा बँकेचा अधिकारी आहेत , कर्तृत्ववान आहेत , हुशार आहेत , व्यासंगी आहेत , सर्वानां आवडणारे आहेत पण दोघांनीही लग्न केले नाही . तुम्हाला दोन सुना मिळाल्या असत्या तर तुम्हाला जरा छान विश्रांती मिळाली असती व सुनांवर जरा रुबाबही दाखवता आला असता . तुम्हाला वाईट वाटत नाही का ?
जराही नाही . 
मोनेआजी अगदी ठामपणे म्हणाल्या .
असे कसे ? माझा लगेच प्रतिप्रश्न . जरा सविस्तर सांगा . भारतात जुन्या पारंपारिक विचारांचा पगडा आहे . प्रत्येकाला वाटते माझा वंश पुढे चालला पाहीजे , घराण्याचे नाव राहीले पाहीजे . नातू हवा , घर कसे गजबजलेले हवे . लग्न करून मुलानां जन्म देणे हे तर प्रत्येक भारतीयाला आद्य कर्तव्य वाटते मग तुमची विचारसरणी अशी वेगळी कशी ?
         मोने आजीच्यां चेहऱ्यावर मंद स्मितहास्य होते . तुम्ही हा प्रश्न मला विचारणार याची मला खात्री होती . पण खरं सांगू आता दोघेही साठीच्या आसपास आहेत त्यामूळे आता लग्न हा  विषय पूर्णपणे संपला . पण तरुण होते त्यावेळी फार पूर्वी मी त्यांच्या लग्नाचा विषय काढला होता . 
दोघेही विद्यार्थीप्रिय , अभ्यासू , वाचनप्रिय व हुशार आहेत . आनंदी आहेत , छान जगत आहेत , मग माझ्या स्वार्थासाठी त्यांच्या जीवनात मी का खोडा घालू ? हे जीवन प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसार , आवडीनुसार , सवडीनुसार , मनसोक्तपणे जगता आले पाहीजे . जीवनातील प्रत्येक दिवस एक मोठा सणाचा दिवस असल्यासारखा उत्सवपूर्ण जगता आला पाहीजे . थोडक्यात स्वमर्जीप्रमाणे  दिवस  जगता आला पाहीजे . कोणाच्याही व्यक्तिस्वातंत्र्याचा अपमान न करता , कोणाचाही प्रभाव न पाडून घेता , जीवन स्वच्छपणे जगता आले पाहीजे . माझी दोन्ही मुले आनंदी आहेत . त्यांच्या कार्यामूळे हजारो विद्यार्थी माणसे आनंदी होत आहेत आणि हा आनंद मला रोज मिळतो . मग वाईट कशाला वाटेल ?
मी हे उत्तर ऐकले व छानपणे मस्तक त्यांच्या पायाशी ठेवून आशीर्वाद घेतला .
दिव्यत्वाची जेथे प्रचिती ॥
तेथे कर माझी जुळती ॥ त्यादिवशी अशीच माझी भावावस्था झाली .
          लोकमान्य टिळक व वाईचा एक वेगळा ऋणानुबंध होता . अठ्ठावीस वाईकरांनी सांगितलेल्या लोकमान्य टिळकांच्या आठवणी , पत्रव्यवहार , टिळकांच्या वाई भेटीचे किस्से , छायाचित्रे यांचा मागोवा भालचंद्र मोने यांनी शोधून अभ्यासपूर्ण पुस्तक तयार केले आहे . जूना इतिहास पुराव्यांसह शोधून काढणे, हजारो पुस्तकांतून अभ्यास करून त्यांचे वाचन करून निवडक  माहिती संकलन करणे , त्याची वर्गवारी करून पुस्तकासाठी दस्ताऐवज तयार करणे , अनेकांच्या घरी जावून माहिती गोळा करणे , संदर्भ गोळा करणे हे एखाद्या मधमाशीसारखे न कंटाळता अविरत कष्टाचे काम असते आणि नेमके हेच काम भालचंद्र मोने करतात . अशा कामासाठी जिद्द , चिकाटी व सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा लागतो तरच कार्य सफल होते व इतके सर्व करून मोने प्रसिद्धीपासून नेहमी दूर राहतात . 
           हे सगळे आठवायचे कारण म्हणजे तीनचार दिवसांपूर्वी त्यांचा फोन आला होता . ' लोकमान्य टिळक आणि वाईकर ' या पुस्तक प्रकाशन समारंभाच्या निमंत्रण देण्यासंदर्भात . त्याचदिवशी माझा वर्गमित्र श्री .सुरेश वरगंटीवार याने लोकमान्यांचे व्यक्तीचित्र विविध माध्यमातून साकारून एक वेगळे प्रदर्शन वाईमध्ये भरवायचे ठरवले आहे . त्याचे उद्‌घाटन माझ्या हस्ते करावयाचे त्यांनी नक्की केले होते . मोठ्ठ व्हायचे कॅन्सल केले असले तरी मी मित्रप्रेमामुळे त्यानां नकार देऊ शकलो नाही .
              तर भेटू प्रत्यक्ष येत्या शनीवारी दि .२६ ऑगस्टला सकाळी 10 वाजता चित्रप्रदर्शनाच्या उदघाटनाला व संध्याकाळी 5 वाजता पुस्तक प्रकाशनाच्या समारंभावेळी . अध्यक्ष श्री . अनिल जोशी आहेत . प्रमुख पाहुणे श्री.दिपक टिळक येणार आहेत .
सर्वानां सस्नेह निमंत्रण !🙏🙏

सुनील काळे
9423966486

दत्त दिगंबर पतसंस्थेच्या विरुद्ध लढणारा अखेरचा योध्दा - विश्वास बर्गे

दत्त दिगंबर पतसंस्थेविरुद्ध लढणारा अखेरचा योध्दा विश्वास बर्गे
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
        काल वाईमध्ये वसंतमाला व्याख्यानमालेतील 12 व्या पुष्पाचे व्याखाते होते श्री . समीर नेसरीकर , आणि त्यांचा विषय होता "आजच्या काळातील अर्थभान " .
       आपण सगळेच जाणतो की मनुष्य छोटा असो वा मोठा प्रत्येकाच्या जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते . कष्टाने मिळवलेल्या पैशांचे योग्य नियोजन करायचे असते .कधीकधी आपण जसे जीवन जगायचे ठरवलेले असते , जी स्वप्ने पाहीलेली असतात त्याच्या बरोबर विरुद्ध अनपेक्षित घटना आपल्या आयुष्यात अचानक घडतात आणि ठरवलेले सुंदर जगण्याचे स्वप्न बेचिराख होते . काही जण कसेबसे सावरतात तर काही जण जीवनाशी तडजोड करून कायमची माघार स्विकारतात . अयशस्वी होतात .
         दहा वर्षांपूर्वी पाचगणीवरून वाईला कायमचे राहायला आलो . वाई पाचगणी अंतर जरी जास्त नसले तरी येथे सांस्कृतिक विषमता खूप आहे त्यामुळे फार जणांशी ओळखी घरोब्याचे सबंध नव्हते . त्यामुळे वाई परिसर व माणसे जरा नव्यानेच समजून घेत होतो .
         तयार घर घ्यायचे असे ठरवले होते तर एक भयानक अनुभव माझ्या पदरात पडला मग शेवटी घर बांधायला लागले . आता घर बांधायचे तर दोन वर्षांचा काळ जाणार होता . भाड्याच्या घरात रोख पैसे ठेवणे सोपे व सुरक्षितही नव्हते . कॉन्ट्रॅक्टरचे कामगार , त्यांची रोजची हजेरी व विटा ,वाळू , सिमेंट , यांचे पैसे महिन्याच्या एक तारखेला रोख द्यावे लागत होते . म्हणून मी काही अमाऊंट पाचगणीच्या बँकेत ठेवण्यापेक्षा दत्तदिगंबर पतसंस्थेच्या वाईच्या मिलिंद खामकर यांच्या जागेत सुरु असलेल्या शाखेत ठेवायला गेलो ,तेथे संस्थेत योगिता चौधरी या मेणवली गावच्या ओळखीच्या बाई काम करत होत्या . त्या म्हणाल्या काही काळजी करू नका . मी तुम्हाला ओळखते व मी येथे वाईतच राहते .
          घर बांधण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागणार होता काही दिवसांचाच तर प्रश्न होता म्हणून तेथे चार लाख रुपयांची मासिक ठेव गुंतवणूक केली . मला दर महिन्याला चार हजार रुपये मिळत होते . इकडे इमारतीच्या बांधकामाचा स्पीडही फास्ट होता . अगदी शेवटच्या थोड्याच दिवसात एक दिवस पतसंस्थेत गेलो तर शटर डाऊन दिसले .
           योगिता चौधरी मॅडमला फोन केला तर म्हणाल्या मुख्य बाजारात पहिल्या मजल्यावर मोठे ऑफीस घेतले आहे तेथे फर्निचरचे काम सुरु आहे . मी आता शाखाप्रमुख असणार आहे . फर्निचरचे काम संपले की पतसंस्था पुन्हा सुरु होईल . काळजी करू नका . मग प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व नंतर सतत पाहणी करतच राहीलो . कारण फर्निचरचे काम संपतच नव्हते . इकडे घराचे बांधकाम संपून रंगकाम सुरु झाले होते .  शिफ्टींगमध्ये खूप व्यस्त झालो होतो . शेवटी कलरकामाचे पैसे द्यायचे म्हणून एक दिवस पतसंस्थेत गेलो तर कळाले शाखा कधीच सुरु होणार नाही .
          योगिता चौधरी मॅडम म्हणाल्या मलाच फसवले , माझाच पगार दिला नाही . ज्यांच्या विश्वासावर ठेव ठेवली त्यांनी कळवलेच नाही . शेवटी एकप्रकारे दगा दिला . मग पळापळी सुरु झाली . त्यांनी विलास शिंदे नावाच्या व्यवस्थापकाची भेट करून दिली . त्यांनी सहा महिन्यात पूर्ण रक्कम मिळेल असा पोलीसांसमोर जबाब दिला .
        आयुष्यात पहिल्यांदा कोरेगावला गेलो . पो.स्टेशनला तक्रार करायला गेलो तर म्हणाले घटना वाईत घडली मग वाईत जावा . वाई पो .स्टेशनला गेलो तर म्हणाले आर्थिक गुन्हे शाखा सातारा व अंतर्गत दुय्यम सहकारी निबंधकाकडे तक्रार करा . तेथे गेल्यावर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात अर्ज करा तेथे गेलो तर जिल्हा पोलीस प्रमुखांकडे अर्ज करा सगळीकडे नुसती टोलवाटोलवी सुरु झाली . मग वाई , सातारा , कोरेगाव अशा वाऱ्या सुरु झाल्या . अर्जांवर वर अर्ज सुरु झाले व चार लाख बुडवून घेतल्याचे दुःख व 
" अर्थभान '' पदरात पडले .
            असा संघर्ष सुरु असताना एक दिवस विश्वास बर्गे यांचा फोन आला . तुम्ही सातारा येथे भेटायला या , माझेही पैसे बुडाले आहेत आपण एकत्र प्रयत्न करू म्हणाले . मग पहिल्यांदा त्यानां भेटलो आणि आम्ही दोघेही समदुःखी आहोत याची ओळख पटली .
       विश्वास बर्गे मुंबईला माझगावच्या प्रसिद्ध इंग्रजी शाळेत पीटीचे शिक्षक होते . आयुष्यभर कष्ट करून 36 वर्षांची पेन्शन घेऊन आता कोरेगावला मूळ गावी राहून म्हातारपण निवांत जगायचे त्यांचे स्वप्न होते . एकूलती एक मुलगी सांगलीला लग्न झाल्याने दोघे पती पत्नी कोरेगावला एकटेच राहत होते . तेथे दत्त दिगंबर शाखेची मोती चौकात मुख्य शाखा होती . आयुष्यभर कमावलेले अकरा लाखाची ठेव त्यांनी पतसंस्थेत गुंतवली . त्यांनी ठेव ठेवली म्हणून त्यांच्या सर्व भावांनी पतसंस्थेत पैसे गुंतवले . एकूण चाळीस लाखापर्यंत ही रक्कम ठेवली गेली होती . आणि अचानक पतसंस्थेचे अध्यक्ष राजेन्द्र हिरालाल गांधी व त्यांचे सर्व संचालक सदस्य एकूण 32 कोटी रुपयांचा अपहार करून फरारी झाले .
        विश्वास बर्गे एक वयस्कर गृहस्थ असले तरी मुंबईत राहात होते . अभ्यासू व्यक्तिमत्व होते .धडाडीने त्यांनी सर्व ठिकाणी माझ्यासारखेच असंख्य अर्ज दिले होते . शेवटी कोरेगाव कोर्टात अर्ज करून त्यांनी फरारी सदस्यांचे पितळ उघडे पाडले . आरोपी कोरेगावचे रहिवासी होते पण पोलीसांनी त्यानां अटक केली नाही . कोरेगाव कोर्टाने त्यांनां सर्वांचे पैसे परत करण्याचा आदेश दिला . पण लढाई इतकी सोपी नव्हती . आरोपींनी सातारा येथे अटक होऊ नये म्हणून अर्ज केला . तो फेटाळला म्हणुन मुंबई हायकोर्टात अपिल केले . मुंबई हायकोर्टाने अपिल फेटाळले म्हणून दिल्लीला सुप्रीम कोर्टात अपिल केले . या सर्व केसेस एकटे जीवाचे रान करून हाताळण्यामध्ये मुख्य योध्दा होते कोरेगावचे विश्वास बर्गे .
           या लढाई दरम्यान सातारचे मनसेचे संदीप मोझर यांनी ही संस्था चालवायला घेतल्याचे कळाले . त्यांनी या संस्थेचे दिव्य दत्त दिगंबर पतसंस्था असे नामकरण केले .मग त्यांच्या भारदस्त " किल्ला " नावाच्या बंगल्यात भेटायला गेलो . तेथे बरीच बाचाबाची ,भांडाभाडी , उलटेपालटे प्रश्न-उत्तरे झाली शेवटी त्यांचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यानां भेटायला शिवाजी पार्क मुंबईला गेलो . तेथे राजगडाचा अजब कारभाराची झलक पाहायला मिळाली . कार्यकर्त्यांनी त्यांना आता भेटता येणार नाही असे चांगल्या मराठी भाषेत सांगितले . एक अर्ज द्यायला सांगितले . त्याचे पुढे काय झाले हा संशोधनाचा विषय आहे . त्यांच्या ऑफीसमध्ये हसणाऱ्या राज साहेबांचे एक सुंदर पेन्सिल स्केच चित्रकार वासुदेव कामत सरांनी केले आहे . ते माझे अर्थभान पाहून मला हसत आहेत असा मला भास झाला . तेथून आल्यावर आणखी फोनाफोनी टोलवाटोलवी झाली . राजसाहेबांची भेट तर झाली नाही पण मुंबईचा प्रवास व जाणेयेणे भारी पडले. मग तेथूनच मोझरानां फोन केला व काही दिवसानंतर त्यांनी पन्नास हजार रुपयांचा चेक दिला . थोड्याच दिवसात त्यांनी माघार घेऊन पतसंस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला .
          सुप्रीम कोर्टाने आरोपींना अटक करून सर्वांचे पैसे परत द्यावेत असा आदेश दिला परंतू चतूर पोलीस सांगत होते आरोपी सापडत नाहीत . कोरेगावात बिनधास्तपणे फिरणाऱ्या या मंडळीना सगळेजण बघत होते पण फक्त पोलीसानां ते दिसत नव्हते .
        मी कोरेगावला ,सातारला एसपी ऑफीस व वाईत सर्व ठिकाणी अर्ज केले होते त्याची परिणीती म्हणजे एक दिवस मला वाई पो .स्टेशन येथून फोन आला म्हणाले मी यादव पोलीस बोलतोय , तुमचे मुख्य आरोपी राजेन्द्र हिरालाल गांधी येथे आले आहेत . तेथे गेलो तर गांधीसाहेब निवांत गप्पा मारत बसले होते . यादवांना मी म्हणालो यानां ताबडतोब अटक करा हे फरारी आहेत .तर ते हसत म्हणाले मी त्यांच्याकडून जबाब लिहून घेतला आहे .तुमचे सगळेच साडेतीन लाख रुपये  ते द्यायला तयार आहेत तुम्ही काळजी करू नका . मग वाईचे पो. प्रमुख आनंद खोबरे यांना भेटलो त्यानां मुंबई हायकोर्टाची प्रत दिली व अटक करा असे सांगितले तर ते म्हणाले त्यांना अटक करता येणार नाही कारण तुमचे पैसे ते देत आहेत त्यांनी लेखी जबाबाचे आश्वासन दिले . त्या लेखी आश्वासनाची प्रत घेऊन मी सगळीकडे फिरलो व फिरतच राहीलो . सद रक्षणाय खलनिग्रणाय म्हणजे काय ते कळाले .
              फॉर्चुनर या मोठ्या अलिशान गाडीत फिरणारे राजेन्द्र गांधी एक लबाड , मवाली माणूस आहेत .  त्यांनी वाईच्या मिलिंद खामकरांच्या घरी मला नेले फुकटचे चहापाणी करून मी आता यांनां सर्व रक्कम देणार असल्याचे सांगितले. मिलींद खामकरांनी लगेच  साक्षीदार आहे असा होकार दिला .
          दुसऱ्यादिवशी सकाळी १० वाजताच कोरेगावला गेलो . तेथे ऑफिसमध्ये राजेन्द्र गांधी आलेच नाहीत . शेवटी परत बाचाबाची , भांडणे मग त्यांच्या घरातून पन्नास हजाराचा चेक आला . चार लाखापैकी एक लाख मिळाले . 
           उरलेल्या तीन लाखांसाठी आजपर्यंत वाई पो .स्टेशन ,कोरेगाव पो . स्टेशन , मा . मुख्य अधिक्षक मुख्यालय सातारा , आर्थिक गुन्हे शाखा , ग्रामविकास मंत्री , सहकार मंत्री , खासदार उदयनराजे भोसले , आमदार मकरंद पाटील , पो. उपविभागीय अधिकारी वाई , मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , महसूल मंत्री , कोल्हापूर परिक्षेत्र पो .प्रमुख , सभापती विधानपरिषद , जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग - १ सहकारी संस्था , अशा अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी  व अर्ज करून थकलो . 
            2020 मध्ये माझ्या घराच्या पाण्याच्या टाकीवरून मी पडलो डाव्या पायाचे मुख्य हाड तुटले हॉस्पीटलचा खर्च एक लाख पन्नास हजार रुपये होता . करोनाच्या काळात पुण्यात हॉस्पीटलमध्ये ॲडमिट होतो खर्च दोन लाख होता त्यावेळी राजेन्द्र गांधी यांना अनेक फोन केले , गयावया करून माझ्याच पैशांची मागणी केली तर म्हणाले मी फक्त पाचशे रुपये पाठवतो . तीन लाखाची ठेव व पाचशे रुपये देत असल्याचे दाखवून उपकारकर्त्याची भावना ठेऊन बोलत होते . अशी माणसे वृत्तीने पोहचलेली ,निलाजरी व नालायक असतात . 
           मी पूर्णवेळ चित्रकार आहे .चित्रकारांना एक तर नियमित दरमहिना उत्पन्न नसते . कित्येक महिने चित्र काढायची व नंतर मुंबईला जाऊन चित्रप्रदर्शन करायचे . त्यातून मिळणाऱ्या मिळकतीत पुढचे चारपाच वर्ष बचत करत  जगायचे . अशावेळी तीन लाख ही डोंगराएवढी अमाऊंट असते . अशावेळी ती चित्रे डोळ्यापुढे येतात ज्यातून पैसे निर्माण झाले . सगळी मेहनत वाया गेल्याचे फिलींग जाम त्रासदायक असते . संघर्ष त्रासदायक होतो .
        या सगळ्या संघर्षात कोरेगावात त्याच्यांविरुद्ध एक माणूस खूप जिद्दीने लढत होता आणि तो म्हणजे श्री .विश्वास बर्गे .
       वयाच्या सत्तरीत असणाऱ्या या माणसाला मधुमेह होता . वजन जास्त असल्याने चालता येत नव्हते . वेदना होत होत्या .पायाची , हाताची इतर अनेक दुखणी अंगावर घेऊन ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढले . आरोपीनां रितसर अटक झाली थोड्याच दिवसात न्यायालयात जामीन मिळवून मंडळी परत बिनधास्त झाली . अधूनमधून आम्ही दोघे भेटायचो . आपल्या देशात न्याय कधी मिळणार ? पतसंस्था , स्थानिक सहकारी संस्था , त्यांचे अधिकारी काय करतात ? पतसंस्थावर निर्बंध का नसतात ? मुळात पतसंस्था कशासाठी काढल्या ? त्यानां जबाबदार कोण ? त्याच्यां कारभारावर अंकूश का नाही ? सरकारच्या या अजब कारभाराची नेहमी चर्चा करायचो . आपण हरायचे नाही , शेवटपर्यंत लढत राहायचे , या सर्व प्रतिकूल कठिण परिस्थितीला सामोरे जायचे असे ते सतत म्हणत . सातत्याने कोठेतरी अर्ज करायचे . सगळ्या अधिकाऱ्यानां भेटत राहायचे . त्यांच्या कामकाजात काय प्रगती झाली त्याचे मेसेजेस व फोन करत असायचे .
        वाईच्या लो.टिळक ग्रंथालयात माझे व्हॅली आणि फ्लॉवर्स या शीषर्काखाली सुंदर प्रदर्शन सुरु आहे . त्या प्रदर्शनाच्या तयारीत मी पूर्ण मग्न झालो होतो .
           माझ्या प्रदर्शनाची व आजचे व्याखाते समीर नेसरीकर यांचे 
"आजचे अर्थभान " ह्या व्याखानाची माहिती देण्यासाठी विश्वास बर्गे यांना मी मेसेज पाठवत होतो तर  प्रोफाईलवर त्यांचा फोटो होता व त्याखाली मेसेज होता 

 " भावपूर्ण श्रध्दाजंली "

          आजचे व्याखान कायम लक्षात राहील . तुमच्याकडे कमावलेल्या पैशांचे गुंतवणूकीचे अर्थभान नसेल तर आयुष्यात मनमुराद स्वच्छन्दीपणे जगण्याची गोची होती . आता ज्यावेळी मी घरातील दत्तदिंगबर या पतसंस्थेच्या आर्थिक फसवणूकीची फाईल उघडतो , त्यातील असंख्यं अर्ज पाहतो , त्या मुदत ठेवींच्या मूळ छोट्या आकारातील तीन लाखाच्या तीन कागदी पावत्या पाहतो त्यावेळी मी निराश होतो . मला ती रक्कम मिळविण्यासाठी कोणापुढे दाद मागावी हे कळत नाही .     
        लोकसभेच्या इलेक्शनसाठी मतदान करताना माझे हात थरथरतात . ही काळी शाई लावून आपण जीवनातील आनंदाला डाग लावून घेतल्याचे शिक्कामोर्तब होते . कोणी तरी मेसेज त्या काळात पाठवला होता " डाग अच्छे होते है " .
       या देशात हजारो कोटी रुपयांचा अपहार करून विजय मल्ल्या इंग्लडमध्ये मजेत ,निवांत ,आनंदाने जगत असतो . ललीत मोदी परदेशात चैन करत असतो . कित्येक दिवस झाले या महाभागानां अटक होत नाही . कायद्याचा किस काढला जातो . त्याचीच प्रेरणा हे दत्त दिगंबर पतसंस्थेसारख्या काही सहकारी संस्था घेत असतात . त्यानां अनेक अज्ञात हातांचा आधार असतो त्यामुळे कसलीही भीती वाटत नाही . सर्वसामान्य भाजीवाले , फळविक्रेते , छोट्या पानपट्टीसारख्या दुकानदारांनी रोज साठवलेली छोटी ठेव या पतसंस्थेत जमा केली होती . पण गरीबांचे , कष्टकऱ्यांचे कष्टाने घाम गाळून जमवलेले पैसे हे संचालक गडप करतात . कित्येक कोटी रुपयांनां चुना लावून मजेत जगत असतात . अलिशान फॉर्चुनरमधून फिरत असतात . सक्षम पोलीस यंत्रणा , मोठमोठे राजकीय नेते , सामाजिक पुढारी , समाजसेवक त्यांच्यापुढे नांगी टाकतात ,त्यावेळी आपली भारताची लोकशाही काळ्या रंगाची चादर लपेटून गुपचूप अंधारात बसलेली आहे असे मला वाटते . 
      आता चार जून रोजी निवडणूकीचा निकाल लागेल नवीन खासदार निवडून येतील  दिल्लीला जातील एकमेकांच्या विरोधकांवर टिकास्त्र करून लोकशाहीचा जयजयकार करतील . सामान्य माणसांच्या परिस्थितीत काय फरक पडेल ? कधी कधी वाटते न्याय मिळविण्याच्या प्रोसेस इतक्या कॉम्प्लीकेटेट ( गुंतागुंतीच्या)केलेल्या आहेत की न्याय मिळेपर्यंत माझ्या फोटोलाही " भावपूर्ण श्रध्दांजली " म्हणत हार घालावा लागेल की काय ?असे वाटते .
अशा लढाईत विश्वास बर्गे सारखा एक खरा सच्चा योध्दा धारातिर्थी पडला हे पाहून आठवणीने डोळे पाणावले . बचेंगे तो और भी लढेंगे असे म्हणणारे बर्गे सर लढा देत  कायमचे गेले .आता त्यांची एकटी अशिक्षित पत्नी हा लढा कसा पुढे चालू ठेवणार ? तिच्या जगण्याचे भवितव्य काय ? कोण तिला सावरणार ? एकंदर पुढे सगळं अवघड आहे . तिच्यापुढे अंधारयात्रेचा मोठा प्रवास आहे . हा अवघड प्रवास सर्वानां कळावा , त्यांनी यातून काही बोध घ्यावा म्हणून हा लेखनप्रपंच 🙏🙏

आता पैसे बुडविणारे राजेन्द्र गांधी व संचालक मंडळ फटाके फोडून मोठ्याने डिजे वाजवत असतील कारण आता केसेस लढणारा व बाजीप्रभू सारखा लढणारा लढवय्या बर्गे सर गेले . आता त्यांची मजाच मजा . आपल्याला कोणी वाली नाही हेच खरे . 🙏🙏

जय महाराष्ट्र ,🙏 जय भारत , 🙏
जय लोकशाही 🙏व जय आर्थिक अर्थभान !
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
सुनील काळे✍️
9423966486

शनिवार, १४ डिसेंबर, २०२४

दूरदेशीची मैत्री = पार्ट 2

 दूरदेशीची मैत्री - पार्ट 2
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
          24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यानां रिटायर्डमेंट घ्यावीच लागते आपणही घ्यावी . त्यादिवशी मी माझी डायरी घेऊन पाचगणीला गेलो रिटायर्डमेंटनंतर काय काय करता येईल हे ठरवायला . आता मस्त आराम करायचा . भरपूर तकतक केली आता निवांत जगायचे सगळी कमर्शियल कामे बंद करायची आपल्या स्वतःसाठी जगायचे असे ठरवून लिहायला सुरुवात केली तर आमचा कल्याणचा मित्र नंदीश सोनगिरे व त्याची डॉक्टर बायको एक छान केक घेऊन वाढदिवशी हजर झाले . त्याच दिवशी पंढरपूरचे अंतर्नाद डिजिटल मासिकाचे संपादक डॉ.अनिल जोशी व त्यांची मिसेस शुंभागी जोशी त्यांचा बदलापूरचा मित्र मोठा पुष्पगुच्छ व काही भेटवस्तू व स्वतः बनवलेले काही खाण्याचे पदार्थ घेऊन पाचगणीला आले . एकंदर तो दिवस लक्षात राहण्यासारखा होता . आम्ही सर्वांनी माझ्या आवडत्या पांगारी गावची व्हॅली आणि पुस्तकाच्या गावाला भेट दिली . आपल्या आवडत्या मित्रांसोबत भेट होणे व भरपूर गप्पा मारणे ही अनोखी मेजवानी असते . आपले काही मित्र व नातेवाईकदेखील आपल्याला पूर्णपणे विसरतात .काहीतरी खुस्पट फालतू विचार डोक्यात ठेऊन आपल्याशी वैर घेतात , टाळतात , भांडतात व टिका करत राहतात अशा सर्व त्रासदायक नातेसंबंधानां मी मित्रानां मनातूनच हद्दपार केले आहे . कायमचा नारळ दिला आहे कारण मी आनंदाने जगण्याचे ठरविले आहे व आता खरोखर मजेत जगतो .
            अर्थात मित्र भरपूर असले तरी सगळेच मित्र हे मैत्र प्रामाणिक टिकवतात असे नसते . मित्रांचेही अनेक प्रकार असतात व गरजेप्रमाणे त्यांचे मित्रत्व अधूनमधून जागृत होते याचा मलाही चांगला अनुभव येत असतो . पण सगळे एकसारखे व चांगलेच मित्र भेटावेत अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरते . व्यक्ती तितक्या प्रकृति याची जाणीव ठेवावी लागते . मित्र जसे असतात तसे स्विकारत गेले की मग त्रास होत नाही . हे जीवन नानाविध स्वभावाच्या मित्रांनी भरलेले आहे व त्यात खूप व्हरायटी आहे म्हणून मलाही ते फार मजेशीर व रोमांचक वाटते .
              मी पुण्यात अभिनव कला महाविद्यालयात 85 ते 90 च्या काळात चार वर्ष शिकायला होतो . त्यावेळी एक वर्ष विद्यार्थी सहाय्यक समिती नावाच्या वसतिगृहात राहत होतो . त्यावेळी  कला महाविद्यालयात जाताना चालत जायचो त्यावेळी काही मित्र सायकलवर जायचे . मला डबलसीट घ्यावे लागेल म्हणून दुसरीकडे बघत वेगाने शेजारून निघून जायचे . आज त्याच रस्त्यावरून चारचाकी गाडीने जाताना त्यांच्या कधीतरी आठवणी येतात . आताही त्यातील काही मित्र  लक्षात आहेत ,पण आपण त्यांच्या वाईट गोष्टी डोक्यात ठेवत बसलो की त्रास होतो त्यामुळे विसरून नव्याने प्रवास करत राहायचे . त्या वसतिगृहात माझ्याच कॉलेजला शिकणारा एक मित्र होता . तो अनेक गोष्टीत आमच्यापेक्षा पुढे असायचा आजही तो पुढेच आहे . त्याची एक मैत्रिण होती . त्याने हॉस्टेलवर एक ' बिन माणसाचा हात ' नावाचे नाटक बसवले होते त्या नाटकात एक पात्र होते सातारा  जिल्ह्यातील एक गावरान ऊसाचा रस विकणारा गुऱ्हाळ चालवणारा माणूस . आणि ह्या पात्रात मी अप्रतिम अभिनय केला म्हणून बेस्ट ॲक्टरचे प्राईजही मिळाले होते . त्यामुळे तो मित्र कायम लक्षात राहीला होता .
             दोन एक वर्षापूर्वी एकदा कॉलेजच्या जवळ आर्ट मटेरियल घ्यायला गेलो होतो त्यावेळी दुपारी जानकी नावाच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो . त्यावेळी तीस वर्षांनंतर अचानक हा आमचा फेसबुकवर सुप्रसिद्ध असणारा मित्र प्रवेश करताना समोरच्याच टेबलावर बसलेला दिसला . आमचा मित्रत्वाचा सातारी बाणा लगेच जागृत झाला . त्याच्याशी हात मिळवला व एकत्र बसुन भरपूर गप्पा माराव्या म्हणून शेजारी बसायला गेलो तर या मित्राने हातात त्याचे व्हिजिटींग कार्ड दिले व याठिकाणी मी एका बिझनेस मिटींगमध्ये आहे त्यामुळे अपॉईमेंट घेऊन ऑफीसमध्ये यावे अशी प्रेमळ विनंती केली . मी त्याला लगेच मनापासून सॉरी म्हणालो . नंतर दूर त्याला त्रास होणार नाही अशा कोपऱ्यात जाऊन बसलो . थोडा स्वतःचाच रागही आला . कारण मी आपल्या मित्रत्वाच्या धुंदीत असतो पण समोरचा त्याच मित्रत्वाच्या धुंदीत असेल असे नसते , तो खूप वेगळ्या विचारांमध्ये वेगळ्या विश्वात जगत असू शकतो याची जाणीव ठेवली पाहीजे हे मी नव्याने शिकलो .त्यामुळे मैत्र जपताना मी आता फार काळजी घेतो . त्या मित्राच्या ऑफीसमध्ये परत जाण्याची माझी इच्छा त्याचदिवशी संपली त्या कार्डावरचा पत्ताही मी पाहीला नाही व आता त्या मित्राची तसे वागणूक दिल्याबद्दल तक्रारही नाही . आपण आर्थिक अडचणीत किंवा वाईट अवस्थेत किंवा अप्रसिद्ध असताना जर मित्र टाळत असतील तर ते तुमचे कधीच मित्र नव्हते व यापुढेही असणार नाहीत .

पण काहीजण सर्व परिस्थितीत आपल्याला जपणारी असतात . अशी माणसे खास व्यक्तिमत्वाची असतात .वेगळीच असतात . ती तुमच्या सर्व परिस्थितीत सतत सोबत असतात . सारखीच प्रेमाने वागत असतात अशा मित्रानां मी नेहमीच सॅल्यूट करतो .

               इल्झे विगॅन्ड ही आमची जर्मनीची मैत्रीण मात्र आगळीवेगळीच आहे . ती आता 95 वर्षाची आहे . गेली अठ्ठावीस वर्ष ती संपर्कात आहे . तिने व मी आमचे मैत्रभाव छानपणे जपले आहे . करोनानंतर गेली चारपाच वर्ष ती भारतात आली नव्हती . तीची फार जबरदस्त इच्छा होती की आम्ही एकदा तरी जर्मनीला भेट द्यावी . त्यासाठी श्रीमंत होण्याचा आम्हीही खूप प्रयत्न केला . दोन प्रदर्शने नेहरु सेंटर आर्ट गॅलरीत केली . व्हिसा मिळविण्यासाठी सीए कडे गेलो, इन्कमटॅक्स फाईल बनवली , पासपोर्ट काढला , उत्पन्नाचे दाखले मिळवले ,
 ट्रॅव्हलएजंटकडे संपर्क केले पण विमान प्रवासाच्या यंत्रणा फारच कडक आहेत . सतत नव्या गोष्टी मागत असत . मग मेडीकल इन्शुरन्स मागितला . फिटनेस सर्टीफिकेट , उत्पन्नाचे मार्ग विचारले . तेथे किती दिवस राहणार आहे ? कोणाकडे राहणार ? त्यांचे सर्टिफाईड  पत्र आहे का ? रिटर्न तिकीट काढले का ? ज्या कोणाकडे राहणार त्यांचे इन्कमप्रुफ ? तेथे फिरण्याचे पैसे आहेत का ? किती आहेत ? माझ्यासारख्या फ्रिलान्स चित्रकार लोकांना उत्पन्नाचे फिक्स सोर्स कोठून असणार ? मग मी कंटाळलो . नाद सोडून दिला . गडया आपला गाव बरा असे ठरवून जर्मनीचे स्वप्न पहाणे बंद केले . काही स्वप्ने परवडणारी नसतात हे लवकर लक्षात आले  व इल्झेला कळवले आम्हाला जर्मनीला येणे शक्य नाही व विषय संपवला .
              मग इल्सेचा मेसेज आला जर तुम्ही मला भेटायला येत नाही तर मग मी येते . वय वर्ष पंच्च्यान्नव , हातात आता काठी आली आहे . शरीर थकले आहे , एका गुढग्याचे ऑपरेशन झाले आहे . पण उत्साह मात्र तोच आहे . जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा निरागस दृष्टीकोन लहान मुलासारखा ओसांडून वहात आहे . मैत्रीची ओढ तशीच आहे . मी तिला सांगितले आता शरीर थकले आहे एकटे येण्याची रिस्क घेऊ नको सोबत कोणीही नसल्याने कधीही काहीही होऊ शकते . पण इल्झे ऐकणारी थोडी आहे ? तीचे मैत्र आणि तिचे जगणेही आहेच वेगळे.
           एक दिवस कॉल आला . मी महाबळेश्वरला आली आहे . हॉटेल बुकींग करून अर्धा महाबळेश्वर फिरून झाले आहे . तुझ्याकडे उदया सोमवारी येणार आहे . मी एसटी ने प्रवास करते तुझा पत्ता सांग मग भेटायला येते .कधी येऊ ?
           अशा हट्टी मैत्रिणीपुढे काहीच बोलता येत नाही . मग वाई बस स्टॉपवर इल्झे आली . तिने एसटी स्टॅन्डवरच जादूची झप्पी दिली . सगळे प्रवासी बघतच राहीले . मग गेली तीन चार दिवस मेणवली, वाईचा परिसर फिरत राहीलो . प्रत्येक माणसाशी प्रेमाने बोलणे , वॉचमन , कातकरी मुले , श्रीमंत , गरीब , जातीभेद न करता सर्वांच्यासोबत फोटो काढणे , घाटावर छोटे स्केच करणे , आवडीचे पदार्थ खात रहाणे , गाणी ऐकणे , आणि तरुणाईला लाजवेल त्या उत्साहाने जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेणे हे पाहीले की खरोखर हे जीवन सुंदर आहे हे पटते .
       मी तर अठ्ठावनव्या वर्षी रिटायर्डमेंट घेतली पण इल्झे मात्र पंच्च्यानवव्या वर्षीही तितकीच ॲक्टीव्ह आहे . 
       जीवनातला हा उत्साह कसा टिकवायचा असे विचारले तर म्हणते तुम्ही भारतीय पुढील भविष्याचा विचार करत बसता मी मात्र फक्त आज आणि आता एवढया दोनच गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत . येणारा प्रत्येक क्षण मस्त मजेत जगायचा . पुढे जे काही होईल ते होईल . मृत्यू म्हणजे पण एक अनोळखी मित्रच असणार आहे त्याला काय घाबरायचे ?  त्याच्याशीही मैत्री करायची . मस्त जगायचे व मस्तीतच एक दिवस मरायचे .

सुनील काळे✍️
9423966486

दूरदेशीची मैत्री -पार्ट 1
https://www.facebook.com/share/p/u2XDxctcaz7DjFFR/

जगण्याचे " स्टॅन्डर्ड " समजलेला माणूस- प्रा . डॉ . ज्ञानदेव झांबरे सर************************        पाचगणी हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शैक्षणिक केंद्र आणि थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे . ब्रिटिश काळापासून वेगवेगळ्या लोकांनी स्वधर्मियांसाठी शाळा सुरु केल्या . त्यामुळे येथे त्रेचाळीस शाळांमध्ये अठरापगड जातींचे लोक एकत्रित रहात असल्याने येथे कॉस्मोपोलीटन संस्कृती आहे . पाचगणी शहर छोटे असल्याने बहुभाषिक वेगवेगळ्या प्रांतातील मंडळी छानपैकी एकत्रितपणे राहतात . अशा या गावात माझे बालपण गेले . दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि चांगले मार्क मिळाले म्हणून अकरावीसाठी कॉलेजचा शोध सुरु झाला . त्याचवर्षी वाईला किसनवीर महाविद्यालयात नव्याने सायन्स कॉलेज सुरु झाल्याचे कळाले . BSc डिग्री मिळण्याची चांगली सोय झाली होती . त्यामुळे घरच्यांनी मला अकरावी सायन्सला प्रवेश घेण्यासाठी फोर्स केला . मी मात्र नाराज झालो होतो कारण माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले होते व सायन्सचे विषय इंग्रजी माध्यमात शिकवले जाणार होते . इंग्रजीची माझी खूप आबाळ झाली होती कारण सातवीपर्यंत आम्हाला इंग्रजीचे शिक्षकच नव्हते . इंग्रजी , गणित , सायन्स या विषयाची तर माझी कुडंली कधी जमलीच नव्हती पण त्याकाळी उलट उत्तर देण्याची प्रथा नव्हती त्यामुळे मी मुकाटपणे वाईला सायन्स कॉलेजला रोज एस.टी बसचा पास काढून येऊ लागलो .       सायन्सच्या या वर्गात शिक्षक मला काय शिकवत होते याचे मला भान नव्हते कारण मला इंग्रजी भाषाच समजत नव्हती . चाळीस पन्नास विद्यार्थी असल्याने मागच्या बेंचवर बसायला लागलो आणि मला एक नविन छंद लागला . मी चित्रे काढायला लागलो . माझ्या मित्रांची , शिक्षकांची , प्राण्यांची , वनस्पतींच्या जर्नलमध्ये आकृत्या काढणे मला आवडू लागले . कधी कधी मी वाईच्या बसमधून पसरणीघाटात उतरायचो . या घाटातील वळणदार रस्ते , दुतर्फा असलेली वडाची झाडे , पांडवगडाच्या पायथ्याच्या सभोवतालची छोटी छोटी चमकणारी भातशेती , ऊन पावसाचा खेळ , संध्याकाळची सुर्यास्ताची रंगउधळण , वाईच्या गणपती मंदिराची , वेगवेगळ्या घाटाची चित्रे मी जलरंगात उतरवू लागलो . थोडक्यात मला चित्रकलेची फारच आवड निर्माण झाली होती . चित्रकार होण्यासाठी लागणारी इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा मी बारावी सायन्सला असताना दिली व त्यामध्ये मला 'अ 'श्रेणी प्राप्त झाली होती .       चित्रकलेचे वेड इतके वाढले की मी सकाळी सहा वाजताच थंड हवेत चित्र काढायला जायला लागलो . टेबललॅन्डच्या पठारावर तर कधी सिडनेपाँईटच्या उंच चौथऱ्यावर बसून मी धोमधरणाचे पाणी ,कृष्णा व्हॅलीतील डोंगररांगा , कधी पांगारी तायघाट जवळच्या पारसी पॉईंटची चित्रे रेखाटू लागलो . आणि अचानक माझ्या लक्षात आले मला अतिथंड हवेत सकाळी फिरल्याने सर्दीचा त्रास सुरु झाला आहे . ऑक्सिजिन घेण्यासाठी दोन्ही नाकपुड्या बंद झाल्याने श्वास घेणे मुश्कील झाले आहे . डॉक्टरांनी माझे ऑपरेशन करून नाकातील वाढलेले पॉलीप्स काढावे लागतील यासाठी तातडीने ॲडमिट केले . नाकाला मोठे बँडेज बांधूनच मी 12वी सायन्सची प्रॅक्टीकल परिक्षा दिली होती . त्यानंतर  पुण्याला चित्रकलेच्या अभिनव कॉलेजला मी गेलो . चित्रकार झालो व परत पाचगणी महाबळेश्वरचा निसर्ग रंगवू लागलो होतो . थंड हवेत वेळीअवेळी सतत डोंगररांगावर भटकंती केल्याने माझा नाकाने श्वास घेण्याचा त्रास आणखीनच वेगाने वाढू लागला . डॉ. प्रशांत पोळ यांनी वेगवेगळ्या वर्षी चारपाच वेळा माझे ऑपरेशन केले आहे . एकंदरीत मला थंड हवेची ॲलर्जी झाल्याचे सिद्ध झाले व डॉक्टरांनी 2014 साली मी पाचगणी सोडावी लागेल असे निक्षून सांगितले . मला माझे पाचगणीचे बस्तान सोडून  कायमचे  वाईला यावे असे त्यांनी सांगितले व नाईलाजाने मी काही दिवस वाईला राहण्याचे ठरवले .          वाई कॉलेजचे प्राध्यापक असलेले माझे मित्र श्री .पटकुरे सर यांनी मला सह्याद्रीनगर या परिसरात बोलावले . थोडी चर्चा केली तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की त्यांच्या सोसायटीत " प्रज्ञाअमृत " नावाचा एक बंगला आहे . त्याचे मालक श्री .व सौ झांबरे दोघेही शिक्षक आहेत . त्यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर पाच खोल्यांचे घर भाड्याने मिळते . तेथे काही दिवस राहून वाईच्या परिसरातील चित्रे काढावीत . हवा बदलाने तब्बेतीवर काय परिणाम होईल हेही कळेल व एखादी जागा आवडली तर घर बांधण्यासाठी वाईत एन ए प्लॉट घ्यावा या उद्देशाने मी त्यांच्या घरी आलो .         सहयाद्रीनगरात असलेला " प्रज्ञाअमृत " अतिशय मेंटेन केलेला ,फुलझाडे असलेला सुंदर बगीचा व पार्किंगची सोय असलेला बंगला बघताक्षणीच मला आवडला . बंगल्याच्या पाठीमागे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी स्वतंत्र जीना होता . आतमध्ये सर्व नीटनेटकेपणा होता . खिडक्या दरवाजानां पडदे लावलेले होते . आम्ही दोघेही चित्रकार असल्याने चित्रकाम करण्यासाठी व राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होती . झांबरेसर , झांबरेमॅडम व त्यांची मुलगी मृणाल हे तीनच माणसे खाली रहात होते . त्यांचा मोठा मुलगा प्रणव शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला होता . पहिल्या भेटीतच आमची छान ओळख झाली व लगेच प्राथमिक बोलणी करून मी एका आठवड्यात पाचगणीवरून वाईला शिफ्ट झालो . सर व मॅडम दोघेही स्वच्छताप्रेमी होते . त्यामुळे मी रोज मॉर्निंगवॉकला वाकेश्वरला जाताना पाहायचो झांबरे सर स्वतः साफसफाई करायचे , कुंड्यांना पाणी घालणे , झाडांची निगा राखणे ,खतपाणी देणे . पूर्ण आवार पाण्याने स्वच्छ धूवून काढायची त्यांनां आवड होती . आम्ही कधीतरी समोरासमोर भेटलो की अनेक विषयांवर गप्पा मारायचो . वाईत राहण्याचे फायदेतोटे तपासून पहायचो . येथील परिसराचा माणसांचा स्वभाव व आचरणांवर चर्चा करायचो . नवनव्या जागा शोधायची आता सवय लागली होती . त्याचा आढावा घेताना झांबरे सर मनापासून प्रतिक्रिया द्यायचे .       " प्रज्ञाअमृत " या बंगल्यामध्ये रहात असताना एक घडलेला प्रसंग मला आजही लक्षात आहे व आयुष्यभर पुढेही कायम लक्षात राहील . एकदा रविवारी सुट्टीचा दिवस होता . साधारण नऊ दहा वाजताची वेळ असेल . आमची घरकाम कारणारी बाई आज येणार नव्हती त्यामुळे दोघेही निवांत पेपर वाचत बसलो होतो . आणि शेवटच्या दूरच्या खोलीतील अचानक कोपऱ्यातील किचनसिंकचा का वॉशबेसीनजवळचा नळ अलगद तुटून पडला होता . पाईपलाईन उघडी झाली आणि वेगाने पाणी रूममध्ये पसरु लागले होते . आम्ही विरुद्धदिशेच्या बाजूला असल्याने काही आवाजच आला नाही . हळूहळू पडणाऱ्या पाण्याने ती रुम भरून गेली होती आणि अचानक खालून झांबरे मॅडम व सर दोघेही वरच्या मजल्यावर आले .त्यांनी घराची बेल वाजवली आणि त्यांच्या लगेच लक्षात आले की शेवटच्या खोलीतून पाणी जवळपास चारपाच इंच भरून दुसऱ्या रूममध्ये पाणी पसरू लागले होते . झांबरे सरांनी लगेच प्लंबरला फोन लावला येताना नवीन नळ घेऊन यायला सांगितले . पटकन टेरेसवर जावून मुख्य पाईपलाईन बंद केली . इतक्यात झांबरे मॅडम पटकन खाली गेल्या , येताना त्यांनी फरशी पुसण्याचा रबरमॉप व चारपाच फरशी पुसण्याचे जाड कपडे घेऊन एक बादली आणली . त्यांची मुलगी मृणाल देखील मदतीला आली . इकडे बनियन व लुंगी घालून निवांत बसलेले झांबरे सर गुडघ्यापर्यंत लूंगी गुंडाळून पटकन फरशीवरील पाणी बादलीत भरू लागले . झांबरे मॅडम यांनी लगेच साडीचा पदर खोचून मॉपने पाणी बाहेर टाकायला सुरुवात केली . मग आम्ही दोघेही त्यांच्यामध्ये सामील झालो व सर्व जणांनी रुममध्ये साचलेले पाणी काढून तासाभरात सगळा बंगला चकाचक केला . नंतर प्लंबर आला त्याने नवीन नळ बसवला .आता तुम्ही म्हणाल यात आश्चर्याची गोष्ट काय ? तर आम्ही झांबरे सरांचे भाडेकरू होतो . पाण्याचा नळ दुरुस्त करून रुम साफसफाई करण्याची जबाबदारी आमची होती . ते घरमालक होते . उच्चशिक्षित पी एच डी झालेले कॉलेजचे प्राध्यापक होते . मॅडम एम एस सी व जॉय स्कूलच्या उपप्राचार्या होत्या . एकदा घर भाड्याने दिले की त्याची देखभाल करण्याची जबाबदारी भाडेकरूचीच असते . त्यादिवशी दुपारी आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि तो प्रसंग एन्जॉय केला . कोणीही कसलीही तक्रार झाली नाही . दोन चार महिन्यातच आम्ही " प्रज्ञाअमृत " बंगला सोडला . नवीन जागा घेतली तेथे मोठे अपयश आले . नंतर मग आमचा मेणवली गावाजवळ " निसर्ग " नावाचा बंगला तयार केला . मागच्या वर्षी तेथे " निसर्ग आर्ट गॅलरी " नावाने चित्रप्रदर्शनही भरवले होते . अनेक वेगवेगळ्या जिल्हयातील , तालुक्यातील पर्यटक प्रदर्शन पाहण्यासाठी येत होती . एकदा किसनवीर कॉलेजचे प्रा. श्री रमेशचंद्र बारगजे सरांनी फोन केला की त्यांच्या कोल्हापूरच्या 1973 सालच्या एम .एस .सी बॅचचे क्लासमेटस यांचे वाई येथे गेटटुगेदर आयोजित केले आहे त्यावेळी तुमची निसर्ग आर्ट गॅलरी पाहायला सर्वजण येणार आहेत . धोमचे मंदिर पाहून सर्व गाड्या निसर्ग आर्ट गॅलरी पाहण्यासाठी गेटपर्यंत आल्या . त्यानां पार्कींगची जागा दाखवत होतो त्यावेळी एक गाडी मात्र गेटपासून दूर थोड्या अंतरावर उभी राहीलेली पाहीली . बारगजे सरानां ती गाडी बाहेर का थांबली म्हणून विचारले तर सरांनी कपाळावर हात मारून घेतला . मला म्हणाले काय बोलू आता ? ती गाडी तुझ्या सख्या चुलत व मावसभाऊ असलेल्या हनुमंत काळे यांची आहे . तो आमच्या बॅचचा सर्वात अतिशय हुशार विद्यार्थी होता . युनिव्हरसिटीत प्रथम आला होता . त्याला आम्ही सांगितले चित्रकार सुनील काळे तुझा भाऊ आहे . त्याने वाई ,पाचगणी महाबळेश्वर या परिसरातील असंख्य अप्रतिम चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत , त्याची मिसेस चित्रकार स्वाती काळे हिने असंख्य फुलांची तैलरंगात चित्रे काढलेली आहेत . उत्तम चित्रप्रदर्शन आहे . तुमची तीस वर्ष झाली भेट झालेली नाही तर तुम्ही आता जरूर भेटा व प्रदर्शनही पहा . पण तुझा भाऊ गाडीतून उतरायला तयार नाही त्याचे कुटुंबीय गाडीतच बसून आहेत .ते म्हणतात आम्ही भावकीत जात नाही कारण आमचे " स्टॅन्डर्ड " मोठे आहे . मी मोठ्या कंपनीत ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर होतो . तो साधा चित्रकार आहे त्याची माझी तुलना होऊ शकत नाही . तुम्ही सगळे प्रदर्शन पाहायला जा आम्ही बाहेर रस्त्यावर गाडीत बसून राहू . तो एक तास बाहेर थांबला पण घरात आलाच नाही . खरे तर हा हनुमंतदादा आता हेमंत नाव लावतो . कारण आईबापाने ठेवलेले हनुमंत हे नाव त्याला आवडले नाही . अतिशय गरिबीतून त्याला शिक्षण दिले होते .स्वतःच्या कर्तबगारीने तो उच्चपदावर पोहचला त्याचे उच्चशिक्षित मुलीबरोबर लग्न झाले पण लग्नानंतर व अगोदर नोकरी करत असतानाही या दादाने कधीच कोणत्याही भांवडाला जवळ केले नाही . कोणत्याही नातेवाईकांकडे ते फिरकले नाहीत . कोणाशी कसलाही संबंध ठेवला नाही ,कोणालाही मदत केली नाही . संपूर्ण कुटुंबाला दूर ठेऊन दादा मोठा स्टॅन्डर्डवाला झाला . आमचा दादा कसा दिसतो हे मला पाहण्याची उत्सुकता होती . कारण तो माझ्यापेक्षा पंधरावीस वर्षांनी मोठा होता . पण " स्टॅन्डर्ड "आडवे आले . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात . शिक्षणामुळे माणूस विचारवंत होतो त्याच्या ज्ञानाच्या कक्षा उचांवतात . त्याचे जीवन सुखकर व समृद्ध होतेच पण त्याच्यां विशाल छायेत अनेकानां संजीवनी मिळते . उच्चशिक्षित भावाने मात्र आमच्या सर्वांसाठी त्याचे दरवाजे मात्र कायमचे बंद केले होते . उच्चशिक्षणाचा मला तेथे काहीच उपयोग झालेला दिसला नाही . इथे मला पीचडी झालेले उपप्राचार्य झांबरे सर आठवतात . उपप्राचार्या झांबरे मॅडम आठवतात . स्वतःच्या भाड्याने राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाशी प्रेमाने सुखदुःखाची विचारपूस करत असत . ते दोघेही स्वतःचे " स्टॅन्डर्ड "कधी गोंजारत बसले नाहीत .  सामान्य माणसासारखे राहून दोघेही असामान्य कामे करत राहीली . जॉय स्कूल व किसनवीर विद्यालयातील विद्यार्थी घडवताना आपल्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांला घडवण्याचे . " स्टॅन्डर्ड " काम त्यांनी आयुष्यभर केले व त्याचा गर्वही कधी केला नाही . जीवन जगण्याचे खरे " स्टॅन्डर्ड " त्यांनां कळले आहे म्हणून माझ्या त्या अतिउच्चशिक्षित एम एस सी फर्स्टक्लास झालेल्या अडाणी भावापेक्षा झांबरे पती पत्नींविषयी मला आदर वाटत आहे .     महिन्यापूर्वी एकदा झांबरे मॅडमचा मला फोन आला . त्यांनी विचारपूस केली व त्या जॉय स्कूलची नोकरी सोडून पुण्यात नातवाचा सांभाळ करण्यासाठी पुण्यात रहात असल्याचे सांगितले . मुलगा सिव्हील इंजिनियर व सुनबाई पेशाने सरकारी वकील असल्याने दोघेही कामात व्यस्त झाले मग मुलाकडे लक्ष कोण देणार ? म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला . आणि ते ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . माझी आर्ट गॅलरी होती . ती सांभाळताना माझी तीन वर्षाची मुलगी सांभाळण्यासाठी मी आईवडीलानां विनंती केली तर त्यांनी नकार दिला . गावाकडे शेतीची कामे असतात त्यामुळे तुमची मुलगी तुम्हीच सांभाळा असे उत्तर आईने दिले . शेवटी आमच्या संघर्षाच्या लढाईत मुलगी देवाघरी गेली . ती वारली त्यावेळी मी माझ्या मेव्हण्याला सत्यजितला फोन केला . तो म्हणाला मी अत्यंविधीला येऊ शकणार नाही . तो देखील Phd झालेला आहे . अतिउच्चशिक्षित आहे . त्याला भाचीच्या अत्यंविधीला जाण्याची गरज वाटली नाही . बहिणीला कठीण स्थितीत आधार देण्याची आवश्यकता वाटली नाही आणि पुढे आता सत्तावीस वर्ष झाली तरी त्याला आमची कधीच आठवणही झाली नाही . काय उपयोग त्या डॉक्टरेटचा ? जिथे माणूस माणसाला ओळखत नाही .मोबाईल ,फोन , लॅपटॉप आले तंत्रज्ञान वाढले तरी मनाची आढी मात्र कायम राहीली .कधी त्याच्या कुटूंबाने संपर्कच केला नाही कारण "स्टॅन्डर्ड " आडवे आले .त्यावेळी खऱ्या अर्थाने एकटे जगायला शिकलो . अशावेळी झांबरे मॅडमचा त्याग मला प्रेरणा देणारा वाटतो . मुलांविषयची माया त्यांच्या कृतीतून दिसते .इकडे सरांनां रिटायर्ड होण्यापूर्वी खानावळीत जेवण करावे लागले . काही महिने एकटेपणा स्विकारावा लागला . पण त्यांनी कधीही त्याची तक्रार केली नाही . कॉलेजमध्ये त्यांनी अनेक कार्यक्रमात स्वतःला झोकून दिले . त्यांच्या कॉलेजच्या कारकीर्दीची मला जास्त माहिती नाही पण त्यापेक्षा माणुसकी जपणारे , कुटुंबाला जपणारे , अभिमान नसणारे , मोठेपणाचा त्याग केलेले गार्डनमध्ये स्वच्छता करणारे डॉ झांबरे सर मनाला फार भावले . त्यांच्या मुलाचे लग्न ठरले त्यावेळी प्रणवच्या लग्नाला आम्ही दोघेही गेलो होतो . लग्नकार्यालय पूर्णपणे भरून गेले होते प्रचंड गर्दी होती तरीही झांबरेसरांनी आम्हाला बरोबर पकडलेच . शाल श्रीफळ देऊन योग्य मानसन्मान केला त्यावेळी मला या झांबरे कुटूबांचेखरे " स्टॅन्डर्ड " कळाले . वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य नामवंत लहानमोठ्या माणसांनी संपूर्ण हॉल भरून गेला होता . काय असते स्टॅन्डर्ड ?? तुम्ही जगत असता त्यावेळी त्या तुमच्या जगतानाच्या काळात असंख्य माणसे भेटतात . त्यातील काही माणसे चांगली वागलेली असतात काही वाईट वागलेली असतात . पण शेवट काय असतो ? तुमच्या जगण्याला कधीतरी मर्यादा येतेच . कधीतरी शरीर थकते व तुम्हाला अंतिम श्वास घ्यावा लागतो . त्यानंतर कोणत्यातरी स्मशानघाटाजवळ तुमची राख होते ती राख पाण्यात मिसळते तुमचे अस्तित्व संपते . जग काही दिवस तुमची आठवण काढते नंतर तुमची कोणी आठवणही काढत नाही . तुमचे " स्टॅन्डर्ड " काही असो शेवटी तुमची राखच होते . हे ज्यानां समजते त्यांचे भावविश्व वेगळे असते . ते कायम हसतमुख असतात . ते त्यांच्या कृतीतून त्यांचे वेगळेपण जोपासत असतात .अनेकानां त्यांचे जगणे प्रेरणा ठरत असते .असे जीवनाचे खरे " स्टॅन्डर्ड " कळालेले झांबरे सर मला आवडतात . काही महिन्यांपूर्वी अचानक आमच्याकडे घरकाम करणाऱ्या बाई व माळीकाम करणारा त्यांचा मुलगा या दोघांनी आमचे काम सोडले. काही दिवस आम्ही वेगवेगळी माणसे शोधली पण त्यांच्या पगाराच्या अपेक्षा जास्त असल्याने जुळले नाही . मग झांबरे सर पुन्हा आठवले . Phd झालेला माणूस स्वतः झाडलोट करतो , बागेची निगा राखतो तर आपण का लाजायचे ? त्यांच्यापासून प्रेरणा घेतली . आता मी बागकामात तरबेज झालोय बागेत शेतात काम केल्यामुळे आरोग्यही चांगले राहते याचा शोध लागला . आपण कोणावर विसंबून राहायचे नाही काम करत राहायचे हेच खरे " स्टॅन्डर्ड " झांबरे सरांकडून मी शिकलो . खरी डॉक्टरेट तीच आहे . मे महिन्यात ते आता रिटायर्ड होतील . अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या सरानां व झांबरेमॅडम या दोघांनाही उर्वरीत रिटायर्ड आयुष्य सुखसमृद्धीचे आनंदाचे जावे त्यांच्या मनासारखे जगताना उत्तम आरोग्य प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना व मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !चित्रकार - सुनील काळे✍️9423966486निसर्ग आर्ट गॅलरी [वाई]