ब्लॉग संग्रहण

शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५

चित्रकार सदानंद बाकरे यांची आठवण

*चित्रकार सदानंद बाकरे यांची आठवण*
  🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭
                     आयुष्यामध्ये काही प्रसंग काही आठवणी अशा असतात की आपण किती जरी ठरवले की त्या विसरायच्या तरी ते शक्य होत नाही .काहीतरी प्रसंग असे येतात आणि त्या आठवणी परत नव्याने जागे होतात .आज संध्याकाळी सात वाजता आमच्या निसर्ग आर्ट गॅलरीच्या नेहमीच्या सकाळी १० ते ६ या वेळेनंतर अचानक एक कुटूंब चित्रप्रदर्शन पहायला आले . आमचा कामगार लगेच म्हणाला वेळ संपली , म्हणून ते परत जात होते इतक्यात मी माझा वॉक संपवून परतलो होतो . गेटच्या दारात त्यांची भेट झाली ते तरुण जोडपे दुचाकीवरून आले होते . रेनसूट घातला होता तरी पावसात भिजत आल्याने ओलेचिंब झाले होते . साताऱ्यावरून प्रवास करून आले होते रस्त्यात जाताना त्यानां निसर्ग आर्ट गॅलरीचा बोर्ड दिसला म्हणून त्यांनी विचारले होते . अचानक मला सदानंद बाकरे या मोठ्या चित्रकाराची आठवण झाली . मी त्यानां आमचे प्रदर्शन दाखवले थोड्या गप्पा मारल्या . दोघे तरुण जोडपे फारच खूष झाले . जाताना त्यांनी अनेकवेळा कृतज्ञता व्यक्त केली . त्या तरुण मुलाने माझ्यासोबत एक फोटो काढला. ते आनंदाने धन्यवाद देत गेले आणि माझी आठवणीची लेखणी सुरु झाली .
            कोकण हे सगळ्यांनाच आवडणारे ठिकाण आहे . कोकणातल्या बोटी समुद्र आणि नारळाच्या बागा ,जलदुर्ग , सागरकिनारे , बोटी हे रंगवणे हे मला आजही सर्वात आवडते काम वाटते . कारण कोकण व तेथील निसर्ग हा विषयच भारी आहे .  
            असेच एकदा कोकणाच्या दौऱ्यात चित्र काढायला गेलो असताना दापोली येथे गेलो होतो . दापोलीला छान कृषी महाविद्यालयामध्ये मुक्काम केला होता आणि जवळपास कोणकोणती ठिकाणे पाहण्यासाठी आहेत याचा शोध घेत होतो . त्यावेळी मुरुड ,अंजरले ,दिवेआगार ,बोर्डी , हरिहरेश्वर , श्रीवर्धन त्याच्याजवळ असणारे जीवनेबंदर या ठिकाणी चित्र काढण्यासाठी फिरत होतो . मुरुड मध्ये असताना आम्ही एका प्रायव्हेट बंगल्यामध्ये रहात होतो या बंगल्याचे मालक अतिशय बोलके आणि उत्साही गृहस्थ होते . त्यांचे आडनाव श्री .मुरुडकर . त्यादिवशी मी परिसरातील चित्र काढून आल्यानंतर रात्री जेवत असताना मी चित्रकार आहे हे सांगितले .  माझी चित्रे पाहिल्यानंतर त्यांनी सांगितले की मुरूडमध्ये आमच्या येथे एक वयस्कर प्रसिद्ध चित्रकार राहतात त्यांचे नाव सदानंद बाकरे आहे . परंतु हे चित्रकार अतिशय लहरी एककल्ली व विचित्र वागतात पूर्वी मी त्यांना जेवणाचा डबा पुरवायचो . परंतु त्यांच्या जेवणासाठी इतक्या तक्रारी असायच्या की आता संपूर्ण गावामध्ये त्यांना जेवण देण्यासाठी कोणीही जात नाही .हे चित्रकार मोठे असून पूर्वी परदेशातही राहत होते असे आम्हा गाववाल्यानां माहिती आहे . तुम्ही त्यांना जरूर भेटा. 
         त्यांनी आवर्जून सांगितल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांना सोबत घेतले व तिघेजण  बाकरेसरांच्या बंगल्यावर गाडी घेऊन गेलो .
          आम्ही बंगल्यात प्रवेश करण्यापूर्वीच आतून एका वयस्कर व्यक्तीचा मोठ्याने आवाज आला . कोण आहे रे तिकडे ? त्याबरोबर आम्ही लगेच थांबलो .आमच्या बरोबरचे श्री . मुरुडकर मालक यांनी लगेच पुढे जाऊन बाकरेसाहेबानां नमस्कार केला .पाचगणीवरून  निसर्गचित्रकार नवराबायको तुम्हाला भेटायला आलेले आहेत तर त्यांना भेटता येईल का ? असे विचारले . त्यांनी आतूनच विचारले अपॉईंटमेंट घेतलेली आहे का ? आम्ही त्यांना सांगितले की नाही .  त्यांना सांगा , पहिले आपण माझी अपॉईमेंट घ्या आणि मग भेटायला या . त्यांचे संभाषण चालू असतानाच मी त्यांना सांगितले की मी आता मुरुड सोडून दुसऱ्या गावाला चाललो आहे त्यामुळे मला नंतर भेटायला वेळ मिळणार नाही . त्यांनी आतूनच उत्तर दिले येथून 3km अंतरावर एसटी स्टॅन्डजवळ एक सार्वजनिक टेलीफोन आहे तेथे जा . तेथून मला फोन करून माझी अपॉईमेंट घ्या त्यानंतर मी फोनवर तुम्हाला वेळ देईन व त्यानंतर आपण भेटू .अपॉईमेंट घेतल्याशिवाय मी कोणालाच भेटत नाही . त्यामुळे येथून लगेच चला , चालू पडा . थांबू नका ? असे सडेतोडे उत्तर आल्यामुळे मी आणि स्वाती निराशेने बाहेर पडलो . प्रत्यक्ष माणूस समोर असताना टेलीफोन करून अपॉईमेंट का घ्यायची ? हे तंत्र मला कधीच समजले नाही . पुढे मी माझ्या व्यापात सदानंद बाकरे यांना विसरूनही गेलो
         2002 साली माझे जहांगीर आर्ट गॅलरी येथे ऑडिटोरियम हॉल येथे भव्य प्रदर्शन भरलेले होते . जहाँगीर आर्ट गॅलरीबद्दल बाकीचे लोक काहीही म्हणोत परंतु माझ्यासाठी चित्रविक्रीचे ते उत्तम ठिकाण आहे . त्यामुळे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन करताना मी जास्तीत जास्त चित्रे घेऊन जात असतो . चित्र चालू असताना चित्रप्रदर्शन चालू असताना जी चित्रे विकली जातात ती मी ताबडतोब काढून ठेवतो आणि भरपूर स्टॉक सोबत असल्यामुळे नवनवीन चित्रे प्रत्येक वेळी डिस्प्ले करत असायचो . अशा या प्रदर्शनांमध्ये चित्रप्रेमी लोकांची खूपच प्रचंड गर्दी असायची आणि प्रत्येकाकडे बोलायला वेळ द्यायला लक्ष द्यायला पुरेसा वेळही नसायचा . प्रदर्शनात खूप कामे व भेटाभेटी असल्याने दिवस व्यस्ततेतच संपायचा .
            त्यावेळी एकदा दुपारच्या वेळी गॅलरीमध्ये एक अर्धा  बाह्याचा पांढरा झब्बा घातलेले ,निळी लुंगी खांद्यावर , सोबत एक पांढरी शबनम घेऊन एक वयस्कर गृहस्थ लंगडत लंगडत एका तरुण माणसाच्या हाताला धरून आत आले . त्यांच्याबरोबर आमच्या ओळखीचे प्रशांत शहा व आशुतोष आपटे , ज्ञानेश्वर ढवळे हे चित्रकार मित्र होते . या गृहस्थांना नीट चालता येत नव्हते तरीही ते कष्टाने लंगडत लंगडत चाललेले होते . त्यांच्या उजव्या पायाला मोठी जखम झालेली होती त्या पांढऱ्या बँडेजवर त्यांनी पॉलिथिनची साधी प्लास्टिकची पिशवी बांधलेली होती . आत येताच आशुतोष आपटे यांनी त्यांची ओळख  सांगितली सुनील हे प्रसिद्ध चित्रकार सदानंद बाकरे ते तुमचे प्रदर्शन पाहायला खास टॅक्सीने तब्बेत बरी नसताना हॉस्पीटलमधून आलेत .
         एका क्षणार्धात मी बाकरेंच्या मुरूडच्या आठवणीमध्ये  गेलो . मला लगेच आठवले  त्यांनी मला त्यांच्या घरी भेट घेऊन दिली नव्हती , त्यामुळे मी थोडासा रागाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले . बाकरेसाहेबांनी आशुतोष आपटे , ज्ञानेश्वर ढवळे , प्रशांत शहा यांच्याबरोबर माझे चित्र प्रदर्शन पाहिले स्वातीच्या फुलांची चित्रे व माझी पाचगणी महाबळेश्वर येथील निसर्गचित्रे पाहून ते खूप भारावले नंतर टेबलापाशी आल्यानंतर त्यांनी माझी गळाभेट घेतली .
        त्यावेळी मी त्यानां म्हणालो  मुरुडला तुमच्या घरी आलो होतो परंतु आपली भेट त्यावेळी झाली नाही ती भेट आज होणार होती . त्यावेळी माझ्याकडे मोबाईल फोन नव्हता , आता आहे .कोकणात पुन्हा कधी आलो की तुमची अपॉईमेंट घेऊनच येईन . त्यावेळी ते मला निराश स्वरात म्हणाले अहो ती माझी चूकच होती . कशाला आठवण काढलीत ?  आता म्हातारपणात हातपाय थकलेत . कोणाचा आधार नाही . त्यावेळचा जोष व हुशारी आता राहीली नाही . आता तर शरीरही साथ देत नाही . तुम्ही त्यावेळी आला होता त्यावेळी भेटलो असतो तर बरे झाले असते . आता काय शेवटचे दिवस उरलेत . येणारा दिवस ढकलतोय .
          आज कितीतरी दिवसांनी हॉस्पिटलमध्ये असताना मला तुमच्या दोघांविषयी टाईम्स ऑफ इंडियात आलेले " कलर्स ऑफ लाईफ " हे  आर्टिकल वाचायला मिळाले . मग मी हॉस्पिटलमधून तडक तुमचे चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी आलो आहे . खरे सांगतो , तुमच्या दोघांचे प्रदर्शन खूप छान , अप्रतिम आहे . मला खूप आवडले . त्यांनी पाठीवर हात ठेऊन कौतुकही केले . थोडा वेळ खुर्चीवर बसले व त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा प्रदर्शन पाहण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळी आमचे मित्र प्रशांत शहा मला  म्हणाले अरे मित्रा ,  
' काय नशीबवान आहेस ' अशी मोठी माणसे तुमच्या प्रदर्शनाला दाद देत आहेत . त्यांचा अभिप्राय घे व फोटो घे . त्यावेळी बाकरेसाहेबांनी आमच्या अभिप्राय वहीमध्ये त्यांची सही  करून थरथरत्या हाताने एक छोटासा अभिप्रायही लिहिला . त्यांच्या हाताला झालेला कंप जाणवत होता , थरथरत्या हाताने त्यांनी शेवटचा अभिप्राय लिहिला .त्यावेळी त्यांनी सांगितले मुरूडच्या घराबाहेर फिरत असताना त्यांच्या पायाला विषारी साप चावला .त्या दंशामुळे पायाला मोठी इजा झालेली आहे . स्वतःचे जवळचे कोणी नातेवाईक माणसे मदतीला नव्हती त्यामुळे योग्य उपचार झाले नाहीत . त्यासाठी ते मुंबईमध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते . आता जखम बरी झाली आहे . थोडेफार चालू शकत होते .
           त्यांनी प्रेमाने निरोप घेतला व आता फोन करू नको डायरेक्ट मुरुडला या असे आमंत्रणही दिले होते , परंतु नंतर मी त्यांच्याकडे परत गेलो नाही .आज कितीतरी वर्षानंतर  आलेल्या एका तरुण जोडप्यामुळे मला  त्यांची परत एकदा आठवण झाली . 
          केकू गांधी यांच्या गॅलरी केमोल्डमध्ये मी तीन वर्ष फ्रेमिंग सेक्शनमध्ये होतो . तेथे प्रोगेसिव्ह आर्ट ग्रुप स्थापन केलेले हुसेन , रझा , आरा , गाडे , सुझा , बाकरे यासारख्या जगप्रसिद्ध कलाकारांची चित्रे गॅलरी मधून फ्रेमिंगसाठी येत असत . त्यांच्या चित्रांच्या किमंतीचे आकडे ऐकले तरी कानाला शॉक लागल्यासारखे वाटायचे . त्यांची नावे चित्रकला क्षेत्रात मोठी दबदबा करणारी व आदराने घेतली जातात . त्यानंतर या ग्रूपमधले पांढरा झब्बा लुंगी घालून आलेले हताश चित्रकार सदानंद बाकरे जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रत्यक्ष समोर पाहीले . त्यांची छबी कायम लक्षात राहीली . 
        एकदा सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे प्रकाश राजेशिर्के भेटले होते ते त्यांच्या संपर्कात होते . त्यांनी त्यांची दुर्देवी कैफियत थोडक्यात सांगितली . एका मोठ्या कलावंत चित्रकारांच्या उतारवयात काय उपेक्षा होवू शकते याची मला कहाणी त्यांना ऐकवली . मला बाकरेंच्या स्वभावाची प्रचिती आलेली होती त्यामुळे पुढे त्यांचे काय झाले याची मला आता पूर्ण माहिती नाही .
           गेटच्या दारात आलेला पाहूणा , मित्र किंवा अनोळखी व्यक्ती असो , तो गरीब असो वा श्रीमंत असो , चित्रकार असो वा सामान्य माणूस असो . मी त्याच्यासाठी प्रत्यक्ष गेटवर जावून त्याची दखल घेतो . दोन शब्द बोलतोच . कारण तो एक माणूस आहे आणि " माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहीजे " असे मला मनापासून वाटते .
       आपण माणुसकी जपणारे नसलो तर तुमच्या छोटेमोठेपणाला काहीही अर्थ नाही याची आठवण मला सदानंद बाकरे प्रसंगातून कायमची लक्षात राहीली आहे . आपण माणुसकीसाठी कायम सतर्क राहीले पाहिजे असे मला वाटते .
        मोठेपणाची झूल तारुण्यात जोर दाखवते , उतारवयात सर्वांचाच जोष उतरलेला असतो . मग उतारवयात पश्चाताप होतो पण  त्यावेळी खूप उशीर झालेला असतो . 
आज असलेले यश कधी पलायन करेल ? व अपयशाचा कधी सामना करावा लागेल ? हे कोणालाच माहिती नसते . आयुष्याचा खेळ कधी कोणाचा पलटेल याची खात्री कोणी देऊ नये . 

" समय बडा बलवान होता है " .
 
" माणूसकी " नेहमी जागृत ठेवण्यासाठी सर्वानां शुभेच्छा !
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुनील काळे✍️ 9423966486
निसर्ग आर्ट गॅलरी [वाई ]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जगण्याचे " स्टॅन्डर्ड " समजलेला माणूस- प्रा . डॉ . ज्ञानदेव झांबरे सर************************        पाचगणी हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शैक्षणिक केंद्र आणि थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे . ब्रिटिश काळापासून वेगवेगळ्या लोकांनी स्वधर्मियांसाठी शाळा सुरु केल्या . त्यामुळे येथे त्रेचाळीस शाळांमध्ये अठरापगड जातींचे लोक एकत्रित रहात असल्याने येथे कॉस्मोपोलीटन संस्कृती आहे . पाचगणी शहर छोटे असल्याने बहुभाषिक वेगवेगळ्या प्रांतातील मंडळी छानपैकी एकत्रितपणे राहतात . अशा या गावात माझे बालपण गेले . दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि चांगले मार्क मिळाले म्हणून अकरावीसाठी कॉलेजचा शोध सुरु झाला . त्याचवर्षी वाईला किसनवीर महाविद्यालयात नव्याने सायन्स कॉलेज सुरु झाल्याचे कळाले . BSc डिग्री मिळण्याची चांगली सोय झाली होती . त्यामुळे घरच्यांनी मला अकरावी सायन्सला प्रवेश घेण्यासाठी फोर्स केला . मी मात्र नाराज झालो होतो कारण माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले होते व सायन्सचे विषय इंग्रजी माध्यमात शिकवले जाणार होते . इंग्रजीची माझी खूप आबाळ झाली होती कारण सातवीपर्यंत आम्हाला इंग्रजीचे शिक्षकच नव्हते . इंग्रजी , गणित , सायन्स या विषयाची तर माझी कुडंली कधी जमलीच नव्हती पण त्याकाळी उलट उत्तर देण्याची प्रथा नव्हती त्यामुळे मी मुकाटपणे वाईला सायन्स कॉलेजला रोज एस.टी बसचा पास काढून येऊ लागलो .       सायन्सच्या या वर्गात शिक्षक मला काय शिकवत होते याचे मला भान नव्हते कारण मला इंग्रजी भाषाच समजत नव्हती . चाळीस पन्नास विद्यार्थी असल्याने मागच्या बेंचवर बसायला लागलो आणि मला एक नविन छंद लागला . मी चित्रे काढायला लागलो . माझ्या मित्रांची , शिक्षकांची , प्राण्यांची , वनस्पतींच्या जर्नलमध्ये आकृत्या काढणे मला आवडू लागले . कधी कधी मी वाईच्या बसमधून पसरणीघाटात उतरायचो . या घाटातील वळणदार रस्ते , दुतर्फा असलेली वडाची झाडे , पांडवगडाच्या पायथ्याच्या सभोवतालची छोटी छोटी चमकणारी भातशेती , ऊन पावसाचा खेळ , संध्याकाळची सुर्यास्ताची रंगउधळण , वाईच्या गणपती मंदिराची , वेगवेगळ्या घाटाची चित्रे मी जलरंगात उतरवू लागलो . थोडक्यात मला चित्रकलेची फारच आवड निर्माण झाली होती . चित्रकार होण्यासाठी लागणारी इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा मी बारावी सायन्सला असताना दिली व त्यामध्ये मला 'अ 'श्रेणी प्राप्त झाली होती .       चित्रकलेचे वेड इतके वाढले की मी सकाळी सहा वाजताच थंड हवेत चित्र काढायला जायला लागलो . टेबललॅन्डच्या पठारावर तर कधी सिडनेपाँईटच्या उंच चौथऱ्यावर बसून मी धोमधरणाचे पाणी ,कृष्णा व्हॅलीतील डोंगररांगा , कधी पांगारी तायघाट जवळच्या पारसी पॉईंटची चित्रे रेखाटू लागलो . आणि अचानक माझ्या लक्षात आले मला अतिथंड हवेत सकाळी फिरल्याने सर्दीचा त्रास सुरु झाला आहे . ऑक्सिजिन घेण्यासाठी दोन्ही नाकपुड्या बंद झाल्याने श्वास घेणे मुश्कील झाले आहे . डॉक्टरांनी माझे ऑपरेशन करून नाकातील वाढलेले पॉलीप्स काढावे लागतील यासाठी तातडीने ॲडमिट केले . नाकाला मोठे बँडेज बांधूनच मी 12वी सायन्सची प्रॅक्टीकल परिक्षा दिली होती . त्यानंतर  पुण्याला चित्रकलेच्या अभिनव कॉलेजला मी गेलो . चित्रकार झालो व परत पाचगणी महाबळेश्वरचा निसर्ग रंगवू लागलो होतो . थंड हवेत वेळीअवेळी सतत डोंगररांगावर भटकंती केल्याने माझा नाकाने श्वास घेण्याचा त्रास आणखीनच वेगाने वाढू लागला . डॉ. प्रशांत पोळ यांनी वेगवेगळ्या वर्षी चारपाच वेळा माझे ऑपरेशन केले आहे . एकंदरीत मला थंड हवेची ॲलर्जी झाल्याचे सिद्ध झाले व डॉक्टरांनी 2014 साली मी पाचगणी सोडावी लागेल असे निक्षून सांगितले . मला माझे पाचगणीचे बस्तान सोडून  कायमचे  वाईला यावे असे त्यांनी सांगितले व नाईलाजाने मी काही दिवस वाईला राहण्याचे ठरवले .          वाई कॉलेजचे प्राध्यापक असलेले माझे मित्र श्री .पटकुरे सर यांनी मला सह्याद्रीनगर या परिसरात बोलावले . थोडी चर्चा केली तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की त्यांच्या सोसायटीत " प्रज्ञाअमृत " नावाचा एक बंगला आहे . त्याचे मालक श्री .व सौ झांबरे दोघेही शिक्षक आहेत . त्यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर पाच खोल्यांचे घर भाड्याने मिळते . तेथे काही दिवस राहून वाईच्या परिसरातील चित्रे काढावीत . हवा बदलाने तब्बेतीवर काय परिणाम होईल हेही कळेल व एखादी जागा आवडली तर घर बांधण्यासाठी वाईत एन ए प्लॉट घ्यावा या उद्देशाने मी त्यांच्या घरी आलो .         सहयाद्रीनगरात असलेला " प्रज्ञाअमृत " अतिशय मेंटेन केलेला ,फुलझाडे असलेला सुंदर बगीचा व पार्किंगची सोय असलेला बंगला बघताक्षणीच मला आवडला . बंगल्याच्या पाठीमागे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी स्वतंत्र जीना होता . आतमध्ये सर्व नीटनेटकेपणा होता . खिडक्या दरवाजानां पडदे लावलेले होते . आम्ही दोघेही चित्रकार असल्याने चित्रकाम करण्यासाठी व राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होती . झांबरेसर , झांबरेमॅडम व त्यांची मुलगी मृणाल हे तीनच माणसे खाली रहात होते . त्यांचा मोठा मुलगा प्रणव शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला होता . पहिल्या भेटीतच आमची छान ओळख झाली व लगेच प्राथमिक बोलणी करून मी एका आठवड्यात पाचगणीवरून वाईला शिफ्ट झालो . सर व मॅडम दोघेही स्वच्छताप्रेमी होते . त्यामुळे मी रोज मॉर्निंगवॉकला वाकेश्वरला जाताना पाहायचो झांबरे सर स्वतः साफसफाई करायचे , कुंड्यांना पाणी घालणे , झाडांची निगा राखणे ,खतपाणी देणे . पूर्ण आवार पाण्याने स्वच्छ धूवून काढायची त्यांनां आवड होती . आम्ही कधीतरी समोरासमोर भेटलो की अनेक विषयांवर गप्पा मारायचो . वाईत राहण्याचे फायदेतोटे तपासून पहायचो . येथील परिसराचा माणसांचा स्वभाव व आचरणांवर चर्चा करायचो . नवनव्या जागा शोधायची आता सवय लागली होती . त्याचा आढावा घेताना झांबरे सर मनापासून प्रतिक्रिया द्यायचे .       " प्रज्ञाअमृत " या बंगल्यामध्ये रहात असताना एक घडलेला प्रसंग मला आजही लक्षात आहे व आयुष्यभर पुढेही कायम लक्षात राहील . एकदा रविवारी सुट्टीचा दिवस होता . साधारण नऊ दहा वाजताची वेळ असेल . आमची घरकाम कारणारी बाई आज येणार नव्हती त्यामुळे दोघेही निवांत पेपर वाचत बसलो होतो . आणि शेवटच्या दूरच्या खोलीतील अचानक कोपऱ्यातील किचनसिंकचा का वॉशबेसीनजवळचा नळ अलगद तुटून पडला होता . पाईपलाईन उघडी झाली आणि वेगाने पाणी रूममध्ये पसरु लागले होते . आम्ही विरुद्धदिशेच्या बाजूला असल्याने काही आवाजच आला नाही . हळूहळू पडणाऱ्या पाण्याने ती रुम भरून गेली होती आणि अचानक खालून झांबरे मॅडम व सर दोघेही वरच्या मजल्यावर आले .त्यांनी घराची बेल वाजवली आणि त्यांच्या लगेच लक्षात आले की शेवटच्या खोलीतून पाणी जवळपास चारपाच इंच भरून दुसऱ्या रूममध्ये पाणी पसरू लागले होते . झांबरे सरांनी लगेच प्लंबरला फोन लावला येताना नवीन नळ घेऊन यायला सांगितले . पटकन टेरेसवर जावून मुख्य पाईपलाईन बंद केली . इतक्यात झांबरे मॅडम पटकन खाली गेल्या , येताना त्यांनी फरशी पुसण्याचा रबरमॉप व चारपाच फरशी पुसण्याचे जाड कपडे घेऊन एक बादली आणली . त्यांची मुलगी मृणाल देखील मदतीला आली . इकडे बनियन व लुंगी घालून निवांत बसलेले झांबरे सर गुडघ्यापर्यंत लूंगी गुंडाळून पटकन फरशीवरील पाणी बादलीत भरू लागले . झांबरे मॅडम यांनी लगेच साडीचा पदर खोचून मॉपने पाणी बाहेर टाकायला सुरुवात केली . मग आम्ही दोघेही त्यांच्यामध्ये सामील झालो व सर्व जणांनी रुममध्ये साचलेले पाणी काढून तासाभरात सगळा बंगला चकाचक केला . नंतर प्लंबर आला त्याने नवीन नळ बसवला .आता तुम्ही म्हणाल यात आश्चर्याची गोष्ट काय ? तर आम्ही झांबरे सरांचे भाडेकरू होतो . पाण्याचा नळ दुरुस्त करून रुम साफसफाई करण्याची जबाबदारी आमची होती . ते घरमालक होते . उच्चशिक्षित पी एच डी झालेले कॉलेजचे प्राध्यापक होते . मॅडम एम एस सी व जॉय स्कूलच्या उपप्राचार्या होत्या . एकदा घर भाड्याने दिले की त्याची देखभाल करण्याची जबाबदारी भाडेकरूचीच असते . त्यादिवशी दुपारी आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि तो प्रसंग एन्जॉय केला . कोणीही कसलीही तक्रार झाली नाही . दोन चार महिन्यातच आम्ही " प्रज्ञाअमृत " बंगला सोडला . नवीन जागा घेतली तेथे मोठे अपयश आले . नंतर मग आमचा मेणवली गावाजवळ " निसर्ग " नावाचा बंगला तयार केला . मागच्या वर्षी तेथे " निसर्ग आर्ट गॅलरी " नावाने चित्रप्रदर्शनही भरवले होते . अनेक वेगवेगळ्या जिल्हयातील , तालुक्यातील पर्यटक प्रदर्शन पाहण्यासाठी येत होती . एकदा किसनवीर कॉलेजचे प्रा. श्री रमेशचंद्र बारगजे सरांनी फोन केला की त्यांच्या कोल्हापूरच्या 1973 सालच्या एम .एस .सी बॅचचे क्लासमेटस यांचे वाई येथे गेटटुगेदर आयोजित केले आहे त्यावेळी तुमची निसर्ग आर्ट गॅलरी पाहायला सर्वजण येणार आहेत . धोमचे मंदिर पाहून सर्व गाड्या निसर्ग आर्ट गॅलरी पाहण्यासाठी गेटपर्यंत आल्या . त्यानां पार्कींगची जागा दाखवत होतो त्यावेळी एक गाडी मात्र गेटपासून दूर थोड्या अंतरावर उभी राहीलेली पाहीली . बारगजे सरानां ती गाडी बाहेर का थांबली म्हणून विचारले तर सरांनी कपाळावर हात मारून घेतला . मला म्हणाले काय बोलू आता ? ती गाडी तुझ्या सख्या चुलत व मावसभाऊ असलेल्या हनुमंत काळे यांची आहे . तो आमच्या बॅचचा सर्वात अतिशय हुशार विद्यार्थी होता . युनिव्हरसिटीत प्रथम आला होता . त्याला आम्ही सांगितले चित्रकार सुनील काळे तुझा भाऊ आहे . त्याने वाई ,पाचगणी महाबळेश्वर या परिसरातील असंख्य अप्रतिम चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत , त्याची मिसेस चित्रकार स्वाती काळे हिने असंख्य फुलांची तैलरंगात चित्रे काढलेली आहेत . उत्तम चित्रप्रदर्शन आहे . तुमची तीस वर्ष झाली भेट झालेली नाही तर तुम्ही आता जरूर भेटा व प्रदर्शनही पहा . पण तुझा भाऊ गाडीतून उतरायला तयार नाही त्याचे कुटुंबीय गाडीतच बसून आहेत .ते म्हणतात आम्ही भावकीत जात नाही कारण आमचे " स्टॅन्डर्ड " मोठे आहे . मी मोठ्या कंपनीत ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर होतो . तो साधा चित्रकार आहे त्याची माझी तुलना होऊ शकत नाही . तुम्ही सगळे प्रदर्शन पाहायला जा आम्ही बाहेर रस्त्यावर गाडीत बसून राहू . तो एक तास बाहेर थांबला पण घरात आलाच नाही . खरे तर हा हनुमंतदादा आता हेमंत नाव लावतो . कारण आईबापाने ठेवलेले हनुमंत हे नाव त्याला आवडले नाही . अतिशय गरिबीतून त्याला शिक्षण दिले होते .स्वतःच्या कर्तबगारीने तो उच्चपदावर पोहचला त्याचे उच्चशिक्षित मुलीबरोबर लग्न झाले पण लग्नानंतर व अगोदर नोकरी करत असतानाही या दादाने कधीच कोणत्याही भांवडाला जवळ केले नाही . कोणत्याही नातेवाईकांकडे ते फिरकले नाहीत . कोणाशी कसलाही संबंध ठेवला नाही ,कोणालाही मदत केली नाही . संपूर्ण कुटुंबाला दूर ठेऊन दादा मोठा स्टॅन्डर्डवाला झाला . आमचा दादा कसा दिसतो हे मला पाहण्याची उत्सुकता होती . कारण तो माझ्यापेक्षा पंधरावीस वर्षांनी मोठा होता . पण " स्टॅन्डर्ड "आडवे आले . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात . शिक्षणामुळे माणूस विचारवंत होतो त्याच्या ज्ञानाच्या कक्षा उचांवतात . त्याचे जीवन सुखकर व समृद्ध होतेच पण त्याच्यां विशाल छायेत अनेकानां संजीवनी मिळते . उच्चशिक्षित भावाने मात्र आमच्या सर्वांसाठी त्याचे दरवाजे मात्र कायमचे बंद केले होते . उच्चशिक्षणाचा मला तेथे काहीच उपयोग झालेला दिसला नाही . इथे मला पीचडी झालेले उपप्राचार्य झांबरे सर आठवतात . उपप्राचार्या झांबरे मॅडम आठवतात . स्वतःच्या भाड्याने राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाशी प्रेमाने सुखदुःखाची विचारपूस करत असत . ते दोघेही स्वतःचे " स्टॅन्डर्ड "कधी गोंजारत बसले नाहीत .  सामान्य माणसासारखे राहून दोघेही असामान्य कामे करत राहीली . जॉय स्कूल व किसनवीर विद्यालयातील विद्यार्थी घडवताना आपल्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांला घडवण्याचे . " स्टॅन्डर्ड " काम त्यांनी आयुष्यभर केले व त्याचा गर्वही कधी केला नाही . जीवन जगण्याचे खरे " स्टॅन्डर्ड " त्यांनां कळले आहे म्हणून माझ्या त्या अतिउच्चशिक्षित एम एस सी फर्स्टक्लास झालेल्या अडाणी भावापेक्षा झांबरे पती पत्नींविषयी मला आदर वाटत आहे .     महिन्यापूर्वी एकदा झांबरे मॅडमचा मला फोन आला . त्यांनी विचारपूस केली व त्या जॉय स्कूलची नोकरी सोडून पुण्यात नातवाचा सांभाळ करण्यासाठी पुण्यात रहात असल्याचे सांगितले . मुलगा सिव्हील इंजिनियर व सुनबाई पेशाने सरकारी वकील असल्याने दोघेही कामात व्यस्त झाले मग मुलाकडे लक्ष कोण देणार ? म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला . आणि ते ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . माझी आर्ट गॅलरी होती . ती सांभाळताना माझी तीन वर्षाची मुलगी सांभाळण्यासाठी मी आईवडीलानां विनंती केली तर त्यांनी नकार दिला . गावाकडे शेतीची कामे असतात त्यामुळे तुमची मुलगी तुम्हीच सांभाळा असे उत्तर आईने दिले . शेवटी आमच्या संघर्षाच्या लढाईत मुलगी देवाघरी गेली . ती वारली त्यावेळी मी माझ्या मेव्हण्याला सत्यजितला फोन केला . तो म्हणाला मी अत्यंविधीला येऊ शकणार नाही . तो देखील Phd झालेला आहे . अतिउच्चशिक्षित आहे . त्याला भाचीच्या अत्यंविधीला जाण्याची गरज वाटली नाही . बहिणीला कठीण स्थितीत आधार देण्याची आवश्यकता वाटली नाही आणि पुढे आता सत्तावीस वर्ष झाली तरी त्याला आमची कधीच आठवणही झाली नाही . काय उपयोग त्या डॉक्टरेटचा ? जिथे माणूस माणसाला ओळखत नाही .मोबाईल ,फोन , लॅपटॉप आले तंत्रज्ञान वाढले तरी मनाची आढी मात्र कायम राहीली .कधी त्याच्या कुटूंबाने संपर्कच केला नाही कारण "स्टॅन्डर्ड " आडवे आले .त्यावेळी खऱ्या अर्थाने एकटे जगायला शिकलो . अशावेळी झांबरे मॅडमचा त्याग मला प्रेरणा देणारा वाटतो . मुलांविषयची माया त्यांच्या कृतीतून दिसते .इकडे सरांनां रिटायर्ड होण्यापूर्वी खानावळीत जेवण करावे लागले . काही महिने एकटेपणा स्विकारावा लागला . पण त्यांनी कधीही त्याची तक्रार केली नाही . कॉलेजमध्ये त्यांनी अनेक कार्यक्रमात स्वतःला झोकून दिले . त्यांच्या कॉलेजच्या कारकीर्दीची मला जास्त माहिती नाही पण त्यापेक्षा माणुसकी जपणारे , कुटुंबाला जपणारे , अभिमान नसणारे , मोठेपणाचा त्याग केलेले गार्डनमध्ये स्वच्छता करणारे डॉ झांबरे सर मनाला फार भावले . त्यांच्या मुलाचे लग्न ठरले त्यावेळी प्रणवच्या लग्नाला आम्ही दोघेही गेलो होतो . लग्नकार्यालय पूर्णपणे भरून गेले होते प्रचंड गर्दी होती तरीही झांबरेसरांनी आम्हाला बरोबर पकडलेच . शाल श्रीफळ देऊन योग्य मानसन्मान केला त्यावेळी मला या झांबरे कुटूबांचेखरे " स्टॅन्डर्ड " कळाले . वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य नामवंत लहानमोठ्या माणसांनी संपूर्ण हॉल भरून गेला होता . काय असते स्टॅन्डर्ड ?? तुम्ही जगत असता त्यावेळी त्या तुमच्या जगतानाच्या काळात असंख्य माणसे भेटतात . त्यातील काही माणसे चांगली वागलेली असतात काही वाईट वागलेली असतात . पण शेवट काय असतो ? तुमच्या जगण्याला कधीतरी मर्यादा येतेच . कधीतरी शरीर थकते व तुम्हाला अंतिम श्वास घ्यावा लागतो . त्यानंतर कोणत्यातरी स्मशानघाटाजवळ तुमची राख होते ती राख पाण्यात मिसळते तुमचे अस्तित्व संपते . जग काही दिवस तुमची आठवण काढते नंतर तुमची कोणी आठवणही काढत नाही . तुमचे " स्टॅन्डर्ड " काही असो शेवटी तुमची राखच होते . हे ज्यानां समजते त्यांचे भावविश्व वेगळे असते . ते कायम हसतमुख असतात . ते त्यांच्या कृतीतून त्यांचे वेगळेपण जोपासत असतात .अनेकानां त्यांचे जगणे प्रेरणा ठरत असते .असे जीवनाचे खरे " स्टॅन्डर्ड " कळालेले झांबरे सर मला आवडतात . काही महिन्यांपूर्वी अचानक आमच्याकडे घरकाम करणाऱ्या बाई व माळीकाम करणारा त्यांचा मुलगा या दोघांनी आमचे काम सोडले. काही दिवस आम्ही वेगवेगळी माणसे शोधली पण त्यांच्या पगाराच्या अपेक्षा जास्त असल्याने जुळले नाही . मग झांबरे सर पुन्हा आठवले . Phd झालेला माणूस स्वतः झाडलोट करतो , बागेची निगा राखतो तर आपण का लाजायचे ? त्यांच्यापासून प्रेरणा घेतली . आता मी बागकामात तरबेज झालोय बागेत शेतात काम केल्यामुळे आरोग्यही चांगले राहते याचा शोध लागला . आपण कोणावर विसंबून राहायचे नाही काम करत राहायचे हेच खरे " स्टॅन्डर्ड " झांबरे सरांकडून मी शिकलो . खरी डॉक्टरेट तीच आहे . मे महिन्यात ते आता रिटायर्ड होतील . अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या सरानां व झांबरेमॅडम या दोघांनाही उर्वरीत रिटायर्ड आयुष्य सुखसमृद्धीचे आनंदाचे जावे त्यांच्या मनासारखे जगताना उत्तम आरोग्य प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना व मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !चित्रकार - सुनील काळे✍️9423966486निसर्ग आर्ट गॅलरी [वाई]