ब्लॉग संग्रहण

शुक्रवार, ६ जून, २०२५

चित्रप्रेरणा

चित्रप्रेरणा
🎨🎨🎨
        माणसाच्या आयुष्यातील बालपण कायम लक्षात राहते .शाळेचे दिवस , शाळेचा परिसर , शाळेचे शिक्षक , आपल्यासोबतचे सवंगडी व आपण ज्या गावात लहानाचे हळूहळू मोठे होत गेलो तो परिसर तेथील वातावरण आपल्या अचेतन मनात कायम स्मरणात राहीलेले असते.
         पाचगणी हे सुप्रसिद्ध शैक्षणिक व बोर्डींग स्कूल्ससाठी प्रसिद्ध असले तरी या मोठया स्कूलची फी परवडणे सर्वांनां शक्य नसते . आम्ही वाईजवळच्या पांडेवाडी या खेडेगावातून पाचगणीला राहायला आलो होतो . माझे वडील व काका एकत्र कुटुंब पद्धतीने राहत होती . ते दोघे व त्यांच्या बायका पूर्णपणे अशिक्षितच होते . त्यामुळे त्यांनी सर्व मुलामुलींनां मराठी माध्यमाच्या जीवन शिक्षण विद्यामंदीर या शाळेत पाठवले . सातवीपर्यंत आमच्या शाळेत चित्रकला हा विषयच नव्हता . त्यामुळे खास चित्र काढण्याची अशी कधी प्रेरणाच मिळाली नाही .
           सातवीनंतर मी संजीवन या मोठ्या शाळेत गेलो . शाळेत  प्रवेशपरिक्षा पास झालो आणि आम्ही चौघे गावातील मित्र  या मोठ्या शाळेत जावू लागलो . तेथे शांतीनिकेतनमधून शिकून आलेले भट्टाचारी नावाचे कलाशिक्षक होते . पण माझे दुर्देव असे की आम्ही मराठी माध्यमात शिकल्यामुळे आम्हाला  इंग्रजी जराही समजत नव्हते, त्यामुळे बोलता तर अजिबातच यायचे नाही . त्यामुळे दहावीपर्यंत तीन वर्ष आम्ही त्या सरांशी सलोखा निर्माण करू शकलो नाही . चित्रप्रेरणा तर दूरच राहीली .
            घरी अभ्यासाला जागा नसल्यामुळे आम्ही मित्रमंडळी अभ्यासाची पुस्तके घेऊन कधी पोलीसग्राऊंडच्या पाठीमागे सोहराब मोदींच्या गार्डनमध्ये , कधी नगरपालीकेच्या बागेमध्ये , कधी दूर टेबललॅन्डच्या गुहेमध्ये तर कधी सिडनेपॉईंटच्या निसर्गरम्य परिसरात अभ्यासाला जायचो .
          एकदा संध्याकाळी सिडने पॉईटंच्या रस्त्यावर आताचे रविन हॉटेल आहे त्या रस्त्यावर एक चित्रकार चित्र रंगविताना पाहिला . सडपातळ शरीर , काळ्याभोर मिशा , गौरवर्ण , केसांची साधीच रचना व इनशर्ट केलेले , पायात शूज व एक छोटीशी फोल्डींगची खूर्ची घेऊन हा चित्रकार समोरची कमळगड व मांढरदेवीची दरी , नवरानवरीचा डोंगर व त्या डोंगरावर पडलेल्या एका बाजूच्या संध्याकाळच्या सावल्या व दुसऱ्याबाजूला त्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या भातशेतीवर पडलेल्या शेडस ,खाचखळगे , चमकणारे ऊन , डोंगरावर पसरलेले धुके व खाली तळमाळ्यावर जाणारा उतारावरचा रस्ता जलरंगात चित्रित करत होते . चित्रकाराच्या पाठीमागे एक नवीकोरी झक्कास एटलॉस कंपनीची सायकल होती . पुढे हँडलसमोर रात्रीचा प्रकाशझोत पडावा म्हणून डायनामो लावलेला होता . एका बाजूला चित्रकलेचे सामान ठेवण्यासाठी पत्र्याची पेटी लावलेली होती . चित्रकार कोणाशीही बोलत नव्हता ,त्याचे काम मन लावून सुरूच होते आजूबाजूला खेडेगावची मंडळी , काही सुशिक्षित पर्यटक , आम्ही शाळेकरी मुले चित्र पाहण्यासाठी कोंडाळे करून जणू जादूचा खेळ पहात होतो . होय , खरंच जादूचा खेळ होता . पांढऱ्याशुभ्र हँडमेड कागदावर जलरंगाचा बिनधास्तपणे मारलेला फटकारा चित्राला हळूहळू जिवंत करत होता . सारा परिसर चैतन्यमय होऊन एका सुरेख फ्रेममध्ये एकवटला होता . ते  दृश्य फोटोकॉपी नव्हते त्या चित्रात एक हालचाल होती . चित्रकाराचे कौशल्य अफाट होते .त्या निर्जीव दृश्याला सजीव केले होते . संध्याकाळी अंधार पडायला लागल्यावर चित्रकाराने सर्व सामान पिशवीत भरले व जवळच्या बिलिमोरीया स्कूलच्या आवारात चित्रकार दिसेनासा झाला . त्याची पाठमोरी आकृती मला आजही लक्षात आहे .
मला खरी " चित्रप्रेरणा " मिळाली होती .
          मग रोज संध्याकाळी मी बिलिमोरीया स्कूलच्या प्रवेशद्वाराशी दबा धरून बसायचो . चित्रकार कधी गार्डनच्याशेजारी असलेल्या वडाच्या झाडांची , कधी मुख्य बाजारात तर कधी पारशी पॉईटंच्या व्हॅलीची चित्रे काढताना दिसायचा . मग  सायकलवर फिरणाऱ्या त्या चित्रकाराचा मी पाठीमागे पळत पळत पाठलाग करायचो . चित्रकाराच्या कुंचल्यातून साकारलेली कितीतरी चित्रे मी पाठीमागे सलगपणे चारपाच तास उभे राहून पाहायचो . त्या चित्रकाराचे व्यक्तीमत्व मला आवडायला लागले होते . तो चित्रकार कोठेही दिसला की मी मंतरल्यासारखा ,भारावून गेल्यासारखा त्याच्या मागेमागे धावायचो .
          एकदा तर चित्रकाराने कमालच गेली . पाचगणीची ग्रामदेवता घाटजाईची जत्रा फेब्रूवारीमध्ये दरवर्षी भरते . या जत्रेत आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ढोलवाले , झांजपथके यायची . त्या ढोलवाल्यांची वेगवेगळी हालचाल व जोशपूर्ण प्रत्यक्ष सजीव रेखाटणे काढण्याकरता हा चित्रकार हॉटेल अप्सराच्या उंच पत्र्यावर रेखाटनाचे साहित्य घेऊन बसला . मी पाठलाग करून लगेच चपळाईने पाठीमागे उभा राहीलो . दोन्ही हाताने झांज पकडून आमचे बहिरा माळी म्हणून प्रसिद्ध असलेले एक वयस्कर गावकरी यांचे हावभाव हालचाली चित्रकाराने बरोबर पकडल्या . गुलालाची उधळण करणारे गावकरी , त्यांचा शारिरीक जोशपूर्ण आवेश  , त्यांचा ताल व ठेका चित्रकाराच्या लयबद्ध रेषेतून जिवंत होत होते . मी मात्र डोळे विस्फारून चित्रकाराची हालचाल लक्षात ठेवत होतो . पाचगणीच्या परिसराची चित्रे रेखाटणाऱ्या या कलाकाराचा मी जबरदस्त फॅन झालो होतो पण तरीही कित्येक वर्ष माझी त्यांच्याबरोबर बोलण्याची कधी हिम्मतच झाली नाही.
        या चित्रकाराचे नाव सुभाषचंद्र बोंगाळे सर . पुढे 12वी सायन्सला माझे मन रमेना मग एक दिवस सरांनां प्रत्यक्ष भेटलो . माझी रेखाटलेली  चित्रे त्यांना दाखवली . चित्रकार व्हायचे असेल तर इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा द्यावी लागते तरच चित्रकला महाविद्यालयात प्रवेश मिळतो याची माहिती त्यांनी दिली . त्यासाठी लागणारे लेटरींग ,भुमिती असे विषय शिकविण्यासाठी सर घरी आले . माझ्यात चित्रकलेचा स्पार्क आहे हे त्यांनी ओळखले . कोणतीही अपेक्षा न ठेवता , कोणताही आडपडदा न ठेवता मुक्तहस्ताने बोंगाळे सरांनी मला मार्गदर्शन केले . पुढे जीवनात अनेक अडचणी आल्या , कठीण प्रसंग आले , निराशेचे क्षण आले त्यावेळी बोंगाळे सर जिवलग मित्रासारखे सोबत राहीले . कलाशिक्षक म्हणून काही वर्ष काम करावे लागले त्यावेळी शाळा सांभाळून चित्रांचा ध्यास , चित्र काढत राहण्याची मशाल सतत तेवत ठेवली पाहिजे , चित्रांचा ध्यास विसरता कामा नये याची शिकवण सरांमुळे मिळाली . आजही बोंगाळे सर मनामनात भिनलेले आहेत . व आज त्यांची आठवण तीव्रतेने आली त्याचे कारणही खास आहे .
        वाईपासून 3 किमी अंतरावर मेणवलीजवळ प्रसिद्ध कवि आर्याकार वामन पंडीत यांचे भोगाव गाव आहे . या गावाच्या रस्त्यावर निसर्गरम्य परिसरात रस्त्यालगतच माझा निसर्ग नावाचा बंगला आहे  आणि या बंगल्यातच मी एक महिना " निसर्ग आर्ट गॅलरी " या नावाने कलादालन सुरु केले आहे . 7मे पासून ते 7जून पर्यंत सुरु झालेल्या या चित्रप्रदर्शनाला खेड्यापाड्यातील अनेक गावकरी , वाई , सातारा , कराड , मुंबई , पुणे , पाचगणीतील अनेक मित्रमंडळी व पर्यटक आवर्जून येत आहेत . सातारा जिल्ह्यात आडबाजूला भोगाव सारख्या छोट्या खेडेगावात आपल्या एका वेडया चित्रकार दाम्पत्याने सुरु केलेल्या या प्रदर्शनाला मुद्दाम भेट देत आहेत व कौतुक करत आहेत .
        पण आज या भोगावच्या खेडेगावातून बालगोपाळ मित्रमैत्रिणींची एक मोठी फौजच प्रदर्शन पाहायला आली होती . यामध्ये एक मुलगा दिव्यांग होता . त्याला 2 किमी व्हीलचेअरवर घेऊन ही मुलांची टोळी चित्रप्रदर्शन पहायला आल्यावर मी वेगळ्याच विश्वात गेलो . मुलांच्या अंगात अंगभूतच खूप चैतन्य , उत्साह , उर्जा असते . त्यानां नाविन्यतेची ओढ असते . विश्वातल्या अगणित प्रश्नांची उकल करण्याची उर्मी असते . त्या सर्व मुलांनी कितीतरी नवनवे प्रश्न विचारले . त्यांची प्रश्नांची सरबती संपतच नव्हती . कारण त्यानां त्यांच्या गावात एक चित्रकार सापडला होता . आताची पिढी खूप चपळ व हुश्शार पिढी आहे . त्यांच्यापैकी एकदोन जणांकडे मोबाईल फोन होता . त्यांच्या अपेक्षाही मोठ्या होत्या . चित्रकाराची बैठक कशी असते ? माध्यमे कशी असतात ? कोणते ब्रश वापरले? पैसे किती मिळतात ? जलरंगात व तैलरंगात काय फरक असतो? किती वेळ लागतो ? गार्डन कधी सांभाळता ? चित्र कधी काढता? कॅनव्हॉस म्हणजे काय ? नाईफ पेंटींग म्हणजे काय? प्रश्न तर संपतच नव्हते .
          अशा जिज्ञासू मुलामुलींना कलादालन कसे असते ? हे माहीतच नव्हते . कलानिर्मिती करताना चित्रकारानां काय वाटते ते त्यानां मनोगत वाचताना कळाले ? त्यांनी तीन चार तास कलादालनात चैतन्य आणले ? त्यांच्या निरागस प्रश्नांना उत्तरे देताना मी स्वतःला विसरून गेलो . माणसे वयाने वाढत जातात आणि त्यांचे कुतुहूल , निरागसपण त्यांच्यातले चैतन्यपणही हळूहळू लोप पावत जाते . ती मोठी होतात आणि कोमेजत जातात . एखाद्या उमलणाऱ्या सुंदर फुलणाऱ्या फुलावर विषारी फवारा मारावा व त्यांचे फूलपणच संपवावे तशी पालक मंडळी त्यानां संपवून टाकतात . त्यांच्या कलागुणानां धार पाडण्याऐवजी कलाजोपासना म्हणजे भीकेचे डोहाळे लागलेत का ? असे म्हणून लेखक , गायक,चित्रकार ,नाट्य , वादक , व शिल्पकलेसारख्या असंख्य कलागुणानां कात्री लावतात . मुलानां फक्त दहावी बारावीत वार्षिक अभ्यासात भरपूर मार्क मिळविण्यासाठीच प्रोत्साहीत करत राहतात . त्यानां करिअर करण्याचा धोसरा लावतात . त्यानां पुरते व्यावसायिक वृत्तीचे निर्जिव पुतळे बनवतात .
        पुण्या-मुंबई सारख्या मोठ्या शहरात कलाकारानां किती मानसन्मान मिळतो याची तेथील लोकानां जाण आलेली आहे . त्यातून ते स्वतःचे करियर शोधतात .पण लांबच्या खेड्यातील कमी पट असलेल्या शाळाच बंद करून त्याच्यां सुविधा बंद करणाऱ्या व शिक्षणाचा दोर कायमचा कापणाऱ्या जाणत्या सरकारनितीपुढे काय बोलावे ?
          निसर्ग आर्ट गॅलरीत चित्र-विक्रीच्या फार मोठ्या उलाढाली होत नाहीत कारण जिल्ह्यात एकही कलादालन नसल्याने कलादृष्टी तरी कशी वाढणार ? चित्रप्रदर्शनेच होत नसतील तर चित्रभान तरी कसे वाढणार? आपण तक्रार तरी कोणाकडे करायची ? 
           मग मला आठवतो आमच्या जिल्ह्यातील मुलखावेगळा राजा . औंधचे राजे बाळासाहेब पंतनिधी . शंभर वर्षांपूर्वी खटाव तालुक्यात यमाईच्या डोंगरावर म्युझियम उभे करणारे राजे . त्यासाठी कलावंताना स्वतः दरबारी तनखा व प्रोत्साहन देऊन चित्रनिर्मिती , शिल्पनिर्मिती करवून कलाप्रसार व्हावा म्हणून अहोरात्र देशपरदेशातून स्वतःच्या पैशातून कलाकृती आणून भवानी संग्रहालय निर्माण करणारे राजे . असे मुलखावेगळे दुरदृष्टी असणारे व स्वतः कलाप्रेमी , कलावंताचे मन जाणणार  राजे आता मिळत नाहीत .
      सातारा जिल्ह्याला दोन दोन राजे आहेत पण चित्रकारानां प्रदर्शनासाठी शासनाचे कायमस्वरूपी एकतरी कलादालन जिल्हयात  कधी निर्माण होईल ?  हे कोणालाच माहीत नाही . स्वातंत्र्य मिळून जिल्हयाने अनेक मुख्यमंत्री दिले पण सातारा जिल्हा कलाकारांसाठी शापितच राहीला . येथील कलाकारानां मुंबई किंवा पुण्यात प्रदर्शन करायला जावे लागते . जिल्ह्यात महाबळेश्वर सारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळी फक्त तीन दिवसांचे महापर्यटन महोत्सव भरवून हॅलीकॉफ्टर राईड , लेझर शो , टेन्ट हाऊस बांधून , फ्लोटींग बाजारासारखी नाटके करून जनतेचेच कोट्यावधी रुपये वाया घालवून मजा करतात . त्यापेक्षा एखादे छान बालगंधर्वसारखे नाट्यगृह व कलादालन निर्माण केले असते तर जिल्यातील अनेक कलावंतांना एक कायमस्वरूपी व्यासपीठ मिळाले असते . अनेक कलावंतानी तेथे सातत्याने प्रदर्शने केली असती . कारण तेथे अनेक नामवंत श्रीमंत उद्योगपतींचे बंगले आहेत . पण खरे प्रश्न सोडवण्यात सरकारी मंडळीना उत्साह नसतो . फक्त आदेशाचे पालन करण्यात अधिकारी धन्यता मानतात . असो .
या पार्श्वभूमीवर निसर्ग आर्ट गॅलरीला भेट देणारे असे अनेक छोटे उत्साही कलावंत पाहिले तर एकतरी मुलगा सुनील काळे व एकतरी मुलगी स्वाती काळे म्हणून भविष्यात निर्माण होण्याची शक्यता आहे . त्यानां या प्रदर्शनातून जशी मला सुभाषचंद्र बोंगाळे सरांकडून " चित्रप्रेरणा " मिळाली तशी एकातरी बालकलाकाराला नक्कीच शंभर टक्के  " चित्रप्रेरणा " मिळेल असे मनापासून वाटते . म्हणून छोट्या खेड्यात महिनाभर प्रदर्शन भरविले म्हणून जराही वाईट वाटत नाही .
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
सुनील काळे (चित्रकार)✍️
9423  966486
स्वाती काळे (चित्रकार)
9158751626

निसर्ग आर्ट गॅलरी
मेणवली धोम रोड
मु.पो भोगाव ,
ता.वाई , जि. सातारा ४१२८०३
* प्रदर्शन : दि . 7 मे ते 7 जून
* वेळ : सकाळी१०ते संध्याकाळी ६ .
* प्रवेश मूल्य नाही .

जगण्याचे " स्टॅन्डर्ड " समजलेला माणूस- प्रा . डॉ . ज्ञानदेव झांबरे सर************************        पाचगणी हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शैक्षणिक केंद्र आणि थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे . ब्रिटिश काळापासून वेगवेगळ्या लोकांनी स्वधर्मियांसाठी शाळा सुरु केल्या . त्यामुळे येथे त्रेचाळीस शाळांमध्ये अठरापगड जातींचे लोक एकत्रित रहात असल्याने येथे कॉस्मोपोलीटन संस्कृती आहे . पाचगणी शहर छोटे असल्याने बहुभाषिक वेगवेगळ्या प्रांतातील मंडळी छानपैकी एकत्रितपणे राहतात . अशा या गावात माझे बालपण गेले . दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि चांगले मार्क मिळाले म्हणून अकरावीसाठी कॉलेजचा शोध सुरु झाला . त्याचवर्षी वाईला किसनवीर महाविद्यालयात नव्याने सायन्स कॉलेज सुरु झाल्याचे कळाले . BSc डिग्री मिळण्याची चांगली सोय झाली होती . त्यामुळे घरच्यांनी मला अकरावी सायन्सला प्रवेश घेण्यासाठी फोर्स केला . मी मात्र नाराज झालो होतो कारण माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले होते व सायन्सचे विषय इंग्रजी माध्यमात शिकवले जाणार होते . इंग्रजीची माझी खूप आबाळ झाली होती कारण सातवीपर्यंत आम्हाला इंग्रजीचे शिक्षकच नव्हते . इंग्रजी , गणित , सायन्स या विषयाची तर माझी कुडंली कधी जमलीच नव्हती पण त्याकाळी उलट उत्तर देण्याची प्रथा नव्हती त्यामुळे मी मुकाटपणे वाईला सायन्स कॉलेजला रोज एस.टी बसचा पास काढून येऊ लागलो .       सायन्सच्या या वर्गात शिक्षक मला काय शिकवत होते याचे मला भान नव्हते कारण मला इंग्रजी भाषाच समजत नव्हती . चाळीस पन्नास विद्यार्थी असल्याने मागच्या बेंचवर बसायला लागलो आणि मला एक नविन छंद लागला . मी चित्रे काढायला लागलो . माझ्या मित्रांची , शिक्षकांची , प्राण्यांची , वनस्पतींच्या जर्नलमध्ये आकृत्या काढणे मला आवडू लागले . कधी कधी मी वाईच्या बसमधून पसरणीघाटात उतरायचो . या घाटातील वळणदार रस्ते , दुतर्फा असलेली वडाची झाडे , पांडवगडाच्या पायथ्याच्या सभोवतालची छोटी छोटी चमकणारी भातशेती , ऊन पावसाचा खेळ , संध्याकाळची सुर्यास्ताची रंगउधळण , वाईच्या गणपती मंदिराची , वेगवेगळ्या घाटाची चित्रे मी जलरंगात उतरवू लागलो . थोडक्यात मला चित्रकलेची फारच आवड निर्माण झाली होती . चित्रकार होण्यासाठी लागणारी इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा मी बारावी सायन्सला असताना दिली व त्यामध्ये मला 'अ 'श्रेणी प्राप्त झाली होती .       चित्रकलेचे वेड इतके वाढले की मी सकाळी सहा वाजताच थंड हवेत चित्र काढायला जायला लागलो . टेबललॅन्डच्या पठारावर तर कधी सिडनेपाँईटच्या उंच चौथऱ्यावर बसून मी धोमधरणाचे पाणी ,कृष्णा व्हॅलीतील डोंगररांगा , कधी पांगारी तायघाट जवळच्या पारसी पॉईंटची चित्रे रेखाटू लागलो . आणि अचानक माझ्या लक्षात आले मला अतिथंड हवेत सकाळी फिरल्याने सर्दीचा त्रास सुरु झाला आहे . ऑक्सिजिन घेण्यासाठी दोन्ही नाकपुड्या बंद झाल्याने श्वास घेणे मुश्कील झाले आहे . डॉक्टरांनी माझे ऑपरेशन करून नाकातील वाढलेले पॉलीप्स काढावे लागतील यासाठी तातडीने ॲडमिट केले . नाकाला मोठे बँडेज बांधूनच मी 12वी सायन्सची प्रॅक्टीकल परिक्षा दिली होती . त्यानंतर  पुण्याला चित्रकलेच्या अभिनव कॉलेजला मी गेलो . चित्रकार झालो व परत पाचगणी महाबळेश्वरचा निसर्ग रंगवू लागलो होतो . थंड हवेत वेळीअवेळी सतत डोंगररांगावर भटकंती केल्याने माझा नाकाने श्वास घेण्याचा त्रास आणखीनच वेगाने वाढू लागला . डॉ. प्रशांत पोळ यांनी वेगवेगळ्या वर्षी चारपाच वेळा माझे ऑपरेशन केले आहे . एकंदरीत मला थंड हवेची ॲलर्जी झाल्याचे सिद्ध झाले व डॉक्टरांनी 2014 साली मी पाचगणी सोडावी लागेल असे निक्षून सांगितले . मला माझे पाचगणीचे बस्तान सोडून  कायमचे  वाईला यावे असे त्यांनी सांगितले व नाईलाजाने मी काही दिवस वाईला राहण्याचे ठरवले .          वाई कॉलेजचे प्राध्यापक असलेले माझे मित्र श्री .पटकुरे सर यांनी मला सह्याद्रीनगर या परिसरात बोलावले . थोडी चर्चा केली तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की त्यांच्या सोसायटीत " प्रज्ञाअमृत " नावाचा एक बंगला आहे . त्याचे मालक श्री .व सौ झांबरे दोघेही शिक्षक आहेत . त्यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर पाच खोल्यांचे घर भाड्याने मिळते . तेथे काही दिवस राहून वाईच्या परिसरातील चित्रे काढावीत . हवा बदलाने तब्बेतीवर काय परिणाम होईल हेही कळेल व एखादी जागा आवडली तर घर बांधण्यासाठी वाईत एन ए प्लॉट घ्यावा या उद्देशाने मी त्यांच्या घरी आलो .         सहयाद्रीनगरात असलेला " प्रज्ञाअमृत " अतिशय मेंटेन केलेला ,फुलझाडे असलेला सुंदर बगीचा व पार्किंगची सोय असलेला बंगला बघताक्षणीच मला आवडला . बंगल्याच्या पाठीमागे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी स्वतंत्र जीना होता . आतमध्ये सर्व नीटनेटकेपणा होता . खिडक्या दरवाजानां पडदे लावलेले होते . आम्ही दोघेही चित्रकार असल्याने चित्रकाम करण्यासाठी व राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होती . झांबरेसर , झांबरेमॅडम व त्यांची मुलगी मृणाल हे तीनच माणसे खाली रहात होते . त्यांचा मोठा मुलगा प्रणव शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला होता . पहिल्या भेटीतच आमची छान ओळख झाली व लगेच प्राथमिक बोलणी करून मी एका आठवड्यात पाचगणीवरून वाईला शिफ्ट झालो . सर व मॅडम दोघेही स्वच्छताप्रेमी होते . त्यामुळे मी रोज मॉर्निंगवॉकला वाकेश्वरला जाताना पाहायचो झांबरे सर स्वतः साफसफाई करायचे , कुंड्यांना पाणी घालणे , झाडांची निगा राखणे ,खतपाणी देणे . पूर्ण आवार पाण्याने स्वच्छ धूवून काढायची त्यांनां आवड होती . आम्ही कधीतरी समोरासमोर भेटलो की अनेक विषयांवर गप्पा मारायचो . वाईत राहण्याचे फायदेतोटे तपासून पहायचो . येथील परिसराचा माणसांचा स्वभाव व आचरणांवर चर्चा करायचो . नवनव्या जागा शोधायची आता सवय लागली होती . त्याचा आढावा घेताना झांबरे सर मनापासून प्रतिक्रिया द्यायचे .       " प्रज्ञाअमृत " या बंगल्यामध्ये रहात असताना एक घडलेला प्रसंग मला आजही लक्षात आहे व आयुष्यभर पुढेही कायम लक्षात राहील . एकदा रविवारी सुट्टीचा दिवस होता . साधारण नऊ दहा वाजताची वेळ असेल . आमची घरकाम कारणारी बाई आज येणार नव्हती त्यामुळे दोघेही निवांत पेपर वाचत बसलो होतो . आणि शेवटच्या दूरच्या खोलीतील अचानक कोपऱ्यातील किचनसिंकचा का वॉशबेसीनजवळचा नळ अलगद तुटून पडला होता . पाईपलाईन उघडी झाली आणि वेगाने पाणी रूममध्ये पसरु लागले होते . आम्ही विरुद्धदिशेच्या बाजूला असल्याने काही आवाजच आला नाही . हळूहळू पडणाऱ्या पाण्याने ती रुम भरून गेली होती आणि अचानक खालून झांबरे मॅडम व सर दोघेही वरच्या मजल्यावर आले .त्यांनी घराची बेल वाजवली आणि त्यांच्या लगेच लक्षात आले की शेवटच्या खोलीतून पाणी जवळपास चारपाच इंच भरून दुसऱ्या रूममध्ये पाणी पसरू लागले होते . झांबरे सरांनी लगेच प्लंबरला फोन लावला येताना नवीन नळ घेऊन यायला सांगितले . पटकन टेरेसवर जावून मुख्य पाईपलाईन बंद केली . इतक्यात झांबरे मॅडम पटकन खाली गेल्या , येताना त्यांनी फरशी पुसण्याचा रबरमॉप व चारपाच फरशी पुसण्याचे जाड कपडे घेऊन एक बादली आणली . त्यांची मुलगी मृणाल देखील मदतीला आली . इकडे बनियन व लुंगी घालून निवांत बसलेले झांबरे सर गुडघ्यापर्यंत लूंगी गुंडाळून पटकन फरशीवरील पाणी बादलीत भरू लागले . झांबरे मॅडम यांनी लगेच साडीचा पदर खोचून मॉपने पाणी बाहेर टाकायला सुरुवात केली . मग आम्ही दोघेही त्यांच्यामध्ये सामील झालो व सर्व जणांनी रुममध्ये साचलेले पाणी काढून तासाभरात सगळा बंगला चकाचक केला . नंतर प्लंबर आला त्याने नवीन नळ बसवला .आता तुम्ही म्हणाल यात आश्चर्याची गोष्ट काय ? तर आम्ही झांबरे सरांचे भाडेकरू होतो . पाण्याचा नळ दुरुस्त करून रुम साफसफाई करण्याची जबाबदारी आमची होती . ते घरमालक होते . उच्चशिक्षित पी एच डी झालेले कॉलेजचे प्राध्यापक होते . मॅडम एम एस सी व जॉय स्कूलच्या उपप्राचार्या होत्या . एकदा घर भाड्याने दिले की त्याची देखभाल करण्याची जबाबदारी भाडेकरूचीच असते . त्यादिवशी दुपारी आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि तो प्रसंग एन्जॉय केला . कोणीही कसलीही तक्रार झाली नाही . दोन चार महिन्यातच आम्ही " प्रज्ञाअमृत " बंगला सोडला . नवीन जागा घेतली तेथे मोठे अपयश आले . नंतर मग आमचा मेणवली गावाजवळ " निसर्ग " नावाचा बंगला तयार केला . मागच्या वर्षी तेथे " निसर्ग आर्ट गॅलरी " नावाने चित्रप्रदर्शनही भरवले होते . अनेक वेगवेगळ्या जिल्हयातील , तालुक्यातील पर्यटक प्रदर्शन पाहण्यासाठी येत होती . एकदा किसनवीर कॉलेजचे प्रा. श्री रमेशचंद्र बारगजे सरांनी फोन केला की त्यांच्या कोल्हापूरच्या 1973 सालच्या एम .एस .सी बॅचचे क्लासमेटस यांचे वाई येथे गेटटुगेदर आयोजित केले आहे त्यावेळी तुमची निसर्ग आर्ट गॅलरी पाहायला सर्वजण येणार आहेत . धोमचे मंदिर पाहून सर्व गाड्या निसर्ग आर्ट गॅलरी पाहण्यासाठी गेटपर्यंत आल्या . त्यानां पार्कींगची जागा दाखवत होतो त्यावेळी एक गाडी मात्र गेटपासून दूर थोड्या अंतरावर उभी राहीलेली पाहीली . बारगजे सरानां ती गाडी बाहेर का थांबली म्हणून विचारले तर सरांनी कपाळावर हात मारून घेतला . मला म्हणाले काय बोलू आता ? ती गाडी तुझ्या सख्या चुलत व मावसभाऊ असलेल्या हनुमंत काळे यांची आहे . तो आमच्या बॅचचा सर्वात अतिशय हुशार विद्यार्थी होता . युनिव्हरसिटीत प्रथम आला होता . त्याला आम्ही सांगितले चित्रकार सुनील काळे तुझा भाऊ आहे . त्याने वाई ,पाचगणी महाबळेश्वर या परिसरातील असंख्य अप्रतिम चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत , त्याची मिसेस चित्रकार स्वाती काळे हिने असंख्य फुलांची तैलरंगात चित्रे काढलेली आहेत . उत्तम चित्रप्रदर्शन आहे . तुमची तीस वर्ष झाली भेट झालेली नाही तर तुम्ही आता जरूर भेटा व प्रदर्शनही पहा . पण तुझा भाऊ गाडीतून उतरायला तयार नाही त्याचे कुटुंबीय गाडीतच बसून आहेत .ते म्हणतात आम्ही भावकीत जात नाही कारण आमचे " स्टॅन्डर्ड " मोठे आहे . मी मोठ्या कंपनीत ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर होतो . तो साधा चित्रकार आहे त्याची माझी तुलना होऊ शकत नाही . तुम्ही सगळे प्रदर्शन पाहायला जा आम्ही बाहेर रस्त्यावर गाडीत बसून राहू . तो एक तास बाहेर थांबला पण घरात आलाच नाही . खरे तर हा हनुमंतदादा आता हेमंत नाव लावतो . कारण आईबापाने ठेवलेले हनुमंत हे नाव त्याला आवडले नाही . अतिशय गरिबीतून त्याला शिक्षण दिले होते .स्वतःच्या कर्तबगारीने तो उच्चपदावर पोहचला त्याचे उच्चशिक्षित मुलीबरोबर लग्न झाले पण लग्नानंतर व अगोदर नोकरी करत असतानाही या दादाने कधीच कोणत्याही भांवडाला जवळ केले नाही . कोणत्याही नातेवाईकांकडे ते फिरकले नाहीत . कोणाशी कसलाही संबंध ठेवला नाही ,कोणालाही मदत केली नाही . संपूर्ण कुटुंबाला दूर ठेऊन दादा मोठा स्टॅन्डर्डवाला झाला . आमचा दादा कसा दिसतो हे मला पाहण्याची उत्सुकता होती . कारण तो माझ्यापेक्षा पंधरावीस वर्षांनी मोठा होता . पण " स्टॅन्डर्ड "आडवे आले . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात . शिक्षणामुळे माणूस विचारवंत होतो त्याच्या ज्ञानाच्या कक्षा उचांवतात . त्याचे जीवन सुखकर व समृद्ध होतेच पण त्याच्यां विशाल छायेत अनेकानां संजीवनी मिळते . उच्चशिक्षित भावाने मात्र आमच्या सर्वांसाठी त्याचे दरवाजे मात्र कायमचे बंद केले होते . उच्चशिक्षणाचा मला तेथे काहीच उपयोग झालेला दिसला नाही . इथे मला पीचडी झालेले उपप्राचार्य झांबरे सर आठवतात . उपप्राचार्या झांबरे मॅडम आठवतात . स्वतःच्या भाड्याने राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाशी प्रेमाने सुखदुःखाची विचारपूस करत असत . ते दोघेही स्वतःचे " स्टॅन्डर्ड "कधी गोंजारत बसले नाहीत .  सामान्य माणसासारखे राहून दोघेही असामान्य कामे करत राहीली . जॉय स्कूल व किसनवीर विद्यालयातील विद्यार्थी घडवताना आपल्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांला घडवण्याचे . " स्टॅन्डर्ड " काम त्यांनी आयुष्यभर केले व त्याचा गर्वही कधी केला नाही . जीवन जगण्याचे खरे " स्टॅन्डर्ड " त्यांनां कळले आहे म्हणून माझ्या त्या अतिउच्चशिक्षित एम एस सी फर्स्टक्लास झालेल्या अडाणी भावापेक्षा झांबरे पती पत्नींविषयी मला आदर वाटत आहे .     महिन्यापूर्वी एकदा झांबरे मॅडमचा मला फोन आला . त्यांनी विचारपूस केली व त्या जॉय स्कूलची नोकरी सोडून पुण्यात नातवाचा सांभाळ करण्यासाठी पुण्यात रहात असल्याचे सांगितले . मुलगा सिव्हील इंजिनियर व सुनबाई पेशाने सरकारी वकील असल्याने दोघेही कामात व्यस्त झाले मग मुलाकडे लक्ष कोण देणार ? म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला . आणि ते ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . माझी आर्ट गॅलरी होती . ती सांभाळताना माझी तीन वर्षाची मुलगी सांभाळण्यासाठी मी आईवडीलानां विनंती केली तर त्यांनी नकार दिला . गावाकडे शेतीची कामे असतात त्यामुळे तुमची मुलगी तुम्हीच सांभाळा असे उत्तर आईने दिले . शेवटी आमच्या संघर्षाच्या लढाईत मुलगी देवाघरी गेली . ती वारली त्यावेळी मी माझ्या मेव्हण्याला सत्यजितला फोन केला . तो म्हणाला मी अत्यंविधीला येऊ शकणार नाही . तो देखील Phd झालेला आहे . अतिउच्चशिक्षित आहे . त्याला भाचीच्या अत्यंविधीला जाण्याची गरज वाटली नाही . बहिणीला कठीण स्थितीत आधार देण्याची आवश्यकता वाटली नाही आणि पुढे आता सत्तावीस वर्ष झाली तरी त्याला आमची कधीच आठवणही झाली नाही . काय उपयोग त्या डॉक्टरेटचा ? जिथे माणूस माणसाला ओळखत नाही .मोबाईल ,फोन , लॅपटॉप आले तंत्रज्ञान वाढले तरी मनाची आढी मात्र कायम राहीली .कधी त्याच्या कुटूंबाने संपर्कच केला नाही कारण "स्टॅन्डर्ड " आडवे आले .त्यावेळी खऱ्या अर्थाने एकटे जगायला शिकलो . अशावेळी झांबरे मॅडमचा त्याग मला प्रेरणा देणारा वाटतो . मुलांविषयची माया त्यांच्या कृतीतून दिसते .इकडे सरांनां रिटायर्ड होण्यापूर्वी खानावळीत जेवण करावे लागले . काही महिने एकटेपणा स्विकारावा लागला . पण त्यांनी कधीही त्याची तक्रार केली नाही . कॉलेजमध्ये त्यांनी अनेक कार्यक्रमात स्वतःला झोकून दिले . त्यांच्या कॉलेजच्या कारकीर्दीची मला जास्त माहिती नाही पण त्यापेक्षा माणुसकी जपणारे , कुटुंबाला जपणारे , अभिमान नसणारे , मोठेपणाचा त्याग केलेले गार्डनमध्ये स्वच्छता करणारे डॉ झांबरे सर मनाला फार भावले . त्यांच्या मुलाचे लग्न ठरले त्यावेळी प्रणवच्या लग्नाला आम्ही दोघेही गेलो होतो . लग्नकार्यालय पूर्णपणे भरून गेले होते प्रचंड गर्दी होती तरीही झांबरेसरांनी आम्हाला बरोबर पकडलेच . शाल श्रीफळ देऊन योग्य मानसन्मान केला त्यावेळी मला या झांबरे कुटूबांचेखरे " स्टॅन्डर्ड " कळाले . वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य नामवंत लहानमोठ्या माणसांनी संपूर्ण हॉल भरून गेला होता . काय असते स्टॅन्डर्ड ?? तुम्ही जगत असता त्यावेळी त्या तुमच्या जगतानाच्या काळात असंख्य माणसे भेटतात . त्यातील काही माणसे चांगली वागलेली असतात काही वाईट वागलेली असतात . पण शेवट काय असतो ? तुमच्या जगण्याला कधीतरी मर्यादा येतेच . कधीतरी शरीर थकते व तुम्हाला अंतिम श्वास घ्यावा लागतो . त्यानंतर कोणत्यातरी स्मशानघाटाजवळ तुमची राख होते ती राख पाण्यात मिसळते तुमचे अस्तित्व संपते . जग काही दिवस तुमची आठवण काढते नंतर तुमची कोणी आठवणही काढत नाही . तुमचे " स्टॅन्डर्ड " काही असो शेवटी तुमची राखच होते . हे ज्यानां समजते त्यांचे भावविश्व वेगळे असते . ते कायम हसतमुख असतात . ते त्यांच्या कृतीतून त्यांचे वेगळेपण जोपासत असतात .अनेकानां त्यांचे जगणे प्रेरणा ठरत असते .असे जीवनाचे खरे " स्टॅन्डर्ड " कळालेले झांबरे सर मला आवडतात . काही महिन्यांपूर्वी अचानक आमच्याकडे घरकाम करणाऱ्या बाई व माळीकाम करणारा त्यांचा मुलगा या दोघांनी आमचे काम सोडले. काही दिवस आम्ही वेगवेगळी माणसे शोधली पण त्यांच्या पगाराच्या अपेक्षा जास्त असल्याने जुळले नाही . मग झांबरे सर पुन्हा आठवले . Phd झालेला माणूस स्वतः झाडलोट करतो , बागेची निगा राखतो तर आपण का लाजायचे ? त्यांच्यापासून प्रेरणा घेतली . आता मी बागकामात तरबेज झालोय बागेत शेतात काम केल्यामुळे आरोग्यही चांगले राहते याचा शोध लागला . आपण कोणावर विसंबून राहायचे नाही काम करत राहायचे हेच खरे " स्टॅन्डर्ड " झांबरे सरांकडून मी शिकलो . खरी डॉक्टरेट तीच आहे . मे महिन्यात ते आता रिटायर्ड होतील . अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या सरानां व झांबरेमॅडम या दोघांनाही उर्वरीत रिटायर्ड आयुष्य सुखसमृद्धीचे आनंदाचे जावे त्यांच्या मनासारखे जगताना उत्तम आरोग्य प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना व मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !चित्रकार - सुनील काळे✍️9423966486निसर्ग आर्ट गॅलरी [वाई]