ब्लॉग संग्रहण

गुरुवार, २६ जून, २०२५

इनायत आणि कोल्हापूरच्या आठवणी

इनायत व कोल्हापूरच्या आठवणी
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      वाईजवळ तीन किमी मेणवली गावाजवळ खेडेगावात निसर्ग आर्ट गॅलरी सारखा प्रोजेक्ट सुरु करताना एक जवळचा मित्र म्हणाला अरे , या आडबाजूला पाचगणी महाबळेश्वरचा मुख्य रस्ता सोडून इकडे गॅलरीला कोण येणार एकदम फ्लॉप आयडीया आहे . मी सुद्धा त्याचा निराशावादी सुर ऐकून मनातून कचरलो , प्रदर्शनाचा थोडा वेडा व वेगळा प्रयत्न आहे पण 7 मे ते 7जून पर्यंत एक महिना प्रयत्न करूया अन्यथा गॅलरी पुढे सुरु ठेवायची का नाही ते नंतर  ठरवू असे ठरले.
पद्मश्री श्री .अच्युत पालव यांच्या शुभहस्ते उदघाटन केले .
             पहिल्या आठवड्यात अपेक्षेपेक्षा थोडी गर्दी कमी होती पण नंतर हळूहळू पावसाने मे महिन्यातच उच्छाद मांडला व आणखीनच नैराश्य वाढले . आणि अचानक सकाळी आठ वाजताच मोबाईलवर फोन आला . सुनिलभाई कैसे हो ? तुम्हारी आर्ट गॅलरी देखने के लिए मुंबईसे सोला लोगोंकी मिनी बस लेकर मुंबईसे वाईमें आया हूँ । गुगल मॅप भेजो , मै इनायत पित्तलवाला बोल रहा हूँ।
        थोड्याच वेळात एक मिनी बस आमच्या प्रवेशद्वाराजवळ दाखल झाली आणि त्या गाडीतून बोहरी जमातीच्या ड्रेसमधील काही महिला व पुरुष मंडळीची टिम गॅलरीत दाखल झाली . 
        1985 साली मी बारावी सायन्स पास झाल्यानंतर घरच्यांचा विरोध स्विकारून आयुष्यात पहिल्यांदा घराबाहेर कोल्हापूरला आलो होतो . कसलाही बाहेरच्या जगाचा अनुभव नव्हता . कोल्हापुरच्या आयटीआय कॉलेजसमोर मला कलानिकेतन महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता . त्यापूर्वी जेजे स्कूल ऑफ आर्ट व पुण्याच्या अभिनवला प्रवेशासाठी प्रयत्न केला होता . ती दोन्ही गजबजलेली आर्ट स्कूल पहिल्यानंतर दूर आडरानात एकमजली फार भव्य बांधकाम नसलेले कलानिकेतन पाहून मी थोडा निराश झालो होतो .
         प्राचार्य अरविंद मेस्त्रींनी पहिल्याच दिवशी विचारले कोल्हापुरात  कुठे राहणार ? मी म्हणालो माहीत नाही , पहिल्यांदा आलोय येथे , माझ्या ओळखीचेही कोणी नाही व नातेवाईकसुद्धा नाहीत . त्यादिवशी एसटी स्टॅन्ड वर झोपलो . सकाळी झाडूवाल्याने उठवले तेथे तोडांवर पाणी मारले व तीन चार किमी  चालत पुन्हा कॉलेजला दाखल झालो . दुसऱ्या दिवशी परत मेस्त्रीसरांनी विचारले कुठे राहीला रात्री ? मी एसटी स्टॅन्डवर राहीलो हे ऐकताच ते माझ्याकडे आश्चर्याने पाहून त्यांच्या शिपायाला म्हणाले बापू याची जरा सोय कर इतर मुलांबरोबर याला दुपारी जेवायला दे .
           संध्याकाळी बापू केळुस्कर मला बाजुच्याच कॉलेजशेजारी असलेल्या मोरे कॉलनीतील एका बंगल्याच्या तळमजल्यावर घेऊन गेला . तेथे कॉलेजमध्ये शिकणारे संजय देसाई , इनायत पित्तलवाला , गंगाधर गोंधळी व रामदास जगताप ही एलेमेंटरी कमर्शियल व एटीडीला शिकणारी मुले माझ्याच वयाची होती . त्यांनी फौंडेशनला शिकणारा असून मला लगेच त्यांच्या ताफ्यात सामावून घेतले . बापू केळुस्करने आमच्या पाचही जणांची दोन्ही वेळच्या जेवणाची सोय त्याच्या घरी केली होती . बापू जवळच एका बंगल्याच्या आवारात औट हाऊसमध्ये रहात होता .
          पहिल्या दिवशी मी त्या बंगल्यात गेलो तर चष्मा लावलेला , खाकी हाफ पँट व पांढरा शर्ट घातलेला एक म्हातारा माणूस बागेत खूर्ची टाकून पुस्तक वाचत बसलेला होता . बापूने गेटवर ओळख करून दिली व पाया पडायला सांगितले आणि विचारले ओळखलेस का हे कोण आहेत ते ? मी नाही म्हणालो .
हे आहेत भालजी पेंढारकर . चंद्रकांत मांडरे असलेला महाराजांचा चित्रपट पाहीलास का ? यांनीच बनवला तो . मी तो चित्रपट पाहिलेला होता पण भालजींना प्रथमच पहात होतो . मग त्यांनी कोल्हापूरी टोनमध्ये विचारले व्यायाम करतोस का नाय ? मी नाही म्हणालो . मग त्यांनी बापूला सांगितले रोज दहा जोरबैठका मारल्याशिवाय याला खायला देऊ नको . बापू लगेच होय म्हणाला .दिवसा कलानिकेतन व रात्री जयप्रभा स्टुडीओत रात्रीचा वॉचमन म्हणून बापू केळूस्कर काम करायचा .
         या काळात माझी या ग्रुपसोबत घट्ट मैत्री सुरु झाली . इनायत अतिशय शांत व सोज्वळ स्वभावाचा होता . मुंबईला गोरेगावला राहत होता . त्याचे वडील व काका कमर्शियल आर्टिस्ट होते त्यांचा स्टुडीओ होता . त्यावर्षी जेजे स्कूल व बान्द्रा स्कूलमध्ये ॲडमिशन न मिळाल्यामुळेच तो नाईलाजाने कोल्हापूरला आला होता . तो वेगळ्या धर्माचा असूनही कधीही त्याने कोणाशी वादविवाद केला नाही . आम्ही कोल्हापुरात सगळे नवखे व समान अडचणींना सामोरे जात होतो . एकमेकांच्या अडचणी समजून घेऊन एकमेकानां मदत करत होतो .
           सकाळ संध्याकाळी दहा जोरबैठका मारायच्या , गंगावेशीवर जाऊन म्हशीचे धारोष्ण दूध प्यायचे , केशवराव भोसले नाट्यगृहाचे नाटकांचे बोर्ड रंगवायचे , कधी जयप्रभा स्टुडीओत छोटे मोठे सेट रंगवायची कामे करायचो . कोल्हापूरकर खूपच हौशी मंडळी त्यावेळी छत्र्यांवर नावे टाकण्याची फॅशन होती. कधी गाड्यांच्या नंबर प्लेटा , साईन बोर्ड रंगवायचो . निसर्गचित्रणाचा नाद आणखी पक्का होण्याचे कारण म्हणजे स्वतः अरविंद मेस्त्री कधी कधी कॉलेजच्या आवारातच लँडस्केप करायचे . चंद्रकांत मांडरेचे संग्रहालय राजारामपूरीत त्यावर्षी तयार होत होते . पन्हाळा , रंकाळा , खाणीचा परिसर , कसबा बावडा , शालीनी पॅलेस , न्यू पॅलेस , भवानी मंडप याठिकाणी स्केचिंग व निसर्गचित्रणासाठी जायचो . त्याकाळात टाऊन हॉल म्युझियम , शिवाजी चौकातील डॉ. काटे यांच्या हॉस्पीटलमध्ये आबालाल रहिमान , अरुल राज , पॉल राज ,चंद्रकांत मांडरे , एस.एम . काझी , बाबुराव पेंटर ,रविंद्र मेस्त्री यांच्या कलाकृती पहायला मिळायच्या . एस.निंबाळकर  यांच्यामूळे अनेक चित्रकारांच्या ओळखी होत होत्या . त्या सर्वांमध्ये कायम लक्षात राहील्या त्या प्रेमा भोसले मॅडम आमच्या सर्वांच्या फौडेंशनच्या कडक शिस्तीच्या आदर्शशिक्षिका . त्यांच्यामुळे चित्रकलेचा पाया खरोखर पक्का झाला . त्या फार जिव्हाळ्याने शिकवायच्या त्यांच्या असाईनमेंट पूर्ण करणे चॅलेंज असायचे .महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिरात जाऊन दहा स्केचिंग करणे त्याकाळातील सर्वात मोठी टास्क असायची . माझा नवा रूम पार्टनर कागलचा अमृतराव पाटील व मी रोज चालत जात स्केचेस करायचो . चित्रांचा पसारा वाढल्यामुळे मी बाजूच्याच प्रकाश कोठावळे यांच्या बंगल्यात शिफ्ट झालो पण जेवणासाठी आम्ही एकत्रच बापू केळूस्कर यांच्याकडे जायचो .
        कोल्हापूरची माणसे साधी व सतत मदतीचा हात पुढे करणारी मंडळी . भरपूर भांडणार , तांबडा पांढरा हाणणार , एकमेकानां शिव्या घालणार पण माणुसकी जपणार . चाळीस वर्षांपूर्वीचे कोल्हापूरकर मित्र व मैत्रिणी आजही संपर्कात आहेत काही वर्षांपूर्वी आम्ही छान गेट टू गेदर केले होते . कोल्हापूरला वेळ व संधी मिळाली की जाण्यास मी नेहमी तयार असतो . ते दिवस सोनेरी व कायम लक्षात राहणारे होते .
         चाळीस वर्षांपासूनची ही मैत्री इनायतने व मी आजही टिकवून ठेवलेली आहे . इनायत एक वर्ष पूर्ण करून परत मुंबईला गेला व मी त्याचवर्षी पुण्याला आलो . पुढे बरीच वर्ष आमचा संपर्क नव्हता . तरुणपणातील दोघांचेही त्यावेळेचे काळेभोर केस आता पांढरेशुभ्र झाले आहेत . कोव्हीडच्या काळात त्याची मिसेस गेली . दोन्ही मुलींची लग्ने होऊन एक बँगलोर व एक मुंबईत स्थायिक आहे .इनायत आता एकटा मीरा रोड येथे राहतो .
         निसर्ग आर्ट गॅलरी पाहण्यासाठी व मला भेटण्यासाठी चाळीस वर्षांनंतर उरामध्ये साठवलेल्या अनेक आठवणी घेऊन हा मित्र सर्व नातेवाईकानां घेऊन मुंबईवरून वाईला भेटायला आला . मित्रत्व जपण्याची ओढ असली व एकमेकांविषयी आदरपूर्वक खरे प्रेम असले की माणसे प्रत्यक्ष भेटतात नाहीतर फेसबुक व्हॉटसअपच्या आभासी जगात मित्र नातेवाईक शेजारून चालले तरी ओळख दाखवत नाहीत भेटणे तर फार फार दुरची गोष्ट असते . एक मित्र प्रत्यक्ष भेटणे म्हणजे एक आठवणींचा अध्याय असतो . त्याच्यासोबत घालवल्या क्षणांची मनाच्या करण्यामध्ये उजळणी असते . तो एक ठेवा असतो अविस्मरणीय गोष्टींचा .
         आता वाटते बरे झाले गॅलरी सुरु केली नाहीतर अशा दूर माणसांच्या गर्दीत  मुंबईसारख्या शहरामध्ये हरवलेल्या  मित्राची प्रत्यक्ष भेट कशी झाली असती ? इनायतच्या भेटीमुळे कोल्हापूरातील दिवस आठवले .
त्यामुळे आता निसर्ग आर्ट गॅलरी पुढे सुरु ठेवायचा निश्चय केला आहे . 
तुम्ही देखील या , जमेल तसे वेळ काढून या . 
सर्वांना सप्रेम निमंत्रण आहेच .
सोबत कॉमेंटसमध्ये गूगल मॅपची लिंक दिलेली आहे .
फेसबुकवर इन्स्टाग्रामवर Nisarg Art Gallery या पेजला फॉलो करा. तेथे गॅलरीचे रोजचे अपडेट आहेत .
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
निसर्ग आर्ट गॅलरी
मेणवली धोम रोडवर नाना फडणीस वाड्यापासून अर्धा किमी मुख्य रस्त्यालगत .
मु.पो भोगाव , ता.वाई ,
जिल्हा . सातारा - 412803
वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत .
सर्वांना मुक्त प्रवेश [No Entry fee]
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
चित्रकार सुनील काळे✍️ 9423966486
निसर्ग आर्ट गॅलरी [वाई]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जगण्याचे " स्टॅन्डर्ड " समजलेला माणूस- प्रा . डॉ . ज्ञानदेव झांबरे सर************************        पाचगणी हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शैक्षणिक केंद्र आणि थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे . ब्रिटिश काळापासून वेगवेगळ्या लोकांनी स्वधर्मियांसाठी शाळा सुरु केल्या . त्यामुळे येथे त्रेचाळीस शाळांमध्ये अठरापगड जातींचे लोक एकत्रित रहात असल्याने येथे कॉस्मोपोलीटन संस्कृती आहे . पाचगणी शहर छोटे असल्याने बहुभाषिक वेगवेगळ्या प्रांतातील मंडळी छानपैकी एकत्रितपणे राहतात . अशा या गावात माझे बालपण गेले . दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि चांगले मार्क मिळाले म्हणून अकरावीसाठी कॉलेजचा शोध सुरु झाला . त्याचवर्षी वाईला किसनवीर महाविद्यालयात नव्याने सायन्स कॉलेज सुरु झाल्याचे कळाले . BSc डिग्री मिळण्याची चांगली सोय झाली होती . त्यामुळे घरच्यांनी मला अकरावी सायन्सला प्रवेश घेण्यासाठी फोर्स केला . मी मात्र नाराज झालो होतो कारण माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले होते व सायन्सचे विषय इंग्रजी माध्यमात शिकवले जाणार होते . इंग्रजीची माझी खूप आबाळ झाली होती कारण सातवीपर्यंत आम्हाला इंग्रजीचे शिक्षकच नव्हते . इंग्रजी , गणित , सायन्स या विषयाची तर माझी कुडंली कधी जमलीच नव्हती पण त्याकाळी उलट उत्तर देण्याची प्रथा नव्हती त्यामुळे मी मुकाटपणे वाईला सायन्स कॉलेजला रोज एस.टी बसचा पास काढून येऊ लागलो .       सायन्सच्या या वर्गात शिक्षक मला काय शिकवत होते याचे मला भान नव्हते कारण मला इंग्रजी भाषाच समजत नव्हती . चाळीस पन्नास विद्यार्थी असल्याने मागच्या बेंचवर बसायला लागलो आणि मला एक नविन छंद लागला . मी चित्रे काढायला लागलो . माझ्या मित्रांची , शिक्षकांची , प्राण्यांची , वनस्पतींच्या जर्नलमध्ये आकृत्या काढणे मला आवडू लागले . कधी कधी मी वाईच्या बसमधून पसरणीघाटात उतरायचो . या घाटातील वळणदार रस्ते , दुतर्फा असलेली वडाची झाडे , पांडवगडाच्या पायथ्याच्या सभोवतालची छोटी छोटी चमकणारी भातशेती , ऊन पावसाचा खेळ , संध्याकाळची सुर्यास्ताची रंगउधळण , वाईच्या गणपती मंदिराची , वेगवेगळ्या घाटाची चित्रे मी जलरंगात उतरवू लागलो . थोडक्यात मला चित्रकलेची फारच आवड निर्माण झाली होती . चित्रकार होण्यासाठी लागणारी इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा मी बारावी सायन्सला असताना दिली व त्यामध्ये मला 'अ 'श्रेणी प्राप्त झाली होती .       चित्रकलेचे वेड इतके वाढले की मी सकाळी सहा वाजताच थंड हवेत चित्र काढायला जायला लागलो . टेबललॅन्डच्या पठारावर तर कधी सिडनेपाँईटच्या उंच चौथऱ्यावर बसून मी धोमधरणाचे पाणी ,कृष्णा व्हॅलीतील डोंगररांगा , कधी पांगारी तायघाट जवळच्या पारसी पॉईंटची चित्रे रेखाटू लागलो . आणि अचानक माझ्या लक्षात आले मला अतिथंड हवेत सकाळी फिरल्याने सर्दीचा त्रास सुरु झाला आहे . ऑक्सिजिन घेण्यासाठी दोन्ही नाकपुड्या बंद झाल्याने श्वास घेणे मुश्कील झाले आहे . डॉक्टरांनी माझे ऑपरेशन करून नाकातील वाढलेले पॉलीप्स काढावे लागतील यासाठी तातडीने ॲडमिट केले . नाकाला मोठे बँडेज बांधूनच मी 12वी सायन्सची प्रॅक्टीकल परिक्षा दिली होती . त्यानंतर  पुण्याला चित्रकलेच्या अभिनव कॉलेजला मी गेलो . चित्रकार झालो व परत पाचगणी महाबळेश्वरचा निसर्ग रंगवू लागलो होतो . थंड हवेत वेळीअवेळी सतत डोंगररांगावर भटकंती केल्याने माझा नाकाने श्वास घेण्याचा त्रास आणखीनच वेगाने वाढू लागला . डॉ. प्रशांत पोळ यांनी वेगवेगळ्या वर्षी चारपाच वेळा माझे ऑपरेशन केले आहे . एकंदरीत मला थंड हवेची ॲलर्जी झाल्याचे सिद्ध झाले व डॉक्टरांनी 2014 साली मी पाचगणी सोडावी लागेल असे निक्षून सांगितले . मला माझे पाचगणीचे बस्तान सोडून  कायमचे  वाईला यावे असे त्यांनी सांगितले व नाईलाजाने मी काही दिवस वाईला राहण्याचे ठरवले .          वाई कॉलेजचे प्राध्यापक असलेले माझे मित्र श्री .पटकुरे सर यांनी मला सह्याद्रीनगर या परिसरात बोलावले . थोडी चर्चा केली तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की त्यांच्या सोसायटीत " प्रज्ञाअमृत " नावाचा एक बंगला आहे . त्याचे मालक श्री .व सौ झांबरे दोघेही शिक्षक आहेत . त्यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर पाच खोल्यांचे घर भाड्याने मिळते . तेथे काही दिवस राहून वाईच्या परिसरातील चित्रे काढावीत . हवा बदलाने तब्बेतीवर काय परिणाम होईल हेही कळेल व एखादी जागा आवडली तर घर बांधण्यासाठी वाईत एन ए प्लॉट घ्यावा या उद्देशाने मी त्यांच्या घरी आलो .         सहयाद्रीनगरात असलेला " प्रज्ञाअमृत " अतिशय मेंटेन केलेला ,फुलझाडे असलेला सुंदर बगीचा व पार्किंगची सोय असलेला बंगला बघताक्षणीच मला आवडला . बंगल्याच्या पाठीमागे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी स्वतंत्र जीना होता . आतमध्ये सर्व नीटनेटकेपणा होता . खिडक्या दरवाजानां पडदे लावलेले होते . आम्ही दोघेही चित्रकार असल्याने चित्रकाम करण्यासाठी व राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होती . झांबरेसर , झांबरेमॅडम व त्यांची मुलगी मृणाल हे तीनच माणसे खाली रहात होते . त्यांचा मोठा मुलगा प्रणव शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला होता . पहिल्या भेटीतच आमची छान ओळख झाली व लगेच प्राथमिक बोलणी करून मी एका आठवड्यात पाचगणीवरून वाईला शिफ्ट झालो . सर व मॅडम दोघेही स्वच्छताप्रेमी होते . त्यामुळे मी रोज मॉर्निंगवॉकला वाकेश्वरला जाताना पाहायचो झांबरे सर स्वतः साफसफाई करायचे , कुंड्यांना पाणी घालणे , झाडांची निगा राखणे ,खतपाणी देणे . पूर्ण आवार पाण्याने स्वच्छ धूवून काढायची त्यांनां आवड होती . आम्ही कधीतरी समोरासमोर भेटलो की अनेक विषयांवर गप्पा मारायचो . वाईत राहण्याचे फायदेतोटे तपासून पहायचो . येथील परिसराचा माणसांचा स्वभाव व आचरणांवर चर्चा करायचो . नवनव्या जागा शोधायची आता सवय लागली होती . त्याचा आढावा घेताना झांबरे सर मनापासून प्रतिक्रिया द्यायचे .       " प्रज्ञाअमृत " या बंगल्यामध्ये रहात असताना एक घडलेला प्रसंग मला आजही लक्षात आहे व आयुष्यभर पुढेही कायम लक्षात राहील . एकदा रविवारी सुट्टीचा दिवस होता . साधारण नऊ दहा वाजताची वेळ असेल . आमची घरकाम कारणारी बाई आज येणार नव्हती त्यामुळे दोघेही निवांत पेपर वाचत बसलो होतो . आणि शेवटच्या दूरच्या खोलीतील अचानक कोपऱ्यातील किचनसिंकचा का वॉशबेसीनजवळचा नळ अलगद तुटून पडला होता . पाईपलाईन उघडी झाली आणि वेगाने पाणी रूममध्ये पसरु लागले होते . आम्ही विरुद्धदिशेच्या बाजूला असल्याने काही आवाजच आला नाही . हळूहळू पडणाऱ्या पाण्याने ती रुम भरून गेली होती आणि अचानक खालून झांबरे मॅडम व सर दोघेही वरच्या मजल्यावर आले .त्यांनी घराची बेल वाजवली आणि त्यांच्या लगेच लक्षात आले की शेवटच्या खोलीतून पाणी जवळपास चारपाच इंच भरून दुसऱ्या रूममध्ये पाणी पसरू लागले होते . झांबरे सरांनी लगेच प्लंबरला फोन लावला येताना नवीन नळ घेऊन यायला सांगितले . पटकन टेरेसवर जावून मुख्य पाईपलाईन बंद केली . इतक्यात झांबरे मॅडम पटकन खाली गेल्या , येताना त्यांनी फरशी पुसण्याचा रबरमॉप व चारपाच फरशी पुसण्याचे जाड कपडे घेऊन एक बादली आणली . त्यांची मुलगी मृणाल देखील मदतीला आली . इकडे बनियन व लुंगी घालून निवांत बसलेले झांबरे सर गुडघ्यापर्यंत लूंगी गुंडाळून पटकन फरशीवरील पाणी बादलीत भरू लागले . झांबरे मॅडम यांनी लगेच साडीचा पदर खोचून मॉपने पाणी बाहेर टाकायला सुरुवात केली . मग आम्ही दोघेही त्यांच्यामध्ये सामील झालो व सर्व जणांनी रुममध्ये साचलेले पाणी काढून तासाभरात सगळा बंगला चकाचक केला . नंतर प्लंबर आला त्याने नवीन नळ बसवला .आता तुम्ही म्हणाल यात आश्चर्याची गोष्ट काय ? तर आम्ही झांबरे सरांचे भाडेकरू होतो . पाण्याचा नळ दुरुस्त करून रुम साफसफाई करण्याची जबाबदारी आमची होती . ते घरमालक होते . उच्चशिक्षित पी एच डी झालेले कॉलेजचे प्राध्यापक होते . मॅडम एम एस सी व जॉय स्कूलच्या उपप्राचार्या होत्या . एकदा घर भाड्याने दिले की त्याची देखभाल करण्याची जबाबदारी भाडेकरूचीच असते . त्यादिवशी दुपारी आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि तो प्रसंग एन्जॉय केला . कोणीही कसलीही तक्रार झाली नाही . दोन चार महिन्यातच आम्ही " प्रज्ञाअमृत " बंगला सोडला . नवीन जागा घेतली तेथे मोठे अपयश आले . नंतर मग आमचा मेणवली गावाजवळ " निसर्ग " नावाचा बंगला तयार केला . मागच्या वर्षी तेथे " निसर्ग आर्ट गॅलरी " नावाने चित्रप्रदर्शनही भरवले होते . अनेक वेगवेगळ्या जिल्हयातील , तालुक्यातील पर्यटक प्रदर्शन पाहण्यासाठी येत होती . एकदा किसनवीर कॉलेजचे प्रा. श्री रमेशचंद्र बारगजे सरांनी फोन केला की त्यांच्या कोल्हापूरच्या 1973 सालच्या एम .एस .सी बॅचचे क्लासमेटस यांचे वाई येथे गेटटुगेदर आयोजित केले आहे त्यावेळी तुमची निसर्ग आर्ट गॅलरी पाहायला सर्वजण येणार आहेत . धोमचे मंदिर पाहून सर्व गाड्या निसर्ग आर्ट गॅलरी पाहण्यासाठी गेटपर्यंत आल्या . त्यानां पार्कींगची जागा दाखवत होतो त्यावेळी एक गाडी मात्र गेटपासून दूर थोड्या अंतरावर उभी राहीलेली पाहीली . बारगजे सरानां ती गाडी बाहेर का थांबली म्हणून विचारले तर सरांनी कपाळावर हात मारून घेतला . मला म्हणाले काय बोलू आता ? ती गाडी तुझ्या सख्या चुलत व मावसभाऊ असलेल्या हनुमंत काळे यांची आहे . तो आमच्या बॅचचा सर्वात अतिशय हुशार विद्यार्थी होता . युनिव्हरसिटीत प्रथम आला होता . त्याला आम्ही सांगितले चित्रकार सुनील काळे तुझा भाऊ आहे . त्याने वाई ,पाचगणी महाबळेश्वर या परिसरातील असंख्य अप्रतिम चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत , त्याची मिसेस चित्रकार स्वाती काळे हिने असंख्य फुलांची तैलरंगात चित्रे काढलेली आहेत . उत्तम चित्रप्रदर्शन आहे . तुमची तीस वर्ष झाली भेट झालेली नाही तर तुम्ही आता जरूर भेटा व प्रदर्शनही पहा . पण तुझा भाऊ गाडीतून उतरायला तयार नाही त्याचे कुटुंबीय गाडीतच बसून आहेत .ते म्हणतात आम्ही भावकीत जात नाही कारण आमचे " स्टॅन्डर्ड " मोठे आहे . मी मोठ्या कंपनीत ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर होतो . तो साधा चित्रकार आहे त्याची माझी तुलना होऊ शकत नाही . तुम्ही सगळे प्रदर्शन पाहायला जा आम्ही बाहेर रस्त्यावर गाडीत बसून राहू . तो एक तास बाहेर थांबला पण घरात आलाच नाही . खरे तर हा हनुमंतदादा आता हेमंत नाव लावतो . कारण आईबापाने ठेवलेले हनुमंत हे नाव त्याला आवडले नाही . अतिशय गरिबीतून त्याला शिक्षण दिले होते .स्वतःच्या कर्तबगारीने तो उच्चपदावर पोहचला त्याचे उच्चशिक्षित मुलीबरोबर लग्न झाले पण लग्नानंतर व अगोदर नोकरी करत असतानाही या दादाने कधीच कोणत्याही भांवडाला जवळ केले नाही . कोणत्याही नातेवाईकांकडे ते फिरकले नाहीत . कोणाशी कसलाही संबंध ठेवला नाही ,कोणालाही मदत केली नाही . संपूर्ण कुटुंबाला दूर ठेऊन दादा मोठा स्टॅन्डर्डवाला झाला . आमचा दादा कसा दिसतो हे मला पाहण्याची उत्सुकता होती . कारण तो माझ्यापेक्षा पंधरावीस वर्षांनी मोठा होता . पण " स्टॅन्डर्ड "आडवे आले . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात . शिक्षणामुळे माणूस विचारवंत होतो त्याच्या ज्ञानाच्या कक्षा उचांवतात . त्याचे जीवन सुखकर व समृद्ध होतेच पण त्याच्यां विशाल छायेत अनेकानां संजीवनी मिळते . उच्चशिक्षित भावाने मात्र आमच्या सर्वांसाठी त्याचे दरवाजे मात्र कायमचे बंद केले होते . उच्चशिक्षणाचा मला तेथे काहीच उपयोग झालेला दिसला नाही . इथे मला पीचडी झालेले उपप्राचार्य झांबरे सर आठवतात . उपप्राचार्या झांबरे मॅडम आठवतात . स्वतःच्या भाड्याने राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाशी प्रेमाने सुखदुःखाची विचारपूस करत असत . ते दोघेही स्वतःचे " स्टॅन्डर्ड "कधी गोंजारत बसले नाहीत .  सामान्य माणसासारखे राहून दोघेही असामान्य कामे करत राहीली . जॉय स्कूल व किसनवीर विद्यालयातील विद्यार्थी घडवताना आपल्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांला घडवण्याचे . " स्टॅन्डर्ड " काम त्यांनी आयुष्यभर केले व त्याचा गर्वही कधी केला नाही . जीवन जगण्याचे खरे " स्टॅन्डर्ड " त्यांनां कळले आहे म्हणून माझ्या त्या अतिउच्चशिक्षित एम एस सी फर्स्टक्लास झालेल्या अडाणी भावापेक्षा झांबरे पती पत्नींविषयी मला आदर वाटत आहे .     महिन्यापूर्वी एकदा झांबरे मॅडमचा मला फोन आला . त्यांनी विचारपूस केली व त्या जॉय स्कूलची नोकरी सोडून पुण्यात नातवाचा सांभाळ करण्यासाठी पुण्यात रहात असल्याचे सांगितले . मुलगा सिव्हील इंजिनियर व सुनबाई पेशाने सरकारी वकील असल्याने दोघेही कामात व्यस्त झाले मग मुलाकडे लक्ष कोण देणार ? म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला . आणि ते ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . माझी आर्ट गॅलरी होती . ती सांभाळताना माझी तीन वर्षाची मुलगी सांभाळण्यासाठी मी आईवडीलानां विनंती केली तर त्यांनी नकार दिला . गावाकडे शेतीची कामे असतात त्यामुळे तुमची मुलगी तुम्हीच सांभाळा असे उत्तर आईने दिले . शेवटी आमच्या संघर्षाच्या लढाईत मुलगी देवाघरी गेली . ती वारली त्यावेळी मी माझ्या मेव्हण्याला सत्यजितला फोन केला . तो म्हणाला मी अत्यंविधीला येऊ शकणार नाही . तो देखील Phd झालेला आहे . अतिउच्चशिक्षित आहे . त्याला भाचीच्या अत्यंविधीला जाण्याची गरज वाटली नाही . बहिणीला कठीण स्थितीत आधार देण्याची आवश्यकता वाटली नाही आणि पुढे आता सत्तावीस वर्ष झाली तरी त्याला आमची कधीच आठवणही झाली नाही . काय उपयोग त्या डॉक्टरेटचा ? जिथे माणूस माणसाला ओळखत नाही .मोबाईल ,फोन , लॅपटॉप आले तंत्रज्ञान वाढले तरी मनाची आढी मात्र कायम राहीली .कधी त्याच्या कुटूंबाने संपर्कच केला नाही कारण "स्टॅन्डर्ड " आडवे आले .त्यावेळी खऱ्या अर्थाने एकटे जगायला शिकलो . अशावेळी झांबरे मॅडमचा त्याग मला प्रेरणा देणारा वाटतो . मुलांविषयची माया त्यांच्या कृतीतून दिसते .इकडे सरांनां रिटायर्ड होण्यापूर्वी खानावळीत जेवण करावे लागले . काही महिने एकटेपणा स्विकारावा लागला . पण त्यांनी कधीही त्याची तक्रार केली नाही . कॉलेजमध्ये त्यांनी अनेक कार्यक्रमात स्वतःला झोकून दिले . त्यांच्या कॉलेजच्या कारकीर्दीची मला जास्त माहिती नाही पण त्यापेक्षा माणुसकी जपणारे , कुटुंबाला जपणारे , अभिमान नसणारे , मोठेपणाचा त्याग केलेले गार्डनमध्ये स्वच्छता करणारे डॉ झांबरे सर मनाला फार भावले . त्यांच्या मुलाचे लग्न ठरले त्यावेळी प्रणवच्या लग्नाला आम्ही दोघेही गेलो होतो . लग्नकार्यालय पूर्णपणे भरून गेले होते प्रचंड गर्दी होती तरीही झांबरेसरांनी आम्हाला बरोबर पकडलेच . शाल श्रीफळ देऊन योग्य मानसन्मान केला त्यावेळी मला या झांबरे कुटूबांचेखरे " स्टॅन्डर्ड " कळाले . वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य नामवंत लहानमोठ्या माणसांनी संपूर्ण हॉल भरून गेला होता . काय असते स्टॅन्डर्ड ?? तुम्ही जगत असता त्यावेळी त्या तुमच्या जगतानाच्या काळात असंख्य माणसे भेटतात . त्यातील काही माणसे चांगली वागलेली असतात काही वाईट वागलेली असतात . पण शेवट काय असतो ? तुमच्या जगण्याला कधीतरी मर्यादा येतेच . कधीतरी शरीर थकते व तुम्हाला अंतिम श्वास घ्यावा लागतो . त्यानंतर कोणत्यातरी स्मशानघाटाजवळ तुमची राख होते ती राख पाण्यात मिसळते तुमचे अस्तित्व संपते . जग काही दिवस तुमची आठवण काढते नंतर तुमची कोणी आठवणही काढत नाही . तुमचे " स्टॅन्डर्ड " काही असो शेवटी तुमची राखच होते . हे ज्यानां समजते त्यांचे भावविश्व वेगळे असते . ते कायम हसतमुख असतात . ते त्यांच्या कृतीतून त्यांचे वेगळेपण जोपासत असतात .अनेकानां त्यांचे जगणे प्रेरणा ठरत असते .असे जीवनाचे खरे " स्टॅन्डर्ड " कळालेले झांबरे सर मला आवडतात . काही महिन्यांपूर्वी अचानक आमच्याकडे घरकाम करणाऱ्या बाई व माळीकाम करणारा त्यांचा मुलगा या दोघांनी आमचे काम सोडले. काही दिवस आम्ही वेगवेगळी माणसे शोधली पण त्यांच्या पगाराच्या अपेक्षा जास्त असल्याने जुळले नाही . मग झांबरे सर पुन्हा आठवले . Phd झालेला माणूस स्वतः झाडलोट करतो , बागेची निगा राखतो तर आपण का लाजायचे ? त्यांच्यापासून प्रेरणा घेतली . आता मी बागकामात तरबेज झालोय बागेत शेतात काम केल्यामुळे आरोग्यही चांगले राहते याचा शोध लागला . आपण कोणावर विसंबून राहायचे नाही काम करत राहायचे हेच खरे " स्टॅन्डर्ड " झांबरे सरांकडून मी शिकलो . खरी डॉक्टरेट तीच आहे . मे महिन्यात ते आता रिटायर्ड होतील . अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या सरानां व झांबरेमॅडम या दोघांनाही उर्वरीत रिटायर्ड आयुष्य सुखसमृद्धीचे आनंदाचे जावे त्यांच्या मनासारखे जगताना उत्तम आरोग्य प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना व मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !चित्रकार - सुनील काळे✍️9423966486निसर्ग आर्ट गॅलरी [वाई]