ब्लॉग संग्रहण

बुधवार, १८ मार्च, २०२६

पानगळ

पानगळ ..................
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

      माणूस नावाचा जो प्राणी आहे त्याचा मेंदू , त्याचे विचार ,त्याच्या अपेक्षा किती वेगाने वाढत राहतात याचा विधात्याला सुद्धा पत्ता लागत नाही . जीवन नेमके कशासाठी जगायचे ? जगताना आपण नेमकी दिनचर्या कशी ठरवायची ? आपण स्वतःला नेहमी उत्साहित , आनंदी कसे ठेवायचे याचा विचार मला रोज सकाळी उठल्यापासून पडतो. कारण सतत आनंदी व उत्सव साजरे करण्यासारखे दिवसभरात काय तरी घडले पाहीजे याची वाट पहावी लागते .
      माणसे स्वप्न पाहतात , त्या स्वप्नानां प्रत्यक्ष आकार देण्यासाठी अहोरात्र झटतात . सतत अवघड यातना झेलत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाताना प्रत्येक वेळी झुंजावे लागते तरच यशप्राप्ती होते .
     पाचगणीमध्ये ब्रिटिशांनी निवासी शाळा बांधल्या त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्लडवरून नामवंत शिक्षक आणले . या शिक्षणतज्ञानां राहण्यासाठी व उद्योगपती श्रीमंताना राहण्यासाठी अलिशान बंगले बांधले . सुदैवाने पूर्वी या सर्व बंगल्यामध्ये मला जाण्याचा योग आला . त्यावेळी राहणारे स्थानिक माळ्यांची मुले शाळेत शिकायला असायची . आमच्या घरासमोर एसटी स्टॅन्ड होते व त्यापाठीमागे ' दि आर्क पॅलेस ' नावाचा नबाब बिजलीखान यांचा बंगला होता . मी व माझा मित्र घन:श्याम रोज संध्याकाळी अभ्यास करायला जायचो . नबाबसाहेब मोठे प्रेमळ गृहस्थ होते . ते आमच्यासारख्या गरीब मुलानां अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यायचे. खडीसाखर , शिरा , वाटीभर दूध सर्व मुलानां देत असत . त्यांच्या बंगल्यामध्ये अलिशान कलाकुसर केलेले सागवानी सोफासेट , डेकोरेटीव्ह खुर्च्या , सागवानी ॲटींक शिसम लाकडाचे पलंग, उंची कपाटे व त्यांच्या पूर्वजांचे भव्य आकारातील तैलरंगातील चित्रे भिंतींना शोभा आणत असत . त्या घरात एक भव्यतेचा अहसास देणारी नीरव शांतता असे . पिवळसर रंगाचे बल्ब व अलिशान झुंबरे त्या ऐश्वर्याला शोभा देणारे होते . त्याच्या विरुद्ध वातावरण माझ्या घरी होते . पुढे दुकान असायचे तेथे नेहमी गिऱ्हाईकांची गर्दी असायची . आतमध्ये कामगार व त्यांची कामाची गडबड , आतमध्ये घरात एकत्र कुटुंब पद्धतीमुळे भरपूर माणसे असत . सेपरेट बेडरूम , हॉल , अभ्यासाची खोली अशी रचना किंवा भानगडच माहिती नव्हती . सगळीकडे सतत हल्लाकोळ , आवाज व बडबड सुरु असायची . नीरव शांतता हे त्यांनां माहीतच नव्हते .
        ब्रिटिशांनी जाताना हे एकरात पसरलेले बंगले पारशी , इराणी , गुजराथी , बोहरी , मुस्लीम , ख्रिश्चन  श्रीमंत व्यक्तींना विकले . त्यामुळे आता त्याठिकाणी हॉटेल्स , सॅनिटोरियम्स , शाळा आहेत. भव्य इमारत , उतरत्या छपरांची बांधणी सभोवताली असंख्य झाडे, फुलांचा बागबगीचा , गुलाब व स्थानिक फुलांची सजावट केलेल्या सिमेंटच्या मोठ्या कुंड्या सर्व बंगल्यात आजही आहेत .
      विरजी फॅमिलीचा ' मेडस्टोन ' , अदाजानिया फॅमिलीचा ' मेहेरबाय हाऊस ' 
बेबी पाईंट शेजारी फर्नांडीस यांचे 'एनफिल्ड ' पोलीस स्टेशन ग्राऊंडच्या मागचा सोहराब मोदींचा बंगला , टाटांच्या मालकीचा 'टाटा टेक्सटाईल ' जिमी पंथकीचा 'डलवीच हाऊस ' डॉ . मर्चंट यांचा ' चिस्तिया मंजील ' असे अनेक बंगले मी पाहिलेले आहेत . बिलिमोरीया स्कूल , इल पलाझो हॉटेल , प्रोस्पेक्ट हॉटेल, न्यू इरा स्कूल अशा ठिकाणच्या बागा मला आजही आवडतात . सिल्व्हर वृक्षांची उंचच उंच झाडे व त्या बंगल्याच्या आजूबाजूचा परिसर मनाला फार मोहवून टाकत असे . मग गेली पन्नास वर्ष या परिसरात राहिल्यामुळे आपलाही एखादा असा बंगला असावा अशी स्वप्ने मला पडू लागली .
         एखाद्या उद्योगपतीला , व्यापाऱ्याला , कारखानदाराला बंगल्याचे स्वप्न पूर्ण करायला अवघड नसते कारण त्यानां आर्थिक पाठबळ व कुटूंबाची साथ असते. त्यासाठी मोठी आर्थिक गणिते असतात ती सोडवायला मित्रमंडळी असतात . पण मी पडलो चित्रकलेच्या प्रेमात . तेथे नियमित उत्पन्न नाही . कलाप्रेमींची साथ नाही . साताऱ्यातील सर्व तालुक्यांमध्ये एकही आर्ट गॅलरी नाही अशा विरुद्ध वातावरणात बंगला बांधण्याचे मुंगरीलालके हसीन स्वप्न होते . पण स्वाती व मी हार मानली नाही . आपले स्वप्न पाचगणीत होणे शक्य नाही हे आमच्या लक्षात आले . वाईजवळ कमी बजेटमध्ये मग मेणवली गावाबाहेर आम्ही जागा घेतली व ' निसर्ग ' बंगल्याचे स्वप्न दहा वर्षांपूर्वी पूर्ण केले .
         स्वप्न धडपड करून पूर्ण झाले पण त्या स्वप्नांना साकार झाल्यानंतर टिकवून ठेवणेही महत्वाचे असते. अठरा हजार स्क्वेअर फूट जागा पाच हजार स्क्वेअर फूटांचे घर व बागबगीचा तयार केला . उत्साहाने आंबा , रामफळ , नारळ , चिक्कू , लिंबू , पाम , केळी , डाळींब , फणस , सप्तपर्णी , तूती अशी अनेक प्रकारची झाडे लावली . झाडे लहान असताना त्यांनां योग्य खतपाणी व नीगा राखण्यासाठी मेहनत केल्याने झाडे भरपूर उंच झाली . पण आता त्यांची देखभाल करणे अवघड झाले आहे . जास्वंद, सदाफूली , झेंडू ,सुर्यफुले यांनी जवळपास 300 कुंड्या त्यांनां नियमित पाणी देणे , खुरपणे , खते टाकणे अशी असंख्य कामे वाढली . त्यासाठी स्थानिक माळी किंवा एखादे छोटे कुटूंब शोधायला सुरुवात केली पण यश मिळाले नाही . वाईला एम आय डी सी आहे . तेथे गरवारे , एचपी , मालाज जॅम ,अथर्व फौडेंशन यासारख्या असंख्य कंपन्या आहेत . आजूबाजूच्या खेड्यातील सर्व शेतकरी व तरुण मुले आता शेतीपेक्षा या कंपन्यामध्ये कामाला जातात तेथे त्यांनां चांगला रोज मिळतो . बायकानां नेण्या आणण्यासाठी बसची सोय केली आहे . त्यामुळे शेतात बेननी करण्यासाठी वेळ घालवण्यापेक्षा पंधरावीस हजार रुपये मिळत असल्याने सगळे अशा कंपनीत काम करण्याला प्राधान्य देत आहेत . मग तुमच्या घरकाम व माळीकामाला विचारतो कोण ? शेवटी त्यांचे पगारांचे आकडे ऐकून आम्ही माघार घेतली . आमची दोघांनी कामे वाटून घेतली . आता लढाई खरी सुरु झाली .
      सकाळी उठलो की बागेत फेरफटका मारतो आणि लगेच लक्षात येते की आज काय काय कामे करायची आहेत . कधी पाला पाचोळा पडलेला असतो ,कधी झाडाची फांदी तुटलेली असते ,कधी पाणी मारायचे कधी झाडू मारायचा असतो . अशावेळी लक्षात येते बंगल्याचे नुसते स्वप्न पाहणे हे सोपे काम आहे पण बंगला व त्याचा परिसर स्वच्छ ठेवणे , मेंटेनन्स करणे हे कधीही न संपणारे काम आहे. पण कोणी मदतनीस नाही खंत वाटत असे . या मदतनीसाची वाट तरी किती दिवस पहाणार ? अस्वच्छता तर पाहवत नाही मग आता स्वतःला "आत्मनिर्भर "करणे गरजेचे ठरते .हातात झाडू घेऊन साफसफाई मेंटेनन्सची कामे करावीच लागतात .घरकामाला तर पर्यायच राहत नाही .
       माणसाला एकाच कामाचा लवकरच कंटाळा येतो तसाच मलाही कंटाळा येतो पण ब्रिटीशकालीन बंगला पाहण्याचे स्वप्न अंगाशी आल्याचे दुःखही होते. कारण मोकळ्या जागेत पालापाचोळा नेहमीच पडतो .
      एकदा सकाळीच लक्षात आले की कोणी शेतकऱ्याने ऊसाचे पाचट पेटवल्याने संपूर्ण परिसरात काळे भूसकट तण सगळीकडे पसरलेले होते . वाऱ्याने उडून सगळीकडे पालापाचोळा काडीकचरा पडलेला होता . मोठी पानगळ झाली होती .मग लगेच झाडू घेऊन साफसफाईला सुरुवात केली. आणि तीन चार तासात पंचवीस तीस बादल्या झाडांची पाने गोळा केली. सर्व परिसर स्वच्छ केला होता . बंगल्याच्या बाहेर मोठ्ठा सुक्या पानांचा ढिग तयार झाला होता . त्या पानगळीच्या पानानां पेटवले व मी आतमध्ये पाणी पिण्यासाठी गेलो .
         निसर्गाचा काय भरोसा नाही हे लवकरच माझ्या लक्षात आले . भयंकर मोठी वावटळ व वेगवान वाऱ्याचा झंझावात सुरु झाला होता . भर दुपारी एखादे सुनामी सारखे चक्रीवादळ सुरु झाले होते. जेवढा परिसर तीनचार तास खपून स्वच्छ केला होता तेथे पुन्हा मोठी पानगळ होत होती . पावसासारखी पाने टपाटप पडत होती . धुळीचा लोट चक्राकार फिरून फिरून या पानानां गरगर फिरवत आपटत होता . सगळीकडे अहःकार सुरु होता . डोळ्यांना फक्त धुळीचे लोट दिसत होते . मी तसाच स्तब्ध होऊन खुर्चीवर बसलो . माझी मती गुंग झाली होती विचार करण्याची बुद्धी संपली होती समोर पानांचा ढिग पडलेला दिसत होता . मी हतबल झालो होतो . डोक्याला हातच लावून बसलो कारण मी पूर्ण निराश झालो होतो .
सगळीकडे वाळलेली पिवळसर असंख्य पानेच पाने पडलेली होती . वाऱ्याचा झंझावात सुरूच होता पाने पुन्हा पुन्हा पडतच होती जणू भयंकर प्रलयकाळ आताच संपलेला होता . . .
       अशा या भर दुपारच्या चक्रीवादळात मी सुन्न बसलेलो असतानाच अचानक चारपाच पाने माझ्या अगांवर पडली . त्यातले एक आंब्यांचे पान होते . ते पान चक्क माझ्याशी बोलूच लागले. मी तर एकदम आश्चर्यचकीतच झालो . असे पान एकदम बोलू कसे शकते . नीट पाहतो तर खरेच पाने बोलत होती . .
    काय झाले मित्रा ? एवढा काय निराश होऊन डोक्याला हात लावून बसला आहेस ? अरे ही पानगळ होती . आता पानगळीचे दिवसच आहेत . निसर्गचक्र सतत सुरुच असते . नवी पालवी फुटणार असते . नवा चमत्कार घडणार असतो नवी धुमारी फुटणार असते . कालचक्र सतत सुरु असते . काळ कोणासाठी थांबत नसतो . 
कारण पानगळ ही होणारच असते . . . . . .
      तु ज्या बंगल्याची वर्णने केलीस तेथे आता पुन्हा जा . गावच्या  रजिस्टर मालमत्ता ऑफीसमध्ये जरूर जा . तेथे असणारे सातबारा पहा . या सातबाऱ्यात तुला आता बदल दिसतील . ज्या मालकानां तु ओळखत होतास ती आता काळाच्या पडद्याआड गेली आहेत . तेथे नवे मालक आले आहेत. काही जणांनी त्यांच्या मालकीचे  बंगले विकले काही जणांची वारस रुपाने नवी पिढी आली . काळाचा महिमा अपरंपार आहे . जुने जाणार नवे येणार हे बदल सतत घडतच असतात . या बदलानां स्विकारावेच लागते . काही झाडे तशीच आहेत तर काही झाडे सरकारी माणसांनी काही झाडे नव्या मालकांनी तोडली . काही बंगले तसेच आहेत तर काही बंगल्यांना बुलडोझर लाऊन मालकांनी नवी हॉटेल्स बांधली आहेत . परिसर तोच असतो पण माणसे जिथे जिथे जातील तेथे तेथे नव्या गोष्टी करतील . सृष्टीचा हा नियमच आहे नव्याचा स्विकार करत जुने पाठीमागे सोडून द्यावेच लागते .
कारण पानगळ ही होणारच असते . . . . .
         त्या जीर्ण पानाने माझ्या डोळयात पाहिले आणि विचारले किती वर्ष झाली ही झाडे लावून ? दहा वर्षांपूर्वी छोट्या नर्सरीतून तू आम्हाला आणलेस , मोठ्या प्रेमाने जमीनीत लावण केलीस , खतपाणी टाकलेस , विटांचे जमीनीवर छोटे कुंपन केलेस , ऊनवाऱ्यात पडू नये म्हणून काठीचा आधार दिलास . बघता बघता आम्ही झाडमंडळी 10 ते 20 फूटापर्यंत उंच भरारी मारली .
लहानपणी हरितद्रव्ये भरूभरून मिळाली हिरव्या रंगात न्हाऊन निघालो . आता नीट बघ बरे ? मी पान हातात घेतले नीट पाहीले पानाचा रंग पिवळा झाला होतो . त्याच्या पर्णरेषा सुकल्या होत्या . मध्येच पूर्णपणे आरपार भोके पडलेली होती . शीरा उघड्या झाल्या होत्या . एकंदर पान म्हातारे झाले होते . त्याचा अवतार सुकल्यामुळे जीर्ण झाला होता . पान शांतपणे म्हणाले आता आकाशाशी गवसणी घालण्याचे दिवस गेले . आता या काळ्या मातीची ओढ लागली आहे . तु कसा आता सगळी पाने गोळा करतोस व आम्हाला बाहेर मुखाग्नी देतोस तेथे आमची राख होते . ही राख त्या काळ्या मातीत किंवा कृष्णेच्या पाण्यात वाहत जाते . तसेच तुमचे माणसाचे जीवन . तुम्हीही म्हातारे होता . केस पांढरे होतात . शीरा आकसतात . चेहऱ्याचे तेज कमी होत जाते . हातपाय थरथरतात . कितीही श्रीमंत असा कितीही पैसेवाले असा कितीही हुशार डॉक्टर कसलेही विज्ञान कसलेही औषधोपचार तुमचा जीव वाचवू शकणार नाहीत , कितीही सौंदर्यांचा अभिमान असो, कितीही ज्ञानाचा गर्व असो , कितीही मोठ्या घरातले वारसदार असो . निसर्गकालचक्र कोणालाच सोडत नाही . कधी सुनामीसारखे वादळ येईल , कधी करोनासारखी महामारी येईल , कधी गाडीचा , रेल्वेचा , विमानाचा अपघात होईल . कधी डॉक्टरांचे औषधोपचार चुकतील तर कधी स्वतःचेच दुर्लक्ष कडेकपाऱ्यातून किंवा साधे चालत असलात तरी किरकोळ अपघात झाल्यामुळे तुमची इच्छा असो वा नसो तुम्हाला हे जग सोडावेच लागते . सृष्टीचा कालचक्राचा नियम कधीच कोणाला चुकत नाही .
         आता मला पानगळीचा त्रास होत नाही , मला पानाने त्याची पूर्ण हकीकत ऐकवली त्याचा सारांश एवढाच कळाला की तुम्ही कोणीही महान व्यक्ती असा किंवा साधी माणसे असा , कोणत्याही धर्माचे असा , छोटे कर्म करणारे असा वा महान कर्म करणारे असा आपला सर्वांचा प्रवास या पानांसारखाच आहे . अलगद झाडापासून निघायचे दुरच्या प्रवासाला . कितीही अडचणी येवोत आनंदाने प्रवास करत राहायचे .

पानगळ ही होणारच असते . . . . . . 
पानगळ ही होणारच असते . . . . . . 
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃   
 ✍️ सुनील काळे 9423966486 .

जगण्याचे " स्टॅन्डर्ड " समजलेला माणूस- प्रा . डॉ . ज्ञानदेव झांबरे सर************************        पाचगणी हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शैक्षणिक केंद्र आणि थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे . ब्रिटिश काळापासून वेगवेगळ्या लोकांनी स्वधर्मियांसाठी शाळा सुरु केल्या . त्यामुळे येथे त्रेचाळीस शाळांमध्ये अठरापगड जातींचे लोक एकत्रित रहात असल्याने येथे कॉस्मोपोलीटन संस्कृती आहे . पाचगणी शहर छोटे असल्याने बहुभाषिक वेगवेगळ्या प्रांतातील मंडळी छानपैकी एकत्रितपणे राहतात . अशा या गावात माझे बालपण गेले . दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि चांगले मार्क मिळाले म्हणून अकरावीसाठी कॉलेजचा शोध सुरु झाला . त्याचवर्षी वाईला किसनवीर महाविद्यालयात नव्याने सायन्स कॉलेज सुरु झाल्याचे कळाले . BSc डिग्री मिळण्याची चांगली सोय झाली होती . त्यामुळे घरच्यांनी मला अकरावी सायन्सला प्रवेश घेण्यासाठी फोर्स केला . मी मात्र नाराज झालो होतो कारण माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले होते व सायन्सचे विषय इंग्रजी माध्यमात शिकवले जाणार होते . इंग्रजीची माझी खूप आबाळ झाली होती कारण सातवीपर्यंत आम्हाला इंग्रजीचे शिक्षकच नव्हते . इंग्रजी , गणित , सायन्स या विषयाची तर माझी कुडंली कधी जमलीच नव्हती पण त्याकाळी उलट उत्तर देण्याची प्रथा नव्हती त्यामुळे मी मुकाटपणे वाईला सायन्स कॉलेजला रोज एस.टी बसचा पास काढून येऊ लागलो .       सायन्सच्या या वर्गात शिक्षक मला काय शिकवत होते याचे मला भान नव्हते कारण मला इंग्रजी भाषाच समजत नव्हती . चाळीस पन्नास विद्यार्थी असल्याने मागच्या बेंचवर बसायला लागलो आणि मला एक नविन छंद लागला . मी चित्रे काढायला लागलो . माझ्या मित्रांची , शिक्षकांची , प्राण्यांची , वनस्पतींच्या जर्नलमध्ये आकृत्या काढणे मला आवडू लागले . कधी कधी मी वाईच्या बसमधून पसरणीघाटात उतरायचो . या घाटातील वळणदार रस्ते , दुतर्फा असलेली वडाची झाडे , पांडवगडाच्या पायथ्याच्या सभोवतालची छोटी छोटी चमकणारी भातशेती , ऊन पावसाचा खेळ , संध्याकाळची सुर्यास्ताची रंगउधळण , वाईच्या गणपती मंदिराची , वेगवेगळ्या घाटाची चित्रे मी जलरंगात उतरवू लागलो . थोडक्यात मला चित्रकलेची फारच आवड निर्माण झाली होती . चित्रकार होण्यासाठी लागणारी इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा मी बारावी सायन्सला असताना दिली व त्यामध्ये मला 'अ 'श्रेणी प्राप्त झाली होती .       चित्रकलेचे वेड इतके वाढले की मी सकाळी सहा वाजताच थंड हवेत चित्र काढायला जायला लागलो . टेबललॅन्डच्या पठारावर तर कधी सिडनेपाँईटच्या उंच चौथऱ्यावर बसून मी धोमधरणाचे पाणी ,कृष्णा व्हॅलीतील डोंगररांगा , कधी पांगारी तायघाट जवळच्या पारसी पॉईंटची चित्रे रेखाटू लागलो . आणि अचानक माझ्या लक्षात आले मला अतिथंड हवेत सकाळी फिरल्याने सर्दीचा त्रास सुरु झाला आहे . ऑक्सिजिन घेण्यासाठी दोन्ही नाकपुड्या बंद झाल्याने श्वास घेणे मुश्कील झाले आहे . डॉक्टरांनी माझे ऑपरेशन करून नाकातील वाढलेले पॉलीप्स काढावे लागतील यासाठी तातडीने ॲडमिट केले . नाकाला मोठे बँडेज बांधूनच मी 12वी सायन्सची प्रॅक्टीकल परिक्षा दिली होती . त्यानंतर  पुण्याला चित्रकलेच्या अभिनव कॉलेजला मी गेलो . चित्रकार झालो व परत पाचगणी महाबळेश्वरचा निसर्ग रंगवू लागलो होतो . थंड हवेत वेळीअवेळी सतत डोंगररांगावर भटकंती केल्याने माझा नाकाने श्वास घेण्याचा त्रास आणखीनच वेगाने वाढू लागला . डॉ. प्रशांत पोळ यांनी वेगवेगळ्या वर्षी चारपाच वेळा माझे ऑपरेशन केले आहे . एकंदरीत मला थंड हवेची ॲलर्जी झाल्याचे सिद्ध झाले व डॉक्टरांनी 2014 साली मी पाचगणी सोडावी लागेल असे निक्षून सांगितले . मला माझे पाचगणीचे बस्तान सोडून  कायमचे  वाईला यावे असे त्यांनी सांगितले व नाईलाजाने मी काही दिवस वाईला राहण्याचे ठरवले .          वाई कॉलेजचे प्राध्यापक असलेले माझे मित्र श्री .पटकुरे सर यांनी मला सह्याद्रीनगर या परिसरात बोलावले . थोडी चर्चा केली तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की त्यांच्या सोसायटीत " प्रज्ञाअमृत " नावाचा एक बंगला आहे . त्याचे मालक श्री .व सौ झांबरे दोघेही शिक्षक आहेत . त्यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर पाच खोल्यांचे घर भाड्याने मिळते . तेथे काही दिवस राहून वाईच्या परिसरातील चित्रे काढावीत . हवा बदलाने तब्बेतीवर काय परिणाम होईल हेही कळेल व एखादी जागा आवडली तर घर बांधण्यासाठी वाईत एन ए प्लॉट घ्यावा या उद्देशाने मी त्यांच्या घरी आलो .         सहयाद्रीनगरात असलेला " प्रज्ञाअमृत " अतिशय मेंटेन केलेला ,फुलझाडे असलेला सुंदर बगीचा व पार्किंगची सोय असलेला बंगला बघताक्षणीच मला आवडला . बंगल्याच्या पाठीमागे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी स्वतंत्र जीना होता . आतमध्ये सर्व नीटनेटकेपणा होता . खिडक्या दरवाजानां पडदे लावलेले होते . आम्ही दोघेही चित्रकार असल्याने चित्रकाम करण्यासाठी व राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होती . झांबरेसर , झांबरेमॅडम व त्यांची मुलगी मृणाल हे तीनच माणसे खाली रहात होते . त्यांचा मोठा मुलगा प्रणव शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला होता . पहिल्या भेटीतच आमची छान ओळख झाली व लगेच प्राथमिक बोलणी करून मी एका आठवड्यात पाचगणीवरून वाईला शिफ्ट झालो . सर व मॅडम दोघेही स्वच्छताप्रेमी होते . त्यामुळे मी रोज मॉर्निंगवॉकला वाकेश्वरला जाताना पाहायचो झांबरे सर स्वतः साफसफाई करायचे , कुंड्यांना पाणी घालणे , झाडांची निगा राखणे ,खतपाणी देणे . पूर्ण आवार पाण्याने स्वच्छ धूवून काढायची त्यांनां आवड होती . आम्ही कधीतरी समोरासमोर भेटलो की अनेक विषयांवर गप्पा मारायचो . वाईत राहण्याचे फायदेतोटे तपासून पहायचो . येथील परिसराचा माणसांचा स्वभाव व आचरणांवर चर्चा करायचो . नवनव्या जागा शोधायची आता सवय लागली होती . त्याचा आढावा घेताना झांबरे सर मनापासून प्रतिक्रिया द्यायचे .       " प्रज्ञाअमृत " या बंगल्यामध्ये रहात असताना एक घडलेला प्रसंग मला आजही लक्षात आहे व आयुष्यभर पुढेही कायम लक्षात राहील . एकदा रविवारी सुट्टीचा दिवस होता . साधारण नऊ दहा वाजताची वेळ असेल . आमची घरकाम कारणारी बाई आज येणार नव्हती त्यामुळे दोघेही निवांत पेपर वाचत बसलो होतो . आणि शेवटच्या दूरच्या खोलीतील अचानक कोपऱ्यातील किचनसिंकचा का वॉशबेसीनजवळचा नळ अलगद तुटून पडला होता . पाईपलाईन उघडी झाली आणि वेगाने पाणी रूममध्ये पसरु लागले होते . आम्ही विरुद्धदिशेच्या बाजूला असल्याने काही आवाजच आला नाही . हळूहळू पडणाऱ्या पाण्याने ती रुम भरून गेली होती आणि अचानक खालून झांबरे मॅडम व सर दोघेही वरच्या मजल्यावर आले .त्यांनी घराची बेल वाजवली आणि त्यांच्या लगेच लक्षात आले की शेवटच्या खोलीतून पाणी जवळपास चारपाच इंच भरून दुसऱ्या रूममध्ये पाणी पसरू लागले होते . झांबरे सरांनी लगेच प्लंबरला फोन लावला येताना नवीन नळ घेऊन यायला सांगितले . पटकन टेरेसवर जावून मुख्य पाईपलाईन बंद केली . इतक्यात झांबरे मॅडम पटकन खाली गेल्या , येताना त्यांनी फरशी पुसण्याचा रबरमॉप व चारपाच फरशी पुसण्याचे जाड कपडे घेऊन एक बादली आणली . त्यांची मुलगी मृणाल देखील मदतीला आली . इकडे बनियन व लुंगी घालून निवांत बसलेले झांबरे सर गुडघ्यापर्यंत लूंगी गुंडाळून पटकन फरशीवरील पाणी बादलीत भरू लागले . झांबरे मॅडम यांनी लगेच साडीचा पदर खोचून मॉपने पाणी बाहेर टाकायला सुरुवात केली . मग आम्ही दोघेही त्यांच्यामध्ये सामील झालो व सर्व जणांनी रुममध्ये साचलेले पाणी काढून तासाभरात सगळा बंगला चकाचक केला . नंतर प्लंबर आला त्याने नवीन नळ बसवला .आता तुम्ही म्हणाल यात आश्चर्याची गोष्ट काय ? तर आम्ही झांबरे सरांचे भाडेकरू होतो . पाण्याचा नळ दुरुस्त करून रुम साफसफाई करण्याची जबाबदारी आमची होती . ते घरमालक होते . उच्चशिक्षित पी एच डी झालेले कॉलेजचे प्राध्यापक होते . मॅडम एम एस सी व जॉय स्कूलच्या उपप्राचार्या होत्या . एकदा घर भाड्याने दिले की त्याची देखभाल करण्याची जबाबदारी भाडेकरूचीच असते . त्यादिवशी दुपारी आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि तो प्रसंग एन्जॉय केला . कोणीही कसलीही तक्रार झाली नाही . दोन चार महिन्यातच आम्ही " प्रज्ञाअमृत " बंगला सोडला . नवीन जागा घेतली तेथे मोठे अपयश आले . नंतर मग आमचा मेणवली गावाजवळ " निसर्ग " नावाचा बंगला तयार केला . मागच्या वर्षी तेथे " निसर्ग आर्ट गॅलरी " नावाने चित्रप्रदर्शनही भरवले होते . अनेक वेगवेगळ्या जिल्हयातील , तालुक्यातील पर्यटक प्रदर्शन पाहण्यासाठी येत होती . एकदा किसनवीर कॉलेजचे प्रा. श्री रमेशचंद्र बारगजे सरांनी फोन केला की त्यांच्या कोल्हापूरच्या 1973 सालच्या एम .एस .सी बॅचचे क्लासमेटस यांचे वाई येथे गेटटुगेदर आयोजित केले आहे त्यावेळी तुमची निसर्ग आर्ट गॅलरी पाहायला सर्वजण येणार आहेत . धोमचे मंदिर पाहून सर्व गाड्या निसर्ग आर्ट गॅलरी पाहण्यासाठी गेटपर्यंत आल्या . त्यानां पार्कींगची जागा दाखवत होतो त्यावेळी एक गाडी मात्र गेटपासून दूर थोड्या अंतरावर उभी राहीलेली पाहीली . बारगजे सरानां ती गाडी बाहेर का थांबली म्हणून विचारले तर सरांनी कपाळावर हात मारून घेतला . मला म्हणाले काय बोलू आता ? ती गाडी तुझ्या सख्या चुलत व मावसभाऊ असलेल्या हनुमंत काळे यांची आहे . तो आमच्या बॅचचा सर्वात अतिशय हुशार विद्यार्थी होता . युनिव्हरसिटीत प्रथम आला होता . त्याला आम्ही सांगितले चित्रकार सुनील काळे तुझा भाऊ आहे . त्याने वाई ,पाचगणी महाबळेश्वर या परिसरातील असंख्य अप्रतिम चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत , त्याची मिसेस चित्रकार स्वाती काळे हिने असंख्य फुलांची तैलरंगात चित्रे काढलेली आहेत . उत्तम चित्रप्रदर्शन आहे . तुमची तीस वर्ष झाली भेट झालेली नाही तर तुम्ही आता जरूर भेटा व प्रदर्शनही पहा . पण तुझा भाऊ गाडीतून उतरायला तयार नाही त्याचे कुटुंबीय गाडीतच बसून आहेत .ते म्हणतात आम्ही भावकीत जात नाही कारण आमचे " स्टॅन्डर्ड " मोठे आहे . मी मोठ्या कंपनीत ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर होतो . तो साधा चित्रकार आहे त्याची माझी तुलना होऊ शकत नाही . तुम्ही सगळे प्रदर्शन पाहायला जा आम्ही बाहेर रस्त्यावर गाडीत बसून राहू . तो एक तास बाहेर थांबला पण घरात आलाच नाही . खरे तर हा हनुमंतदादा आता हेमंत नाव लावतो . कारण आईबापाने ठेवलेले हनुमंत हे नाव त्याला आवडले नाही . अतिशय गरिबीतून त्याला शिक्षण दिले होते .स्वतःच्या कर्तबगारीने तो उच्चपदावर पोहचला त्याचे उच्चशिक्षित मुलीबरोबर लग्न झाले पण लग्नानंतर व अगोदर नोकरी करत असतानाही या दादाने कधीच कोणत्याही भांवडाला जवळ केले नाही . कोणत्याही नातेवाईकांकडे ते फिरकले नाहीत . कोणाशी कसलाही संबंध ठेवला नाही ,कोणालाही मदत केली नाही . संपूर्ण कुटुंबाला दूर ठेऊन दादा मोठा स्टॅन्डर्डवाला झाला . आमचा दादा कसा दिसतो हे मला पाहण्याची उत्सुकता होती . कारण तो माझ्यापेक्षा पंधरावीस वर्षांनी मोठा होता . पण " स्टॅन्डर्ड "आडवे आले . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात . शिक्षणामुळे माणूस विचारवंत होतो त्याच्या ज्ञानाच्या कक्षा उचांवतात . त्याचे जीवन सुखकर व समृद्ध होतेच पण त्याच्यां विशाल छायेत अनेकानां संजीवनी मिळते . उच्चशिक्षित भावाने मात्र आमच्या सर्वांसाठी त्याचे दरवाजे मात्र कायमचे बंद केले होते . उच्चशिक्षणाचा मला तेथे काहीच उपयोग झालेला दिसला नाही . इथे मला पीचडी झालेले उपप्राचार्य झांबरे सर आठवतात . उपप्राचार्या झांबरे मॅडम आठवतात . स्वतःच्या भाड्याने राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाशी प्रेमाने सुखदुःखाची विचारपूस करत असत . ते दोघेही स्वतःचे " स्टॅन्डर्ड "कधी गोंजारत बसले नाहीत .  सामान्य माणसासारखे राहून दोघेही असामान्य कामे करत राहीली . जॉय स्कूल व किसनवीर विद्यालयातील विद्यार्थी घडवताना आपल्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांला घडवण्याचे . " स्टॅन्डर्ड " काम त्यांनी आयुष्यभर केले व त्याचा गर्वही कधी केला नाही . जीवन जगण्याचे खरे " स्टॅन्डर्ड " त्यांनां कळले आहे म्हणून माझ्या त्या अतिउच्चशिक्षित एम एस सी फर्स्टक्लास झालेल्या अडाणी भावापेक्षा झांबरे पती पत्नींविषयी मला आदर वाटत आहे .     महिन्यापूर्वी एकदा झांबरे मॅडमचा मला फोन आला . त्यांनी विचारपूस केली व त्या जॉय स्कूलची नोकरी सोडून पुण्यात नातवाचा सांभाळ करण्यासाठी पुण्यात रहात असल्याचे सांगितले . मुलगा सिव्हील इंजिनियर व सुनबाई पेशाने सरकारी वकील असल्याने दोघेही कामात व्यस्त झाले मग मुलाकडे लक्ष कोण देणार ? म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला . आणि ते ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . माझी आर्ट गॅलरी होती . ती सांभाळताना माझी तीन वर्षाची मुलगी सांभाळण्यासाठी मी आईवडीलानां विनंती केली तर त्यांनी नकार दिला . गावाकडे शेतीची कामे असतात त्यामुळे तुमची मुलगी तुम्हीच सांभाळा असे उत्तर आईने दिले . शेवटी आमच्या संघर्षाच्या लढाईत मुलगी देवाघरी गेली . ती वारली त्यावेळी मी माझ्या मेव्हण्याला सत्यजितला फोन केला . तो म्हणाला मी अत्यंविधीला येऊ शकणार नाही . तो देखील Phd झालेला आहे . अतिउच्चशिक्षित आहे . त्याला भाचीच्या अत्यंविधीला जाण्याची गरज वाटली नाही . बहिणीला कठीण स्थितीत आधार देण्याची आवश्यकता वाटली नाही आणि पुढे आता सत्तावीस वर्ष झाली तरी त्याला आमची कधीच आठवणही झाली नाही . काय उपयोग त्या डॉक्टरेटचा ? जिथे माणूस माणसाला ओळखत नाही .मोबाईल ,फोन , लॅपटॉप आले तंत्रज्ञान वाढले तरी मनाची आढी मात्र कायम राहीली .कधी त्याच्या कुटूंबाने संपर्कच केला नाही कारण "स्टॅन्डर्ड " आडवे आले .त्यावेळी खऱ्या अर्थाने एकटे जगायला शिकलो . अशावेळी झांबरे मॅडमचा त्याग मला प्रेरणा देणारा वाटतो . मुलांविषयची माया त्यांच्या कृतीतून दिसते .इकडे सरांनां रिटायर्ड होण्यापूर्वी खानावळीत जेवण करावे लागले . काही महिने एकटेपणा स्विकारावा लागला . पण त्यांनी कधीही त्याची तक्रार केली नाही . कॉलेजमध्ये त्यांनी अनेक कार्यक्रमात स्वतःला झोकून दिले . त्यांच्या कॉलेजच्या कारकीर्दीची मला जास्त माहिती नाही पण त्यापेक्षा माणुसकी जपणारे , कुटुंबाला जपणारे , अभिमान नसणारे , मोठेपणाचा त्याग केलेले गार्डनमध्ये स्वच्छता करणारे डॉ झांबरे सर मनाला फार भावले . त्यांच्या मुलाचे लग्न ठरले त्यावेळी प्रणवच्या लग्नाला आम्ही दोघेही गेलो होतो . लग्नकार्यालय पूर्णपणे भरून गेले होते प्रचंड गर्दी होती तरीही झांबरेसरांनी आम्हाला बरोबर पकडलेच . शाल श्रीफळ देऊन योग्य मानसन्मान केला त्यावेळी मला या झांबरे कुटूबांचेखरे " स्टॅन्डर्ड " कळाले . वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य नामवंत लहानमोठ्या माणसांनी संपूर्ण हॉल भरून गेला होता . काय असते स्टॅन्डर्ड ?? तुम्ही जगत असता त्यावेळी त्या तुमच्या जगतानाच्या काळात असंख्य माणसे भेटतात . त्यातील काही माणसे चांगली वागलेली असतात काही वाईट वागलेली असतात . पण शेवट काय असतो ? तुमच्या जगण्याला कधीतरी मर्यादा येतेच . कधीतरी शरीर थकते व तुम्हाला अंतिम श्वास घ्यावा लागतो . त्यानंतर कोणत्यातरी स्मशानघाटाजवळ तुमची राख होते ती राख पाण्यात मिसळते तुमचे अस्तित्व संपते . जग काही दिवस तुमची आठवण काढते नंतर तुमची कोणी आठवणही काढत नाही . तुमचे " स्टॅन्डर्ड " काही असो शेवटी तुमची राखच होते . हे ज्यानां समजते त्यांचे भावविश्व वेगळे असते . ते कायम हसतमुख असतात . ते त्यांच्या कृतीतून त्यांचे वेगळेपण जोपासत असतात .अनेकानां त्यांचे जगणे प्रेरणा ठरत असते .असे जीवनाचे खरे " स्टॅन्डर्ड " कळालेले झांबरे सर मला आवडतात . काही महिन्यांपूर्वी अचानक आमच्याकडे घरकाम करणाऱ्या बाई व माळीकाम करणारा त्यांचा मुलगा या दोघांनी आमचे काम सोडले. काही दिवस आम्ही वेगवेगळी माणसे शोधली पण त्यांच्या पगाराच्या अपेक्षा जास्त असल्याने जुळले नाही . मग झांबरे सर पुन्हा आठवले . Phd झालेला माणूस स्वतः झाडलोट करतो , बागेची निगा राखतो तर आपण का लाजायचे ? त्यांच्यापासून प्रेरणा घेतली . आता मी बागकामात तरबेज झालोय बागेत शेतात काम केल्यामुळे आरोग्यही चांगले राहते याचा शोध लागला . आपण कोणावर विसंबून राहायचे नाही काम करत राहायचे हेच खरे " स्टॅन्डर्ड " झांबरे सरांकडून मी शिकलो . खरी डॉक्टरेट तीच आहे . मे महिन्यात ते आता रिटायर्ड होतील . अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या सरानां व झांबरेमॅडम या दोघांनाही उर्वरीत रिटायर्ड आयुष्य सुखसमृद्धीचे आनंदाचे जावे त्यांच्या मनासारखे जगताना उत्तम आरोग्य प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना व मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !चित्रकार - सुनील काळे✍️9423966486निसर्ग आर्ट गॅलरी [वाई]