ब्लॉग संग्रहण

गुरुवार, १७ जून, २०२१

फडणीस सर

फडणीस सर

🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋
           
           आज मनापासून वाईच्या फडणीस सरांचे स्मरण होत आहे . खरं तर फडणीस सर यांचा मी कॉलेजातला प्रत्यक्ष शिकवलेला विद्यार्थी नाही,  त्यांचा माझा  पूर्वीपासून जवळचा सबंधही नव्हता,  खूप वर्षांपासूनचा नियमित संवाद किंवा परिचय नव्हता. 
         सात सप्टेंबरला सकाळी आमचे चित्रकार मित्र होनराव व विश्वास सोनवणे यांचे फोन आले आणि कोरोनामुळे फडणीस सर गेले या बातमीने कोठेतरी काळजात दुःखाची मोठी कळ उमटल्याची जाणीव झाली व मनात खोलवर पोकळी निर्माण झाली . 
        पाच वर्षांपूर्वी मी पाचगणीवरून वाईजवळ कायमस्वरूपी राहायला आलो त्यावेळी वाईत खूप मित्र नव्हते. वाचनाची आवड असल्याने एक दिवस लो.टिळक वाचनालयात आलो, वाचक सदस्य झालो, पैसे भरून वाचनाची पुस्तके व पावती घेऊन निघालो तर वाचनालयाच्या उजव्या कोपऱ्यातील  काचेचा दरवाजा असलेल्या खोलीतून कोणीतरी हातवारे करुन बोलावत असल्याची जाणीव झाली. त्या दरवाज्यातून आत जाताच मोठया टेबलापलीकडे नव्या कोऱ्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यामागे एक दाढीधारी व ग्रे कलरची फेल्टहॅट घातलेली , खांदयावर शबनम बॅग लटकवलेली एक व्यक्ती मोठया प्रेमाने मला बोलावत होती.
      " माझे नाव प्रा.सदाशिव फडणीस " त्यांनी हस्तांदोलन करत बसायला सांगितले .
"आज आमचे नेहमीचे मित्र आले नाहीत म्हणून तुम्हाला चहासाठी बोलावले, आणि आज तुम्हीही माझ्यासारखीच फेल्ट हॅट घातली आहे म्हणून हा नवा वाचक सदस्य कोण आहे याची उत्सुकता होती. ".... 
या बसा निवांतपणे.....अशी मनमोकळी सुरुवात करून अगदी सहजपणे कोणताही आडपडदा न ठेवता त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मी चित्रकार आहे हे समजल्यावर तर ते खूपच खूष झाले . 
           त्या पहिल्याच भेटीत आम्ही एकमेकांचे  सख्खे "खास" मित्र झालो. मग वेगवेगळ्या कला, लेखक,कलाकार,चित्र,  कवी, संगीत नाटक,संवेदना ,प्रदर्शने, साहित्य, पर्यटन, कलाकारांच्या जाणीवा , प्रेरणा अशा गप्पांमध्ये दोन तास कसे 
संपले ते मला कळालेच नाही वाचनालयाची वेळ संपली मग आम्ही बाहेर रस्त्यावरच उभे राहून तासभर गप्पा मारल्या. त्यांच्या गप्पानां विषयाचे बंधन नव्हते.
         नंतरच्या अनेक भेटीतून फडणीस सरानां सतत संवाद करत नवनव्या माणसांच्या ओळखी करून घेणे आणि इतरानांही आपली स्वतःची, व आपल्या सर्व मित्रांच्या ओळखी करून देणे यांचा मनापासून नाद, किंवा मोठा छंदच होता. 
            चित्रकला, संगीत, गायक, लेखक, कवी, नाटक यासारख्या इतर सर्व कला व कलाकारांबद्दल त्यानां अपार प्रेम व उत्सुकता होती. आपण कलाकार नाही अशी खंत ते वारंवार व्यक्त करत. संधी मिळवायची आणि त्या माणसांशी त्याच्या क्षेत्रातील घडामोडींविषयी आवडीने बोलत राहायची त्यांना खूप आवड व  सवडही होती.
           आमची ओळख वाढल्यानंतर त्यांनी काही दिवसातच डॉ. प्रभूणे आणि भालचंद्र मोने या त्यांच्या मित्रांसह आमच्या ' निसर्ग ' नावाच्या स्टुडिओला व घराला भेट दिली. तेथील डिस्प्ले केलेली चित्रे पाहून त्यानां आम्हा कलाकार पतीपत्नीच्या चित्रांविषयी खूप कुतुहल आणि प्रेमपूर्ण आदर होता आणि तो इतरानां सांगताना सतत त्यांच्या बोलण्यातून दिसून यायचा .
            चित्रकारांच्या चित्रनिर्मितीविषयी, कवींच्या कवितांविषयी, लेखकांच्या लेखनाविषयी त्यानां हे सुचते कसे ? आणि ते व्यक्त कसे करतात ? त्यांच्या सादरीकरणाच्या प्रोसेसविषयी त्यानां नेहमी उत्सुकता असायची व ती प्रक्रिया समजून घेण्याचा सतत उत्साह असायचा.
          टिळक वाचनालयाचे अध्यक्ष झाल्यावर ते बराच वेळा  वाचनालयातच असायचे. वेगवेगळ्या विषयांचे प्रसिद्ध वक्ते, व्याखाते, तज्ञमंडळी यानां बोलावून नवनवीन कार्यक्रम अरेंज करण्यामध्ये त्यांचा नेहमी पुढाकार असायचा व अशा सर्व कार्यक्रमांचा  मेसेज पाठवायचा व फोन करुन आठवण करून द्यायची त्यानां आवड होती. 
           बऱ्याच वेळा माझा या सगळ्याच कार्यक्रमानां प्रतिसाद नसायचा मग ते नाराज न होता नवा विचार मांडायचे. आपण फक्त आपल्याच चित्रकला क्षेत्राचा विचार न करता इतर विषयांचेही थोडेफार ज्ञान जीवनात आपल्याला आवश्यक आहे असे ते सांगायचे. माणूस बहुआयामी हवा, वाचन चौफेर हवे. माणसाने बहुश्रूत असावे त्यांचा आग्रह असे. त्यामूळे हळूहळू मग आमची उपस्थिती अशा कार्यक्रमांना वाढली.
           एकदा वाचनालयात गेलो असता सगळीकडे पुस्तकांचे ढिग लागलेले दिसले. मग फडणीस सरांनी सांगितले की सगळी पुस्तके विषयवार लावायचे काम सुरु आहे. प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तीनां त्यांच्या आवडत्या विषयाची पुस्तके लगेच सापडली पाहीजेत म्हणून हजारो पुस्तके व्यवस्थित लावण्याचा त्यांनी ध्यास घेतला व तो पूर्णही केला. सर्व वाचनालय डिजिटल करायचे काम त्यांनी हाती घेतले होते.प्रत्येक वर्षीच्या नव्या किंवा जुन्या दिवाळी अंकात  चित्रकलेसंदर्भात कोणताही  लेख त्यांच्या वाचनात आला की त्याची माहीती ते लगेच फोन करुन सांगायचे, व तो लेख महत्वाचा असून मी वाचलाच पाहीजे असे आग्रहाने सांगत असत विशेष म्हणजे त्यानां सगळेच लेख खूप सुंदरच आहेत असे 
"निरागसपणे " वाटत होते.
           वाईच्या वसंत व्याखानमालेत त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. प्रत्येक विषयातील प्रसिद्ध व नावाजलेल्या मंडळीना बोलावयाचे, त्यांचे कौतुक करायचे आणि कार्यक्रम " भन्नाट " करायचा, परिपूर्ण करायचा हे त्यांचे मुख्य ध्येय असायचे.
           १९१८ च्या मे महिन्यात वसंत व्याख्यानमालेत त्यांनी  
"आमची निसर्गयात्रा व अनुभव " या स्लाईड शोच्या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी आग्रहाने आमंत्रित केले व प्रोत्साहन दिले. आणि त्यानंतर मग वाईत आर्ट गॅलरी करावी असा नवा विचार त्यांनी मांडावयास सुरुवात केली. चित्रकारांची चित्रेच रसिकांनी पाहीली नाहीत तर कलाविषयक जाणीवाच समृद्ध होणार नाहीत, लोकांना चित्रे कशी समजणार ? त्यासाठी त्यांनी 
' चित्र कसे पहावे ' हा एक खास  डॉ . प्रभुणे यांचा स्लाईड शो चा कार्यक्रम आयोजित केला होता. सर्व कलांच्या उन्नतीसाठी वाई तालुक्यात एक मोठे सांस्कृतिक केंद्र तयार झाले पाहीजे असे ते सांगत. मग टिळक वाचनालयाच्या बेसमेंटमध्ये चित्रप्रदर्शन करता येईल का ? अशी सतत विचारणा करत, चित्र लावण्याचे हुक, लाईट व्यवस्था, मांडणी कशी करता येईल , किती खर्च होईल ? याचा अंदाज ते घेत असत. 
               आर्ट गॅलरीसाठी प्रयत्न करताना काही जणांकडून  अडचणी आल्या, नकार आला की ते चिडून जायचे. मग चहा पिताना समाजकारण, राजकारण, मानवी स्वभाव, यावर ते स्वतःच त्याचे मानसशास्त्रीय विश्लेषण करत. मी मात्र  त्यांचा उत्साह पाहून शांत राहत असे मग ते आणखी त्वेषाने बोलत,कलाकारांनी उदासीन न राहता आता क्रांतीचा झेंडा घेऊन जागृती केली पाहीजे , सतत प्रयत्न करत राहायला हवे .  मला त्यांच्या ह्या उत्साहाचे खूप कौतुक वाटायचे.
           फडणीस सरांच्या गप्पानां अंत नसायचा म्हणून खूप वेळा घाईमध्ये असलो की मी पुस्तके बदलण्यासाठी 
लो.टिळक वाचनालयाच्या डाव्या बाजूच्या मुख्य प्रवेशद्वारातून जायचो. पण फडणीस सर बरोबर पकडायचेच, त्यानां चुकवणे अवघड असायचे . मग परत  आमच्या चर्चा सुरु व्हायच्या,जीवन  मुल्ये,कलानिर्मिती, मूर्त, अमूर्त चित्रे, त्या चर्चा कधी न संपणाऱ्या असायच्या....
            एकदा मी व फडणीस सर रात्री वाचनालयाच्या जवळच्या मातोश्री नावाच्या हॉटेलमध्ये गप्पा मारत होतो. चहा पिताना त्यांनी  गरम होत असल्याने त्यांची फेल्ट हॅट टेबलावर काढून ठेवली होती. मी पाहीले तर त्यांच्या डोक्यावर भरपूर केस होते. मी त्यानां सहजपणे विचारले ''सर ऊन असेल तर हॅट घालणे योग्य आहे, पण आता रात्री गरज नसताना तुम्ही हॅट सतत कशाला घालता ? फडणीस सर अचानक एकदमच शांत झाले व गंभीरपणे म्हणाले  " त्याचे काय आहे सुनील काळे, तुम्ही मराल त्यावेळी तुम्ही काढलेली असंख्य चित्रे रसिकांच्या भिंतीवर लटकवलेली असतील तुम्ही कलाकार मंडळी कधी मरत नसता, चित्रकार चित्रांच्यारूपाने जिवंत राहतात , गायक, संगीतकार त्यांच्या गाण्यामधून अमर होतात, लेखक, कवी त्यांच्या साहित्यातून पुस्तक रुपाने कायम स्मरणात राहतात... कलाकार जिवंत असताना कला जगतात व कलेच्या माध्यमातून मेल्यानंतरही रसिक जणानां आनंद देत राहतात. नुसते जिवंत राहणे आणि खरे आयुष्य जगणे यामध्ये खूप फरक आहे. आम्ही सामान्य माणसे. आम्ही नुसते जिवंत आहोत , आम्हाला कोण स्मरणात ठेवणार ? आमचं अस्तित्व नगण्य, आम्ही मेलो की संपलो ..........
म्हणून मी ही हॅट सतत घालतो, ही हॅट म्हणजे माझी ओळख, मी असो वा नसो पण पण फेल्टहॅट घालणारे शबनम बॅग बाळगणारे ते म्हणजे फडणीस सर एवढी आमची ओळख राहीली तरी पुरेसे आहे....................
           आता लो.टिळक वाचनालयात गेल्यावर  उजव्या बाजुच्या ऑफीसमधून हाक मारल्याचा आवाज येणार नाही , नवीन चित्रकलेची पुस्तके व इतर चांगल्या लेखांविषयी वाचण्याचा आग्रह होणार नाही, नवीन चित्रे,कला विषयांवर चर्चा होणार नाहीत , त्यांचा नेहमी सकारात्मक प्रोत्साहन देणारा उत्साही चेहरा आणि त्यांची फेल्ट हॅट, शबनम बॅग यापुढे कधीही दिसणार नाही कारण सात सप्टेंबरला फडणीस सर करोनामूळे अनंतात विलीन झाले.
                 सध्या करोनाच्या महामारीत सर्व देवांची मंदीरे बंद आहेत, सर्व भक्तानां मंदीराचे दरवाजे बंद असल्यामूळे देव तरी काय करणार ? मला वाटते देवही या एकटेपणाला कंटाळला असणार, मग कंटाळल्यामूळे अचानकपणे त्याला फडणीस सरांची आठवण झाली असणार व घाईघाईतच त्याने फडणीस सरांना गप्पा मारायला वर बोलावून घेतले असणार......... आणि मग देवाच्या खूप मोठया वाचनालयात फडणीस सर देवाबरोबर अनेक वेगवेगळ्या विषयांवर, नानाविध कला ज्यामध्ये संगीत, चित्रकला, नाटक, कविता, लेखन, साहित्य, अभिनय, वसंत व्याख्यानमाला, व वाईत सांस्कृतिक केन्द्र कसे असणार ? आर्ट गॅलरी कशी असणार ? या ठिकाणी आणखी काय सुधारणा करता येईल ?मूर्त ,अमूर्त चित्रे का समजत नाहीत ? त्यासाठी काय करावे इत्यादी विविध प्रश्नांवर सखोल गंभीरपणे चर्चा करत असणार अशी मला खात्री आहे .
        असे म्हणतात की,जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या आयुष्याची लांबी ही जन्माच्याच वेळी ठरलेली असते, आपल्याला जितके श्वास घ्यायचे ठरलेले असते तितके श्वास घ्यायचे संपले की मृत्यूला सामोरे जावेच लागते. 
         मी खरं तर नास्तिक आहे, मंदीरात जात नाही पण कधी गेलोच तर देवाला नक्की फडणीस सरानां न भेटवता अचानक का नेले ? असा नेल्याचा जाब नक्कीच विचारीन, तक्रार करीन की अजून काही वर्ष का थांबला नाहीस......... असो.
     फडणीस सर असे अचानकपणे सर्वांना चकवा देऊन त्यांच्या धीरगंभीर, मिश्किल स्वभावानुसार सहजपणे मृत्यूला सामोरे गेले. त्यांची फेल्ट हॅट, शबनम बॅग व त्यांच्याबरोबरच्या चर्चा मनात कायम लक्षात राहतील .
जन्म निश्चित आहे,
मरण निश्चित आहे,
जर आयुष्यातील कर्म चांगले असतील
तर " स्मरण " निश्चित आहे. 
फडणीस सर ज्यांच्या ज्यांच्या सहवासात आले असतील त्या अनेकांच्या "स्मरणात " ते नक्की राहतील, कारण त्यांनी केलेले कार्य चांगलेच होते.......
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

सुनील काळे✍️
9423966486

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जगण्याचे " स्टॅन्डर्ड " समजलेला माणूस- प्रा . डॉ . ज्ञानदेव झांबरे सर************************        पाचगणी हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शैक्षणिक केंद्र आणि थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे . ब्रिटिश काळापासून वेगवेगळ्या लोकांनी स्वधर्मियांसाठी शाळा सुरु केल्या . त्यामुळे येथे त्रेचाळीस शाळांमध्ये अठरापगड जातींचे लोक एकत्रित रहात असल्याने येथे कॉस्मोपोलीटन संस्कृती आहे . पाचगणी शहर छोटे असल्याने बहुभाषिक वेगवेगळ्या प्रांतातील मंडळी छानपैकी एकत्रितपणे राहतात . अशा या गावात माझे बालपण गेले . दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि चांगले मार्क मिळाले म्हणून अकरावीसाठी कॉलेजचा शोध सुरु झाला . त्याचवर्षी वाईला किसनवीर महाविद्यालयात नव्याने सायन्स कॉलेज सुरु झाल्याचे कळाले . BSc डिग्री मिळण्याची चांगली सोय झाली होती . त्यामुळे घरच्यांनी मला अकरावी सायन्सला प्रवेश घेण्यासाठी फोर्स केला . मी मात्र नाराज झालो होतो कारण माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले होते व सायन्सचे विषय इंग्रजी माध्यमात शिकवले जाणार होते . इंग्रजीची माझी खूप आबाळ झाली होती कारण सातवीपर्यंत आम्हाला इंग्रजीचे शिक्षकच नव्हते . इंग्रजी , गणित , सायन्स या विषयाची तर माझी कुडंली कधी जमलीच नव्हती पण त्याकाळी उलट उत्तर देण्याची प्रथा नव्हती त्यामुळे मी मुकाटपणे वाईला सायन्स कॉलेजला रोज एस.टी बसचा पास काढून येऊ लागलो .       सायन्सच्या या वर्गात शिक्षक मला काय शिकवत होते याचे मला भान नव्हते कारण मला इंग्रजी भाषाच समजत नव्हती . चाळीस पन्नास विद्यार्थी असल्याने मागच्या बेंचवर बसायला लागलो आणि मला एक नविन छंद लागला . मी चित्रे काढायला लागलो . माझ्या मित्रांची , शिक्षकांची , प्राण्यांची , वनस्पतींच्या जर्नलमध्ये आकृत्या काढणे मला आवडू लागले . कधी कधी मी वाईच्या बसमधून पसरणीघाटात उतरायचो . या घाटातील वळणदार रस्ते , दुतर्फा असलेली वडाची झाडे , पांडवगडाच्या पायथ्याच्या सभोवतालची छोटी छोटी चमकणारी भातशेती , ऊन पावसाचा खेळ , संध्याकाळची सुर्यास्ताची रंगउधळण , वाईच्या गणपती मंदिराची , वेगवेगळ्या घाटाची चित्रे मी जलरंगात उतरवू लागलो . थोडक्यात मला चित्रकलेची फारच आवड निर्माण झाली होती . चित्रकार होण्यासाठी लागणारी इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा मी बारावी सायन्सला असताना दिली व त्यामध्ये मला 'अ 'श्रेणी प्राप्त झाली होती .       चित्रकलेचे वेड इतके वाढले की मी सकाळी सहा वाजताच थंड हवेत चित्र काढायला जायला लागलो . टेबललॅन्डच्या पठारावर तर कधी सिडनेपाँईटच्या उंच चौथऱ्यावर बसून मी धोमधरणाचे पाणी ,कृष्णा व्हॅलीतील डोंगररांगा , कधी पांगारी तायघाट जवळच्या पारसी पॉईंटची चित्रे रेखाटू लागलो . आणि अचानक माझ्या लक्षात आले मला अतिथंड हवेत सकाळी फिरल्याने सर्दीचा त्रास सुरु झाला आहे . ऑक्सिजिन घेण्यासाठी दोन्ही नाकपुड्या बंद झाल्याने श्वास घेणे मुश्कील झाले आहे . डॉक्टरांनी माझे ऑपरेशन करून नाकातील वाढलेले पॉलीप्स काढावे लागतील यासाठी तातडीने ॲडमिट केले . नाकाला मोठे बँडेज बांधूनच मी 12वी सायन्सची प्रॅक्टीकल परिक्षा दिली होती . त्यानंतर  पुण्याला चित्रकलेच्या अभिनव कॉलेजला मी गेलो . चित्रकार झालो व परत पाचगणी महाबळेश्वरचा निसर्ग रंगवू लागलो होतो . थंड हवेत वेळीअवेळी सतत डोंगररांगावर भटकंती केल्याने माझा नाकाने श्वास घेण्याचा त्रास आणखीनच वेगाने वाढू लागला . डॉ. प्रशांत पोळ यांनी वेगवेगळ्या वर्षी चारपाच वेळा माझे ऑपरेशन केले आहे . एकंदरीत मला थंड हवेची ॲलर्जी झाल्याचे सिद्ध झाले व डॉक्टरांनी 2014 साली मी पाचगणी सोडावी लागेल असे निक्षून सांगितले . मला माझे पाचगणीचे बस्तान सोडून  कायमचे  वाईला यावे असे त्यांनी सांगितले व नाईलाजाने मी काही दिवस वाईला राहण्याचे ठरवले .          वाई कॉलेजचे प्राध्यापक असलेले माझे मित्र श्री .पटकुरे सर यांनी मला सह्याद्रीनगर या परिसरात बोलावले . थोडी चर्चा केली तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की त्यांच्या सोसायटीत " प्रज्ञाअमृत " नावाचा एक बंगला आहे . त्याचे मालक श्री .व सौ झांबरे दोघेही शिक्षक आहेत . त्यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर पाच खोल्यांचे घर भाड्याने मिळते . तेथे काही दिवस राहून वाईच्या परिसरातील चित्रे काढावीत . हवा बदलाने तब्बेतीवर काय परिणाम होईल हेही कळेल व एखादी जागा आवडली तर घर बांधण्यासाठी वाईत एन ए प्लॉट घ्यावा या उद्देशाने मी त्यांच्या घरी आलो .         सहयाद्रीनगरात असलेला " प्रज्ञाअमृत " अतिशय मेंटेन केलेला ,फुलझाडे असलेला सुंदर बगीचा व पार्किंगची सोय असलेला बंगला बघताक्षणीच मला आवडला . बंगल्याच्या पाठीमागे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी स्वतंत्र जीना होता . आतमध्ये सर्व नीटनेटकेपणा होता . खिडक्या दरवाजानां पडदे लावलेले होते . आम्ही दोघेही चित्रकार असल्याने चित्रकाम करण्यासाठी व राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होती . झांबरेसर , झांबरेमॅडम व त्यांची मुलगी मृणाल हे तीनच माणसे खाली रहात होते . त्यांचा मोठा मुलगा प्रणव शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला होता . पहिल्या भेटीतच आमची छान ओळख झाली व लगेच प्राथमिक बोलणी करून मी एका आठवड्यात पाचगणीवरून वाईला शिफ्ट झालो . सर व मॅडम दोघेही स्वच्छताप्रेमी होते . त्यामुळे मी रोज मॉर्निंगवॉकला वाकेश्वरला जाताना पाहायचो झांबरे सर स्वतः साफसफाई करायचे , कुंड्यांना पाणी घालणे , झाडांची निगा राखणे ,खतपाणी देणे . पूर्ण आवार पाण्याने स्वच्छ धूवून काढायची त्यांनां आवड होती . आम्ही कधीतरी समोरासमोर भेटलो की अनेक विषयांवर गप्पा मारायचो . वाईत राहण्याचे फायदेतोटे तपासून पहायचो . येथील परिसराचा माणसांचा स्वभाव व आचरणांवर चर्चा करायचो . नवनव्या जागा शोधायची आता सवय लागली होती . त्याचा आढावा घेताना झांबरे सर मनापासून प्रतिक्रिया द्यायचे .       " प्रज्ञाअमृत " या बंगल्यामध्ये रहात असताना एक घडलेला प्रसंग मला आजही लक्षात आहे व आयुष्यभर पुढेही कायम लक्षात राहील . एकदा रविवारी सुट्टीचा दिवस होता . साधारण नऊ दहा वाजताची वेळ असेल . आमची घरकाम कारणारी बाई आज येणार नव्हती त्यामुळे दोघेही निवांत पेपर वाचत बसलो होतो . आणि शेवटच्या दूरच्या खोलीतील अचानक कोपऱ्यातील किचनसिंकचा का वॉशबेसीनजवळचा नळ अलगद तुटून पडला होता . पाईपलाईन उघडी झाली आणि वेगाने पाणी रूममध्ये पसरु लागले होते . आम्ही विरुद्धदिशेच्या बाजूला असल्याने काही आवाजच आला नाही . हळूहळू पडणाऱ्या पाण्याने ती रुम भरून गेली होती आणि अचानक खालून झांबरे मॅडम व सर दोघेही वरच्या मजल्यावर आले .त्यांनी घराची बेल वाजवली आणि त्यांच्या लगेच लक्षात आले की शेवटच्या खोलीतून पाणी जवळपास चारपाच इंच भरून दुसऱ्या रूममध्ये पाणी पसरू लागले होते . झांबरे सरांनी लगेच प्लंबरला फोन लावला येताना नवीन नळ घेऊन यायला सांगितले . पटकन टेरेसवर जावून मुख्य पाईपलाईन बंद केली . इतक्यात झांबरे मॅडम पटकन खाली गेल्या , येताना त्यांनी फरशी पुसण्याचा रबरमॉप व चारपाच फरशी पुसण्याचे जाड कपडे घेऊन एक बादली आणली . त्यांची मुलगी मृणाल देखील मदतीला आली . इकडे बनियन व लुंगी घालून निवांत बसलेले झांबरे सर गुडघ्यापर्यंत लूंगी गुंडाळून पटकन फरशीवरील पाणी बादलीत भरू लागले . झांबरे मॅडम यांनी लगेच साडीचा पदर खोचून मॉपने पाणी बाहेर टाकायला सुरुवात केली . मग आम्ही दोघेही त्यांच्यामध्ये सामील झालो व सर्व जणांनी रुममध्ये साचलेले पाणी काढून तासाभरात सगळा बंगला चकाचक केला . नंतर प्लंबर आला त्याने नवीन नळ बसवला .आता तुम्ही म्हणाल यात आश्चर्याची गोष्ट काय ? तर आम्ही झांबरे सरांचे भाडेकरू होतो . पाण्याचा नळ दुरुस्त करून रुम साफसफाई करण्याची जबाबदारी आमची होती . ते घरमालक होते . उच्चशिक्षित पी एच डी झालेले कॉलेजचे प्राध्यापक होते . मॅडम एम एस सी व जॉय स्कूलच्या उपप्राचार्या होत्या . एकदा घर भाड्याने दिले की त्याची देखभाल करण्याची जबाबदारी भाडेकरूचीच असते . त्यादिवशी दुपारी आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि तो प्रसंग एन्जॉय केला . कोणीही कसलीही तक्रार झाली नाही . दोन चार महिन्यातच आम्ही " प्रज्ञाअमृत " बंगला सोडला . नवीन जागा घेतली तेथे मोठे अपयश आले . नंतर मग आमचा मेणवली गावाजवळ " निसर्ग " नावाचा बंगला तयार केला . मागच्या वर्षी तेथे " निसर्ग आर्ट गॅलरी " नावाने चित्रप्रदर्शनही भरवले होते . अनेक वेगवेगळ्या जिल्हयातील , तालुक्यातील पर्यटक प्रदर्शन पाहण्यासाठी येत होती . एकदा किसनवीर कॉलेजचे प्रा. श्री रमेशचंद्र बारगजे सरांनी फोन केला की त्यांच्या कोल्हापूरच्या 1973 सालच्या एम .एस .सी बॅचचे क्लासमेटस यांचे वाई येथे गेटटुगेदर आयोजित केले आहे त्यावेळी तुमची निसर्ग आर्ट गॅलरी पाहायला सर्वजण येणार आहेत . धोमचे मंदिर पाहून सर्व गाड्या निसर्ग आर्ट गॅलरी पाहण्यासाठी गेटपर्यंत आल्या . त्यानां पार्कींगची जागा दाखवत होतो त्यावेळी एक गाडी मात्र गेटपासून दूर थोड्या अंतरावर उभी राहीलेली पाहीली . बारगजे सरानां ती गाडी बाहेर का थांबली म्हणून विचारले तर सरांनी कपाळावर हात मारून घेतला . मला म्हणाले काय बोलू आता ? ती गाडी तुझ्या सख्या चुलत व मावसभाऊ असलेल्या हनुमंत काळे यांची आहे . तो आमच्या बॅचचा सर्वात अतिशय हुशार विद्यार्थी होता . युनिव्हरसिटीत प्रथम आला होता . त्याला आम्ही सांगितले चित्रकार सुनील काळे तुझा भाऊ आहे . त्याने वाई ,पाचगणी महाबळेश्वर या परिसरातील असंख्य अप्रतिम चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत , त्याची मिसेस चित्रकार स्वाती काळे हिने असंख्य फुलांची तैलरंगात चित्रे काढलेली आहेत . उत्तम चित्रप्रदर्शन आहे . तुमची तीस वर्ष झाली भेट झालेली नाही तर तुम्ही आता जरूर भेटा व प्रदर्शनही पहा . पण तुझा भाऊ गाडीतून उतरायला तयार नाही त्याचे कुटुंबीय गाडीतच बसून आहेत .ते म्हणतात आम्ही भावकीत जात नाही कारण आमचे " स्टॅन्डर्ड " मोठे आहे . मी मोठ्या कंपनीत ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर होतो . तो साधा चित्रकार आहे त्याची माझी तुलना होऊ शकत नाही . तुम्ही सगळे प्रदर्शन पाहायला जा आम्ही बाहेर रस्त्यावर गाडीत बसून राहू . तो एक तास बाहेर थांबला पण घरात आलाच नाही . खरे तर हा हनुमंतदादा आता हेमंत नाव लावतो . कारण आईबापाने ठेवलेले हनुमंत हे नाव त्याला आवडले नाही . अतिशय गरिबीतून त्याला शिक्षण दिले होते .स्वतःच्या कर्तबगारीने तो उच्चपदावर पोहचला त्याचे उच्चशिक्षित मुलीबरोबर लग्न झाले पण लग्नानंतर व अगोदर नोकरी करत असतानाही या दादाने कधीच कोणत्याही भांवडाला जवळ केले नाही . कोणत्याही नातेवाईकांकडे ते फिरकले नाहीत . कोणाशी कसलाही संबंध ठेवला नाही ,कोणालाही मदत केली नाही . संपूर्ण कुटुंबाला दूर ठेऊन दादा मोठा स्टॅन्डर्डवाला झाला . आमचा दादा कसा दिसतो हे मला पाहण्याची उत्सुकता होती . कारण तो माझ्यापेक्षा पंधरावीस वर्षांनी मोठा होता . पण " स्टॅन्डर्ड "आडवे आले . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात . शिक्षणामुळे माणूस विचारवंत होतो त्याच्या ज्ञानाच्या कक्षा उचांवतात . त्याचे जीवन सुखकर व समृद्ध होतेच पण त्याच्यां विशाल छायेत अनेकानां संजीवनी मिळते . उच्चशिक्षित भावाने मात्र आमच्या सर्वांसाठी त्याचे दरवाजे मात्र कायमचे बंद केले होते . उच्चशिक्षणाचा मला तेथे काहीच उपयोग झालेला दिसला नाही . इथे मला पीचडी झालेले उपप्राचार्य झांबरे सर आठवतात . उपप्राचार्या झांबरे मॅडम आठवतात . स्वतःच्या भाड्याने राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाशी प्रेमाने सुखदुःखाची विचारपूस करत असत . ते दोघेही स्वतःचे " स्टॅन्डर्ड "कधी गोंजारत बसले नाहीत .  सामान्य माणसासारखे राहून दोघेही असामान्य कामे करत राहीली . जॉय स्कूल व किसनवीर विद्यालयातील विद्यार्थी घडवताना आपल्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांला घडवण्याचे . " स्टॅन्डर्ड " काम त्यांनी आयुष्यभर केले व त्याचा गर्वही कधी केला नाही . जीवन जगण्याचे खरे " स्टॅन्डर्ड " त्यांनां कळले आहे म्हणून माझ्या त्या अतिउच्चशिक्षित एम एस सी फर्स्टक्लास झालेल्या अडाणी भावापेक्षा झांबरे पती पत्नींविषयी मला आदर वाटत आहे .     महिन्यापूर्वी एकदा झांबरे मॅडमचा मला फोन आला . त्यांनी विचारपूस केली व त्या जॉय स्कूलची नोकरी सोडून पुण्यात नातवाचा सांभाळ करण्यासाठी पुण्यात रहात असल्याचे सांगितले . मुलगा सिव्हील इंजिनियर व सुनबाई पेशाने सरकारी वकील असल्याने दोघेही कामात व्यस्त झाले मग मुलाकडे लक्ष कोण देणार ? म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला . आणि ते ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . माझी आर्ट गॅलरी होती . ती सांभाळताना माझी तीन वर्षाची मुलगी सांभाळण्यासाठी मी आईवडीलानां विनंती केली तर त्यांनी नकार दिला . गावाकडे शेतीची कामे असतात त्यामुळे तुमची मुलगी तुम्हीच सांभाळा असे उत्तर आईने दिले . शेवटी आमच्या संघर्षाच्या लढाईत मुलगी देवाघरी गेली . ती वारली त्यावेळी मी माझ्या मेव्हण्याला सत्यजितला फोन केला . तो म्हणाला मी अत्यंविधीला येऊ शकणार नाही . तो देखील Phd झालेला आहे . अतिउच्चशिक्षित आहे . त्याला भाचीच्या अत्यंविधीला जाण्याची गरज वाटली नाही . बहिणीला कठीण स्थितीत आधार देण्याची आवश्यकता वाटली नाही आणि पुढे आता सत्तावीस वर्ष झाली तरी त्याला आमची कधीच आठवणही झाली नाही . काय उपयोग त्या डॉक्टरेटचा ? जिथे माणूस माणसाला ओळखत नाही .मोबाईल ,फोन , लॅपटॉप आले तंत्रज्ञान वाढले तरी मनाची आढी मात्र कायम राहीली .कधी त्याच्या कुटूंबाने संपर्कच केला नाही कारण "स्टॅन्डर्ड " आडवे आले .त्यावेळी खऱ्या अर्थाने एकटे जगायला शिकलो . अशावेळी झांबरे मॅडमचा त्याग मला प्रेरणा देणारा वाटतो . मुलांविषयची माया त्यांच्या कृतीतून दिसते .इकडे सरांनां रिटायर्ड होण्यापूर्वी खानावळीत जेवण करावे लागले . काही महिने एकटेपणा स्विकारावा लागला . पण त्यांनी कधीही त्याची तक्रार केली नाही . कॉलेजमध्ये त्यांनी अनेक कार्यक्रमात स्वतःला झोकून दिले . त्यांच्या कॉलेजच्या कारकीर्दीची मला जास्त माहिती नाही पण त्यापेक्षा माणुसकी जपणारे , कुटुंबाला जपणारे , अभिमान नसणारे , मोठेपणाचा त्याग केलेले गार्डनमध्ये स्वच्छता करणारे डॉ झांबरे सर मनाला फार भावले . त्यांच्या मुलाचे लग्न ठरले त्यावेळी प्रणवच्या लग्नाला आम्ही दोघेही गेलो होतो . लग्नकार्यालय पूर्णपणे भरून गेले होते प्रचंड गर्दी होती तरीही झांबरेसरांनी आम्हाला बरोबर पकडलेच . शाल श्रीफळ देऊन योग्य मानसन्मान केला त्यावेळी मला या झांबरे कुटूबांचेखरे " स्टॅन्डर्ड " कळाले . वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य नामवंत लहानमोठ्या माणसांनी संपूर्ण हॉल भरून गेला होता . काय असते स्टॅन्डर्ड ?? तुम्ही जगत असता त्यावेळी त्या तुमच्या जगतानाच्या काळात असंख्य माणसे भेटतात . त्यातील काही माणसे चांगली वागलेली असतात काही वाईट वागलेली असतात . पण शेवट काय असतो ? तुमच्या जगण्याला कधीतरी मर्यादा येतेच . कधीतरी शरीर थकते व तुम्हाला अंतिम श्वास घ्यावा लागतो . त्यानंतर कोणत्यातरी स्मशानघाटाजवळ तुमची राख होते ती राख पाण्यात मिसळते तुमचे अस्तित्व संपते . जग काही दिवस तुमची आठवण काढते नंतर तुमची कोणी आठवणही काढत नाही . तुमचे " स्टॅन्डर्ड " काही असो शेवटी तुमची राखच होते . हे ज्यानां समजते त्यांचे भावविश्व वेगळे असते . ते कायम हसतमुख असतात . ते त्यांच्या कृतीतून त्यांचे वेगळेपण जोपासत असतात .अनेकानां त्यांचे जगणे प्रेरणा ठरत असते .असे जीवनाचे खरे " स्टॅन्डर्ड " कळालेले झांबरे सर मला आवडतात . काही महिन्यांपूर्वी अचानक आमच्याकडे घरकाम करणाऱ्या बाई व माळीकाम करणारा त्यांचा मुलगा या दोघांनी आमचे काम सोडले. काही दिवस आम्ही वेगवेगळी माणसे शोधली पण त्यांच्या पगाराच्या अपेक्षा जास्त असल्याने जुळले नाही . मग झांबरे सर पुन्हा आठवले . Phd झालेला माणूस स्वतः झाडलोट करतो , बागेची निगा राखतो तर आपण का लाजायचे ? त्यांच्यापासून प्रेरणा घेतली . आता मी बागकामात तरबेज झालोय बागेत शेतात काम केल्यामुळे आरोग्यही चांगले राहते याचा शोध लागला . आपण कोणावर विसंबून राहायचे नाही काम करत राहायचे हेच खरे " स्टॅन्डर्ड " झांबरे सरांकडून मी शिकलो . खरी डॉक्टरेट तीच आहे . मे महिन्यात ते आता रिटायर्ड होतील . अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या सरानां व झांबरेमॅडम या दोघांनाही उर्वरीत रिटायर्ड आयुष्य सुखसमृद्धीचे आनंदाचे जावे त्यांच्या मनासारखे जगताना उत्तम आरोग्य प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना व मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !चित्रकार - सुनील काळे✍️9423966486निसर्ग आर्ट गॅलरी [वाई]