बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
          24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यानां रिटायर्डमेंट घ्यावीच लागते आपणही घ्यावी . त्यादिवशी मी माझी डायरी घेऊन पाचगणीला गेलो रिटायर्डमेंटनंतर काय काय करता येईल हे ठरवायला . आता मस्त आराम करायचा . भरपूर तकतक केली आता निवांत जगायचे सगळी कमर्शियल कामे बंद करायची आपल्या स्वतःसाठी जगायचे असे ठरवून लिहायला सुरुवात केली तर आमचा कल्याणचा मित्र नंदीश सोनगिरे व त्याची डॉक्टर बायको एक छान केक घेऊन वाढदिवशी हजर झाले . त्याच दिवशी पंढरपूरचे अंतर्नाद डिजिटल मासिकाचे संपादक डॉ.अनिल जोशी व त्यांची मिसेस शुंभागी जोशी त्यांचा बदलापूरचा मित्र मोठा पुष्पगुच्छ व काही भेटवस्तू व स्वतः बनवलेले काही खाण्याचे पदार्थ घेऊन पाचगणीला आले . एकंदर तो दिवस लक्षात राहण्यासारखा होता . आम्ही सर्वांनी माझ्या आवडत्या पांगारी गावची व्हॅली आणि पुस्तकाच्या गावाला भेट दिली . आपल्या आवडत्या मित्रांसोबत भेट होणे व भरपूर गप्पा मारणे ही अनोखी मेजवानी असते . आपले काही मित्र व नातेवाईकदेखील आपल्याला पूर्णपणे विसरतात .काहीतरी खुस्पट फालतू विचार डोक्यात ठेऊन आपल्याशी वैर घेतात , टाळतात , भांडतात व टिका करत राहतात अशा सर्व त्रासदायक नातेसंबंधानां काही मित्रानां मनातूनच हद्दपार केले आहे . कायमचा नारळ दिला आहे कारण मी आनंदाने जगण्याचे ठरविले आहे व आता खरोखर मजेत जगतो .
            अर्थात मित्र भरपूर असले तरी सगळेच मित्र हे मैत्र प्रामाणिक टिकवतात असे नसते . मित्रांचेही अनेक प्रकार असतात व गरजेप्रमाणे त्यांचे मित्रत्व अधूनमधून जागृत होते याचा मलाही चांगला अनुभव येत असतो . पण सगळे एकसारखे व चांगलेच मित्र भेटावेत अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरते . व्यक्ती तितक्या प्रकृति याची जाणीव ठेवावी लागते . मित्र जसे असतात तसे स्विकारत गेले की मग त्रास होत नाही . हे जीवन नानाविध स्वभावाच्या मित्रांनी भरलेले आहे व त्यात खूप व्हरायटी आहे म्हणून मलाही ते फार मजेशीर व रोमांचक वाटते .
              मी पुण्यात अभिनव कला महाविद्यालयात 85 ते 90 च्या काळात चार वर्ष शिकायला होतो . त्यावेळी एक वर्ष विद्यार्थी सहाय्यक समिती नावाच्या वसतिगृहात राहत होतो . त्यावेळी  कला महाविद्यालयात जाताना चालत जायचो त्यावेळी काही मित्र सायकलवर जायचे . मला डबलसीट घ्यावे लागेल म्हणून दुसरीकडे बघत वेगाने शेजारून निघून जायचे . आज त्याच रस्त्यावरून चारचाकी गाडीने जाताना त्यांच्या कधीतरी आठवणी येतात . आताही त्यातील काही मित्र  लक्षात आहेत ,पण आपण त्यांच्या वाईट गोष्टी डोक्यात ठेवत बसलो की त्रास होतो त्यामुळे विसरून नव्याने प्रवास करत राहायचे . त्या वसतिगृहात माझ्याच कॉलेजला शिकणारा एक मित्र होता . तो अनेक गोष्टीत आमच्यापेक्षा पुढे असायचा आजही तो पुढेच आहे . त्याची एक मैत्रिण होती . त्याने हॉस्टेलवर एक ' बिन माणसाचा हात ' नावाचे नाटक बसवले होते त्या नाटकात एक पात्र होते सातारा  जिल्ह्यातील एक गावरान ऊसाचा रस विकणारा गुऱ्हाळ चालवणारा माणूस . आणि ह्या पात्रात मी अप्रतिम अभिनय केला म्हणून बेस्ट ॲक्टरचे प्राईजही मिळाले होते . त्यामुळे तो मित्र कायम लक्षात राहीला होता .
             दोन एक वर्षापूर्वी एकदा पुण्यामध्ये आर्ट कॉलेजच्या जवळ आर्टशॉपमध्ये मटेरियल घ्यायला गेलो होतो . त्यावेळी दुपारी जानकी नावाच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो . त्यावेळी तीस वर्षांनंतर अचानक हा आमचा फेसबुकवर सुप्रसिद्ध असणारा मित्र प्रवेश करताना समोरच्याच टेबलावर बसलेला दिसला . मला तर खूपच आनंद झाला .  आमचा मित्रत्वाचा सातारी बाणा लगेच जागृत झाला . तीस वर्षापासूनचे मित्रप्रेम एकदम उफाळून आले .त्याच्याशी लगेच हात मिळवला व एकत्र बसुन भरपूर गप्पा माराव्या म्हणून शेजारी बसायला गेलो तर या मित्राने हातात त्याचे व्हिजिटींग कार्ड दिले व याठिकाणी मी एका बिझनेस मिटींगमध्ये आहे त्यामुळे अपॉईंटमेंट घेऊन ऑफीसमध्ये यावे अशी " प्रेमळ " विनंती केली . मी त्याला लगेच मनापासून सॉरी म्हणालो . नंतर दूर त्याला त्रास होणार नाही अशा कोपऱ्यात जाऊन बसलो . थोडा स्वतःचाच रागही आला . कारण मी आपल्या मित्रत्वाच्या धुंदीत असतो पण समोरचा त्याच मित्रत्वाच्या धुंदीत असेल असे नसते , तो खूप वेगळ्या विचारांमध्ये वेगळ्या विश्वात जगत असू शकतो याची जाणीव ठेवली पाहीजे हे मी त्यादिवशी नव्याने शिकलो .त्यामुळे मैत्र जपताना मी आता फार काळजी घेतो . त्या मित्राच्या ऑफीसमध्ये परत जाण्याची माझी इच्छा त्याच दिवशी संपली त्या कार्डावरचा पत्ताही मी पाहीला नाही व आता त्या मित्राने तसे वागणूक दिल्याबद्दल तक्रारही नाही . आपण आर्थिक अडचणीत किंवा वाईट अवस्थेत किंवा अप्रसिद्ध असताना जर मित्र टाळत असतील तर ते तुमचे कधीच मित्र नव्हते व यापुढेही असणार नाहीत . शिवाय हॉटेलमध्ये जेवताना काही जणांच्या बिझनेस मिटींग सुरु असतात हे माझ्या अज्ञानी मनाला माहीत नव्हते

पण काहीजण सर्व परिस्थितीत आपल्याला जपणारी असतात . अशी माणसे खास व्यक्तिमत्वाची असतात .वेगळीच असतात . ती तुमच्या सर्व परिस्थितीत सतत सोबत असतात . सारखीच प्रेमाने वागत असतात अशा मित्रानां मी नेहमीच सॅल्यूट करतो .

               इल्झे विगॅन्ड ही आमची जर्मनीची मैत्रीण मात्र आगळीवेगळीच आहे . ती आता 95 वर्षाची आहे . गेली अठ्ठावीस वर्ष ती संपर्कात आहे . तिने व मी आमचे मैत्रभाव छानपणे जपले आहे . करोनानंतर गेली चारपाच वर्ष ती भारतात आली नव्हती . तीची फार जबरदस्त इच्छा होती की आम्ही एकदा तरी जर्मनीला भेट द्यावी . त्यासाठी श्रीमंत होण्याचा आम्हीही खूप प्रयत्न केला . दोन प्रदर्शने नेहरु सेंटर आर्ट गॅलरीत केली . व्हिसा मिळविण्यासाठी सीए कडे गेलो, इन्कमटॅक्स फाईल बनवली , पासपोर्ट काढला , उत्पन्नाचे दाखले मिळवले ,
 ट्रॅव्हलएजंटकडे संपर्क केले पण विमान प्रवासाच्या यंत्रणा फारच कडक आहेत . सतत नव्या गोष्टी मागत असत . मग मेडीकल इन्शुरन्स मागितला . फिटनेस सर्टीफिकेट , उत्पन्नाचे मार्ग विचारले . तेथे किती दिवस राहणार आहे ? कोणाकडे राहणार ? त्यांचे सर्टिफाईड  पत्र आहे का ? रिटर्न तिकीट काढले का ? ज्या कोणाकडे राहणार त्यांचे इन्कमप्रुफ ? तेथे फिरण्याचे पैसे आहेत का ? किती आहेत ? माझ्यासारख्या फ्रिलान्स चित्रकार लोकांना उत्पन्नाचे फिक्स सोर्स कोठून असणार ? मग मी कंटाळलो . नाद सोडून दिला . गडया आपला गाव बरा असे ठरवून जर्मनीचे स्वप्न पहाणे बंद केले . काही स्वप्ने परवडणारी नसतात हे लवकर लक्षात आले  व इल्झेला कळवले आम्हाला जर्मनीला येणे शक्य नाही व विषय संपवला .
              मग इल्सेचा मेसेज आला जर तुम्ही मला भेटायला येत नाही तर मग मी येते . वय वर्ष पंच्च्यान्नव , हातात आता काठी आली आहे . शरीर थकले आहे , एका गुढग्याचे ऑपरेशन झाले आहे . पण उत्साह मात्र तोच आहे . जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा निरागस दृष्टीकोन लहान मुलासारखा ओसांडून वहात आहे . मैत्रीची ओढ तशीच आहे . मी तिला सांगितले आता शरीर थकले आहे एकटे येण्याची रिस्क घेऊ नको सोबत कोणीही नसल्याने कधीही काहीही होऊ शकते . पण इल्झे ऐकणारी थोडी आहे ? तीचे मैत्र आणि तिचे जगणेही आहेच वेगळे.
           एक दिवस कॉल आला . मी महाबळेश्वरला आली आहे . हॉटेल बुकींग करून अर्धा महाबळेश्वर फिरून झाले आहे . तुझ्याकडे उदया सोमवारी येणार आहे . मी एसटी ने प्रवास करते तुझा पत्ता सांग मग भेटायला येते .कधी येऊ ?
           अशा हट्टी मैत्रिणीपुढे काहीच बोलता येत नाही . मग वाई बस स्टॉपवर इल्झे आली . तिने एसटी स्टॅन्डवरच जादूची झप्पी दिली . सगळे प्रवासी बघतच राहीले . मग गेली तीन चार दिवस मेणवली, वाईचा परिसर फिरत राहीलो . प्रत्येक माणसाशी प्रेमाने बोलणे , वॉचमन , कातकरी मुले , श्रीमंत , गरीब , जातीभेद न करता सर्वांच्यासोबत फोटो काढणे , घाटावर छोटे स्केच करणे , आवडीचे पदार्थ खात रहाणे , गाणी ऐकणे , आणि तरुणाईला लाजवेल त्या उत्साहाने जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेणे हे पाहीले की खरोखर हे जीवन सुंदर आहे हे पटते .
       मी तर अठ्ठावनव्या वर्षी रिटायर्डमेंट घेतली पण इल्झे मात्र पंच्च्यानवव्या वर्षीही तितकीच ॲक्टीव्ह आहे . 
       जीवनातला हा उत्साह कसा टिकवायचा असे विचारले तर म्हणते तुम्ही भारतीय पुढील भविष्याचा विचार करत बसता मी मात्र फक्त आज आणि आता एवढया दोनच गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत . येणारा प्रत्येक क्षण मस्त मजेत जगायचा . पुढे जे काही होईल ते होईल . मृत्यू म्हणजे पण एक अनोळखी मित्रच असणार आहे त्याला काय घाबरायचे ?  त्याच्याशीही मैत्री करायची . मस्त जगायचे व मस्तीतच एक दिवस मरायचे .

सुनील काळे✍️
9423966486

दूरदेशीची मैत्री -पार्ट 1
https://www.facebook.com/share/p/u2XDxctcaz7DjFFR/

भालचंद्र मोने - एक भन्नाट वाईकर

भालचंद्र मोने - एक भन्नाट वाईकर
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
         वाई , पाचगणी व महाबळेश्वर ही सातारा जिल्ह्यातील  जवळजवळ लागून असलेली महत्वाची ठिकाणे आहेत . पण या तिन्हीही ठिकाणची भौगोलिक रचना , भूप्रदेशाची वैशिष्ठ्ये , वातावरण , हवामान व सर्वात महत्वाचे माणसांच्या जगण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत . वाईमध्ये प्रसिद्ध अशी अनेक मंदिरे , दगडी चिरेबंदी घाट , कृष्णा नदी वाई शहरातून वाहत असल्याने सर्वानां खूप भावते . पाचगणी टेबललॅन्डच्या पठारामूळे व बोर्डींग शाळांमूळे प्रसिद्ध , तिथे अनेक शाळांच्या शिक्षणपद्धतीमूळे कोस्मोपोलीटिशन संस्कृती आहे . महाबळेश्वरला सह्याद्री डोंगरपर्वतांच्या रांगामूळे अनेक पॉईंटस विकसित झाले आहेत व त्याचे श्रेय ब्रिटिशांना जाते . विकसित केलेल्या पर्यटन संस्कृतीमुळे एक वेगळा व्यावसायिकपणा येथील माणसांमध्ये मुरला आहे .
           मी ज्यावेळी पाचगणीतून वाईला स्थलांतरीत झालो त्यावेळी नव्या मित्रांच्या शोधात होतो . पण मित्र थोडे असे पटापट मिळतात ? मग वाईची पुस्तके वाचून थोडा अभ्यास करायचा ठरवले . त्यासाठी वाईचे प्रसिद्ध लेखक लक्ष्मीकांत रांजणे यानां विनंती केली आणि त्यांनी एक अप्रतिम पुस्तक वाचायला दिले त्या पुस्तकाचे नाव होते वाई - कला आणि संस्कृती . त्या पुस्तकावर चित्रकार सुहास बहुलकरांचे चित्र व अप्रतिम प्रस्तावना आहे . त्या पुस्तकाचे लेखक सु .र . देशपांडे यानां भेटलो तर त्यांनी सांगितले तुम्ही आता या पुस्तकाच्या प्रेमात पडलाच आहात पण एका व्यक्तिला लवकरात लवकर भेटलेच पाहीजे आणि त्यांचे नाव आहे भालचंद्र मोने कारण त्याच्यां मदतीमूळेच हे पुस्तक वैशिष्ठ्यपूर्ण झाले आहे .
             ब्राम्हणशाहीच्या घाटाजवळ उतरताना मोने साहेबांच्या घरी गेलो आणि लोकेशन पाहूनच चकीत झालो . माझे एक स्वप्न होते आपले घर वाईच्या नदीच्या घाटाजवळ असावे मग रोज सकाळी निवांतपणे घाटावर फिरायचे व स्केचिंग करत राहायचे . वाईचे सगळेच घाट किती वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात . प्रत्येक प्रहारात , प्रत्येक सिझनमध्ये त्याची वेगवेगळी रूपे दिसतात . भालचंद्र मोने यानां प्रत्यक्ष भेटल्यावर खरोखरच त्यांची व घाटाचीही वेगवेगळी रूपे आजमावता आली .
            वाईला स्टेट बँक ऑफ इंडियामधून ते रिटायर्ड झाले . बँकेचा कारभार तसा रुक्ष कर्तव्यदक्षतेचा . सतत आर्थिक गोष्टींशी निगडीत असलेला पण भालचंद्र मोने त्रासलेले वाटले नाहीत . कारण त्यांच्या आवडीनिवडी निराळ्या होत्या . वाचन , चित्रकला , भटकंती ,संशोधन , अध्यात्म व सर्वात महत्वाचे आपल्या वाई गावाविषयी असलेले नितांत प्रेम . या प्रेमापोटीच त्याच्यां मित्रांनी 'आस्था ' नावाची पर्यावरण मैत्री संस्था स्थापन केली व त्याचे सचिव म्हणून त्यानी स्वतःला कामात झोकून दिले .
            वाईला लक्ष्मणशास्त्री जोशींमूळे विश्वकोष व प्राज्ञपाठशाळा खूप प्रसिद्ध आहेत . त्या संस्थेच्या प्रभावातून अनेक लेखक , कवी , कायकर्ते , संशोधक लेखक निर्माण झालेले आहेत . भालचंद्र मोने त्यापैकी एक . काही दिवसांपूर्वी त्यांनी वाई परिसरातील फोटोग्राफर्स एकत्र करून असंख्य पक्षांची माहीती असलेले सुंदर पुस्तक निर्माण केले होते . त्यासाठी पक्षीतज्ञ किरण पुरंदरे यानां प्रकाशन सोहळ्याला बोलावले होते . वाईचे कमलाकर भालेकर दुसऱ्या महायुद्धात वॉरंट ऑफीसर होते . त्या महायुद्धात त्यांनी रोजची डायरी लिहीली होती . मोनेंनी ती डायरी मिळवून छान संक्षिप्त पुस्तक लिहीले आहे.
            वसंत व्याख्यानमालेचे अनेक वर्ष श्रोते, कार्यकर्ते ते पदाधिकारी असल्याने भालचंद्र मोने बहुश्रृत व बहुआयामी व्यक्तिमत्वाचे आहेत . त्यानां अनेक विषयांची व अनेक गोष्टींची माहिती असल्याने त्यांच्याशी गप्पा मारत असताना कधी कंटाळा येत नाही . विश्वकोषाची लायब्ररी , प्राज्ञ पाठशाळा , येथे त्यांचा मुक्त सतत संचार चालू असतो . त्यांच्या खांद्यावर एक शबनम बॅग नेहमी लटकवलेली असते . त्यात एखादे तरी पुस्तक असतेच . मी चित्रकार असल्याने त्यांनी टिळक वाचनालयात चित्रकला विषयाची  कोणकोणती पुस्तके उपलब्ध आहेत याची तोंडपाठ यादीच दिली कारण त्यांचे आजोबा हरभट मोने चित्रकार होते. त्यानां पारंपारीक कला ते आधुनिक समकालीन कला , मूर्त , अमूर्त कला ,गाजलेले चित्रपट , चित्रकार ,लेखक , जुनी पुस्तके , अध्यात्मातील अनुभव यांचा दांडगा अभ्यास आहे . पण त्याचा वृथा अभिमान नाही . अतिशय साधेपणा व अहंकार विरहीत जीवनशैली यामुळे ते समाधानी असतात . त्यांच्या या स्वभावामुळे मी कधीकधी गप्पा मारायला त्याच्या घरी जातो. एक प्रसंग मात्र कायम लक्षात राहीला आहे तो सांगण्यासारखाच आहे .
            एकदा विजय दिवाण व मी मोनेसाहेबांच्या  घरी मस्त गप्पा मारत होतो . आणि अचानक संध्याकाळ झाल्याने चहाचा विषय निघाला . त्यावेळी स्वतः मोने चहा करायला आत गेले . बाहेर त्यांच्या वयोवृद्ध आई झोपाळ्यावर बसून आमच्याशी बोलत होत्या कारण त्यांचे पाय दुखत होते. मी त्यानां एक सहज प्रश्न विचारला . नागेश मोने व भालचंद्र मोने ही तुमची दोन मुले . एक शाळेचा मुख्याध्यापक व दुसरा बँकेचा अधिकारी आहेत , कर्तृत्ववान आहेत , हुशार आहेत , व्यासंगी आहेत , सर्वानां आवडणारे आहेत पण दोघांनीही लग्न केले नाही . तुम्हाला दोन सुना मिळाल्या असत्या तर तुम्हाला जरा छान विश्रांती मिळाली असती व सुनांवर जरा रुबाबही दाखवता आला असता . तुम्हाला वाईट वाटत नाही का ?
जराही नाही . 
मोनेआजी अगदी ठामपणे म्हणाल्या .
असे कसे ? माझा लगेच प्रतिप्रश्न . जरा सविस्तर सांगा . भारतात जुन्या पारंपारिक विचारांचा पगडा आहे . प्रत्येकाला वाटते माझा वंश पुढे चालला पाहीजे , घराण्याचे नाव राहीले पाहीजे . नातू हवा , घर कसे गजबजलेले हवे . लग्न करून मुलानां जन्म देणे हे तर प्रत्येक भारतीयाला आद्य कर्तव्य वाटते मग तुमची विचारसरणी अशी वेगळी कशी ?
         मोने आजीच्यां चेहऱ्यावर मंद स्मितहास्य होते . तुम्ही हा प्रश्न मला विचारणार याची मला खात्री होती . पण खरं सांगू आता दोघेही साठीच्या आसपास आहेत त्यामूळे आता लग्न हा  विषय पूर्णपणे संपला . पण तरुण होते त्यावेळी फार पूर्वी मी त्यांच्या लग्नाचा विषय काढला होता . 
दोघेही विद्यार्थीप्रिय , अभ्यासू , वाचनप्रिय व हुशार आहेत . आनंदी आहेत , छान जगत आहेत , मग माझ्या स्वार्थासाठी त्यांच्या जीवनात मी का खोडा घालू ? हे जीवन प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसार , आवडीनुसार , सवडीनुसार , मनसोक्तपणे जगता आले पाहीजे . जीवनातील प्रत्येक दिवस एक मोठा सणाचा दिवस असल्यासारखा उत्सवपूर्ण जगता आला पाहीजे . थोडक्यात स्वमर्जीप्रमाणे  दिवस  जगता आला पाहीजे . कोणाच्याही व्यक्तिस्वातंत्र्याचा अपमान न करता , कोणाचाही प्रभाव न पाडून घेता , जीवन स्वच्छपणे जगता आले पाहीजे . माझी दोन्ही मुले आनंदी आहेत . त्यांच्या कार्यामूळे हजारो विद्यार्थी माणसे आनंदी होत आहेत आणि हा आनंद मला रोज मिळतो . मग वाईट कशाला वाटेल ?
मी हे उत्तर ऐकले व छानपणे मस्तक त्यांच्या पायाशी ठेवून आशीर्वाद घेतला .
दिव्यत्वाची जेथे प्रचिती ॥
तेथे कर माझी जुळती ॥ त्यादिवशी अशीच माझी भावावस्था झाली .
          लोकमान्य टिळक व वाईचा एक वेगळा ऋणानुबंध होता . अठ्ठावीस वाईकरांनी सांगितलेल्या लोकमान्य टिळकांच्या आठवणी , पत्रव्यवहार , टिळकांच्या वाई भेटीचे किस्से , छायाचित्रे यांचा मागोवा भालचंद्र मोने यांनी शोधून अभ्यासपूर्ण पुस्तक तयार केले आहे . जूना इतिहास पुराव्यांसह शोधून काढणे, हजारो पुस्तकांतून अभ्यास करून त्यांचे वाचन करून निवडक  माहिती संकलन करणे , त्याची वर्गवारी करून पुस्तकासाठी दस्ताऐवज तयार करणे , अनेकांच्या घरी जावून माहिती गोळा करणे , संदर्भ गोळा करणे हे एखाद्या मधमाशीसारखे न कंटाळता अविरत कष्टाचे काम असते आणि नेमके हेच काम भालचंद्र मोने करतात . अशा कामासाठी जिद्द , चिकाटी व सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा लागतो तरच कार्य सफल होते व इतके सर्व करून मोने प्रसिद्धीपासून नेहमी दूर राहतात . 
           हे सगळे आठवायचे कारण म्हणजे तीनचार दिवसांपूर्वी त्यांचा फोन आला होता . ' लोकमान्य टिळक आणि वाईकर ' या पुस्तक प्रकाशन समारंभाच्या निमंत्रण देण्यासंदर्भात . त्याचदिवशी माझा वर्गमित्र श्री .सुरेश वरगंटीवार याने लोकमान्यांचे व्यक्तीचित्र विविध माध्यमातून साकारून एक वेगळे प्रदर्शन वाईमध्ये भरवायचे ठरवले आहे . त्याचे उद्‌घाटन माझ्या हस्ते करावयाचे त्यांनी नक्की केले होते . मोठ्ठ व्हायचे कॅन्सल केले असले तरी मी मित्रप्रेमामुळे त्यानां नकार देऊ शकलो नाही .
              तर भेटू प्रत्यक्ष येत्या शनीवारी दि .२६ ऑगस्टला सकाळी 10 वाजता चित्रप्रदर्शनाच्या उदघाटनाला व संध्याकाळी 5 वाजता पुस्तक प्रकाशनाच्या समारंभावेळी . अध्यक्ष श्री . अनिल जोशी आहेत . प्रमुख पाहुणे श्री.दिपक टिळक येणार आहेत .
सर्वानां सस्नेह निमंत्रण !🙏🙏

सुनील काळे
9423966486

दत्त दिगंबर पतसंस्थेच्या विरुद्ध लढणारा अखेरचा योध्दा - विश्वास बर्गे

दत्त दिगंबर पतसंस्थेविरुद्ध लढणारा अखेरचा योध्दा विश्वास बर्गे
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
        काल वाईमध्ये वसंतमाला व्याख्यानमालेतील 12 व्या पुष्पाचे व्याखाते होते श्री . समीर नेसरीकर , आणि त्यांचा विषय होता "आजच्या काळातील अर्थभान " .
       आपण सगळेच जाणतो की मनुष्य छोटा असो वा मोठा प्रत्येकाच्या जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते . कष्टाने मिळवलेल्या पैशांचे योग्य नियोजन करायचे असते .कधीकधी आपण जसे जीवन जगायचे ठरवलेले असते , जी स्वप्ने पाहीलेली असतात त्याच्या बरोबर विरुद्ध अनपेक्षित घटना आपल्या आयुष्यात अचानक घडतात आणि ठरवलेले सुंदर जगण्याचे स्वप्न बेचिराख होते . काही जण कसेबसे सावरतात तर काही जण जीवनाशी तडजोड करून कायमची माघार स्विकारतात . अयशस्वी होतात .
         दहा वर्षांपूर्वी पाचगणीवरून वाईला कायमचे राहायला आलो . वाई पाचगणी अंतर जरी जास्त नसले तरी येथे सांस्कृतिक विषमता खूप आहे त्यामुळे फार जणांशी ओळखी घरोब्याचे सबंध नव्हते . त्यामुळे वाई परिसर व माणसे जरा नव्यानेच समजून घेत होतो .
         तयार घर घ्यायचे असे ठरवले होते तर एक भयानक अनुभव माझ्या पदरात पडला मग शेवटी घर बांधायला लागले . आता घर बांधायचे तर दोन वर्षांचा काळ जाणार होता . भाड्याच्या घरात रोख पैसे ठेवणे सोपे व सुरक्षितही नव्हते . कॉन्ट्रॅक्टरचे कामगार , त्यांची रोजची हजेरी व विटा ,वाळू , सिमेंट , यांचे पैसे महिन्याच्या एक तारखेला रोख द्यावे लागत होते . म्हणून मी काही अमाऊंट पाचगणीच्या बँकेत ठेवण्यापेक्षा दत्तदिगंबर पतसंस्थेच्या वाईच्या मिलिंद खामकर यांच्या जागेत सुरु असलेल्या शाखेत ठेवायला गेलो ,तेथे संस्थेत योगिता चौधरी या मेणवली गावच्या ओळखीच्या बाई काम करत होत्या . त्या म्हणाल्या काही काळजी करू नका . मी तुम्हाला ओळखते व मी येथे वाईतच राहते .
          घर बांधण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागणार होता काही दिवसांचाच तर प्रश्न होता म्हणून तेथे चार लाख रुपयांची मासिक ठेव गुंतवणूक केली . मला दर महिन्याला चार हजार रुपये मिळत होते . इकडे इमारतीच्या बांधकामाचा स्पीडही फास्ट होता . अगदी शेवटच्या थोड्याच दिवसात एक दिवस पतसंस्थेत गेलो तर शटर डाऊन दिसले .
           योगिता चौधरी मॅडमला फोन केला तर म्हणाल्या मुख्य बाजारात पहिल्या मजल्यावर मोठे ऑफीस घेतले आहे तेथे फर्निचरचे काम सुरु आहे . मी आता शाखाप्रमुख असणार आहे . फर्निचरचे काम संपले की पतसंस्था पुन्हा सुरु होईल . काळजी करू नका . मग प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व नंतर सतत पाहणी करतच राहीलो . कारण फर्निचरचे काम संपतच नव्हते . इकडे घराचे बांधकाम संपून रंगकाम सुरु झाले होते .  शिफ्टींगमध्ये खूप व्यस्त झालो होतो . शेवटी कलरकामाचे पैसे द्यायचे म्हणून एक दिवस पतसंस्थेत गेलो तर कळाले शाखा कधीच सुरु होणार नाही .
          योगिता चौधरी मॅडम म्हणाल्या मलाच फसवले , माझाच पगार दिला नाही . ज्यांच्या विश्वासावर ठेव ठेवली त्यांनी कळवलेच नाही . शेवटी एकप्रकारे दगा दिला . मग पळापळी सुरु झाली . त्यांनी विलास शिंदे नावाच्या व्यवस्थापकाची भेट करून दिली . त्यांनी सहा महिन्यात पूर्ण रक्कम मिळेल असा पोलीसांसमोर जबाब दिला .
        आयुष्यात पहिल्यांदा कोरेगावला गेलो . पो.स्टेशनला तक्रार करायला गेलो तर म्हणाले घटना वाईत घडली मग वाईत जावा . वाई पो .स्टेशनला गेलो तर म्हणाले आर्थिक गुन्हे शाखा सातारा व अंतर्गत दुय्यम सहकारी निबंधकाकडे तक्रार करा . तेथे गेल्यावर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात अर्ज करा तेथे गेलो तर जिल्हा पोलीस प्रमुखांकडे अर्ज करा सगळीकडे नुसती टोलवाटोलवी सुरु झाली . मग वाई , सातारा , कोरेगाव अशा वाऱ्या सुरु झाल्या . अर्जांवर वर अर्ज सुरु झाले व चार लाख बुडवून घेतल्याचे दुःख व 
" अर्थभान '' पदरात पडले .
            असा संघर्ष सुरु असताना एक दिवस विश्वास बर्गे यांचा फोन आला . तुम्ही सातारा येथे भेटायला या , माझेही पैसे बुडाले आहेत आपण एकत्र प्रयत्न करू म्हणाले . मग पहिल्यांदा त्यानां भेटलो आणि आम्ही दोघेही समदुःखी आहोत याची ओळख पटली .
       विश्वास बर्गे मुंबईला माझगावच्या प्रसिद्ध इंग्रजी शाळेत पीटीचे शिक्षक होते . आयुष्यभर कष्ट करून 36 वर्षांची पेन्शन घेऊन आता कोरेगावला मूळ गावी राहून म्हातारपण निवांत जगायचे त्यांचे स्वप्न होते . एकूलती एक मुलगी सांगलीला लग्न झाल्याने दोघे पती पत्नी कोरेगावला एकटेच राहत होते . तेथे दत्त दिगंबर शाखेची मोती चौकात मुख्य शाखा होती . आयुष्यभर कमावलेले अकरा लाखाची ठेव त्यांनी पतसंस्थेत गुंतवली . त्यांनी ठेव ठेवली म्हणून त्यांच्या सर्व भावांनी पतसंस्थेत पैसे गुंतवले . एकूण चाळीस लाखापर्यंत ही रक्कम ठेवली गेली होती . आणि अचानक पतसंस्थेचे अध्यक्ष राजेन्द्र हिरालाल गांधी व त्यांचे सर्व संचालक सदस्य एकूण 32 कोटी रुपयांचा अपहार करून फरारी झाले .
        विश्वास बर्गे एक वयस्कर गृहस्थ असले तरी मुंबईत राहात होते . अभ्यासू व्यक्तिमत्व होते .धडाडीने त्यांनी सर्व ठिकाणी माझ्यासारखेच असंख्य अर्ज दिले होते . शेवटी कोरेगाव कोर्टात अर्ज करून त्यांनी फरारी सदस्यांचे पितळ उघडे पाडले . आरोपी कोरेगावचे रहिवासी होते पण पोलीसांनी त्यानां अटक केली नाही . कोरेगाव कोर्टाने त्यांनां सर्वांचे पैसे परत करण्याचा आदेश दिला . पण लढाई इतकी सोपी नव्हती . आरोपींनी सातारा येथे अटक होऊ नये म्हणून अर्ज केला . तो फेटाळला म्हणुन मुंबई हायकोर्टात अपिल केले . मुंबई हायकोर्टाने अपिल फेटाळले म्हणून दिल्लीला सुप्रीम कोर्टात अपिल केले . या सर्व केसेस एकटे जीवाचे रान करून हाताळण्यामध्ये मुख्य योध्दा होते कोरेगावचे विश्वास बर्गे .
           या लढाई दरम्यान सातारचे मनसेचे संदीप मोझर यांनी ही संस्था चालवायला घेतल्याचे कळाले . त्यांनी या संस्थेचे दिव्य दत्त दिगंबर पतसंस्था असे नामकरण केले .मग त्यांच्या भारदस्त " किल्ला " नावाच्या बंगल्यात भेटायला गेलो . तेथे बरीच बाचाबाची ,भांडाभाडी , उलटेपालटे प्रश्न-उत्तरे झाली शेवटी त्यांचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यानां भेटायला शिवाजी पार्क मुंबईला गेलो . तेथे राजगडाचा अजब कारभाराची झलक पाहायला मिळाली . कार्यकर्त्यांनी त्यांना आता भेटता येणार नाही असे चांगल्या मराठी भाषेत सांगितले . एक अर्ज द्यायला सांगितले . त्याचे पुढे काय झाले हा संशोधनाचा विषय आहे . त्यांच्या ऑफीसमध्ये हसणाऱ्या राज साहेबांचे एक सुंदर पेन्सिल स्केच चित्रकार वासुदेव कामत सरांनी केले आहे . ते माझे अर्थभान पाहून मला हसत आहेत असा मला भास झाला . तेथून आल्यावर आणखी फोनाफोनी टोलवाटोलवी झाली . राजसाहेबांची भेट तर झाली नाही पण मुंबईचा प्रवास व जाणेयेणे भारी पडले. मग तेथूनच मोझरानां फोन केला व काही दिवसानंतर त्यांनी पन्नास हजार रुपयांचा चेक दिला . थोड्याच दिवसात त्यांनी माघार घेऊन पतसंस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला .
          सुप्रीम कोर्टाने आरोपींना अटक करून सर्वांचे पैसे परत द्यावेत असा आदेश दिला परंतू चतूर पोलीस सांगत होते आरोपी सापडत नाहीत . कोरेगावात बिनधास्तपणे फिरणाऱ्या या मंडळीना सगळेजण बघत होते पण फक्त पोलीसानां ते दिसत नव्हते .
        मी कोरेगावला ,सातारला एसपी ऑफीस व वाईत सर्व ठिकाणी अर्ज केले होते त्याची परिणीती म्हणजे एक दिवस मला वाई पो .स्टेशन येथून फोन आला म्हणाले मी यादव पोलीस बोलतोय , तुमचे मुख्य आरोपी राजेन्द्र हिरालाल गांधी येथे आले आहेत . तेथे गेलो तर गांधीसाहेब निवांत गप्पा मारत बसले होते . यादवांना मी म्हणालो यानां ताबडतोब अटक करा हे फरारी आहेत .तर ते हसत म्हणाले मी त्यांच्याकडून जबाब लिहून घेतला आहे .तुमचे सगळेच साडेतीन लाख रुपये  ते द्यायला तयार आहेत तुम्ही काळजी करू नका . मग वाईचे पो. प्रमुख आनंद खोबरे यांना भेटलो त्यानां मुंबई हायकोर्टाची प्रत दिली व अटक करा असे सांगितले तर ते म्हणाले त्यांना अटक करता येणार नाही कारण तुमचे पैसे ते देत आहेत त्यांनी लेखी जबाबाचे आश्वासन दिले . त्या लेखी आश्वासनाची प्रत घेऊन मी सगळीकडे फिरलो व फिरतच राहीलो . सद रक्षणाय खलनिग्रणाय म्हणजे काय ते कळाले .
              फॉर्चुनर या मोठ्या अलिशान गाडीत फिरणारे राजेन्द्र गांधी एक लबाड , मवाली माणूस आहेत .  त्यांनी वाईच्या मिलिंद खामकरांच्या घरी मला नेले फुकटचे चहापाणी करून मी आता यांनां सर्व रक्कम देणार असल्याचे सांगितले. मिलींद खामकरांनी लगेच  साक्षीदार आहे असा होकार दिला .
          दुसऱ्यादिवशी सकाळी १० वाजताच कोरेगावला गेलो . तेथे ऑफिसमध्ये राजेन्द्र गांधी आलेच नाहीत . शेवटी परत बाचाबाची , भांडणे मग त्यांच्या घरातून पन्नास हजाराचा चेक आला . चार लाखापैकी एक लाख मिळाले . 
           उरलेल्या तीन लाखांसाठी आजपर्यंत वाई पो .स्टेशन ,कोरेगाव पो . स्टेशन , मा . मुख्य अधिक्षक मुख्यालय सातारा , आर्थिक गुन्हे शाखा , ग्रामविकास मंत्री , सहकार मंत्री , खासदार उदयनराजे भोसले , आमदार मकरंद पाटील , पो. उपविभागीय अधिकारी वाई , मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , महसूल मंत्री , कोल्हापूर परिक्षेत्र पो .प्रमुख , सभापती विधानपरिषद , जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग - १ सहकारी संस्था , अशा अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी  व अर्ज करून थकलो . 
            2020 मध्ये माझ्या घराच्या पाण्याच्या टाकीवरून मी पडलो डाव्या पायाचे मुख्य हाड तुटले हॉस्पीटलचा खर्च एक लाख पन्नास हजार रुपये होता . करोनाच्या काळात पुण्यात हॉस्पीटलमध्ये ॲडमिट होतो खर्च दोन लाख होता त्यावेळी राजेन्द्र गांधी यांना अनेक फोन केले , गयावया करून माझ्याच पैशांची मागणी केली तर म्हणाले मी फक्त पाचशे रुपये पाठवतो . तीन लाखाची ठेव व पाचशे रुपये देत असल्याचे दाखवून उपकारकर्त्याची भावना ठेऊन बोलत होते . अशी माणसे वृत्तीने पोहचलेली ,निलाजरी व नालायक असतात . 
           मी पूर्णवेळ चित्रकार आहे .चित्रकारांना एक तर नियमित दरमहिना उत्पन्न नसते . कित्येक महिने चित्र काढायची व नंतर मुंबईला जाऊन चित्रप्रदर्शन करायचे . त्यातून मिळणाऱ्या मिळकतीत पुढचे चारपाच वर्ष बचत करत  जगायचे . अशावेळी तीन लाख ही डोंगराएवढी अमाऊंट असते . अशावेळी ती चित्रे डोळ्यापुढे येतात ज्यातून पैसे निर्माण झाले . सगळी मेहनत वाया गेल्याचे फिलींग जाम त्रासदायक असते . संघर्ष त्रासदायक होतो .
        या सगळ्या संघर्षात कोरेगावात त्याच्यांविरुद्ध एक माणूस खूप जिद्दीने लढत होता आणि तो म्हणजे श्री .विश्वास बर्गे .
       वयाच्या सत्तरीत असणाऱ्या या माणसाला मधुमेह होता . वजन जास्त असल्याने चालता येत नव्हते . वेदना होत होत्या .पायाची , हाताची इतर अनेक दुखणी अंगावर घेऊन ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढले . आरोपीनां रितसर अटक झाली थोड्याच दिवसात न्यायालयात जामीन मिळवून मंडळी परत बिनधास्त झाली . अधूनमधून आम्ही दोघे भेटायचो . आपल्या देशात न्याय कधी मिळणार ? पतसंस्था , स्थानिक सहकारी संस्था , त्यांचे अधिकारी काय करतात ? पतसंस्थावर निर्बंध का नसतात ? मुळात पतसंस्था कशासाठी काढल्या ? त्यानां जबाबदार कोण ? त्याच्यां कारभारावर अंकूश का नाही ? सरकारच्या या अजब कारभाराची नेहमी चर्चा करायचो . आपण हरायचे नाही , शेवटपर्यंत लढत राहायचे , या सर्व प्रतिकूल कठिण परिस्थितीला सामोरे जायचे असे ते सतत म्हणत . सातत्याने कोठेतरी अर्ज करायचे . सगळ्या अधिकाऱ्यानां भेटत राहायचे . त्यांच्या कामकाजात काय प्रगती झाली त्याचे मेसेजेस व फोन करत असायचे .
        वाईच्या लो.टिळक ग्रंथालयात माझे व्हॅली आणि फ्लॉवर्स या शीषर्काखाली सुंदर प्रदर्शन सुरु आहे . त्या प्रदर्शनाच्या तयारीत मी पूर्ण मग्न झालो होतो .
           माझ्या प्रदर्शनाची व आजचे व्याखाते समीर नेसरीकर यांचे 
"आजचे अर्थभान " ह्या व्याखानाची माहिती देण्यासाठी विश्वास बर्गे यांना मी मेसेज पाठवत होतो तर  प्रोफाईलवर त्यांचा फोटो होता व त्याखाली मेसेज होता 

 " भावपूर्ण श्रध्दाजंली "

          आजचे व्याखान कायम लक्षात राहील . तुमच्याकडे कमावलेल्या पैशांचे गुंतवणूकीचे अर्थभान नसेल तर आयुष्यात मनमुराद स्वच्छन्दीपणे जगण्याची गोची होती . आता ज्यावेळी मी घरातील दत्तदिंगबर या पतसंस्थेच्या आर्थिक फसवणूकीची फाईल उघडतो , त्यातील असंख्यं अर्ज पाहतो , त्या मुदत ठेवींच्या मूळ छोट्या आकारातील तीन लाखाच्या तीन कागदी पावत्या पाहतो त्यावेळी मी निराश होतो . मला ती रक्कम मिळविण्यासाठी कोणापुढे दाद मागावी हे कळत नाही .     
        लोकसभेच्या इलेक्शनसाठी मतदान करताना माझे हात थरथरतात . ही काळी शाई लावून आपण जीवनातील आनंदाला डाग लावून घेतल्याचे शिक्कामोर्तब होते . कोणी तरी मेसेज त्या काळात पाठवला होता " डाग अच्छे होते है " .
       या देशात हजारो कोटी रुपयांचा अपहार करून विजय मल्ल्या इंग्लडमध्ये मजेत ,निवांत ,आनंदाने जगत असतो . ललीत मोदी परदेशात चैन करत असतो . कित्येक दिवस झाले या महाभागानां अटक होत नाही . कायद्याचा किस काढला जातो . त्याचीच प्रेरणा हे दत्त दिगंबर पतसंस्थेसारख्या काही सहकारी संस्था घेत असतात . त्यानां अनेक अज्ञात हातांचा आधार असतो त्यामुळे कसलीही भीती वाटत नाही . सर्वसामान्य भाजीवाले , फळविक्रेते , छोट्या पानपट्टीसारख्या दुकानदारांनी रोज साठवलेली छोटी ठेव या पतसंस्थेत जमा केली होती . पण गरीबांचे , कष्टकऱ्यांचे कष्टाने घाम गाळून जमवलेले पैसे हे संचालक गडप करतात . कित्येक कोटी रुपयांनां चुना लावून मजेत जगत असतात . अलिशान फॉर्चुनरमधून फिरत असतात . सक्षम पोलीस यंत्रणा , मोठमोठे राजकीय नेते , सामाजिक पुढारी , समाजसेवक त्यांच्यापुढे नांगी टाकतात ,त्यावेळी आपली भारताची लोकशाही काळ्या रंगाची चादर लपेटून गुपचूप अंधारात बसलेली आहे असे मला वाटते . 
      आता चार जून रोजी निवडणूकीचा निकाल लागेल नवीन खासदार निवडून येतील  दिल्लीला जातील एकमेकांच्या विरोधकांवर टिकास्त्र करून लोकशाहीचा जयजयकार करतील . सामान्य माणसांच्या परिस्थितीत काय फरक पडेल ? कधी कधी वाटते न्याय मिळविण्याच्या प्रोसेस इतक्या कॉम्प्लीकेटेट ( गुंतागुंतीच्या)केलेल्या आहेत की न्याय मिळेपर्यंत माझ्या फोटोलाही " भावपूर्ण श्रध्दांजली " म्हणत हार घालावा लागेल की काय ?असे वाटते .
अशा लढाईत विश्वास बर्गे सारखा एक खरा सच्चा योध्दा धारातिर्थी पडला हे पाहून आठवणीने डोळे पाणावले . बचेंगे तो और भी लढेंगे असे म्हणणारे बर्गे सर लढा देत  कायमचे गेले .आता त्यांची एकटी अशिक्षित पत्नी हा लढा कसा पुढे चालू ठेवणार ? तिच्या जगण्याचे भवितव्य काय ? कोण तिला सावरणार ? एकंदर पुढे सगळं अवघड आहे . तिच्यापुढे अंधारयात्रेचा मोठा प्रवास आहे . हा अवघड प्रवास सर्वानां कळावा , त्यांनी यातून काही बोध घ्यावा म्हणून हा लेखनप्रपंच 🙏🙏

आता पैसे बुडविणारे राजेन्द्र गांधी व संचालक मंडळ फटाके फोडून मोठ्याने डिजे वाजवत असतील कारण आता केसेस लढणारा व बाजीप्रभू सारखा लढणारा लढवय्या बर्गे सर गेले . आता त्यांची मजाच मजा . आपल्याला कोणी वाली नाही हेच खरे . 🙏🙏

जय महाराष्ट्र ,🙏 जय भारत , 🙏
जय लोकशाही 🙏व जय आर्थिक अर्थभान !
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
सुनील काळे✍️
9423966486

शनिवार, १४ डिसेंबर, २०२४

दूरदेशीची मैत्री = पार्ट 2

 दूरदेशीची मैत्री - पार्ट 2
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
          24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यानां रिटायर्डमेंट घ्यावीच लागते आपणही घ्यावी . त्यादिवशी मी माझी डायरी घेऊन पाचगणीला गेलो रिटायर्डमेंटनंतर काय काय करता येईल हे ठरवायला . आता मस्त आराम करायचा . भरपूर तकतक केली आता निवांत जगायचे सगळी कमर्शियल कामे बंद करायची आपल्या स्वतःसाठी जगायचे असे ठरवून लिहायला सुरुवात केली तर आमचा कल्याणचा मित्र नंदीश सोनगिरे व त्याची डॉक्टर बायको एक छान केक घेऊन वाढदिवशी हजर झाले . त्याच दिवशी पंढरपूरचे अंतर्नाद डिजिटल मासिकाचे संपादक डॉ.अनिल जोशी व त्यांची मिसेस शुंभागी जोशी त्यांचा बदलापूरचा मित्र मोठा पुष्पगुच्छ व काही भेटवस्तू व स्वतः बनवलेले काही खाण्याचे पदार्थ घेऊन पाचगणीला आले . एकंदर तो दिवस लक्षात राहण्यासारखा होता . आम्ही सर्वांनी माझ्या आवडत्या पांगारी गावची व्हॅली आणि पुस्तकाच्या गावाला भेट दिली . आपल्या आवडत्या मित्रांसोबत भेट होणे व भरपूर गप्पा मारणे ही अनोखी मेजवानी असते . आपले काही मित्र व नातेवाईकदेखील आपल्याला पूर्णपणे विसरतात .काहीतरी खुस्पट फालतू विचार डोक्यात ठेऊन आपल्याशी वैर घेतात , टाळतात , भांडतात व टिका करत राहतात अशा सर्व त्रासदायक नातेसंबंधानां मी मित्रानां मनातूनच हद्दपार केले आहे . कायमचा नारळ दिला आहे कारण मी आनंदाने जगण्याचे ठरविले आहे व आता खरोखर मजेत जगतो .
            अर्थात मित्र भरपूर असले तरी सगळेच मित्र हे मैत्र प्रामाणिक टिकवतात असे नसते . मित्रांचेही अनेक प्रकार असतात व गरजेप्रमाणे त्यांचे मित्रत्व अधूनमधून जागृत होते याचा मलाही चांगला अनुभव येत असतो . पण सगळे एकसारखे व चांगलेच मित्र भेटावेत अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरते . व्यक्ती तितक्या प्रकृति याची जाणीव ठेवावी लागते . मित्र जसे असतात तसे स्विकारत गेले की मग त्रास होत नाही . हे जीवन नानाविध स्वभावाच्या मित्रांनी भरलेले आहे व त्यात खूप व्हरायटी आहे म्हणून मलाही ते फार मजेशीर व रोमांचक वाटते .
              मी पुण्यात अभिनव कला महाविद्यालयात 85 ते 90 च्या काळात चार वर्ष शिकायला होतो . त्यावेळी एक वर्ष विद्यार्थी सहाय्यक समिती नावाच्या वसतिगृहात राहत होतो . त्यावेळी  कला महाविद्यालयात जाताना चालत जायचो त्यावेळी काही मित्र सायकलवर जायचे . मला डबलसीट घ्यावे लागेल म्हणून दुसरीकडे बघत वेगाने शेजारून निघून जायचे . आज त्याच रस्त्यावरून चारचाकी गाडीने जाताना त्यांच्या कधीतरी आठवणी येतात . आताही त्यातील काही मित्र  लक्षात आहेत ,पण आपण त्यांच्या वाईट गोष्टी डोक्यात ठेवत बसलो की त्रास होतो त्यामुळे विसरून नव्याने प्रवास करत राहायचे . त्या वसतिगृहात माझ्याच कॉलेजला शिकणारा एक मित्र होता . तो अनेक गोष्टीत आमच्यापेक्षा पुढे असायचा आजही तो पुढेच आहे . त्याची एक मैत्रिण होती . त्याने हॉस्टेलवर एक ' बिन माणसाचा हात ' नावाचे नाटक बसवले होते त्या नाटकात एक पात्र होते सातारा  जिल्ह्यातील एक गावरान ऊसाचा रस विकणारा गुऱ्हाळ चालवणारा माणूस . आणि ह्या पात्रात मी अप्रतिम अभिनय केला म्हणून बेस्ट ॲक्टरचे प्राईजही मिळाले होते . त्यामुळे तो मित्र कायम लक्षात राहीला होता .
             दोन एक वर्षापूर्वी एकदा कॉलेजच्या जवळ आर्ट मटेरियल घ्यायला गेलो होतो त्यावेळी दुपारी जानकी नावाच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो . त्यावेळी तीस वर्षांनंतर अचानक हा आमचा फेसबुकवर सुप्रसिद्ध असणारा मित्र प्रवेश करताना समोरच्याच टेबलावर बसलेला दिसला . आमचा मित्रत्वाचा सातारी बाणा लगेच जागृत झाला . त्याच्याशी हात मिळवला व एकत्र बसुन भरपूर गप्पा माराव्या म्हणून शेजारी बसायला गेलो तर या मित्राने हातात त्याचे व्हिजिटींग कार्ड दिले व याठिकाणी मी एका बिझनेस मिटींगमध्ये आहे त्यामुळे अपॉईमेंट घेऊन ऑफीसमध्ये यावे अशी प्रेमळ विनंती केली . मी त्याला लगेच मनापासून सॉरी म्हणालो . नंतर दूर त्याला त्रास होणार नाही अशा कोपऱ्यात जाऊन बसलो . थोडा स्वतःचाच रागही आला . कारण मी आपल्या मित्रत्वाच्या धुंदीत असतो पण समोरचा त्याच मित्रत्वाच्या धुंदीत असेल असे नसते , तो खूप वेगळ्या विचारांमध्ये वेगळ्या विश्वात जगत असू शकतो याची जाणीव ठेवली पाहीजे हे मी नव्याने शिकलो .त्यामुळे मैत्र जपताना मी आता फार काळजी घेतो . त्या मित्राच्या ऑफीसमध्ये परत जाण्याची माझी इच्छा त्याचदिवशी संपली त्या कार्डावरचा पत्ताही मी पाहीला नाही व आता त्या मित्राची तसे वागणूक दिल्याबद्दल तक्रारही नाही . आपण आर्थिक अडचणीत किंवा वाईट अवस्थेत किंवा अप्रसिद्ध असताना जर मित्र टाळत असतील तर ते तुमचे कधीच मित्र नव्हते व यापुढेही असणार नाहीत .

पण काहीजण सर्व परिस्थितीत आपल्याला जपणारी असतात . अशी माणसे खास व्यक्तिमत्वाची असतात .वेगळीच असतात . ती तुमच्या सर्व परिस्थितीत सतत सोबत असतात . सारखीच प्रेमाने वागत असतात अशा मित्रानां मी नेहमीच सॅल्यूट करतो .

               इल्झे विगॅन्ड ही आमची जर्मनीची मैत्रीण मात्र आगळीवेगळीच आहे . ती आता 95 वर्षाची आहे . गेली अठ्ठावीस वर्ष ती संपर्कात आहे . तिने व मी आमचे मैत्रभाव छानपणे जपले आहे . करोनानंतर गेली चारपाच वर्ष ती भारतात आली नव्हती . तीची फार जबरदस्त इच्छा होती की आम्ही एकदा तरी जर्मनीला भेट द्यावी . त्यासाठी श्रीमंत होण्याचा आम्हीही खूप प्रयत्न केला . दोन प्रदर्शने नेहरु सेंटर आर्ट गॅलरीत केली . व्हिसा मिळविण्यासाठी सीए कडे गेलो, इन्कमटॅक्स फाईल बनवली , पासपोर्ट काढला , उत्पन्नाचे दाखले मिळवले ,
 ट्रॅव्हलएजंटकडे संपर्क केले पण विमान प्रवासाच्या यंत्रणा फारच कडक आहेत . सतत नव्या गोष्टी मागत असत . मग मेडीकल इन्शुरन्स मागितला . फिटनेस सर्टीफिकेट , उत्पन्नाचे मार्ग विचारले . तेथे किती दिवस राहणार आहे ? कोणाकडे राहणार ? त्यांचे सर्टिफाईड  पत्र आहे का ? रिटर्न तिकीट काढले का ? ज्या कोणाकडे राहणार त्यांचे इन्कमप्रुफ ? तेथे फिरण्याचे पैसे आहेत का ? किती आहेत ? माझ्यासारख्या फ्रिलान्स चित्रकार लोकांना उत्पन्नाचे फिक्स सोर्स कोठून असणार ? मग मी कंटाळलो . नाद सोडून दिला . गडया आपला गाव बरा असे ठरवून जर्मनीचे स्वप्न पहाणे बंद केले . काही स्वप्ने परवडणारी नसतात हे लवकर लक्षात आले  व इल्झेला कळवले आम्हाला जर्मनीला येणे शक्य नाही व विषय संपवला .
              मग इल्सेचा मेसेज आला जर तुम्ही मला भेटायला येत नाही तर मग मी येते . वय वर्ष पंच्च्यान्नव , हातात आता काठी आली आहे . शरीर थकले आहे , एका गुढग्याचे ऑपरेशन झाले आहे . पण उत्साह मात्र तोच आहे . जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा निरागस दृष्टीकोन लहान मुलासारखा ओसांडून वहात आहे . मैत्रीची ओढ तशीच आहे . मी तिला सांगितले आता शरीर थकले आहे एकटे येण्याची रिस्क घेऊ नको सोबत कोणीही नसल्याने कधीही काहीही होऊ शकते . पण इल्झे ऐकणारी थोडी आहे ? तीचे मैत्र आणि तिचे जगणेही आहेच वेगळे.
           एक दिवस कॉल आला . मी महाबळेश्वरला आली आहे . हॉटेल बुकींग करून अर्धा महाबळेश्वर फिरून झाले आहे . तुझ्याकडे उदया सोमवारी येणार आहे . मी एसटी ने प्रवास करते तुझा पत्ता सांग मग भेटायला येते .कधी येऊ ?
           अशा हट्टी मैत्रिणीपुढे काहीच बोलता येत नाही . मग वाई बस स्टॉपवर इल्झे आली . तिने एसटी स्टॅन्डवरच जादूची झप्पी दिली . सगळे प्रवासी बघतच राहीले . मग गेली तीन चार दिवस मेणवली, वाईचा परिसर फिरत राहीलो . प्रत्येक माणसाशी प्रेमाने बोलणे , वॉचमन , कातकरी मुले , श्रीमंत , गरीब , जातीभेद न करता सर्वांच्यासोबत फोटो काढणे , घाटावर छोटे स्केच करणे , आवडीचे पदार्थ खात रहाणे , गाणी ऐकणे , आणि तरुणाईला लाजवेल त्या उत्साहाने जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेणे हे पाहीले की खरोखर हे जीवन सुंदर आहे हे पटते .
       मी तर अठ्ठावनव्या वर्षी रिटायर्डमेंट घेतली पण इल्झे मात्र पंच्च्यानवव्या वर्षीही तितकीच ॲक्टीव्ह आहे . 
       जीवनातला हा उत्साह कसा टिकवायचा असे विचारले तर म्हणते तुम्ही भारतीय पुढील भविष्याचा विचार करत बसता मी मात्र फक्त आज आणि आता एवढया दोनच गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत . येणारा प्रत्येक क्षण मस्त मजेत जगायचा . पुढे जे काही होईल ते होईल . मृत्यू म्हणजे पण एक अनोळखी मित्रच असणार आहे त्याला काय घाबरायचे ?  त्याच्याशीही मैत्री करायची . मस्त जगायचे व मस्तीतच एक दिवस मरायचे .

सुनील काळे✍️
9423966486

दूरदेशीची मैत्री -पार्ट 1
https://www.facebook.com/share/p/u2XDxctcaz7DjFFR/

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड

 दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

       आपल्यापैकी प्रत्येकाच्या रोजच्या जगण्यात  वेगवेगळ्या वयाची ,वेगवेगळ्या स्वभावाची ,अठरापगड जातीधर्माची , अतिशय वेगवेगळ्या विचारांचा पगडा असलेली , धार्मिक , राजकीय एकमत नसलेली  तर अगदी विरुद्ध विचारधारा व विरुद्ध टोकाची विचारसरणी असलेली अनेक माणसे जीवनप्रवासात भेटत असतात . काहीजण भेटल्यानंतर लगेच विस्मृतीत जातात,काही थोडेच दिवस लक्षात राहतात व नंतर विसरली जातात तर काही कायमची लक्षात राहतात . कधीकधी तर ही कायम लक्षात राहिलेली माणसे आपल्या जीवन प्रवासाचा एक अविभाज्य भागच झालेली असतात . त्यांचे हे अचानक निर्माण झालेले अनोखे मैत्रीचे नाते मनात कायम टिकून राहते .

            आज मी अशाच एका दूरदेशीच्या मैत्रीची गोष्ट सांगणार आहे. जी माझ्या जातीची नाही , धर्माची नाही , माझ्या वर्णाची नाही , जी माझ्या देशाची नाही , इतकेच काय ती मला समवयस्कर देखील नाही . आमचे राहणीमान , आर्थिक परिस्थिती , भौगोलिक वातावरण , आवडीनिवडी वेगवेगळ्याच आहेत .तरी देखील आम्ही कितीतरी वर्षे एकमेकांचे अगदी पक्के घनिष्ट मित्र आहोत आणि ह्या मैत्रीच्या मनाचे गुंफलेले धागे दिवसेंदिवस अजूनच घट्ट बनत चालले आहेत.

           1996 साली माझे एक चित्रप्रदर्शन पाचगणीत सुरु होते . त्या ओपन प्लाझाटाईप आर्टगॅलरीमध्ये अनेक पर्यटक येत होते . प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत होता.  एके दिवशी अशाच या प्रदर्शनाच्या धामधूमीत माझे चित्रप्रदर्शन पाहुन झाल्यावर पंच्चाहत्तरीच्या वयाची , पांढरेशुभ्र केस , युरोपीयन गोऱ्या वर्णाची , चेहर्‍यावर सुरकुत्या पण तजेलदार चेहरा असलेली , काळा गॉगल व लालभडक शर्ट व पांढरी पॅन्ट परिधान केलेली , पाठीमागे छोटी हॅवरसॅक लटकवलेली एक म्हातारी आज्जीबाई अगदी अचानकपणे माझ्यासमोर चालत आली व काही कळायच्या आतच तिने गळ्याभोवती प्रेमाने हात टाकत मनसोक्त गळाभेट घेतली . या अचानक झालेल्या जादूच्या झप्पीमुळे मी क्षणभर गांगरलो , बावरुन गेलो आणि थोडा आश्चर्यचकीतही झालो .

युवर पेंटीग्ज आर वंडरफूल ! 

युअर डिस्पले ॲन्ड स्टाईल इज अलसो व्हेरी व्हेरी इंटरेस्टींग .

कॅन वुई टेक कप ऑफ कॉफी टुगेदर ? तिने तिच्या मनातील भावना व ओळख थोडक्यात  शेकहँड करत अशा प्रेमळ पद्धतीने व्यक्त केल्यामूळे मी नकार देऊ शकलो नाही . मी , स्वाती , तिचा मित्र व ती असे चौघे कॉफी घेत हॉटेलमध्ये बसलो .

माय नेम इज इल्झे , 

आय एल एस ई .

व्हेरी सिंपल नेम .शेकहँन्ड करत तीने स्वतःची ओळख करून दिली . 

आय एम फ्रॉम जर्मनी , माय सिटी नेम इज बॉन . बी ओ एन एन . 

आय एम रिटायर्ड आर्ट टिचर ,बट नाऊ  टोटली फ्रि . 

आय लाईक एन्जॉईंग माय रिटायर्ड लाईफ स्केचिंग इंडिया . इंडिया अँन्ड इंडियन पीपल आर व्हेरी व्हेरी इंटरेस्टींग . आय लाईक युवर्स पेन्टींग अँन्ड स्केचेस .

           माझी चित्रे तिला आवडली होती , त्याविषयी ती भरभरून बोलत होती . तिला कौतुक करताना किती बोलावे याचे जणू भानच राहीले नव्हते . मग तिच्या लक्षात आले व तिच्यासोबत आलेल्या लालबुंद चेहरा असलेल्या , हाफ शर्टावर फोटोग्राफरचे जॅकेट परिधान केलेल्या वयोवृद्ध मित्राची ओळख करून दिली . त्याचे नाव ग्वीन्टर जॉन . त्या भेटीमध्ये तीने माझा पत्ता घेतला आणि दुसऱ्या दिवशी ती ग्वीन्टर सोबत माझ्या पाचगणीच्या त्या छोट्या घरात आली . तिचं जर्मनमिश्रित इंग्रजी आणि माझे मराठी गावरान इंग्रजी एकमेकाला मात्र थोडे थोड़े समजत होते .

            इल्झे आणि तिचा मित्र ग्वीन्टर दोघेही जर्मनीत बॉन नावाच्या शहरात राहत होते . तिथे तिचे 125 वर्ष जुने अनेक खोल्यांचे घर आहे . आणि तेथे ती एकटीच राहत असते . जर्मनीत डिसेंबरच्या सहा महिन्याच्या काळात अतिशय थंडी व बर्फ कोसळत असल्याने मायनस दहा डिग्रीच्या कडाक्याच्या थंडीमुळे घरात इलेक्ट्रीक हिटर बसवावा लागतो . त्या हिटरचे इलेक्ट्रीकचे इतके बिल येते की त्या बिलाच्या रकमेमध्ये सहा महिने भारतात राहायला परवडते . त्यामूळे अनेक वर्षांपासुन ते भारतात स्केचिंग करत भटकत असतात.

           ग्वीन्टर 85 वर्षांचा असुन तो पूर्वी जर्मन राजदूतांच्या सरकारी कार्यालयात नोकरी करायचा . जर्मनीत ते वेगवेगळ्या घरांमध्ये राहतात , पण दोघांना चित्रांची व स्केचिंगची आवड असल्याने ते भारतात एकत्र फिरतात .

या वयात असे मैत्रीपूर्ण संबध ठेवून एकत्र राहत , एकत्र भटकंती करत असताना तुमच्या दोघांचे कुटुंबिय काही तक्रार करतात का? मी आपला भारतीय , मराठमोळा प्रश्न विचारल्यानंतर इल्झे मनसोक्तपणे हसली .मग तिने तिच्या कुटूंबाविषयी माहिती दिली . इल्सेला दोन मुली व एक मुलगा सगळे वयाच्या पन्नासच्या पुढे . इल्सेचा नवरा कॅसिनो व गॅम्बलींगमध्ये बरबाद झाला. घटस्फोटानंतर इल्सेने सर्व जबाबदारी स्विकारली आर्ट टिचरची नोकरी केली आणि आपल्या सर्व मुलानां उत्तम शिक्षण दिले . जावई , सुना , नातवंडे सगळा भरपूर मोठा परिवार आहे. प्रत्येकजण सेटल आहे. प्रत्येकाची मोठी घरे आहेत व सर्वजण वेगवेगळे राहतात. त्यांच्या संसारात मग्न आहेत . पण आपण कोणालाही ओझे वाटता कामा नये यासाठी ती वेगळे राहणे पसंद करते . तिला चित्रे काढायला , स्केचिंग करायला भटकायला आवडते . योगायोगाने ग्वींटर तिच्याच शहरात राहणारा तोही समवयस्कर . त्याची पत्नी अजारपणात गेली . मुले सेटल आहेत .पण दोघांनीही नात्याच्या गुंत्यात स्वतःला गुरफटून घेतले नाही . मग या दोघांची निरागस मैत्री सुरु झाली व स्वच्छन्दी भटकंती देखील .

               वयाच्या साठीनंतर तिला स्केचिंग , चित्रकला करत मनसोक्त भटकायचे होते त्याप्रमाणे कधी एकटी किंवा एकत्रपणे ती भारतात प्रत्येकवर्षी सहा महिने भटकत असते . वाराणसी , इंदोर , औरंगाबाद , राजस्थानमधील जोधपूर ,उदयपूर , जैसलमेर , मद्रास , पचमढी , भोपाळ , मांडू , अजिंठा , वेरुळ ' पाँडेचरी , हम्पी , कर्नाटक , गोवा , सातारा , वाई, पाचगणी , महाबळेश्वर , म्यानमार , बाली , जावा , जकार्ता , मलेशिया , थायलंड , इंडोनिशिया बँकॉक अशा सर्व ठिकाणी तिची मुशाफिरी सुरु असते . गेली पंचवीस वर्षे तिचा हा मुक्तप्रवास मजेशीरपणे चालू आहे.

             दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ती पाचगणीला येते . ती भारतात आली की तिचा अचानक फोन येतो . प्रत्येक वेळी आठवणीने ती अपॉईंटमेंट घेतल्याप्रमाणे टायमिंग विचारते आणि ते कधीही आजपर्यंत चुकलेले नाही . तिला लाल एस.टी बसने प्रवास करायला आवडतो . त्याचे कारण म्हणजे एसटी स्वस्त आहेच पण त्यात बसणारी साधी माणसे प्रेमळ असतात व सुरक्षितपणे प्रवास करता येतो असे तिचे व्यक्तिगत मत आहे . आपली छोटी सॅक पाठीवर घेऊन ती सगळा भारत चित्रित करत बसमधूनच फिरत असते .

             एकदा तिने मला स्केचिंग करण्यासाठी माझ्या आवडत्या स्पॉटवर सोबत येण्याची विनंती केली. मग तिला इम्प्रेस करण्यासाठी मी माझे चित्रकलेचे सामान , ईझल (चित्रकलेचे स्टॅन्ड ), भरपूर पेन , ब्रशेस , वॉटरकलर्स ,पेन्सीली , बसायची खुर्ची , उन्हाची आऊटडोअरची मोठी छत्री , त्याचे लोखंडी स्टॅन्ड , व इतर अनेक सटरफटर वस्तू घेऊन पांगारी गावच्या व्हॅलीचे चित्र काढायला माझ्या मारुती व्हॅन गाडीतून निघालो . आमच्या दोघांनाही एकमेकानां स्पॉटवर चित्रे काढताना पाहण्याची इच्छा व उत्सुकता होती .

              पंजाबी ड्रेसमध्ये बसलेल्या इल्झेने मस्तपैकी जमीनीवरच बैठक मांडली . तिच्या जवळचे पाच बाय सात इंच आकाराचे छोटे स्केचबुक उघडले . त्यात एक बॉर्डर मार्किंग करायची चौकट होती . ती चौकट पेन्सिलीने आऊटलाईन करून तिची अतिशय छोट्या आकाराची जलरंगाच्या वड्या असलेली पेटी उघडली . तिच्याकडे एकच ब्रश होता तो दोन भागात विखुरलेला आट्या असलेला ब्रश तिने जोडला . युरीन टेस्ट करताना वापरतात तशी पाण्याची छोटी बाटली उघडली . अतिशय तत्परतेने तीने चित्र काढावयास सुरुवात केली . थोडे अमूर्त , थोडे मूर्त , इंप्रशेनिस्ट पद्धतीचे चित्र 15 मिनिटात संपले देखील . मग पाठीमागच्या बाजूला तिने मला स्पॉटविषयी माहिती विचारली . त्या दृश्याचे नाव ,गाव , वेळ लिहली मग माझ्याकडे हसत पहात म्हणाली माय वर्क इज फिनिश्ड . नाऊ यु स्टार्ट युवर वर्क .

             मी मात्र माझे सामान लावण्यातच अर्धा तास घालवला आणि मग दोन तीन तास माझे डिटेल स्केचिंग काम सुरु झाले . तोपर्यंत इल्झे सगळीकडे मनसोक्तपणे भटकून आली . तिचा स्केचिंगचा विचार , चित्राकडे , दृश्याकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी होती . तिच्या चित्रानां कोणतीही अशी स्टाईल नव्हती . तिचे स्केचबुक म्हणजे एक छान प्रवासवर्णन होते . प्रत्येक चित्रामागे सारांशरुपाने लिहलेली माहिती ,वेळ ,दिनांक व्यवस्थितपणे लिहलेले होते . त्या प्रत्येक स्केचमध्ये मला कधी व्हॅनगॉग , पॉल क्ली, पिकासो , मोनेट , कधी कोलते , अवचट , चंद्रमोहन अशी वेगवेगळी चित्रकारांच्या पद्धतीने रेखाटलेली चित्रे दिसायची . कोणतेही एक चित्र दुसऱ्यासारखे नाही . मी तिला याविषयी विचारले तर म्हणाली चित्र काढताना मला त्यादिवशी ,त्यावेळेला ,त्याक्षणाला जे जाणवले ,भावले ते मी रेखाटले . 

नो डिस्कशन . 

विषय संपला .

              मी मात्र माझी पारंपारीक पठडी , डिटेल्स स्केच करायची सवय सोडलेली नसायची पण त्यावर तिने कधीही टिकाटिप्पणी केली नाही किंवा मला ती स्टाईल सोडण्यासाठी । सांगितले नाही उलट ती कौतुकाने म्हणायची एक्सलंट जॉब , एक्सलंट पेशन्स . इल्झेने  चित्रकलेतील कोणत्याही ईझम्सचा निषेध केला नव्हता . तिला सगळे ईझम्स सारखेच प्रिय होते , सगळ्यानांच तिने स्विकारले होते . आनंदाने ..........

            पुढे प्रत्येकवर्षांच्या भेटीमध्ये ती आणि मी वाईच्या गणपती घाटावर , मधल्या आळीतील घाट , मेणवलीचा फडणीसवाडा , पाचगणी व महाबळेश्वरच्या परिसरातील  शेरबाग , आर्थरसीट , राजभवन , लॉडवीक पॉईंटला भटकत स्केचिंग करायचो खूप फिरायचो . तिला कोणत्याही विषयाचे वावडे नसायचे . डोंगर , दरी , रस्ता , झाडे , इमारत , बंगले काहीही विषय असो ती सगळे अगदी प्रेमाने चित्रित करायची . तिच्या स्वतःच्या स्टाईलने . तिचा ऐशींव्या वर्षाचा सातत्याने स्केचिंग करण्याचा उत्साह पाहून मी चकीत व्हायचो . बिनधास्तपणे अनोळखी गावांमध्ये फिरण्याची सवय , परका देश , परकी माणसे याविषयी तिची कसलीही तक्रार नसायची . तिची चित्रांची छोटी सॅक पाठीवर घेऊन कोणी सोबत असो वा नसो ती आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगते .

           मग मला माझी आपल्याकडची काही म्हातारी माणसे आठवतात . सांधेदुखी , गुडघेदुखी , हातपाय सुजलेले दाखवत राहतात . अनेक आजारांनी मानसिक व शारिरीक दृष्टीने खंगलेली एकाच जागेवर पडून राहीलेली असतात . प्रवासाचे नाव जरी काढले तरी अनेक अडचणी सांगत टाळाटाळ करत राहतात . काहीजण जुन्या घडलेल्या वाईट गोष्टींवर राजकारण , सरकार , व नातेवाईकांविषयी सतत टिकात्मक बोलून टिव्ही पहात स्वतः व इतरानाही अस्वस्थ करणारी मंडळी आठवत राहतात . अर्थात काही अपवाद असतात , सगळीच वयस्कर माणसं त्रासदायक नसतात .

              इल्झेचे व्यक्तिमत्व मात्र या सर्वांपेक्षा वेगळेच आहे . स्वतः नकाशा घ्यायचा , त्या गावाची शहराची माहीती काढायची , तिथल्या कोणत्या स्पॉटवर चित्रे काढता येतील याचा अभ्यास करायचा . हॉटेल बुक करायचे ,एसटीचे वेळापत्रक घ्यायचे . कोणतीही एसटी वेळेवर आली नाही म्हणून ती कधीही वैतागलेली दिसली नाही .एसटी मध्ये फाटलेल्या सीटाबद्दल , असुविधांबद्दल तिची कोणतीही तक्रार नाही. जे नानाविध प्रकारचे चांगले वाईट जेवण मिळेल ते आनंदाने खायचे , कोणत्याही अनोळख्या स्त्रीया , माणसांबरोबर मैत्री करायची त्यांच्या मुलानां खाऊ द्यायचा . त्यांच्याबरोबर मोबाईलने असंख्य फोटो काढायचे . बुरखा घातलेली एखादी मुस्लिम स्त्री दिसली की तीचा बुरखा उघडायचा व त्या बाईबरोबर हातात हात घालून एक हसतमुख फोटो काढण्यासाठी  त्याच बाईच्या सोबत असलेला तिच्याच नवर्‍याला सांगायचे ही तिची हॉबी ती पुरेपूर एन्जॉय करते . आपल्या या सहा महीन्यांच्या प्रवासात भरपूर स्केचबुके घेऊन ती समाधानाने जर्मनीला जाते . तेथे गेल्यावर सर्व ओळखीच्यानां आवर्जून पत्रे लिहते . स्वतः ई मेल करते व तिच्या अनुभवाबद्दल केलल्या मदतीबद्दल भरभरून लिहते . 

            गेली पंचवीस वर्ष मी आणि स्वाती करत असलेल्या आर्ट गॅलरीच्या संघर्षाची ती साक्षीदार आहे . येताना ती मुद्दाम जर्मनीची ब्रशपेन्स तर कधी छोटी स्केचबुके आणते त्याबदल्यात मी तिला कधी खास मदत करावी अशी तिची कधीही अपेक्षा नसते .आम्ही राहत होतो त्या सर्व चित्रविचित्र परिस्थितीचा तिने कधी तिरस्कार केला नाही . माझ्या अपयशावर टिकास्त्र सोडले नाही . उपदेशाचे डोस पाजले नाहीत .यावर्षी करोनाच्या महामारीमुळे डिसेंबर महिन्यामध्ये इल्झे भारतात आली नाही . यावर्षी मायनस वीस डिग्री सेल्सियस तापमानात बर्फामूळे पसरलेला ग्रे रंगाचा उदासिनपणा तिला भारताची आठवण करून देतो. युवर कंट्री इज कलरफूल , यु ऑल इंडियन्स आर वंडरफूल पीपल  असे सांगत इल्झे आता वॉटसअपवर कधी स्काईपवर व्हिडीओ कॉल करत खूप बोलत असते . तिने केलेली नवीन चित्रे दाखवत राहते .तिने माझी सगळी घरे पाहिलीत आता माझे नवीन घर पाहण्याची व परत त्या परिसरातील स्केचिंग करण्याची तीची ओढ आजही नव्वदाव्या वर्षी कायम आहे. 

ती फक्त करोना संपण्याची वाट पाहतेय ..........

            एकदा भारतातील प्रवास संपवून ती परत जर्मनीला जाण्यासाठी निघाली होती . कारण ग्वीन्टर ख्रिस्तवासी झाल्यामूळे ती आता एकटीच प्रवास करत होती . मी आणि स्वाती तिला शेवटचे भेटण्यासाठी महाबळेश्वरला हॉटेलवर गेलो होतो . तिच्या हातामध्ये छोटी चाके असलेली सुटकेस व पाठीमागे तिची फेव्हरेट छोटी चित्रांची सॅक होतीच . बाकी काही सामान नाही . मग मी तिला विचारले , असे परक्या देशात भटक्या विमुक्त जमातीसारखे फिरताना तुला भिती नाही का वाटत ?

त्यावेळी तिने दिलेले उत्तर आजही माझ्या कायम लक्षात आहे .

मित्रा , प्रवास खूप लांबचा आहे , 

मजेशीर आहे, 

आनंदाचा आहे , 

पण आपल्या प्रत्येकाचा प्रवास अचानकपणे कधीही संपू शकतो याची सतत जाणीव ठेवली पाहीजे . 

आपल्या या जीवनाच्या प्रवासात अनेक अडचणी येणार आहेत , अनेक कडू गोड अनुभव पाठीशी मिळणार आहेत. पण प्रवासात खूप मोठ्या अपेक्षा बाळगून, खूप नात्यांची गुंतागुंत वाढवण्यापेक्षा कमीत कमी सामान घेऊन मनाची आणि शरीरावरचीही जड ओझी टाळली पाहीजेत .


" शेवटच्या प्रवासात सामान खूप  कमी असले पाहीजे ". 


शेवटी आपले दोन्ही हात व मनही पक्षांप्रमाणे मोकळे असायला हवे मग झटपट कोठेही जाण्यासाठी आपण सदैव तयार असू .

जीवन प्रवासासाठी कसलीही जटील बंधने असू नयेत . 


" शेवटच्या प्रवासात सामान खूप कमी असले पाहीजे ". 


माझ्या वाई -पाचगणीच्या साध्या दोन दिवसाच्या प्रवासात गाडीतील डिकीत व पाठीमागच्या सीटवरील खच्चून भरलेल्या सामानाकडे सहज नजर टाकली की  मला या 

दुरदेशीच्या मैत्रीणीची आठवण येते व कानात शब्दही ऐकू येतात .


" प्रवासात सामान खूप कमी असले पाहीजे "

"प्रवासात सामान खूप कमी असले पाहीजे " 

🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳


सुनील काळे✍️

9423966486

sunilkaleartist@gmail.com

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०२४

कोल्हापूरचे निसर्गचित्रकार : एस .निंबाळकर

कोल्हापूरचे निसर्गचित्रकार - एस. निंबाळकर
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
           आपण कोणत्या गावात , कोणत्या जिल्हयात , कोणत्या घरात , कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसते . निसर्गाने किंवा सृष्टीकर्त्या विधात्याने तो चॉईस माणसाला दिला नाही . पण समजा तसा चॉईस मला मिळाला असता अशी ज्यावेळी मी मनातल्या मनात कल्पना करतो त्यावेळी एक जिल्हा मला हमखास आवडतो त्या जिल्ह्याचे नाव आहे कोल्हापूर . कोल्हापूर खरं सांगायचे तर सर्वार्थाने कलापूर आहे . अशा या कलापूरात अपघाताने अचानकपणे मी कलाशिक्षण घेण्यासाठी सन 1985 मध्ये एक वर्ष राहीलो . ते एक वर्ष माझ्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करणारे , जाणीवा विकसित करणारे , जीवनाची जडणघडण करणारे व माणूस म्हणून जगताना माणुसकी शिकवणारे ठरले . म्हणून आजही कोल्हापूरला जायचे काही कारण निघाले की मी लगेच एका पायावर तयार असतो .
            मी 1984 साली बारावी सायन्स शिकलो होतो पण यापुढे आपल्याला चित्रकार म्हणून जगायचे असे माझ्या मनाने फार गंभीरपणे ठरवले . त्यावर्षी तीन ठिकाणी मी प्रवेशअर्ज भरले होते . पुणे ,मुंबई व कोल्हापूराचे कलानिकेतन कॉलेज . इंटरमिजिएट परीक्षेत A ग्रेड व दहावीला फर्स्टक्लास मिळाला होता  त्यामुळे कोणत्याही कलामहाविद्यालयात सहज प्रवेश मिळणार याची खात्री होती . पण चित्रकला क्षेत्रात घुसतानाच दुर्दैवाचे फेरे सुरु झाले . त्यावेळी बाबुराव सडवेलकर जेजे स्कूलचे डीन होते . त्यावर्षी त्यांनी एक नवा फतवा काढला की 12वी पास असणाऱ्या सर्व विद्यार्थीवर्गाला बी.ए , बीएससी , लॉ , किंवा इतर कोणत्याही शाखेत सहज जाता येईल . त्यामुळे यावर्षी प्रथम दहावीच्याच मुलामुलींना प्रवेश मिळणार , त्यापेक्षा जास्त शिकलेल्या इतरानां कोणालाही प्रवेश मिळणार नाही . त्यामुळे माझी चांगलीच गोची झाली . पाचगणीपासून पुणे जवळ होते त्यामुळे पुण्यात मला प्रवेश हवा होता . मुंबई तर खूपच दूर वाटायची त्यावेळी .
             पुण्यात एक महिना धडपडलो व खूप निराश झालो .फौडेंशन हा बेसिक कोर्स असतो नंतर पुन्हा वेगळ्या कॉलेजमध्ये जाता येते हे समजल्यानंतर मी  निदान कोल्हापूरला तरी प्रयत्न करावा असे ठरवले .
             आयुष्यात पहिल्यांदा कोल्हापूरला आलो . बाबूराव  पेंटरांचे चिरंजीव अरविंद मेस्त्री त्यावेळी प्राचार्य होते . त्यांनी निसर्गचित्रांचा गठ्ठा पाहीला आणि म्हणाले शासनाला काय येड लागलयं समजत नाही . ज्याला कलेची आवड आहे त्यानां प्रवेश द्यायचा सोडून फक्त दहावी पास असलेले घ्या हे चुकीचे आहे . मग सरांनी दोन दिवस थांब आपण प्रयत्न करू असे सांगितले . मग आयुष्यात  पहिल्यांदा बाहेर राहण्याचा प्रश्न पडला . आता काय करावे ? या विचारात कोल्हापूर बसस्थानकावर बसून राहीलो . रात्री तेथेच झोपलो . 
             दुसऱ्या दिवशी चालत कळंबा येथे असणाऱ्या कलानिकेतन कॉलेजला पोहचलो तर अरविंद सर नुकतेच ऑफिसला येत होते . त्यांनी ऑफीसात बोलावले . रात्री कुठे राहीलास ? काय खाल्ले ? ओळखीचे कोणी आहे का याची प्रेमाने विचारपूस केली . मी ज्यावेळी स्टेशनवरच झोपलो हे ऐकून ते आश्चर्यचकीत झाले . त्यांनी मला सांगितले जा तुला फौडेंशनच्या वर्गात  प्रवेश मिळाला असे समज . तुझी शिकायची जिद्द , चिकाटी मला आवडली . बघू पुढे काय होते ते , मी सांगतो तसे कर .
            कोल्हापूरच्या कलामहाविद्यालयात मला प्रवेश मिळाला पण जगण्यासाठी अन्न व राहण्यासाठी छप्पर लागते . ते तर माझ्याकडे नव्हते व कोणी ओळखीचेही नव्हते . पण कोल्हापूरची माणसेच भारी . हळूहळू चारपाच कॉटबेसीसवर खोलीत राहणारे काही विद्यार्थी होते त्यांनी मला त्यांच्यात सामावून घेतले . मी साईनबोर्ड करायचो व निसर्गचित्रकार म्हणून मला कलाक्षेत्रात काम करायचे होते . स्वतःच्या पायावर उभे राहून पैसे मिळवून शिक्षण पूर्ण करायचे होते . मग मी व माझा मित्र दिपक सातार्डेकर कामासाठी भटकू लागलो . त्यावेळी छत्र्यांवर नाव टाकणे , सायकली डेकोरेट करणे , दुकानांचे बोर्ड रंगविणे , नाटकाची पोस्टर्स करणे , बंगल्याच्या दर्शनी भागावर घरांवर नावाच्या पाट्या लिहीणे अशी कामे मिळत . ती कामे मिळवत असताना ऐके दिवशी खासबाग मैदानाच्या समोरच्या  पहिल्या मजल्यावर एक छोटी पाटी दिसली . पेंटर एस . निंबाळकर आर्ट्स आणि स्टुडीओ . मग उत्सुकतेपोटी नकळत मी पहिल्या मजल्यावर पोहचलो .
            निंबाळकराच्या या स्टुडीओमध्ये एकच मोठी खोली होती . त्या दरवाज्या शेजारी एक लाकडी फोल्डींगचे इझल त्यावर माऊंट बोर्ड लावलेला होता . त्या इझलशेजारी एक मोठे टेबल त्या टेबलावर एका प्लास्टीकच्या ट्रे मध्ये असंख्य पोस्टर कलर्सच्या अर्धवट रंगानी भरलेल्या बाटल्या होत्या . जलरंगाचे असंख्य ब्रशेस , पाण्याची छोटी बादली , पॅलेटस व शेजारच्या लोखंडी रॅकवर व टिपॉयवर चित्रांची पुस्तके रचलेली होती .
पांढरा बिनबाह्यांचा बनियन , बुल्गानीन दाढी , अनेक रंगानी शितोंडे उडून मूळ रंग कोणता हे दिसत नसलेली पँट घालून डाव्या हातात सिगारेटचे झुरके घेत हे चित्रकारमहाशय एक दुकानाचा साईनबोर्ड ऑईलपेंटने रंगवत बसलेले होते .
             मी त्यानां नमस्कार केला माझी ओळख सांगितली व तुमच्याकडे काही काम मिळेल का याची विचारणा केली . अरे वा ! तु पाचगणीचा का? लई बेस्ट स्पॉट ? लई भारी हाय बघ लँडस्केपसाठी . मी गेलो होतो . टेबललॅन्ड नावाचे पठार हाय बघ तेथे . एकदम बेस्ट . सिगारेटचे झुरके मारत साईनबोर्ड रंगविणारे एस. निंबाळकर पुढे कायमचे मित्र झाले . हळूहळू निंबाळकर मला त्यांची जास्तीचे काम द्यायचे . पण त्यांचे खरे प्रेम हे निसर्गचित्रे रेखाटनावर असायचे . पोटासाठी साईनबोर्ड व इतर रंगविण्याची कसलीही कामे करताना त्यांनी कधी लाज , शरम धरली नाही . किंवा मी मोठा चित्रकार आहे , जी डी आर्ट पेंटींग व कमर्शियल आर्ट शिकलो आहे तर अशी कामे का करू ? असा प्रश्नही त्यानां कधी पडला नाही . त्यांचा हा गुण मला जगण्यासाठी खूप उपयुक्त ठरला .
             कोल्हापूरचे अनेक चित्रकार त्यांच्या स्टुडिओला येता जाता सहज भेट देत असायचे त्यांनी कधीच कोणाला रोखले नाही . अपॉईमेंट नावाची भानगडच त्यांनी ठेवली नाही . मुक्त प्रवेश व भरपूर कोल्हापूरी शिव्या घालून ते येणाऱ्या जाणाऱ्यांचे स्वागत करायचे . खूप लोकानां भेटायचे . पुण्या मुंबईतील चित्रकार फोन करून या म्हणायचे पण निंबाळकर त्यानां कधी फोन करायचे नाहीत . मी त्यानां एकदा विचारले की समजा तुम्ही त्या चित्रकाराच्या घरी गेला आणि तो तेथे नसला तर ? ते सहज म्हणाले सुनील , तुला सांगतो ही चित्रकारमंडळी म्हणजे लई म्हंजे लई म्हंजे लईच चतुर जात . तुम्ही त्यानां फोन केला की लई नाटकं करणार . खोटे तर लगेच बोलणार , लई बीझी हाय असं म्हणणार त्यापेक्षा डायरेक्ट भिडायचे . रिक्शा प्रवासाचे पैसे वाया गेले तरी हरकत नाय पण आजपर्यंत माझा अंदाज कधी चुकला नाही . ते पुण्यामुंबईत भ्रमण करत असताना अनेकानां भेटायचे व त्यानां मित्र करून टाकायचे . त्यामुळेच मलाही अनेक चित्रकारानां भेटायची गप्पा मारून नव्या गोष्टी समजून घेण्याचे व्यसन लागले .
             त्यांच्याकडे अनेक चित्रांचे रेफरन्स बुक व फोटो कलेक्शन असायचे . कधी एका चित्रातील होडी घ्यायचे तर दुसऱ्या चित्रातील डोंगर घ्यायचे कधी तिसऱ्या रेफरन्समधून मंदीर घ्यायचे . कधी वातावरण निर्मितीसाठी इकडून तिकडून फिगर्स ढापायचे . या सगळ्यांचा परिपाक एक नवीनच स्पॉट किंवा निसर्गदृश्य साकारायचे . ते साकार करताना ते इतके एक्स्पर्ट झाले होते की चार पाच चित्रे एकत्र रंगवूनही कोणाला त्याचा पत्ता लागला नाही . कारण नवे चित्र खरेच वेगळे असायचे .अनेक कलाकारांच्या चांगल्या गोष्टी ते सहजपणे चित्रांत बेमालूमपणे घुसवायचे . कोणी प्रश्न विचारला तर भाबडेपणाने कोठून चित्रात काय घुसवले याची उकल करून सांगायचे .
            एकदा कोल्हापूरला प्रसिद्ध चित्रकार प्रताप मुळीक यांचे प्रदर्शन भरवायचे ठरले . त्यावेळी मी त्यांच्याकडेच कामाला होतो . मग चित्र नेणे , रात्री डिस्प्ले करणे , चित्रांवर नंबर टाकणे , बाहेरचा कापडी बोर्ड , बॅनर , जाहिरातीचा फलक रंगविणे इत्यादी कामे करण्यासाठी त्यांनी मला सोबत नेले . सर्व कामे संपल्यावर म्हणाले आता मी माझ्या चुलत भावाकडे मुक्कामासाठी जातो . तु काय करणार आता ? आणि ते मला तेथेच सोडून निघून गेले .खरं तर माझे कोणी नातेवाईक नव्हते तेथे जे होते ते निंबाळकरांसारखे मित्र . त्यानां फोन करून बोलावले तर शाहू स्मारकला लगेच आले . म्हणाले काळजी करू नकोस आज माझ्या स्टुडीओत झोप , कोल्हापूरला आला होतास त्या स्टेशनावर झोपू नको . मुळीक कोल्हापूरचेच पण ते आता पुण्यात राहतात . माणसे बदलतात . तु पुण्यात चार वर्ष राहूनही पुणेकरांकडून काहीच शिकला नाहीस . त्यांनी स्टुडिओची चावी दिली व रिक्शाने आम्ही खासबागच्या स्टुडीओत आलो .एस .निंबाळकर असे फटकळ पण बिनधास्त खरे बोलणारे कोल्हापूरकर होते .
            एकदा वडगावचे चित्रकार संपत नायकवडी व एस. निंबाळकर सातआठ दिवसांसाठी चित्र काढायला पाचगणीला आले होते . ते पावसाळ्याचे दिवस होते . आम्ही मस्तपैकी टेबललॅन्डच्या पठारावरच्या गुहेत , डालकेटच्या जुन्या इमारती , पाचगणीचे रस्ते , महाबळेश्वरच्या पॉईंटसवर जाऊन डोंगररांगांची चित्रे काढली . महाबळेश्वरला त्यांचे मित्र बाळू वेल्हाळ नोकरीला होते . त्यांच्याकडे मुक्काम केला व प्रसिद्ध ऑर्थरसीट पॉईंटला जाऊन छान वॉटरकलर केले . मग अचानक एस. निंबाळकर म्हणाले आपण ही चित्रे मांडून पॉईंटवर बसू या . कदाचित कोणी कलारसिक आपली चित्रे विकत घेतील . दोन तासानंतर कोणीही चित्र विकत घेत नाहीत हे पाहुन एस .निंबाळकर म्हणाले . आयला आपण महाराष्ट्रात जन्मलो हिच मोठी चुक झाली . त्यात सातारा जिल्ह्यात चित्र विकायचे म्हणजे राजस्थानाच्या वाळूत शेती करायला घेतल्यासारखे आहे . चित्रातून चित्रकार जगवला पाहीजे , चांगले चित्र भिंतीवर लावले पाहीजे याची भारतात जाणीव नाही . मग गरम भुट्टा (कणीस) खात निसर्ग पाहणाऱ्या लोकांकडे पहात ते म्हणाले . निसर्ग पाहायला येतात की भुट्टा खायला तेच कळत नाही .
             चित्र विकण्यासाठी त्यांनी मग त्यांचा अनोखा फंडा सांगितला . एकदा मुंबईला भेटले तर म्हणाले चल तुला स्वस्तात रंग कुठे मिळतात ते दाखवतो . मग अतिशय गर्दी असलेल्या जुन्या बाजाराच्या दोन टाकी परिसरात घेऊन गेले . तेथे इतकी गल्ली बोळे व असंख्य वस्तू विकायला होत्या की फिरताना मी गांगरून गेलो . मग तेथेच एका अरुंद बोळात घुसून एका जुन्या इमारतीच्या गलीच्छ वस्तीत कंपनीचे वाया गेलेले रिजेक्टेट भंगारचे रंगाचे दुकान होते तेथे घेऊन गेले . अर्धवट भरलेल्या , रंग बाहेर पडल्यामुळे रिजेक्ट झालेल्या ट्युब्ज त्यांनी विकत घेतल्या . एका दुकानात बॉक्सबोर्डचे पेपर विकत घेतले . काही ब्रशेस घेतले . दोन तीन हजाराच्या त्या वस्तू मला दाखवून म्हणाले आता बघ याचे सहा महिन्यात दहापट पैसे करतो . सहा महिन्यानंतर ते परत आले व म्हणाले चल आता माझी करामत दाखवतो .
              मुंबईत अनेक फ्रेम्समेकर्स आहेत , सदगुरु , पेटेंडरिदम , इंदू फोटोफ्रेम्स या मोठ्या शो रुम्समध्ये ओरीजनल चित्रे विकणारी मोठी व्यापारी मंडळी आहेत . त्याच्यांकडे एस .निंबाळकर प्लास्टीक फाईल्स किंवा कधी कापडी पिशव्या घेऊन जायचे . त्या पिशव्या दुकानाच्या मालकापुढे ठेवायचे . ते देतील ते पैसे घ्यायचे . घासाघीस नाही , वादविवाद नाहीत अशा चार पाच जणांकडे गेले की त्यांची सहा महिन्याची बेगमी पुर्ण व्हायची . चित्र काढण्यासाठी व जगण्यासाठी पैसे मिळाले यामध्ये ते खूष असायचे . त्यांनी कधीही मोठ्या चित्रकारांसारखे जगात नाव व्हावे , स्टाईलमध्ये जगावे , कोल्हापूरात नाव कमवावे , आपली चित्रे कोट्यावधी रुपयांमध्ये विकली जावीत अशी हाव धरली नाही . पायात साधी चप्पल , साधे शर्ट पँट व अस्ताव्यस्त अवतार त्यांनी कधी सोडला नाही . कोणावर इंप्रेशन मारण्याचे ध्येयच नसल्यामुळे आपल्या कलानिर्मितीत हा माणूस धुदंपणे जगला .
               एकदा सावर्डे येथील चित्रकार प्रकाश राजेशिर्के यांनी कोल्हापूरजवळ पन्हाळा येथे संजीवन विद्यालयात चित्रकलेचा कॅम्प आयोजित केला होता . प्रत्येक चित्रकाराला राहण्याची सोय व दहा हजार रुपये मिळणार होते . मग मी व स्वाती प्रथमच अशा कॅम्पला गेलो . तेथे एस. निंबाळकर देखील आले होते . मग आम्ही पन्हाळ्यात पायथ्याशी छोट्या गावात चित्र काढायला गेलो . माझ्याकडे खुर्ची , ईझल , बोर्ड सर्व मटेरियल होते . पण निंबाळकर मस्त पायाची मांडी घालून मातीत निवांत बसले होते . पँट खराब होत होती पण त्याची त्यांना जराही पर्वा नव्हती . डाव्या हातात सिगारेट पेटत होती . त्यावेळी मस्तपैकी दोन घरे , त्याच्यां शेणाने सारवलेल्या भिंती , कौले , दोन कोंबड्या , दोन शेळया डोक्यावर लाकडांचा भारा घेऊन जाणारी बाई यांचे मस्तपैकी दोन तासात चित्रण करून निंबाळकर कोल्हापूरला एका दिवसातच परतले . जाताना स्टुडिओत भेटून जा म्हणाले .
             त्यांच्या स्टुडीओचा पत्ता बदलेला होता . आता ते तिसऱ्या मजल्यावर शिफ्ट झाले होते . स्टुडीओची जागा बदललेली होती पण निंबाळकर बदलले नव्हते . त्यांच्या रहाणीमानाप्रमाणेच स्टुडीओतील रचना बदललेली नव्हती . त्याच अस्ताव्यस्त पसरलेल्या वस्तू , पुस्तके , भिंतीवरील अनेक टांगलेली चित्रे , तोच ईझल , तोच टेबल , तेच ते जुन्या बाजारातून आणलेल्या पोस्टर कलर्सच्या अर्धवट रंगानी भरलेल्या बाटल्या होत्या सिगारेटची अनेक थेटूक ॲश ट्रे मध्ये पडलेली होती आणि बाल्कनीमध्ये पोत्यात भरलेल्या रिकाम्या बाटल्या बघितल्यानंतर त्यांच्या रोजच्या जगण्याची पद्धत लक्षात आली . तेथेच मित्र उमेश नेरकर यांची भेट झाली .
             कोणाशी शत्रूत्व नाही , कोणाशी वैर नाही , कोणाशी स्पर्धा नाही , कोणाशी तुलना नाही . कोणी मान अपमान केला तरी विचलीत झाला नाही असा हा वेगळाच आत्मा होता .आपल्या स्वतःची एक जीवनशैली निवडून फक्त चित्रांवर जगण्याचा काट्याकुट्यातील मार्गावर सर्वांसोबत हसून जगणारा कोल्हापूरचा हा अवलीया निसर्गचित्रकार आज अनंतात विलीन झाला . आता कोल्हापूरला गेलो की चित्रकार एस.निंबाळकर व त्यांच्या फोटोमुळे असंख्य आठवणी नेहमी आठवत राहतील . . . . . 

चित्रकार : सुनील काळे✍️
9423966486

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०२४

गिर्यारोहक : जितेन्द्र गवारे

गिर्यारोहक - जितेन्द्र गवारे
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟    
          प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या स्वभावाचा , वेगवेगळ्या विचारांचा , वेगळ्या शारीरीक , आर्थिक , मानसिक विचारधारेंनी भारावून गेलेला असतो . आपल्याला जी जीवनशैली आवडेल तशीच दुसऱ्यांची असेल हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही . समान व्यसन , समान आवडी असलेल्यांची मैत्री त्यामुळेच जुळते जेव्हा विचारांची बैठक सारखी असते .
        माझे मूळ गाव वाई तालुक्यातील पांडवगडाच्या पायथ्याशी असलेले पांडववाडी किंवा पांडेवाडी . दरवर्षी गावातून वर डोंगरावर पांडवगडावर पांडवजाईदेवीची पालखी जाते . कित्येक वर्ष फक्त मनातूनच गडावर गेलो. प्रत्यक्ष शरीर घेऊन जाणे आता तर स्वप्नच झाले कारण पायाचे झालेल्या ऑपरेशनमुळे डोंगर चढणे आता जमत नाही . मी पाचगणी महाबळेश्वरमधून जशी चित्रनिर्मिती केली तशी एकटे जाऊन ट्रेकिंग करून गडावर चित्रकलेचे सामान घेऊन जाणे शक्य नसते . ट्रेकिंग करून गड सर करणारे . हिमालयात जाऊन बर्फात , थंडीत अनेक किलोंचे सामान पाठीवर घेऊन कांचनगंगा व इतर गिरिशिखरे चढाई करून सर करण्यासाठी जी अलौकीक जिद्द लागते त्यानां तर मी चक्क साष्टांग नमस्कारच करतो .
           आता रिटायर्डमेंटच्या काळात मी पांडवगडाच्या पायथ्याशी राहतोय . माझ्या सर्व खिडक्यांमधून पांडवगडाचे दर्शन होते . त्या उंच डोंगरावर पूर्वी अज्ञातवासात पांडव रहात होते अशी आख्यायिका आहे . त्या गडावर पाचगणीचा एक पारशी शेर वाडीया नावाचा माणूस कित्येक वर्ष रहात होता . पाचगणीच्या संजीवन शाळेच्या समोर जकात नाक्याशेजारी असलेली रोडटच  महागडी प्रॉपर्टी विकून हा गडी एकटा पांडवगडावर राहायचा . त्याने तेथे एक छोटे घर बांधले होते . सोबत एकदोन कुत्री घेऊन हा पारशी दिवसभर त्या गडाच्या परिसरात वरून दिसणारे निसर्गसौंदर्य पहात राहायचा . असा कित्येक वर्ष तेथे रहात होता . लाईट नाही , जनरेटर नाही , मोबाईल , टिव्ही नाही , बाजार वस्तू घेण्यासाठी वाईला जायचे तर डोंगर उतरावा लागायचा . नंतर परत प्रवास करून सर्व सामान डोंगरावर चढवायचे . सोबत माणूस नाही असे एकटे राहणाऱ्या शेर वाडीयाविषयी मला खूप खूप उत्सुकता असायची . असे एकट्याने डोंगरमाथ्यावर राहणे साधे सोपे काम नसते . डोक्यावर एक फूट लांबीचे सरळ मोकळे केस , त्या केसांवर वाऱ्याने उडू नयेत,अस्ताव्यस्त होऊ नयेत म्हणून एक काळी पट्टी बांधलेली असायची , खूर्टी बुल्गानीन दाढी , आत बसलेली गालफडे , गोरा रंग व साडे सहा फूट उंच किडकिडीत शरीरयष्टी , नेहमी इनशर्ट करायचा व एक जाड चामड्याचा पट्टा पँटला बांधायचा . त्यात नेलकटर , छोटा चाकू ,किल्ली यासारखी दोनतीन अवजारे असायची . त्याचा खूप उंच असा काळ्या रंगाचा हंटरशूज पाहीला की मला जणू इंग्रजी चित्रपटाचा नायक चालत आहे असे वाटायचे . त्याच्या रेसर सायकलची शीट दीड फूट उंच असायची त्याच्यासारखीच विचित्र दिसायची . वाईत किंवा पाचगणीला तो फिरत असला की सगळे त्याच्याकडे बघत राहायचे . सेंट पीटर्समध्ये शिकला होता तरी मराठी बोलायचा त्यामुळे सगळ्यांशी त्याची ओळख होती . असा हा शेर वाडीया सर्व जगाशी सबंध तोडून पांडवगडावर का रहात होता ? काय जीवनाचे रहस्य शोधत होता ? हे आता विचारायचेच राहीले .
       एक दिवस वाईला टिळक लायब्ररीत जितेन्द्र गवारे यांचा हिमालयातील गिर्यारोहणाचा अनुभव व स्लाईडशो असा कार्यक्रम आयोजित केला होता . मी त्यांचे अनुभव ऐकून एका वेगळ्याच जगात पोहचलो  होतो . हिमालयात गिर्यारोहण करणे हे एक वेडे धाडस आहे . महाराष्ट्रातील वातावरण व हिमालयाच्या बर्फाच्छदित पर्वतरांगाचे वातावरण यात जमीनअस्मानाचा फरक आहे . त्यासाठी बर्फात  राहण्याचे सामान व ऑक्सीजनचा सिलेंडर पाठीवर घेऊन हातात काठी , जाड प्लास्टीकचे शरीर पूर्ण झाकणारे कपडे घालून प्रत्यक्ष हिमवर्षावात चढाई करताना बर्फाचे डोंगर , लँडस्लायडींग , वारा , वादळ , अनोळख्या अडचणींच्या विश्वात डोंगर चढत गिरिभ्रमण करणे हे सोपे काम नसते .
           प्रत्यक्ष चढाई करण्यापूर्वी जवळपास वीस पंचवीस लाखांची तरदूत करावी लागते . जाण्या येण्यासाठी रेल्वे , विमान कंपनीचे तिकीट बुक करून ठेवावे लागते . श्वास वाढवणे व श्वास रोखून धरण्यासाठी शास्त्रशुद्ध सराव करावा लागतो , त्यासाठी शारीरिक व्यायाम , पळणे ,चालणे, योगाचा अभ्यास व मनाची संतुलीत अवस्था टिकवून ठेवण्याचे तंत्र शिकावे लागते . सततचा सराव करावा लागतो . विपरीत परिस्थिती येणार आहे याची जाणीव ठेऊन शरीरसंपदा चपळ ठेवावी लागते . वजन वाढू नये सतत साथ द्यायला तयार शरीर तंदुरुस्त असावे म्हणून सातत्याने जिममध्ये व्यायाम करावा लागतो . ज्याठिकाणी जायचे आहे त्या गिरिशिखरांचा नकाशा घेऊन भौगोलीक रचना व इतिहास समजून घ्यावा लागतो . निळ्या ट्रॅकसूटमध्ये तंदुरुस्त जितेन्द्र गवारे त्यांचे हिमालयातील फोटोंचा स्लाईड शो वाईमध्ये दाखवत असताना सगळे प्रेक्षक थंडगार झाले होते , अचंबित झाले होते. प्रत्येकाला प्रश्न पडलेला होता की हे सगळे उपदव्याप करून स्वतःच्या प्रिय कुटुंबापासून एक दोन महिना दूर राहून आर्थिक भूर्दंड सहन करून यानां काय मिळवायचे असते ? कशाला जीव धोक्यात घालून अडचणींचा सामना करत बसायच ?
शेवटी जितेन्द्र गवारे यांनी प्रेक्षकांना काही प्रश्न विचारायचे असल्यास विचारावेत असे वाक्य ऐकताच माझा  हात पटकन वर गेला .
          जिवाची पर्वा न करता , प्राणप्रिय कुटूंबातील सदस्यानां दूर ठेऊन , पंचवीस लाखांची आर्थिक झळ सोसून , एवढा शारीरिक व्यायामाचा त्रास सोसून जेव्हा तुम्ही हिमालयात जाता त्याऐवजी ते पैसे बँकेत मुदतठेव ठेऊन दर महिना व्याज मोजत बसण्या ऐवजी,निवांत सकाळी जरा उशीरा उठून , रिस्क न घेणारे साधे सर्वसामान्य माणसांसारखे जीवन जगायला तुम्हाला आवडत नाही का ? आणि तुम्ही अशा सफरींसाठी जाता त्यावेळी घरच्यांची अवस्था काय असते ? ते तुम्हाला अडवत नाहीत का ? माझा प्रश्न ऐकताच जितेन्द्र गवारे सहज हसत म्हणाले बसा सांगतो याची उत्तरे . आणि सगळ्यांनी कान टवकारले .
           आयुष्य म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा एक अविस्मरणीय प्रवास असतो . काहींचे जीवन अगदी रहाटगाडग्यासारखे असते .रोजचा दिवस सारखाच उगवतो . तेच तेच रुटीन जगणे असते . जीवनात काही नवीन उत्साहाने जगण्यासाठी आव्हानच नसते . बेसूर व कंटाळवाणे तेच तेच जीवन का जगावे माणसाने ? मला माणूस म्हणून जगताना चॅलेंजिंग , बाणेदार , शुरवीरासारखे धाडसी जगावे वाटते . आपले शरीर हे आराम करण्यासाठी , खाऊन जाडजूड होऊन निवांत झोपण्यासाठी नसते . शरीराला कार्यमग्न , उर्जावान ठेवण्यासाठी मावळ्यांसारखे चपळ ठेवण्यासाठी योग्य आहार , योग्य दिनचर्या असावी असे मला वाटते . त्यासाठी दरवर्षी कोठे ना कोठे मी गिर्यारोहणाची मोहीम आखत असतो . गिर्यारोहण हा साहसी खेळ आहे . या खेळात हिमशिखरे कधी अंगावर पडतील , आपण कधी या पर्वतशिखरांखाली गाडले जाऊ याची शाश्वती नसते . आपला हा श्वास कधी संपेल हे सांगता येत नाही . जर रोजचा दिवस जीवनातील एक साहसी खेळ म्हणून जगलो तर संपूर्ण जीवन एक उर्जेची धारा असल्यासारखे वाटेल .
              दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे . माणूस कितीही श्रीमंत असू द्या तो कधीच समाधानी नसतो . गरीबानां श्रीमंत व्हायचे म्हणून ते धावत असतात व श्रीमंतानां अधिक श्रीमंत व्हायचे असते म्हणून ते अधिक धावपळ करतात . आणि पैसे टिकवून ठेवण्यासाठी कंजूषवृत्तीने जगताना आपल्या इच्छा मारण्यात अर्थ काय ? अधिक पैसे मिळविण्यासाठी सामान्य लोकानां फसवून टोप्या लांडीलबाडी करून दिवसरात्र पैसे कसे वाढतील या विचारांत स्वतःलाच काहीजण फसवत असतात . असे जीवन मला जगायचे नाही .
            तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर फार सोपे आहे . मी असा आळशी, निवांत  बेसूरा जगू नये म्हणून माझी पत्नी , माझे कुटूंबीय स्वतःच अशा मोहीमेमध्ये मला मदत करत असतात . शेवटी जगताना मरण कधी तरी येणारच . मग मरण पुण्यात आले काय किंवा हिमालयाच्या कुशीत आले काय ? मरण्याच्या अगोदर जिवंत जगले पाहीजे असे मला वाटते . मृत्यू त्यामुळे मित्र असल्यासारखा वाटतो. मग मित्रासोबत भिती कशाला वाटायला पाहीजे ?
आणि सर्वात शेवटी हे अगदी मनातलं सांगतो . जी माणसे सर्वसामान्य रुटीन पद्धतीने जगतात ती रुटीन पद्धतीनेच मरतात . जी माणसे असामान्य मोठ्या ध्येयाने पछाडलेली असतात ती असामान्य कर्तृत्व करतात. त्यांच्या कर्तृत्वाची दरवळ हळूहळू सगळीकडे पसरते व समाजही एक दिवस त्यांची दखल घेतोच . गिर्यारोहन क्षेत्रात जे काम मी केले त्यामुळेच तर तुम्ही मला या कार्यक्रमाला का बोलवले ना ?
            प्रत्येकाच्या जीवनाची फिलॉसॉफी वेगवेगळी असते किंवा ती वेगवेगळी असलीच पाहीजे . जितेन्द्र गवारे त्यांच्या आगळ्यावेगळ्या विचारांमूळे व धाडशी जीवनशैलीमुळे कायम लक्षात राहीले .
         जितेन्द्र गवारेंचा आज वाढदिवस आहे . त्यामुळे आजचा दिवस त्यांच्यासाठी खास आहे . अनेक मोहीमा ते आयोजित करत असतात . त्याच्यां सर्व गिरिशिखरांच्या मोहीमानां खूप खूप शुभेच्छा !
💐💐💐💐💐💐💐💐💐
 
https://www.facebook.com/share/r/Nsc8DB6Par2Xyu95/?s=chYV2B&fs=e&mibextid=6AJuK9

https://www.instagram.com/reel/ChZ5rlJq-dL/?igsh=Z2V3cGRqNDBud21s

सुनील काळे✍️ 
9423966486

मंगळवार, १६ जुलै, २०२४

सुभाष दांडेकरांची आठवण

कॅम्लीनच्या सुभाष दांडेकरांची आठवण
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
        पाऊस सुरु झाला की पाचगणी महाबळेश्वरच्या डोंगरपठारावरून दिसणाऱ्या सहयाद्रीच्या पर्वतरांगा हळूहळू नवी रुपे धारण करू लागतात . पावसामुळे सर्वत्र गवत उगवण्यास सुरुवात होते आणि मग पावसाचा एकदा का जोरदार सपाटा सुरु झाला की धरतीमाता जणू हिरवागार शालू नेसली आहे की काय असेच वाटायला लागतो . 
            मे महिन्याच्या उकाड्यामुळे हैराण झाल्यामुळे प्रत्यक्ष स्पॉटवरचे काम थांबले असायचे मग पावसाळ्यात चित्र काढायला मला जोर यायचा . चित्र काढण्यासाठी त्यावेळी मारुती व्हॅन गाडी मुद्दाम घेतली होती . आठ सीटर गाडीच्या पाठीमागच्या समोरासमोर बसायच्या दोन सीटस काढल्या की ऐसपेस जागा मिळायची व पाठीमागचा दरवाजा ओपन केला की समोर मोठा पत्र्याचा आडोसा तयार व्हायचा आत पाणी यायचे नाही . अशी कितीतरी चित्रे मी भर पावसाळ्यात रंगवलेली आहेत .
          सन २००२ साली माझे व स्वातीचे " निसर्गसंवाद " या शीर्षकातंर्गत जहाँगीर आर्ट गॅलरीच्या डाव्या बाजूच्या मोठ्या ऑडीटोरीयम हॉलमध्ये चित्रप्रदर्शन भरलेले होते . ऑगस्ट महिन्यात प्रदर्शन असल्यामुळे त्या काळात मुंबईतही प्रचंड पाऊस कोसळत होता . सकाळी ११ वाजता उद्‌घाटन झाल्यानंतर काही चित्रे भिंतीवर टांगायची तयारी सुरु होती . अशावेळी लाईट व्हायोलट कलरचा शर्ट व इनशर्ट केलेली कडक पँट घातलेली एक वयस्कर व्यक्ती भिजत  अचानक हॉलमध्ये आली आणि प्रदर्शन पहाता  पहाता तुम्हाला मी काही मदत करू का ? अशी विचारणा करू लागली . मी नकार दिला व ते पुन्हा शांतपणे चित्रे पाहू लागले . 
         एका चित्रासमोर मात्र ते थांबायचे व पुन्हा प्रदर्शनाला चक्कर मारून परत परत त्याच चित्रासमोर पुन्हा उभे राहायचे . काहीतरी विचार केल्यानंतर पुन्हा फेरी मारायचे . अशा सात आठ चकरा मारल्यानंतर ते म्हणाले हे चित्र पाचगणीचे आहे का ? मी होय म्हणालो . नंतर म्हणाले तेथे पारशी पॉईंट आहे आणि त्यानंतर थोडे चालल्यानंतर उतारावर एक छोटे खेडेगाव आहे , या चित्रात हेच गाव आहे का ? हो त्या गावाचे नाव तायघाट आहे मी म्हणालो आणि ग्रहस्थ एकदम खूष झाले . बरोबर हेच ते गाव आणि या गावावरून थोडे पुढे चालत गेलो की उजव्या बाजूला आणखी एका गावाचा रस्ता लागतो तेथून हे गाव फार फार सुंदर दिसते त्या गावाचे नाव तुम्हाला आठवतंय का ? 
अहो ते तर पांगारी गाव . या पांगारी गावाला जाणाऱ्या रस्त्यावरूनच मी हे चित्र पावसाळ्यात काढलेले आहे . मग ग्रहस्थ मनापासून एकदम खूप खुषच झाले . मग मला म्हणाले काय सांगू तुम्हाला अहो ,या अशा गडद दाट धुक्यात भर पावसात तीस चाळीस वर्षांपूर्वी मी माझी बायको रजनी लग्नानंतर हनिमूनसाठी पाचगणीला आलो होतो आणि पावसात रस्ता चुकलो . या पांगारी गावच्या रस्त्याने चालत धुक्यातून एकमेकांना खेटून कधी एकमेकाचां हात धरून दोन तास आम्ही भटकत होतो . काय सुंदर वातावरण होते ते . या तुमच्या चित्रात अगदी तसेच वातावरण आहे बघा . दोन्ही बाजूने आकाशातून ढगांचे पुंजके उतरत होते . समोर सिडने पॉईंट व टेबललॅन्डचे पठार व त्याच्या डोंगरउतारावर तायघाट गाव अप्रतिम नजारा होता . आज तुमच्या चित्रामुळे तरुणपणातील सगळ्या गमतीजमती आठवल्या . फार मस्त प्रदर्शन आहे . तुमचे हे चित्र मी विकत घेत आहे . त्यांनी लगेच  नाव विचारून चेकच हातात ठेवला . त्या चेकवरची सही पाहून आता मीच थबकलो कारण त्यावर नाव होते सुभाष दांडेकर . आणि खाली कॅम्लीन कंपनीचे चेअरमन असे स्पष्टपणे प्रिंट केले होते .
      ज्यांचे रंग मी लहानपणापासून वापरायचो पण ती व्यक्ती समोर कधी पाहिली नव्हती . त्यांचा कधी फोटोही पाहिला नव्हता .मग आमच्या गप्पा आणखीन रंगू लागल्या . मग रंगाचा विषय निघाला . त्याची क्वालीटी कशी राखली जाते याविषयी चर्चा झाल्या . त्यांनी चित्र घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टसाठी घरी बोलावले अभिप्राय वहीत छोटा अभिप्राय लिहून त्यांच्या घराचा सविस्तर पत्ता लिहिला व निरोप घेतला . गॅलरीतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा पाच मिनिनंतर परत येऊन त्यांनी हात हातात घेतला व उदया मी रजनीला सरप्राईज देणार आहे . तुम्ही हे चित्र कोणत्या ठिकाणावरून काढले हे लगेच सांगायचे नाही असे सांगून हासत हासत न चुकता उदया भेटण्याची आठवण पुन्हा करून दिली .
              दुसऱ्या दिवशी मी चित्र घेऊन टॅक्सीने त्यांच्या बांद्रयाच्या कोबे रेस्टारंट जवळच्या क्षितिज अपार्टमेंटमध्ये पोहचलो तर खाली एक माणूस माझी वाटच पहात होता . त्याने चित्र हातात घेतले व मला लिफ्टने घरात नेले . तेथे हॉलमध्ये सुभाषजी माझी वाट पहात बसलेलेच होते . त्यांनी बबल सीटचे पॅकिंग स्वतः उघडून समोर एका टेबलावर चित्र ठेवले व लहान मुलासारखे तोंडावर बोट ठेवून मला आता काही बोलायचे नाही अशी सुचना केली . त्यांचा तो उत्साह पाहून मीदेखील हसलो व ठिक आहे मी बोलणार नाही असे सांगितले . मग त्यांनी मोठ्याने किचनकडे तोंड करून हाक मारली रजनी जरा बाहेर ये , हे बघ मी काय आणलेय तु ओळख बघू आता . इतक्यात रजनीताई नॅपकीनने हात पुसत बाहेरच्या हॉलमध्ये आल्या व ते चित्र पाहून चकीत झाल्या . अय्या हे तर पाचगणीचे चित्र , किती सुंदर आहे , सुभाष तुला आठवतेय का? आपण लग्नानंतर हनिमूनला गेलो होतो . त्यावेळी त्या गावच्या रस्त्यावरून हेच दृश्य दिसत होते . धुक्यात हरवलेले ते गाव , डोंगर व टेबललॅन्डचे ते पठार . किती किती मस्त दिवस होते ना ते . त्या मनापासून लाजल्या व म्हणाल्या आज मला या चित्रामुळे सगळं आठवतय . थँक्यू सो मच फॉर लवली मेमरीज ! आपल्या बायकोला हे सगळे दिवस आठवत आहेत हे पाहून दांडेकरसाहेब भलतेच खूष झाले . मग त्यांनी माझी चित्रकार म्हणून ओळख करून दिली . पुन्हा तायघाट व पांगारी या नावाची गावे आठवत आहेत का ? याची आठवण करून दिली व नाटकीय भाषेत म्हणाले चित्रकार सुनील काळे , तुम्ही महान चित्रकार आहात , तुमच्या या चित्रात त्या गावाचा निसर्गाचा आत्मा उतरलेला आहे , यापुढे तुम्हाला कॅम्लीन कंपनीतर्फे 40% डिस्काऊंड मिळेल . तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी केली की अमाऊंटवर 40% डिस्काऊंडची तुम्ही मागणी करायची ती तुम्हाला मिळेल ही माझी तुम्हाला सप्रेम भेट समजा .
               मग रजनीताईंनी सर्व घर फिरून दाखवले . गोपाळ देऊस्करांनी त्यांचे ऑईलकलर मध्ये केलेले पोट्रेट दाखवले . संग्रहातील इतर मान्यवर प्रसिद्ध चित्रकारांच्या काही कलाकृती दाखवण्याची त्यांची इच्छा होती पण माझे प्रदर्शन जहाँगीर आर्ट गॅलरीत सुरु होते त्यामुळे त्यांचा निरोप घेऊन मी गॅलरीत आलो . अर्ध्या तासातच कॅम्लीनचे रघुनाथ पोवळे नावाचे मार्केटींग टिमचे मॅनेजर आले व पत्ता घेऊन गेले . यापुढे मला संपर्क करा असे सांगून साहेबांनी तुम्हाला 40% डिस्काऊंट देणार आहे याची पुन्हा आठवण करून दिली .
              अशी चित्रांवर चित्रकलेवर प्रेम करणारी माणसे कायमची लक्षात राहतात . पुढे कॅम्लीनचे कॅनव्हास , रंग , आर्टमटेरियल यावर चाळीस टक्के डिस्काऊंट मिळत राहीला . आजही पोवळेसाहेब संपर्कात असतात . मी ज्या ब्रिटीश स्कूलमध्ये शिकवायला होतो ते बोर्डींग स्कूल होते . तेथे आम्ही प्रत्येक मुलाला आर्ट किट दिले . त्यामध्ये कॅम्लीनचे जलरंग , पेस्टल व पोस्टर कलर्स ,कॅलिग्राफी पेन , स्केल , कंपास बॉक्स व इतर सर्व सामान ठेवण्यासाठी एक खास बॅग तयार केली . त्या बॅगेवर शाळेचा व कंपनीचा लोगो प्रिंट करून दिला होता . मुले खूप खूष झाली होती . त्यावेळी सातारा येथील मंगेश बलशेठवार यांच्या दुकानातून सर्व पुरवठा करण्यात आला होता . पण त्यापाठीमागे खरी प्रेरणा होती सुभाष व रजनी दांडेकर या कलासक्त दाम्पत्याची . मुलांनी चित्रे काढली पाहिजेत, आर्ट कॉलेजच्या मुलांनी परदेशातील चित्रकारांची म्युझियममध्ये जावून प्रत्यक्ष चित्रे पाहीली पाहिजे , प्रेरणा घेतली पाहिजे यासाठी स्पर्धा घेऊन पारितोषकप्राप्त मुलांना कंपनीतर्फे परदेशवारी करण्याचे पुण्यकाम दांडेकर मंडळी कॅम्लीन फौडेंशनच्या माध्यामातून करत असत .
                मराठी माणसांनां उद्योजक म्हणून यशस्वी होता येत नाही हा शाप दांडेकरांनी साफ चुकीचा ठरवला . पेनाची रंगीत शाई पासून सुरुवात करून हळूहळू उच्च गुणवत्तेची उत्पादने देण्याचे त्यांचे ध्येय होते आणि त्यासाठी ते झपाटून काम करत . 1958 मध्ये सुभाष दांडेकरांनी मुंबईतून रसायनशास्त्रात पदवी मिळवली व कंपनीत तांत्रिक संचालक म्हणून रुजू झाले . रंग तंत्रज्ञानाचा प्रगत अभ्यास करण्यासाठी ते इंग्लडला गेले . आणि आल्यानंतर त्यांनी कमी बजेटमध्ये पण गुणवत्तेशी तोल साधत अनेक रंग बाजारात उपलब्ध केले . सरतेशेवटी कॅमल हा ब्रॅन्ड प्रतिष्ठित भारतीय ग्राहकांच्या बदलत्या मागणीनुसार विद्यार्थी आणि छंद बाळगणाऱ्यांपासून ते हौशी व व्यावसायिक कलाकरांच्या परिचयाचा होत गेला कारण त्यामागे सुभाष दांडेकराची अखंड प्रेरणा व परिश्रम होते .
                दिनांक 22 जुलै 2022 रोजी रजनीताई यांचे निधन झाले आणि आज 15 जुलै 2024रोजी श्री.सुभाष दांडेकर यांचे निधन झाले . एकमेकांवर नितांत प्रेम करणाऱ्या तसेच अनेक चित्रकार , चित्रकला शिक्षक , कलावंत , आणि विद्यार्थी या मंडळीना प्रोत्साहन देणाऱ्या या दाम्पत्याची आठवण सर्व चित्रकारानां नेहमीच राहील .
मला खात्री आहे की ते स्वर्गात गेल्यानंतर रजनी दांडेकरांचा प्रथम शोध घेतील . आपल्या कॅम्लीन कंपनीचा प्रगतीचा अहवाल सादर करतील आणि आता स्वर्गातील देवांच्या मुलांसाठी , स्वर्गातील चित्रकारांसाठी , कलावंतांसाठी आणखी नवनवी उत्पादने निर्माण करतील आणि पृथ्वीवरील कलाकारांचे जीवन जसे रंगीत कलरफूल केले तसे स्वर्गातील जीवन आणखी सुंदर करतील यामध्ये शंका वाटत नाही .
सुभाष दांडेकर यांनी 15 जुलै रोजी अखेरचा श्वास घेतला त्यानां भावपूर्ण श्रध्दांजली .🙏

सुनील काळे✍️
9423966486

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...