शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०२४

कोल्हापूरचे निसर्गचित्रकार : एस .निंबाळकर

कोल्हापूरचे निसर्गचित्रकार - एस. निंबाळकर
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
           आपण कोणत्या गावात , कोणत्या जिल्हयात , कोणत्या घरात , कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसते . निसर्गाने किंवा सृष्टीकर्त्या विधात्याने तो चॉईस माणसाला दिला नाही . पण समजा तसा चॉईस मला मिळाला असता अशी ज्यावेळी मी मनातल्या मनात कल्पना करतो त्यावेळी एक जिल्हा मला हमखास आवडतो त्या जिल्ह्याचे नाव आहे कोल्हापूर . कोल्हापूर खरं सांगायचे तर सर्वार्थाने कलापूर आहे . अशा या कलापूरात अपघाताने अचानकपणे मी कलाशिक्षण घेण्यासाठी सन 1985 मध्ये एक वर्ष राहीलो . ते एक वर्ष माझ्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करणारे , जाणीवा विकसित करणारे , जीवनाची जडणघडण करणारे व माणूस म्हणून जगताना माणुसकी शिकवणारे ठरले . म्हणून आजही कोल्हापूरला जायचे काही कारण निघाले की मी लगेच एका पायावर तयार असतो .
            मी 1984 साली बारावी सायन्स शिकलो होतो पण यापुढे आपल्याला चित्रकार म्हणून जगायचे असे माझ्या मनाने फार गंभीरपणे ठरवले . त्यावर्षी तीन ठिकाणी मी प्रवेशअर्ज भरले होते . पुणे ,मुंबई व कोल्हापूराचे कलानिकेतन कॉलेज . इंटरमिजिएट परीक्षेत A ग्रेड व दहावीला फर्स्टक्लास मिळाला होता  त्यामुळे कोणत्याही कलामहाविद्यालयात सहज प्रवेश मिळणार याची खात्री होती . पण चित्रकला क्षेत्रात घुसतानाच दुर्दैवाचे फेरे सुरु झाले . त्यावेळी बाबुराव सडवेलकर जेजे स्कूलचे डीन होते . त्यावर्षी त्यांनी एक नवा फतवा काढला की 12वी पास असणाऱ्या सर्व विद्यार्थीवर्गाला बी.ए , बीएससी , लॉ , किंवा इतर कोणत्याही शाखेत सहज जाता येईल . त्यामुळे यावर्षी प्रथम दहावीच्याच मुलामुलींना प्रवेश मिळणार , त्यापेक्षा जास्त शिकलेल्या इतरानां कोणालाही प्रवेश मिळणार नाही . त्यामुळे माझी चांगलीच गोची झाली . पाचगणीपासून पुणे जवळ होते त्यामुळे पुण्यात मला प्रवेश हवा होता . मुंबई तर खूपच दूर वाटायची त्यावेळी .
             पुण्यात एक महिना धडपडलो व खूप निराश झालो .फौडेंशन हा बेसिक कोर्स असतो नंतर पुन्हा वेगळ्या कॉलेजमध्ये जाता येते हे समजल्यानंतर मी  निदान कोल्हापूरला तरी प्रयत्न करावा असे ठरवले .
             आयुष्यात पहिल्यांदा कोल्हापूरला आलो . बाबूराव  पेंटरांचे चिरंजीव अरविंद मेस्त्री त्यावेळी प्राचार्य होते . त्यांनी निसर्गचित्रांचा गठ्ठा पाहीला आणि म्हणाले शासनाला काय येड लागलयं समजत नाही . ज्याला कलेची आवड आहे त्यानां प्रवेश द्यायचा सोडून फक्त दहावी पास असलेले घ्या हे चुकीचे आहे . मग सरांनी दोन दिवस थांब आपण प्रयत्न करू असे सांगितले . मग आयुष्यात  पहिल्यांदा बाहेर राहण्याचा प्रश्न पडला . आता काय करावे ? या विचारात कोल्हापूर बसस्थानकावर बसून राहीलो . रात्री तेथेच झोपलो . 
             दुसऱ्या दिवशी चालत कळंबा येथे असणाऱ्या कलानिकेतन कॉलेजला पोहचलो तर अरविंद सर नुकतेच ऑफिसला येत होते . त्यांनी ऑफीसात बोलावले . रात्री कुठे राहीलास ? काय खाल्ले ? ओळखीचे कोणी आहे का याची प्रेमाने विचारपूस केली . मी ज्यावेळी स्टेशनवरच झोपलो हे ऐकून ते आश्चर्यचकीत झाले . त्यांनी मला सांगितले जा तुला फौडेंशनच्या वर्गात  प्रवेश मिळाला असे समज . तुझी शिकायची जिद्द , चिकाटी मला आवडली . बघू पुढे काय होते ते , मी सांगतो तसे कर .
            कोल्हापूरच्या कलामहाविद्यालयात मला प्रवेश मिळाला पण जगण्यासाठी अन्न व राहण्यासाठी छप्पर लागते . ते तर माझ्याकडे नव्हते व कोणी ओळखीचेही नव्हते . पण कोल्हापूरची माणसेच भारी . हळूहळू चारपाच कॉटबेसीसवर खोलीत राहणारे काही विद्यार्थी होते त्यांनी मला त्यांच्यात सामावून घेतले . मी साईनबोर्ड करायचो व निसर्गचित्रकार म्हणून मला कलाक्षेत्रात काम करायचे होते . स्वतःच्या पायावर उभे राहून पैसे मिळवून शिक्षण पूर्ण करायचे होते . मग मी व माझा मित्र दिपक सातार्डेकर कामासाठी भटकू लागलो . त्यावेळी छत्र्यांवर नाव टाकणे , सायकली डेकोरेट करणे , दुकानांचे बोर्ड रंगविणे , नाटकाची पोस्टर्स करणे , बंगल्याच्या दर्शनी भागावर घरांवर नावाच्या पाट्या लिहीणे अशी कामे मिळत . ती कामे मिळवत असताना ऐके दिवशी खासबाग मैदानाच्या समोरच्या  पहिल्या मजल्यावर एक छोटी पाटी दिसली . पेंटर एस . निंबाळकर आर्ट्स आणि स्टुडीओ . मग उत्सुकतेपोटी नकळत मी पहिल्या मजल्यावर पोहचलो .
            निंबाळकराच्या या स्टुडीओमध्ये एकच मोठी खोली होती . त्या दरवाज्या शेजारी एक लाकडी फोल्डींगचे इझल त्यावर माऊंट बोर्ड लावलेला होता . त्या इझलशेजारी एक मोठे टेबल त्या टेबलावर एका प्लास्टीकच्या ट्रे मध्ये असंख्य पोस्टर कलर्सच्या अर्धवट रंगानी भरलेल्या बाटल्या होत्या . जलरंगाचे असंख्य ब्रशेस , पाण्याची छोटी बादली , पॅलेटस व शेजारच्या लोखंडी रॅकवर व टिपॉयवर चित्रांची पुस्तके रचलेली होती .
पांढरा बिनबाह्यांचा बनियन , बुल्गानीन दाढी , अनेक रंगानी शितोंडे उडून मूळ रंग कोणता हे दिसत नसलेली पँट घालून डाव्या हातात सिगारेटचे झुरके घेत हे चित्रकारमहाशय एक दुकानाचा साईनबोर्ड ऑईलपेंटने रंगवत बसलेले होते .
             मी त्यानां नमस्कार केला माझी ओळख सांगितली व तुमच्याकडे काही काम मिळेल का याची विचारणा केली . अरे वा ! तु पाचगणीचा का? लई बेस्ट स्पॉट ? लई भारी हाय बघ लँडस्केपसाठी . मी गेलो होतो . टेबललॅन्ड नावाचे पठार हाय बघ तेथे . एकदम बेस्ट . सिगारेटचे झुरके मारत साईनबोर्ड रंगविणारे एस. निंबाळकर पुढे कायमचे मित्र झाले . हळूहळू निंबाळकर मला त्यांची जास्तीचे काम द्यायचे . पण त्यांचे खरे प्रेम हे निसर्गचित्रे रेखाटनावर असायचे . पोटासाठी साईनबोर्ड व इतर रंगविण्याची कसलीही कामे करताना त्यांनी कधी लाज , शरम धरली नाही . किंवा मी मोठा चित्रकार आहे , जी डी आर्ट पेंटींग व कमर्शियल आर्ट शिकलो आहे तर अशी कामे का करू ? असा प्रश्नही त्यानां कधी पडला नाही . त्यांचा हा गुण मला जगण्यासाठी खूप उपयुक्त ठरला .
             कोल्हापूरचे अनेक चित्रकार त्यांच्या स्टुडिओला येता जाता सहज भेट देत असायचे त्यांनी कधीच कोणाला रोखले नाही . अपॉईमेंट नावाची भानगडच त्यांनी ठेवली नाही . मुक्त प्रवेश व भरपूर कोल्हापूरी शिव्या घालून ते येणाऱ्या जाणाऱ्यांचे स्वागत करायचे . खूप लोकानां भेटायचे . पुण्या मुंबईतील चित्रकार फोन करून या म्हणायचे पण निंबाळकर त्यानां कधी फोन करायचे नाहीत . मी त्यानां एकदा विचारले की समजा तुम्ही त्या चित्रकाराच्या घरी गेला आणि तो तेथे नसला तर ? ते सहज म्हणाले सुनील , तुला सांगतो ही चित्रकारमंडळी म्हणजे लई म्हंजे लई म्हंजे लईच चतुर जात . तुम्ही त्यानां फोन केला की लई नाटकं करणार . खोटे तर लगेच बोलणार , लई बीझी हाय असं म्हणणार त्यापेक्षा डायरेक्ट भिडायचे . रिक्शा प्रवासाचे पैसे वाया गेले तरी हरकत नाय पण आजपर्यंत माझा अंदाज कधी चुकला नाही . ते पुण्यामुंबईत भ्रमण करत असताना अनेकानां भेटायचे व त्यानां मित्र करून टाकायचे . त्यामुळेच मलाही अनेक चित्रकारानां भेटायची गप्पा मारून नव्या गोष्टी समजून घेण्याचे व्यसन लागले .
             त्यांच्याकडे अनेक चित्रांचे रेफरन्स बुक व फोटो कलेक्शन असायचे . कधी एका चित्रातील होडी घ्यायचे तर दुसऱ्या चित्रातील डोंगर घ्यायचे कधी तिसऱ्या रेफरन्समधून मंदीर घ्यायचे . कधी वातावरण निर्मितीसाठी इकडून तिकडून फिगर्स ढापायचे . या सगळ्यांचा परिपाक एक नवीनच स्पॉट किंवा निसर्गदृश्य साकारायचे . ते साकार करताना ते इतके एक्स्पर्ट झाले होते की चार पाच चित्रे एकत्र रंगवूनही कोणाला त्याचा पत्ता लागला नाही . कारण नवे चित्र खरेच वेगळे असायचे .अनेक कलाकारांच्या चांगल्या गोष्टी ते सहजपणे चित्रांत बेमालूमपणे घुसवायचे . कोणी प्रश्न विचारला तर भाबडेपणाने कोठून चित्रात काय घुसवले याची उकल करून सांगायचे .
            एकदा कोल्हापूरला प्रसिद्ध चित्रकार प्रताप मुळीक यांचे प्रदर्शन भरवायचे ठरले . त्यावेळी मी त्यांच्याकडेच कामाला होतो . मग चित्र नेणे , रात्री डिस्प्ले करणे , चित्रांवर नंबर टाकणे , बाहेरचा कापडी बोर्ड , बॅनर , जाहिरातीचा फलक रंगविणे इत्यादी कामे करण्यासाठी त्यांनी मला सोबत नेले . सर्व कामे संपल्यावर म्हणाले आता मी माझ्या चुलत भावाकडे मुक्कामासाठी जातो . तु काय करणार आता ? आणि ते मला तेथेच सोडून निघून गेले .खरं तर माझे कोणी नातेवाईक नव्हते तेथे जे होते ते निंबाळकरांसारखे मित्र . त्यानां फोन करून बोलावले तर शाहू स्मारकला लगेच आले . म्हणाले काळजी करू नकोस आज माझ्या स्टुडीओत झोप , कोल्हापूरला आला होतास त्या स्टेशनावर झोपू नको . मुळीक कोल्हापूरचेच पण ते आता पुण्यात राहतात . माणसे बदलतात . तु पुण्यात चार वर्ष राहूनही पुणेकरांकडून काहीच शिकला नाहीस . त्यांनी स्टुडिओची चावी दिली व रिक्शाने आम्ही खासबागच्या स्टुडीओत आलो .एस .निंबाळकर असे फटकळ पण बिनधास्त खरे बोलणारे कोल्हापूरकर होते .
            एकदा वडगावचे चित्रकार संपत नायकवडी व एस. निंबाळकर सातआठ दिवसांसाठी चित्र काढायला पाचगणीला आले होते . ते पावसाळ्याचे दिवस होते . आम्ही मस्तपैकी टेबललॅन्डच्या पठारावरच्या गुहेत , डालकेटच्या जुन्या इमारती , पाचगणीचे रस्ते , महाबळेश्वरच्या पॉईंटसवर जाऊन डोंगररांगांची चित्रे काढली . महाबळेश्वरला त्यांचे मित्र बाळू वेल्हाळ नोकरीला होते . त्यांच्याकडे मुक्काम केला व प्रसिद्ध ऑर्थरसीट पॉईंटला जाऊन छान वॉटरकलर केले . मग अचानक एस. निंबाळकर म्हणाले आपण ही चित्रे मांडून पॉईंटवर बसू या . कदाचित कोणी कलारसिक आपली चित्रे विकत घेतील . दोन तासानंतर कोणीही चित्र विकत घेत नाहीत हे पाहुन एस .निंबाळकर म्हणाले . आयला आपण महाराष्ट्रात जन्मलो हिच मोठी चुक झाली . त्यात सातारा जिल्ह्यात चित्र विकायचे म्हणजे राजस्थानाच्या वाळूत शेती करायला घेतल्यासारखे आहे . चित्रातून चित्रकार जगवला पाहीजे , चांगले चित्र भिंतीवर लावले पाहीजे याची भारतात जाणीव नाही . मग गरम भुट्टा (कणीस) खात निसर्ग पाहणाऱ्या लोकांकडे पहात ते म्हणाले . निसर्ग पाहायला येतात की भुट्टा खायला तेच कळत नाही .
             चित्र विकण्यासाठी त्यांनी मग त्यांचा अनोखा फंडा सांगितला . एकदा मुंबईला भेटले तर म्हणाले चल तुला स्वस्तात रंग कुठे मिळतात ते दाखवतो . मग अतिशय गर्दी असलेल्या जुन्या बाजाराच्या दोन टाकी परिसरात घेऊन गेले . तेथे इतकी गल्ली बोळे व असंख्य वस्तू विकायला होत्या की फिरताना मी गांगरून गेलो . मग तेथेच एका अरुंद बोळात घुसून एका जुन्या इमारतीच्या गलीच्छ वस्तीत कंपनीचे वाया गेलेले रिजेक्टेट भंगारचे रंगाचे दुकान होते तेथे घेऊन गेले . अर्धवट भरलेल्या , रंग बाहेर पडल्यामुळे रिजेक्ट झालेल्या ट्युब्ज त्यांनी विकत घेतल्या . एका दुकानात बॉक्सबोर्डचे पेपर विकत घेतले . काही ब्रशेस घेतले . दोन तीन हजाराच्या त्या वस्तू मला दाखवून म्हणाले आता बघ याचे सहा महिन्यात दहापट पैसे करतो . सहा महिन्यानंतर ते परत आले व म्हणाले चल आता माझी करामत दाखवतो .
              मुंबईत अनेक फ्रेम्समेकर्स आहेत , सदगुरु , पेटेंडरिदम , इंदू फोटोफ्रेम्स या मोठ्या शो रुम्समध्ये ओरीजनल चित्रे विकणारी मोठी व्यापारी मंडळी आहेत . त्याच्यांकडे एस .निंबाळकर प्लास्टीक फाईल्स किंवा कधी कापडी पिशव्या घेऊन जायचे . त्या पिशव्या दुकानाच्या मालकापुढे ठेवायचे . ते देतील ते पैसे घ्यायचे . घासाघीस नाही , वादविवाद नाहीत अशा चार पाच जणांकडे गेले की त्यांची सहा महिन्याची बेगमी पुर्ण व्हायची . चित्र काढण्यासाठी व जगण्यासाठी पैसे मिळाले यामध्ये ते खूष असायचे . त्यांनी कधीही मोठ्या चित्रकारांसारखे जगात नाव व्हावे , स्टाईलमध्ये जगावे , कोल्हापूरात नाव कमवावे , आपली चित्रे कोट्यावधी रुपयांमध्ये विकली जावीत अशी हाव धरली नाही . पायात साधी चप्पल , साधे शर्ट पँट व अस्ताव्यस्त अवतार त्यांनी कधी सोडला नाही . कोणावर इंप्रेशन मारण्याचे ध्येयच नसल्यामुळे आपल्या कलानिर्मितीत हा माणूस धुदंपणे जगला .
               एकदा सावर्डे येथील चित्रकार प्रकाश राजेशिर्के यांनी कोल्हापूरजवळ पन्हाळा येथे संजीवन विद्यालयात चित्रकलेचा कॅम्प आयोजित केला होता . प्रत्येक चित्रकाराला राहण्याची सोय व दहा हजार रुपये मिळणार होते . मग मी व स्वाती प्रथमच अशा कॅम्पला गेलो . तेथे एस. निंबाळकर देखील आले होते . मग आम्ही पन्हाळ्यात पायथ्याशी छोट्या गावात चित्र काढायला गेलो . माझ्याकडे खुर्ची , ईझल , बोर्ड सर्व मटेरियल होते . पण निंबाळकर मस्त पायाची मांडी घालून मातीत निवांत बसले होते . पँट खराब होत होती पण त्याची त्यांना जराही पर्वा नव्हती . डाव्या हातात सिगारेट पेटत होती . त्यावेळी मस्तपैकी दोन घरे , त्याच्यां शेणाने सारवलेल्या भिंती , कौले , दोन कोंबड्या , दोन शेळया डोक्यावर लाकडांचा भारा घेऊन जाणारी बाई यांचे मस्तपैकी दोन तासात चित्रण करून निंबाळकर कोल्हापूरला एका दिवसातच परतले . जाताना स्टुडिओत भेटून जा म्हणाले .
             त्यांच्या स्टुडीओचा पत्ता बदलेला होता . आता ते तिसऱ्या मजल्यावर शिफ्ट झाले होते . स्टुडीओची जागा बदललेली होती पण निंबाळकर बदलले नव्हते . त्यांच्या रहाणीमानाप्रमाणेच स्टुडीओतील रचना बदललेली नव्हती . त्याच अस्ताव्यस्त पसरलेल्या वस्तू , पुस्तके , भिंतीवरील अनेक टांगलेली चित्रे , तोच ईझल , तोच टेबल , तेच ते जुन्या बाजारातून आणलेल्या पोस्टर कलर्सच्या अर्धवट रंगानी भरलेल्या बाटल्या होत्या सिगारेटची अनेक थेटूक ॲश ट्रे मध्ये पडलेली होती आणि बाल्कनीमध्ये पोत्यात भरलेल्या रिकाम्या बाटल्या बघितल्यानंतर त्यांच्या रोजच्या जगण्याची पद्धत लक्षात आली . तेथेच मित्र उमेश नेरकर यांची भेट झाली .
             कोणाशी शत्रूत्व नाही , कोणाशी वैर नाही , कोणाशी स्पर्धा नाही , कोणाशी तुलना नाही . कोणी मान अपमान केला तरी विचलीत झाला नाही असा हा वेगळाच आत्मा होता .आपल्या स्वतःची एक जीवनशैली निवडून फक्त चित्रांवर जगण्याचा काट्याकुट्यातील मार्गावर सर्वांसोबत हसून जगणारा कोल्हापूरचा हा अवलीया निसर्गचित्रकार आज अनंतात विलीन झाला . आता कोल्हापूरला गेलो की चित्रकार एस.निंबाळकर व त्यांच्या फोटोमुळे असंख्य आठवणी नेहमी आठवत राहतील . . . . . 

चित्रकार : सुनील काळे✍️
9423966486

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०२४

गिर्यारोहक : जितेन्द्र गवारे

गिर्यारोहक - जितेन्द्र गवारे
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟    
          प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या स्वभावाचा , वेगवेगळ्या विचारांचा , वेगळ्या शारीरीक , आर्थिक , मानसिक विचारधारेंनी भारावून गेलेला असतो . आपल्याला जी जीवनशैली आवडेल तशीच दुसऱ्यांची असेल हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही . समान व्यसन , समान आवडी असलेल्यांची मैत्री त्यामुळेच जुळते जेव्हा विचारांची बैठक सारखी असते .
        माझे मूळ गाव वाई तालुक्यातील पांडवगडाच्या पायथ्याशी असलेले पांडववाडी किंवा पांडेवाडी . दरवर्षी गावातून वर डोंगरावर पांडवगडावर पांडवजाईदेवीची पालखी जाते . कित्येक वर्ष फक्त मनातूनच गडावर गेलो. प्रत्यक्ष शरीर घेऊन जाणे आता तर स्वप्नच झाले कारण पायाचे झालेल्या ऑपरेशनमुळे डोंगर चढणे आता जमत नाही . मी पाचगणी महाबळेश्वरमधून जशी चित्रनिर्मिती केली तशी एकटे जाऊन ट्रेकिंग करून गडावर चित्रकलेचे सामान घेऊन जाणे शक्य नसते . ट्रेकिंग करून गड सर करणारे . हिमालयात जाऊन बर्फात , थंडीत अनेक किलोंचे सामान पाठीवर घेऊन कांचनगंगा व इतर गिरिशिखरे चढाई करून सर करण्यासाठी जी अलौकीक जिद्द लागते त्यानां तर मी चक्क साष्टांग नमस्कारच करतो .
           आता रिटायर्डमेंटच्या काळात मी पांडवगडाच्या पायथ्याशी राहतोय . माझ्या सर्व खिडक्यांमधून पांडवगडाचे दर्शन होते . त्या उंच डोंगरावर पूर्वी अज्ञातवासात पांडव रहात होते अशी आख्यायिका आहे . त्या गडावर पाचगणीचा एक पारशी शेर वाडीया नावाचा माणूस कित्येक वर्ष रहात होता . पाचगणीच्या संजीवन शाळेच्या समोर जकात नाक्याशेजारी असलेली रोडटच  महागडी प्रॉपर्टी विकून हा गडी एकटा पांडवगडावर राहायचा . त्याने तेथे एक छोटे घर बांधले होते . सोबत एकदोन कुत्री घेऊन हा पारशी दिवसभर त्या गडाच्या परिसरात वरून दिसणारे निसर्गसौंदर्य पहात राहायचा . असा कित्येक वर्ष तेथे रहात होता . लाईट नाही , जनरेटर नाही , मोबाईल , टिव्ही नाही , बाजार वस्तू घेण्यासाठी वाईला जायचे तर डोंगर उतरावा लागायचा . नंतर परत प्रवास करून सर्व सामान डोंगरावर चढवायचे . सोबत माणूस नाही असे एकटे राहणाऱ्या शेर वाडीयाविषयी मला खूप खूप उत्सुकता असायची . असे एकट्याने डोंगरमाथ्यावर राहणे साधे सोपे काम नसते . डोक्यावर एक फूट लांबीचे सरळ मोकळे केस , त्या केसांवर वाऱ्याने उडू नयेत,अस्ताव्यस्त होऊ नयेत म्हणून एक काळी पट्टी बांधलेली असायची , खूर्टी बुल्गानीन दाढी , आत बसलेली गालफडे , गोरा रंग व साडे सहा फूट उंच किडकिडीत शरीरयष्टी , नेहमी इनशर्ट करायचा व एक जाड चामड्याचा पट्टा पँटला बांधायचा . त्यात नेलकटर , छोटा चाकू ,किल्ली यासारखी दोनतीन अवजारे असायची . त्याचा खूप उंच असा काळ्या रंगाचा हंटरशूज पाहीला की मला जणू इंग्रजी चित्रपटाचा नायक चालत आहे असे वाटायचे . त्याच्या रेसर सायकलची शीट दीड फूट उंच असायची त्याच्यासारखीच विचित्र दिसायची . वाईत किंवा पाचगणीला तो फिरत असला की सगळे त्याच्याकडे बघत राहायचे . सेंट पीटर्समध्ये शिकला होता तरी मराठी बोलायचा त्यामुळे सगळ्यांशी त्याची ओळख होती . असा हा शेर वाडीया सर्व जगाशी सबंध तोडून पांडवगडावर का रहात होता ? काय जीवनाचे रहस्य शोधत होता ? हे आता विचारायचेच राहीले .
       एक दिवस वाईला टिळक लायब्ररीत जितेन्द्र गवारे यांचा हिमालयातील गिर्यारोहणाचा अनुभव व स्लाईडशो असा कार्यक्रम आयोजित केला होता . मी त्यांचे अनुभव ऐकून एका वेगळ्याच जगात पोहचलो  होतो . हिमालयात गिर्यारोहण करणे हे एक वेडे धाडस आहे . महाराष्ट्रातील वातावरण व हिमालयाच्या बर्फाच्छदित पर्वतरांगाचे वातावरण यात जमीनअस्मानाचा फरक आहे . त्यासाठी बर्फात  राहण्याचे सामान व ऑक्सीजनचा सिलेंडर पाठीवर घेऊन हातात काठी , जाड प्लास्टीकचे शरीर पूर्ण झाकणारे कपडे घालून प्रत्यक्ष हिमवर्षावात चढाई करताना बर्फाचे डोंगर , लँडस्लायडींग , वारा , वादळ , अनोळख्या अडचणींच्या विश्वात डोंगर चढत गिरिभ्रमण करणे हे सोपे काम नसते .
           प्रत्यक्ष चढाई करण्यापूर्वी जवळपास वीस पंचवीस लाखांची तरदूत करावी लागते . जाण्या येण्यासाठी रेल्वे , विमान कंपनीचे तिकीट बुक करून ठेवावे लागते . श्वास वाढवणे व श्वास रोखून धरण्यासाठी शास्त्रशुद्ध सराव करावा लागतो , त्यासाठी शारीरिक व्यायाम , पळणे ,चालणे, योगाचा अभ्यास व मनाची संतुलीत अवस्था टिकवून ठेवण्याचे तंत्र शिकावे लागते . सततचा सराव करावा लागतो . विपरीत परिस्थिती येणार आहे याची जाणीव ठेऊन शरीरसंपदा चपळ ठेवावी लागते . वजन वाढू नये सतत साथ द्यायला तयार शरीर तंदुरुस्त असावे म्हणून सातत्याने जिममध्ये व्यायाम करावा लागतो . ज्याठिकाणी जायचे आहे त्या गिरिशिखरांचा नकाशा घेऊन भौगोलीक रचना व इतिहास समजून घ्यावा लागतो . निळ्या ट्रॅकसूटमध्ये तंदुरुस्त जितेन्द्र गवारे त्यांचे हिमालयातील फोटोंचा स्लाईड शो वाईमध्ये दाखवत असताना सगळे प्रेक्षक थंडगार झाले होते , अचंबित झाले होते. प्रत्येकाला प्रश्न पडलेला होता की हे सगळे उपदव्याप करून स्वतःच्या प्रिय कुटुंबापासून एक दोन महिना दूर राहून आर्थिक भूर्दंड सहन करून यानां काय मिळवायचे असते ? कशाला जीव धोक्यात घालून अडचणींचा सामना करत बसायच ?
शेवटी जितेन्द्र गवारे यांनी प्रेक्षकांना काही प्रश्न विचारायचे असल्यास विचारावेत असे वाक्य ऐकताच माझा  हात पटकन वर गेला .
          जिवाची पर्वा न करता , प्राणप्रिय कुटूंबातील सदस्यानां दूर ठेऊन , पंचवीस लाखांची आर्थिक झळ सोसून , एवढा शारीरिक व्यायामाचा त्रास सोसून जेव्हा तुम्ही हिमालयात जाता त्याऐवजी ते पैसे बँकेत मुदतठेव ठेऊन दर महिना व्याज मोजत बसण्या ऐवजी,निवांत सकाळी जरा उशीरा उठून , रिस्क न घेणारे साधे सर्वसामान्य माणसांसारखे जीवन जगायला तुम्हाला आवडत नाही का ? आणि तुम्ही अशा सफरींसाठी जाता त्यावेळी घरच्यांची अवस्था काय असते ? ते तुम्हाला अडवत नाहीत का ? माझा प्रश्न ऐकताच जितेन्द्र गवारे सहज हसत म्हणाले बसा सांगतो याची उत्तरे . आणि सगळ्यांनी कान टवकारले .
           आयुष्य म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा एक अविस्मरणीय प्रवास असतो . काहींचे जीवन अगदी रहाटगाडग्यासारखे असते .रोजचा दिवस सारखाच उगवतो . तेच तेच रुटीन जगणे असते . जीवनात काही नवीन उत्साहाने जगण्यासाठी आव्हानच नसते . बेसूर व कंटाळवाणे तेच तेच जीवन का जगावे माणसाने ? मला माणूस म्हणून जगताना चॅलेंजिंग , बाणेदार , शुरवीरासारखे धाडसी जगावे वाटते . आपले शरीर हे आराम करण्यासाठी , खाऊन जाडजूड होऊन निवांत झोपण्यासाठी नसते . शरीराला कार्यमग्न , उर्जावान ठेवण्यासाठी मावळ्यांसारखे चपळ ठेवण्यासाठी योग्य आहार , योग्य दिनचर्या असावी असे मला वाटते . त्यासाठी दरवर्षी कोठे ना कोठे मी गिर्यारोहणाची मोहीम आखत असतो . गिर्यारोहण हा साहसी खेळ आहे . या खेळात हिमशिखरे कधी अंगावर पडतील , आपण कधी या पर्वतशिखरांखाली गाडले जाऊ याची शाश्वती नसते . आपला हा श्वास कधी संपेल हे सांगता येत नाही . जर रोजचा दिवस जीवनातील एक साहसी खेळ म्हणून जगलो तर संपूर्ण जीवन एक उर्जेची धारा असल्यासारखे वाटेल .
              दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे . माणूस कितीही श्रीमंत असू द्या तो कधीच समाधानी नसतो . गरीबानां श्रीमंत व्हायचे म्हणून ते धावत असतात व श्रीमंतानां अधिक श्रीमंत व्हायचे असते म्हणून ते अधिक धावपळ करतात . आणि पैसे टिकवून ठेवण्यासाठी कंजूषवृत्तीने जगताना आपल्या इच्छा मारण्यात अर्थ काय ? अधिक पैसे मिळविण्यासाठी सामान्य लोकानां फसवून टोप्या लांडीलबाडी करून दिवसरात्र पैसे कसे वाढतील या विचारांत स्वतःलाच काहीजण फसवत असतात . असे जीवन मला जगायचे नाही .
            तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर फार सोपे आहे . मी असा आळशी, निवांत  बेसूरा जगू नये म्हणून माझी पत्नी , माझे कुटूंबीय स्वतःच अशा मोहीमेमध्ये मला मदत करत असतात . शेवटी जगताना मरण कधी तरी येणारच . मग मरण पुण्यात आले काय किंवा हिमालयाच्या कुशीत आले काय ? मरण्याच्या अगोदर जिवंत जगले पाहीजे असे मला वाटते . मृत्यू त्यामुळे मित्र असल्यासारखा वाटतो. मग मित्रासोबत भिती कशाला वाटायला पाहीजे ?
आणि सर्वात शेवटी हे अगदी मनातलं सांगतो . जी माणसे सर्वसामान्य रुटीन पद्धतीने जगतात ती रुटीन पद्धतीनेच मरतात . जी माणसे असामान्य मोठ्या ध्येयाने पछाडलेली असतात ती असामान्य कर्तृत्व करतात. त्यांच्या कर्तृत्वाची दरवळ हळूहळू सगळीकडे पसरते व समाजही एक दिवस त्यांची दखल घेतोच . गिर्यारोहन क्षेत्रात जे काम मी केले त्यामुळेच तर तुम्ही मला या कार्यक्रमाला का बोलवले ना ?
            प्रत्येकाच्या जीवनाची फिलॉसॉफी वेगवेगळी असते किंवा ती वेगवेगळी असलीच पाहीजे . जितेन्द्र गवारे त्यांच्या आगळ्यावेगळ्या विचारांमूळे व धाडशी जीवनशैलीमुळे कायम लक्षात राहीले .
         जितेन्द्र गवारेंचा आज वाढदिवस आहे . त्यामुळे आजचा दिवस त्यांच्यासाठी खास आहे . अनेक मोहीमा ते आयोजित करत असतात . त्याच्यां सर्व गिरिशिखरांच्या मोहीमानां खूप खूप शुभेच्छा !
💐💐💐💐💐💐💐💐💐
 
https://www.facebook.com/share/r/Nsc8DB6Par2Xyu95/?s=chYV2B&fs=e&mibextid=6AJuK9

https://www.instagram.com/reel/ChZ5rlJq-dL/?igsh=Z2V3cGRqNDBud21s

सुनील काळे✍️ 
9423966486

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...