गुरुवार, १७ जून, २०२१

पॅलेटवरचे रंग : चंद्रकांत मांडरे

 पॅलेटवरचे रंग

🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌

          



कोल्हापूरकरांच्या कलाकारांच्या खूप कथा , गोष्टी व किस्से बऱ्याच वेळा माझ्या वाचनात आलेल्या होत्या .कोल्हापूरला त्यामूळे कलापूर असंही म्हणतात .

         अशा या कोल्हापूरात मी घरदार सोडून बारावी सायन्स नंतर  कलानिकेतन कॉलेजला दाखल झालो . मोठ्ठं शहर, अनोळखी वातावरण, माणसे पण नवी होती . त्यावेळी माझी आर्थिक स्थिती बिकट होती ,पण निसर्गचित्रांची ओढ प्रचंड होती . पण कला महाविद्यालयामध्ये   ' निसर्गचित्र ' हा एकच विषय नव्हता . सगळ्याच विषयांची प्राथमिक तयारी म्हणजे फौडेंशनचा कोर्स . 

         कॉलेजला थोडे  स्थिरस्थावर झालो त्यानंतर चंद्रकांत मांडरे यांचे नाव सतत ऐकायला मिळायचे . त्यांच्या निसर्गचित्रांच्या प्रिंटस व लेख वारंवांर वाचनात यायचे . अशा कलाकाराला गुरु मानून  त्यांची एकदा तरी भेट घ्यावी म्हणून एका रविवारी त्यांच्या घराचा पत्ता मिळविला आणि निघालो .

        कलानिकेतन कॉलेज कंळबा रोड ते राजारामपूरी सातवी गल्ली, निसर्ग बंगला या पत्यावर चालत , माझी चित्रांची फाईल घेऊन पोहचायला मला दोन तास लागले . त्यावेळी मेसचा डबा लावलेला होता. ब्रेकफास्ट हा प्रकार आर्थिक टंचाईमुळे माहीत नव्हता. त्यामूळे उपाशीपोटीच मी चालत निघालो .

        निसर्ग बंगल्याच्या  गेट मधून आत गेल्याबरोबर दरवाजा उघडणारी व्यक्ती स्वतः चंद्रकांत मांडरे आहेत हे मी लगेच ओळखले , डोक्यावर फरची कॅप, पांढरा सदरा ,  त्यावर करडया रंगाचे जॅकेट ,पांढरा पायजमा. त्यामूळे त्यांचे व्यक्तिमत्व खरोखरच भारदस्त दिसत होते .

         सेफ्टीडोअरवरच्या दरवाजातूनच त्यांनी विचारले

 "काय पाहीजे ?"

"मी कलानिकेतनचा फौंडेशनचा  विद्यार्थी आहे तुमची ओरिजनल चित्रे पहायला आलोय व माझी चित्रे पण दाखवायची आहेत" . मी पटापट बोलून गेलो . 

"ठिक आहे...बसा बाहेर ."

एवढंच बोलून ते वरच्या मजल्यावर निघून गेले.

सकाळचे दहा, अकरा, बारा वाजले,  दुपार झाली. माझ्या पोटात भुकेने प्रचंड आग पडू लागली. वाट पाहून पाहून खूप कंटाळा येवू लागला पण मांडरे काय आत बोलवेनात . बरं आता बाहेर गेलो आणि अचानकपणे मांडरे बाहेर आले तर ? मोठा प्रश्न  पडला आणि मनात वेगवेगळे विचार येऊ लागले . कोणीतरी सांगितल्याचे आठवले , गुरु प्रथम कडक परिक्षा घेतात, शिष्याला खरंच गरज आहे का हे त्याच्या वर्तणूकीतून तपासतात, मगच ज्ञान किंवा दिक्षा देतात. कदाचित आपली पण नक्कीच परिक्षा घेत असावेत, हे मनाशी ठरवून मी देखील जिद्दीने बाहेरच बसून राहीलो .

           संध्याकाळचे पाच वाजले असावेत, दरवाजा उघडल्याचा आवाज आला व सौ . मांडरे बाहेर फिरायला निघाल्या व दारातच मला बसलेला पाहून "काय पाहीजे ?" असे विचारू लागल्या .

          मी सकाळी नऊ वाजल्या पासून मांडरे साहेबांची बाहेर वाट पहात बसल्याचे सांगताच त्या खूप चिडल्या व मला लगेच आत घेऊन पहिल्या मजल्यावर नेले. मांडरे साहेब चहा घेत निवांतपणे पुस्तक वाचत बसले होते . 

मला बघताच त्यांनी  

"अजून तू आहेसच होय ? गेला नाहीस ?" असा प्रतिप्रश्न  केला .

खरं तर मांडरे मला पूर्ण विसरले होते ( की विसरण्याचे नाटक केले होते, की प्रथम वर्षाचा फौंडेशनचा विद्यार्थी होतो म्हणून दुर्लक्ष केले होते .. ते मला  कधीच कळले नाही )

          त्यांनी त्यांची काही चित्रे नुकतीच फ्रेम करून आणली होती . ती सर्व निसर्गचित्रे मला दाखवली . 

त्यांचा '  निसर्ग बंगला ' महाराष्ट्र सरकार कलादालनात रूपांतरीत करणार असल्याने इंटिरिअरचे काम चालू होते . माझी चित्रे पाहील्यावर "निळ्याजांभळ्या (violet) रंगाचा वापर खूप जास्त करतोस तो पूर्णपणे बंद कर" अशी तंबी दिली . पण "तु पहिल्याच वर्षाचा फौडेंशनचा विद्यार्थी असल्याने तुला मी माफ करतो" असं खाद्यांवर हात ठेऊन कौतुकही केले .

             सौ . शशीकला मांडरे पाचगणीच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट स्कूल मध्ये काही वर्ष  शिकायला होत्या त्याची आठवण त्यांनी करून दिली . संध्याकाळी थोडा चहापाणी व बिस्कीट मिळाल्यावर मलाही थोडी गप्पा मारायला तरतरी आली . 

         मांडरे त्यांच्या चित्रपटाच्या शुटींग  मध्ये जरा वेळ असला की जेथे असतील तेथे जवळचा परिसर जलरंगात चित्रित करत . जलरंग हे त्यांचे आवडते माध्यम होते . जसं दिसतं तसंच चित्र काढण्याची त्यानां भारी आवड होती .

व ती त्यांनी अखेरपर्यंत जोपासली .

पन्हाळा, रंकाळा ,कोल्हापूर परिसर, वाई महाबळेश्वर, काश्मीर, व परदेशातील इतर अनेक ठिकाणे त्यांनी जलरंगात चित्रित केल्याचे त्यांनी सांगितले .

           जाताना त्यांनी मला त्यांच्या छोट्या स्टुडीओत नेले. "चित्रांविषयी काय संदेश देणार आहे? असे विचारले त्यावेळी ते कोल्हापूरी ढंगात जे म्हणाले ते आजही माझ्या कायम लक्षात  आहे .

पोरा , 

कुठं बी रहा,

कसा बी रहा,

काय पण खा,

कसा पण जग,

कितीही अडचणी येऊ दे

पण आपली ही रंगाची पॅलेट असते ना त्याच्यावरील रंग कधी बी सुकले नाय पाहीजेत हे पक्कं ध्यानात ठेवायचं.

माझी जलरंगाची रंगपेटी बऱ्याच वेळा, जीवनातल्या अनेक गोष्टींमुळे, आघातामुळे ,

वाईट प्रसंगामुळे, सुकली............... पर्यायच नव्हता मला .

त्या वेळी मग चंद्रकांत मांडरे यांचे शब्द आठवतात........... 

मी दोन दोन थेंब पाणी प्रत्येक जलरंगावर टाकतो........ 

व परत नव्या दमाने, नव्या विचाराने पुन्हा सुरुवात करतो .


कारण.....

चित्रकाराला कितीही अडचणी येवोत, 

पण त्याचे पॅलेटवरचे रंग कधी सुकले नाही पाहीजेत................ 

पॅलेटवरचे रंग कधी सुकले नाही पाहीजेत................


🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌


सुनिल काळे

9423966486

फडणीस सर

फडणीस सर

🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋
           
           आज मनापासून वाईच्या फडणीस सरांचे स्मरण होत आहे . खरं तर फडणीस सर यांचा मी कॉलेजातला प्रत्यक्ष शिकवलेला विद्यार्थी नाही,  त्यांचा माझा  पूर्वीपासून जवळचा सबंधही नव्हता,  खूप वर्षांपासूनचा नियमित संवाद किंवा परिचय नव्हता. 
         सात सप्टेंबरला सकाळी आमचे चित्रकार मित्र होनराव व विश्वास सोनवणे यांचे फोन आले आणि कोरोनामुळे फडणीस सर गेले या बातमीने कोठेतरी काळजात दुःखाची मोठी कळ उमटल्याची जाणीव झाली व मनात खोलवर पोकळी निर्माण झाली . 
        पाच वर्षांपूर्वी मी पाचगणीवरून वाईजवळ कायमस्वरूपी राहायला आलो त्यावेळी वाईत खूप मित्र नव्हते. वाचनाची आवड असल्याने एक दिवस लो.टिळक वाचनालयात आलो, वाचक सदस्य झालो, पैसे भरून वाचनाची पुस्तके व पावती घेऊन निघालो तर वाचनालयाच्या उजव्या कोपऱ्यातील  काचेचा दरवाजा असलेल्या खोलीतून कोणीतरी हातवारे करुन बोलावत असल्याची जाणीव झाली. त्या दरवाज्यातून आत जाताच मोठया टेबलापलीकडे नव्या कोऱ्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यामागे एक दाढीधारी व ग्रे कलरची फेल्टहॅट घातलेली , खांदयावर शबनम बॅग लटकवलेली एक व्यक्ती मोठया प्रेमाने मला बोलावत होती.
      " माझे नाव प्रा.सदाशिव फडणीस " त्यांनी हस्तांदोलन करत बसायला सांगितले .
"आज आमचे नेहमीचे मित्र आले नाहीत म्हणून तुम्हाला चहासाठी बोलावले, आणि आज तुम्हीही माझ्यासारखीच फेल्ट हॅट घातली आहे म्हणून हा नवा वाचक सदस्य कोण आहे याची उत्सुकता होती. ".... 
या बसा निवांतपणे.....अशी मनमोकळी सुरुवात करून अगदी सहजपणे कोणताही आडपडदा न ठेवता त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मी चित्रकार आहे हे समजल्यावर तर ते खूपच खूष झाले . 
           त्या पहिल्याच भेटीत आम्ही एकमेकांचे  सख्खे "खास" मित्र झालो. मग वेगवेगळ्या कला, लेखक,कलाकार,चित्र,  कवी, संगीत नाटक,संवेदना ,प्रदर्शने, साहित्य, पर्यटन, कलाकारांच्या जाणीवा , प्रेरणा अशा गप्पांमध्ये दोन तास कसे 
संपले ते मला कळालेच नाही वाचनालयाची वेळ संपली मग आम्ही बाहेर रस्त्यावरच उभे राहून तासभर गप्पा मारल्या. त्यांच्या गप्पानां विषयाचे बंधन नव्हते.
         नंतरच्या अनेक भेटीतून फडणीस सरानां सतत संवाद करत नवनव्या माणसांच्या ओळखी करून घेणे आणि इतरानांही आपली स्वतःची, व आपल्या सर्व मित्रांच्या ओळखी करून देणे यांचा मनापासून नाद, किंवा मोठा छंदच होता. 
            चित्रकला, संगीत, गायक, लेखक, कवी, नाटक यासारख्या इतर सर्व कला व कलाकारांबद्दल त्यानां अपार प्रेम व उत्सुकता होती. आपण कलाकार नाही अशी खंत ते वारंवार व्यक्त करत. संधी मिळवायची आणि त्या माणसांशी त्याच्या क्षेत्रातील घडामोडींविषयी आवडीने बोलत राहायची त्यांना खूप आवड व  सवडही होती.
           आमची ओळख वाढल्यानंतर त्यांनी काही दिवसातच डॉ. प्रभूणे आणि भालचंद्र मोने या त्यांच्या मित्रांसह आमच्या ' निसर्ग ' नावाच्या स्टुडिओला व घराला भेट दिली. तेथील डिस्प्ले केलेली चित्रे पाहून त्यानां आम्हा कलाकार पतीपत्नीच्या चित्रांविषयी खूप कुतुहल आणि प्रेमपूर्ण आदर होता आणि तो इतरानां सांगताना सतत त्यांच्या बोलण्यातून दिसून यायचा .
            चित्रकारांच्या चित्रनिर्मितीविषयी, कवींच्या कवितांविषयी, लेखकांच्या लेखनाविषयी त्यानां हे सुचते कसे ? आणि ते व्यक्त कसे करतात ? त्यांच्या सादरीकरणाच्या प्रोसेसविषयी त्यानां नेहमी उत्सुकता असायची व ती प्रक्रिया समजून घेण्याचा सतत उत्साह असायचा.
          टिळक वाचनालयाचे अध्यक्ष झाल्यावर ते बराच वेळा  वाचनालयातच असायचे. वेगवेगळ्या विषयांचे प्रसिद्ध वक्ते, व्याखाते, तज्ञमंडळी यानां बोलावून नवनवीन कार्यक्रम अरेंज करण्यामध्ये त्यांचा नेहमी पुढाकार असायचा व अशा सर्व कार्यक्रमांचा  मेसेज पाठवायचा व फोन करुन आठवण करून द्यायची त्यानां आवड होती. 
           बऱ्याच वेळा माझा या सगळ्याच कार्यक्रमानां प्रतिसाद नसायचा मग ते नाराज न होता नवा विचार मांडायचे. आपण फक्त आपल्याच चित्रकला क्षेत्राचा विचार न करता इतर विषयांचेही थोडेफार ज्ञान जीवनात आपल्याला आवश्यक आहे असे ते सांगायचे. माणूस बहुआयामी हवा, वाचन चौफेर हवे. माणसाने बहुश्रूत असावे त्यांचा आग्रह असे. त्यामूळे हळूहळू मग आमची उपस्थिती अशा कार्यक्रमांना वाढली.
           एकदा वाचनालयात गेलो असता सगळीकडे पुस्तकांचे ढिग लागलेले दिसले. मग फडणीस सरांनी सांगितले की सगळी पुस्तके विषयवार लावायचे काम सुरु आहे. प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तीनां त्यांच्या आवडत्या विषयाची पुस्तके लगेच सापडली पाहीजेत म्हणून हजारो पुस्तके व्यवस्थित लावण्याचा त्यांनी ध्यास घेतला व तो पूर्णही केला. सर्व वाचनालय डिजिटल करायचे काम त्यांनी हाती घेतले होते.प्रत्येक वर्षीच्या नव्या किंवा जुन्या दिवाळी अंकात  चित्रकलेसंदर्भात कोणताही  लेख त्यांच्या वाचनात आला की त्याची माहीती ते लगेच फोन करुन सांगायचे, व तो लेख महत्वाचा असून मी वाचलाच पाहीजे असे आग्रहाने सांगत असत विशेष म्हणजे त्यानां सगळेच लेख खूप सुंदरच आहेत असे 
"निरागसपणे " वाटत होते.
           वाईच्या वसंत व्याखानमालेत त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. प्रत्येक विषयातील प्रसिद्ध व नावाजलेल्या मंडळीना बोलावयाचे, त्यांचे कौतुक करायचे आणि कार्यक्रम " भन्नाट " करायचा, परिपूर्ण करायचा हे त्यांचे मुख्य ध्येय असायचे.
           १९१८ च्या मे महिन्यात वसंत व्याख्यानमालेत त्यांनी  
"आमची निसर्गयात्रा व अनुभव " या स्लाईड शोच्या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी आग्रहाने आमंत्रित केले व प्रोत्साहन दिले. आणि त्यानंतर मग वाईत आर्ट गॅलरी करावी असा नवा विचार त्यांनी मांडावयास सुरुवात केली. चित्रकारांची चित्रेच रसिकांनी पाहीली नाहीत तर कलाविषयक जाणीवाच समृद्ध होणार नाहीत, लोकांना चित्रे कशी समजणार ? त्यासाठी त्यांनी 
' चित्र कसे पहावे ' हा एक खास  डॉ . प्रभुणे यांचा स्लाईड शो चा कार्यक्रम आयोजित केला होता. सर्व कलांच्या उन्नतीसाठी वाई तालुक्यात एक मोठे सांस्कृतिक केंद्र तयार झाले पाहीजे असे ते सांगत. मग टिळक वाचनालयाच्या बेसमेंटमध्ये चित्रप्रदर्शन करता येईल का ? अशी सतत विचारणा करत, चित्र लावण्याचे हुक, लाईट व्यवस्था, मांडणी कशी करता येईल , किती खर्च होईल ? याचा अंदाज ते घेत असत. 
               आर्ट गॅलरीसाठी प्रयत्न करताना काही जणांकडून  अडचणी आल्या, नकार आला की ते चिडून जायचे. मग चहा पिताना समाजकारण, राजकारण, मानवी स्वभाव, यावर ते स्वतःच त्याचे मानसशास्त्रीय विश्लेषण करत. मी मात्र  त्यांचा उत्साह पाहून शांत राहत असे मग ते आणखी त्वेषाने बोलत,कलाकारांनी उदासीन न राहता आता क्रांतीचा झेंडा घेऊन जागृती केली पाहीजे , सतत प्रयत्न करत राहायला हवे .  मला त्यांच्या ह्या उत्साहाचे खूप कौतुक वाटायचे.
           फडणीस सरांच्या गप्पानां अंत नसायचा म्हणून खूप वेळा घाईमध्ये असलो की मी पुस्तके बदलण्यासाठी 
लो.टिळक वाचनालयाच्या डाव्या बाजूच्या मुख्य प्रवेशद्वारातून जायचो. पण फडणीस सर बरोबर पकडायचेच, त्यानां चुकवणे अवघड असायचे . मग परत  आमच्या चर्चा सुरु व्हायच्या,जीवन  मुल्ये,कलानिर्मिती, मूर्त, अमूर्त चित्रे, त्या चर्चा कधी न संपणाऱ्या असायच्या....
            एकदा मी व फडणीस सर रात्री वाचनालयाच्या जवळच्या मातोश्री नावाच्या हॉटेलमध्ये गप्पा मारत होतो. चहा पिताना त्यांनी  गरम होत असल्याने त्यांची फेल्ट हॅट टेबलावर काढून ठेवली होती. मी पाहीले तर त्यांच्या डोक्यावर भरपूर केस होते. मी त्यानां सहजपणे विचारले ''सर ऊन असेल तर हॅट घालणे योग्य आहे, पण आता रात्री गरज नसताना तुम्ही हॅट सतत कशाला घालता ? फडणीस सर अचानक एकदमच शांत झाले व गंभीरपणे म्हणाले  " त्याचे काय आहे सुनील काळे, तुम्ही मराल त्यावेळी तुम्ही काढलेली असंख्य चित्रे रसिकांच्या भिंतीवर लटकवलेली असतील तुम्ही कलाकार मंडळी कधी मरत नसता, चित्रकार चित्रांच्यारूपाने जिवंत राहतात , गायक, संगीतकार त्यांच्या गाण्यामधून अमर होतात, लेखक, कवी त्यांच्या साहित्यातून पुस्तक रुपाने कायम स्मरणात राहतात... कलाकार जिवंत असताना कला जगतात व कलेच्या माध्यमातून मेल्यानंतरही रसिक जणानां आनंद देत राहतात. नुसते जिवंत राहणे आणि खरे आयुष्य जगणे यामध्ये खूप फरक आहे. आम्ही सामान्य माणसे. आम्ही नुसते जिवंत आहोत , आम्हाला कोण स्मरणात ठेवणार ? आमचं अस्तित्व नगण्य, आम्ही मेलो की संपलो ..........
म्हणून मी ही हॅट सतत घालतो, ही हॅट म्हणजे माझी ओळख, मी असो वा नसो पण पण फेल्टहॅट घालणारे शबनम बॅग बाळगणारे ते म्हणजे फडणीस सर एवढी आमची ओळख राहीली तरी पुरेसे आहे....................
           आता लो.टिळक वाचनालयात गेल्यावर  उजव्या बाजुच्या ऑफीसमधून हाक मारल्याचा आवाज येणार नाही , नवीन चित्रकलेची पुस्तके व इतर चांगल्या लेखांविषयी वाचण्याचा आग्रह होणार नाही, नवीन चित्रे,कला विषयांवर चर्चा होणार नाहीत , त्यांचा नेहमी सकारात्मक प्रोत्साहन देणारा उत्साही चेहरा आणि त्यांची फेल्ट हॅट, शबनम बॅग यापुढे कधीही दिसणार नाही कारण सात सप्टेंबरला फडणीस सर करोनामूळे अनंतात विलीन झाले.
                 सध्या करोनाच्या महामारीत सर्व देवांची मंदीरे बंद आहेत, सर्व भक्तानां मंदीराचे दरवाजे बंद असल्यामूळे देव तरी काय करणार ? मला वाटते देवही या एकटेपणाला कंटाळला असणार, मग कंटाळल्यामूळे अचानकपणे त्याला फडणीस सरांची आठवण झाली असणार व घाईघाईतच त्याने फडणीस सरांना गप्पा मारायला वर बोलावून घेतले असणार......... आणि मग देवाच्या खूप मोठया वाचनालयात फडणीस सर देवाबरोबर अनेक वेगवेगळ्या विषयांवर, नानाविध कला ज्यामध्ये संगीत, चित्रकला, नाटक, कविता, लेखन, साहित्य, अभिनय, वसंत व्याख्यानमाला, व वाईत सांस्कृतिक केन्द्र कसे असणार ? आर्ट गॅलरी कशी असणार ? या ठिकाणी आणखी काय सुधारणा करता येईल ?मूर्त ,अमूर्त चित्रे का समजत नाहीत ? त्यासाठी काय करावे इत्यादी विविध प्रश्नांवर सखोल गंभीरपणे चर्चा करत असणार अशी मला खात्री आहे .
        असे म्हणतात की,जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या आयुष्याची लांबी ही जन्माच्याच वेळी ठरलेली असते, आपल्याला जितके श्वास घ्यायचे ठरलेले असते तितके श्वास घ्यायचे संपले की मृत्यूला सामोरे जावेच लागते. 
         मी खरं तर नास्तिक आहे, मंदीरात जात नाही पण कधी गेलोच तर देवाला नक्की फडणीस सरानां न भेटवता अचानक का नेले ? असा नेल्याचा जाब नक्कीच विचारीन, तक्रार करीन की अजून काही वर्ष का थांबला नाहीस......... असो.
     फडणीस सर असे अचानकपणे सर्वांना चकवा देऊन त्यांच्या धीरगंभीर, मिश्किल स्वभावानुसार सहजपणे मृत्यूला सामोरे गेले. त्यांची फेल्ट हॅट, शबनम बॅग व त्यांच्याबरोबरच्या चर्चा मनात कायम लक्षात राहतील .
जन्म निश्चित आहे,
मरण निश्चित आहे,
जर आयुष्यातील कर्म चांगले असतील
तर " स्मरण " निश्चित आहे. 
फडणीस सर ज्यांच्या ज्यांच्या सहवासात आले असतील त्या अनेकांच्या "स्मरणात " ते नक्की राहतील, कारण त्यांनी केलेले कार्य चांगलेच होते.......
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

सुनील काळे✍️
9423966486

रिटायर्ड

*_रिटायर्ड_* 

सकाळी वॉटस अॅपवर मेसेजेस पाहत असताना इंद्रनील बर्वे यांचा गुड मॉर्निंगचा मेसेज आला . त्यामध्ये एका तुटलेल्या , टाकून दिलेल्या , गंजलेल्या बोटीचा फोटो होता . आणि त्याखाली लिहले होते  'रिटायर्ड ' . तो फोटो पाहून मी एका जुन्या आठवणीत रममाण झालो .
          २oo४ साली आमचा एक ग्रूप शो मुंबईला नेहरू सेंटरच्या मोठया हॉलमध्ये झाला . प्रदर्शन सुरु झाले संध्याकाळी मला गॅलरीच्या ऑफीसमधून निरोप आला की महाबळेश्वर वरुन तुमच्यासाठी फोन आला आहे .गॅलरीच्या कोपऱ्यातच कॉर्नरला ऑफीस आहे .मी टेलीफोन घेतला .... कोणीतरी वयोवृध्द आवाजात पारशी टोन मध्ये बाई बोलत होत्या. 
" मि . काले मी पेरीन बोलते , मी पण रिटायर हाय ,पण आता महाबलेश्वरमंदी आला हाय , तुझा क्लबमंदी पाठवलेला ब्रोशर मी पाहीला हाय , त्यामंदी एक बोटींचा पेंटींग हाय , " रिटायर्ड " टायटल लिवला हाय त्यो पेंटींग मला हंड्रेड परसेन्ट पाहिजे हाय . त्याला ब्राऊनकलर मंदी फ्रेम कर . मी बॉम्बेला आला की  तवा तुझा पैसा दिल .पक्का प्रॉमिस कर .  माझा नंबर लिव . मी प्रॉमिस करून नंबर लिहून घेतला . आणि फोन बंद झाला .
           प्रदर्शनाची धामधूम संपल्यानंतर निघण्यापूर्वी मी त्या पारशी पेरीन बाईंना फोन केला . त्यांनी सांगितल्या प्रमाणे मंत्रालया शेजारी ' समता ' नावाची पॉश इमारत होती . त्या ठिकाणी पेंटींग व्यवस्थित पॅक करून टॅक्सीने गेलो . नरिमन पॉईंट ,मंत्रालय परिसरात ती इमारत प्रसिद्ध  असल्याने शोधायला जास्त त्रास झाला नाही . इमारत पॉश होती .लिफ्टने पोहचलो आणि घराची बेल वाजविली.
           75 वयाच्या पेरीनबाई टिपीकल स्लीवलेस पारशी फ्रॉक घालून समोरच दरवाजा उघडून उभ्या होत्या .आत गेल्यावर प्रशस्त हॉलमध्ये पारशी सागवानी फर्निचर व सर्व ठिकाणी जाडजूड पुस्तकांची कपाटे . विश्वकोष किंवा वकीलाच्या ऑफिस मध्ये जशी जाडजूड काळ्या रंगाची पुस्तके असतात तशीच  सगळीकडे पुस्तकेच पुस्तके . त्या पुस्तकांच्या भोवती बरोबर मध्यभागी अतिशय व्यवस्थित टाय सुट बुट घातलेले ८० वर्षांचे एक पारशी गृहस्थ बसलेले. अतिशय धारदार नाक , गोरा वर्ण ,उंच , सडपातळ ब्रिटीशां प्रमाणे दिसणारा व शांतपणे शुन्यात नजर लावून बसलेला. मी त्यानां गुडमॉर्निंग  केले , पण काहीच प्रतिक्रिया नाही , हास्य नाही, ओळख नाही, शब्द नाहीत .पेरीनने मला सरळ आत मध्ये येण्यास सांगितले .आतमध्ये सुध्दा सगळीकडेच कपाटांनी भरलेली  पुस्तके व या कपाटांच्या मधोमध एक छोटी जागा मोकळी सोडलेली .व त्याला खिळा सुध्दा मारुन ठेवला होता . ते  'रिटायर्ड 'बोटींचे चित्र तिने तेथे लावायला सांगितले .मी पॅकींग केलेले चित्र काढले व त्या ठिकाणी लावले . ते इतके परफेक्ट बसले की जणू कित्येक वर्ष ती जागा माझ्या  पेंटींगची वाटच पहात होते .
         पैशाचे पाकीट तयारच ठेवले होते . तिने ते माझ्या हातात दिले, डोक्यावर प्रेमाने हात ठेवला . गॉड ब्लेस यू असे म्हटले व शांतपणे बाहेरचा रस्ता दाखवला . बाहेर पडताना मी तिच्याकडे पाहीले तर म्हणाली .........
" माजा हाजबंड हाय ,ते असाच बसते . "
           मी त्या इमारतीतून बाहेर प्रचंड गर्दीत आलो . रस्त्याच्या फूटपाथवरून मी जरी चालत होतो तरी माझ्या मनात असंख्य विचार येत होते . घरात पारशी बाबा टाय बूट घालून का बसत असेल ? असा निर्विकार शांत मनाने तो कसला विचार करत असेल ? त्याला कोणी दुःख दिले असेल का ? काय तरी त्याचे बिनसले असेल किंवा हरविले असेल का ? त्याला कंटाळा येत नसेल का त्या रोजच्या बसण्याचा ? असे दिवसभर एका जागेवर बसून राहायचे म्हणजे अवघड काम ...... माझ्या मनात प्रश्नावर प्रश्न निर्माण होत होते .
             पुढे मी त्यानां विसरून गेलो . चार पाच वर्षानंतर मी पाचगणीत असताना मला अचानक फोन आला . तोच पारशी टोन, 
" मी पेरीन भरूचा बोलते . मी आता महाबळेश्वर क्लब मंदी हाय  तू भेटायला ये, मला तुला काय  तरी दयायचं हाय तू ये .पक्का प्रॉमिस कर . मीही पक्का प्रॉमिस केला व  ठरलेल्या दिवशी मी महाबळेश्वरला गेलो . संध्याकाळी मी तेथे पोहचलो क्लबच्या ऑफीस मध्ये चौकशी केली . उजव्या बाजूलाच थोडया पायऱ्या असलेली छोटी एकसंघ कॉटेजेस आहेत . त्यातील १ नंबरच्या कॉटेज मध्येच पेरीन उभ्या होत्या. बाहेर व्हरांड्यामध्येच आराम खुर्ची होती व त्यामध्ये पारशी बाबा बसलेले . तिच नजर , तेच निर्विकार आंतरळात पहाणे . मी केलेल्या नमस्काराला प्रत्युतर नाही . बोलणे नाही . मी पेरीन कडे पाहीले . तिने न बोलता एक इंग्रजी पुस्तक माझ्या हातावर ठेवले . महाबळेश्वर क्लब व परिसराची माहीती असलेले . महाबळेश्वर क्लब साठी तिने ते स्वतः लिहले होते . 
वुई एंजॉईंग युवर पेटींग मि . काले , वुई बोथ लाईक दॅट पेंटींग  , 
तुझा " रिटायर्ड " टायटल लई आवडला .
 मी आरामखुर्चीकडे पाहीले तर म्हणाली 
" माजा हजबंड हाय , ते असाच बसते . "
टाय, सुट ,बुट कडक पारशी बाबा .निर्विकार ,शांत शुन्यात नजर लावून बसलेला . त्याला पाहिल्यानंतर मी परत प्रश्नांच्या खाईत ... मनात प्रश्नावर प्रश्न निर्माण होत होते . काय शोधत असेल हा माणूस ? का शांतपणे न बोलता शुन्यात हरवलेल्या नजरेने बसत असावा ? 
       मला आठवले ते पेंटींग मी तापोळ्याला गेलो होतो त्यावेळी काढले होते . माझा एक शिक्षक मित्र दीपक चिकणे तेथे रुम घेऊन रहात होता .दिवसभर मी तापोळ्याच्या शिवसागर  बोटींग क्लब व बामणोली परिसरात फिरत होतो संध्याकाळी परतताना थोडया अंतरावर ह्या वापरलेल्या ,टाकून दिलेल्या, निरोपयोगी झालेल्या बोटी पडल्या होत्या . मला त्या चकाचक नव्या बोटींपेक्षा या गंजलेल्या बोटींचेच चित्र काढावेसे वाटले . त्याची झिजलेली लाकडे  ,उडालेला रंग पूर्ण गंजलेले लोखंड यांचा इफेक्ट मिळविण्यात मी बराच यशस्वी झालो होतो व त्याला " रिटायर्ड "नाव देऊन मी ते चित्र ब्रोशरमध्ये छापले होते .
           पुढे एकदा आमच्या मुंबईच्याच पारशी मित्राला मी ही कथा सांगितली . त्यांच्याविषयी विचारले तर म्हणाले , 
"तो पारशी तर सॅम भरुचा . "
दिल्लीच्या  सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश , रिटायर्ड जज्ज . तो खूप मोठा माणूस  , ऑप्टीमॅस्टीक अॅन्ड व्हेरी व्हेरी टॅलेंटेड मॅन ,अॅन्ड ही वॉज व्हेरी पॉवरफूल मॅन , व्हेरी स्ट्रीक्ट जज्ज .  यु आर लकी दॅट युवर ओन्ली पेंटींग इन हीज हाऊस .
         आणि अचानक मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली . माझे रिटायर्ड नावाचे पेंटीग त्यांनी का घेतले असावे त्याचे कोडेही अचानकपणे सुटले .
          त्या दुर्लक्षित, गंजलेल्या,  लाकुड सडलेल्या निरोपयोगी बोटी पूर्वी किती छान  दिसत असतील ? किती  पर्यटकांनीं या बोटीवर व शिवसागर क्लबमध्ये असताना मस्ती , मजा अनुभवली असेल . रुबाब असेल या बोटींचा त्यावेळी मालक त्यांची मन लावून काळजी घेत असणार . आणि आता गरज संपल्यावर त्या एका कोपऱ्यात टाकून दिलेल्या असाव्यात .दुर लोटलेल्या दुर्लक्षित केलल्या ,अडवळणी  कोनाड्यात लांब ,विषन्नपणे तुटलेल्या अवस्थेत त्या आता पडलेल्या आहेत , कदाचित आता अखेरचा श्वास मोजत पडलेल्या या त्याच बोटी त्यांच्याकडे आता कोणीच लक्ष देत नाहीत ..........
            अचानक मला सुपरस्टार राजेश खन्नाचे अखेरच्या दिवसात केलेले एक भाषण आठवले . त्यावेळी त्याने साहीरचा एक शेर म्हटला होता तो शेर असा होता , " इज्जते , शोहरते , उल्फते , चाहते सब कुछ इस दुनिया में रहता नही . आज मै हू जहाँ कल कोई और था , ये भी एक दौर है ...... वो भी एक दौर था " .
           जस्टीज सॅम भरुचा देखील कदाचित त्यांचा पूर्वीचा रुबाबदार , उच्चत्तम पदावरचा व्यतित केलेला काळ आठवत असेच खूप गुढपणे शांत बसत असावेत . दूर अंतराळात , निर्विकार चेहऱ्याने ,  आठवणी काढत,  आठवणींचे गाठोडे सोडत बसलेले असावेत,
त्या " रिटायर्ड " बोटीप्रमाणे स्वतःच्याच एका भूतकाळातील  अनोळखी विश्वात..........

सुनिल काळे ( ९४२३९६६४८६ )

आमीरचे लग्न आणि माझे चित्रप्रदर्शन

*आमीरचे लग्न आणि माझे चित्रप्रदर्शन*      🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨

          बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना ! 
असं एक वाक्य मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण त्याचा जीवनात कधी प्रत्यक्ष अनुभव येईल असे मला कधीच वाटले नाही. पण एक दिवस असा आला की तो माझ्या कायम स्मरणात राहीला. चला तर मग आज खूप दिवसांनी निवांतपणे तुमच्याशी गप्पा मारत हा मजेशीर अनुभवच शेअर करतो.
           28/12/2005 ही तारीख आजही माझ्या चांगलीच लक्षात आहे . ही तारीख आहे पाचगणीत प्रसिद्ध अभिनेता आमीर खान व किरण राव यांच्या लग्नाची. मला या लग्नाचे निमंत्रणही नव्हते, किंवा माझा दुरान्वये त्यांच्यापैकी कोणाचा संबधही नव्हता. पण तरीही हे लग्न माझ्या आयुष्यात एक महत्वाचा प्रसंग म्हणून लक्षात आहे . का ? कसे ? सांगतो तुम्हाला......
                सन 2001 ते 2004 पर्यंत मी पाचगणीच्या सेंट पीटर्स या ब्रिटीशकालीन बोर्डींग स्कूलमध्ये आर्ट टिचर म्हणून काम करत होतो. त्रेपन्न एकराचा सुंदर परिसर, त्यामध्ये खेळाची मोठी मैदाने, सुंदर ब्रिटीश आर्कीटेक्चरच्या इमारती, नीटनेटकी फुलांची गार्डन्स, भरपूर वृक्षराई , शांतता,अशा फ्लोरा हाऊसच्या परिसरात शाळेने मला एक छोटे कॉटेज राहण्यासाठी दिले होते. सकाळचा नाश्ता, दोन्ही वेळेचे जेवण, लाईट, पाणी, घरभाडे नाही अशा खूप सुखसुविधा दिल्या होत्या.शिवाय रोज सकाळी टाय, बुट,कोट असा कडक ड्रेसकोड घालून दिवसभर शाळेत मिरवायचे असायचे. शिवाय माझ्याकडे चारचाकी गाडी होती. मोठा रुबाब असायचा त्याकाळात. शिवाय मी परमनंट झालो होतो. आयुष्यात रिटायर्ड होईपर्यंत मला चिंता नव्हती. पण अशा सगळ्या सुखसुविधा असूनही मी प्रचंड अस्वस्थ होतो, असमाधानी होतो, अतृप्त होतो. कारण की मी निसर्गचित्रकार होतो. आणि मला चित्र काढायला अजिबात वेळ नव्हता.
               मी खुप संघर्ष करून घरादाराचा त्याग करून चित्रकलेच्या कॉलेजला गेलो होतो. अनेक प्रदर्शने केली होती. खूप पैसे मिळत नसले तरी चित्रकलेच्या रोज संपर्कात होतो. स्केचिंगचा रियाझ करायचो, आनंदी असायचो. सेंट पीटर्सची मात्र रोजची सकाळपासून मिनिट टू मिनिट वर्षभराची आखणी असायची. आठवड्यातून सुट्टी कधीतरीच आणि रविवारीही कधी M.O.D म्हणजे मास्टर ऑन ड्युटी किंवा चर्चची ड्युटी असायची. माझी स्वतःची चित्रकला सोडून शाळेमध्ये सतत रोजचा भरगच्च कार्यक्रम असायचा. मी रोज त्याच त्या मशीनसारख्या रूटीनला प्रचंड कंटाळलो होतो. मला स्वतःची चित्रकला करता येत नसल्याने मी मानसिकरित्या आतल्या आत घुसमटत होतो.आणि एक दिवस मी या सगळ्या चांगल्या रुटिनच्या सुखाच्या जगण्याचा राजीनामा देऊन अंत करायचा असा अंतिम निर्णय घेतला आणि काही दिवसानंतर मी रूटीन शाळेतून कायमचा मुक्त झालो.
            माझे नवे घर झाले आणि मी परत निसर्गाच्या कुशीत भरपूर चित्र काढत सुटलो. एखाद्या डांबून ठेवलेल्या कैद्याला खूप दिवसानंतर जसे स्वतंत्र मिळाल्याचा भरघोस आनंद मिळतो तसेच मला वाटायचे. त्या संपूर्ण वर्षात मी परिसरातील भरपूर निसर्गचित्रे रेखाटली.
               वाईवरून पाचगणीत प्रवेश करताना दांडेघर जकातनाक्या शेजारी (Ravine Hotel) रवाईन हॉटेलचा बोर्ड दिसतो. पाचगणीतील हे सर्वात मोठे व कृष्णा व्हॅलीचा सुंदर देखावा असणारे प्रसिद्ध स्टार हॉटेल आहे.पाचगणीच्या परिसरात ज्यावेळी शुटींग असतात ,त्यावेळी सगळे मोठे स्टार नायक, नायिका, नेते, मोठे उद्योगपती, श्रीमंत पालक येथेच मुक्कामी असतात. अतिशय भव्य व सुंदर लोकेशन, सर्व अत्याधुनिक सुविधा असल्याने तेथे नेहमीच मोठी गर्दी असते. या हॉटेलच्या मालकीणबाई 
सौ.बिस्मिल्ला सुनेसरा मॅडम या अतिशय कल्पक, कष्टाळू, आणि कलासक्त मनोवृत्तीच्या आहेत. त्या स्वतः हौशी कॉपी पेटींग करत असतात. त्यांची माझी ओळख होतीच. माझी वॉटरकलरमधील व स्वातीची ऑईल कलरमधील थोडीफार चित्रे त्यांच्याकडे हॉटेलमध्ये विक्रीसाठी ठेवली होती.
              एकदा बिस्मिल्ला मॅडमने सांगितले की प्रसिद्ध अभिनेता आमीर खानचे लग्न पाचगणीत आहे. अनेक मोठी नेते मंडळी, अभिनेते, प्रसिद्ध लोक येणार आहेत, त्यांचे सर्व हॉटेल तीन चार दिवसांसाठी आमीरने बुक केले आहे. कदाचित आमीर येथेच मुक्कामी असेल तर तू एका मोठया चित्रप्रदर्शनाचे आयोजन कर म्हणजे त्याची सगळी पाहुणे मंडळी चित्रप्रदर्शन पाहायला येतील. ही खूप चांगली संधी होती. मलाही ही कल्पना खूप आवडली कारण मला हॉलचे भाडे दयायचे नव्हते. शिवाय तळघरातील एक मोठा जीमचा हॉल मला लाईटच्या सुविधेसह उपलब्ध होत होता. आठ दिवसांचा वेळ होता आणि आमच्याकडे चित्रकामही तयार होते.
            माझ्याकडे चित्र डिस्प्ले करण्याचे स्टॅन्ड, आणि ईझल्स होते. त्या लोखंडी स्टॅन्डसला,ईझल्सना मी ऑईलपेंट मारुन चकाचक केले. चित्रानां नवीन फ्रेम्स , माऊंटींग तयार केले , काही आमंत्रण पत्रिका तयार केल्या.मी स्वतः सुंदर कॅलिग्राफी करून आमीरसाठी खास निमंत्रण पत्रिका तयार केली.रवाईन हॉटेलला रोषणाई केली गेली होती. आमीर खानच्या लग्नाची बातमी पाचगणीत पोहचली होती. शिवाय डिसेंबरचा शेवटचा आठवडा असल्याने पाचगणीत सिझन होता, पर्यटकांना उत्साहाने बहर आलेलाच होता. एकंदर प्रदर्शनाची जय्यत तयारी करून आम्ही लग्न दिवसाची वाट पहात होतो.
           आमीर खान, लगानची पूर्ण टीम, अनेक हिरो, हिरॉईन्स, दिग्दर्शक, क्रिकेटर्स, संगीतकार, निर्माते पाचगणीत दाखल होवू लागले. सर्व हॉटेल्स भरली गेली, अनेक टि.व्ही वाहिन्यांच्या मोठया गाडया ,पत्रकार, र्इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे प्रतिनिधी सर्वत्र बातम्यांसाठी फिरताना दिसू लागले. अनेक मोठ्या हॉटेल्समध्ये पाहुण्यांची लगबग दिसू लागली, पाचगणी लोकल माणसांनी, पर्यटकांनी, उत्साहाने व स्टार व्हराडी मंडळीमुळे पूर्णपणे भरून गेली.
           आमीरचे लग्न ' मेहेरभाई हाऊस ' या बंगल्यात होणार होते आणि काही कार्यक्रम इल पलाझो या हॉटेलमध्ये आयोजित केले गेले होते. मला आमीरला भेटून निमंत्रणपत्रिका दयायची होती पण मी त्याला कॉन्टॅक्ट कसा करणार याचे अगोदरपासून काहीच नियोजन नव्हते. लग्नाला आत फक्त एकच दिवसच उरला होता आणि मी खूपच अस्वस्थ झालो होतो. त्याच वेळी सकाळी मला बिस्मिल्ला मॅडमचा फोन आला की आज संध्याकाळी आमीर रवाईन हॉटेलच्या टेनिस कोर्टवर लगानच्या सर्व मित्रांसोबत खेळायला येणार आहे. खेळ संपल्यानंतर तू भेट व प्रदर्शनाची निमंत्रण पत्रिका दे. हे ऐकल्यावर मलाही उत्साह आला आणि मी तेथे जाण्याचे निश्चित केले.
              त्या संध्याकाळी टेनिस कोर्टवर प्रचंड बंदोबस्त होता. अनेक पोलीस व प्रायव्हेट बॉडीगार्डस सगळीकडे दिसत होते. अमीर एका इनोव्हा गाडीतून आल्याचे मी पाहीले. त्याच्या सोबत अनेक प्रसिद्ध मंडळी होती.टेनिसचा खेळ संपल्यानंतर आमीर याच गाडीने परत जाणार आहे याची खात्री मी करून घेतली. 
आणि मी गाडीच्या जवळच थांबण्याचे ठरवले. 
            इकडे स्टार मंडळीचा टेनिस खेळ खूप रंगात आला होता. हॉटलमध्ये राहणारे सर्वजणच त्याच्या खेळात सामील झाले होते. खेळ संपताक्षणीच आमीरभोवती फोटो काढणाऱ्यांची गर्दी वाढू लागली, फोटो काढत सर्वानां हात हालवत, ओळखीच्या सर्वांना नमस्कार करत सहा मजबूत बॉडीगार्डसच्या पहाऱ्यात तो आपल्या गाडीकडे येत होता. आता एक दोन मिनिटात त्याच्या गाडीचा दरवाजा उघडला गेला तो गाडीत बसण्यापूर्वीच मी अत्यंत वेगाने गाडीकडे धावलो. मी अचानक पुढे मुसंडी मारल्याने क्षणभर बॉडीगार्डस गांगरले व त्या सर्वांनी मला आडवले. आमीर नुकताच टेनिस खेळून आल्यामूळे कपाळावरील घामाच्या धारा पुसत होता. मी माझ्या हातातले मोठे निमंत्रण पत्रिकेचे पाकीट, माझे चित्रप्रदर्शनाचे जुने कॅटलॉग त्याच्या हातात दिले.आमीरने बॉडीगार्डसनां थांबण्याचा इशारा केला व मला शांतपणे विचारले,
"क्या काम है " ? क्या है इस पॅकटमें ?
मी हातातील पत्रिका पेस्ट केली नव्हतीच, ती पत्रिका त्याने उघडली तोपर्यंत मी बोलायला सुरुवात केली. 
"तुम्हारे शादी के वास्ते हम लोगोने एक पंचगनीके पेटींगका एक बडा एक्झिबिशन रवाईन हॉटेलमें रखा है ! कृपया कल आप आके उसका ओपनिंग करो, ऐसा मै चाहता हूँ . असं एका दमात सगळे सांगितले.
'' कब है ये एक्झिबिशन " ? आमीरने विचारले .
" कल सुबह दस बजे " , मी उत्साहाने सांगितले .
कल तो मेरी शादी है I आमीरने हसतच सांगितले. 
"अच्छा ये बताओ , तुम्हारी शादी हो गयी है " ? आमीरने पुन्हा विचारले .
हाँ , हो गयी है I मी सांगितले .
तो फिर ये बताओ की " तुम मेरी जगह होते तो शादी अॅटेन्ड करोगे की आर्ट एक्झिबिशनके ओपनिंग करोगे " ? आमीरने विचारले.
मै मेरी शादी अॅटेन्ड करुँगा I मी भोळसटपणे खाली मान घालून उत्तर दिले.
त्याबरोबर त्याच्या तोंडावर ते प्रसिध्द स्मितहास्य उमटले. आणि माझा हात हातात घेत शेकहँन्ड करून आमीरची स्वारी इनोव्हामध्ये बसली. 
"कॅन आय टेक धिस इन्व्हीटेशन 
कार्ड विथ मी " ? आमीरने विचारले.
मी Yes म्हणालो.
Thank you ,for your honest Answer.

      बॉडीगार्डसनी लगेच सर्व गर्दी हटवली, व सर्वांना हात हलवत आमीरची गाडी दिसेनाशी झाली.
          आपण किती मुर्ख आहोत, या विचाराने मी खजील झालो. एवढी साधी गोष्ट माझ्या लक्षात का आली नाही याची मलाच लाज वाटली.आपल्या सारख्या एखाद्या साध्या माणसाचे लग्न असेल तरी तो लग्नाच्या दिवशी किती व्यस्त असेल, तो इतर गोष्टींकडे लक्ष न देता लग्न कार्यक्रमात व्यस्त असेल. आणि आमीर खान तर सेलेब्रिटी आहे. अशा अचानक ठरवलेल्या कार्यक्रमास त्याने नकार दिला तर त्याचे काय चुकले. अशी मनाचीच समजूत घालत मी माझ्या लग्नाच्या आठवणीत भूतकाळात रमत घरी गेलो.
              दुसऱ्या दिवशी आमीर खान किंवा कोणीच आपल्या प्रदर्शनाला येणार नाही असे मनाला ठामपणे वाटले, मी हॉटेलमध्ये त्या प्रदर्शनाच्या तळघरातील हॉलमध्ये एकटाच निवांतपणे पुस्तक वाचत बसलो होतो.
साधारणपणे दुपारी एकच्या सुमारास टाय घातलेला, शर्ट इन केलेला हातात एक ब्रीफकेस घेतलेला स्मार्ट तरुण माणूस प्रदर्शनाच्या हॉलमध्ये आला.
"माझे नाव आशिष थरथरे, मी आमीर खानचा पर्सनल मॅनेजर आहे. चित्रकार सुनील काळे आपणच का " ?
मी हो म्हणालो, आणि त्याला बसायला खुर्ची दिली.
आमीर खान यांनी प्रदर्शनाला येऊ शकणार नाही अशी दिलगीरी व्यक्त केली आहे आणि त्यांनी हा निरोप मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटून द्यायला सांगितला आहे.
मी देखील आमीरचे बरोबर आहे..... मीच ह्या प्रदर्शनाचे आयोजन लग्नाच्या दिवशी करण्याची मोठी चुक केली असे त्यानां सांगितले.
नाही ,नाही असे काही नाही उलट तुम्ही खूप छान काम केले आहे. फक्त ते स्वतः येथे येऊ शकत नाही हे त्यांनी दुःखाने सांगितले आहे. त्यांनी तुमची ब्रोशर्स, आमंत्रण पत्रिका पाहीली त्यातील चित्रे त्यानां आवडली आहेत. उलट त्यांनीच एक विनंती केली आहे ती सांगण्यासाठीच मी येथे आलो आहे. तुमच्या या प्रदर्शनात खूप गेस्ट येणार आहेत त्यानां चित्रे आवडली तर ते जरूर विकत घेतील, फक्त तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊ नका. तुमची जी काही रक्कम होईल ती सर्व टोटल रक्कम आमीर खान यांच्याकडून दिली जाईल. कृपया ही विनंती मान्य करावी...... असे बोलून आशिष प्रदर्शन पाहून निघून गेला.
              आता मात्र मी थक्क होण्याची वेळ माझी होती.एका अनोळख्या गावी ,लग्नाच्या दिवशी, अनोळखी कलाकाराने न सांगता चित्रप्रदर्शन भरवले होते आणि त्याची योग्य ती दखल आमीरने निरोप पाठवून स्वतः घेतली होती त्याच्या मनात आले असते तर त्याने माझे कार्ड फेकूनही दिले असते. उलट हा एका परफेकशनिस्टचा मला खरा अनुभव आला होता.
            सकाळी लग्नाचा कार्यक्रम, जेवणाचा कार्यक्रम संपला होता. प्रसिध्द वऱ्हाडी मंडळीची धावपळ ये जा सुरु होती आणि संध्याकाळी रिकाम्या वेळी माझ्या प्रदर्शनाला अचानक गर्दी उसळली आणि ज्यानां मी पाहीले त्यानां पाहून मी मनाने फार फार भारावून गेलो. आजही हे सर्व लिहताना मी तोच अनुभव पुन्हा घेत आहे.
              खरं सांगायचे तर त्यावेळी मी आमीर खानचा खूप मोठा फॅन नव्हतो, त्याचे सगळे चित्रपटही मी पाहीलेले नव्हते. मी त्याचा फक्त लगान आणि सत्यजित भटकळ यांची " मेकींग ऑफ लगान " ही फिल्म पाहीली होती. आणि आज या प्रदर्शनात ते सर्व देशी, परदेशी , सर्व छोटे,मोठे अभिनेते माझी चित्रे पाहत होते. लगानची क्रिकेट टिम आलेली होतीच पण क्रिकेट जगतात खेळणारी दिग्गज मंडळी मी प्रत्यक्ष पहात होतो. अनेक प्रसिद्ध दिग्दर्शक , नायक, नायिका, संगीतकार, वादक, चरित्र अभिनेते, विनोदी अभिनेते, खलनायक, गायक, ज्यानां मी फक्त टेलिव्हिजनवरच पहात होतो ती मी प्रत्यक्ष डोळ्यांसमोर पहात होतो. आणि माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. त्या सर्वांची नावे लिहीत बसलो तर सगळी चित्रपटसृष्टीचीच पुनरावृत्ती होईल. तो एक भारी, संवेदनामय, अविस्मरणीय सुखद लक्षात राहण्यासारखा अनुभव होता.
           त्या गर्दीमध्येच एक बॉबकट केलेली मध्यम उंचीची अनोळखी स्त्री आली. मी आमीरला दिलेली निमंत्रणपत्रिका तिच्या हातात होती. तिने तिचे नाव नुझत खान असे सांगितले. तिच्या सोबत आणखी एक काळा शर्ट घातलेला गृहस्थ होता. त्याने त्याचे नाव मन्सुरअली खान असे सांगितले. अतिशय काळजीपूर्वक , मन:पूर्वक तो प्रत्येक चित्र बघत होता. सर्व प्रदर्शन पाहील्यानंतर काही चित्रे त्यानां आवडली होती ती सिलेक्ट केल्यावर त्याने एक मोठा गमतीशीर प्रश्न विचारला. सर्वात जुनी, कधीही प्रदर्शित केली नाहीत अशी काही चित्रे आहेत का ? मी म्हणालो खूप आहेत चित्रांचा गट्टाच आहे माझ्याकडे. त्याने त्याचे कार्ड दिले व दुसऱ्या दिवशी मला सर्वात जुनी चित्रे घेऊन 
इल पलाझो हॉटेलमध्ये येण्यास सांगितले. 
अशा अद्भूत वातावरणातील तो दिवस संपला.
           दुसऱ्या दिवशी माझ्या स्टुडीओतला जुन्या चित्रांचा गट्टा घेऊन मी इल पलाझो हॉटेलवर पोहचलो. इकडे प्रदर्शनाच्या हॉलवर स्वाती थांबली. मन्सुरअली खानने त्याची बायको टिनाची ओळख करून दिली. तेवढ्यात नुझत खान आली व त्यांनी जुन्या चित्रांवर झडपच मारली. दोघेजण फारच भारावून गेले होते. त्यानां जे जुन्या पाचगणीची चित्रे आपेक्षित होती ती त्यानां मिळाली होती. मग त्यांनीच सांगितले की ते प्रसिद्ध दिग्दर्शक व चित्रपट निर्माते नासीर हुसेन यांची मुले आहेत व आमीर हा ताहीर हुसेन यांचा मुलगा असून त्यांचा सख्खा चुलत भाऊ आहे. नुझतचा मुलगा इम्रानखान हिरो आहे . यादों की बारात, कारवाँ , आणि बरेच चित्रपट पाचगणीत शुटींग करताना ते लहानपणापासून नेहमी येथे येत असत. सर्व खान बंधू पाचगणी परिसराचे खूप चाहते आहेत. माझी बरीच चित्रे त्यांनी घेतली. इकडे दुसऱ्या हॉलमध्ये आमीरच्या लग्नाचा मोठा केक कापण्याचा कार्यक्रम सुरु होता. आणि येथे मी माझी जुनी चित्रे विकण्याच्या कार्यक्रमात मग्न होतो.
            नंतर रवाईन हॉटेलच्या हॉलवर आल्यावर दोन खास कुटुंबाची ओळख झाली, एक होता अमीन हाजी ( लगान टिमचा मुका ढोलके पटटू ) आणि त्याची ब्रिटीश पत्नी शॅलोट. दुसरे शॅलोटचे ब्रिटीश आईवडील श्री .व सौ .कोलस 
( Mr. & Mrs.Coles). त्यांनीही काही चित्रे घेतली. 
          अमीन हाजी आता पाचगणीतच स्थायिक झाला असून तो पाचगणीकरांचा गळ्यातील ताईत झाला आहे. अनेक स्थानिक उपक्रमांमध्ये तो सक्रीय असतो व तो आमचा चांगला मित्र झाला आहे .
            नंतर मला लेखिका शर्मिला फडके यांच्या एका लोकमतच्या लेखातून मन्सुरअली खान हे व्यक्तिमत्व काय आहे हे कळाले.
आमीरचा कयामतसे कयामत तक, जो जिता वही सिकंदर इ. गाजलेल्या चित्रपटांचा तो दिग्दर्शक होता. आणि आता तो उटीजवळ कण्णूर येथे शेती करत आहे .
            आमीरच्या लग्नानंतर सर्व धावपळ संपल्यानंतर मॅनेजर आशिष थरथरे यांनी सर्व घेतलेल्या चित्रांची रक्कम रोख दिली, आभार मानले व मला एक माझ्या आवडीचे चित्र आमीर खानसाठी मागितले. मीही टेबललॅन्ड, एम.आर.ए सेटंर, सिडने पॉईंटचे एकत्रित चित्रण असलेले एक माझ्या आवडत्या स्पॉटचे जलरंगातील चित्र दिले. दुसऱ्या दिवशी आमीरच्या सहीचा 
एकोण चाळीस हजाराचा चेक व त्याची रंगीत झेरॉक्सप्रत आली. चेक बँकेत जमा केला आणि झेरॉक्स आठवण म्हणून आजही माझ्याकडे आहे .
         तर असा हा भन्नाट अनुभव '
         बेगानी शादीमें अब्दूल्ला दिवाना............. 
या म्हणीचे प्रॅक्टीकल प्रत्यंतर देणारा ठरला.
            या अनुभवाचे विश्लेषण ज्यावेळी मी करतो त्यावेळी मला आमीरच्या 
दूरदृष्टीचा , कलावंताची जाण ठेवण्याच्या संवेदनाशील वृत्तीचा प्रॅक्टीकल अनुभव आला . म्हणूनच त्याला परफेक्शनीस्ट का म्हणतात हेही मला उदाहरणासह पटले. २००५ नंतरचे त्याचे सर्व चित्रपट  मंगल पांडे, दंगल, गजनी, 
तारे जमीन पर, सिक्रेट सुपरस्टार , पीके,
 थ्री इडिएटस, धूम ३.   इ. चित्रपट मी मुद्दाम पाहीले व त्याची भूमिका, त्यासाठी अफाट मेहनत करण्याची त्याची वृत्ती, त्याचा अभिनय, त्याचे दिग्दर्शन कौशल्य, त्याच्या चित्रपटाचे मार्केटींग, त्याच्या चित्रपटांची गाणी, कथेचे सादरीकरण मला भावते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण करत असलेल्या सर्व कामावर मनापासून प्रेम करणे, त्या कामासाठी दिवस रात्र ध्यास घेऊन ते सर्व अंगाने परिपूर्ण होईल याचा जीवघेणा ध्यास घेणे, आंतरीक, मानसिक, शारिरीक सर्व उर्जा पूर्णपणे झोकून देऊन मनःपूर्वक काम करणे, प्रत्येक गोष्ट जास्तीत जास्त परफेक्ट करण्यावर त्याचा भर असतो, व ही गोष्ट आपल्या सर्वांना देखील प्रत्यक्ष जीवनात प्रत्येक क्षेत्रात खरोखरच प्रेरणादायक आहे . त्याचे मराठी शिकणे, सामाजिक सत्यमेव जयतेसारखे टी व्हीवरचे कार्यक्रम, पाणी फौडेंशन सारखे सामाजिक भान असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत . दंगल सारख्या चित्रपटात बापाच्या भुमिकेसाठी स्वतःचे भरमसाठ वजन वाढवून परत ते शरीर व्यायामाने पूर्ववत आणणे मला तरी खूप आश्चर्यकारक वाटते. 
         आणखी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले महानपण बाजूला ठेवून  कोणत्याही क्षेत्रातील छोट्या कलावंताचाही त्यानां लक्षात ठेवून मनापासून आदर करणे ,त्यानां मदत करणे त्यांचा सन्मान करणे हा मला मोठा गुण वाटतो. कारण काही कलाकार जरा मोठे झाले, प्रसिध्द झाले की की लहान कलाकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. कधीकधी तर ओळखही दाखवत नाहीत
          आणि आता तर तो "मेहरभाई हाऊस " या अप्रतिम ब्रिटीशकालीन बंगल्याचा मालक  व पाचगणीकर झाला आहे. 

या मेहरभाई हाऊसच्या माझ्या व्यक्तिगत खूपच आठवणी आहेत.
त्या लिहीन मी नंतर कधीतरी निवांतपणे...............
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
सुनील काळे
9423966486
sunilkaleartist@gmail.com

स्टेशन

स्टेशन

            आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अपघाताने सगळ्यानांच कधी ना कधी जखम होते, छोटया मोठया जखमा तर रोजच्या जगण्यात सतत होत असतात .
पण मित्र, मैत्रीणीनों सगळ्यांच्या जखमा सारख्या नसतात, प्रत्येकाची जखम खूप वेगवेगळी असते. काही जणांच्या जखमा खूप वरवरच्या असतात तर काही जणांच्या जखमा आयुष्यभर खूप खोलवर रुतून त्यानां बेचिराख करून टाकतात,
त्या खोलवर गेलेल्या जखमा कधीही भरून येत नाहीत आणि बऱ्या झाल्यासारख्या दिसल्या तरी त्यांचे व्रण व आघात कायम मनात राहतात कधीही भरून न येण्यासाठी...............

             आज तुम्हा सर्वांना अशीच कधीही भरून न आलेल्या आणि मोठा आघात झालेल्या जखमेविषयीची आठवण सांगणार आहे, त्या घटनेमुळे मी, माझी विचारसरणी, माझी रोजच्या जगण्याची पध्दत, तीनशेसाठ डीग्रीमध्ये फिरली.
 
             ही घटना १९९९ सालातील आहे.
संध्याकाळचे चार वाजत आलेले होते, सीएसटी टर्मिनस मधून निघणारी प्रगति एक्सप्रेस पकडण्यासाठी आम्ही आमच्या बॅगा घेऊन मोठ्या प्रयासाने स्टेशनवर धावपळ करत आलो . आज नेहमीसारखी गर्दी नव्हती कारण कोणत्या तरी जंयतीच्या सुट्टीमूळे पुणे मुंबई अपडाऊन करणारी नेहमीची मंडळी गैरहजर होती.एका बऱ्यापैकी रिकामा असलेल्या डब्यात आम्ही जागा मिळवली आणि स्थिरावलो . मी आणि स्वाती पुण्याच्या प्रवासासाठी निघालो होतो.

             एक महिन्यापूर्वीच पाचगणीतील मॅप्रोगार्डन येथील चित्रांची पावसामूळे धुळधाण झाली होती. पाचगणीत पावसाचे दिवस सुरु झाले होते आणि माझ्याकडे जगण्यासाठीचे सर्व मार्ग संपले होते. थरथरत्या हाताने जीवापाड प्रेमाने काढलेल्या दोनशेपेक्षा जास्त चित्रांना मुठमाती देऊन मी आता कायमचा पाचगणीला रामराम करुन नालासोपारा येथे आलो होतो. तेथे माझे घर होते .

             आणि मनात नव्या स्वप्नांची, नव्या आशेची, प्रगतीची आस घेऊन मुंबई स्वप्ननगरीत दाखल झालो होतो.
 
            एकदा मी, स्वाती व आमची मुलगी दिशा जहांगीर आर्ट गॅलरीला प्रदर्शन पाहायला गेलो होतो . जहांगीर आर्टच्या प्रमुख मेनन मॅडमने मला पाहताच झापले.... .........मि. सुनील काले, आपको चार लेटर भेजा है I दो दिन के अंदर गॅलरी का पैसा भरो, नही तो गॅलरी बुकींग कॅन्सल हो जाएगा l
            गॅलरीला लागणारे पैसे माझ्या पाचगणीच्या अकाऊंटमध्ये होते त्यामूळे जहाँगीर बुक करणे मला अतिशय महत्वाचे आहे हे माझ्या लक्षात आले. आणि त्याच दिवशी बॉम्बे आर्ट सोसायटीचे पदांचे इलेक्शन असल्याने बरेच पुण्याचे चित्रकार, प्राध्यापक वोटींगसाठी स्वतंत्र बस घेऊन एकत्रितपणे आले होते. माझे अभिनवचे प्रा. मिलिंद फडके यानी सांगितले जर तुला पाचगणीला जायचे असेल तर आमच्याबरोबर पुण्याला चल आणि रात्री कोणाकडे तरी मुक्काम कर दुसऱ्या दिवशी बँकेतून पैसे काढ आणि लगेच परत ये..... एक दिवसाचा तर प्रश्न होता...... म्हनून मी त्यांच्या बरोबर पुण्याला जायचे नक्की केले, आणि स्वाती व दिशा नालासोपाऱ्याला घरी गेल्या.

           त्या रात्री पुण्यात मी श्रीकांत कदम , सतिश काळे या चित्रकार मित्रांच्या खोलीमध्ये झोपलो.

                 सकाळी लवकरच एसटीने मी पाचगणीत पोहचलो आणि दहा वाजता बँकेत जाण्यापूर्वीच फोन आला ताबडतोब परत निघा ,कारण तुमची मुलगी या जगात नाही ,ती आता मेली आहे........ ती आता मेली आहे ............हा एकच शब्द माझ्या डोक्यात घुमत राहीला

              मी काहीही विचार न करता  तत्काळ परतीचा प्रवास सुरु केला . त्या काळात माझ्याकडे मोबाईल नव्हता.
आयुष्यातील सर्वात बेकार, कठीण आणि अवघड, असहाय्यपणे केलेला तो प्रवास आणि मनाची उलाघाल करणारा तो प्रवास कधी आठवला तरी आजही मी प्रचंड अस्वस्थ होतो.......

          रात्री खूप उशीरा घरी पोहचलो तर दिशाचे इवलेसे पार्थीव पांढऱ्या शुभ्र चादरीत गुंडाळलेले होते आणि दिवसभर प्रचंड आकांत,रुडून आंक्रदून मलूल पडलेली स्वाती............. 
खूप मोठ्याने आरडलो...... मनाचा दुःखाचा बांध कधीच फुटून गेला. फार फार म्हणजे फारच विस्कटलो होतो मी.
  
             11 सप्टें .1999 ची ती काळरात्र माझ्या कायम लक्षात राहीली, आयुष्यभरासाठी मोठी जखम करून गेली .त्याच रात्री साताऱ्यामध्ये उदयन महाराजांचे लेवे प्रकरण झाले आणि त्याचे पडसाद सगळीकडे महाराष्ट्रभर उमटले होते. त्याच दिवशी नालासोपारा येथे इलेक्शन होते. सगळीकडे इलेक्शन मूळे धावपळीचे ,गडबडीचे वातावरण होते. आणि निसर्गही खूपच कोपला होता, प्रचंड वादळी धुवाधार धो धो पाऊस पडत होता,नालासोपारा स्टेशन परिसरात प्रचंड पाणी साठले होते, रेल्वे उशीरा धावत होत्या, एकदंर आकाशातील बापाने माझी सगळीकडे व्यवस्थित प्लॅनिंग करून नाकाबंदी केली होती.

            दुसऱ्या दिवशी तिचे दफन करायचे होते व त्यासाठी खड्डा काढायचा होता. माझे फार मित्र नालासोपाऱ्यात नव्हते. शेवटी शोधत राहील्यामुळे एक खड्डा खोदणारा म्हातारा माणूस मिळाला पण त्याचा जोडीदार नव्हता म्हणून तो तयारच होत नव्हता मग मी त्याच्या सोबत यायला तयार झालो. 
             रात्री एक वाजता मी    नालासोपाऱ्याच्या स्मशानभुमीत गेलो आणि माझ्या मुलीचा अत्यंविधीचा खड्डा खोदायला सुरुवात केली......... त्या मजूराला अशा कामाची सवय होती पण मी मात्र भावनाविवश होऊन डोळ्यांतील अश्रूच्या धारा वहात असताना कुदळ व फावडे घेऊन हाताला घट्टे पाडत, माती उपसत त्याला मदत करत होतो . तो मला मदत करत होता का मी त्याला मदत करत होतो हेच कळत नव्हते......... त्या रात्री मी जराही झोपलोच नाही............. दुसऱ्या दिवशी काही नातेवाईक आणि . विजय आचरेकर, रवि मंडलीक, 
अनंत निकम या मित्रांसोबत स्मशानभुमीत गेलो. स्वातीची शारिरीक व मानसिक अवस्था बिघडल्यामुळे ती आली नाही.

             स्मशानभूमीत मात्र तो एवढासा जीव, चार वर्ष जीवापाड सांभाळलेला एक गोंडस आत्मा माझ्या पासून कायमचा दूर जाणार होता आणि मी प्रचंड आवेगाने ओरडू लागलो, मला माझे दुःख अनावर झाले. माझे हृदयाचे तुकडे तुकडे झाले, मी बेभान झालो, भावनांचे लोट वारंवांर उसळी मारु लागले .सीतामाईने धरती मातेला जसे पोटात घेतले तसे मी आंक्रदून ,आक्रंदून मला पोटात घेण्याची वारंवांर विनंती करत होतो......... मी मनातल्या मनात मानसिकदृष्टया, शारिरिकदृष्टया पूर्णपणे उध्वस्त झालो होतो. मनाच्या छोट्या छोट्या असंख्य ठिकऱ्या उडाल्या होत्या.त्या दिवशी मी शेवटचा खरा रडलो....... त्या दिवशी पोटभर रडलो. माझा मीच मला सावरण्याचा खूप प्रयत्न केला.............. मी आजही सावरण्याचा प्रयत्न करतो............. पण खरं सांगतो मनातून कधी मी सावरलोच नाही. पण धाय मोकलून रडत ही नाही.

           दिशाला थोडा ताप आहे असे स्वातीला वाटले.आमच्या पार्क व्हयू अपार्टमेंट समोरच डॉ . सदानंद खोपकर यांचा दवाखाना होता आणि आजही आहे. तेथे चालत स्वाती व दिशा गेली. डॉ. खोपकरने तिला तपासले व जवळच असलेल्या भवानी मेडीकल्समधून इंजेक्शन आणायला सांगितले. प्रिस्क्रीपशनप्रमाणे स्वातीने इंजेक्शन आणले. उडया मारत, हसत ,चालत ते दोघे डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्याबरोबर दिशाने आई.......... म्हणून जोरात शेवटचीच हाक मारली आणि काळी निळी पडून ती जागेवरच गतप्राण झाली.......... ...........
एका छोटया जीवाचा खेळखंडोबा झाला.
डॉ. खोपकरांनी तीची बॉडी समोरच्या पाटील हॉस्पीटलमध्ये नेली तेथेही तिला अनेक इंजेक्शने दिली....... पण....... दिशा उठली नाही........... ती कायमची गेली होती .त्या सर्वांनी संगनमत, करून पोलीसांना फोन केला. मोठी सेटलमेंट झाली................. आणि बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवली.

    .आज एकवीस वर्ष झाली... या दुःखद घटनेचा मी खूप कसोशीने छडा लावण्याचा प्रयत्न केला हुशार पोलीस यंत्रणा, डॉक्टरांची लॉबी ,पोस्टमार्टमचा रिपोर्ट आज अखेरपर्यंत त्यांनी दिलाच नाही............
खूप आटापिटा केला, प्रसिद्धी माध्यमांना विनंती केली, पोलीस स्टेशनला हजारो चकरा मारल्या, मंत्र्यासंत्र्यांना भेटलो, नगराध्यक्ष ,नगरसेवकानां भेटलो, सामाजिक कार्यकर्ते,राजकीय 
पुढाऱ्यानां भेटलो .सगळ्यानां माझी दर्दभरी कहाणी सांगत सुटलो, पर्याय, न्याय मिळेल, काही उत्तरे मिळतील अशी अपेक्षा करत राहीलो पण एका छोटया जीवाचे या जगात काहीच मोल नसते याची जाणीव पूर्णपणे अनुभवली .पत्रकारांची उदासीनता, आणि समाजातील लोकांची दिसलेली  निर्जिवता मनावर खूप मोठा घाव घालून गेली.

            एकदा तर रेल्वेमंत्री राम नाईक रेल्वे काऊंटरचे उदघाटन करताना मी निवेदन देऊन खूप मोठमोठ्याने आरडाओरडा केला तर पोलीसांनी मला मुलीच्या मृत्यूमुळे याला वेड लागले आहे असे सांगून खेचत खेचत बाहेर काढले.

        अशा कटू आणि दुर्देवी अनुभवामुळे आम्ही प्रचंडप्रचंड निराशेने मी मुंबई, नालासोपारा वेस्टच्या त्या पार्क व्हयू मधील घराला कायमचा अखेरचा निरोप घेऊन निघालो......... प्रचंड,निराशा व दिशाच्या आठवणींचा मोठ्ठा डोंगर मनात साठवत मोठं मानसिक ओझं घेऊन आम्ही दोघे सीएसटी स्टेशनवरून प्रगती एक्सप्रेसने पुण्याला निघालो होतो.............
यापुढे परत मुंबईला यायचे नाही व पाचगणीतच राहायचे असे ठरवून आम्ही सर्व सारवासारव करून नालासोपाऱ्याचा निरोप घेतला होता. सीएसटीवरुन प्रगति एक्सप्रेस सुटली आणि धिम्या गतीने ती दादर स्टेशनवर थांबली.

            आमच्या समोरच्या बाकावर जागा रिकामी असल्याने एक इस्कॉनचा तरुण तुळतुळीत गोटा केलेला, धारधार नाकाचा, स्मार्ट गोरापान, आणि भगवी वस्त्रे परीधान केलेला व गळ्यामध्ये मोठी झोळी लटकवलेला एक सन्यांसी शांतपणे समोरच्या बाकावर बसला.

             गाडीचा वेग हळूहळू वाढत होता, आणि आमच्या निराश मनात विचारांचा वेगही हळूहळू वाढत चालला होता. जगातील सर्व गोष्टींविरुद्ध निकराने प्रतिकार,लढाई करून हार स्विकारलेल्या सैनिकाप्रमाणे उदासीन होऊन मान लटकवत पडत्या चेहऱ्याने आम्ही बसलेलो होतो. गाडीचा वेग आणखी वाढला तसा समोरचा सन्यांसी प्रसन्न चेहऱ्याने आम्हाला 
' गुड इव्हिनिंग ' म्हणाला.परंतू निराशेमुळे आम्ही त्याच्याकडे लक्षच देखील दिले नाही.

         आमच्या या उदासीन प्रतिक्रियेमुळे तो सन्यांसी माघार घेणार नव्हता........
त्याने हळूच झोळीतून दोन चॉकलेटस काढली व आम्हाला देण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्याला नकार दिला.

             रेल्वेचा वेग वाढला आणि त्याने झोळीतून दोन लाल रंगाची सफरचंद काढली व आमच्या हातात देण्याचा प्रयत्न केला. पण आमचा मूडच नसल्याने आम्ही ती त्याला परत केली.

                 थोडयावेळाने कर्जत रेल्वे स्टेशन आले. गाडी थांबली. सन्यांसी तत्परतेने खाली उतरला आणि कर्जतचे प्रसिद्ध गरमागरम दोन दोन वडापाव आमच्यासाठीही घेऊन आला. त्याने जबरदस्त आग्रह केला तरीही आम्ही त्याला नकारच दिला.

                आणखी थोडयावेळाने गरमागरम चहावाला आला, सन्यांशाने आमच्यासाठी दोन कप चहा स्वतःहून घेतले पण तेही आम्ही न पिता सरळ गाडी बाहेर भिरकावून दिले .

               स्वाती उदास , दुःखी चेहऱ्याने डोक्याला स्कार्फ घालून खिडकीवर डोके रेलून बसली होती. मी मान खाली घालून निर्विकार चेहऱ्याने बसलो होतो.

                थोडयावेळाने सन्यांशाने दोन छोटी इस्कॉनची पुस्तके काढली व आम्हाला वाचावयास दिली.आम्ही ती न वाचताच साभार परत केली.

                इतक्यात लोनावळा स्टेशन आले. गाडी थांबताच सन्यांसी महाशय उतरले आणि लोनावळ्याची प्रसिध्द चिक्कीची दोन पाकीटे घेऊन आले व आमच्या दोघांच्या हातात देऊन "फ्रेश चिक्की आहे " तुम्ही जरूर टेस्ट करा असे म्हणू लागले. आम्ही ती चिक्कीची पाकीटे न खाताच त्याला साभार परत केली.

           सन्यांशाने खूप बोलण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्याला कसलाच प्रतिसाद दिला नाही.......

          एकंदर सन्यांशाच्या लक्षात आले की ह्या दांम्पत्याचे काहीतरी भयानक बिनसलेले आहे. कारण आम्ही कोणत्या मानसिक अवस्थेत याची त्यालाही कल्पना नव्हती.

          आणि मग तो स्वतःच त्याची माहीती सांगू लागला.मी एक उच्चशिक्षित डॉक्टर आहे परंतू श्रीकृष्णाचे चरित्र वाचल्यामूळे माझ्या जीवनात आमूलाग्र बदल झाला व त्या बदलाची परिणीती म्हणून मी डॉक्टरी पेशा सोडून पूर्ण काळ इस्कॉनच्या आश्रमात 
सन्यंस्त होऊन कृष्णभक्तीत लीन झालो आहे असे सांगू लागला.
 
              डॉक्टरच्या चुकीच्या औषधापचारांमूळे माझ्या मुलीचा मृत्यू झाला होता आणि परिस्थितीमूळे मी पूर्णपणे नास्तिक झाल्यामूळे मला आता त्याचा राग येऊन खूप तिरस्कार वाटू लागला होता. आमच्या शांत प्रवासात अशा आगंतुक माणसाने ढवळाढवळ करुन व्यत्यय आणलेला मला आवडत नव्हता. पण थोडयाच तासांचा प्रश्न असल्याने नाईलाज होता.

               प्रवास संपत चालला होता, शिवाजीनगर स्टेशन आले आणि सन्यांसी अचानकपणे क्षणार्धात वेगाने उठला. आमची प्रवासाची मोठी बॅग त्याने रॅकवरून काढली व मुख्य दरवाजाकडे झेपावला आणि जोरजोरात ओरडू लागला .
स्टेशन आले.......... 
स्टेशन आले.........
स्टेशन आले,.................

               आता मात्र माझा मनाचा तोल, संयम संपलेलाच होता , मी रागाने उठलो आणि त्याच्या मागे धावत जावून आमची बॅग हातात घेतली. आणि मग त्याला विचारले "काय मुर्खपणा चालला आहे तुमचा ? आम्हाला शिवाजीनगर नाही तर पुणे स्टेशनला उतरायचे आहे. आमचे स्टेशन पुढे आहे, येथे नाही. "

         आणि मग मात्र सन्यांशी प्रसन्नपणे हसला आणि मला म्हणाला अरे वा ! तुम्हाला बोलता येते याचा मला फार आनंद झाला आहे. तुम्हाला खरंच माहीत आहे का ? 
आपले प्रत्येकाचे एक स्टेशन येणार आहे ? आणि त्या स्टेशनवर आपल्याला उत्तरावेच लागणार आहे ?
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचे एक अंतिम स्टेशन असते, ते स्टेशन आले की आपला प्रवास संपतो ..............त्या स्टेशनवर बिनबोबाट , न गोंधळ करता शांतपणे जायचे असते.

" लक्षात ठेवा प्रत्येकाचे एक अंतिम स्टेशन येणार आहे, केव्हा ? कधी ?कसे ? हे त्याला कळते हळूहळू माहीत होत जाते. संकेत मिळत जातात.
रेल्वे स्टेशनवर तुम्ही स्वतःच्या बॅगा प्रवासाचे साहित्य घेऊन उतरू शकता, पण त्या अंतिम स्टेशनवर मात्र तुम्हाला काहीही नेता येत नाही. आपण सर्वजण रिकाम्या हाताने आलेलो असतो व जातानाही पूर्णपणे रिकाम्या हातानेच जावे लागते. ते स्टेशन आले की उतरावेच लागते तेथे कोणालाही वशीला लावता येत नाही, तेथे कोणालाही दया, मया लाचलुचपत देणे चालत नाही.

स्टेशन आले की निमूटपणे उतरायचे असते.

स्टेशन आले की शांतपणे उतरायचे असते.

          तुझ्या मुलीचे वय चार वर्ष होते. तीचे स्टेशन आले आणि ती या अनंतात मस्त, स्वच्छन्दी प्रवास करून अंतराळात विलीन झाली. तिचे पूर्णपणे अस्तित्व संपले, ती पुर्णपणे निर्विकार झाली, अनंतात विरून गेली, तुम्ही दोघे मात्र उगीचच स्वतःला त्रागा, त्रास करुन बैचेन, अस्वस्थ होऊन जगत आहात . तुम्ही आता जो प्रवास माझ्या सोबत केला त्यात प्रवासाचा आनंद तर तुम्ही घेतला नाहीच पण तुमच्या सानिध्यात आलेल्या सर्व प्रवाशांचा व व्यक्तिगत माझा प्रवास दुःखद व अतिशय त्रासदायक केला. असा रडका प्रवास करण्यात काहीच अर्थ नाही.......

              मात्र यापुढचा प्रवास मात्र छान करा, मजेशीर करा, सुंदर करा, आनंदी करा, स्वतः आनंदी राहा, व इतरानांही भरभरून आनंदी प्रवास करण्यासाठी मदत करा. कारण येथून काहीच न्यायचे नाही, तुमचा बंगला, तुमची गाडी, घोडे, संपत्ती, सोने, रत्ने, दागिने, हिरे, मोती, मौल्यवान वस्तू, तुमच्या आवडीच्या खास स्पेशल वस्तु, फर्निचर, काहीही नेता येणार नाही सोबत.
इतकेच काय ? तुम्ही जन्म दिलेली ,तुमचा स्वतःचा अंश असणारी मुले, प्राणप्रिय पत्नी, नातवंडे किंवा इतर कोणालाही सोबत नेण्याची सोय नाही. 

हा प्रवास प्रत्येकाचा एकटयाने सुरू होतो आणि एकट्यानेच संपतो. 

तुमचं पुणे रेल्वे स्टेशन आले आहे , निघा आता........

      संन्याशाने भगवतगीतेची एक नवी कोरी प्रत माझ्या हातात ठेवली. व आता तरी हे पुस्तक घ्या. असे म्हणत न सांगताच मला प्रेमाने कडकडून मिठी मारली , दोन्ही हात हातात घट्टपणे धरले व अंतिम निरोप घेतला.

"स्टेशन आले की शांतपणे उतरायचे असते "

         असे पुन्हा एकदा म्हणत थांबलेल्या रेल्वेच्या डब्यातून तो उतरला. त्याच्या पाठोपाठ मी आणि स्वाती बॅगा घेऊन उतरलो. सन्यांशी शांतपणे पुढे पुढे चालत राहीला आणि आम्ही तो दिसेनासा होत पर्यंत, त्याच्या पाठमोऱ्या धुसर, अदृश्य प्रतिमेकडे 
पहातच राहीलो............
पहातच राहीलो............
पहातच राहीलो.............

              आता एकवीस वर्ष पूर्ण होतील या घटनेला, त्या भगवतगीतेची कोरी करकरीत प्रत आजपर्यंत  कधीही मी उघडली नाही.
आज कपाटात अचानक सापडली आणि ही 'स्टेशन ' गोष्ट परत आठवली.

               सुशांतसिंग राजपुतच्या घटनेमूळे सगळा देश दुःखाच्या सागरात बुडाला.मी देखील अस्वस्थ, उदास दुःखी झालो होतो. पण खरं सांगू मित्रांनो आता वाटते त्याचे स्टेशन आले होते. त्याचा आपल्या सर्वांसोबतचा प्रवास इतकाच होता. त्याचे स्टेशन आल्यामूळे तो आता अनंतात, आसंमतात, विलिन झाला............ तो पलीकडच्या जगात गेला....... स्वतःहून.......

           आपण सगळेजण या जीवनाच्या अवघड प्रवासात सुखाचेच क्षण शोधत असतो . आपल्या सगळ्यांच्याच खूप मोठया इच्छा ,आकांक्षा ,मोठी स्वप्ने असतात. आपण सगळेच ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत असतो . काहींची स्वप्ने त्यांच्या सोबतच अर्धवटपणे संपतात. त्यांचे कार्य संपते ते, अनंतात विलिन होतात. कारण त्यांचे ' स्टेशन ' आलेले असते......

आणि स्टेशन आले की उतरावेच लागते............

             मला एका जवळच्या मित्राने विचारले सुनील काळे, या एवढया मोठया भयानक अनुभवातून तू छान निवांतपणे, आनंदाने जगतोस ,पण आम्ही मात्र परत मूळ पदावर येतो. तुझ्या सतत आनंदी राहण्याचे ,एनर्जीचे रहस्य काय आहे ?

           रहस्य काही नाही मित्रांनो,
आज मला समजलेले हे रहस्य तुम्हा सर्वांनाच सांगतो,.......... 
मला रोज सकाळी तीव्रपणे वाटते की माझे स्टेशन उद्या येणार आहे......... मग आजचा शेवटचा दिवस असणार आहे........ हा शेवटचा दिवस मी छानपणे जगावा........ उत्तम वाचावे......... उत्तम ऐकावे.......... उत्तम ते सर्व पहावे........ खूप छान चित्रे काढावीत......... गाणी ऐकावीत...
माझ्या घरासमोरच्या छोटया शेतात काम करावे........ बगीच्याला पाणी घालावे........ सर्व कचरा काढावा........ घर स्वच्छ ठेवावे.......... व्यायाम, योगासने करावीत......... आमचा टॉमी कुत्रा, चिनू मांजर , तिच्या पिल्लांसोबत खूप खेळावे............ प्रसन्नपणे मेणवलीच्या घाटावर रोज सकाळी फिरायला जावे...... वाईच्या घाटांवर,टेबल लॅन्डच्या पठारावर मनसोक्त फिरावे, महाबळेश्वरच्या ऑथर सीट पाँईटच्या व इतर दऱ्याखोऱ्यांमध्ये भरपूर फिरावे, निसर्गाशी समरस होऊन खूप फोटो काढावेत, आमच्या कृष्णा नदीच्या शेजारच्या खूप झाडे असलेल्या ठिकाणी भरपूर फोटो काढावेत, पाय पसरून निवांत त्या ठिकाणची जलरंगातील चित्रे काढावीत, खूप स्केचेस करावीत .
प्रत्येक गोष्ट ' सजगते ' ने करावी.आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीचा भरभरून आनंद घ्यावा............. कधीही कोणाशी स्पर्धा न करता दुस्वास न करता शांतपणे जगावे.
झाडानां, फुलझाडानां पाणी घालावे..... त्यातून नव नवी फुले जन्मावीत............ आणि स्वातीच्या कॅनव्हासवर दिशाच्या आवडीची अनेक 
कमळफुले, सुर्यफुले, जरबेराची, झेंडूची, 
हॉलीऑक्सची, तीळाची, आणि अनेक रंगाची विविध रानफुले कॅनव्हासवर नव्याने सतत जिवंत व्हावीत. कारण दिशानेच तिच्या जाण्यातून तिला एक नवी जगण्याची ' दिशा ' दिलेली आहे. आणि तिनेही ही आठवण सातत्याने कॅनव्हासवर आणून दिशाची आठवण फुलांच्या चित्रातून सतत ताजी व जिवंत ठेवली आहे . त्यामूळे चित्ररूपाने दिशा कधी गेल्याचे दुःख होत नाही... ती चित्रे देश परदेशातील अनेक रसिकांच्या थकलेल्या चेहऱ्यावर हास्य फुलवतात अगदी आमची दिशा खळखळून, निरागसपणे हसायची तसेच

आणि या अज्ञात सन्यांशाची दोघांनाही पुर्णपणे आठवण आहे ..............

स्टेशन आले की शांतपणे उतरावेच लागते..........
स्टेशन आले की शांतपणे उतरावेच लागते.......
👏👏👏👏👏👏👏👏👏
सुनील काळे 9423966486

गुलमोहराची मित्रभेट

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
 *गुलमोहराची मित्रभेट* 
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

       पाचगणी ज्या ब्रिटीश अधिकाऱ्याने शोधली आणि पहिला बंगला बांधला त्याचे नाव जॉन चेसन. त्यामूळेच रस्त्याला नाव मिळाले चेसन रोड . या चेसन रोडवर प्रिस्टन, मेडस्टोन हे छान बंगले व एस .एम बाथा स्कूल, न्यू इरा स्कूल या छान , प्रसिद्ध मोठ्या शाळा आहेत. 
आठ एकर परिसरातील " मेडस्टोन " हा बंगला ब्रिटीशांनीच बांधलेला होता .पेसी विरजी या पारशी गृहस्थांची मालकी त्या बंगल्याकडे ब्रिटीशानंतर होती . ते स्वतः व त्यांचे कुटुंबीय हे कलाप्रेमी व कलेचा आदर करणारे ,निसर्गप्रेमी कुटूंब होते .बऱ्याच वर्षांपासून माझी पेसी अंकलची ओळख व एक उत्तम नाते तयार झाले होते . त्यानां चित्रकले बद्दल आस्था होती . मी तेथे खूप वेळा जायचो त्यांनी मला कधीही तेथे जाण्यास मज्जाव केला नाही, उलट मी बरेच दिवस तेथे गेलो नाही की पेसी अंकल रागवायचे नाराज व्हायचे .
सकाळी एकदा फिरत असताना छान निसर्ग , झाडे, फोटो काढत काढत मी विरजी बंगल्यावर आलो होतो .. खूपच दिवसांनी , वर्षांनंतर आलो होतो , कारण पेसी अंकल आता या जगात नाहीत . आणि पाहतो तो बंगल्याला गेटवरच कुलूप व आतमधून ग्रीन नेट लावल्याने काहीच दिसत नव्हते . म्हणून मी चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळी ही संपूर्ण प्रॉपर्टी बाथा स्कूलने घेतल्याचे कळाले.
बाथा स्कूलच्या गेटवर वॉचमन केबीन होती . वॉचमनने विचारले काय काम आहे ? कोणाला भेटायचंय ? मी म्हणालो माझा एक जुना मित्र आहे ,गुलमोहर , लाल रंगाचा, त्याला सवडीने भेटायचंय .वॉचमनने माझ्याकडे नीट बघितले , 
'अहो असं कुठं आसतयं का ' ? 
झाडाला भेटायचंय म्हणे, काय तरी मनाला पटेल असं बोलावं माणसानं . मी म्हणालो हो खरंच मला झाडालाच भेटायचंय , तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे , त्या झाडाशी माझी खरंच माझी मैत्री आहे, बऱ्याच वर्षांपासून ,पाहीजे तर तुम्ही झाडाला जावून विचारा .
त्याने शाळेच्या प्रशासक मॅडमला फोन लावला . तिने विचारले ' माणूस वेडा, बिडा आहे का ? 
 तो म्हणाला नाही, इंग्रजी पण बोलतुया...... पुढं काय करू ? त्याने रजिस्टर माझ्यापुढे ठेवले .मी नाव , गाव, मोबाईल नंबर लिहला पर्पज " गुलमोहर " मित्राला भेटणे, असं लिहून झोकात सहीही ठोकली .
वॉचमनने मला शाळेच्या ऑफीसमध्ये जाण्यास सांगितले . 
प्रशासक मॅडमने तुमचा नक्की उद्देश काय आहे ? असं स्पष्टपणे विचारले . मीही गुलमोहराचे झाड हा माझा मित्र असून खूप दिवसांनी त्याला भेटणे हाच उद्देश असल्याचे पुन्हा स्पष्टपणे व ठामपणे सांगितले . तिला काय करावे हे सुधारेना . तिने प्राचार्यानां भेटून परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले व बाहेर बसायला लागेल , थोडं थांबायला लागेल असं सांगितले. मग मीही मित्राला भेटूनच जायचेच असं ठरवून निवांत बसलो . शेवटी तासाभराने प्राचार्यांनी मी गेलो नाही हे खिडकीतून  पाहून मला नाईलाजाने  आत बोलावले व अशी झाडाला भेट देणाऱ्याची पहीलीच केस असल्यामूळे इस्टेट मॅनेजरला विचारावे लागेल , डायरेक्ट परवानगी देता येणार नाही असे सांगितले .थोडया वेळाने इस्टेट मॅनेजर आले व तेही मोठयाच विचारात पडले. मग परिस्थितीचा गंभीर विचार वगैरे केल्याचे दाखवून आम्हाला मुंबईला ट्रस्टीनां फोन करुन विचारावे लागेल असं म्हणाले . मग त्यांनी मुंबईला कमिटी मेंबर्सला फोन लावला .
मग ट्रस्टीनीं फोनवरच माझे नाव, गाव सर्व माहीती विचारली . मी चित्रकार आहे याची खात्री करून घेतली व दोन , तीन माणसानां सोबत घेऊन झाडाला भेटायची एकदाची परवानगी दिली . त्यामध्ये दोन माणसं सोबत असतील अशी मुख्य अट घातली , आणि मग मी आणि कदाचित झाडाने देखील एकदाचा हुश्श करून हा लाल फितीचा कारभार संपवला .
       मग शाळेचे कलाशिक्षक व इस्टेट मॅनेजर यांच्या सोबत मी मेडस्टोन विरजी बंगल्याकडे निघालो .
बंगल्याचे मूळ मालक पेसी विरजी वयस्कर झाल्याने जग सोडून गेले होते त्यांची तीनही मुले इंग्लडला स्थायिक झाली होती . त्यानां आता प्रॉपटीत कसलाच इंटरेस्ट राहीला नव्हता . बाकीची मंडळी मुलीकडे बंगलोरला कर्नाटकात शिफ्ट झाल्याचे कळाले . बंगला आता निस्तेजपणे शाळेचा बोर्ड लावून उदासपणे पडल्या सारखा दिसत होता .
बंगल्याच्या परिसराचे सगळे चैतन्यच हरवले होते .एके काळी किती तरी वेळा मी या परिसरात स्केचेस व वॉटरकलर मधील चित्रे रेखाटली होती .पेसी अंकल प्रत्येक वर्षी त्यांच्या मुलांच्या इंग्लडच्या घरी माझी चित्रे पाठवायचे त्यांच्या जीमी , रॉय व कॅथी या मुलांची, नातवंडाची आठवणीने बोलावून भेट करुन द्यायचे . 
      बंगल्याच्या पुढील सुंदर गार्डन , मागील कृष्णा नदीचे धरणाचे पात्र, कमळगडाच्या पर्वतरांगा, खाली चिखली गावाची शेती व खूप खोल असलेली धुक्याची दरी मी कितीतरी वेळा चित्रित केली होती . तेथील बोगनवेलीची झाडे व गार्डनचा परिसर एक शांत रम्य परिसर होता .मी त्या सर्व आठवणीत रममाण झालो होतो .
        मला पेसी अंकलच्या आठवणी बरोबर गुलमोहराच्या झाडालाही भेटायचे वेध लागले होते . कारण ते झाड साधेसुधे नव्हते . १९४४ साली स्वतः महात्मा गांधी यांनी लावलेले होते . याच झाडाचे व बंगल्याचा परिसर असलेले चित्र महाराष्ट्राचे राज्यपाल पी सी अलेक्झांडर यानां त्याच्यांच सांगण्यावरून मी करून केले होते . माझ्या पेटींग देण्याच्या कार्यक्रमात याच मेडस्टोन बंगल्यात ते फार भावूक झाले होते . या पेटींगच्या रूपाने महात्मा गांधी यांची आठवण माझ्याकडे कायम राहील अशी त्यांनी मनोकामना व्यक्त केली होती .कारण ते सच्चे गांधी भक्त होते. माझ्या बरोबर हात हातात घेऊन ते गुलमोहराच्या झाडाजवळ आले व नतमस्तक होवून झाडावर हळूवारपणे त्यांनी हात फिरवला होता . मला वाळकेश्वर व महाबळेश्वरच्या राजभवनवर आमंत्रित केले होते . स्वतः राज्यपाल त्यांच्या पत्नी, त्यांचा लवाजमा, गाडया, अनेक  व्यक्तींच्या उपस्थितीमूळे विरजी बंगल्याचा सर्वच माहोल कसा रोमांचित करणारा प्रसन्नमय प्रसंग झाला होता .मी गर्दीतच लपून बसलो होतो हेही मला आठवले व आता हसायला आले . त्यावेळी मात्र माझी हृदयाची धडधड आजही मला आठवत होती .
       अशा आठवणीत मी उत्सुकतेने शोधत गुलमोहराजवळ आलो तर काय ,गुलमोहर निखळून पडला होता , उन्मळून पडला होता, त्याचे अस्तित्वच नाहीसे झाले होते . त्याचे डौलदार रुप न दिसता त्याचे फक्त छोटेसे खुरटे बुंधे दिसत होते . गांधीजीची आठवण कायम करणारा गुलमोहर पुर्णपणे संपलेला होता. मला तर मोठा धक्काच बसल्यासारखे झाले .
      कारण बंगल्याचे मालक पेसी विरजी वयोवृद्ध झाले व आजारी पडले . त्यानंतर ते गेले .अखेरपर्यंत मुलांनी त्यानां इंग्लडला खूप वेळा बोलावले पण त्यांनी येथेच शेवटपर्यंत राहायचे ठरविले व अखेरपर्यंत पाचगणी ही त्यांची जन्मभूमी असल्याप्रमाणे  येथेच राहीले .
       आपला मालक सोडून गेल्याचे गुलमोहराला कळले असावे . त्याने जगण्याची आशा सोडून दिली असावी व त्याच्या जिवलग मालकाच्या पाठोपाठच हा विशाल वृक्ष कोलमडून पडला असावा . दु:खवियोगाने त्याने नक्की स्वतः आत्महत्याच केली असावी .पूर्वी जसे पुरुषाच्या निधनानंतर स्त्रीया सती जात होते तसं हे गुलमोहरांच झाड सती गेले असावे .
       आता त्याचीच एक फांदी घेऊन एक दुसरे नवीन झाड पुढे गार्डनच्या मधोमध लावले होते . ते ही बऱ्यापैकी मोठे झाले होते त्या माझ्या गुलमोहर मित्राच्या अखेरचा अंश असलेल्या नव्या गुलमोहरावर हात फिरवून, अखेरचा निरोप घेऊन मी ही निघालो. कारण खरा गुलमोहर आता पेसी अंकल बरोबरच गेला होता.
     जाताना शाळेच्या प्राचार्यानां आमची राज्यपाल भेटीची महती , सुनील काळे या चित्रकाराची पाचगणीतील, जहाँगीर आर्ट गॅलरीतील प्रदर्शनाची, व गुलमोहर झाडांविषयीची राज्यपालांची गोष्ट कोणीतरी सांगितली असावी कारण नंतर त्यांचा बोलण्याचा टोन बदलेला होता . त्यांनी खूप आग्रहाने ऑफीसला बोलावले पण मी थांबलो नाही कारण खरा  गुलमोहरच परत भेटणार नव्हता व पेसी अंकल ही परत मला तेथे बोलावणार नव्हते . मी हळूहळू जड पावलांनी परत निघालो . परत कधीही न येण्याचा निर्धार करुनच . आता त्या आठवणीनां मनात साठवणे एवढेच माझ्या हातात होते .
          कुत्रा, मांजर, , पोपट, , हे प्राणीपक्षी जसे माणसाचे मित्र असतात तशी झाडंही माणसांची मित्र असू शकतात . त्यांच्यावर विज्ञानाचे प्रयोग करून तेही संवेदनाक्षम असतात हे सिद्ध झालेले आहे . त्यांच्याबरोबर आपण बोललो त्यानां समजून घेतले तर आपली मनस्थिती त्यानांही कळते, अंतरीच्या भावना समजतात ,पण हे या भावनविरहीत मनांच्या हुकुमाच्या ताबेदारानां कसे कळणार ?
आता मला कळतंय की, मलाही ते झाड बोलावत होतं कारण कित्येक वर्ष मी तिकडे फिरकलोच नव्हतो . त्याची व्यथा त्याला मला सांगायची होती . माझं आणि त्याचं दुःख एकच होतं .पेसी अकंल नसल्याचं आमचं एकत्र दुःख आपआपसात शेअर करायचं होतं . साचलेलं मनही हलकं करायचं होतं .
      काल वाईत अशाच एका वेगळ्या झाडांनी झपाटलेल्या व्यक्तीची अचानकच भेट झाली . आमचे संगीतप्रेमी मित्र खोपटीकर सरांनी फोन करून मला बोलावले .एकलव्य वसतिगृहाचे प्रमुख असलेले 
रिटायर्ड अेसीपी सुभाषचन्द्र डांगे यांची ओळख करून दिली . त्यांनी वाईत वसुंधरा मातेची कल्पना करून मूर्ती बनवलेली आहे . तिची पूर्तता करण्याची धडपड बऱ्याच वर्षापासून सातत्याने लावून धरली आहे . हजारो झाडे लावून सगळीकडे हिरवंगार ,वनश्रीपूर्ण सपंन्नता आणायची  वसुंधरा मातेला सगळीकडे खूष करण्याचा संकल्प केला आहे . अशा संकल्पानांच्या पूर्ततेसाठी आपण सर्वानींच हातभार लावला पाहीजे . भरपूर झाडे वाढवण्याच्या कल्पनांनी त्यांनी अगदी  वेडे केले आहे . त्याचं हे वेडेपण आपणही वाटून घेतले पाहीजे . उत्साहाने त्यात सामील झाले पाहिजे . 
     झाडं असतील तरच आपण असणार आहोत.
झाडे नसतील तर कल्पना करा ,सगळं कसं भकभकीत उजाड व माळरान वाटेल, पक्षी, प्राणी राहतील कोठे ?
खातील काय ? झाडांशिवाय " निसर्ग " ही कल्पनाही कशी तरी भकासच वाटते ? 
आपला भारतमातेचा विकास कसा चाललाय ते अशा कल्पनेवरूनच कळेल . 
निसर्ग म्हणजे काय ?
निसर्गाशी मैत्री झाडांशिवाय कशी करता येईल ? झाडं ही आपली संपत्ती, आपला प्राण , आपला श्वास, आपला जीव . झाडांशिवाय निसर्गचित्रे ? कल्पनाच करायला नको . बापरे  !
      माणसं उन्हाळ्यात गाडी लावण्यासाठी जागा शोधत राहतात, उन्हाच्या धगीने जीव घामाघुम होतो, डोकं आणि मन , शुष्क, तप्त व्हायला लागते .सुर्यदेव सगळीकडे आग ओकू लागतो त्यावेळी झाडांची खूपच गरज लागते . ,सगळीकडे खूप खूप झाडे असावीत असं वाटत राहतं . 
पण .....
        रस्ता रुंदीकरणात तोडलेल्या हजारो झाडांची भीषण कत्तल पाहीली की आपण पूर्ण विकासाच्या का पूर्ण भकासाच्या दिशेने निघालोय याची जाणीव व्हायला लागते . तोडलेली झाडं परत लावण्याची , जबाबदारी कोणाकडे असते का ? हल्ली पृथ्वीचं तापमान खूप वाढलयं असा सूर सगळीकडे सुरु होतो . ग्लोबल वॉर्मिगच्या चर्चेला वेग यायला लागतो . मग सगळं परत थांबते .
        अनेक गावागावात , शहरांमध्ये आता हल्लाबोल, लाखोंचे मोर्चे, उपोषणे, दंगली, मारामारी, हाणामारी, खळखटयाक , दलित ,सवर्णांची आंदोलने वेगाने वाढत आहेत बहुजनांचे, अल्पसंख्याकांचे, खेचाखेचीचे राजकारण वेगळेच चाललेले दिसत आहेत 
      अशी नस्ती उठाठेव करण्यापेक्षा सर्वानीं वेळीच सावध होऊन झाडे लावणे, झाडे जगवणे, काहीनीं झाडांचीच  मोठी शेती करणे असे फायद्यांचे उपक्रम हाती घेतले तर किती क्रांती होईल ना संपूर्ण  देशात? खेडयापाड्यात, गावागावांमध्ये, तालुक्यांमध्ये,जिल्ह्या जिल्हयांमध्ये, शहरी भागात ,निमशहरी भागात ,ओसाड माळरानांवर जिथे मिळेल तेथे झाडे लावण्याचा व ती जगवण्याचा ध्यास सर्वानी घेतला पाहीजे .झाडे लावून जगवण्याची स्पर्धा घेऊन मोठयात मोठी बक्षिसे दिली पाहीजेत. कारण " झाड हे प्रत्येकाचा जगण्याचा श्वास आहे ". आणि श्वास हा अखेरपर्यंत घ्यावा लागतो . जोपर्यंत श्वास, तोपर्यंतच आस .
       माणसं शेवटी मरतातच मरण कोणालाच चुकले नाही . पण जगत असताना माणूस एकही झाड लावत नाहीत , वाढवतही नाहीत . 
माणूस मरताना मात्र नऊ मण म्हणजे  तीनशे साठ किलो लाकडे ( एक मण =४० किलो ) मात्र घेऊनच मरतो . आणि त्याला अजून तरी सगळीकडे विद्यूतदाहिनीचा पर्याय उपलब्ध झालेला नाही . आपण निदान आपल्यासाठी तरी एका झाडाची तरी सोय करून मरायला पाहीजे याची काळजी प्रत्येकाने केली पाहीजे .मरताना आपलेच प्रेत सरणावर ठेवलेल्या झाडाला म्हणेल की तु का माझ्याबरोबर  जळतोयस ?
         तुच माझा व मीच तुझा खरा मित्र ,अखेरपर्यंत साथ देणारा .
 जे तुझे होणार तेच माझे होणार ......
फक्त राखच . 
मग दोघांचीही राख एकत्र होवू दे .

 तेव्हा ती लाकडंही शोलेमधील गीत गात म्हणतील की.
ये दोस्ती, हम नही तोडेंगे 
तोडेंगे दम मगर, 
तेरा साथ ना छोडेंगे ................

सुनील काळे 
9423966486
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...