स्टेशन
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अपघाताने सगळ्यानांच कधी ना कधी जखम होते, छोटया मोठया जखमा तर रोजच्या जगण्यात सतत होत असतात .
पण मित्र, मैत्रीणीनों सगळ्यांच्या जखमा सारख्या नसतात, प्रत्येकाची जखम खूप वेगवेगळी असते. काही जणांच्या जखमा खूप वरवरच्या असतात तर काही जणांच्या जखमा आयुष्यभर खूप खोलवर रुतून त्यानां बेचिराख करून टाकतात,
त्या खोलवर गेलेल्या जखमा कधीही भरून येत नाहीत आणि बऱ्या झाल्यासारख्या दिसल्या तरी त्यांचे व्रण व आघात कायम मनात राहतात कधीही भरून न येण्यासाठी...............
आज तुम्हा सर्वांना अशीच कधीही भरून न आलेल्या आणि मोठा आघात झालेल्या जखमेविषयीची आठवण सांगणार आहे, त्या घटनेमुळे मी, माझी विचारसरणी, माझी रोजच्या जगण्याची पध्दत, तीनशेसाठ डीग्रीमध्ये फिरली.
ही घटना १९९९ सालातील आहे.
संध्याकाळचे चार वाजत आलेले होते, सीएसटी टर्मिनस मधून निघणारी प्रगति एक्सप्रेस पकडण्यासाठी आम्ही आमच्या बॅगा घेऊन मोठ्या प्रयासाने स्टेशनवर धावपळ करत आलो . आज नेहमीसारखी गर्दी नव्हती कारण कोणत्या तरी जंयतीच्या सुट्टीमूळे पुणे मुंबई अपडाऊन करणारी नेहमीची मंडळी गैरहजर होती.एका बऱ्यापैकी रिकामा असलेल्या डब्यात आम्ही जागा मिळवली आणि स्थिरावलो . मी आणि स्वाती पुण्याच्या प्रवासासाठी निघालो होतो.
एक महिन्यापूर्वीच पाचगणीतील मॅप्रोगार्डन येथील चित्रांची पावसामूळे धुळधाण झाली होती. पाचगणीत पावसाचे दिवस सुरु झाले होते आणि माझ्याकडे जगण्यासाठीचे सर्व मार्ग संपले होते. थरथरत्या हाताने जीवापाड प्रेमाने काढलेल्या दोनशेपेक्षा जास्त चित्रांना मुठमाती देऊन मी आता कायमचा पाचगणीला रामराम करुन नालासोपारा येथे आलो होतो. तेथे माझे घर होते .
आणि मनात नव्या स्वप्नांची, नव्या आशेची, प्रगतीची आस घेऊन मुंबई स्वप्ननगरीत दाखल झालो होतो.
एकदा मी, स्वाती व आमची मुलगी दिशा जहांगीर आर्ट गॅलरीला प्रदर्शन पाहायला गेलो होतो . जहांगीर आर्टच्या प्रमुख मेनन मॅडमने मला पाहताच झापले.... .........मि. सुनील काले, आपको चार लेटर भेजा है I दो दिन के अंदर गॅलरी का पैसा भरो, नही तो गॅलरी बुकींग कॅन्सल हो जाएगा l
गॅलरीला लागणारे पैसे माझ्या पाचगणीच्या अकाऊंटमध्ये होते त्यामूळे जहाँगीर बुक करणे मला अतिशय महत्वाचे आहे हे माझ्या लक्षात आले. आणि त्याच दिवशी बॉम्बे आर्ट सोसायटीचे पदांचे इलेक्शन असल्याने बरेच पुण्याचे चित्रकार, प्राध्यापक वोटींगसाठी स्वतंत्र बस घेऊन एकत्रितपणे आले होते. माझे अभिनवचे प्रा. मिलिंद फडके यानी सांगितले जर तुला पाचगणीला जायचे असेल तर आमच्याबरोबर पुण्याला चल आणि रात्री कोणाकडे तरी मुक्काम कर दुसऱ्या दिवशी बँकेतून पैसे काढ आणि लगेच परत ये..... एक दिवसाचा तर प्रश्न होता...... म्हनून मी त्यांच्या बरोबर पुण्याला जायचे नक्की केले, आणि स्वाती व दिशा नालासोपाऱ्याला घरी गेल्या.
त्या रात्री पुण्यात मी श्रीकांत कदम , सतिश काळे या चित्रकार मित्रांच्या खोलीमध्ये झोपलो.
सकाळी लवकरच एसटीने मी पाचगणीत पोहचलो आणि दहा वाजता बँकेत जाण्यापूर्वीच फोन आला ताबडतोब परत निघा ,कारण तुमची मुलगी या जगात नाही ,ती आता मेली आहे........ ती आता मेली आहे ............हा एकच शब्द माझ्या डोक्यात घुमत राहीला
मी काहीही विचार न करता तत्काळ परतीचा प्रवास सुरु केला . त्या काळात माझ्याकडे मोबाईल नव्हता.
आयुष्यातील सर्वात बेकार, कठीण आणि अवघड, असहाय्यपणे केलेला तो प्रवास आणि मनाची उलाघाल करणारा तो प्रवास कधी आठवला तरी आजही मी प्रचंड अस्वस्थ होतो.......
रात्री खूप उशीरा घरी पोहचलो तर दिशाचे इवलेसे पार्थीव पांढऱ्या शुभ्र चादरीत गुंडाळलेले होते आणि दिवसभर प्रचंड आकांत,रुडून आंक्रदून मलूल पडलेली स्वाती.............
खूप मोठ्याने आरडलो...... मनाचा दुःखाचा बांध कधीच फुटून गेला. फार फार म्हणजे फारच विस्कटलो होतो मी.
11 सप्टें .1999 ची ती काळरात्र माझ्या कायम लक्षात राहीली, आयुष्यभरासाठी मोठी जखम करून गेली .त्याच रात्री साताऱ्यामध्ये उदयन महाराजांचे लेवे प्रकरण झाले आणि त्याचे पडसाद सगळीकडे महाराष्ट्रभर उमटले होते. त्याच दिवशी नालासोपारा येथे इलेक्शन होते. सगळीकडे इलेक्शन मूळे धावपळीचे ,गडबडीचे वातावरण होते. आणि निसर्गही खूपच कोपला होता, प्रचंड वादळी धुवाधार धो धो पाऊस पडत होता,नालासोपारा स्टेशन परिसरात प्रचंड पाणी साठले होते, रेल्वे उशीरा धावत होत्या, एकदंर आकाशातील बापाने माझी सगळीकडे व्यवस्थित प्लॅनिंग करून नाकाबंदी केली होती.
दुसऱ्या दिवशी तिचे दफन करायचे होते व त्यासाठी खड्डा काढायचा होता. माझे फार मित्र नालासोपाऱ्यात नव्हते. शेवटी शोधत राहील्यामुळे एक खड्डा खोदणारा म्हातारा माणूस मिळाला पण त्याचा जोडीदार नव्हता म्हणून तो तयारच होत नव्हता मग मी त्याच्या सोबत यायला तयार झालो.
रात्री एक वाजता मी नालासोपाऱ्याच्या स्मशानभुमीत गेलो आणि माझ्या मुलीचा अत्यंविधीचा खड्डा खोदायला सुरुवात केली......... त्या मजूराला अशा कामाची सवय होती पण मी मात्र भावनाविवश होऊन डोळ्यांतील अश्रूच्या धारा वहात असताना कुदळ व फावडे घेऊन हाताला घट्टे पाडत, माती उपसत त्याला मदत करत होतो . तो मला मदत करत होता का मी त्याला मदत करत होतो हेच कळत नव्हते......... त्या रात्री मी जराही झोपलोच नाही............. दुसऱ्या दिवशी काही नातेवाईक आणि . विजय आचरेकर, रवि मंडलीक,
अनंत निकम या मित्रांसोबत स्मशानभुमीत गेलो. स्वातीची शारिरीक व मानसिक अवस्था बिघडल्यामुळे ती आली नाही.
स्मशानभूमीत मात्र तो एवढासा जीव, चार वर्ष जीवापाड सांभाळलेला एक गोंडस आत्मा माझ्या पासून कायमचा दूर जाणार होता आणि मी प्रचंड आवेगाने ओरडू लागलो, मला माझे दुःख अनावर झाले. माझे हृदयाचे तुकडे तुकडे झाले, मी बेभान झालो, भावनांचे लोट वारंवांर उसळी मारु लागले .सीतामाईने धरती मातेला जसे पोटात घेतले तसे मी आंक्रदून ,आक्रंदून मला पोटात घेण्याची वारंवांर विनंती करत होतो......... मी मनातल्या मनात मानसिकदृष्टया, शारिरिकदृष्टया पूर्णपणे उध्वस्त झालो होतो. मनाच्या छोट्या छोट्या असंख्य ठिकऱ्या उडाल्या होत्या.त्या दिवशी मी शेवटचा खरा रडलो....... त्या दिवशी पोटभर रडलो. माझा मीच मला सावरण्याचा खूप प्रयत्न केला.............. मी आजही सावरण्याचा प्रयत्न करतो............. पण खरं सांगतो मनातून कधी मी सावरलोच नाही. पण धाय मोकलून रडत ही नाही.
दिशाला थोडा ताप आहे असे स्वातीला वाटले.आमच्या पार्क व्हयू अपार्टमेंट समोरच डॉ . सदानंद खोपकर यांचा दवाखाना होता आणि आजही आहे. तेथे चालत स्वाती व दिशा गेली. डॉ. खोपकरने तिला तपासले व जवळच असलेल्या भवानी मेडीकल्समधून इंजेक्शन आणायला सांगितले. प्रिस्क्रीपशनप्रमाणे स्वातीने इंजेक्शन आणले. उडया मारत, हसत ,चालत ते दोघे डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्याबरोबर दिशाने आई.......... म्हणून जोरात शेवटचीच हाक मारली आणि काळी निळी पडून ती जागेवरच गतप्राण झाली.......... ...........
एका छोटया जीवाचा खेळखंडोबा झाला.
डॉ. खोपकरांनी तीची बॉडी समोरच्या पाटील हॉस्पीटलमध्ये नेली तेथेही तिला अनेक इंजेक्शने दिली....... पण....... दिशा उठली नाही........... ती कायमची गेली होती .त्या सर्वांनी संगनमत, करून पोलीसांना फोन केला. मोठी सेटलमेंट झाली................. आणि बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवली.
.आज एकवीस वर्ष झाली... या दुःखद घटनेचा मी खूप कसोशीने छडा लावण्याचा प्रयत्न केला हुशार पोलीस यंत्रणा, डॉक्टरांची लॉबी ,पोस्टमार्टमचा रिपोर्ट आज अखेरपर्यंत त्यांनी दिलाच नाही............
खूप आटापिटा केला, प्रसिद्धी माध्यमांना विनंती केली, पोलीस स्टेशनला हजारो चकरा मारल्या, मंत्र्यासंत्र्यांना भेटलो, नगराध्यक्ष ,नगरसेवकानां भेटलो, सामाजिक कार्यकर्ते,राजकीय
पुढाऱ्यानां भेटलो .सगळ्यानां माझी दर्दभरी कहाणी सांगत सुटलो, पर्याय, न्याय मिळेल, काही उत्तरे मिळतील अशी अपेक्षा करत राहीलो पण एका छोटया जीवाचे या जगात काहीच मोल नसते याची जाणीव पूर्णपणे अनुभवली .पत्रकारांची उदासीनता, आणि समाजातील लोकांची दिसलेली निर्जिवता मनावर खूप मोठा घाव घालून गेली.
एकदा तर रेल्वेमंत्री राम नाईक रेल्वे काऊंटरचे उदघाटन करताना मी निवेदन देऊन खूप मोठमोठ्याने आरडाओरडा केला तर पोलीसांनी मला मुलीच्या मृत्यूमुळे याला वेड लागले आहे असे सांगून खेचत खेचत बाहेर काढले.
अशा कटू आणि दुर्देवी अनुभवामुळे आम्ही प्रचंडप्रचंड निराशेने मी मुंबई, नालासोपारा वेस्टच्या त्या पार्क व्हयू मधील घराला कायमचा अखेरचा निरोप घेऊन निघालो......... प्रचंड,निराशा व दिशाच्या आठवणींचा मोठ्ठा डोंगर मनात साठवत मोठं मानसिक ओझं घेऊन आम्ही दोघे सीएसटी स्टेशनवरून प्रगती एक्सप्रेसने पुण्याला निघालो होतो.............
यापुढे परत मुंबईला यायचे नाही व पाचगणीतच राहायचे असे ठरवून आम्ही सर्व सारवासारव करून नालासोपाऱ्याचा निरोप घेतला होता. सीएसटीवरुन प्रगति एक्सप्रेस सुटली आणि धिम्या गतीने ती दादर स्टेशनवर थांबली.
आमच्या समोरच्या बाकावर जागा रिकामी असल्याने एक इस्कॉनचा तरुण तुळतुळीत गोटा केलेला, धारधार नाकाचा, स्मार्ट गोरापान, आणि भगवी वस्त्रे परीधान केलेला व गळ्यामध्ये मोठी झोळी लटकवलेला एक सन्यांसी शांतपणे समोरच्या बाकावर बसला.
गाडीचा वेग हळूहळू वाढत होता, आणि आमच्या निराश मनात विचारांचा वेगही हळूहळू वाढत चालला होता. जगातील सर्व गोष्टींविरुद्ध निकराने प्रतिकार,लढाई करून हार स्विकारलेल्या सैनिकाप्रमाणे उदासीन होऊन मान लटकवत पडत्या चेहऱ्याने आम्ही बसलेलो होतो. गाडीचा वेग आणखी वाढला तसा समोरचा सन्यांसी प्रसन्न चेहऱ्याने आम्हाला
' गुड इव्हिनिंग ' म्हणाला.परंतू निराशेमुळे आम्ही त्याच्याकडे लक्षच देखील दिले नाही.
आमच्या या उदासीन प्रतिक्रियेमुळे तो सन्यांसी माघार घेणार नव्हता........
त्याने हळूच झोळीतून दोन चॉकलेटस काढली व आम्हाला देण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्याला नकार दिला.
रेल्वेचा वेग वाढला आणि त्याने झोळीतून दोन लाल रंगाची सफरचंद काढली व आमच्या हातात देण्याचा प्रयत्न केला. पण आमचा मूडच नसल्याने आम्ही ती त्याला परत केली.
थोडयावेळाने कर्जत रेल्वे स्टेशन आले. गाडी थांबली. सन्यांसी तत्परतेने खाली उतरला आणि कर्जतचे प्रसिद्ध गरमागरम दोन दोन वडापाव आमच्यासाठीही घेऊन आला. त्याने जबरदस्त आग्रह केला तरीही आम्ही त्याला नकारच दिला.
आणखी थोडयावेळाने गरमागरम चहावाला आला, सन्यांशाने आमच्यासाठी दोन कप चहा स्वतःहून घेतले पण तेही आम्ही न पिता सरळ गाडी बाहेर भिरकावून दिले .
स्वाती उदास , दुःखी चेहऱ्याने डोक्याला स्कार्फ घालून खिडकीवर डोके रेलून बसली होती. मी मान खाली घालून निर्विकार चेहऱ्याने बसलो होतो.
थोडयावेळाने सन्यांशाने दोन छोटी इस्कॉनची पुस्तके काढली व आम्हाला वाचावयास दिली.आम्ही ती न वाचताच साभार परत केली.
इतक्यात लोनावळा स्टेशन आले. गाडी थांबताच सन्यांसी महाशय उतरले आणि लोनावळ्याची प्रसिध्द चिक्कीची दोन पाकीटे घेऊन आले व आमच्या दोघांच्या हातात देऊन "फ्रेश चिक्की आहे " तुम्ही जरूर टेस्ट करा असे म्हणू लागले. आम्ही ती चिक्कीची पाकीटे न खाताच त्याला साभार परत केली.
सन्यांशाने खूप बोलण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्याला कसलाच प्रतिसाद दिला नाही.......
एकंदर सन्यांशाच्या लक्षात आले की ह्या दांम्पत्याचे काहीतरी भयानक बिनसलेले आहे. कारण आम्ही कोणत्या मानसिक अवस्थेत याची त्यालाही कल्पना नव्हती.
आणि मग तो स्वतःच त्याची माहीती सांगू लागला.मी एक उच्चशिक्षित डॉक्टर आहे परंतू श्रीकृष्णाचे चरित्र वाचल्यामूळे माझ्या जीवनात आमूलाग्र बदल झाला व त्या बदलाची परिणीती म्हणून मी डॉक्टरी पेशा सोडून पूर्ण काळ इस्कॉनच्या आश्रमात
सन्यंस्त होऊन कृष्णभक्तीत लीन झालो आहे असे सांगू लागला.
डॉक्टरच्या चुकीच्या औषधापचारांमूळे माझ्या मुलीचा मृत्यू झाला होता आणि परिस्थितीमूळे मी पूर्णपणे नास्तिक झाल्यामूळे मला आता त्याचा राग येऊन खूप तिरस्कार वाटू लागला होता. आमच्या शांत प्रवासात अशा आगंतुक माणसाने ढवळाढवळ करुन व्यत्यय आणलेला मला आवडत नव्हता. पण थोडयाच तासांचा प्रश्न असल्याने नाईलाज होता.
प्रवास संपत चालला होता, शिवाजीनगर स्टेशन आले आणि सन्यांसी अचानकपणे क्षणार्धात वेगाने उठला. आमची प्रवासाची मोठी बॅग त्याने रॅकवरून काढली व मुख्य दरवाजाकडे झेपावला आणि जोरजोरात ओरडू लागला .
स्टेशन आले..........
स्टेशन आले.........
स्टेशन आले,.................
आता मात्र माझा मनाचा तोल, संयम संपलेलाच होता , मी रागाने उठलो आणि त्याच्या मागे धावत जावून आमची बॅग हातात घेतली. आणि मग त्याला विचारले "काय मुर्खपणा चालला आहे तुमचा ? आम्हाला शिवाजीनगर नाही तर पुणे स्टेशनला उतरायचे आहे. आमचे स्टेशन पुढे आहे, येथे नाही. "
आणि मग मात्र सन्यांशी प्रसन्नपणे हसला आणि मला म्हणाला अरे वा ! तुम्हाला बोलता येते याचा मला फार आनंद झाला आहे. तुम्हाला खरंच माहीत आहे का ?
आपले प्रत्येकाचे एक स्टेशन येणार आहे ? आणि त्या स्टेशनवर आपल्याला उत्तरावेच लागणार आहे ?
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचे एक अंतिम स्टेशन असते, ते स्टेशन आले की आपला प्रवास संपतो ..............त्या स्टेशनवर बिनबोबाट , न गोंधळ करता शांतपणे जायचे असते.
" लक्षात ठेवा प्रत्येकाचे एक अंतिम स्टेशन येणार आहे, केव्हा ? कधी ?कसे ? हे त्याला कळते हळूहळू माहीत होत जाते. संकेत मिळत जातात.
रेल्वे स्टेशनवर तुम्ही स्वतःच्या बॅगा प्रवासाचे साहित्य घेऊन उतरू शकता, पण त्या अंतिम स्टेशनवर मात्र तुम्हाला काहीही नेता येत नाही. आपण सर्वजण रिकाम्या हाताने आलेलो असतो व जातानाही पूर्णपणे रिकाम्या हातानेच जावे लागते. ते स्टेशन आले की उतरावेच लागते तेथे कोणालाही वशीला लावता येत नाही, तेथे कोणालाही दया, मया लाचलुचपत देणे चालत नाही.
स्टेशन आले की निमूटपणे उतरायचे असते.
स्टेशन आले की शांतपणे उतरायचे असते.
तुझ्या मुलीचे वय चार वर्ष होते. तीचे स्टेशन आले आणि ती या अनंतात मस्त, स्वच्छन्दी प्रवास करून अंतराळात विलीन झाली. तिचे पूर्णपणे अस्तित्व संपले, ती पुर्णपणे निर्विकार झाली, अनंतात विरून गेली, तुम्ही दोघे मात्र उगीचच स्वतःला त्रागा, त्रास करुन बैचेन, अस्वस्थ होऊन जगत आहात . तुम्ही आता जो प्रवास माझ्या सोबत केला त्यात प्रवासाचा आनंद तर तुम्ही घेतला नाहीच पण तुमच्या सानिध्यात आलेल्या सर्व प्रवाशांचा व व्यक्तिगत माझा प्रवास दुःखद व अतिशय त्रासदायक केला. असा रडका प्रवास करण्यात काहीच अर्थ नाही.......
मात्र यापुढचा प्रवास मात्र छान करा, मजेशीर करा, सुंदर करा, आनंदी करा, स्वतः आनंदी राहा, व इतरानांही भरभरून आनंदी प्रवास करण्यासाठी मदत करा. कारण येथून काहीच न्यायचे नाही, तुमचा बंगला, तुमची गाडी, घोडे, संपत्ती, सोने, रत्ने, दागिने, हिरे, मोती, मौल्यवान वस्तू, तुमच्या आवडीच्या खास स्पेशल वस्तु, फर्निचर, काहीही नेता येणार नाही सोबत.
इतकेच काय ? तुम्ही जन्म दिलेली ,तुमचा स्वतःचा अंश असणारी मुले, प्राणप्रिय पत्नी, नातवंडे किंवा इतर कोणालाही सोबत नेण्याची सोय नाही.
हा प्रवास प्रत्येकाचा एकटयाने सुरू होतो आणि एकट्यानेच संपतो.
तुमचं पुणे रेल्वे स्टेशन आले आहे , निघा आता........
संन्याशाने भगवतगीतेची एक नवी कोरी प्रत माझ्या हातात ठेवली. व आता तरी हे पुस्तक घ्या. असे म्हणत न सांगताच मला प्रेमाने कडकडून मिठी मारली , दोन्ही हात हातात घट्टपणे धरले व अंतिम निरोप घेतला.
"स्टेशन आले की शांतपणे उतरायचे असते "
असे पुन्हा एकदा म्हणत थांबलेल्या रेल्वेच्या डब्यातून तो उतरला. त्याच्या पाठोपाठ मी आणि स्वाती बॅगा घेऊन उतरलो. सन्यांशी शांतपणे पुढे पुढे चालत राहीला आणि आम्ही तो दिसेनासा होत पर्यंत, त्याच्या पाठमोऱ्या धुसर, अदृश्य प्रतिमेकडे
पहातच राहीलो............
पहातच राहीलो............
पहातच राहीलो.............
आता एकवीस वर्ष पूर्ण होतील या घटनेला, त्या भगवतगीतेची कोरी करकरीत प्रत आजपर्यंत कधीही मी उघडली नाही.
आज कपाटात अचानक सापडली आणि ही 'स्टेशन ' गोष्ट परत आठवली.
सुशांतसिंग राजपुतच्या घटनेमूळे सगळा देश दुःखाच्या सागरात बुडाला.मी देखील अस्वस्थ, उदास दुःखी झालो होतो. पण खरं सांगू मित्रांनो आता वाटते त्याचे स्टेशन आले होते. त्याचा आपल्या सर्वांसोबतचा प्रवास इतकाच होता. त्याचे स्टेशन आल्यामूळे तो आता अनंतात, आसंमतात, विलिन झाला............ तो पलीकडच्या जगात गेला....... स्वतःहून.......
आपण सगळेजण या जीवनाच्या अवघड प्रवासात सुखाचेच क्षण शोधत असतो . आपल्या सगळ्यांच्याच खूप मोठया इच्छा ,आकांक्षा ,मोठी स्वप्ने असतात. आपण सगळेच ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत असतो . काहींची स्वप्ने त्यांच्या सोबतच अर्धवटपणे संपतात. त्यांचे कार्य संपते ते, अनंतात विलिन होतात. कारण त्यांचे ' स्टेशन ' आलेले असते......
आणि स्टेशन आले की उतरावेच लागते............
मला एका जवळच्या मित्राने विचारले सुनील काळे, या एवढया मोठया भयानक अनुभवातून तू छान निवांतपणे, आनंदाने जगतोस ,पण आम्ही मात्र परत मूळ पदावर येतो. तुझ्या सतत आनंदी राहण्याचे ,एनर्जीचे रहस्य काय आहे ?
रहस्य काही नाही मित्रांनो,
आज मला समजलेले हे रहस्य तुम्हा सर्वांनाच सांगतो,..........
मला रोज सकाळी तीव्रपणे वाटते की माझे स्टेशन उद्या येणार आहे......... मग आजचा शेवटचा दिवस असणार आहे........ हा शेवटचा दिवस मी छानपणे जगावा........ उत्तम वाचावे......... उत्तम ऐकावे.......... उत्तम ते सर्व पहावे........ खूप छान चित्रे काढावीत......... गाणी ऐकावीत...
माझ्या घरासमोरच्या छोटया शेतात काम करावे........ बगीच्याला पाणी घालावे........ सर्व कचरा काढावा........ घर स्वच्छ ठेवावे.......... व्यायाम, योगासने करावीत......... आमचा टॉमी कुत्रा, चिनू मांजर , तिच्या पिल्लांसोबत खूप खेळावे............ प्रसन्नपणे मेणवलीच्या घाटावर रोज सकाळी फिरायला जावे...... वाईच्या घाटांवर,टेबल लॅन्डच्या पठारावर मनसोक्त फिरावे, महाबळेश्वरच्या ऑथर सीट पाँईटच्या व इतर दऱ्याखोऱ्यांमध्ये भरपूर फिरावे, निसर्गाशी समरस होऊन खूप फोटो काढावेत, आमच्या कृष्णा नदीच्या शेजारच्या खूप झाडे असलेल्या ठिकाणी भरपूर फोटो काढावेत, पाय पसरून निवांत त्या ठिकाणची जलरंगातील चित्रे काढावीत, खूप स्केचेस करावीत .
प्रत्येक गोष्ट ' सजगते ' ने करावी.आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीचा भरभरून आनंद घ्यावा............. कधीही कोणाशी स्पर्धा न करता दुस्वास न करता शांतपणे जगावे.
झाडानां, फुलझाडानां पाणी घालावे..... त्यातून नव नवी फुले जन्मावीत............ आणि स्वातीच्या कॅनव्हासवर दिशाच्या आवडीची अनेक
कमळफुले, सुर्यफुले, जरबेराची, झेंडूची,
हॉलीऑक्सची, तीळाची, आणि अनेक रंगाची विविध रानफुले कॅनव्हासवर नव्याने सतत जिवंत व्हावीत. कारण दिशानेच तिच्या जाण्यातून तिला एक नवी जगण्याची ' दिशा ' दिलेली आहे. आणि तिनेही ही आठवण सातत्याने कॅनव्हासवर आणून दिशाची आठवण फुलांच्या चित्रातून सतत ताजी व जिवंत ठेवली आहे . त्यामूळे चित्ररूपाने दिशा कधी गेल्याचे दुःख होत नाही... ती चित्रे देश परदेशातील अनेक रसिकांच्या थकलेल्या चेहऱ्यावर हास्य फुलवतात अगदी आमची दिशा खळखळून, निरागसपणे हसायची तसेच
आणि या अज्ञात सन्यांशाची दोघांनाही पुर्णपणे आठवण आहे ..............
स्टेशन आले की शांतपणे उतरावेच लागते..........
स्टेशन आले की शांतपणे उतरावेच लागते.......
👏👏👏👏👏👏👏👏👏