ब्लॉग संग्रहण

गुरुवार, २६ जून, २०२५

इनायत आणि कोल्हापूरच्या आठवणी

इनायत व कोल्हापूरच्या आठवणी
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      वाईजवळ तीन किमी मेणवली गावाजवळ खेडेगावात निसर्ग आर्ट गॅलरी सारखा प्रोजेक्ट सुरु करताना एक जवळचा मित्र म्हणाला अरे , या आडबाजूला पाचगणी महाबळेश्वरचा मुख्य रस्ता सोडून इकडे गॅलरीला कोण येणार एकदम फ्लॉप आयडीया आहे . मी सुद्धा त्याचा निराशावादी सुर ऐकून मनातून कचरलो , प्रदर्शनाचा थोडा वेडा व वेगळा प्रयत्न आहे पण 7 मे ते 7जून पर्यंत एक महिना प्रयत्न करूया अन्यथा गॅलरी पुढे सुरु ठेवायची का नाही ते नंतर  ठरवू असे ठरले.
पद्मश्री श्री .अच्युत पालव यांच्या शुभहस्ते उदघाटन केले .
             पहिल्या आठवड्यात अपेक्षेपेक्षा थोडी गर्दी कमी होती पण नंतर हळूहळू पावसाने मे महिन्यातच उच्छाद मांडला व आणखीनच नैराश्य वाढले . आणि अचानक सकाळी आठ वाजताच मोबाईलवर फोन आला . सुनिलभाई कैसे हो ? तुम्हारी आर्ट गॅलरी देखने के लिए मुंबईसे सोला लोगोंकी मिनी बस लेकर मुंबईसे वाईमें आया हूँ । गुगल मॅप भेजो , मै इनायत पित्तलवाला बोल रहा हूँ।
        थोड्याच वेळात एक मिनी बस आमच्या प्रवेशद्वाराजवळ दाखल झाली आणि त्या गाडीतून बोहरी जमातीच्या ड्रेसमधील काही महिला व पुरुष मंडळीची टिम गॅलरीत दाखल झाली . 
        1985 साली मी बारावी सायन्स पास झाल्यानंतर घरच्यांचा विरोध स्विकारून आयुष्यात पहिल्यांदा घराबाहेर कोल्हापूरला आलो होतो . कसलाही बाहेरच्या जगाचा अनुभव नव्हता . कोल्हापुरच्या आयटीआय कॉलेजसमोर मला कलानिकेतन महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता . त्यापूर्वी जेजे स्कूल ऑफ आर्ट व पुण्याच्या अभिनवला प्रवेशासाठी प्रयत्न केला होता . ती दोन्ही गजबजलेली आर्ट स्कूल पहिल्यानंतर दूर आडरानात एकमजली फार भव्य बांधकाम नसलेले कलानिकेतन पाहून मी थोडा निराश झालो होतो .
         प्राचार्य अरविंद मेस्त्रींनी पहिल्याच दिवशी विचारले कोल्हापुरात  कुठे राहणार ? मी म्हणालो माहीत नाही , पहिल्यांदा आलोय येथे , माझ्या ओळखीचेही कोणी नाही व नातेवाईकसुद्धा नाहीत . त्यादिवशी एसटी स्टॅन्ड वर झोपलो . सकाळी झाडूवाल्याने उठवले तेथे तोडांवर पाणी मारले व तीन चार किमी  चालत पुन्हा कॉलेजला दाखल झालो . दुसऱ्या दिवशी परत मेस्त्रीसरांनी विचारले कुठे राहीला रात्री ? मी एसटी स्टॅन्डवर राहीलो हे ऐकताच ते माझ्याकडे आश्चर्याने पाहून त्यांच्या शिपायाला म्हणाले बापू याची जरा सोय कर इतर मुलांबरोबर याला दुपारी जेवायला दे .
           संध्याकाळी बापू केळुस्कर मला बाजुच्याच कॉलेजशेजारी असलेल्या मोरे कॉलनीतील एका बंगल्याच्या तळमजल्यावर घेऊन गेला . तेथे कॉलेजमध्ये शिकणारे संजय देसाई , इनायत पित्तलवाला , गंगाधर गोंधळी व रामदास जगताप ही एलेमेंटरी कमर्शियल व एटीडीला शिकणारी मुले माझ्याच वयाची होती . त्यांनी फौंडेशनला शिकणारा असून मला लगेच त्यांच्या ताफ्यात सामावून घेतले . बापू केळुस्करने आमच्या पाचही जणांची दोन्ही वेळच्या जेवणाची सोय त्याच्या घरी केली होती . बापू जवळच एका बंगल्याच्या आवारात औट हाऊसमध्ये रहात होता .
          पहिल्या दिवशी मी त्या बंगल्यात गेलो तर चष्मा लावलेला , खाकी हाफ पँट व पांढरा शर्ट घातलेला एक म्हातारा माणूस बागेत खूर्ची टाकून पुस्तक वाचत बसलेला होता . बापूने गेटवर ओळख करून दिली व पाया पडायला सांगितले आणि विचारले ओळखलेस का हे कोण आहेत ते ? मी नाही म्हणालो .
हे आहेत भालजी पेंढारकर . चंद्रकांत मांडरे असलेला महाराजांचा चित्रपट पाहीलास का ? यांनीच बनवला तो . मी तो चित्रपट पाहिलेला होता पण भालजींना प्रथमच पहात होतो . मग त्यांनी कोल्हापूरी टोनमध्ये विचारले व्यायाम करतोस का नाय ? मी नाही म्हणालो . मग त्यांनी बापूला सांगितले रोज दहा जोरबैठका मारल्याशिवाय याला खायला देऊ नको . बापू लगेच होय म्हणाला .दिवसा कलानिकेतन व रात्री जयप्रभा स्टुडीओत रात्रीचा वॉचमन म्हणून बापू केळूस्कर काम करायचा .
         या काळात माझी या ग्रुपसोबत घट्ट मैत्री सुरु झाली . इनायत अतिशय शांत व सोज्वळ स्वभावाचा होता . मुंबईला गोरेगावला राहत होता . त्याचे वडील व काका कमर्शियल आर्टिस्ट होते त्यांचा स्टुडीओ होता . त्यावर्षी जेजे स्कूल व बान्द्रा स्कूलमध्ये ॲडमिशन न मिळाल्यामुळेच तो नाईलाजाने कोल्हापूरला आला होता . तो वेगळ्या धर्माचा असूनही कधीही त्याने कोणाशी वादविवाद केला नाही . आम्ही कोल्हापुरात सगळे नवखे व समान अडचणींना सामोरे जात होतो . एकमेकांच्या अडचणी समजून घेऊन एकमेकानां मदत करत होतो .
           सकाळ संध्याकाळी दहा जोरबैठका मारायच्या , गंगावेशीवर जाऊन म्हशीचे धारोष्ण दूध प्यायचे , केशवराव भोसले नाट्यगृहाचे नाटकांचे बोर्ड रंगवायचे , कधी जयप्रभा स्टुडीओत छोटे मोठे सेट रंगवायची कामे करायचो . कोल्हापूरकर खूपच हौशी मंडळी त्यावेळी छत्र्यांवर नावे टाकण्याची फॅशन होती. कधी गाड्यांच्या नंबर प्लेटा , साईन बोर्ड रंगवायचो . निसर्गचित्रणाचा नाद आणखी पक्का होण्याचे कारण म्हणजे स्वतः अरविंद मेस्त्री कधी कधी कॉलेजच्या आवारातच लँडस्केप करायचे . चंद्रकांत मांडरेचे संग्रहालय राजारामपूरीत त्यावर्षी तयार होत होते . पन्हाळा , रंकाळा , खाणीचा परिसर , कसबा बावडा , शालीनी पॅलेस , न्यू पॅलेस , भवानी मंडप याठिकाणी स्केचिंग व निसर्गचित्रणासाठी जायचो . त्याकाळात टाऊन हॉल म्युझियम , शिवाजी चौकातील डॉ. काटे यांच्या हॉस्पीटलमध्ये आबालाल रहिमान , अरुल राज , पॉल राज ,चंद्रकांत मांडरे , एस.एम . काझी , बाबुराव पेंटर ,रविंद्र मेस्त्री यांच्या कलाकृती पहायला मिळायच्या . एस.निंबाळकर  यांच्यामूळे अनेक चित्रकारांच्या ओळखी होत होत्या . त्या सर्वांमध्ये कायम लक्षात राहील्या त्या प्रेमा भोसले मॅडम आमच्या सर्वांच्या फौडेंशनच्या कडक शिस्तीच्या आदर्शशिक्षिका . त्यांच्यामुळे चित्रकलेचा पाया खरोखर पक्का झाला . त्या फार जिव्हाळ्याने शिकवायच्या त्यांच्या असाईनमेंट पूर्ण करणे चॅलेंज असायचे .महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिरात जाऊन दहा स्केचिंग करणे त्याकाळातील सर्वात मोठी टास्क असायची . माझा नवा रूम पार्टनर कागलचा अमृतराव पाटील व मी रोज चालत जात स्केचेस करायचो . चित्रांचा पसारा वाढल्यामुळे मी बाजूच्याच प्रकाश कोठावळे यांच्या बंगल्यात शिफ्ट झालो पण जेवणासाठी आम्ही एकत्रच बापू केळूस्कर यांच्याकडे जायचो .
        कोल्हापूरची माणसे साधी व सतत मदतीचा हात पुढे करणारी मंडळी . भरपूर भांडणार , तांबडा पांढरा हाणणार , एकमेकानां शिव्या घालणार पण माणुसकी जपणार . चाळीस वर्षांपूर्वीचे कोल्हापूरकर मित्र व मैत्रिणी आजही संपर्कात आहेत काही वर्षांपूर्वी आम्ही छान गेट टू गेदर केले होते . कोल्हापूरला वेळ व संधी मिळाली की जाण्यास मी नेहमी तयार असतो . ते दिवस सोनेरी व कायम लक्षात राहणारे होते .
         चाळीस वर्षांपासूनची ही मैत्री इनायतने व मी आजही टिकवून ठेवलेली आहे . इनायत एक वर्ष पूर्ण करून परत मुंबईला गेला व मी त्याचवर्षी पुण्याला आलो . पुढे बरीच वर्ष आमचा संपर्क नव्हता . तरुणपणातील दोघांचेही त्यावेळेचे काळेभोर केस आता पांढरेशुभ्र झाले आहेत . कोव्हीडच्या काळात त्याची मिसेस गेली . दोन्ही मुलींची लग्ने होऊन एक बँगलोर व एक मुंबईत स्थायिक आहे .इनायत आता एकटा मीरा रोड येथे राहतो .
         निसर्ग आर्ट गॅलरी पाहण्यासाठी व मला भेटण्यासाठी चाळीस वर्षांनंतर उरामध्ये साठवलेल्या अनेक आठवणी घेऊन हा मित्र सर्व नातेवाईकानां घेऊन मुंबईवरून वाईला भेटायला आला . मित्रत्व जपण्याची ओढ असली व एकमेकांविषयी आदरपूर्वक खरे प्रेम असले की माणसे प्रत्यक्ष भेटतात नाहीतर फेसबुक व्हॉटसअपच्या आभासी जगात मित्र नातेवाईक शेजारून चालले तरी ओळख दाखवत नाहीत भेटणे तर फार फार दुरची गोष्ट असते . एक मित्र प्रत्यक्ष भेटणे म्हणजे एक आठवणींचा अध्याय असतो . त्याच्यासोबत घालवल्या क्षणांची मनाच्या करण्यामध्ये उजळणी असते . तो एक ठेवा असतो अविस्मरणीय गोष्टींचा .
         आता वाटते बरे झाले गॅलरी सुरु केली नाहीतर अशा दूर माणसांच्या गर्दीत  मुंबईसारख्या शहरामध्ये हरवलेल्या  मित्राची प्रत्यक्ष भेट कशी झाली असती ? इनायतच्या भेटीमुळे कोल्हापूरातील दिवस आठवले .
त्यामुळे आता निसर्ग आर्ट गॅलरी पुढे सुरु ठेवायचा निश्चय केला आहे . 
तुम्ही देखील या , जमेल तसे वेळ काढून या . 
सर्वांना सप्रेम निमंत्रण आहेच .
सोबत कॉमेंटसमध्ये गूगल मॅपची लिंक दिलेली आहे .
फेसबुकवर इन्स्टाग्रामवर Nisarg Art Gallery या पेजला फॉलो करा. तेथे गॅलरीचे रोजचे अपडेट आहेत .
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
निसर्ग आर्ट गॅलरी
मेणवली धोम रोडवर नाना फडणीस वाड्यापासून अर्धा किमी मुख्य रस्त्यालगत .
मु.पो भोगाव , ता.वाई ,
जिल्हा . सातारा - 412803
वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत .
सर्वांना मुक्त प्रवेश [No Entry fee]
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
चित्रकार सुनील काळे✍️ 9423966486
निसर्ग आर्ट गॅलरी [वाई]

मंगळवार, २४ जून, २०२५

एक दिवस - एक स्केच

एक दिवस - एक स्केच
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
रात्रीचे सव्वाअकरा वाजलेत .
मी गावाबाहेर रहात असलेल्या 
" निसर्ग " बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त स्टुडिओत माझ्या तीस पस्तीस वर्षांच्या कालावधीत केलेल्या दोन तीन हजार रफ स्केचेसचा पसारा घेऊन बसलोय . सगळीकडे घनदाट नीरव शांतता आहे . या नीरव शांततेला भंग करणारा कसलाही आवाज नाही . काही वेळापूर्वी प्रचंड तुफान पाऊस पडल्यामुळे आजूबाजूच्या शेतात  डबकी साचलेली आहेत . त्या डबक्यातून डोके काढून लहानमोठे बेडूक कसलेतरी चित्रविचित्र आवाज काढत आहेत . त्यापेक्षाही दूर आमच्या खेडेगावातील मंदिराच्या गाभाऱ्यात काही गावकरी एकतारी घेऊन तालसुरांच्या नियमानां धुडकावून शांततेचा भंग करत मोठमोठ्याने बेताल सुरांमध्ये लाऊडस्पीकर लावून भजने गात आहेत. खरं तर देवाला लाऊडस्पीकरची काय गरज असते ? त्याला का ऐकू येत नाही ?  पण खरे कारण वेगळेच आहे . आम्ही गावात राहतो , म्हणजे शहरी नियमांशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही ही एक गोष्ट व दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही भजने करतोय म्हणजे आम्ही धार्मिक पुण्यकार्य करतोय त्यामुळे तुम्ही हे सहन केलेच पाहीजे असा सर्वानां समजलाच पाहीजे हा एक छूपा अट्टहास असतो .
         का बरे ही मंडळी भजने गात असावीत ? काय मिळत असेल त्यांना? आत्मिक समाधान ? सत्याचा ? ईश्वराचा शोध ? नुसता टाईमपास ? की स्वतःलाच स्वतः विसरण्याचा प्रयत्न ? का आणखी स्वतःलाच स्वतःमध्ये शोधण्याचा प्रयत्न किंवा काही अदृश्य हेतूही असावा का ? असे भराभर मला फारच गंभीर प्रश्न पडतात . त्या भजन मंडळीतील एखादाच खरा निष्णात , तालासुरांची जाणीव असलेला असावा बाकीची त्यांच्या ओबडधोबड आवाजात सुरात सूर मिसळून गाण्याचा विचका करत आहेत पण त्यांची कोणाची एकमेकांशी तक्रार नाही . आपण सगळेच बेसुरे आहोत पण शुद्ध मनाने सुरांचा शोध घेत राहीले पाहिजे अशी त्यांची धारणा असावी .
        मी जी स्केचेस केलीत त्यांची वेगवेगळी माध्यमेही अशी बेसुरी भजनांसारखीच आहेत . काही काळ्या पेनाने , काही चारकोलने , काही ब्रशने , काही रंगीत पेन्सीली वापरून ,काही जलरंगात , तर काही काळी फाऊंटन पेनाची इंक वापरुन केली आहेत . यामध्ये परीपुर्णत्वाचा ध्यास नाही . काही सहज आनंदासाठी , काही टाईमपाससाठी तर काही तो विषय समजून घेण्यासाठी , काही अभ्यासासाठी चित्राच्या पूर्वतयारीसाठी केलेली स्केचेस आहेत . 
      कदाचित त्या गावकऱ्यांची ईश्वराला साद देत देवत्वाचा शोध घेण्याची इच्छा किंवा भजनातून व्यक्त करण्याची कृती असेल . माझा देखील वाई ,पाचगणी , महाबळेश्वराच्या परिसरात रानोमाळ हिंडून शहरातून निसर्गाचे सौंदर्य कागदावर पकडण्याचा प्रयत्न स्केचमधून प्रतिबिंबित होत असेल . 
     निसर्गाचा गुरु कोण ? स्वतः निसर्गदेवच .हा निसर्गदेवच चित्ररूपाने माझ्या पाठीशी उभा राहून समोरच्या दृश्यांची  ज्ञातअज्ञात रुपे  स्केचरूपाने माझ्याकडून करून घेत असावा . निसर्गदेव असा छान सर्वत्र पसरला आहे . त्याचा आपण सर्वजणच जमेल तसे शोध घेण्यात आस्वाद घेण्यात मग्न असतो फक्त प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे असते. काहींचे भजन तर काहींचे चित्र .
        दृश्य पेंटिंग्जच्या रुपाने रंगाचा आधार घेत रेखाटणारे चित्रकाराचे हात असोत वा कवीमनाच्या लेखकाने निर्माण केलेल्या काव्यपंक्ती असोत , त्या काव्यपक्तीनां निरागसरुपाने साकार करणारे गायक असोत वा त्यांना सुरबद्ध करणारे संगीतकार असोत . चित्रकार , शिल्पकार , गायक , संगीतकार व समस्त विश्वातील अनेक कलाकारांमुळे ह्या दगदगीच्या भाकड बेसूर जगात आनंद निर्माण झाला आहे . त्यांच्या विविध कला साकार करण्याच्या अलौकीक कलागुणांमुळे या जगात राहायला सर्वानां आवडते मजा वाटते .     
जीवनात कोणतीही कला न आवडणारी कोणतीही कला  जोपासणारी अरसिक मंडळी पाहिली की यांचे जगण्याचे प्रयोजन शून्य आहे याची प्रकर्षाने जाणीव होते . एखादया पशूच्यामध्ये व या अरसिक माणसाच्यामध्ये काहीही फरक नाही याचीही मनाला खात्री पटते .
        तुमचा सूर लागो वा न लागो पण गावकरी जसे भजनांच्या तालांमध्ये तल्लीन होत जातात , दुसरा काय म्हणेल? त्याला काय वाटेल? त्या शेजारच्या माणसाला माझा बेसूर आवाज ऐकून त्रास होईल का ? याचा जराही विचार त्यांच्या मनात येत नाही . ते त्या भजनकलेमध्ये निरागसतेने सामील होत आस्वाद घेत राहतात .
         चित्रकाराने काढलेली ही रफ रेखाचित्रे त्याच निरागस ध्यासाचा एक धागा आहे . भजन व स्केचेस करणे मला आता वेगळा प्रकार वाटत नाही असतो . शेवटी ईश्वराप्रती जाण्याचे मार्ग प्रत्येकाचे वेगवेगळेच असतात .
       माझी ही चित्ररेखाटने पाहून एक मित्र म्हणाला तू तर तुझा परिसर , तो क्षण , ते दृश्य , तो काळ चित्ररूपाने  कागदांवर कायमचा पकडून  ठेवला आहेस . तो काळ तो परिसर आता किती बदलला याचा विचार केला तर जाणवते या सृष्टीतील कितीतरी अनमोल गोष्टी माणसाने विकासाच्या नावाखाली फारच " भकास " केलेल्या आहेत . ही स्केचेस आता एक प्रकारचे जून्या वास्तूंचे डाक्यूमेंटेशन झाले आहे .
         पाचगणी , महाबळेश्वर व वाई परिसरातील वृक्षतोड , मोकळ्या डोंगररांगावर बांधलेल्या नवनव्या इमारती वाहनांची गर्दी नव्या हॉटेल्स , बंगले व नव्या शाळांचा उदय पाहून पन्नास वर्षांत किती मोठा बदल होत आहे याचे " चित्रदर्शन " मला रेखाटनातून जाणवते . ही स्केचेस करताना एक नवा अनुभव , नवा अभ्यास व नवा दृष्टीकोन जाणवत होता . कालपरत्वे आता नवे झालेले बदल स्विकारले गेलेले होते . एक 
चित्ररेखाटन (स्केच)  रेखाटणे म्हणजे जणू एक नवी गोष्ट सांगणे असते .
         आता रोज एका चित्रामागची गोष्ट व ते रेखाटन करतानाचा अनुभव सांगण्याची वेळ आली आहे याची मला जाणीव होत आहे . चित्र रेखाटने करताना त्या दृश्याचा दृश्यअनुभव देणे हा उद्देश आहेच पण ते दृश्य रेखाटण्याची उर्मी का आली ? प्रत्यक्ष फिल्डवर साईटवर चित्र रेखाटताना काय परिस्थिती होती व चित्र रेखाटताना त्या त्या परिसराची थोडी माहिती व स्मरणरंजनाचा ही अनुभव मिळेल याची मला खात्री वाटते .
       कदाचित आणखी काही वर्षांनी ही दृश्यचित्रे एकदम इतिहासकालीन वाटतील असेही मला वाटत आहे .
चला तर मग सुरु करतो एक रफ स्केचेस चित्रमालीका .
तुमच्या प्रतिक्रिया वाचायला नक्की आवडतील .

सुनील काळे ✍️
9423 966486

प्रा. रमेशचंद्र बारगजे

प्रा. रमेशचंद्र बारगजे (सर)
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
          भारतातील शिक्षणपद्धती आणि जपानच्या शिक्षणपद्धतीत मोठी तफावत आढळते . जपानमध्ये लहान मुलानां अगदी सुरुवातीपासूनच नेहमीच्या विषयाव्यतिरिक्त हस्तकला , ओरोगामी , चित्रकला , शिल्पकला, वादनकला , गायनकला , बागकाम , प्लबिंग , इलेक्ट्रीक , इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुरुस्ती , स्वच्छता व इतर असंख्य अशा जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कला शाळेपासूनच शिकविल्या जातात . त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा एकूण कल पाहून त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक प्राध्यापक मदत करतात व मग तो विद्यार्थी त्याला आवडणारे कोणतेही एक क्षेत्र निवडून  त्यात पारंगत होतो , खरी मास्टरकी मिळवितो . 
         मध्यंतरी एक पोस्ट तर खूप भावली . जपानमधील दूरच्या खेड्यात एकटी शाळेत जाणारी मुलगी होती ,तिला शाळेत जाण्यासाठी संपूर्ण ट्रेन थांबवली जायची . एका मुलासाठी मोठा वळसा घेऊन स्थानिक बस त्या मुलाला घेऊन शाळेत पोहचविण्यासाठी मदत करायची .याऊलट आपण भारतीय शाळांचा आढावा घेतला तर अगदी कमी पट असलेल्या डोंगराळ व वस्तीवरच्या शाळाच बंद करण्याचा घाट मध्यंतरी सरकारने घातला होता . सुविधा देणे तर दूरच पण शाळेच्या इमारतींची अवस्थादेखील डेंजर आहे .
          त्यामुळे हे जाणवते की मानवी जीवन जगताना सगळेच फक्त IT (आयटी ) मध्ये काम करणारे उपयोगाचे नसतात . खेड्यापाड्यात व शहरात रंगकाम करणारे , इलेक्ट्रीकचे काम करणारे , वेल्डींगचे काम करणारे , हुशार प्लंबरसुद्धा मिळत नाहीत . त्यामुळे शिक्षकांनी फक्त पुस्तके पाठांतर करण्यापेक्षा अशा रोजच्या व्यावहारीक गोष्टीसुद्धा शाळेत शिकविल्या पाहिजेत असे वाटते . त्यासाठी शिक्षणाचा मूळ उद्देश समजून घेऊन नवनवे अभ्यासक्रम सुरु करणे आता गरजेचे आहे . अशा नवनव्या कलागुणांमुळे विद्यार्थ्याची मानसिक घुसमट थांबते व आवडीच्या क्षेत्रात तो प्राविण्य मिळवितो शाळेत येण्याची गोडी वाटते .
             मी 1982 साली दहावी पास झालो आणि परंपरेप्रमाणे बारावी सायन्समध्ये शिक्षणासाठी वाईच्या किसनवीर महाविद्यालयात दाखल झालो. इंग्रजी भाषा जराही समजत नव्हती , थोडक्यात प्रचंड बोंब होती . सर मंडळी काय शिकवितात हे मला अजिबात कळत नव्हते.यातून आली ती प्रचंड मानसिक निराशा .  मग एसटीमधून प्रवास करताना मध्येच पसरणी घाटात उतरून निसर्गचित्रणाचे स्केचेस करण्याचे नवीन वेड मला लागले . या वेडाची परिसिमा इतकी वाढली की चित्रकलेशिवाय दुसरे काय सुचेचना. मग वर्गात पाठीमागे बसून सगळ्या सरांची स्केचेस करायचो. 
          प्राणिशास्त्र  शिकविणारे प्रा.रमेशचंद्र बारगजे नावाचे एक प्रोफेसर मला शिकवायला होते ते मात्र वेगळेच होते . त्यानां चित्रकला , मिमिक्री , गायन, बागकाम  व इतर बऱ्याच गोष्टींची आवड होती . त्यांनी मला चित्रकलेसाठी प्रोत्साहन दिले माझ्यातला चित्रकलेचा स्पार्क ओळखला. मला बेडूक कापून त्याची पचनसंस्था शिकण्यात अजिबात रस नव्हता पण बेडकाची डिसेक्शन करतानाची चित्रे रेखाटायला मला आवडायची . माझ्या प्रयोगवह्या (जर्नलस) अशा चित्रांची परफेक्ट बुक्स असायची . मग त्यांनी त्यावर्षी या फ्रॉगडिसेक्शनची व शास्त्रज्ञांची छान रेखाचित्रे करून घेतली . मोठे चार्टस करून घेतले व माझ्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन वार्षिक स्नेहसमेलनांत आयोजित करून प्रोत्साहन दिले . त्याचवर्षी मी चित्रकलेची इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये दिली व मला A ग्रेड मिळाले . त्यामुळे आत्मविश्वास वाढला .पुढे बारावी सायन्स पास झालो व कोल्हापूरला कलानिकेतन चित्रकला महाविद्यालयात दाखल झालो . चाळीस वर्ष होऊन गेली पण किसनवीर महाविद्यालयाचे सर्वच सर आजही संपर्कात राहीले ,आठवणीत राहीले कारण त्यानां विद्यार्थी घडवायची ओढ होती .
           आज प्रा.रमेशचंद्र बारगजे सर 1973 सालच्या कोल्हापूर विद्यापीठातील आपल्या मित्रांसोबत सहकटूंब " निसर्ग आर्ट गॅलरीत "
चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी सर्वानां घेऊन आले . दहा बारा गाड्या आर्ट गॅलरीत आल्या व गॅलरीचा परिसर माणसांनी फुलून गेला . चाळीस वर्षापूर्वी लावलेल्या या चित्रकार छोट्या रोपट्याला योग्य खतपाणी घातल्याने आता रोपट्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले होते . सरांनी कौतुकाने सर्वांसोबत ओळख करून दिली .घरात एक आजारी पेशंट [पत्नी] असताना उत्साहाने सर्व मित्रानां एकत्रित करून गेट टू गेदर व वाईदर्शनाची ट्रिप आयोजित करणाऱ्या सरांचा उत्साह चाळीस वर्षांपूर्वी होता तसाच आजही ओसांडून वहात आहे असे वाटले .
      असे अनेक असामान्य प्रेरणादायी  ऊर्जास्त्रोत्र असलेले प्राध्यापक , शिक्षक व मार्गदर्शक मला वेळोवेळी वेगवेगळया टप्यांवर भेटले व जीवन जगत असताना मोठी प्रेरणा मिळाली . प्रा . रमेशचंद्र बारगजे व त्यांच्या सर्व मित्रपरिवाराला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ! व मनःपूर्वक धन्यवाद !
         निसर्ग आर्ट गॅलरीत येण्यापूर्वी फोन करून संपर्क करा . आपल्या परिसरातील निसर्गाची चित्रकाराच्या नजरेतून चित्रे पाहणे हा एक वेगळा आनंद असतो तो घेण्यासाठी एकटे या किंवा अनेकांना घेऊन या . आमच्या या निसर्ग आर्ट गॅलरीतील निसर्गयात्रेत येणाऱ्या सर्वांचे नेहमीच स्वागत असेल .
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
निसर्गचित्रकार सुनील काळे : 9423966486
निसर्गचित्रकार स्वाती काळे : 9158757626

माझ्या स्वप्नातील घर

माझ्या स्वप्नातील घर
🏠🏠🏠🏠🏠🏠
        1995 साली मी मुंबई कायमची सोडली कारण मला रोज नालासोपारा येथून चर्चगेटला पस्तीस स्टेशन पार करून ऑफीसला ट्रेनमध्ये प्रवास करून जायला लागायचे . माझ्या तीन वर्षाच्या या नोकरीच्या प्रवासात मला एकही दिवस लोकल ट्रेनमध्ये बसायला निवांत जागा मिळाली नाही . बरोबर सकाळी सात वाजून वीस मिनिटाची लोकल चुकली की पुढचे सर्वच गणित चुकायचे आणि परतताना तीच अवस्था . सकाळी इस्त्री करून चकचकीत असणारा मी ट्रेनमध्ये घुसताच विस्कटलेला असायचो . त्यामुळे मुंबईकर चाकरमान्यांचे नियमितपणे न चुकता जीवघेणा प्रवास करून नोकरी करणाऱ्यांचे खरोखर कौतुकास्पद कार्य आहे .     
        मला पाचगणी हे गाव लहानपणापासून आवडायचे कारण तीसचाळीस वर्ष तेथे वास्तव्य केले होते . निसर्गचित्रकार असल्याने आपल्या गावात जाऊन एक आर्ट गॅलरी तयार करण्याचे व त्या गॅलरीत आपल्याच चित्रांचे प्रदर्शन करून चित्रमय आयुष्य जगण्याचे भव्य स्वप्न घेऊन मी मुंबईवरून 1995 साली परत आलो होतो . त्यावेळी जकात नाक्यावरून सिडने पॉईंटकडे वळताच रस्त्याच्या कडेला लागून असलेल्या परिसरात पॅनोरामा व्हयू नावाचा एक जुनाट झालेला बंगला भाड्याने घेतला व प्रदर्शनात मिळालेले सर्व पैसे खर्च करून त्या बंगल्याला " पांचगणी आर्ट गॅलरी " या नावाने नवसंजीवनी दिली . छान प्रदर्शन सुरु झाले उत्तम प्रतिसाद मिळत होता पण घरमालकाने एक वर्षानंतर पुन्हा भाड्याने देण्यास नकार दिला आणि नंतर आमच्या आयुष्याची वाट लागायला सुरुवात झाली .
         वाट इतकी लागली की मला त्या बंगल्याच्या जवळच बिलीमोरीया या इंग्रजी माध्यमाच्या बोर्डींग स्कूलमध्ये अल्पपगारावर नोकरी करायला लागली. शाळेने जी जागा दिली होती त्यामध्ये पाणी , बाथरूम , वॉशरूम , किचन , फर्निचर , कशाचीच सोय नव्हती . टॉयलेटसाठी तिसऱ्या मजल्यावर जायला लागायचे . त्यासाठी  " बिलीमोरिया स्कूलच्या आठवणी  " नावाचा नवीन लेख लिहावा लागेल . पैसे नसले की अशा काळात आपले दिवस फिरलेले असतात सर्व नातेवाईकांनी व मित्रांनी पाठ फिरवलेली असते . सुखके सब साथी दुखमें ना कोई याची प्रचिती वारंवार येत असते . या दुष्काळग्रस्त दिवसात आलेला दिवस ढकलणे एवढेच आपल्या हातात असते. मिळणारा पगार इतका अल्प होता की मोठी तर स्वप्ने काय ? आपण आता संपलो हीच भावना वाढत चालली होती मनाला उभारी देणारे ते दिवस नव्हतेच . सगळ्या बाजूने अंधारमय व निराशेचा तो काळ होता .
         आणि अचानक सकाळच्या पेपरमध्ये एक जाहिरात पाहिली . पुण्याच्या रोहन बिल्डर्स ग्रुपतर्फे चित्रकारानां एक संधी दिली होती . 
" माझ्या स्वप्नातील घर "
हा विषय दिला होता व पहिल्या तीन चित्रानां  पाच हजार रुपयांचे बक्षीस होते . माझा महिन्याचा पगार साडेतीन हजार रुपये होता त्यामुळे पाच हजार रुपयांचे बक्षिस मोठीच रक्कम होती . स्वाती आणि मी त्यामध्ये भाग घेण्याचे ठरवले . खरं तर चित्रांच्या स्पर्धा हा विषय मला आवडत नाही कारण चित्र ही कवितेसारखीच आतून निर्माण होणारी गोष्ट आहे तिथे फक्त मनसोक्त रंगात खेळून आवडलेली गोष्ट सादर करणे महत्वाचे असते . फक्त पैशासाठी कलानिर्मिती ठरवली की व्यावसायिकीकरण सुरु होते असे वाटायचे . पण माझी आर्थिक घडी खरोखरच बिघडली होती . म्हणून स्पर्धेत भाग घ्यायचा असे ठरवले .
        त्यानंतर  मग रात्रीची मला खरीखुरी  भारी भारी घरांची , बंगल्याची , भव्यदिव्य राजवाड्याची स्वप्ने पडायला सुरुवात झाली . त्याकाळात मी रोज सिडने पॉईंटच्या व्हॅलीमध्ये फिरायला जायचो . तेथे तळमाळाच्या व्हॅलीमध्ये माझा भव्य बंगला मला दिसू लागला . त्या बंगल्याच्या समोर कमळगड , नवरानवरीचा डोंगर , उजव्या बाजूस मांढरदेवीचा डोंगर त्याच्या जवळपास पांडवगड व खाली धोमधरणाचे अथांग पसरलेले पाणी . त्या पाण्याच्या बाजूला गर्द हिरवीगार भातशेती . त्या भातशेतीच्या बाजूला उंचावरून दिसणारी चिमुकली लाल छपरांची घरे छोटी मोठी झाडे दिसू लागायची . सुर्य उगवला की डोंगरांच्या पुर्वेकडे पिवळसर कोवळी उन्हे व दूर लांबचे डोंगर धुसर धुक्यात हरवलेले दिसू लागले . नुकत्याच पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे इंद्रधनुष्य तयार झालेले दिसायचे व ते तेजस्वी इंद्रधनुष्य मी स्वप्नातील घराच्या उंच टेरेसवर बसून मस्त ईझल लावून , डोक्यावर मोठी ब्रिटीश टोपी घालून बाजूला जलरंगाची मोठी पॅलेट घेऊन ते दृश्य रंगवत आहे असे माझेच रुपडे मला दिसायला लागले . या व्हॅलीच्या सभोवताली पाण्याचा एक तलाव दिसू लागला , छान रंगीबेरंगी फुलांची बहरलेली जोपासलेली बाग दिसू लागली . बंगल्याच्या मुख्य हॉलमध्ये सुसज्ज फर्निचरची बैठक व छान पुस्तकांनी भरलेले कपाट दिसू लागले . आरामखुर्चीवर निवांत पहुडलेला मी पुस्तक वाचत समोरचा निसर्ग पहात पहात मी चहा पिताना दिसत होतो . दहा दिवसात मला दहा हजार दृश्यांची स्वप्न पडलेली होती . आता बंगल्यास लागून पार्कींगची जागा असून तेथे माझ्या चित्र काढण्याची एक मोठी व प्रवासासाठी एक अशा गाडया दिसू लागल्या . घराच्या मेंटेनन्ससाठी माळ्याची वर्कर कॉटेज गरजेची आहे हे जाणवू लागले . दहा दिवस सतत स्वप्नमय जगलो व मग छान छोटी छोटी स्केचेस केली . त्यातून मग सगळया बेडरूम्स मधून कृष्णा व्हॅली कशी दिसेल याची कल्पनाचित्रे रेखाटली आणि शेवटी या सर्वांचे एकत्रिकरण करून फायनल स्केच तयार केले .
         आपले मन म्हणजे स्वप्नकल्पनांचे मोठे माहेरघर असते . आपण सगळेच थोडेफार स्वप्नाळू असतो . आपल्या सर्वानांच या कल्पनाविश्वात मनसोक्त फिरायला भटकंती करायला आवडत असते. त्यात मी तर चित्रकार असल्याने सगळी स्वप्ने रंगीतच पडायची .
मग 22 "x30 " या आकाराच्या माऊंटबोर्डवर " माझे स्वप्नातील घर " दृश्यरूपात साकारले . चित्र प्रत्यक्ष रेखाटत असताना आणखी बारीकसारीक गोष्टींचा विचार स्पष्ट होत होता . आमच्या दहा बाय बाराच्या खोलीत त्या दगडी भितीं असलेल्या शाळेत शेवटी मी व स्वातीने आमची स्वप्ने चित्रात पूर्ण झालेली दाखवली , पण प्रत्यक्षात मात्र वास्तवता वेगळीच होती .निराशमनाने व शरिरानेही आमची साथ सोडलेली होती . शेवटी एकदाची चित्रे स्पर्धेसाठी पाठवली . त्यामध्ये महाराष्ट्रातून चारपाच हजार चित्रे आल्याचे कळले व  खरोखरच त्या धक्याने आणखी निराशेत भर पडली . एवढ्या मोठ्या स्पर्धेत आपला निकाल शून्यवत आहे असे ठरवून आम्ही शाळेच्या रुटीनमध्ये व्यस्त झालो . शेवटी स्वप्न ते स्वप्न , ते काय वास्तवात उतरणार ? असे ठरवून रोजच्या कामात मग्न झालो .
         दहा बारा दिवसांनी पोस्टमनने खूप दिवसानंतर आम्हाला शोधून काढले व दोन रजिस्टर पत्रे हातात ठेवली .पत्र उघडताच आनंदाला पारावर उरला नाही . कारण आमच्या दोघांच्याही चित्रानां बक्षिस मिळालेले होते . खूप दिवसांनी आम्ही आनंदीत झालो होतो . पुण्याला मोठ्या समारंभात आम्हाला पाच पाच हजाराचे बक्षिस मिळाल्यानंतर सर्वांनी जल्लोष केला . [त्यावेळी त्या चित्राचा फोटो काढून ठेवला असता तर किती बरे झाले असते असे  आता सतत वाटत आहे ] संध्याकाळी पाचगणीला परतलो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी रुटीनमध्ये स्वप्नातील घराला पुर्णपणे विसरलो . कारण असे डोगरांच्या कडेला स्वप्नातील सर्वगुणसंपन्न घर प्रत्यक्षात असणेच शक्य नव्हते असे त्यावेळी वाटले .
        बरोबर पंचवीस वर्ष पूर्ण होऊन गेली . आयुष्याच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते . 12 एप्रिल 2025 रोजी आम्ही महाबळेश्वरला महापर्यटन महोत्सवाच्या खादी ग्रामोध्योग येथील हॉलमध्ये भरणाऱ्या प्रांत व तहसिलदार मुख्याधिकारी यांनी आयोजित केलेल्या स्थानिक रहिवाशांसोबतच्या मिटींगला गेलो होतो . त्या मिटींगनंतर आमच्या पुस्तकांच्या गावात राहणाऱ्या नितीनभाई भिलारे या मित्राला फोन केला . कारण एक पक्षी त्याच्या खाद्यांवर बसून फिरतानाच व्हीडीओ त्याने सर्वानां पाठवला होता . ते घर किंवा ठिकाण मला पहायचे होते .
         संध्याकाळचे चार पाच वाजले असावेत नितीनने त्याचा मॅनेजर पाठवला त्या मॅनेजरचे नाव तन्मय राजगुरु. महाबळेश्वर रस्त्यावर गुरेघर गावानजिक एका अनोळख्या ठिकाणी तो आम्हाला घेऊन चालला होता . पाचगणी महाबळेश्वरचा मुख्य डांबरी रस्ता आता खूप दूर राहीला होता . एका निर्जन निर्मनुष जागेकडे आम्ही गाडीतून चाललो होतो . साधारण एक दोन किमी अंतरावर कृष्णा व्हॅलीच्या समोर आमची गाडी आली पार्किंगमध्ये गाडी लावली आणि समोरच्या बंगल्यासमोरचे दृश्य पाहून मी थक्कच झालो . माझ्या शरीरात एक प्रचंड कंपवात झाला , डोक्यातून मेंदूकडे सणसणत खुप झिणझिण्या निर्माण झाल्यासारखा एक आगळावेगळा विद्युतप्रवाह संचारत गेला . कारण त्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ चित्रकाराचे एक मोठे ईझल होते . त्यावर कॅनव्हास लावलेला दिसत होता . पंचवीस वर्षांपूर्वी मी मनाने  रेखाटलेले " माझ्या स्वप्नातील घर " प्रत्यक्ष जिवंत होऊन माझ्यासमोर दिसत होते . तसाच तो मोठा भव्यदिव्य फर्निचरयुक्त हॉल , त्याच्याशेजारी पुस्तकांचे कपाट ,समोर मोठी बाल्कनी , त्या बाल्कनीसमोर कृष्णा व्हॅलीचा नयनरम्य नजारा दिसत होता. समोर कमळगड व नवरानवरीचा डोंगर , मांढरदेवी पाचगणीच्या पर्वतरांगा व धोमधरणाचा प्रचंड जलाशय संध्याकाळच्या प्रकाशात चमचमत होता . सारा परिसर धुक्याने व ढगांनी व्यापून गेला होता . प्रत्येकवेळी मोबाईलमध्ये दृश्य टिपण्यास सरावलेले माझे हात एकदम निष्प्राण झाले होते . माझ्या डोळ्यांवर माझाच विश्वास बसत नव्हता .सगळा प्रकार एक मोठी आकल्पित घटना वाटत होती . 
असे कसे घडु शकते ? 
पंचवीस वर्षांपूर्वी मी पाहीलेले स्वप्न माझ्यासमोर  दृश्यरूप कसे घेऊ शकते ? सृष्टीकर्त्याने एक अजब चमत्कारीक विश्व प्रत्यक्ष माझ्यासमोर निर्माण केले होते . चमत्कारांवर माझा जराही विश्वास नाही पण चमत्कार झालेला अनुभव मी प्रत्यक्ष घेत होतो अनुभवत होतो .
          मॅनेजर तन्मयने मग छान वाफाळलेला चहा व बिस्कींटांचा ट्रे आणला .तो ट्रे व टिपॉय मला किती ओळखीचा वाटत होता . जणू त्या घरातील प्रत्येक गोष्ट माझ्या परिचयाची होती . मॅनजर तन्मय तन्मयतेने एकेक बेडरूम दाखवत होता व त्या प्रत्येक बेडरूममध्ये मी हरवून जात होतो . उत्तम प्रतिचा बेड , बाथरूमची वेगळी रचना ताब्यांच्या घंघाळाचे वॉशबेसीन , तांब्याचेच कधीही न पाहीलेले वेगळे नळ , प्रत्येक गोष्ट कशी जागची जागेवर , कोठेही कचरा नाही , धुळ नाही , स्वच्छता म्हणजे पुर्ण निरांकर स्वच्छता उलट माझ्याच पायांमुळे फरशी खराब होईल की काय ? अशी मनात शंका येत होती .
         बंगल्याबाहेरच्या व्हॅलीच्या बाजूला बांबूच्या झाडांची बेटे आणखी शोभा वाढवत होती . एक खास कोकणातील दगड वापरून गजिबो तयार केला होता . त्यामध्ये आरामदायी खुर्च्या सोफासेट ठेवलेले दिसत होते . कमानीवर छान झुळझुळीत कपड्याचे पडदे वापरून डेकारेशन केले होते . खाली सुंदर कारपेट टाकलेले होते . तेथून समोरचा निसर्ग आणखी बहारदार दिसत होता . बाजूला माळ्याची कामगारांची सुंदर कॉटेजेस बांधलेली होती . त्याच्याजवळच लाकडी विंडमील जणू एखाद्या इंग्लडमधल्या राजेशाही थाटात राहणाऱ्या एखादया सरदाराचे ते घर असावे असे वाटत होते .
             स्वप्नातील घरे ,स्वप्नातील कल्पना स्वप्नातच विरून जातात असे सगळे म्हणतात पण आता मला स्वप्नातील कल्पना प्रत्यक्ष रुपात साकारणारेही विश्वकर्मा असतात याची खात्री पटली होती . कल्पनेपेक्षा वास्तव्यातील घर आणखी सुंदर होते . जबरदस्त दृश्यरूप घेऊन प्रत्यक्ष माझ्यासमोर उभे ठाकले होते . परमेश्वराने जणू आकाशातून तेजोवलय घेऊन माझ्यासमोर उभे राहून विचारले की तू स्वप्नातील घर फक्त तुझ्या कल्पनेने कागदावर द्विमितीय रुपात दाखवलेस पण आज मी तुला प्रत्यक्ष घर त्रिमितीत कसे असते ते दाखवतो . तु स्वप्न विसरून गेलास पण स्वप्न पाहून स्वप्नांचा ध्यास पुर्ण करणारेही या जगात आहेत . आपल्या भगीरथ प्रयत्नांनी निर्जनस्थळी तेजोमहल बांधणारे दिव्यपुरुष देखील तुझ्यापुढे आहेत . उघड डोळे , पापण्या न मिटता हे सर्व काही लक्षात ठेव , स्वप्नांचा ध्यास अखेरच्या श्वासापर्यंत विसरू नकोस . माझे मन व शरीर त्या वास्तूतून पाय काढणेस तयार नव्हते शेवटी भरल्या डोळ्यांनी व भारावलेल्या मनाने त्या वास्तूला मी नतमस्तक होऊन मातीला हात लावला व कल्पनेपेक्षाही सत्य सुंदर असू शकते अशा त्या निर्माणकर्त्या नितीनभाई भिलारे या विश्वकर्म्यास मनोमन सॅल्यूट ठोकला . कसा वाटला काऊबॉय कॅसल ? त्या . . त्यादिवशी विचारलेल्या प्रश्नाला मी फक्त ' निशब्द ' एवढा एकच शब्द बोलून निरोप घेतला .
        कोण आहेत हे नितीनभाई भिलारे ? एखाद्या माणसाला घडवताना परमेश्वराने इतके सारे काही गुण एकदम कसे टाकले याचा मला आचंबा वाटतो . नितिनभाई व्यावसायाने बांधकाम क्षेत्रात आहे , तो आर्किटेक्ट आहे , तो उत्कृष्ट इंटिरियर डिझायनर आहे , तो संवेदनशील कवि आहे , उत्तम वक्ता आहे , उत्तम लेखक आहे , उत्तम पर्यावरणप्रेमी , निसर्गप्रेमी आहे . सध्याच्या जगात लागणारी आधुनिक विचारांची पुढचे पाहणारी दूरदृष्टी त्याच्याकडे आहे . तो मिलिंद गुणाजीसारखा भटकंती करतो , त्याच्या स्टाईल्स पाहील्या की तो  मला अष्टपैलू अभिनेता दिसतो . त्याच्याकडच्या गाड्यांचा संग्रह पाहीला की मला त्याच्या संग्राहकवृत्तीची नवी ओळख होते . त्याचे व्हीडीओ , रानवाटा , गडकिल्ल्यांचे , नव्या वाटा शोधण्याचे यु ट्युब चॅनेलवरचे व्हिडीओ पाहीले की त्याची कल्पना भरारीची ताकद कळते . नवी झाडे लावण्याचा छंद , प्राणीमात्रांविषयी असलेली ओढ , प्रत्येक गोष्ट , वस्तू निवडतानाची बारीकसारीक गोष्टी टिपण्याची वृत्ती मला भारावून टाकते . पोलीस , एसपी , अनेक राजकीय नेते , अनेक अभिनेते , अनेक कंपन्याचे प्रसिद्ध उद्योगपती ते सामान्य कामगारांचीही ओळख जान पहचान चिरंतन तेवत ठेवण्याची सवय मला नवी दूरदृष्टी देते . अनेक कलागुणांचा ध्यास तर आहेच त्या कलेचा आस्वाद घेण्याची ओढ , पुस्तकांची , गाण्यांची आवड मला सवड काढण्यास प्रवृत्त करते . आपल्या अफाट कामातून व्यापातून आपल्या कुटुंबाशी त्याची घट्ट नाळ आहे तो आपल्या पत्नीचा उत्तम पती व मुलांचा आदर्श पिताही आहे . त्याच्या आईवडीलांशी त्याचे मित्रत्वाचे नाते आहे . अनेक ओळखीच्या व अनोळखी मित्रांशी , सहकाऱ्यांशी असणारे नाते आणखी घट्ट करण्याची त्याची हातोटी अफलातून आहे . तो मैत्री फौंडेशन या सामाजिक संस्थेचा संस्थापक व अध्यक्ष आहे . त्याच्या बुमटाऊन फौंडेशन अंतर्गत तो फूटबॉलच्या , क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करत असतो . त्याने विद्यानिकेतन कॉलेजजवळ अत्याधुनिक सर्वसोयीयुक्त जीम तयार केली होती त्याअंतर्गत बॉडीबिल्डिंगच्या स्पर्धा , रक्तदान शिबिरे तो आयोजित करतो . पाणी वाचवा , वनवा लावू नये यासाठी धडपडतो , उन्हाळ्यात झाडे वाचविण्यासाठी उपाययोजना करत राहतो . तो अनेक गुणांनी परिपूर्ण आहे पण एक गुण त्याचा सर्वात मोठा आहे तो माणूसकी जपणारा उत्तम माणूस आहे . माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे हे त्याच्या वागण्यातून नेहमी उलघडत राहते . आपले काम सर्वोत्तम गुणवतेचे असेल तर बोलायची काय गरज ? असे त्याचे ब्रीदवाक्य आहे .
        अष्टपैलू व अचाट गुणवत्ता असलेल्या या विश्वकर्म्याने नुकतीच 25 मे रोजी आमच्या वाईजवळच्या खेडेगावातील निसर्ग आर्ट गॅलरीला कवी ज्ञानेश सुर्यवंशी व केसरी ट्रॅव्हल्सचे रोटरीयन जयवंत भिलारे या मित्रांसोबत भेट दिली . मोठा रंगीत फुलांचा पुष्पगुच्छ आणून आमच्या दोघांचा सत्कार केला . स्वप्नातील घरासाठी तीन छोटी चित्रे विकत घेऊन चित्रकलेलाही प्रोत्साहन दिले .
         नितीनभाई भिलारे 25 मे रोजी आले व त्यानंतर बरोबर पाच दिवसांनी या माझ्या स्वप्नातील घरासमोरचे केलेले जलरंगातील एक मोठे निसर्गचित्र मोजार्तो या वेबसाईडवर पन्नास हजार रुपयानां विकत गेले . असे योगायोग जुळून यायला ग्रहताऱ्यांची चांगलीच युती झाली असावी .
         एक गोष्ट तितकीच खरी की नितिनभाई जेथे जातील तेथील वातावरण , तेथील कार्यक्रम भारावून टाकतील ,उजळून टाकतील . कारण स्वप्न पाहणे एक चांगली गोष्ट आहे पण पाहिलेली स्वप्ने प्रत्यक्ष हकीकतमध्ये उतरविण्यासाठी जी अविश्रांत परिश्रम करण्याची ध्यासवृत्ती आवश्यक असते ती ध्यासवृत्ती नितीनभाईमध्ये ठासून भरलेली आहे . हे रसायनच काहीतरी अजब आहे , विश्वपित्याने फार सवडीने व हुशारीने हे रसायन सतत जिवंत राहील सतत नाविन्यतेचा ध्यास घेत राहील याची रचना केलेली आहे .
       माझ्या स्वप्नातील घराला प्रत्यक्ष आकार देणाऱ्या या कलंदर व्यक्तिमत्वास मनःपूर्वक सॅल्यूट व पुढील अनेक भव्यदिव्य प्रकल्पांसाठी खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा !💐💐💐💐💐
      सात बेडरूमचे हे स्वप्नातील घर राहण्यासाठी बुकींगमध्ये उपलब्ध असते . तुम्हीही महाबळेश्वरला कधी गेला तर जरूर तेथे भेट द्या . ब्रेथ टेकिंग व्हयू , गॉर्जिएस व्हयू , वास्तूकला म्हणजे काय असते याची नक्की नव्याने ओळख होईल .
🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠
चित्रकार:सुनील काळे✍️9423966486
नितिनभाई भिलारे [मैत्री फौडेंशन ]
9970099100

शुक्रवार, ६ जून, २०२५

चित्रप्रेरणा

चित्रप्रेरणा
🎨🎨🎨
        माणसाच्या आयुष्यातील बालपण कायम लक्षात राहते .शाळेचे दिवस , शाळेचा परिसर , शाळेचे शिक्षक , आपल्यासोबतचे सवंगडी व आपण ज्या गावात लहानाचे हळूहळू मोठे होत गेलो तो परिसर तेथील वातावरण आपल्या अचेतन मनात कायम स्मरणात राहीलेले असते.
         पाचगणी हे सुप्रसिद्ध शैक्षणिक व बोर्डींग स्कूल्ससाठी प्रसिद्ध असले तरी या मोठया स्कूलची फी परवडणे सर्वांनां शक्य नसते . आम्ही वाईजवळच्या पांडेवाडी या खेडेगावातून पाचगणीला राहायला आलो होतो . माझे वडील व काका एकत्र कुटुंब पद्धतीने राहत होती . ते दोघे व त्यांच्या बायका पूर्णपणे अशिक्षितच होते . त्यामुळे त्यांनी सर्व मुलामुलींनां मराठी माध्यमाच्या जीवन शिक्षण विद्यामंदीर या शाळेत पाठवले . सातवीपर्यंत आमच्या शाळेत चित्रकला हा विषयच नव्हता . त्यामुळे खास चित्र काढण्याची अशी कधी प्रेरणाच मिळाली नाही .
           सातवीनंतर मी संजीवन या मोठ्या शाळेत गेलो . शाळेत  प्रवेशपरिक्षा पास झालो आणि आम्ही चौघे गावातील मित्र  या मोठ्या शाळेत जावू लागलो . तेथे शांतीनिकेतनमधून शिकून आलेले भट्टाचारी नावाचे कलाशिक्षक होते . पण माझे दुर्देव असे की आम्ही मराठी माध्यमात शिकल्यामुळे आम्हाला  इंग्रजी जराही समजत नव्हते, त्यामुळे बोलता तर अजिबातच यायचे नाही . त्यामुळे दहावीपर्यंत तीन वर्ष आम्ही त्या सरांशी सलोखा निर्माण करू शकलो नाही . चित्रप्रेरणा तर दूरच राहीली .
            घरी अभ्यासाला जागा नसल्यामुळे आम्ही मित्रमंडळी अभ्यासाची पुस्तके घेऊन कधी पोलीसग्राऊंडच्या पाठीमागे सोहराब मोदींच्या गार्डनमध्ये , कधी नगरपालीकेच्या बागेमध्ये , कधी दूर टेबललॅन्डच्या गुहेमध्ये तर कधी सिडनेपॉईंटच्या निसर्गरम्य परिसरात अभ्यासाला जायचो .
          एकदा संध्याकाळी सिडने पॉईटंच्या रस्त्यावर आताचे रविन हॉटेल आहे त्या रस्त्यावर एक चित्रकार चित्र रंगविताना पाहिला . सडपातळ शरीर , काळ्याभोर मिशा , गौरवर्ण , केसांची साधीच रचना व इनशर्ट केलेले , पायात शूज व एक छोटीशी फोल्डींगची खूर्ची घेऊन हा चित्रकार समोरची कमळगड व मांढरदेवीची दरी , नवरानवरीचा डोंगर व त्या डोंगरावर पडलेल्या एका बाजूच्या संध्याकाळच्या सावल्या व दुसऱ्याबाजूला त्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या भातशेतीवर पडलेल्या शेडस ,खाचखळगे , चमकणारे ऊन , डोंगरावर पसरलेले धुके व खाली तळमाळ्यावर जाणारा उतारावरचा रस्ता जलरंगात चित्रित करत होते . चित्रकाराच्या पाठीमागे एक नवीकोरी झक्कास एटलॉस कंपनीची सायकल होती . पुढे हँडलसमोर रात्रीचा प्रकाशझोत पडावा म्हणून डायनामो लावलेला होता . एका बाजूला चित्रकलेचे सामान ठेवण्यासाठी पत्र्याची पेटी लावलेली होती . चित्रकार कोणाशीही बोलत नव्हता ,त्याचे काम मन लावून सुरूच होते आजूबाजूला खेडेगावची मंडळी , काही सुशिक्षित पर्यटक , आम्ही शाळेकरी मुले चित्र पाहण्यासाठी कोंडाळे करून जणू जादूचा खेळ पहात होतो . होय , खरंच जादूचा खेळ होता . पांढऱ्याशुभ्र हँडमेड कागदावर जलरंगाचा बिनधास्तपणे मारलेला फटकारा चित्राला हळूहळू जिवंत करत होता . सारा परिसर चैतन्यमय होऊन एका सुरेख फ्रेममध्ये एकवटला होता . ते  दृश्य फोटोकॉपी नव्हते त्या चित्रात एक हालचाल होती . चित्रकाराचे कौशल्य अफाट होते .त्या निर्जीव दृश्याला सजीव केले होते . संध्याकाळी अंधार पडायला लागल्यावर चित्रकाराने सर्व सामान पिशवीत भरले व जवळच्या बिलिमोरीया स्कूलच्या आवारात चित्रकार दिसेनासा झाला . त्याची पाठमोरी आकृती मला आजही लक्षात आहे .
मला खरी " चित्रप्रेरणा " मिळाली होती .
          मग रोज संध्याकाळी मी बिलिमोरीया स्कूलच्या प्रवेशद्वाराशी दबा धरून बसायचो . चित्रकार कधी गार्डनच्याशेजारी असलेल्या वडाच्या झाडांची , कधी मुख्य बाजारात तर कधी पारशी पॉईटंच्या व्हॅलीची चित्रे काढताना दिसायचा . मग  सायकलवर फिरणाऱ्या त्या चित्रकाराचा मी पाठीमागे पळत पळत पाठलाग करायचो . चित्रकाराच्या कुंचल्यातून साकारलेली कितीतरी चित्रे मी पाठीमागे सलगपणे चारपाच तास उभे राहून पाहायचो . त्या चित्रकाराचे व्यक्तीमत्व मला आवडायला लागले होते . तो चित्रकार कोठेही दिसला की मी मंतरल्यासारखा ,भारावून गेल्यासारखा त्याच्या मागेमागे धावायचो .
          एकदा तर चित्रकाराने कमालच गेली . पाचगणीची ग्रामदेवता घाटजाईची जत्रा फेब्रूवारीमध्ये दरवर्षी भरते . या जत्रेत आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ढोलवाले , झांजपथके यायची . त्या ढोलवाल्यांची वेगवेगळी हालचाल व जोशपूर्ण प्रत्यक्ष सजीव रेखाटणे काढण्याकरता हा चित्रकार हॉटेल अप्सराच्या उंच पत्र्यावर रेखाटनाचे साहित्य घेऊन बसला . मी पाठलाग करून लगेच चपळाईने पाठीमागे उभा राहीलो . दोन्ही हाताने झांज पकडून आमचे बहिरा माळी म्हणून प्रसिद्ध असलेले एक वयस्कर गावकरी यांचे हावभाव हालचाली चित्रकाराने बरोबर पकडल्या . गुलालाची उधळण करणारे गावकरी , त्यांचा शारिरीक जोशपूर्ण आवेश  , त्यांचा ताल व ठेका चित्रकाराच्या लयबद्ध रेषेतून जिवंत होत होते . मी मात्र डोळे विस्फारून चित्रकाराची हालचाल लक्षात ठेवत होतो . पाचगणीच्या परिसराची चित्रे रेखाटणाऱ्या या कलाकाराचा मी जबरदस्त फॅन झालो होतो पण तरीही कित्येक वर्ष माझी त्यांच्याबरोबर बोलण्याची कधी हिम्मतच झाली नाही.
        या चित्रकाराचे नाव सुभाषचंद्र बोंगाळे सर . पुढे 12वी सायन्सला माझे मन रमेना मग एक दिवस सरांनां प्रत्यक्ष भेटलो . माझी रेखाटलेली  चित्रे त्यांना दाखवली . चित्रकार व्हायचे असेल तर इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा द्यावी लागते तरच चित्रकला महाविद्यालयात प्रवेश मिळतो याची माहिती त्यांनी दिली . त्यासाठी लागणारे लेटरींग ,भुमिती असे विषय शिकविण्यासाठी सर घरी आले . माझ्यात चित्रकलेचा स्पार्क आहे हे त्यांनी ओळखले . कोणतीही अपेक्षा न ठेवता , कोणताही आडपडदा न ठेवता मुक्तहस्ताने बोंगाळे सरांनी मला मार्गदर्शन केले . पुढे जीवनात अनेक अडचणी आल्या , कठीण प्रसंग आले , निराशेचे क्षण आले त्यावेळी बोंगाळे सर जिवलग मित्रासारखे सोबत राहीले . कलाशिक्षक म्हणून काही वर्ष काम करावे लागले त्यावेळी शाळा सांभाळून चित्रांचा ध्यास , चित्र काढत राहण्याची मशाल सतत तेवत ठेवली पाहिजे , चित्रांचा ध्यास विसरता कामा नये याची शिकवण सरांमुळे मिळाली . आजही बोंगाळे सर मनामनात भिनलेले आहेत . व आज त्यांची आठवण तीव्रतेने आली त्याचे कारणही खास आहे .
        वाईपासून 3 किमी अंतरावर मेणवलीजवळ प्रसिद्ध कवि आर्याकार वामन पंडीत यांचे भोगाव गाव आहे . या गावाच्या रस्त्यावर निसर्गरम्य परिसरात रस्त्यालगतच माझा निसर्ग नावाचा बंगला आहे  आणि या बंगल्यातच मी एक महिना " निसर्ग आर्ट गॅलरी " या नावाने कलादालन सुरु केले आहे . 7मे पासून ते 7जून पर्यंत सुरु झालेल्या या चित्रप्रदर्शनाला खेड्यापाड्यातील अनेक गावकरी , वाई , सातारा , कराड , मुंबई , पुणे , पाचगणीतील अनेक मित्रमंडळी व पर्यटक आवर्जून येत आहेत . सातारा जिल्ह्यात आडबाजूला भोगाव सारख्या छोट्या खेडेगावात आपल्या एका वेडया चित्रकार दाम्पत्याने सुरु केलेल्या या प्रदर्शनाला मुद्दाम भेट देत आहेत व कौतुक करत आहेत .
        पण आज या भोगावच्या खेडेगावातून बालगोपाळ मित्रमैत्रिणींची एक मोठी फौजच प्रदर्शन पाहायला आली होती . यामध्ये एक मुलगा दिव्यांग होता . त्याला 2 किमी व्हीलचेअरवर घेऊन ही मुलांची टोळी चित्रप्रदर्शन पहायला आल्यावर मी वेगळ्याच विश्वात गेलो . मुलांच्या अंगात अंगभूतच खूप चैतन्य , उत्साह , उर्जा असते . त्यानां नाविन्यतेची ओढ असते . विश्वातल्या अगणित प्रश्नांची उकल करण्याची उर्मी असते . त्या सर्व मुलांनी कितीतरी नवनवे प्रश्न विचारले . त्यांची प्रश्नांची सरबती संपतच नव्हती . कारण त्यानां त्यांच्या गावात एक चित्रकार सापडला होता . आताची पिढी खूप चपळ व हुश्शार पिढी आहे . त्यांच्यापैकी एकदोन जणांकडे मोबाईल फोन होता . त्यांच्या अपेक्षाही मोठ्या होत्या . चित्रकाराची बैठक कशी असते ? माध्यमे कशी असतात ? कोणते ब्रश वापरले? पैसे किती मिळतात ? जलरंगात व तैलरंगात काय फरक असतो? किती वेळ लागतो ? गार्डन कधी सांभाळता ? चित्र कधी काढता? कॅनव्हॉस म्हणजे काय ? नाईफ पेंटींग म्हणजे काय? प्रश्न तर संपतच नव्हते .
          अशा जिज्ञासू मुलामुलींना कलादालन कसे असते ? हे माहीतच नव्हते . कलानिर्मिती करताना चित्रकारानां काय वाटते ते त्यानां मनोगत वाचताना कळाले ? त्यांनी तीन चार तास कलादालनात चैतन्य आणले ? त्यांच्या निरागस प्रश्नांना उत्तरे देताना मी स्वतःला विसरून गेलो . माणसे वयाने वाढत जातात आणि त्यांचे कुतुहूल , निरागसपण त्यांच्यातले चैतन्यपणही हळूहळू लोप पावत जाते . ती मोठी होतात आणि कोमेजत जातात . एखाद्या उमलणाऱ्या सुंदर फुलणाऱ्या फुलावर विषारी फवारा मारावा व त्यांचे फूलपणच संपवावे तशी पालक मंडळी त्यानां संपवून टाकतात . त्यांच्या कलागुणानां धार पाडण्याऐवजी कलाजोपासना म्हणजे भीकेचे डोहाळे लागलेत का ? असे म्हणून लेखक , गायक,चित्रकार ,नाट्य , वादक , व शिल्पकलेसारख्या असंख्य कलागुणानां कात्री लावतात . मुलानां फक्त दहावी बारावीत वार्षिक अभ्यासात भरपूर मार्क मिळविण्यासाठीच प्रोत्साहीत करत राहतात . त्यानां करिअर करण्याचा धोसरा लावतात . त्यानां पुरते व्यावसायिक वृत्तीचे निर्जिव पुतळे बनवतात .
        पुण्या-मुंबई सारख्या मोठ्या शहरात कलाकारानां किती मानसन्मान मिळतो याची तेथील लोकानां जाण आलेली आहे . त्यातून ते स्वतःचे करियर शोधतात .पण लांबच्या खेड्यातील कमी पट असलेल्या शाळाच बंद करून त्याच्यां सुविधा बंद करणाऱ्या व शिक्षणाचा दोर कायमचा कापणाऱ्या जाणत्या सरकारनितीपुढे काय बोलावे ?
          निसर्ग आर्ट गॅलरीत चित्र-विक्रीच्या फार मोठ्या उलाढाली होत नाहीत कारण जिल्ह्यात एकही कलादालन नसल्याने कलादृष्टी तरी कशी वाढणार ? चित्रप्रदर्शनेच होत नसतील तर चित्रभान तरी कसे वाढणार? आपण तक्रार तरी कोणाकडे करायची ? 
           मग मला आठवतो आमच्या जिल्ह्यातील मुलखावेगळा राजा . औंधचे राजे बाळासाहेब पंतनिधी . शंभर वर्षांपूर्वी खटाव तालुक्यात यमाईच्या डोंगरावर म्युझियम उभे करणारे राजे . त्यासाठी कलावंताना स्वतः दरबारी तनखा व प्रोत्साहन देऊन चित्रनिर्मिती , शिल्पनिर्मिती करवून कलाप्रसार व्हावा म्हणून अहोरात्र देशपरदेशातून स्वतःच्या पैशातून कलाकृती आणून भवानी संग्रहालय निर्माण करणारे राजे . असे मुलखावेगळे दुरदृष्टी असणारे व स्वतः कलाप्रेमी , कलावंताचे मन जाणणार  राजे आता मिळत नाहीत .
      सातारा जिल्ह्याला दोन दोन राजे आहेत पण चित्रकारानां प्रदर्शनासाठी शासनाचे कायमस्वरूपी एकतरी कलादालन जिल्हयात  कधी निर्माण होईल ?  हे कोणालाच माहीत नाही . स्वातंत्र्य मिळून जिल्हयाने अनेक मुख्यमंत्री दिले पण सातारा जिल्हा कलाकारांसाठी शापितच राहीला . येथील कलाकारानां मुंबई किंवा पुण्यात प्रदर्शन करायला जावे लागते . जिल्ह्यात महाबळेश्वर सारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळी फक्त तीन दिवसांचे महापर्यटन महोत्सव भरवून हॅलीकॉफ्टर राईड , लेझर शो , टेन्ट हाऊस बांधून , फ्लोटींग बाजारासारखी नाटके करून जनतेचेच कोट्यावधी रुपये वाया घालवून मजा करतात . त्यापेक्षा एखादे छान बालगंधर्वसारखे नाट्यगृह व कलादालन निर्माण केले असते तर जिल्यातील अनेक कलावंतांना एक कायमस्वरूपी व्यासपीठ मिळाले असते . अनेक कलावंतानी तेथे सातत्याने प्रदर्शने केली असती . कारण तेथे अनेक नामवंत श्रीमंत उद्योगपतींचे बंगले आहेत . पण खरे प्रश्न सोडवण्यात सरकारी मंडळीना उत्साह नसतो . फक्त आदेशाचे पालन करण्यात अधिकारी धन्यता मानतात . असो .
या पार्श्वभूमीवर निसर्ग आर्ट गॅलरीला भेट देणारे असे अनेक छोटे उत्साही कलावंत पाहिले तर एकतरी मुलगा सुनील काळे व एकतरी मुलगी स्वाती काळे म्हणून भविष्यात निर्माण होण्याची शक्यता आहे . त्यानां या प्रदर्शनातून जशी मला सुभाषचंद्र बोंगाळे सरांकडून " चित्रप्रेरणा " मिळाली तशी एकातरी बालकलाकाराला नक्कीच शंभर टक्के  " चित्रप्रेरणा " मिळेल असे मनापासून वाटते . म्हणून छोट्या खेड्यात महिनाभर प्रदर्शन भरविले म्हणून जराही वाईट वाटत नाही .
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
सुनील काळे (चित्रकार)✍️
9423  966486
स्वाती काळे (चित्रकार)
9158751626

निसर्ग आर्ट गॅलरी
मेणवली धोम रोड
मु.पो भोगाव ,
ता.वाई , जि. सातारा ४१२८०३
* प्रदर्शन : दि . 7 मे ते 7 जून
* वेळ : सकाळी१०ते संध्याकाळी ६ .
* प्रवेश मूल्य नाही .

पानगळ

पानगळ .................. 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃       माणूस नावाचा जो प्राणी आहे त्याचा मेंदू , त्याचे विचार ,त्याच्या अपेक्षा किती वेगाने वाढत राहत...