पॅलेटवरचे रंग
🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌
कोल्हापूरकरांच्या कलाकारांच्या खूप कथा , गोष्टी व किस्से बऱ्याच वेळा माझ्या वाचनात आलेल्या होत्या .कोल्हापूरला त्यामूळे कलापूर असंही म्हणतात .
अशा या कोल्हापूरात मी घरदार सोडून बारावी सायन्स नंतर कलानिकेतन कॉलेजला दाखल झालो . मोठ्ठं शहर, अनोळखी वातावरण, माणसे पण नवी होती . त्यावेळी माझी आर्थिक स्थिती बिकट होती ,पण निसर्गचित्रांची ओढ प्रचंड होती . पण कला महाविद्यालयामध्ये ' निसर्गचित्र ' हा एकच विषय नव्हता . सगळ्याच विषयांची प्राथमिक तयारी म्हणजे फौडेंशनचा कोर्स .
कॉलेजला थोडे स्थिरस्थावर झालो त्यानंतर चंद्रकांत मांडरे यांचे नाव सतत ऐकायला मिळायचे . त्यांच्या निसर्गचित्रांच्या प्रिंटस व लेख वारंवांर वाचनात यायचे . अशा कलाकाराला गुरु मानून त्यांची एकदा तरी भेट घ्यावी म्हणून एका रविवारी त्यांच्या घराचा पत्ता मिळविला आणि निघालो .
कलानिकेतन कॉलेज कंळबा रोड ते राजारामपूरी सातवी गल्ली, निसर्ग बंगला या पत्यावर चालत , माझी चित्रांची फाईल घेऊन पोहचायला मला दोन तास लागले . त्यावेळी मेसचा डबा लावलेला होता. ब्रेकफास्ट हा प्रकार आर्थिक टंचाईमुळे माहीत नव्हता. त्यामूळे उपाशीपोटीच मी चालत निघालो .
निसर्ग बंगल्याच्या गेट मधून आत गेल्याबरोबर दरवाजा उघडणारी व्यक्ती स्वतः चंद्रकांत मांडरे आहेत हे मी लगेच ओळखले , डोक्यावर फरची कॅप, पांढरा सदरा , त्यावर करडया रंगाचे जॅकेट ,पांढरा पायजमा. त्यामूळे त्यांचे व्यक्तिमत्व खरोखरच भारदस्त दिसत होते .
सेफ्टीडोअरवरच्या दरवाजातूनच त्यांनी विचारले
"काय पाहीजे ?"
"मी कलानिकेतनचा फौंडेशनचा विद्यार्थी आहे तुमची ओरिजनल चित्रे पहायला आलोय व माझी चित्रे पण दाखवायची आहेत" . मी पटापट बोलून गेलो .
"ठिक आहे...बसा बाहेर ."
एवढंच बोलून ते वरच्या मजल्यावर निघून गेले.
सकाळचे दहा, अकरा, बारा वाजले, दुपार झाली. माझ्या पोटात भुकेने प्रचंड आग पडू लागली. वाट पाहून पाहून खूप कंटाळा येवू लागला पण मांडरे काय आत बोलवेनात . बरं आता बाहेर गेलो आणि अचानकपणे मांडरे बाहेर आले तर ? मोठा प्रश्न पडला आणि मनात वेगवेगळे विचार येऊ लागले . कोणीतरी सांगितल्याचे आठवले , गुरु प्रथम कडक परिक्षा घेतात, शिष्याला खरंच गरज आहे का हे त्याच्या वर्तणूकीतून तपासतात, मगच ज्ञान किंवा दिक्षा देतात. कदाचित आपली पण नक्कीच परिक्षा घेत असावेत, हे मनाशी ठरवून मी देखील जिद्दीने बाहेरच बसून राहीलो .
संध्याकाळचे पाच वाजले असावेत, दरवाजा उघडल्याचा आवाज आला व सौ . मांडरे बाहेर फिरायला निघाल्या व दारातच मला बसलेला पाहून "काय पाहीजे ?" असे विचारू लागल्या .
मी सकाळी नऊ वाजल्या पासून मांडरे साहेबांची बाहेर वाट पहात बसल्याचे सांगताच त्या खूप चिडल्या व मला लगेच आत घेऊन पहिल्या मजल्यावर नेले. मांडरे साहेब चहा घेत निवांतपणे पुस्तक वाचत बसले होते .
मला बघताच त्यांनी
"अजून तू आहेसच होय ? गेला नाहीस ?" असा प्रतिप्रश्न केला .
खरं तर मांडरे मला पूर्ण विसरले होते ( की विसरण्याचे नाटक केले होते, की प्रथम वर्षाचा फौंडेशनचा विद्यार्थी होतो म्हणून दुर्लक्ष केले होते .. ते मला कधीच कळले नाही )
त्यांनी त्यांची काही चित्रे नुकतीच फ्रेम करून आणली होती . ती सर्व निसर्गचित्रे मला दाखवली .
त्यांचा ' निसर्ग बंगला ' महाराष्ट्र सरकार कलादालनात रूपांतरीत करणार असल्याने इंटिरिअरचे काम चालू होते . माझी चित्रे पाहील्यावर "निळ्याजांभळ्या (violet) रंगाचा वापर खूप जास्त करतोस तो पूर्णपणे बंद कर" अशी तंबी दिली . पण "तु पहिल्याच वर्षाचा फौडेंशनचा विद्यार्थी असल्याने तुला मी माफ करतो" असं खाद्यांवर हात ठेऊन कौतुकही केले .
सौ . शशीकला मांडरे पाचगणीच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट स्कूल मध्ये काही वर्ष शिकायला होत्या त्याची आठवण त्यांनी करून दिली . संध्याकाळी थोडा चहापाणी व बिस्कीट मिळाल्यावर मलाही थोडी गप्पा मारायला तरतरी आली .
मांडरे त्यांच्या चित्रपटाच्या शुटींग मध्ये जरा वेळ असला की जेथे असतील तेथे जवळचा परिसर जलरंगात चित्रित करत . जलरंग हे त्यांचे आवडते माध्यम होते . जसं दिसतं तसंच चित्र काढण्याची त्यानां भारी आवड होती .
व ती त्यांनी अखेरपर्यंत जोपासली .
पन्हाळा, रंकाळा ,कोल्हापूर परिसर, वाई महाबळेश्वर, काश्मीर, व परदेशातील इतर अनेक ठिकाणे त्यांनी जलरंगात चित्रित केल्याचे त्यांनी सांगितले .
जाताना त्यांनी मला त्यांच्या छोट्या स्टुडीओत नेले. "चित्रांविषयी काय संदेश देणार आहे? असे विचारले त्यावेळी ते कोल्हापूरी ढंगात जे म्हणाले ते आजही माझ्या कायम लक्षात आहे .
पोरा ,
कुठं बी रहा,
कसा बी रहा,
काय पण खा,
कसा पण जग,
कितीही अडचणी येऊ दे
पण आपली ही रंगाची पॅलेट असते ना त्याच्यावरील रंग कधी बी सुकले नाय पाहीजेत हे पक्कं ध्यानात ठेवायचं.
माझी जलरंगाची रंगपेटी बऱ्याच वेळा, जीवनातल्या अनेक गोष्टींमुळे, आघातामुळे ,
वाईट प्रसंगामुळे, सुकली............... पर्यायच नव्हता मला .
त्या वेळी मग चंद्रकांत मांडरे यांचे शब्द आठवतात...........
मी दोन दोन थेंब पाणी प्रत्येक जलरंगावर टाकतो........
व परत नव्या दमाने, नव्या विचाराने पुन्हा सुरुवात करतो .
कारण.....
चित्रकाराला कितीही अडचणी येवोत,
पण त्याचे पॅलेटवरचे रंग कधी सुकले नाही पाहीजेत................
पॅलेटवरचे रंग कधी सुकले नाही पाहीजेत................
🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌
सुनिल काळे
9423966486
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा