ब्लॉग संग्रहण

शुक्रवार, २ जुलै, २०२१

कॅलिग्राफीचे दिवस

कॅलिग्राफीचे दिवस
✍️✍️✍️✍️✍️✍️   
          एकदा वाईच्या बँकेमध्ये काही कामासाठी गेलो होतो . माझ्या  घराचे बांधकाम चाललेले होते त्यामुळे अनेक जणांना चेकने पैसे द्यावे लागायचे . अशावेळी एक दिवस बाहेरच्या शिपायाने मला थांबवले व तुम्हाला बँकेचे प्रमुख मॅनेजर यांनी केबिनमध्ये बोलावलेले आहे असे सांगितले . मी आश्चर्यचकित झालो . कदाचित लिहताना दिलेला चेक चुकला असावा किंवा काही वेगळे काम असावे असा अंदाज करत मी आत गेलो . मॅनेजर साहेबांनी मला पाहताच उठून अभिवादन केले आणि मला बरेच दिवसांपासून तुम्हाला भेटायचे होते असे सांगितले . मी त्यांना काय काम आहे ? असे विचारले असता तुमचे सगळे चेक मी काळजीपूर्वक पाहतो . त्या चेकवरचे हस्ताक्षर मला खूप आवडते .म्हणून मी शिपायाला सांगून ठेवले होते की तुम्ही बँकेत कधी आला तर मला जरूर भेट करून द्या . आज खूप दिवसांनी योगायोग आला . तुमच्या चेकवरचे हस्ताक्षर आणि सही पाहून मलाही अशा पद्धतीची वेगळी सही शिकायची आहे तर त्यासाठी काय करावे लागेल ?
         मला या शनीवार ,रविवारी रिकामा वेळ आहे . कॅलिग्राफी या दोन दिवसात  जमेलच ना ? थोडे तुमचे मार्गदर्शन हवे होते
          असे दोन दिवसात कॅलिग्राफी शिकण्याचा उत्साह व आत्मविश्वास पाहून मी अचंबितच झालो. मला असे विचारल्यानंतर काय उत्तर द्यावे ते सुचलेच नाही . त्यांनी केबीनमध्ये मागावलेला चहा पीत असतानाच मला कॅलिग्राफीचे माझे दिवस आठवायला सुरुवात झाली .
          तो  शाळेत असतानाचा काळ आठवला .  मला कॅलिग्राफी हा शब्दही माहीत नव्हता .परंतु आपले अक्षर जास्तीत जास्त चांगले काढण्याचा मी नेहमी प्रयत्न करायचो . पुढे चित्रकलेचा नाद लागला परंतु वडीलांनी कधीही रंगाची पेटी व साहीत्य दिले नाही . मग आपणच आपल्या चित्रांचे साहित्य स्वकमाईतून कमवायचा मला ध्यास लागला . पूर्वी फ्लेक्स नव्हते . सगळेजण ऑईलपेंटने रंगवलेले बोर्ड करायचे मग मी देखील साईन बोर्डाची कामे करायला लागलो .
         पाचगणीत हनुमान गल्ली मध्ये वसंत पेंटर नावाचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते.  थोडी बुटकी शरीरयष्टी , केसांचा कोंबडा , साधा शर्ट आणि पँट आणि त्यांच्या हातामध्ये सतत एक पिशवी असायचीच . या पिशवीमध्ये रंगाचे सगळे सामान घेऊन ते साईन बोर्ड करायला जायचे . मग मी त्यांच्या पाठोपाठ जायला सुरुवात केली . हळू माझी भीड चेपली व मी त्यांना वसंतमामा म्हणू लागलो . मला साईनबोर्डाचे काम शिकायचे आहे असे सांगितले , त्यांनाही कोणी तरी फुकटचा जोडीदार पाहिजेच होता . त्यांच्याबरोबर LT लार्सन अँड टुब्रो , सेंट पीटर स्कूलच्या असेंब्ली हॉलचे बोर्ड ( नंतर याच शाळेत मी कलाशिक्षक म्हणून चार वर्ष काम केले ) , वाडीलाल साराभाई संघवी आरोग्यभवन ,  प्रोस्पेक्ट हॉटेल , इल पलाझो हॉटेलचे बोर्ड  व इतर गावातील दुकानांचे साधे बोर्ड आम्ही रंगवायचो . म्हणजे मी बोर्ड स्क्रॅपरने घासायचो व ते रंगवायचे .वसंत पेंटर मनाने चांगले असले तरी खूप कंजूष होते . ते मला एकही रुपया  द्यायचे नाहीत मग हळूहळू मी निराश होऊन स्वतःची बोर्ड रंगविण्याची कामे करायला लागलो . सगळ्यात मोठा बोर्ड म्हणजे आमच्या घरावरच्या मजल्यावर राहणाऱ्या लिंगांण्णा पोतघंटे यांचा दोन बाय पंचवीस फुटांचा दीपक ड्रायक्लीनर्स नावाचा इंग्रजी बोर्ड . दोन फूट आकाराचे एकेक डेकोरेटीव्ह लेटरींग करताना माझी चांगली दमछाक झाली . त्यासाठी शिडीवर उभे राहून लेटरिंग करायला लागायचे . फक्त रात्री काम करायचो त्यामूळे पंधरा ते वीस दिवस लागले कारण मला कामाचा स्वतंत्र अनुभव नसतानाही जिद्दीने मी तो बोर्ड पूर्ण केला .  बोर्ड झकास झाला. पुढे तो बोर्ड पाहून मला VXL जाम या रुस्तम दुभाष यांच्या साईनबोर्डांची मोठी ऑर्डर मला मिळाली . (आता केमरॉन दुभाष व्हेलोसीटी एन्टरटेनमेन्टस भोसे  यांचे आजोबा ) ह्या मिळालेल्या पैशातून मी चित्रकलेचे सामान विकत घ्यायचो.
            कोल्हापूरला कलानिकेतन महाविद्यालयात गेल्यानंतर कॅलिग्राफी या विषयाची  असाइनमेंट आम्हाला भोसले मॅडमनी दिली . 
ब्राह्मणे बाळबोध अक्षर ।
घडसुनी करावे सुंदर ॥ 
जे देखताची चतुर ।
समाधान पावती ॥ 
           या वाक्याचे पेन्सिल , बोरू , पेन ,कटनीप यांच्या साह्याने सुलेखन करायचे .आणि त्याला "कॅलिग्राफी " म्हणजे सुंदर हस्ताक्षराची कला असे म्हणतात हे प्रथम कळाले . वाचनीयता हा अक्षर सौंदर्याचा प्राथमिक घटक आहे हे ही कळले. सुलेखनामागे प्रामुख्याने कलात्मक उद्दीष्टे व प्रेरणा असतात आणि दर्शकाला सौंदर्यानुभुती व उच्च प्रतीचा कलात्मक आनंद देण्याची भुमिका असते. त्यामूळे सुलेखन हा एक ललित कलाप्रकार मानला जातो.
           पुढे पुण्याला आल्यानंतर कमर्शियल आर्ट शिकताना प्रा.मिलिंद फडके व प्रा . बाबू उडुपी यांची कॅलिग्राफी पाहून मी खूपच खूप प्रभावित झालो होतो . चिन्हच्या एका मासिकांमध्ये प्रसिद्ध   कॅलिग्राफर अच्युत पालव यांचा एक सुंदर लेख आला होता . तो वाचल्यानंतर मी त्यांना राजकोटवाला चाळ लालबाग येथे भेटायला गेलो . त्यांची कॅलिग्राफी पाहून , त्यांचा ध्यास , तळमळ व कामाचा सपाटा पाहून कॅलिग्राफी नावाचे भूत माझ्यामध्ये वेगाने संचारले . फार पछाडून गेलो होतो कॅलिग्राफीमूळे . नंतर सुलेखनाचा मग सतत सराव करायला सुरुवात केली . 
           पुण्यामध्ये अभिनवला शिकत असताना जवाहर आर्ट या नाना पेठेतील साईन बोर्डच्या दुकानांमध्ये मी जगण्यासाठी पैसे कमवायचो .
         कॅलिग्राफी हा शब्द मूळ ग्रीक Kalligraphia (कॅलिग्राफीया ) ह्या 
" सुंदर अक्षर " या अर्थाच्या शब्दापासून उत्पन्न झालेला आहे .फार प्राचीन काळापासून सुलेखनाची दोन गटांमध्ये विभागणी होत आली आहे एक व्यवहारोपयोगी व दुसरी अलंकरणात्मक .
       आपण जे रोजचे वेगाने लिहीत असतो त्याला कॅलिग्राफी म्हणता येणार नाही कारण कॅलिग्राफी करायची म्हणजे प्रत्येक अक्षराला नेत्रदीपक ,सुंदर , सुवाच्चता ,सुस्पष्टपणे सादर करण्याची लिपी होय . नेत्रसुखदता , सौंदर्य, व 
वाचनसुलभता यांचा आदर्श ,परिपुर्ण सुरेख मेळ साधलेला दिसून येतो .
कॅलिग्राफी म्हणजे सुंदर अक्षरांची माळच . यामध्ये प्रत्येक अक्षरांमध्ये एकमेकांचे साधर्म्य शोधायचे व ते साधर्म्य साधत वेगळ्या पद्धतीने  मुक्तपणे वळणदार अक्षरे काढायची . हळूहळू त्या अक्षरांचा सराव करत स्वभाव ओळखायचा ही सगळी अक्षरं एकमेकांमध्ये गुंफली की अक्षरांचा समुह एक वेगळेच स्वरूप धारण करतो आणि त्यातील सुसंबंधता , सुसुत्रता जपली की अक्षरे पाहणाऱ्याला आनंदाने मनाला मोहून टाकतात . अक्षरांची नेमकी व सुबक घडण , वेगवेगळ्या सुट्या अक्षरांची वा घटकांची सुसंघटीत क्रमबद्ध रचना, तसेच प्रमाणबद्ध व सुसंवादी एकात्म मेळातून साधलेले कलात्मक अक्षराकृतिबंध हे कॅलिग्राफीचे स्वरूपवैशिष्ठय म्हणता येईल . त्यामूळे कॅलिग्राफीला चित्रकलेच्या बरोबरीनेच उच्च दर्जा व प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. पक्षांच्या पिसांच्या लेखण्या , बोरू , वेगवेगळ्या आकाराचे कुंचले , टाक , पेन , निबांचे टोकदार , गोलाकार , तिरपे , चपटे , यासारखे विविध प्रकार , वेगवेगळ्या रंगीत शाई , जलरंग , तैलरंग
अक्रॅलिक कलर्स इ. अनेक साधने सुलेखन करण्यासाठी वापरली जातात .
         भारतात मुद्रणपूर्व काळात हस्तलिखित , पोथ्या , पुराणातील धार्मिक ग्रंथाच्या सजावटीतून , इस्लामी , मोगल संस्कृतीत कुराणाच्या लेखन सामुग्रीत कॅलिग्राफीची कला जोपासली गेली . जैन , बौद्ध हस्तलिखितांमूळे जगाला भारतीय सुलेखनशैलीची ओळख झाली . चीन जपान , तिबेट येथील मठांत व देवळात पारंपारिक पद्धतीचे सुलेखन अद्यापही अत्यंत श्रध्देने केले जाते.
           १९व्या शतकात मुखपृष्ठ सजावटीत व अक्षरांलकरणात विकासात्मक बदल होत गेले . ग्रंथाप्रमाणेच वृत्तपत्रे , नियतकालिके यांची शीर्षक , लेखशीर्षके , मथळे , उपशीर्षके , अशा सर्वच घटकांत कलात्मक ,अलंकरणात्मक कॅलिग्राफी दिसू लागली . नाटक , जाहिराती , पोस्टर्स , वृत्तपत्रीय जाहिराती . अशा अनेक माध्यमात विपुलतेने व वैविध्यपूर्ण रितीने कॅलिग्राफीचा वापर केला जातो .
         कॅलिग्राफीच्या या ध्यासामुळे  माझी कितीतरी चांगल्या लोकांची ओळख झाली . मी जिथे राहत होतो त्या हॉस्टेलजवळ प्रसिद्ध चित्रकार प्रताप मुळीक राहायचे .त्यावेळी त्यांची अमर चित्रकथासाठी केलेली कॉमिक्स खूप प्रसिद्ध होती . ह्या कॉमिक्समध्ये चित्रांतील संभाषण लिहिण्याचे , कॅलिग्राफी करण्याचे काम मी मिळवले ,काही दिवस ते मी करत होतो . ही कॅलिग्राफी करत असतानाच मला त्यांचा शरीरशास्त्र व माणसांची चित्रे काढण्याचा  अलौकिक ध्यास पाहून मी खूपच प्रभावित झालो .पण नंतर ते हैद्राबादला काही वर्षांसाठी गेले व माझा कॉमिक्सचा अभ्यास संपला. पण त्यावेळी रामानंद सागर यांची रामायण ही प्रसिद्ध मालीका सुरु होती . मुळीकांमूळे मीही अभ्यासासाठी त्याची प्रतिकृती पूर्णपणे हस्तलिखित चित्रे काढून पूर्ण केली होती. त्या कॉमिक्सची ओरिजनल डमी आज खूप तेहतीस वर्षांनी अचानक सापडली.  तिथेच माझी मिलिंद मुळीकची भेट झाली व नंतर आम्ही निसर्गचित्रांमध्ये रमलो .
         कॅलिग्राफीमुळे पुण्याचे प्रसिद्ध स्कायलाइन आर्किटेक्टचे मालक 
श्री .रमेशभाई गुजर यांची कामामूळे माझी अचानक भेट झाली . त्यांनी मार्केटयार्ड जवळ नवीन ऑफिस चालू केले होते . आणि त्या ऑफीसच्या स्थलांतराची पत्रिका कॅलिग्राफीमध्ये करायची होती . संपूर्ण पत्रिका प्रिंट झाली आणि नंतर त्यांच्या लक्षात आले की त्या प्रत्येक पत्रिकेवर  चुकून " श्री " शब्द लिहायचे विसरून गेले आहे .म्हणून हा "श्री " शब्द  लिहिण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो .त्यादिवशी रमेशभाईंबरोबर असलेल्या सौ . प्रविणाभाभी व त्यांच्या इतर सर्व कुटूंबियाची ओळख पुढे घट्ट मैत्रीमध्ये रुपांतरीत झाली आणि ती सर्वांबरोबर आजही एकतीस वर्ष टिकून आहे .
          कॅलिग्राफी करताना अक्षरांमध्ये जो जिवंतपणा येतो तो आणताना मन भारावून जाते , आणि किती लिहू याचे भानच राहत नाही . त्यामूळे मी त्या काळात खूप जणानां पत्रे लिहायचो .आजही मला कॅलिग्राफी करायला आवडते . तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी प्रत्यक्ष कॅलिग्राफी करताना जो आनंद मिळतो त्याची तुलना मला शब्दात करता येणार नाही .         
          मला अच्यूत पालव  किंवा इतर कोणीही  प्रत्यक्ष समोर बसवून कॅलिग्राफी कधीही  शिकवली नाही पण त्याच्यां कामातूनच ती शिकवण आपोआप झाली  अच्यूत पालव यांच्या ओळखीमूळे मला संघर्षाच्या काळात सिनेमा होर्डींग करणाऱ्या ' बाळकृष्ण आर्ट '  या दादरच्या पाटीलवाडीतील  कंपनीत सहा महिनेकाम करण्याची मोठी संधी मिळाली . त्या सिनेमा होर्डींगच्या धम्माल अनुभवांबद्दल नंतर कधीतरी सविस्तर लिहावे लागेल .
         आजही मला कॅलिग्राफीचे दिवस आठवले की  प्रा. मिलिंद फडके यांचे स्वच्छ, सुंदर , नीटनेटके  हस्ताक्षर आठवते , प्रा .बाबू उडूपी यांची बिनधास्त झोकदार , वळणदार मुक्तपणे साकारलेली अक्षरे आठवतात व कॅलिग्राफर मास्टर अच्युत पालव यांचे व त्यांच्या कॅलिग्राफी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पुण्याच्या राजा रविवर्मा आर्ट गॅलरीत भरलेले 
" कॅलिफेस्टीवल " या प्रचंड मोठ्या व जबरदस्त , असंख्य कॅलिग्राफी प्रयोगांचे प्रदर्शन आठवते  व मनात आनंदाच्या सुखद लहरी  निर्माण होतात . त्यांचे कॅलिग्राफीच्या क्षेत्रातील कौशल्य अफलातून आहे. ते कौशल्य खूप खडतर साधनेतून निष्ठेतून आलेले आहे . त्यांचे सुलेखनातील योगदान ,कार्य ,अतुलनीय व अविस्मरणीय आहे. त्यासाठी आदराने त्यानां मनातून मी नेहमी सॅल्यूट ठोकत असतो .
          या अशा ज्ञात व अज्ञात वेळोवेळी भेटलेल्या सर्व कॅलिग्राफीच्या गुरुनां मी मनातून नेहमी  मनःपूर्वक वारंवार अभिवादन करत असतो . कारण सुलेखनात प्राविण्य मिळविण्यासाठी या कलाकारांनी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिलेले आहे . आणि आजही ते सतत त्यांच्या ध्यासात नवनवीन प्रयोग करत मग्न असतात. कला ही गोष्ट  फक्त दाखविण्यासाठी नसून आयुष्य जगताना प्रत्येक क्षण हा कलेचाच एक भाग आहे असे समजणारी ही मंडळी सर्वानांच आदरनीय आहेत म्हणून ते सर्वानांच भावतात .

        आणि बँकेचे मॅनेजरसाहेब सहज विचारत होते दोन दिवसात मला थोड्या सरावाने कॅलिग्राफी सहज जमेलच की ? 
आता यावर काय उत्तर देणार मी ? 
आणि काय बोलणार ? 
      
           या लेखासोबत त्यावेळी शिकत असताना कॅलिग्राफीच्या भरपूर केलेल्या सरावाचे थोडेसे नमूने व  रामायण कॉमिक्सचे संपूर्ण रंगीत हस्तलिखित नुमन्यांचे फोटो व काही जणानां पाठवलेल्या पत्रांचे नमूने जोडले आहेत .

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
सुनील काळे 
9423966486

जगण्याचे " स्टॅन्डर्ड " समजलेला माणूस- प्रा . डॉ . ज्ञानदेव झांबरे सर************************        पाचगणी हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शैक्षणिक केंद्र आणि थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे . ब्रिटिश काळापासून वेगवेगळ्या लोकांनी स्वधर्मियांसाठी शाळा सुरु केल्या . त्यामुळे येथे त्रेचाळीस शाळांमध्ये अठरापगड जातींचे लोक एकत्रित रहात असल्याने येथे कॉस्मोपोलीटन संस्कृती आहे . पाचगणी शहर छोटे असल्याने बहुभाषिक वेगवेगळ्या प्रांतातील मंडळी छानपैकी एकत्रितपणे राहतात . अशा या गावात माझे बालपण गेले . दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि चांगले मार्क मिळाले म्हणून अकरावीसाठी कॉलेजचा शोध सुरु झाला . त्याचवर्षी वाईला किसनवीर महाविद्यालयात नव्याने सायन्स कॉलेज सुरु झाल्याचे कळाले . BSc डिग्री मिळण्याची चांगली सोय झाली होती . त्यामुळे घरच्यांनी मला अकरावी सायन्सला प्रवेश घेण्यासाठी फोर्स केला . मी मात्र नाराज झालो होतो कारण माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले होते व सायन्सचे विषय इंग्रजी माध्यमात शिकवले जाणार होते . इंग्रजीची माझी खूप आबाळ झाली होती कारण सातवीपर्यंत आम्हाला इंग्रजीचे शिक्षकच नव्हते . इंग्रजी , गणित , सायन्स या विषयाची तर माझी कुडंली कधी जमलीच नव्हती पण त्याकाळी उलट उत्तर देण्याची प्रथा नव्हती त्यामुळे मी मुकाटपणे वाईला सायन्स कॉलेजला रोज एस.टी बसचा पास काढून येऊ लागलो .       सायन्सच्या या वर्गात शिक्षक मला काय शिकवत होते याचे मला भान नव्हते कारण मला इंग्रजी भाषाच समजत नव्हती . चाळीस पन्नास विद्यार्थी असल्याने मागच्या बेंचवर बसायला लागलो आणि मला एक नविन छंद लागला . मी चित्रे काढायला लागलो . माझ्या मित्रांची , शिक्षकांची , प्राण्यांची , वनस्पतींच्या जर्नलमध्ये आकृत्या काढणे मला आवडू लागले . कधी कधी मी वाईच्या बसमधून पसरणीघाटात उतरायचो . या घाटातील वळणदार रस्ते , दुतर्फा असलेली वडाची झाडे , पांडवगडाच्या पायथ्याच्या सभोवतालची छोटी छोटी चमकणारी भातशेती , ऊन पावसाचा खेळ , संध्याकाळची सुर्यास्ताची रंगउधळण , वाईच्या गणपती मंदिराची , वेगवेगळ्या घाटाची चित्रे मी जलरंगात उतरवू लागलो . थोडक्यात मला चित्रकलेची फारच आवड निर्माण झाली होती . चित्रकार होण्यासाठी लागणारी इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा मी बारावी सायन्सला असताना दिली व त्यामध्ये मला 'अ 'श्रेणी प्राप्त झाली होती .       चित्रकलेचे वेड इतके वाढले की मी सकाळी सहा वाजताच थंड हवेत चित्र काढायला जायला लागलो . टेबललॅन्डच्या पठारावर तर कधी सिडनेपाँईटच्या उंच चौथऱ्यावर बसून मी धोमधरणाचे पाणी ,कृष्णा व्हॅलीतील डोंगररांगा , कधी पांगारी तायघाट जवळच्या पारसी पॉईंटची चित्रे रेखाटू लागलो . आणि अचानक माझ्या लक्षात आले मला अतिथंड हवेत सकाळी फिरल्याने सर्दीचा त्रास सुरु झाला आहे . ऑक्सिजिन घेण्यासाठी दोन्ही नाकपुड्या बंद झाल्याने श्वास घेणे मुश्कील झाले आहे . डॉक्टरांनी माझे ऑपरेशन करून नाकातील वाढलेले पॉलीप्स काढावे लागतील यासाठी तातडीने ॲडमिट केले . नाकाला मोठे बँडेज बांधूनच मी 12वी सायन्सची प्रॅक्टीकल परिक्षा दिली होती . त्यानंतर  पुण्याला चित्रकलेच्या अभिनव कॉलेजला मी गेलो . चित्रकार झालो व परत पाचगणी महाबळेश्वरचा निसर्ग रंगवू लागलो होतो . थंड हवेत वेळीअवेळी सतत डोंगररांगावर भटकंती केल्याने माझा नाकाने श्वास घेण्याचा त्रास आणखीनच वेगाने वाढू लागला . डॉ. प्रशांत पोळ यांनी वेगवेगळ्या वर्षी चारपाच वेळा माझे ऑपरेशन केले आहे . एकंदरीत मला थंड हवेची ॲलर्जी झाल्याचे सिद्ध झाले व डॉक्टरांनी 2014 साली मी पाचगणी सोडावी लागेल असे निक्षून सांगितले . मला माझे पाचगणीचे बस्तान सोडून  कायमचे  वाईला यावे असे त्यांनी सांगितले व नाईलाजाने मी काही दिवस वाईला राहण्याचे ठरवले .          वाई कॉलेजचे प्राध्यापक असलेले माझे मित्र श्री .पटकुरे सर यांनी मला सह्याद्रीनगर या परिसरात बोलावले . थोडी चर्चा केली तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की त्यांच्या सोसायटीत " प्रज्ञाअमृत " नावाचा एक बंगला आहे . त्याचे मालक श्री .व सौ झांबरे दोघेही शिक्षक आहेत . त्यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर पाच खोल्यांचे घर भाड्याने मिळते . तेथे काही दिवस राहून वाईच्या परिसरातील चित्रे काढावीत . हवा बदलाने तब्बेतीवर काय परिणाम होईल हेही कळेल व एखादी जागा आवडली तर घर बांधण्यासाठी वाईत एन ए प्लॉट घ्यावा या उद्देशाने मी त्यांच्या घरी आलो .         सहयाद्रीनगरात असलेला " प्रज्ञाअमृत " अतिशय मेंटेन केलेला ,फुलझाडे असलेला सुंदर बगीचा व पार्किंगची सोय असलेला बंगला बघताक्षणीच मला आवडला . बंगल्याच्या पाठीमागे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी स्वतंत्र जीना होता . आतमध्ये सर्व नीटनेटकेपणा होता . खिडक्या दरवाजानां पडदे लावलेले होते . आम्ही दोघेही चित्रकार असल्याने चित्रकाम करण्यासाठी व राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होती . झांबरेसर , झांबरेमॅडम व त्यांची मुलगी मृणाल हे तीनच माणसे खाली रहात होते . त्यांचा मोठा मुलगा प्रणव शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला होता . पहिल्या भेटीतच आमची छान ओळख झाली व लगेच प्राथमिक बोलणी करून मी एका आठवड्यात पाचगणीवरून वाईला शिफ्ट झालो . सर व मॅडम दोघेही स्वच्छताप्रेमी होते . त्यामुळे मी रोज मॉर्निंगवॉकला वाकेश्वरला जाताना पाहायचो झांबरे सर स्वतः साफसफाई करायचे , कुंड्यांना पाणी घालणे , झाडांची निगा राखणे ,खतपाणी देणे . पूर्ण आवार पाण्याने स्वच्छ धूवून काढायची त्यांनां आवड होती . आम्ही कधीतरी समोरासमोर भेटलो की अनेक विषयांवर गप्पा मारायचो . वाईत राहण्याचे फायदेतोटे तपासून पहायचो . येथील परिसराचा माणसांचा स्वभाव व आचरणांवर चर्चा करायचो . नवनव्या जागा शोधायची आता सवय लागली होती . त्याचा आढावा घेताना झांबरे सर मनापासून प्रतिक्रिया द्यायचे .       " प्रज्ञाअमृत " या बंगल्यामध्ये रहात असताना एक घडलेला प्रसंग मला आजही लक्षात आहे व आयुष्यभर पुढेही कायम लक्षात राहील . एकदा रविवारी सुट्टीचा दिवस होता . साधारण नऊ दहा वाजताची वेळ असेल . आमची घरकाम कारणारी बाई आज येणार नव्हती त्यामुळे दोघेही निवांत पेपर वाचत बसलो होतो . आणि शेवटच्या दूरच्या खोलीतील अचानक कोपऱ्यातील किचनसिंकचा का वॉशबेसीनजवळचा नळ अलगद तुटून पडला होता . पाईपलाईन उघडी झाली आणि वेगाने पाणी रूममध्ये पसरु लागले होते . आम्ही विरुद्धदिशेच्या बाजूला असल्याने काही आवाजच आला नाही . हळूहळू पडणाऱ्या पाण्याने ती रुम भरून गेली होती आणि अचानक खालून झांबरे मॅडम व सर दोघेही वरच्या मजल्यावर आले .त्यांनी घराची बेल वाजवली आणि त्यांच्या लगेच लक्षात आले की शेवटच्या खोलीतून पाणी जवळपास चारपाच इंच भरून दुसऱ्या रूममध्ये पाणी पसरू लागले होते . झांबरे सरांनी लगेच प्लंबरला फोन लावला येताना नवीन नळ घेऊन यायला सांगितले . पटकन टेरेसवर जावून मुख्य पाईपलाईन बंद केली . इतक्यात झांबरे मॅडम पटकन खाली गेल्या , येताना त्यांनी फरशी पुसण्याचा रबरमॉप व चारपाच फरशी पुसण्याचे जाड कपडे घेऊन एक बादली आणली . त्यांची मुलगी मृणाल देखील मदतीला आली . इकडे बनियन व लुंगी घालून निवांत बसलेले झांबरे सर गुडघ्यापर्यंत लूंगी गुंडाळून पटकन फरशीवरील पाणी बादलीत भरू लागले . झांबरे मॅडम यांनी लगेच साडीचा पदर खोचून मॉपने पाणी बाहेर टाकायला सुरुवात केली . मग आम्ही दोघेही त्यांच्यामध्ये सामील झालो व सर्व जणांनी रुममध्ये साचलेले पाणी काढून तासाभरात सगळा बंगला चकाचक केला . नंतर प्लंबर आला त्याने नवीन नळ बसवला .आता तुम्ही म्हणाल यात आश्चर्याची गोष्ट काय ? तर आम्ही झांबरे सरांचे भाडेकरू होतो . पाण्याचा नळ दुरुस्त करून रुम साफसफाई करण्याची जबाबदारी आमची होती . ते घरमालक होते . उच्चशिक्षित पी एच डी झालेले कॉलेजचे प्राध्यापक होते . मॅडम एम एस सी व जॉय स्कूलच्या उपप्राचार्या होत्या . एकदा घर भाड्याने दिले की त्याची देखभाल करण्याची जबाबदारी भाडेकरूचीच असते . त्यादिवशी दुपारी आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि तो प्रसंग एन्जॉय केला . कोणीही कसलीही तक्रार झाली नाही . दोन चार महिन्यातच आम्ही " प्रज्ञाअमृत " बंगला सोडला . नवीन जागा घेतली तेथे मोठे अपयश आले . नंतर मग आमचा मेणवली गावाजवळ " निसर्ग " नावाचा बंगला तयार केला . मागच्या वर्षी तेथे " निसर्ग आर्ट गॅलरी " नावाने चित्रप्रदर्शनही भरवले होते . अनेक वेगवेगळ्या जिल्हयातील , तालुक्यातील पर्यटक प्रदर्शन पाहण्यासाठी येत होती . एकदा किसनवीर कॉलेजचे प्रा. श्री रमेशचंद्र बारगजे सरांनी फोन केला की त्यांच्या कोल्हापूरच्या 1973 सालच्या एम .एस .सी बॅचचे क्लासमेटस यांचे वाई येथे गेटटुगेदर आयोजित केले आहे त्यावेळी तुमची निसर्ग आर्ट गॅलरी पाहायला सर्वजण येणार आहेत . धोमचे मंदिर पाहून सर्व गाड्या निसर्ग आर्ट गॅलरी पाहण्यासाठी गेटपर्यंत आल्या . त्यानां पार्कींगची जागा दाखवत होतो त्यावेळी एक गाडी मात्र गेटपासून दूर थोड्या अंतरावर उभी राहीलेली पाहीली . बारगजे सरानां ती गाडी बाहेर का थांबली म्हणून विचारले तर सरांनी कपाळावर हात मारून घेतला . मला म्हणाले काय बोलू आता ? ती गाडी तुझ्या सख्या चुलत व मावसभाऊ असलेल्या हनुमंत काळे यांची आहे . तो आमच्या बॅचचा सर्वात अतिशय हुशार विद्यार्थी होता . युनिव्हरसिटीत प्रथम आला होता . त्याला आम्ही सांगितले चित्रकार सुनील काळे तुझा भाऊ आहे . त्याने वाई ,पाचगणी महाबळेश्वर या परिसरातील असंख्य अप्रतिम चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत , त्याची मिसेस चित्रकार स्वाती काळे हिने असंख्य फुलांची तैलरंगात चित्रे काढलेली आहेत . उत्तम चित्रप्रदर्शन आहे . तुमची तीस वर्ष झाली भेट झालेली नाही तर तुम्ही आता जरूर भेटा व प्रदर्शनही पहा . पण तुझा भाऊ गाडीतून उतरायला तयार नाही त्याचे कुटुंबीय गाडीतच बसून आहेत .ते म्हणतात आम्ही भावकीत जात नाही कारण आमचे " स्टॅन्डर्ड " मोठे आहे . मी मोठ्या कंपनीत ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर होतो . तो साधा चित्रकार आहे त्याची माझी तुलना होऊ शकत नाही . तुम्ही सगळे प्रदर्शन पाहायला जा आम्ही बाहेर रस्त्यावर गाडीत बसून राहू . तो एक तास बाहेर थांबला पण घरात आलाच नाही . खरे तर हा हनुमंतदादा आता हेमंत नाव लावतो . कारण आईबापाने ठेवलेले हनुमंत हे नाव त्याला आवडले नाही . अतिशय गरिबीतून त्याला शिक्षण दिले होते .स्वतःच्या कर्तबगारीने तो उच्चपदावर पोहचला त्याचे उच्चशिक्षित मुलीबरोबर लग्न झाले पण लग्नानंतर व अगोदर नोकरी करत असतानाही या दादाने कधीच कोणत्याही भांवडाला जवळ केले नाही . कोणत्याही नातेवाईकांकडे ते फिरकले नाहीत . कोणाशी कसलाही संबंध ठेवला नाही ,कोणालाही मदत केली नाही . संपूर्ण कुटुंबाला दूर ठेऊन दादा मोठा स्टॅन्डर्डवाला झाला . आमचा दादा कसा दिसतो हे मला पाहण्याची उत्सुकता होती . कारण तो माझ्यापेक्षा पंधरावीस वर्षांनी मोठा होता . पण " स्टॅन्डर्ड "आडवे आले . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात . शिक्षणामुळे माणूस विचारवंत होतो त्याच्या ज्ञानाच्या कक्षा उचांवतात . त्याचे जीवन सुखकर व समृद्ध होतेच पण त्याच्यां विशाल छायेत अनेकानां संजीवनी मिळते . उच्चशिक्षित भावाने मात्र आमच्या सर्वांसाठी त्याचे दरवाजे मात्र कायमचे बंद केले होते . उच्चशिक्षणाचा मला तेथे काहीच उपयोग झालेला दिसला नाही . इथे मला पीचडी झालेले उपप्राचार्य झांबरे सर आठवतात . उपप्राचार्या झांबरे मॅडम आठवतात . स्वतःच्या भाड्याने राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाशी प्रेमाने सुखदुःखाची विचारपूस करत असत . ते दोघेही स्वतःचे " स्टॅन्डर्ड "कधी गोंजारत बसले नाहीत .  सामान्य माणसासारखे राहून दोघेही असामान्य कामे करत राहीली . जॉय स्कूल व किसनवीर विद्यालयातील विद्यार्थी घडवताना आपल्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांला घडवण्याचे . " स्टॅन्डर्ड " काम त्यांनी आयुष्यभर केले व त्याचा गर्वही कधी केला नाही . जीवन जगण्याचे खरे " स्टॅन्डर्ड " त्यांनां कळले आहे म्हणून माझ्या त्या अतिउच्चशिक्षित एम एस सी फर्स्टक्लास झालेल्या अडाणी भावापेक्षा झांबरे पती पत्नींविषयी मला आदर वाटत आहे .     महिन्यापूर्वी एकदा झांबरे मॅडमचा मला फोन आला . त्यांनी विचारपूस केली व त्या जॉय स्कूलची नोकरी सोडून पुण्यात नातवाचा सांभाळ करण्यासाठी पुण्यात रहात असल्याचे सांगितले . मुलगा सिव्हील इंजिनियर व सुनबाई पेशाने सरकारी वकील असल्याने दोघेही कामात व्यस्त झाले मग मुलाकडे लक्ष कोण देणार ? म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला . आणि ते ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . माझी आर्ट गॅलरी होती . ती सांभाळताना माझी तीन वर्षाची मुलगी सांभाळण्यासाठी मी आईवडीलानां विनंती केली तर त्यांनी नकार दिला . गावाकडे शेतीची कामे असतात त्यामुळे तुमची मुलगी तुम्हीच सांभाळा असे उत्तर आईने दिले . शेवटी आमच्या संघर्षाच्या लढाईत मुलगी देवाघरी गेली . ती वारली त्यावेळी मी माझ्या मेव्हण्याला सत्यजितला फोन केला . तो म्हणाला मी अत्यंविधीला येऊ शकणार नाही . तो देखील Phd झालेला आहे . अतिउच्चशिक्षित आहे . त्याला भाचीच्या अत्यंविधीला जाण्याची गरज वाटली नाही . बहिणीला कठीण स्थितीत आधार देण्याची आवश्यकता वाटली नाही आणि पुढे आता सत्तावीस वर्ष झाली तरी त्याला आमची कधीच आठवणही झाली नाही . काय उपयोग त्या डॉक्टरेटचा ? जिथे माणूस माणसाला ओळखत नाही .मोबाईल ,फोन , लॅपटॉप आले तंत्रज्ञान वाढले तरी मनाची आढी मात्र कायम राहीली .कधी त्याच्या कुटूंबाने संपर्कच केला नाही कारण "स्टॅन्डर्ड " आडवे आले .त्यावेळी खऱ्या अर्थाने एकटे जगायला शिकलो . अशावेळी झांबरे मॅडमचा त्याग मला प्रेरणा देणारा वाटतो . मुलांविषयची माया त्यांच्या कृतीतून दिसते .इकडे सरांनां रिटायर्ड होण्यापूर्वी खानावळीत जेवण करावे लागले . काही महिने एकटेपणा स्विकारावा लागला . पण त्यांनी कधीही त्याची तक्रार केली नाही . कॉलेजमध्ये त्यांनी अनेक कार्यक्रमात स्वतःला झोकून दिले . त्यांच्या कॉलेजच्या कारकीर्दीची मला जास्त माहिती नाही पण त्यापेक्षा माणुसकी जपणारे , कुटुंबाला जपणारे , अभिमान नसणारे , मोठेपणाचा त्याग केलेले गार्डनमध्ये स्वच्छता करणारे डॉ झांबरे सर मनाला फार भावले . त्यांच्या मुलाचे लग्न ठरले त्यावेळी प्रणवच्या लग्नाला आम्ही दोघेही गेलो होतो . लग्नकार्यालय पूर्णपणे भरून गेले होते प्रचंड गर्दी होती तरीही झांबरेसरांनी आम्हाला बरोबर पकडलेच . शाल श्रीफळ देऊन योग्य मानसन्मान केला त्यावेळी मला या झांबरे कुटूबांचेखरे " स्टॅन्डर्ड " कळाले . वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य नामवंत लहानमोठ्या माणसांनी संपूर्ण हॉल भरून गेला होता . काय असते स्टॅन्डर्ड ?? तुम्ही जगत असता त्यावेळी त्या तुमच्या जगतानाच्या काळात असंख्य माणसे भेटतात . त्यातील काही माणसे चांगली वागलेली असतात काही वाईट वागलेली असतात . पण शेवट काय असतो ? तुमच्या जगण्याला कधीतरी मर्यादा येतेच . कधीतरी शरीर थकते व तुम्हाला अंतिम श्वास घ्यावा लागतो . त्यानंतर कोणत्यातरी स्मशानघाटाजवळ तुमची राख होते ती राख पाण्यात मिसळते तुमचे अस्तित्व संपते . जग काही दिवस तुमची आठवण काढते नंतर तुमची कोणी आठवणही काढत नाही . तुमचे " स्टॅन्डर्ड " काही असो शेवटी तुमची राखच होते . हे ज्यानां समजते त्यांचे भावविश्व वेगळे असते . ते कायम हसतमुख असतात . ते त्यांच्या कृतीतून त्यांचे वेगळेपण जोपासत असतात .अनेकानां त्यांचे जगणे प्रेरणा ठरत असते .असे जीवनाचे खरे " स्टॅन्डर्ड " कळालेले झांबरे सर मला आवडतात . काही महिन्यांपूर्वी अचानक आमच्याकडे घरकाम करणाऱ्या बाई व माळीकाम करणारा त्यांचा मुलगा या दोघांनी आमचे काम सोडले. काही दिवस आम्ही वेगवेगळी माणसे शोधली पण त्यांच्या पगाराच्या अपेक्षा जास्त असल्याने जुळले नाही . मग झांबरे सर पुन्हा आठवले . Phd झालेला माणूस स्वतः झाडलोट करतो , बागेची निगा राखतो तर आपण का लाजायचे ? त्यांच्यापासून प्रेरणा घेतली . आता मी बागकामात तरबेज झालोय बागेत शेतात काम केल्यामुळे आरोग्यही चांगले राहते याचा शोध लागला . आपण कोणावर विसंबून राहायचे नाही काम करत राहायचे हेच खरे " स्टॅन्डर्ड " झांबरे सरांकडून मी शिकलो . खरी डॉक्टरेट तीच आहे . मे महिन्यात ते आता रिटायर्ड होतील . अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या सरानां व झांबरेमॅडम या दोघांनाही उर्वरीत रिटायर्ड आयुष्य सुखसमृद्धीचे आनंदाचे जावे त्यांच्या मनासारखे जगताना उत्तम आरोग्य प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना व मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !चित्रकार - सुनील काळे✍️9423966486निसर्ग आर्ट गॅलरी [वाई]