*चित्रकार सदानंद बाकरे यांची आठवण*
🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭
आयुष्यामध्ये काही प्रसंग काही आठवणी अशा असतात की आपण किती जरी ठरवले की त्या विसरायच्या तरी ते शक्य होत नाही .काहीतरी प्रसंग असे येतात आणि त्या आठवणी परत नव्याने जागे होतात .आज संध्याकाळी सात वाजता आमच्या निसर्ग आर्ट गॅलरीच्या नेहमीच्या सकाळी १० ते ६ या वेळेनंतर अचानक एक कुटूंब चित्रप्रदर्शन पहायला आले . आमचा कामगार लगेच म्हणाला वेळ संपली , म्हणून ते परत जात होते इतक्यात मी माझा वॉक संपवून परतलो होतो . गेटच्या दारात त्यांची भेट झाली ते तरुण जोडपे दुचाकीवरून आले होते . रेनसूट घातला होता तरी पावसात भिजत आल्याने ओलेचिंब झाले होते . साताऱ्यावरून प्रवास करून आले होते रस्त्यात जाताना त्यानां निसर्ग आर्ट गॅलरीचा बोर्ड दिसला म्हणून त्यांनी विचारले होते . अचानक मला सदानंद बाकरे या मोठ्या चित्रकाराची आठवण झाली . मी त्यानां आमचे प्रदर्शन दाखवले थोड्या गप्पा मारल्या . दोघे तरुण जोडपे फारच खूष झाले . जाताना त्यांनी अनेकवेळा कृतज्ञता व्यक्त केली . त्या तरुण मुलाने माझ्यासोबत एक फोटो काढला. ते आनंदाने धन्यवाद देत गेले आणि माझी आठवणीची लेखणी सुरु झाली .
कोकण हे सगळ्यांनाच आवडणारे ठिकाण आहे . कोकणातल्या बोटी समुद्र आणि नारळाच्या बागा ,जलदुर्ग , सागरकिनारे , बोटी हे रंगवणे हे मला आजही सर्वात आवडते काम वाटते . कारण कोकण व तेथील निसर्ग हा विषयच भारी आहे .
असेच एकदा कोकणाच्या दौऱ्यात चित्र काढायला गेलो असताना दापोली येथे गेलो होतो . दापोलीला छान कृषी महाविद्यालयामध्ये मुक्काम केला होता आणि जवळपास कोणकोणती ठिकाणे पाहण्यासाठी आहेत याचा शोध घेत होतो . त्यावेळी मुरुड ,अंजरले ,दिवेआगार ,बोर्डी , हरिहरेश्वर , श्रीवर्धन त्याच्याजवळ असणारे जीवनेबंदर या ठिकाणी चित्र काढण्यासाठी फिरत होतो . मुरुड मध्ये असताना आम्ही एका प्रायव्हेट बंगल्यामध्ये रहात होतो या बंगल्याचे मालक अतिशय बोलके आणि उत्साही गृहस्थ होते . त्यांचे आडनाव श्री .मुरुडकर . त्यादिवशी मी परिसरातील चित्र काढून आल्यानंतर रात्री जेवत असताना मी चित्रकार आहे हे सांगितले . माझी चित्रे पाहिल्यानंतर त्यांनी सांगितले की मुरूडमध्ये आमच्या येथे एक वयस्कर प्रसिद्ध चित्रकार राहतात त्यांचे नाव सदानंद बाकरे आहे . परंतु हे चित्रकार अतिशय लहरी एककल्ली व विचित्र वागतात पूर्वी मी त्यांना जेवणाचा डबा पुरवायचो . परंतु त्यांच्या जेवणासाठी इतक्या तक्रारी असायच्या की आता संपूर्ण गावामध्ये त्यांना जेवण देण्यासाठी कोणीही जात नाही .हे चित्रकार मोठे असून पूर्वी परदेशातही राहत होते असे आम्हा गाववाल्यानां माहिती आहे . तुम्ही त्यांना जरूर भेटा.
त्यांनी आवर्जून सांगितल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांना सोबत घेतले व तिघेजण बाकरेसरांच्या बंगल्यावर गाडी घेऊन गेलो .
आम्ही बंगल्यात प्रवेश करण्यापूर्वीच आतून एका वयस्कर व्यक्तीचा मोठ्याने आवाज आला . कोण आहे रे तिकडे ? त्याबरोबर आम्ही लगेच थांबलो .आमच्या बरोबरचे श्री . मुरुडकर मालक यांनी लगेच पुढे जाऊन बाकरेसाहेबानां नमस्कार केला .पाचगणीवरून निसर्गचित्रकार नवराबायको तुम्हाला भेटायला आलेले आहेत तर त्यांना भेटता येईल का ? असे विचारले . त्यांनी आतूनच विचारले अपॉईंटमेंट घेतलेली आहे का ? आम्ही त्यांना सांगितले की नाही . त्यांना सांगा , पहिले आपण माझी अपॉईमेंट घ्या आणि मग भेटायला या . त्यांचे संभाषण चालू असतानाच मी त्यांना सांगितले की मी आता मुरुड सोडून दुसऱ्या गावाला चाललो आहे त्यामुळे मला नंतर भेटायला वेळ मिळणार नाही . त्यांनी आतूनच उत्तर दिले येथून 3km अंतरावर एसटी स्टॅन्डजवळ एक सार्वजनिक टेलीफोन आहे तेथे जा . तेथून मला फोन करून माझी अपॉईमेंट घ्या त्यानंतर मी फोनवर तुम्हाला वेळ देईन व त्यानंतर आपण भेटू .अपॉईमेंट घेतल्याशिवाय मी कोणालाच भेटत नाही . त्यामुळे येथून लगेच चला , चालू पडा . थांबू नका ? असे सडेतोडे उत्तर आल्यामुळे मी आणि स्वाती निराशेने बाहेर पडलो . प्रत्यक्ष माणूस समोर असताना टेलीफोन करून अपॉईमेंट का घ्यायची ? हे तंत्र मला कधीच समजले नाही . पुढे मी माझ्या व्यापात सदानंद बाकरे यांना विसरूनही गेलो
2002 साली माझे जहांगीर आर्ट गॅलरी येथे ऑडिटोरियम हॉल येथे भव्य प्रदर्शन भरलेले होते . जहाँगीर आर्ट गॅलरीबद्दल बाकीचे लोक काहीही म्हणोत परंतु माझ्यासाठी चित्रविक्रीचे ते उत्तम ठिकाण आहे . त्यामुळे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन करताना मी जास्तीत जास्त चित्रे घेऊन जात असतो . चित्र चालू असताना चित्रप्रदर्शन चालू असताना जी चित्रे विकली जातात ती मी ताबडतोब काढून ठेवतो आणि भरपूर स्टॉक सोबत असल्यामुळे नवनवीन चित्रे प्रत्येक वेळी डिस्प्ले करत असायचो . अशा या प्रदर्शनांमध्ये चित्रप्रेमी लोकांची खूपच प्रचंड गर्दी असायची आणि प्रत्येकाकडे बोलायला वेळ द्यायला लक्ष द्यायला पुरेसा वेळही नसायचा . प्रदर्शनात खूप कामे व भेटाभेटी असल्याने दिवस व्यस्ततेतच संपायचा .
त्यावेळी एकदा दुपारच्या वेळी गॅलरीमध्ये एक अर्धा बाह्याचा पांढरा झब्बा घातलेले ,निळी लुंगी खांद्यावर , सोबत एक पांढरी शबनम घेऊन एक वयस्कर गृहस्थ लंगडत लंगडत एका तरुण माणसाच्या हाताला धरून आत आले . त्यांच्याबरोबर आमच्या ओळखीचे प्रशांत शहा व आशुतोष आपटे , ज्ञानेश्वर ढवळे हे चित्रकार मित्र होते . या गृहस्थांना नीट चालता येत नव्हते तरीही ते कष्टाने लंगडत लंगडत चाललेले होते . त्यांच्या उजव्या पायाला मोठी जखम झालेली होती त्या पांढऱ्या बँडेजवर त्यांनी पॉलिथिनची साधी प्लास्टिकची पिशवी बांधलेली होती . आत येताच आशुतोष आपटे यांनी त्यांची ओळख सांगितली सुनील हे प्रसिद्ध चित्रकार सदानंद बाकरे ते तुमचे प्रदर्शन पाहायला खास टॅक्सीने तब्बेत बरी नसताना हॉस्पीटलमधून आलेत .
एका क्षणार्धात मी बाकरेंच्या मुरूडच्या आठवणीमध्ये गेलो . मला लगेच आठवले त्यांनी मला त्यांच्या घरी भेट घेऊन दिली नव्हती , त्यामुळे मी थोडासा रागाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले . बाकरेसाहेबांनी आशुतोष आपटे , ज्ञानेश्वर ढवळे , प्रशांत शहा यांच्याबरोबर माझे चित्र प्रदर्शन पाहिले स्वातीच्या फुलांची चित्रे व माझी पाचगणी महाबळेश्वर येथील निसर्गचित्रे पाहून ते खूप भारावले नंतर टेबलापाशी आल्यानंतर त्यांनी माझी गळाभेट घेतली .
त्यावेळी मी त्यानां म्हणालो मुरुडला तुमच्या घरी आलो होतो परंतु आपली भेट त्यावेळी झाली नाही ती भेट आज होणार होती . त्यावेळी माझ्याकडे मोबाईल फोन नव्हता , आता आहे .कोकणात पुन्हा कधी आलो की तुमची अपॉईमेंट घेऊनच येईन . त्यावेळी ते मला निराश स्वरात म्हणाले अहो ती माझी चूकच होती . कशाला आठवण काढलीत ? आता म्हातारपणात हातपाय थकलेत . कोणाचा आधार नाही . त्यावेळचा जोष व हुशारी आता राहीली नाही . आता तर शरीरही साथ देत नाही . तुम्ही त्यावेळी आला होता त्यावेळी भेटलो असतो तर बरे झाले असते . आता काय शेवटचे दिवस उरलेत . येणारा दिवस ढकलतोय .
आज कितीतरी दिवसांनी हॉस्पिटलमध्ये असताना मला तुमच्या दोघांविषयी टाईम्स ऑफ इंडियात आलेले " कलर्स ऑफ लाईफ " हे आर्टिकल वाचायला मिळाले . मग मी हॉस्पिटलमधून तडक तुमचे चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी आलो आहे . खरे सांगतो , तुमच्या दोघांचे प्रदर्शन खूप छान , अप्रतिम आहे . मला खूप आवडले . त्यांनी पाठीवर हात ठेऊन कौतुकही केले . थोडा वेळ खुर्चीवर बसले व त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा प्रदर्शन पाहण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळी आमचे मित्र प्रशांत शहा मला म्हणाले अरे मित्रा ,
' काय नशीबवान आहेस ' अशी मोठी माणसे तुमच्या प्रदर्शनाला दाद देत आहेत . त्यांचा अभिप्राय घे व फोटो घे . त्यावेळी बाकरेसाहेबांनी आमच्या अभिप्राय वहीमध्ये त्यांची सही करून थरथरत्या हाताने एक छोटासा अभिप्रायही लिहिला . त्यांच्या हाताला झालेला कंप जाणवत होता , थरथरत्या हाताने त्यांनी शेवटचा अभिप्राय लिहिला .त्यावेळी त्यांनी सांगितले मुरूडच्या घराबाहेर फिरत असताना त्यांच्या पायाला विषारी साप चावला .त्या दंशामुळे पायाला मोठी इजा झालेली आहे . स्वतःचे जवळचे कोणी नातेवाईक माणसे मदतीला नव्हती त्यामुळे योग्य उपचार झाले नाहीत . त्यासाठी ते मुंबईमध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते . आता जखम बरी झाली आहे . थोडेफार चालू शकत होते .
त्यांनी प्रेमाने निरोप घेतला व आता फोन करू नको डायरेक्ट मुरुडला या असे आमंत्रणही दिले होते , परंतु नंतर मी त्यांच्याकडे परत गेलो नाही .आज कितीतरी वर्षानंतर आलेल्या एका तरुण जोडप्यामुळे मला त्यांची परत एकदा आठवण झाली .
केकू गांधी यांच्या गॅलरी केमोल्डमध्ये मी तीन वर्ष फ्रेमिंग सेक्शनमध्ये होतो . तेथे प्रोगेसिव्ह आर्ट ग्रुप स्थापन केलेले हुसेन , रझा , आरा , गाडे , सुझा , बाकरे यासारख्या जगप्रसिद्ध कलाकारांची चित्रे गॅलरी मधून फ्रेमिंगसाठी येत असत . त्यांच्या चित्रांच्या किमंतीचे आकडे ऐकले तरी कानाला शॉक लागल्यासारखे वाटायचे . त्यांची नावे चित्रकला क्षेत्रात मोठी दबदबा करणारी व आदराने घेतली जातात . त्यानंतर या ग्रूपमधले पांढरा झब्बा लुंगी घालून आलेले हताश चित्रकार सदानंद बाकरे जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रत्यक्ष समोर पाहीले . त्यांची छबी कायम लक्षात राहीली .
एकदा सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे प्रकाश राजेशिर्के भेटले होते ते त्यांच्या संपर्कात होते . त्यांनी त्यांची दुर्देवी कैफियत थोडक्यात सांगितली . एका मोठ्या कलावंत चित्रकारांच्या उतारवयात काय उपेक्षा होवू शकते याची मला कहाणी त्यांना ऐकवली . मला बाकरेंच्या स्वभावाची प्रचिती आलेली होती त्यामुळे पुढे त्यांचे काय झाले याची मला आता पूर्ण माहिती नाही .
गेटच्या दारात आलेला पाहूणा , मित्र किंवा अनोळखी व्यक्ती असो , तो गरीब असो वा श्रीमंत असो , चित्रकार असो वा सामान्य माणूस असो . मी त्याच्यासाठी प्रत्यक्ष गेटवर जावून त्याची दखल घेतो . दोन शब्द बोलतोच . कारण तो एक माणूस आहे आणि " माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहीजे " असे मला मनापासून वाटते .
आपण माणुसकी जपणारे नसलो तर तुमच्या छोटेमोठेपणाला काहीही अर्थ नाही याची आठवण मला सदानंद बाकरे प्रसंगातून कायमची लक्षात राहीली आहे . आपण माणुसकीसाठी कायम सतर्क राहीले पाहिजे असे मला वाटते .
मोठेपणाची झूल तारुण्यात जोर दाखवते , उतारवयात सर्वांचाच जोष उतरलेला असतो . मग उतारवयात पश्चाताप होतो पण त्यावेळी खूप उशीर झालेला असतो .
आज असलेले यश कधी पलायन करेल ? व अपयशाचा कधी सामना करावा लागेल ? हे कोणालाच माहिती नसते . आयुष्याचा खेळ कधी कोणाचा पलटेल याची खात्री कोणी देऊ नये .
" समय बडा बलवान होता है " .
" माणूसकी " नेहमी जागृत ठेवण्यासाठी सर्वानां शुभेच्छा !
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुनील काळे✍️ 9423966486
निसर्ग आर्ट गॅलरी [वाई ]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा