ब्लॉग संग्रहण

शनिवार, २९ जून, २०२४

नदिष्ट

" नदिष्ट " 
लेखक : मनोज बोरगावकर , नांदेड .

काही दिवसांपूर्वी मी हे पुस्तक वाचले .
मनोज बोरगावकर या लेखकाची भेट  वसंत व्याख्यानमालेत वाईला झाली . 
आमचे चित्रप्रदर्शन त्यांनी पाहिले व ते त्यांना खूप आवडले . 
आमची ओळख झाल्यानंतर लेखकाने आठवणीने घरी गेल्यानंतर  हे पुस्तक पाठवले . त्यांची "नदिष्ट" कांदबरी या "नादिष्ट" चित्रकाराला मिळाली व नंतर मी सावकाश आस्वाद घेत घेत वाचली . 
       वाचताना इतका आत खेचत गेलो की गोदावरी , कृष्णा किंवा कोणत्याही नदीचा जसा तळ व अंत मनापासून शोधणे अवघड आहे तसाच मानवी मनाचा थांगपता लागणे अवघड आहे . वाचता वाचता पूर्णपणे स्वतःलाच खोल खोल शोधायला लागलो . काही गोष्टी जाणीवपूर्वक विसरायला शिकू लागलो .  प्रत्यक्ष लेखकाला अभिप्राय लिहिताना तर "निशब्दच" झालो .
          तृतीय पंथीयाचे भोग भोगणारी सगुना , लहानपणापासूनचे मार्गदर्शक दादाराव , सर्पमित्र प्रसाद , आयुष्यभर नदीशेजारीच गुरे चारणारा कालुभैय्या , मालाडी , बामनवाड , भिकाजी ही कांदबरीतील सगळी पात्रे जिवंत होऊन समोरच अवतिभवति दिसायला लागायला लागली . फेर धरून डोळ्यासमोर नाचायला लागली . त्यांचे जगण्याचे तत्वज्ञान सोप्या शब्दांमध्ये व्यक्त करू लागली .चित्रकार असल्याने दृश्यपटलावर दृश्यानुभव लगेच दिसायला लागतो . ती गोदावरी नदी , तिथला पुजारी  , तिथला घाट , तिथली भाषा , जगण्याची शैली सगळे कसे डोळ्यापुढे स्पष्ट दिसू लागले . लेखकाने प्रसंग सांगताना जणू एखादा सिनेमा पाहतोय अशी सहजपणे वेगवेगळ्या प्रसंगाची सहज रचना केली आहे .
           चित्रकाराची चित्र काढण्याची एक विशिष्ट शैली असते . ती एका चित्रानंतर दुसरे चित्र पाहताना लगेच जाणवते  तशी या लेखकाची शब्दशैली वेगळीच व एकंदर हिंदी भाषेचा अनोखा वापर ही वेगळा लहेजा आहे . 
          गावाकडेच्याच या अद्भूत हिंदीतून व्यक्त होणारी  निखळता , सहज मनाला भिडणारी  आनंद देणारी व भाषेचा गोडवा जपणारी आहे . अतिशय सहज सोपी आहे . माणसांना जवळीक करणारी आहे .कोणताही शाब्दीक जंजाळाचा गुंतागुंत न करता भाषेचे जडत्व दूर ठेऊन जीवनात मिळालेल्या या नदीच्या मैत्रीतून लेखकाने जीवनविषयक तत्वज्ञान अतिशय सहजपणे सांगितले आहे .
        मी स्वतः लेखक नाही किंवा फार गाजलेली मोठी मोठी पुस्तकेही वाचलेली नाहीत त्यामुळे मी इतर कोणाच्या ग्रंथाची या ग्रंथाशी तुलना करणार नाही . फक्त लेखकाच्याच भाषेत म्हणेन "आपण मोजायच्या तत्वज्ञानात रमलो की जगणेही आपली मापं काढायला लागते ".
        नदीचा तळ लागतो पण तिची खोली सापडणे दुरापास्त असते . तसेच मनोज बोरगावकर सारखे मित्र लगेच मित्र झाले असे वाटते पण त्यांची विचारांची , लेखनाची , समृद्ध अनुभवांची , शब्दांच्या सच्चेपणातील , गोष्ट सांगण्याच्या ओढीची खोली सापडणे दुरापास्त असते . त्यांचे हे पुस्तक वाचणे म्हणजे माणूस वाचण्याचा , माणूस समजून घेण्याचा , जीवन समृद्ध करणारा निरागस जीवनानुभव आहे .

आपण पुस्तकप्रेमी असाल किंवा नसाल तरीही सर्वाना ही कांदबरी नक्की आवडेल . खूप सुंदर विषय आहे .
       वाईत चित्रप्रदर्शनातून आर्थिक लाभ झाला नाही आणि त्याचे दुःख मनाला थोडेशे होत होते . नदिष्ट वाचताना ते दुःख संपूर्ण धूवून निघाले . मनोज बोरगावकर , संदीप खरे , वैभव मांगले , विश्वास पाटील , नृत्यनिपूण सुचेता भिडे चाफेकर व  दिग्गज अशा  एकवीस मंडळीची प्रत्यक्ष भेट झाली , त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती झाली हे काय कमी आहे का ? त्या सर्वांच्याविषयी नंतर सविस्तर लिहीन .
      नदीसारखे वाहत राहा .वाहता वाहता एक दिवस वाचता वाचता हळूहळू
 "नदिष्ट"  होत जा  हा संदेश देत मन पुन्हा सरळ प्रवाहात वाहून प्रसन्न होत गेले .
त्याचवेळी कृष्णातिरावरची मंदिरे , नदीची काढलेली चित्रे , ती चित्रे काढताना भेटलेली माणसे , तेथील अनुभवही पुन्हा पुन्हा आठवत राहीले .
नदिष्ट: मनोज बोरगावकरांचे हे लक्षणीय पुस्तक एकदातरी नक्की वाचावे असेच आहे .

 सुनील काळे✍️
9423966486

गुरुवार, ६ जून, २०२४

माझी कोकणनिसर्गयात्रा


 माझी कोकण निसर्गयात्रा

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

          मी कोल्हापूरला फौडेंशन शिकायला गेलो त्यावेळी अनेक जुन्या चित्रकारांची कामे तेथे पाहता आली.टाऊन हॉलच्या म्युझियममध्ये वडणगेकरांची ,एस .एम काझी, बाबुराव पेंटर, रविन्द्र मेस्त्री, यांची चित्रे पाहायला मिळायची, शिवाजी पुतळ्याजवळ डॉ. काटे यांच्या दवाखान्यात आबालाल रहिमान, आणि जी.डी.पॉलराज यांचे दुपारच्या उन्हांचा इफेक्ट दर्शवणारी एक अप्रतिम कलाकृती होती. पुढे अभिनेता व निसर्गचित्रकार चंद्रकांत मांडरे यांची चित्रे पाहून आपणही निसर्गचित्रकार व्हायचे असे मनातून शिक्कामोर्तब झाले व नंतरच्या उच्च शिक्षणासाठी मी पुण्यात आलो........
               पुण्यात इलेमेंटरी या वर्गात प्रवेश घेताना कोणीतरी सांगितले जगण्यासाठी कमर्शियल आर्टमध्ये खूप पैसे मिळतात, फाईन आर्टवाल्यांची हालत खूप खराब असते व मी घरातून पळून जाऊन शिक्षण घेत असल्याने मला पैसे आवश्यक होते म्हणून मी कमर्शियल आर्टला जाण्याचा निर्णय घेतला.
            आणि इथेच मोठी चूक झाली. कमर्शियल आर्टमध्ये लोगो ,सिम्बॉल, जाहिरात, इलेस्ट्रेशन , प्रॉडक्ट फोटोग्राफी, कॅलिग्राफी, लेटरींग, इ. विषय कार्पोरेट जगताशी निगडीत असल्याने माझा निर्णय चुकला आहे हे मला लवकरच कळून चुकले. पण आता निर्णय बदलणे शक्य नव्हते. त्यावेळी मी विद्यार्थी साहाय्यक समितीत राहत होतो. माझ्याकडे सायकल नव्हती. समितीतील सकाळची योगासने, अल्पशी न्याहरी झाली की मी चालत निघायचो....1986 च्या काळात पुणे बऱ्यापैकी शांत होते. मी चालत फर्ग्यूसनच्या रस्त्यावरुन लकडी पुलावर यायचो सकाळच्या प्रहरात सात वाजता पुलावरून बालगंधर्वचा पूल, डेक्कनचा परिसर, मुळामुठा नदीचे पात्र दाट धुक्याच्या धुसर वातावरणात प्रसिद्ध चित्रकार मोने व टर्नरच्या चित्रांची आठवण करून द्यायचे व मग भारावलेल्या अवस्थेतच मी टिळक रोडच्या अभिनव कला महाविद्यालयात कमर्शियल आर्ट शिकायचो.......... शिकायचो म्हणजे टाईमपास करायचो मनात, डोक्यात मात्र निसर्गचित्रांचाच ध्यास असायचा. सकाळचे वातावरण, पिंगा घालायचे. सुट्टीत पाचगणीला गेल्यावर परिसरात भटकत दिवसभर जलरंगातील निसर्गचित्रे रेखाटत बसायचो...... दोन वर्षात अशी बरीच निसर्गचित्रे मी काढली होती.......
              इंटरमिजिएटच्या दुसऱ्या वर्गात असताना अनेक मित्रांनी मला बालगंधर्वला प्रदर्शन भरवण्यासाठी प्रोत्साहन दिले........ त्यातल्या संजय कांबळे, सुरेश वरगंटीवार, महेन्द्र ( हनुमंत ) तोडकर, या मित्रांची खूप मदत झाली. त्यावेळी बालगंधर्व मध्ये प्रदर्शन करत असताना भिंती अतिशय खराब होत्या त्यासाठी सकाळ पेपर्समधून पांढरा न्यूज प्रिंट पेपरचा रोल आणावा लागायचा. मग खळ तयार करून तो पेपर प्रथम चिकटवयाचा . मग पांढरी पार्श्वभूमी तयार व्हायची. मग त्यावर चित्र प्रदर्शन करायचे .... 
गॅलरीचे भाडे, फ्रेमिंग, प्रदर्शनाची निमंत्रण पत्रिका, पत्रिका पोस्टाने पाठवावी लागायची त्याचा खर्च वेगळा, उदघाटनाचा कार्यक्रम, बॅनर्स ... प्रसिध्दी माध्यमे इ.इ प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष खर्च म्हणजे एका नव्या लग्नाचाच सोहळा पूर्ण केल्यासारखा खर्चिक प्रकार असतो...........अशातच माझा मित्र, संजय कांबळे माझ्या खूप मागे लागला की तू प्रदर्शन करच मी सर्व गोष्टी करीन, तू फक्त चित्र काढून तयार ठेव.

          आपल्या कामामुळे कधी कधी आपल्या खऱ्या मित्रानां आपल्याविषयी खूप आत्मीयता, प्रेम असेल तर अशक्य त्या गोष्टी शक्य होतात. स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टी पूर्ण होतात. असे खूप स्नेही, जिव्हाळ्याचे मित्र, शिक्षक, व हितचिंतक मला वेळोवेळी मिळाले त्यांचा मी नेहमीच आभारी आहे त्यांच्या मदतीमुळेच मी थोडेफार यश मिळवू शकलो.

          शिकत असतानाच इंटरमिजिएटच्या 
सन १९८८ साली माझे पाचगणी परिसरातील निसर्गचित्रांचे  The Echoes of Sahydri या नावाचे प्रदर्शन पार पडले. प्रा.मिलिंद फडके यांनी त्या प्रदर्शनाचे नाव ,आमंत्रण पत्रिकेचा व पेपरचा मसुदा खूप प्रेमाने तयार करून दिला.
मी फक्त पाचगणी, महाबळेश्वर व वाई परिसरातीलच चित्रे रेखाटली होती. प्रत्येक चित्राखाली थोडीफार प्रत्येक स्पॉटची माहीती ही लिहली होती. खूप जणांनां ते प्रदर्शन आवडले होते. 
         प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी एक कोकणातील वयोवृध्द गृहस्थ आले. त्यानां खूप आवडले होते प्रदर्शन पण ते खूप नाराज ही झाले होते. मी कारण विचारल्यावर म्हणाले तुम्ही कोकणातील एकही चित्र काढले नाही, कोकणात समुद्र, नारळाची झाडे, होडया, बोटी, जलदुर्ग,यांचे चित्रण का केले नाही ?
तुम्ही पुढचे प्रदर्शन फक्त कोकणातील चित्रांचेच झाले पाहीजे, तुम्हाला शपथ आहे, तुम्हाला शपथ आहे, असे वारंवार म्हणू लागले. मी देखील त्यानां पोकळ आश्वासन दिले .व नंतर विसरूनही गेलो. पण कधीतरी कोकणात जाऊन समुद्राची चित्रे काढण्याचे मनाने नक्की केले होते.
           अॅडव्हान्सच्या चौथ्या वर्षाच्या दिवाळीच्या सुट्टीत मी कोकणात जायचे नक्की केले. पण अचानकपणे ठरवल्यामूळे जाण्यासाठी पैसे नव्हते. मग एके दिवशी अभिनव कला महाविद्यालयाच्या स्टाफरूममध्ये मधल्या सुट्टीत गेलो. सर्व प्राध्यापक चहा पीत होते, मी सर्वानां नमस्कार केला आणि अवसान आणून मी कोकणात पायी चालत निसर्गचित्रे काढण्यासाठी जाणार आहे , मी मोठ्ठा चित्रकार झाल्यावर तुमचे पैसे परत करीन आता तुम्ही कृपया मदत करा अशी हात जोडून विनंती केली...... क्षणभर थोडे वातावरण गंभीर झाले, पण माझ्या प्रामाणिक आव्हानांमूळे प्राध्यापकांनी त्यांच्या पाकीटाला हात घातला. व सगळ्यांनीच कमी जास्त रुपये माझ्या झोळीत टाकले. एका मिनिटात दोन हजार रुपये टेबलावर तयार झाले. आणि सर्वांनी शुभेच्छा दिल्या..........
         मी खूप मोठ्ठा चित्रकार म्हणून प्रसिद्ध झालो नाही पण त्या सर्व प्राध्यापकांचे खूप मोठे आशिर्वाद, प्रेम व विश्वास मला आयुष्यात काहीतरी सतत चांगले काम करत राहीले पाहीजे याची सतत प्रेरणा देत राहीले.
पुढे आणखी काही चित्रकार मित्र, व इतर जणांनी आणखी दोन हजार रुपये मिळवून दिले व तीस दिवसांच्या कोकण निसर्गयात्रेची मी तयारी करू लागलो. 
         काही वर्गातल्या मित्रानां विचारले पण दिवाळीचा फराळ खायचा सोडून ही नस्ती बिनकामाची भटंकती कोण करणार म्हणून कोणीही यायला तयार झाले नाही शेवटी मी एकटयानेच जायचे नक्की केले.........

             कोकणात जायचे कसे ? राहायचे कसे ? कोणत्या गावांना भेट दयायची याचा मार्गदर्शन नकाशा, प्रा. प्र .के घाणेकर यांनी करुन दिला. सातारचा हॉस्टेलमध्ये राहणारा इंजिनियरींगच्या कॉलेजचा मित्र दिनेश पवार याने एक छोटा कॅमेरा मिळवून दिला, कोणी ट्रेकिंगची बॅग दिली, कोणी पाण्याचा थर्मास दिला, एका मित्राने स्वतःचा चांगला बुट दिला...... अशी जय्यत तयारी करून मी निघण्यासाठी सज्ज झालो.............

          मित्रांनो ,आपण ज्यावेळी कोणताही प्रामाणिक, चांगला, व आंतरमनाच्या आतून खऱ्या हेतूने एखादा संकल्प करतो त्यावेळी आकाशातील बाप कृतार्थपणे अडचणींचे काटे आपोआप दूर करतो. याचा मला त्यावेळी अनुभव आला. 

सत्य संकल्पाचा दाता नारायण !
पूर्ण करील सर्व मनोरथ !

              भटकंती करणारे लेखक ,प्रा. प्र.के. घाणेकर यांनी मला मार्गक्रम आखून दिला होता. माझी व त्यांची काहीच ओळख नव्हती पण माझ्यापेक्षा त्यानांच माझा उपक्रम खूप आवडला होता. एक चित्रकार विद्यार्थी पायी तीस दिवस जावून कोकणातील चित्रे काढणार याचे त्यानां खूप कौतुक वाटत होते. मला सगळ्या सविस्तर सुचना ते अगदी प्रेमाने ,काळजीने व उत्साहाने करत होते. हाताने नकाशे काढून देत होते. एकत्तीस वर्ष झाली तरी प्र .के घाणेकर सरानां मी विसरलो नाही. अशी उर्जावान माणसे प्रवासात सतत दिपस्तभांसारखी सर्वांनाच प्रेरणादायी ठरतात...........

         मी महाराष्ट्राचा नकाशा आणला व त्याप्रमाणे प्रथम दिवस अलिबागचा ठरला होता. एसटीने अलिबागला जायचे आणि कुलाबा किल्ला पाहायचा आणि चित्र काढायचे असे ठरले होते. सकाळची सहाची एसटी पकडून मी अलीबागला पोहचलो. एसटी स्टॅन्डवरच थोडा नाश्ता पाणी करून मी अलिबागच्या किनाऱ्यावर आलो. आणि थक्क झालो........ बापरे.....एवढा मोठ्ठा समुद्र, आणि सगळीकडे पाणीच ........पाणी...... नजर पोहचत होती तेथपर्यंत प्रचंड पाणी. मी खूपच भारावलो होतो. हे दृश्य मला नवे होते . त्यावेळी भरती ओहोटीच्या वेळा नक्की विचारून मी कुलाबा किल्ल्यात प्रवेश केला.
माझ्यासाठी हा खूप भारी वेगळा अनुभव होता. मी उत्साहीत झालो होतो.समुद्राच्या लाटांचा आवाज, नारळाची उंचच झाडे, आणि नजर पोहचेल तेथे पर्यंत पाणी. भारावलेल्या अवस्थेतच मी माझे लँडस्केप पॅड काढले, स्केच केले व जलरंगात या तरल अनुभवाला मी साकारण्यात मी मग्न झालो. मी दुपारचे जेवण करण्याचेही विसरलो व सलग एकानंतर एक अशी चार चित्रे मी वेगवेगळ्या अँगल्सनी पूर्ण केली होती...... हळूहळू अंधार पडू लागला आणि आता भरतीची वेळ होईल असे कोणीतरी सांगितले ...........मी चित्रकाम थांबवले, आणि मागे पाहताच त्या व्यक्तिने स्वतःहून माझे टाळया वाजवून अभिनंदन केले. खूप छान चित्र झाले आहे म्हणून कौतूकही केले. मी कोण ? कोठून आलो ? कोठे जाणार याची चौकशी केली. मी अभिनव कॉलेजचा विद्यार्थी असून दिवाळीत घरी न जाता तीस पस्तीस दिवस पायी कोकणातील चित्रे काढणार आणि मी एसटी स्टॅन्डवर झोपणार, माझी जेवणाची राहण्याची सोय नसताना माझी जिद्द पाहून त्याने मला कडकडून मिठी मारली आणि सोबत येण्याची विनंती केली..........
त्या व्यक्तीचे नाव जयंत धुळप.........
जयंत हा त्यावेळी लोकसत्ताचा पत्रकार होता, व अलिबागचा रहिवासी होता. आता सध्या तो पुढारी पेपरचा रायगड आवृत्ती प्रमुख आहे.
जयंतने मला प्रेमाने त्याच्या धुळप वाडयातील घरी नेले. आई,वडीलांची ओळख करून दिली, माझी चित्रे दाखवली व मी तीस दिवस पायी फिरणार म्हणून खूप कौतुकही केले. त्या सर्वांनीच आज आमच्याकडेच मुक्काम कर असा आग्रहच केला. मग त्यांचा आग्रह पाहून मी ही तयार झालो. त्या रात्री जयंतच्या घरी अलिबागचे माशांचे कालवण, सोलकढी, मच्छी फ्राय खाल्लेली अविस्मरणीय चव आजही लक्षात आहे. जेवणानंतर जयंत व मी खूप उशीरापर्यंत गप्पा मारत होतो. जयंत एक हरहुन्नरी, आणि उत्साही व्यक्तिमत्व आहे , सामाजिक कार्याची त्याला आवड आहे .त्याने दुसऱ्या दिवशी त्याचे मित्र राजू सिनकर व शेखर दोंदे यांची ओळख करून दिली, राजू फोटोग्राफी खूप छान करायचा त्यामूळे त्याला खूप चांगले स्पॉटस माहीत होते . खूप पेन्सील स्केचेस केली, त्यादिवशी एकत्रच चहा, नाश्ता, जेवण व खूप कलेविषयी गप्पा मारता मारता आम्ही अनोळखी असताना पक्के मित्र कधी झालो हेच कळले नाही व कोकणी माणसात एक प्रेमळ भाव ,आपुलकी कशी जोपासलेली आहे त्याचाही अनुभव मला आला.
तुम्ही मनाने सच्चे, दिलदार व स्वच्छ असाल, तुमच्या कृती व्यावसायिक लागेबांधे जोपसणाऱ्या नसतील तर ह्या मैत्रीला कधीही बाधा निर्माण होत नाहीत ती चिरंतन टिकते आजही जयंतची मैत्री अशीच टिकून आहे.

          दुसऱ्या दिवशी मी जंजिरा किल्ल्यावर जाणार होतो .जयंतने प्रेमाने निरोप दिला व एसटी स्टॅन्डवर झोपायचे नाही, दोन वेळचे जेवण वेळेवर घ्यायचे, संपर्कात राहायचे इ . इ
अनेक सुचना केल्या. जनू माझी व त्याची वर्षानुवर्षांची ओळख होती. त्याचा निरोप घेताना त्याने सांगितले जंजिऱ्याच्या चित्रकामानंतर त्याचा मित्र विनोद नरवणकरकडे राहण्याची जेवण्याची सोय केली आहे तेथे जाण्याचा नकाशा देखील त्याने काढून दिला.........

              जंजिऱ्याच्या किल्ल्यात जाण्यासाठी मी एक बोट पकडली, त्या बोटवाल्याला मी चित्र काढण्यासाठी आलो आहे व मला नंतर संध्याकाळी न्यायला ये असे सांगितले. जंजिरा किल्ल्यात प्रवेश करताच मी विस्मित झालो, अभेद्य खडकावर व चारी बाजूला पाणी , दगडांमध्ये बांधलेला तो किल्ला, आतील तोफा, त्या किल्ल्याच्या आतील इमारताचे जीर्ण, पडलेले अवशेष ,अफाट समुद्र पाहून काय रंगवू ? काय चित्रित करू ? असे होऊन गेले . फार कमी माणसे असल्यामूळे मी निवांतपणे पाच सहा डिटेल,पेन्सील व पेनमध्ये स्केचेस केली. दोन तीन जलरंगातील चित्रे काढली संपूर्ण किल्ला फिरलो आणि एका अविस्मरणीय दिवसाची सांगता झाली. संध्याकाळी बोटीचा माणूस आला, त्याने किनाऱ्यावर पोहचल्यानंतर माझी चित्रे, स्केचेस पाहीली व प्रेमाने मिठी मारली, खूप विनंत्या करूनही त्याने बोटीचे पैसे घेतलेच नाही, उलट मला विनोद नरवणकरच्या घरी पोहचते केले.
विनोद साईन बोर्ड रंगविण्याचे काम करायचा माझी चित्रे पाहून त्याने जेवणाची व राहण्याची उत्तम सोय केली. परत रात्री मासे, चपाती, भाताचे जेवण. रात्री भरपूर गप्पा व उत्तम पाहुणचार केला. 

               त्या तीस दिवसात मी इतके मासे खाल्ले असावेत की शरीरात आजही मला कॅल्शियमची कमतरता जाणवत नाही.

             ही असते कलेची ताकद, कला माणसाला जिवंत ठेवते, कला कलाकाराला जिवंत ठेवते आणि कलाकाराची कला समाजाला एकत्र जोडून ठेवते, कला कलाकाराचे अनुभवविश्व समृद्ध करुन टाकते आणि जगणे सुखकर करत जाते, याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेत होतो...... 
कोण ? कुठला ? मी पण या परक्या लोकांबरोबर भरभरून प्रेमळ जीवाभावाची नाती निर्माण होत होती , हातातील कलेशिवाय हे कसे शक्य झाले असते. ? कला माणसाला माणसाशी माणुसकीने जोडते प्रेम वाढवते.
पुढचं गाव होतं दाभोळ............ आणि निघतानाच विनोदचा पाहूणचार घेऊन निरोप घेतानाच त्याने दाभोळच्या अण्णा शिरगांवकरांचे कार्ड हातात ठेवले आणि तेथे आवर्जुन जाण्याची अट घातली. दाभोळला जाताना प्रचंड मोठया बोटीतून सगळी माणसे, मोटारसायकली, मोटारगाडया एवढया मोठया बोटीत टाकल्यानंतर ही बोट बुडेल की काय अशी शंका माझ्या मनात आली आणि मी आचंबित झाल्याचे आठवत आहे . 
              दाभोळच्या मशिदी, समुद्राची चित्रे काढून संध्याकाळी मी अण्णा शिरगांवकरांच्या सागरपुत्र या वसतिगृहात गेलो. त्यांचे साहाय्यक व स्वत: अण्णानीच स्वागत केले. चहापाणी देऊन जेवणाची व राहण्याची सोय केली. अण्णा शिरगावकरानां अॅटींक वस्तूसंग्रह करण्याची आवड होती. दाभोळचे ते आदरणीय , प्रसिध्द व्यक्तिमत्व होते. समाजातील सर्व स्तरामधील मुलानां शिक्षण घेताना राहण्याची सोय अल्पदरात व्हावी म्हणून ते ' सागरपुत्र ' नावाचे वसतिगृह चालवत होते. त्यांना माझे खुपच कौतुक वाटले, त्यांनी त्यांचा सर्व संग्रह दाखवला. आणि त्यांनी त्या रात्री मी दाभोळ वरुन निघाल्या नंतर कोठे कोठे जायचे प्रवासात कोणाकडे जायचे राहायचे याची मोठी लिस्ट दिली. पायी गेलो तर खूप प्रदेश पाहता येणार नाहीत याची जाणीव करून दिली आणि रिक्षा, बैलगाडी, छोटया जीप गाडया यातूनही यापुढे थोडा थोडा प्रवास करावा म्हणजे थकवा येणार नाही, आरोग्य बिघडणार नाही, काळजी घेण्याची तंबीच दिली. खूप प्रेमाने निरोप दिला ( कालांतराने पुढे मी ज्या वसतिगृहात राहत होतो तेथेही ते भेटावयास आले )
मी प्रत्येक दिवसाची हकिकत व कोठे राहीलो , कोणाकडे राहीलो त्या माणसांविषयी आता सांगत बसणार नाही कारण तो मोठा रामायण, महाभारतासारखा मोठा ग्रंथच तयार होईल. पण एका गावात पोहचलो की पुढचा माझा मुक्काम कोठे करायचा याची आपोआप तजवीज व्हायची व मी निवांतपणे इच्छित स्थळी सुखरूप पोहचत असे. मोठा अजब प्रकार वाटत होता सगळा.

            परंपरागत मार्गावरून चालण्यातच मानन्यात अनेकांना समाधान वाटते. थोडी वाट वाकडी करून दुसरीकडे पाहाण्याची तयारी नसते. मी मात्र नेहमीच अशी वाकड्या वाटेवरुन प्रवास करण्याचे धाडस केले. कधी पडलो, कधी सावरलो.

              कोकणात मी एकही दिवस,फलाटावर , रस्त्यावर, वाईट अवस्थेत झोपलो नाही, उपाशी राहीलो नाही, उलट मासे खाऊन चार पाच किलो वजन वाढून सुदृढ झालो. अशा अनोळख्या गावात जाऊन प्रवास करताना फार मोठे वाईट अनुभव आले नाहीत.

          अलिबाग , जंजिरा, दाभोळ, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, सुवर्णदुर्ग, गुहागर, रत्नागिरी, मंडणगड, राणेवाडी, कोळथरे, देवगड, कुणकेश्वर, मालवण, सिंधुदूर्ग, विजयदूर्ग,सांवतवाडी, पणजी, गोवा, जुने गोवा, गोव्याची मंदीरे या ठिकाणांना भेट देऊन माझे डोळे तृप्त झाले व मनाला समाधानही मिळाले. नवीन चित्रे ,स्केचेस काढली, नव्या लोकांशी ओळखी झाल्या. दिवाळीत एका घरी तर मला अगदी पहाटे उठवून चांगली सुंगधी उटण्याने अंघोळ घातली गेली व प्रेमाने सोबत मोठा फराळाचा डबा दिला तो दहा बारा दिवस पुरला.

अशा प्रकारे कोकणातील सफर मी धम्माल जगलो.

                 सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे चार हजार रुपये होते तसेच राहीले. त्या चार हजार रुपयांच्या जीवावर आमचे स्नेही, वामनराव ननावरे यांच्या बरोबर बडोद्याला गेलो. लक्ष्मी पॅलेस, फत्तेसिंग म्युझियम, राजा रविवर्माची गॅलरी, त्यांचा स्टुडिओ, पावागड, चित्र संग्रहालये, आर्ट कॉलेज, व इतर चित्र संग्रहालयांचा अभ्यास केला.

पाचगणी ,महाबळेश्वरचा परिसर सुंदर आहेच पण कोकणाचे सौंदर्य खूप निराळेच आहे.
 
              एकदा प्रवासात सुवर्णदुर्ग किल्ल्यात जाताना लहान होडीला लाटेमुळे मोठा धक्का बसला व कॅमेराच समुद्रात पडला ,नावडयाने उडी मारून तो शोधून काढला. पण कॅमेरा खारे पाणी गेल्याने नादुरुस्त झाला. मग डोळे व मनाचाच कॅमेरा केला. प्रत्येक दृश्य खूप खोलवर साचवायची सवय झाली.

                   खडकांवर वेगाने आपटणाऱ्या लाटा, बाजूला नारळ व माडांची उंचच उंच झाडे, खडकांचा नितळ कातळपणा, समुद्राचे भन्नाट वारे व नादभरा लाटांचा आवाज, कोळयांच्या होडया, कौलारू, लाल मातीची घरे, छोट्या छोट्या वाडया, आंब्याची झाडे, समुद्रा किनाऱ्यालगत चालताना होणारा मऊ भुसभुसीत स्पर्श,वाळूच्या पाऊलखुणा, खेकडे, कासवांच्या पावलांचे ठसे.तेथील प्रेमळ कोकणी माणसे आणि त्यांचा भरभरून केलेला पाहूणचार. उत्तम माशांचे जेवण व दिलदार स्वभाव मला कोकणात जायला नेहमी प्रेरीत करतो.
                या सर्व अनुभवांचे, चित्रांचे 
" The feelings of Nature " माझी कोकण निसर्गयात्रा "या नावाने १९८९ साली मोठे प्रदर्शन भरवले. या प्रदर्शनाच्या आमत्रणं पत्रिकेचा मसुदा प्रा. मिलींद फडकेसरांनीच करून दिला. त्यांनी प्रत्येक वेळेला सकारात्मक प्रतिसाद दिला व वेळोवेळी मला सहकार्य केले . या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाचा माझ्यावर नेहमीच प्रभाव राहीला.

                या प्रदर्शनालाही खूप चांगला उत्तम प्रतिसाद मिळाला. ज्या वयोवृद्ध ग्रहस्थाने मला कोकणातील चित्रे काढण्यासाठी प्रेरीत केले होते त्यांनी प्रदर्शन पाहील्यावर घट्ट मिठी मारली व खूप खूप शुभ आशिर्वाद दिले. आणि माझी शपथ सुटली.

               नंतर पुढे २०१० साली परिस्थिती चांगली झाल्यावर मी परत एकदा स्वतःच्या गाडीने स्वातीसह कोकणात प्रवास केला खूप चित्रे काढली. आता माझ्याकडे खूप सुविधा होत्या, जयंत धुळपला अलिबागला आठवणीने भेटलो. आणि आमची मैत्री जागृत ठेवली
            परत घरी आल्यावर ही आणखी भरपूर चित्रे काढली व त्याचे २०११ ला जहाँगीर आर्ट गॅलरीत ऑडीटोरीयम हॉलमध्ये प्रदर्शन केले... या प्रदर्शनालाही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आणि मी अनुभवाने आणि पैशानेही समृध्द झालो.

             माझ्या हृदयात कोकणासाठी एक वेगळा कोपरा आजही मी जपून ठेवला आहे .

केल्याने देशाटन, पंडीत मैत्री, सभेत संचार, मनुजा चातुर्य येत असे फार . असे एक वाक्य आहे व ते माझ्या या कोकणनिसर्ग यात्रेबाबतीत अतिशय चपखल बसले आहे......

                मला आमच्या एका विजय मांडके नावाच्या अत्यंत जवळच्या स्नेहीमित्राने एक महत्वाचा प्रश्न विचारला. की सुनील काळे , प्रवासात तुम्हालाच अशी आयझॅक, सन्यांशी, अशी माणसे भेटतात इतरानां का भेटत नाहीत. 
माझ्या जवळ या प्रश्नाचे उत्तर नाही मग त्यांनीच एक छोटे विश्लेषण करुन पाठवले. 

        होय वेगवेगळ्या रूपात आयुष्यात संधी , हाक प्रत्येकाला मिळत असते. पण ती संधी स्विकारण्याची, हाक ऐकण्याची फार कमी जणांची तयारी असते. तीनशे साठ अंशामध्ये फिरण्याची, फार कमी जणांची मानसिकता असते. आयुष्य हे सरळमार्गाने, सुरळीत ,सपाट मार्गानेच जावे अशी सगळ्यांचीच इच्छा असते, वेडावाकडा ,चढउताराचा प्रवास कोणाला आवडत नाही. फार कमी लोक ही रिस्क घेतात. हा रिस्क फॅक्टर आयुष्याला मोठी कलाटणी देऊ शकतो. रिस्क घेण्याची तुमची तयारी पाहीजे.

 आपण प्रवास करताना वाईटच होईल अशा निगेटिव्ह विचारांनेच माणसे धास्तावतात व अर्धी लढाई मनानेच माघार घेतात.परंपरागत मार्गावरून चालण्यातच , रुढी परंपरा मानन्यात अनेकांना समाधान वाटते. थोडी वाट वाकडी करून दुसरीकडे पाहाण्याची तयारी नसते. मी मात्र नेहमीच अशी वाकड्या वाटेवरुन प्रवास करण्याचे धाडस केले. कधी पडलो, कधी सावरलो. पुन्हा उभा राहीलो.

              आपण सतत नवा ध्यास, नवी स्वप्ने, नवा मार्ग, नवा प्रयोग, नवे विचार, नवा प्रदेश पाहायला गेले पाहीजे, नव्या माणसांना समजून घेतले पाहीजे. हे सर्व करण्यासाठी रिस्क, चॅलेंज, व आव्हान मात्र स्विकारले पाहीजे.

          अशा रिस्क घेणाऱ्या सर्व मित्र मैत्रिणींना, सर्व क्षेत्रातील कलाकारानां त्यांच्या आवडीच्या वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग सुयश मिळविण्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शुभास्ते पंथान: संतू: ..... 
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
सुनील काळे
Mob .No 9423966486
Sunilkaleartist@gmail.com

जगण्याचे " स्टॅन्डर्ड " समजलेला माणूस- प्रा . डॉ . ज्ञानदेव झांबरे सर************************        पाचगणी हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शैक्षणिक केंद्र आणि थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे . ब्रिटिश काळापासून वेगवेगळ्या लोकांनी स्वधर्मियांसाठी शाळा सुरु केल्या . त्यामुळे येथे त्रेचाळीस शाळांमध्ये अठरापगड जातींचे लोक एकत्रित रहात असल्याने येथे कॉस्मोपोलीटन संस्कृती आहे . पाचगणी शहर छोटे असल्याने बहुभाषिक वेगवेगळ्या प्रांतातील मंडळी छानपैकी एकत्रितपणे राहतात . अशा या गावात माझे बालपण गेले . दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि चांगले मार्क मिळाले म्हणून अकरावीसाठी कॉलेजचा शोध सुरु झाला . त्याचवर्षी वाईला किसनवीर महाविद्यालयात नव्याने सायन्स कॉलेज सुरु झाल्याचे कळाले . BSc डिग्री मिळण्याची चांगली सोय झाली होती . त्यामुळे घरच्यांनी मला अकरावी सायन्सला प्रवेश घेण्यासाठी फोर्स केला . मी मात्र नाराज झालो होतो कारण माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले होते व सायन्सचे विषय इंग्रजी माध्यमात शिकवले जाणार होते . इंग्रजीची माझी खूप आबाळ झाली होती कारण सातवीपर्यंत आम्हाला इंग्रजीचे शिक्षकच नव्हते . इंग्रजी , गणित , सायन्स या विषयाची तर माझी कुडंली कधी जमलीच नव्हती पण त्याकाळी उलट उत्तर देण्याची प्रथा नव्हती त्यामुळे मी मुकाटपणे वाईला सायन्स कॉलेजला रोज एस.टी बसचा पास काढून येऊ लागलो .       सायन्सच्या या वर्गात शिक्षक मला काय शिकवत होते याचे मला भान नव्हते कारण मला इंग्रजी भाषाच समजत नव्हती . चाळीस पन्नास विद्यार्थी असल्याने मागच्या बेंचवर बसायला लागलो आणि मला एक नविन छंद लागला . मी चित्रे काढायला लागलो . माझ्या मित्रांची , शिक्षकांची , प्राण्यांची , वनस्पतींच्या जर्नलमध्ये आकृत्या काढणे मला आवडू लागले . कधी कधी मी वाईच्या बसमधून पसरणीघाटात उतरायचो . या घाटातील वळणदार रस्ते , दुतर्फा असलेली वडाची झाडे , पांडवगडाच्या पायथ्याच्या सभोवतालची छोटी छोटी चमकणारी भातशेती , ऊन पावसाचा खेळ , संध्याकाळची सुर्यास्ताची रंगउधळण , वाईच्या गणपती मंदिराची , वेगवेगळ्या घाटाची चित्रे मी जलरंगात उतरवू लागलो . थोडक्यात मला चित्रकलेची फारच आवड निर्माण झाली होती . चित्रकार होण्यासाठी लागणारी इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा मी बारावी सायन्सला असताना दिली व त्यामध्ये मला 'अ 'श्रेणी प्राप्त झाली होती .       चित्रकलेचे वेड इतके वाढले की मी सकाळी सहा वाजताच थंड हवेत चित्र काढायला जायला लागलो . टेबललॅन्डच्या पठारावर तर कधी सिडनेपाँईटच्या उंच चौथऱ्यावर बसून मी धोमधरणाचे पाणी ,कृष्णा व्हॅलीतील डोंगररांगा , कधी पांगारी तायघाट जवळच्या पारसी पॉईंटची चित्रे रेखाटू लागलो . आणि अचानक माझ्या लक्षात आले मला अतिथंड हवेत सकाळी फिरल्याने सर्दीचा त्रास सुरु झाला आहे . ऑक्सिजिन घेण्यासाठी दोन्ही नाकपुड्या बंद झाल्याने श्वास घेणे मुश्कील झाले आहे . डॉक्टरांनी माझे ऑपरेशन करून नाकातील वाढलेले पॉलीप्स काढावे लागतील यासाठी तातडीने ॲडमिट केले . नाकाला मोठे बँडेज बांधूनच मी 12वी सायन्सची प्रॅक्टीकल परिक्षा दिली होती . त्यानंतर  पुण्याला चित्रकलेच्या अभिनव कॉलेजला मी गेलो . चित्रकार झालो व परत पाचगणी महाबळेश्वरचा निसर्ग रंगवू लागलो होतो . थंड हवेत वेळीअवेळी सतत डोंगररांगावर भटकंती केल्याने माझा नाकाने श्वास घेण्याचा त्रास आणखीनच वेगाने वाढू लागला . डॉ. प्रशांत पोळ यांनी वेगवेगळ्या वर्षी चारपाच वेळा माझे ऑपरेशन केले आहे . एकंदरीत मला थंड हवेची ॲलर्जी झाल्याचे सिद्ध झाले व डॉक्टरांनी 2014 साली मी पाचगणी सोडावी लागेल असे निक्षून सांगितले . मला माझे पाचगणीचे बस्तान सोडून  कायमचे  वाईला यावे असे त्यांनी सांगितले व नाईलाजाने मी काही दिवस वाईला राहण्याचे ठरवले .          वाई कॉलेजचे प्राध्यापक असलेले माझे मित्र श्री .पटकुरे सर यांनी मला सह्याद्रीनगर या परिसरात बोलावले . थोडी चर्चा केली तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की त्यांच्या सोसायटीत " प्रज्ञाअमृत " नावाचा एक बंगला आहे . त्याचे मालक श्री .व सौ झांबरे दोघेही शिक्षक आहेत . त्यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर पाच खोल्यांचे घर भाड्याने मिळते . तेथे काही दिवस राहून वाईच्या परिसरातील चित्रे काढावीत . हवा बदलाने तब्बेतीवर काय परिणाम होईल हेही कळेल व एखादी जागा आवडली तर घर बांधण्यासाठी वाईत एन ए प्लॉट घ्यावा या उद्देशाने मी त्यांच्या घरी आलो .         सहयाद्रीनगरात असलेला " प्रज्ञाअमृत " अतिशय मेंटेन केलेला ,फुलझाडे असलेला सुंदर बगीचा व पार्किंगची सोय असलेला बंगला बघताक्षणीच मला आवडला . बंगल्याच्या पाठीमागे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी स्वतंत्र जीना होता . आतमध्ये सर्व नीटनेटकेपणा होता . खिडक्या दरवाजानां पडदे लावलेले होते . आम्ही दोघेही चित्रकार असल्याने चित्रकाम करण्यासाठी व राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होती . झांबरेसर , झांबरेमॅडम व त्यांची मुलगी मृणाल हे तीनच माणसे खाली रहात होते . त्यांचा मोठा मुलगा प्रणव शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला होता . पहिल्या भेटीतच आमची छान ओळख झाली व लगेच प्राथमिक बोलणी करून मी एका आठवड्यात पाचगणीवरून वाईला शिफ्ट झालो . सर व मॅडम दोघेही स्वच्छताप्रेमी होते . त्यामुळे मी रोज मॉर्निंगवॉकला वाकेश्वरला जाताना पाहायचो झांबरे सर स्वतः साफसफाई करायचे , कुंड्यांना पाणी घालणे , झाडांची निगा राखणे ,खतपाणी देणे . पूर्ण आवार पाण्याने स्वच्छ धूवून काढायची त्यांनां आवड होती . आम्ही कधीतरी समोरासमोर भेटलो की अनेक विषयांवर गप्पा मारायचो . वाईत राहण्याचे फायदेतोटे तपासून पहायचो . येथील परिसराचा माणसांचा स्वभाव व आचरणांवर चर्चा करायचो . नवनव्या जागा शोधायची आता सवय लागली होती . त्याचा आढावा घेताना झांबरे सर मनापासून प्रतिक्रिया द्यायचे .       " प्रज्ञाअमृत " या बंगल्यामध्ये रहात असताना एक घडलेला प्रसंग मला आजही लक्षात आहे व आयुष्यभर पुढेही कायम लक्षात राहील . एकदा रविवारी सुट्टीचा दिवस होता . साधारण नऊ दहा वाजताची वेळ असेल . आमची घरकाम कारणारी बाई आज येणार नव्हती त्यामुळे दोघेही निवांत पेपर वाचत बसलो होतो . आणि शेवटच्या दूरच्या खोलीतील अचानक कोपऱ्यातील किचनसिंकचा का वॉशबेसीनजवळचा नळ अलगद तुटून पडला होता . पाईपलाईन उघडी झाली आणि वेगाने पाणी रूममध्ये पसरु लागले होते . आम्ही विरुद्धदिशेच्या बाजूला असल्याने काही आवाजच आला नाही . हळूहळू पडणाऱ्या पाण्याने ती रुम भरून गेली होती आणि अचानक खालून झांबरे मॅडम व सर दोघेही वरच्या मजल्यावर आले .त्यांनी घराची बेल वाजवली आणि त्यांच्या लगेच लक्षात आले की शेवटच्या खोलीतून पाणी जवळपास चारपाच इंच भरून दुसऱ्या रूममध्ये पाणी पसरू लागले होते . झांबरे सरांनी लगेच प्लंबरला फोन लावला येताना नवीन नळ घेऊन यायला सांगितले . पटकन टेरेसवर जावून मुख्य पाईपलाईन बंद केली . इतक्यात झांबरे मॅडम पटकन खाली गेल्या , येताना त्यांनी फरशी पुसण्याचा रबरमॉप व चारपाच फरशी पुसण्याचे जाड कपडे घेऊन एक बादली आणली . त्यांची मुलगी मृणाल देखील मदतीला आली . इकडे बनियन व लुंगी घालून निवांत बसलेले झांबरे सर गुडघ्यापर्यंत लूंगी गुंडाळून पटकन फरशीवरील पाणी बादलीत भरू लागले . झांबरे मॅडम यांनी लगेच साडीचा पदर खोचून मॉपने पाणी बाहेर टाकायला सुरुवात केली . मग आम्ही दोघेही त्यांच्यामध्ये सामील झालो व सर्व जणांनी रुममध्ये साचलेले पाणी काढून तासाभरात सगळा बंगला चकाचक केला . नंतर प्लंबर आला त्याने नवीन नळ बसवला .आता तुम्ही म्हणाल यात आश्चर्याची गोष्ट काय ? तर आम्ही झांबरे सरांचे भाडेकरू होतो . पाण्याचा नळ दुरुस्त करून रुम साफसफाई करण्याची जबाबदारी आमची होती . ते घरमालक होते . उच्चशिक्षित पी एच डी झालेले कॉलेजचे प्राध्यापक होते . मॅडम एम एस सी व जॉय स्कूलच्या उपप्राचार्या होत्या . एकदा घर भाड्याने दिले की त्याची देखभाल करण्याची जबाबदारी भाडेकरूचीच असते . त्यादिवशी दुपारी आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि तो प्रसंग एन्जॉय केला . कोणीही कसलीही तक्रार झाली नाही . दोन चार महिन्यातच आम्ही " प्रज्ञाअमृत " बंगला सोडला . नवीन जागा घेतली तेथे मोठे अपयश आले . नंतर मग आमचा मेणवली गावाजवळ " निसर्ग " नावाचा बंगला तयार केला . मागच्या वर्षी तेथे " निसर्ग आर्ट गॅलरी " नावाने चित्रप्रदर्शनही भरवले होते . अनेक वेगवेगळ्या जिल्हयातील , तालुक्यातील पर्यटक प्रदर्शन पाहण्यासाठी येत होती . एकदा किसनवीर कॉलेजचे प्रा. श्री रमेशचंद्र बारगजे सरांनी फोन केला की त्यांच्या कोल्हापूरच्या 1973 सालच्या एम .एस .सी बॅचचे क्लासमेटस यांचे वाई येथे गेटटुगेदर आयोजित केले आहे त्यावेळी तुमची निसर्ग आर्ट गॅलरी पाहायला सर्वजण येणार आहेत . धोमचे मंदिर पाहून सर्व गाड्या निसर्ग आर्ट गॅलरी पाहण्यासाठी गेटपर्यंत आल्या . त्यानां पार्कींगची जागा दाखवत होतो त्यावेळी एक गाडी मात्र गेटपासून दूर थोड्या अंतरावर उभी राहीलेली पाहीली . बारगजे सरानां ती गाडी बाहेर का थांबली म्हणून विचारले तर सरांनी कपाळावर हात मारून घेतला . मला म्हणाले काय बोलू आता ? ती गाडी तुझ्या सख्या चुलत व मावसभाऊ असलेल्या हनुमंत काळे यांची आहे . तो आमच्या बॅचचा सर्वात अतिशय हुशार विद्यार्थी होता . युनिव्हरसिटीत प्रथम आला होता . त्याला आम्ही सांगितले चित्रकार सुनील काळे तुझा भाऊ आहे . त्याने वाई ,पाचगणी महाबळेश्वर या परिसरातील असंख्य अप्रतिम चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत , त्याची मिसेस चित्रकार स्वाती काळे हिने असंख्य फुलांची तैलरंगात चित्रे काढलेली आहेत . उत्तम चित्रप्रदर्शन आहे . तुमची तीस वर्ष झाली भेट झालेली नाही तर तुम्ही आता जरूर भेटा व प्रदर्शनही पहा . पण तुझा भाऊ गाडीतून उतरायला तयार नाही त्याचे कुटुंबीय गाडीतच बसून आहेत .ते म्हणतात आम्ही भावकीत जात नाही कारण आमचे " स्टॅन्डर्ड " मोठे आहे . मी मोठ्या कंपनीत ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर होतो . तो साधा चित्रकार आहे त्याची माझी तुलना होऊ शकत नाही . तुम्ही सगळे प्रदर्शन पाहायला जा आम्ही बाहेर रस्त्यावर गाडीत बसून राहू . तो एक तास बाहेर थांबला पण घरात आलाच नाही . खरे तर हा हनुमंतदादा आता हेमंत नाव लावतो . कारण आईबापाने ठेवलेले हनुमंत हे नाव त्याला आवडले नाही . अतिशय गरिबीतून त्याला शिक्षण दिले होते .स्वतःच्या कर्तबगारीने तो उच्चपदावर पोहचला त्याचे उच्चशिक्षित मुलीबरोबर लग्न झाले पण लग्नानंतर व अगोदर नोकरी करत असतानाही या दादाने कधीच कोणत्याही भांवडाला जवळ केले नाही . कोणत्याही नातेवाईकांकडे ते फिरकले नाहीत . कोणाशी कसलाही संबंध ठेवला नाही ,कोणालाही मदत केली नाही . संपूर्ण कुटुंबाला दूर ठेऊन दादा मोठा स्टॅन्डर्डवाला झाला . आमचा दादा कसा दिसतो हे मला पाहण्याची उत्सुकता होती . कारण तो माझ्यापेक्षा पंधरावीस वर्षांनी मोठा होता . पण " स्टॅन्डर्ड "आडवे आले . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात . शिक्षणामुळे माणूस विचारवंत होतो त्याच्या ज्ञानाच्या कक्षा उचांवतात . त्याचे जीवन सुखकर व समृद्ध होतेच पण त्याच्यां विशाल छायेत अनेकानां संजीवनी मिळते . उच्चशिक्षित भावाने मात्र आमच्या सर्वांसाठी त्याचे दरवाजे मात्र कायमचे बंद केले होते . उच्चशिक्षणाचा मला तेथे काहीच उपयोग झालेला दिसला नाही . इथे मला पीचडी झालेले उपप्राचार्य झांबरे सर आठवतात . उपप्राचार्या झांबरे मॅडम आठवतात . स्वतःच्या भाड्याने राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाशी प्रेमाने सुखदुःखाची विचारपूस करत असत . ते दोघेही स्वतःचे " स्टॅन्डर्ड "कधी गोंजारत बसले नाहीत .  सामान्य माणसासारखे राहून दोघेही असामान्य कामे करत राहीली . जॉय स्कूल व किसनवीर विद्यालयातील विद्यार्थी घडवताना आपल्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांला घडवण्याचे . " स्टॅन्डर्ड " काम त्यांनी आयुष्यभर केले व त्याचा गर्वही कधी केला नाही . जीवन जगण्याचे खरे " स्टॅन्डर्ड " त्यांनां कळले आहे म्हणून माझ्या त्या अतिउच्चशिक्षित एम एस सी फर्स्टक्लास झालेल्या अडाणी भावापेक्षा झांबरे पती पत्नींविषयी मला आदर वाटत आहे .     महिन्यापूर्वी एकदा झांबरे मॅडमचा मला फोन आला . त्यांनी विचारपूस केली व त्या जॉय स्कूलची नोकरी सोडून पुण्यात नातवाचा सांभाळ करण्यासाठी पुण्यात रहात असल्याचे सांगितले . मुलगा सिव्हील इंजिनियर व सुनबाई पेशाने सरकारी वकील असल्याने दोघेही कामात व्यस्त झाले मग मुलाकडे लक्ष कोण देणार ? म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला . आणि ते ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . माझी आर्ट गॅलरी होती . ती सांभाळताना माझी तीन वर्षाची मुलगी सांभाळण्यासाठी मी आईवडीलानां विनंती केली तर त्यांनी नकार दिला . गावाकडे शेतीची कामे असतात त्यामुळे तुमची मुलगी तुम्हीच सांभाळा असे उत्तर आईने दिले . शेवटी आमच्या संघर्षाच्या लढाईत मुलगी देवाघरी गेली . ती वारली त्यावेळी मी माझ्या मेव्हण्याला सत्यजितला फोन केला . तो म्हणाला मी अत्यंविधीला येऊ शकणार नाही . तो देखील Phd झालेला आहे . अतिउच्चशिक्षित आहे . त्याला भाचीच्या अत्यंविधीला जाण्याची गरज वाटली नाही . बहिणीला कठीण स्थितीत आधार देण्याची आवश्यकता वाटली नाही आणि पुढे आता सत्तावीस वर्ष झाली तरी त्याला आमची कधीच आठवणही झाली नाही . काय उपयोग त्या डॉक्टरेटचा ? जिथे माणूस माणसाला ओळखत नाही .मोबाईल ,फोन , लॅपटॉप आले तंत्रज्ञान वाढले तरी मनाची आढी मात्र कायम राहीली .कधी त्याच्या कुटूंबाने संपर्कच केला नाही कारण "स्टॅन्डर्ड " आडवे आले .त्यावेळी खऱ्या अर्थाने एकटे जगायला शिकलो . अशावेळी झांबरे मॅडमचा त्याग मला प्रेरणा देणारा वाटतो . मुलांविषयची माया त्यांच्या कृतीतून दिसते .इकडे सरांनां रिटायर्ड होण्यापूर्वी खानावळीत जेवण करावे लागले . काही महिने एकटेपणा स्विकारावा लागला . पण त्यांनी कधीही त्याची तक्रार केली नाही . कॉलेजमध्ये त्यांनी अनेक कार्यक्रमात स्वतःला झोकून दिले . त्यांच्या कॉलेजच्या कारकीर्दीची मला जास्त माहिती नाही पण त्यापेक्षा माणुसकी जपणारे , कुटुंबाला जपणारे , अभिमान नसणारे , मोठेपणाचा त्याग केलेले गार्डनमध्ये स्वच्छता करणारे डॉ झांबरे सर मनाला फार भावले . त्यांच्या मुलाचे लग्न ठरले त्यावेळी प्रणवच्या लग्नाला आम्ही दोघेही गेलो होतो . लग्नकार्यालय पूर्णपणे भरून गेले होते प्रचंड गर्दी होती तरीही झांबरेसरांनी आम्हाला बरोबर पकडलेच . शाल श्रीफळ देऊन योग्य मानसन्मान केला त्यावेळी मला या झांबरे कुटूबांचेखरे " स्टॅन्डर्ड " कळाले . वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य नामवंत लहानमोठ्या माणसांनी संपूर्ण हॉल भरून गेला होता . काय असते स्टॅन्डर्ड ?? तुम्ही जगत असता त्यावेळी त्या तुमच्या जगतानाच्या काळात असंख्य माणसे भेटतात . त्यातील काही माणसे चांगली वागलेली असतात काही वाईट वागलेली असतात . पण शेवट काय असतो ? तुमच्या जगण्याला कधीतरी मर्यादा येतेच . कधीतरी शरीर थकते व तुम्हाला अंतिम श्वास घ्यावा लागतो . त्यानंतर कोणत्यातरी स्मशानघाटाजवळ तुमची राख होते ती राख पाण्यात मिसळते तुमचे अस्तित्व संपते . जग काही दिवस तुमची आठवण काढते नंतर तुमची कोणी आठवणही काढत नाही . तुमचे " स्टॅन्डर्ड " काही असो शेवटी तुमची राखच होते . हे ज्यानां समजते त्यांचे भावविश्व वेगळे असते . ते कायम हसतमुख असतात . ते त्यांच्या कृतीतून त्यांचे वेगळेपण जोपासत असतात .अनेकानां त्यांचे जगणे प्रेरणा ठरत असते .असे जीवनाचे खरे " स्टॅन्डर्ड " कळालेले झांबरे सर मला आवडतात . काही महिन्यांपूर्वी अचानक आमच्याकडे घरकाम करणाऱ्या बाई व माळीकाम करणारा त्यांचा मुलगा या दोघांनी आमचे काम सोडले. काही दिवस आम्ही वेगवेगळी माणसे शोधली पण त्यांच्या पगाराच्या अपेक्षा जास्त असल्याने जुळले नाही . मग झांबरे सर पुन्हा आठवले . Phd झालेला माणूस स्वतः झाडलोट करतो , बागेची निगा राखतो तर आपण का लाजायचे ? त्यांच्यापासून प्रेरणा घेतली . आता मी बागकामात तरबेज झालोय बागेत शेतात काम केल्यामुळे आरोग्यही चांगले राहते याचा शोध लागला . आपण कोणावर विसंबून राहायचे नाही काम करत राहायचे हेच खरे " स्टॅन्डर्ड " झांबरे सरांकडून मी शिकलो . खरी डॉक्टरेट तीच आहे . मे महिन्यात ते आता रिटायर्ड होतील . अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या सरानां व झांबरेमॅडम या दोघांनाही उर्वरीत रिटायर्ड आयुष्य सुखसमृद्धीचे आनंदाचे जावे त्यांच्या मनासारखे जगताना उत्तम आरोग्य प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना व मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !चित्रकार - सुनील काळे✍️9423966486निसर्ग आर्ट गॅलरी [वाई]